फॉलोअर

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

कविता - सरकारीच पाहिजे. - किरण चव्हाण.

                     आजच्या काळात जेंव्हा मुलगा मुलगी पहायला जातो तेंव्हा सहाजीकच मुलगीच्या घरच्या अपेक्षा वाढलेल्या दिसून येतात... आणि त्यामध्ये एक अपेक्षा असतेचं असते ती म्हणजे मुलगा सरकारी नोकरीला असला पाहिजे...ही अपेक्षा असणं वाईट नाही पण याचा अर्थ असाही नाही नोकरीलाचं प्राधान्य देताना  की तो मुलगा कसा आहे..? याला आपण दुय्यम स्थान द्यावं...त्यावर आधारित ही रचना...


.... सरकारीच पाहिजे.


आवं पावणं पोरगं निरोगी,निर्व्यसनी हाय.

चांगलं धट्टा-कट्टा,धडपडी,हरहुन्नरी हाय....


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीच पायजे हाय.


पावणं...पोरगं चांगलं शिकल्यालं हाय,सुशिक्षितबी हाय..

पण एवढंच काय,जरा खाजगी नोकरीला हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


प्रामाणिक हाय हं...पोरगं. 

चांगल्या विचारांचं हाय.

लई चांगल्या गुणांचं, माणुसकीला धरून हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


बरं... पोरगं उद्योगी हाय..चांगला पैसा कमावणारा हाय...

घरदार बघितला तर सगळं जिथल्या तिथं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पावणं चार एकर शेती हाय, पोरगा उत्तम शेती करतो..

कायबी कमी न्हाय गुण्यागोविंदाने राहतो.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


पोरगा माप शिकलाय पण 

व्यवसाय करायचा म्हणतोय,

लाथ मारील तिथं पाणी काढल..

आसं खणखणीत नाणं हाय.


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


स्वभावानं पोरगं बघा,एक नंबरी हाय..

आई-बाच्या शब्दाबाहीर जरासुद्धा न्हाय.

पैसा आडका धन दौलत काय कमी न्हाय

खाऊनपिऊन सगळं कसं सुखामधी हाय..


पावणं ते काय न्हाय...

पोरगं सरकारीचं पायजे हाय.


सरकारी...सरकारी...सरकारी.


बरं पावणं हाय एक पोरगं आसं.

तुम्हीं म्हणताय तसं..


वरून दिसायला माप चांगलं पण गुणानं चांगलं नाय...

व्यसनीबी हाय आणि जरा रोगीबी हाय.

नोकरी हाय म्हणायची सरकारी,

पण कसं वागायचं कळत नाय..

लाचारासारखा वागतो, थोडा भ्रष्टाचारही करतो..

प्रमाणिक तर नाही,

ना कुणाशी देणं-घेणं.

सदा आपल्याच तोऱ्यामोऱ्यात.

नाही विचार करून वागणं.

पगार माप चांगला हाय खरं वागण्याची अक्कल नाय.

पण एवढं मात्र नक्की पोरगं सरकारीचं हाय...


मग काय पावणं...? याच्यापुढं तुमचा इचार तरी काय..?


पावणं ते काय बी आसू दे..

पोरगं नक्की सरकारीच नवं हाय...

याच्यापुढं कसलाच इचार पाचार न्हाय.


             - किरण चव्हाण.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

'अनाथांचा नाथ...मायबाप संतोष गर्जे'.- किरण चव्हाण.

 


ऊसतोड कामगार मायबापाचा लेक झाला शेकडों अनाथ लेकरांचा माय-बाप...

            ...असा अनाथांचा नाथ संतोष गर्जे.


                                             एक दुर्दैवी अघटीत घटना आयुष्यात घडली. ज्याने हृदयावर असा काही आघात केला की,ती ठसठसणारी वेदना संवेदना होऊन गेली. आपल्यासारख्या अनेकांच्या वेदनेंशी ती नातं जोडत गेली.. तो अशाच वेदना घेऊन जगणाऱ्या, मायेच्या नात्यांना पोरकं झालेल्यांना हृदयाशी जोडत राहिला.. विस्कटलेल्या.. उध्वस्त झालेल्या.. निरागस निष्पाप कोमजेलेल्या मुलांच्या मायेचा तो धागा झाला... तो होतो त्यांचा तारणहार... ज्यांची माय गेली त्यांची माय झाला... ज्यांचा बाप गेला त्यांचा बाप झाला...आणि ज्याचं सर्वस्व गेलं... त्यांचं तो सर्वस्वचं झाला... ज्याला कोणी नाही त्याला तो आहे आणि असा तो अनाथांचा नाथ... माय-बाप संतोष नारायण गर्जे.

                                            बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा हे छोटसं गांव.. या गावात वडील नारायण गर्जे व आई छबुबाई नारायण गर्जे यांच्या पोटी २७ ऑगस्ट १९८५ साली संतोषजींचा जन्म झाला. तीन भाऊ-तीन बहिणी अशी एकूण सहा भावंड.. आईवडील शेतमजूर,ऊसतोड कामगार... हातावरचं पोट त्यामध्ये खाणारी तोंडं आठ... हाताला जेंव्हा काम तेंव्हाच कुठे हातातोंडाची पडणारी गाठ... गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.पूर्णपणे हलाखीची परिस्थिती.माय-बाप ऊसतोड असल्याने कामाच्या निमित्ताने परमुलखाला जायचे..सहा- सहा महिने त्यांची भेट व्हायची नाही.जिथं खायचे वांदे तिथं शिक्षणाचं काय..? त्यामुळं  शिक्षणाची ही ऐसीतैसीचं. मुली उपवर झाल्या तशा लगीन लावून दिल्या... त्यात संतोषजींचं भाग्य एवढंच की, सगळ्या भावंडात त्यांना कॉलेजपर्यंत शिक्षण मिळत गेलं.. संतोषजी १२ वीला असताना ती दुर्दैवी घटना घडली... त्यांची मोठी ताई लगीन होऊन सासरी नांदत होती...तिच्या पोटाला पहिली साडेतीन वर्षांची नेणती पोरं.. आणि ती पुन्हा सात महिन्यांची गरोदर होती... घरात भांड्याला भांड लागतं तसं संसारात नवरा बायकोचं भांडण हे ठरलेलचं. पण एकेदिवशी जोराचा वाद झाला नवऱ्याला राग अनावर झाला... डोळं नसतातचं रागाला ते खरंच... रागाच्या भरात त्याने मारली जोराची लाथ त्या नाजूक पोटावर...अन ती धाडकन कोसळली जमिनीवर... तळमळली... तडफडली... जीवानिशी कळवळली...  नाही तो आघात तिला सहन झाला.. नी शेवटी सोडला तिने प्राण पोटातल्या नेणत्या जिवासह... दोन जीवांचा अंत झाला..हे अमानुष पातक घडल्यावर त्यावेळी इकडे संतोषजींच्या आईवडिलांना निरोप आला तुमची मुलगी आजारी आहे बघायला या.जातात तर काय..? तिथे उरला होता फक्त तिचा निर्जीव देह.                  

                       एक सुंदर निरागस उमलत्या कोवळ्या कळीची माय या जगातून कायमची निघून गेली.. कळी पोरकी झाली. 


काय चूक होती हो तिची..? तिच्या मायेचं छत्र हरवलं... आता तिला आईची माया कशी मिळणार..? बाप असूनही बाप राहिला नाही.. असा निष्ठुर बाप... बाप होऊ शकतो...? नाही. तिची माय गेली आणि बापही... आता कोण देणार या नकळत्या लेकराला मायबापाचं प्रेम ?... संतोषचे आईवडील त्या नकळत्या निरागस लेकराला घरी घेऊन आले..संतोषजींच्या संपूर्ण घरासाठी हा मोठा धक्का होता... कसं सावरायचं यातून..? आईवडिलांचं छत्र हरपण हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख... तिचं हे दुःख कोण निवारील..? आता होता येईल का कोणाला तिचा मायबाप...?  आणि असाच तिचा मायबाप होऊन विचार करत होता तो... तो म्हणजे संतोष... आणि ठरलं.मऊ मातीवर वळीव पावसाचे थेंब झडावेत आणि फुटावा रुजल्या बीजाला नवांकुर... तसं या प्रसंगाने संतोषजींच्या संवेदनशील मनातून एक विचारांकुर फुटला.या निष्पाप निरागस जीवाचा आपण झालो तर मायबाप..? होय आपण व्हायचं मायबाप.. पण या एकाच जीवाच्या नाही तर अनेकांच्या... ज्याची माय नाही त्याची माय आणि ज्याचा बाप नाही त्याचा बाप व्हायचं... जसा अनेक फुलांना गुंफणारा धागा तसा पोरक्या मुलांच्या मायेचा धागा व्हायचं... त्यांचं हरवलेलं बालपण पुन्हां त्यांना द्यायचं. वय तर काय होतं ते... केवळ १८ वर्षांचं कोवळं वय.. नुकत्याच ओठावर उगवणाऱ्या कोवळ्या मिशा... कॉलेजकुमार होऊन ऐटीत रूबाबात फिरायचं.. गुलाबी स्वप्नं रंगवायचं...  मित्रांच्या संगतीत भान हरपून जगायचं...  बेभान व्हायचं..? कळतनकळत कुणाच्या प्रेमात पडायचं... पण हे हे सगळं सोडून त्याला हे काय नवीनच सुचत होतं..?  आईबापाचं प्रेम द्यायचं.. अनाथ मुलांचा मायबाप व्हायचं... आणि सुरू झाला प्रवास...


                           आता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची म्हणजे धडपड केली पाहिजे... हातात पैसा पाहिजे... पैसा पाहिजे म्हटल्यावर हाताला काम पाहिजे आणि म्हणून मग गांव सोडलं आणि कामाच्या शोधात पावलं वळाली शहराकडे.. औरंगाबाद शहरामध्ये मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. इथे दोन महिने तर तिथे तीन महिने मिळेल तिथे  काम करायचं. मिळेल ते म्हणजे एका घरात कामाला असताना तेथील दर चार दिवसाने तुंबलेल्या चेंबरमधील मानवी मैला उपसून काढायचंसुद्धा काम केलं... पडेल ते काम करायची तयारी होती... पोटापूरता पैसा हाती येत होता.. दिवस असेच जात होते. पण एका क्षणाला मनाला जाणवलं की, हे असं कुठपर्यंत असे दिवस काढायचे..? चार पैसे कमवण्यातच जर असे दिवस जात असतील तर मग आपल्या उद्दिष्टासाठी आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी करायची...? मनाची अस्वस्थता वाढत गेली... आणि पुन्हा मनाने आपल्या ध्येयाप्रत उचल खाल्ली.

                         अनाथ लेकरांच्यासाठी काहीतरी करायचं  आणि मग औरंगाबाद सोडून गेवराई तालुका गाठला... अनाथाश्रम सुरू करण्यासाठी गेवराई तालुका निवडला... त्यापाठीमागे कारणंही तशी होती...  गेवराई तालुक्यात मागासवर्गीय समाज जास्त आहे, बंजारा समाज असल्यामुळे ऊसतोडणीसाठी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते, लालबत्ती परिसर (रेड लाईट एरिया), शेतकऱ्यांच्या आत्महत्या,  बालविवाहाचे प्रमाण इथं सर्वात जास्त आहे. त्यामुळे अशा कारणामुळे हाच परिसर निवडला. एका मित्राची गेवराई ही सासरवाडी. पण तिथे त्याचे सासुसासरे राहत नव्हते.. म्हणून तिथली ती जागा वापरण्याची परवानगी मिळाली... जागेचा तरी प्रश्न सुटला पण अजून खूप प्रश्नं समोर उभे होते... आता मुख्य म्हणजे मुलांची जमवाजमव करायची. शेजारच्या गावात फिरून चौकशी केली.. लोकांना सांगायला सुरुवात केली. मी अनाथाश्रम सुरू करतो आहे.. अनाथ गरजू मुले कुठे असतील तर पाठवून द्या. पण कुणाशी ओळख ना पाळख.. त्या भागात अगदी नवखा गडी कोण प्रतिसाद देणार...?अशातच पंधरा दिवस गेले काहीच मेळ लागत नव्हता.. म्हणून थांबून चालणार नव्हते. दुकानदारांच्याकडे जाऊन चार-आठ दिवसांच्या वायद्यावर प्रथम काही साहित्य खरेदी केलं.. पत्रे, चौकटी, फरशी, खिळामोळा इ सुरुवातीला एकूण ७५ पत्रे लागले वरती पंधरा आणि खाली साठ असे तीन खोल्यांचा पत्र्यांचा निवारा तयार केला..आणि अशाप्रकारे २००४ साली कसेतरी पहिले अनाथालय उभा राहीले.ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.


हे करत असताना संतोषजीं हे काम मी स्वतः करत आहे हे लोकांना जाणवू न देता औरंगाबादमध्ये मोठा साहेब आहे त्यांच्या सांगण्यावरून हे काम चालू आहे,मी फक्त कामगार आहे असे लोकांना भासवत होते. कारण एवढंच की, लोकांनी हे ऐकून तरी मुलं पाठवावीत नाही तरी  माझ्यासारख्या अनोळखी माणसांवर कोण विश्वास ठेवणार..? असे त्यांना वाटत होते. अशी एकूण सर्व परिस्थिती...  त्यानंतर उदारीवर एक महिन्याचा शिधा, किराणा साहित्य भरून ठेवले आणि मग पुन्हां मुलांचा शोध... वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं. तांड्यावरती,  वाड्यावस्त्यावरती जायचं, केशकर्तनालयाचे दुकान असेल, शाळा, ग्रामपंचायत जिथं तिथं जाऊन लोकांना मनातली संकल्पना पटवून द्यायची.. पण लोकांचा विश्वास बसत नव्हता... त्यात भरीस भर म्हणजे एक अशी अफवा पसरली होती की, पोरंधरीवाले पोरं धरून इमारती, तलावाच्या पायात घालण्यासाठी नेतात.. त्या पोरंधरी माणसांच्या सारखाचं त्यावेळी काहीसा  मिळता-जुळता अवतार.. मग काय..? सगळीचं पंचायत.. तरीही प्रयत्न सोडले नाहीत... शेवटी प्रयत्न फळाला आले अथक सायासातून सात मुलं गाठीशी पडली... प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली... लेकरं निवाऱ्याला आली...

                                        मनात एक पूर्वीपासून स्वप्नं होतंच की, जे आपल्याला मिळालं नाही... पाठीवरचं दप्तर असेल... शाळेचा गणवेष, वह्या, कंपास... पायातली चप्पल. पहिल्यांदा हे सारं या लेकरांना द्यायचं... म्हणून हे सर्व साहित्य सुरुवातीला दुकानदाराकडून उधारीवर उपलब्ध करून घेतलं आणि मुलांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेष.,चप्पल इ वस्तू घेऊन दिल्या.. आगोदरच महिनाभराचं राशन किराणा माल सुद्धा उधारीवरच भरला होता. आता हे झालं पण जेवण बनवायचं कुणी..?. स्वयंपाकीन आणायची कुठून..? त्यामुळे स्वतःच स्वयंपाक बनवायचा. पण जेवण कुणाला बनवायला येतं होतं म्हणून सुरुवातीला पोहे, खिचडी, शिरा याच्यावरच जोर दिला आणि महिनाभरातच सगळा माल संपून गेला... बरं मुलं आता रमली होती तसे त्यांचे दाखले आणले त्यांना शाळेत दाखल केलं.मुलं शाळेलाही जाऊ लागली... पण मुख्य म्हणजे त्यांच्या पोटाला घातलं पाहिजे... थांबून चालणार नव्हतं. मग उत्पन्नाचा मार्ग कुठला..? तर मग मोठे बंगले... इमारती.. मोठी दुकाने इथं काही  मिळेल या आशेने मागायला जायचं.. बरं त्यासाठी स्वतःजवळ ठोस पुरावा नाही.. एका साध्या लेटरपॅडवरती या अनाथाश्रमाविषयीच्या चार पाच ओळी प्रिंट केलेल्या बस एवढीच काय ती आपल्या कार्याची ओळख लोकांना दाखवायची... मोडक्या तोडक्या शब्दांत त्यांच्यासमोर मांडायची... त्यावेळी कुठे कोण दहा-पाच रुपये द्यायचे.. कोण नानाविध प्रश्न विचारायचे.. तर काहीजण अक्षरशः हाकलून लावायचे... हे करत असताना मनाला कुठं तरी शरमिंदापणा वाटायचा...

                                             खरंच खूप कठीण होतं हे काम...दुरूनच डोंगर चांगले दिसतात ते खरंच... इथं तर दिवसेंदिवस अडचणींचा डोंगर उभा होता.पण घेतला वसा टाकायचा कसा..? उमेद हरून चालणार नव्हती. गावोगावी,  घरोघरी जायचं मोठंमोठी दुकाने, कार्यालये फिरायचं.. आणि जे काही मिळेल पैसे, कपडालत्ता, शिधासाहित्य, मुलांचे शैक्षणीक साहित्य अशा स्वरूपात ते जमा करून या लेकरांसाठी आणायचे...-लोकांनी द्यायचं... आपण  मागायचं... आणि या लेकरांची सोय करायची. असाच उद्योग सुरू होता. पण फक्त हेच काम असायचं का..? खूपदा असेही वाईट प्रसंग उभा रहायचे... एकदा अशी घटना घडली... रात्रीची वेळ.. बाहेर रिपरिप गळणार पाऊस.. लाईटची सोय नाही.. आणि त्या रात्रीला एका मुलाला विंचू चावला... ते लहानगं पोरं ओरडायला-बोंबलायला लागलं.. आता काय करायचं..? तसंच त्याला उचलून खांद्यावर घेऊन त्या पावसातून जवळजवळ तीन साडे तीन कि. मी अंतर पार करून तब्बल २ तासांनी दवाखाना गाठला.. डॉक्टरांनी उपचार केले... आणि एक दिवस दवाखान्यातचं थांबावं लागेल असे सांगितले... दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज केला आणि बिल केलं २२०० रु.आता आली का पंचायत.. आता हे लेकरू कुठून आणलं..? आपलं कार्य काय आहे हे त्यांना सांगून का उपयोग आहे..? खिशात एकूण रुपये होते फक्त ६७ रु... त्यात गेवराईत कोणीच ओळखीचं नाही.... आता काय करावं..? त्या मुलाला तिथेच दवाखान्यात ठेवून पुन्हा मागे परतले... जिथे रहायला होते तिथे एक काशीनाथमामा होते त्यांच्याकडून ७ रुपये टक्याने ५००० रु.घेतले आणि मग बिलाची रक्कम भरून त्या मुलाला घेऊन माघारी आपले ठिकाण गाठले... असे एक ना अनेक बरेवाईट प्रसंग अनेकदा यायचे.. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता... लेकरांच्या खाण्यापिण्याला... दुखण्याखुपण्याला वणवण फिरावं लागायचं... शेतातलं पत्र्याचं शेड सोडून शहरात एक घर भाड्याने घेतलं. गेवराईतल्या त्या राहत्या घराचे भाडे द्यायलाही एकेकदा हातात पैसे नसायचे... अशी दळभद्री अवस्था झाली होती.

                                         कोणत्याही चांगल्या कार्याला फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं...अर्थातच संतोषजींनाही जावं लागलं.. अनेक विघ्नसंतोषी माणसांनी त्रास दिला...एकाने तर कळसचं केला होता.संतोषजींच्या तारुण्याचा गैरफायदा घेत त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करून एकूणच चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला... पण सत्याला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी खोटंच उघडं पडतं देवदयेने त्या माणसाला कशी काय सुबुद्धी मिळाली आणि कालांतराने ज्या माणसाने हे आरोप केले होते त्यानेच शेवटी संतोषजींची माफी मागितली. याच्याही पुढे एकदा डोक्यात लाकूड घालण्यापर्यंत जीवावरचा प्रसंग ओढवला होता.म्हणजेचं काय कोणतंही चांगलं काम करताना जशी विघ्नसंतोषी माणसं ही वाट्याला येतातचं त्यांची संतोषजींना काही कमी नव्हती..हरेकप्रकारच्या लेकरांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागायची.... हातांत तर पैसे नसायचेच... प्रत्येक वेळेला हाती कटोरा घेऊन लोकांच्यापुढे जावं लागायचं... त्यांनी द्यायचं की नाही त्यांची मर्जी... कधी मदत मिळायची... नाही मिळायची... हेटाळणी तर रोजची ठरलेलीच... वाटेवरचा भिकारी श्रीमंत वाटायचा इतकी दरिद्री अवस्था होती... रोज मागून आणून लेकरांना काय घालायचं हा प्रश्न प्रत्येकक्षणी छळत होता... खायला काय तर बाजरीची भाकरी आणि भाजी... सणावाराला जशी पुरणपोळी करतात त्या पुरणपोळीची किंमत  इथं कधी तरी केल्या जाणाऱ्या वरणभाताला होती... हातात नेहमी तुटपुंजा पैसा आडका असायचा... आठवडी बाजार असला की, बाजार संपताना लेकरांच्या हातावर मोजके पैसे ठेऊन बाजार करण्यास पाठवून द्यायचं. किडकं-सडकं जे काही ढिगानं मिळेल ते आणण्यास सांगायचं.

                          त्यांना न्हाऊ-खाऊ घालण्यापासून त्यांच्या दुखण्याखुपण्यापर्यंत सगळं एकट्याला बघायला लागायचं... त्यांचा सांभाळ... शिक्षण त्यांचं बालपण जपायचं या साऱ्याला एकटा माणूस कुठं कुठं पुरणार... एकेकदा नको वाटायचं हे सगळं... खूप त्रास व्हायचा... चीड चीड व्हायची... रात्ररात्रभर डोळ्याला डोळा लागायचं नाही... उठून रात्रीच्या अंधारात एकटंच भुतासारखं आपल्याच तंद्रीत  एका जाग्याला बसून रहायचं... वाटायचं आपण मांडलेला डाव आपणच मोडून टाकावा का..? पण नाही या लेकरांचा भूतकाळ आठवला की, हा त्रागा कुठल्या कुठे निघून जायचा... काय दोष असतो हो या मुलांचा... एकेक मुलाचा भूतकाळ म्हणजे थक्क करणारा...गेवराईतलाचं हा प्रसंग गावापासून दूर गायरानात नवराबायको,लेकरं रहात होती..एकदा नवराबायकोंचं लागलं जोराचं भांडण... दारुडा नवरा गेला कुठे बाहेर...आईने लेकरांना बाहेर पिटाळून लावले आणि घेतले स्वतःला पेटवून...ती लेकरं आईबापाच्या या भांडणाला भिऊन गेली जवळच्या नातलगांकडं आणि नवरा दोन -तीन दिवस बाहेरचं..त्या लेकरांच्या मायेचं प्रेत तीन दिवस जळालेल्या अवस्थेत पडलेलं होतं... सडलेलं होतं... बाप असा दारुडा आणि माय अशी गेली मरून... काय करावं त्या लेकरांनी.त्या अजाणत्या लेकरांवर शेवटी दारोदार भीक मागायची वेळ आलीना..? मग या लेकरांना वाली कोण..?अशा लेकरांना मायेचा आधार देणार कोण..? मी जर ही जबाबदारी नाकारली आणि प्रत्येकांनी जर असं म्हटलं तर ही जबाबदारी मग घेणार कोण .? आज जर मातीमध्ये बियांनी स्वतःला गाडून घेतलं तर उद्या नवीन बीजं तयार होतील ना..... म्हणून तर या लेकरांचं आयुष्य फुलवण्यासाठी संतोषजींनी आपलं आयुष्य रुजवलं.

                                          हे सर्व करत असताना आपण जे काही करतो आहोत ते एक सामाजिक काम आहे याची पुसटशीही कल्पना संतोषजींना नव्हती. पण  कालांतराने दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे संतोषजी एकदा अभय बंग यांच्या शिबिराला औरंगाबाद येथे गेले होते व दुसरी म्हणजे २००९ साली डॉ. बाबा आमटे यांचे निधन झाले त्यावेळी लोकसत्तामध्ये त्यांच्यावर एक अग्रलेख छापून आला होता तो वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने अनाथाश्रम ही संकल्पना समजायला मदत झाली... मग पुढे कुणीतरी सरकारकडे मदतीसाठी जायला सुचवलं... आणि मग प्रत्येक  मुलांच्या माहितीची एक भली मोठी प्रोफाइल तयार केली... आणि मग त्यावेळचे महिला व बालकल्याण मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली... आपली ओळख त्यांना  सांगितली... मुलांच्याविषयीचे कार्य थोडक्यात सांगितले... आणि मग अनुदानाची मागणी केली... तयावेळी मंत्री महोदयांनीही आस्थेने विचारपूस करून पुढच्या कार्याची दिशा सांगितली... अशा कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे या मुलांची माहिती देण्यास सांगितली... आणि मग कार्याच्या निमित्ताने त्या विभागाला गाठीभेटी देण्यास सुरुवात झाली...  यातून बरीच माहिती समजत गेली. थोरामोठ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत गेले...काय वेळ असते पहा..या कामाची सुरुवात करताना स्वतःची ओळख लपवून काम करावं लागलं...पण ते करत असताना ते काम एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की आभाळाएवढ्या उंचीच्या माणसांनी या कामाची दखल घेतली. एकदिवस आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब संतोष गर्जे कोण..?ही ओळख विचारत संताजींच्या अनाथालयात आले.

 तर आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांनी स्वतःहुन पुण्यात बोलावून घेऊन संतोषजीं व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.         


संतोषजींनी  मुलांचे कायदे... त्याची प्रक्रिया समजून घ्यायला सुरुवात केली.  कोणती मुलं घ्यायची त्याच्या अटी व निकष काय..? कायदेशीर बाबी काय आहेत याची माहिती होत गेली... सरकार दरबारी संस्थेची मान्यता... अनुदान मिळण्यासाठी चकरा मारताना नाकेनऊ आलं होतं... किती चकरा मारायच्या त्याला हिशोब नव्हता... भीक नको खरं कुत्रं आवर... अशी तऱ्हा... पैसे मिळवण्यासाठीही पैसे द्यावे लागतात हे त्यावेळी कळालं... कुपंणच जेंव्हा शेत खातं त्यावेळी बोल लावायचा कुणाला..? बिचारा हा माणूस कोणासाठी धडपडतोय आणि आपण कोणाकडे पैसे मागतोय..? याचंही भान या माणसांना नसावं.  माणसांत नसलेल्या माणसांची ही अशी नुसती खाऊगिरी... असो पण अखेर अथक प्रयत्नांतून महिला व बालकल्याण विभागाकडून 'आई संस्था संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' या त्यांच्या संस्थेला शेवटी मान्यता मिळाली.

           २०११ साली संतोषजींच्या आयुष्यात प्रीतीजी पत्नी म्हणून आल्या... त्यांच्या लग्नाचाही हा किस्सा मोठा विलक्षण आहे. तो म्हणजे दिनांक ११-११-२०११ साली. घड्याळातील ११ वाजून ११ मिनिटांच्या मोबाईलच्या गजरवर हा अगदी साधासुधा अनोखा विवाह पार पडला...  पतीने पत्नीला म्हटले की, 'मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो' आणि पत्नीने पतीला म्हटले 'मी तुमचा पती म्हणून स्वीकार करते'... बस या परस्पर विश्वासाच्या दोन ओळींनी सहजीवनाचे काव्य रचले...

आजपर्यंत संतोजींच्या रूपातून मुलांना बापाच्या हृदयाची माया मिळत होती... आता प्रीतीताईंच्या रूपातून त्यांना आईच्या मायेचं हृदयही भेटलं आहे.. संतोषजींच्या खांद्याला खांदा लावून प्रीतीताई या मुलांच्या सेवाकार्यात झोकून देऊन काम करू लागल्या... त्यांचं खाऊ-पिऊ-न्हाऊ असू दे दुखणं-खुपणं असू दे सारी निरवानीरव करू लागल्या... संतोजींना आता खुप मोठा आधार मिळाला होता. आतापर्यंत या कार्याचा भार एकट्याने ओढला जात होता... पण त्या कार्यरथाला आता साजेशी दोन चाकं मिळाली होती... खऱ्या अर्थाने आता अधिक ताकदीने काम करायला... मनातलं सगळं बोलायला... दुःखाचा कड हलका करायला कोणीतरी हक्काचं माणूस मिळालं होतं. यानंतर कामाला गती आली..


                           आतापर्यंत  बऱ्यापैकी चांगल्या लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या होत्या... होतं होत्या लोकांची हळूहळू चांगल्याप्रकारे मदत होऊ लागली... लोकं आपणहून मदत करू लागलीआज समाजाच्या दातृत्वावर खऱ्या अर्थाने संस्थेचं काम चांगल्यापद्धतीने चालू आहे. संस्थेतील तीन लेकरं आज संतोषजींच्या हाताखाली काम करतायेत... समाजातील देणारे मायबाप आणि बालग्राम संस्थेचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झाले आहे... दिवसेंदिवस हा स्नेह वृंधीगत होतो आहे... चार दोन दिवसाला कोणी ना कोणी पाहुणे येत असतात या परिवाराला भेटतात,मुलांच्यात रमतात.सहारा अनाथालय बालग्राम परिवार हा एक समाजाचा घटक झाला आहे.


किंबहुना मायेचा हा एक व्यापक परिवार झाला आहे. 'इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला उंच गगनावरी' याप्रमाणे इवलाशा अंकुराचं रोपटं झालं आणि आता ते रोपटं आभाळाच्या दिशेनं झेपावूसुद्धा लागलं आहे.अनेक पोरक्या... अनाथ मुलांना साऊली देऊ लागलं... 

कधी काळी परक्याच्या आसऱ्याला असणारी 'आई' आज स्वतःच्या जागेत उभी आहे..म्हणजेच आगोदर भाड्याच्या घरात असणारा 'आई संचलित सहारा अनाथालय बालग्राम परिवार' हा परिवार  आज स्वतःच्या जागेत उभा आहे. संस्थेची आज तीन एकर जागा आहे... 



पक्की इमारत आहे. १७ वर्षांच्या खडतर प्रवासातून आज माय बाप दात्यांच्या उदात्त दातृत्वावर आज या संस्थेची वाटचाल सुरू आहे... सुरुवातीला संतोषजींनी सात मुलांपासून सुरुवात केलेल्या अनाथालय परिवारातून आजतागायत ३०० मुलांना मायेचा निवारा देऊन त्यांचे भरणपोषण करून त्यांना लहानचं मोठं केलं त्यांच्या पायांवर उभं करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ दिलं..

मुलांच्या शिक्षणाबरोबरच आज या संस्थेत मुलांच्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम घेतले जातात...बालरंग शिबीर यामाध्यमातून मुलांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या कलेनुसार त्याच्या विकासावर भर द्यायचा...दुसरं म्हणजे भान तरूणाईचे.हे तीन दिवसीय निवासी शिबिर घेतले जाते..परिसरातून व बाहेरून शेकडों शिबिरार्थी या शिबिरात सहभाग घेतात...आदरणीय गुरुवर्य इंद्रजित देशमुख आदी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत,वक्ते मुलांना मार्गदर्शन करतात.



मुलांच्या विविध कलागुणप्रदर्शनाचा कार्यक्रम.. बाल अविष्कार या कार्यक्रमामध्ये नाटक,गाणी लोकसंस्कृती दर्शन घडवणे  अशाप्रकारे मुलांच्या कलागुणांना वाव देऊन मनोरंजनसोबत प्रबोधन करण्याचा हा कार्यक्रम आहे..सध्या याचे पाच प्रयोग झाले असून याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे... समाजजागृतीचे उद्दिष्ट ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात हा या कार्यक्रमाचे प्रयोग करण्याचा संकल्प आहे...होळीचा रंग दे बसंती हा कार्यक्रम या कार्यक्रमात देखील बाहेरच्या परिसरातून लहानथोर मंडळी सहभाग घेऊन रंगाची उधळण करून भरपूर आनंद लुटतात.



रक्षाबंधन,भाऊबीज, दिवाळी दसरा असे सर्व सणउत्सव आनंदाने साजरे केले जातात.मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी जाऊन मुलांनी सहलीचा आनंदही लुटला आहे.


 अभ्यासाबतोबरच रांगोळी,चित्रकला,गाणी अशा विविध प्रकारच्या कलेत मुलं रममाण होत असतात.





                     आज रोजी संस्थेत १०६ मुलं आहेत... अडीच वर्षांच्या बालकापासून २२ वर्षांच्या मुलांपर्यंत ही संस्था त्या अनाथ लेकरांच्या पोरकेपणाला दूर सारून त्यांना आपलंसं करते आहे... त्यांच्या हक्काचं बालपण जपते आहे. त्यांचा मायेनं सांभाळ करुन लहानाचं मोठं करते आहे... आणि शेवटी त्यांना आपल्या पायांवर उभं राहण्याचं बळ सुद्धा देते आहे... आज या संस्थेत राहून मुलं-मुली चांगलं शिक्षण घेत आहेत... मुलं शिकून शहर ठिकाणी इंजिनिअर... तर कोण कंपनीत चांगल्या पदांवर काम करीत आहेत... मुलीही शिकून ब्युटी पार्लर... फॅशन डिझाईन सारखे कोर्स करून आपापल्या आवडीनुसार क्षेत्र निवडता आहेत..




आज संस्थेतील बऱ्याच मुलांमुलींची लग्नं झाली... त्यांना मुलं झाली आणि आता आपापल्या आयुष्यात स्थिरावली आहेत. या घरट्यातून भरारी घेतलेली पाखरं आज उंच उंच झेपावली असली तरी आपल्या घरट्याला बिलकुल विसरलेली नाहीत... आठवण आली की आज ही आपल्या घरट्याला भेट देतात...               

                    संतोषजींच्या प्रखर जिद्दीच्या, कठोर मेहनतीच्या आणि अत्यंत चिकाटीच्या जोरावर हसत्या खेळत्या मुलांचं आज हे नंदनवन साकार झालं आहे. 

त्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या अनुभवातून या अनाथ मुलांचं जीवन आणखी समृद्ध करण्यासाठी आपल्या समाजानेही आपल्या मानसिकतेत काय बदल केला पाहिजे याविषयी संतोषजी सांगतात... की, "अशा अनाथ लेकरांच्याकडे पाहताना एका विशिष्ट दृष्टीने न पाहता ती ही आपलीचं लेकरं आहेत हा दृष्टिकोन आपल्या दृष्टीत असला पाहिजे... ती मुलं अनाथ झाली त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण बऱ्याचदा अश्लीलतेच्या बेवारस कुशीतून जन्माला आलेलं पोर हे जे खापर आपण त्यांच्या डोक्यावर फोडतो त्यावेळी त्या निष्पाप जीवाचा काय दोष याचा गांभीर्याने समाजाने विचार करावा... कुठेतरी हा ही एक सामाजिक दोष आहे... अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण देता आलं... जसं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असं आपल्याला आपलं बालपण हवंहवंसं वाटतं का तर आयुष्यातील तो सर्वात सुखाचा आणि आनंदाचा काळ असतो...  आणि असंच सुखाचं आणि आनंदाचा काळ याही मुलांना त्यांच्या बालपणी उपभोगता आला पाहिजे...

                              एकदा ही मुलं मोठी झाली की, त्यांना आपला बालपणाचा काळ आठवल्यानंतर यातना नको व्हायला आपला बालपणाचा काळ दुःखाचा नको वाटायला... समाजाचं खुप मोठं दातृत्व या मुलांना लाभतंय ही खुपच अभिमानाची गोष्ट आहे... पण इथे एक गोष्ट समाजाच्या लक्षात आणून यायला हवी आहे की, आपण जसे आपल्या घरी जाताना आपल्या मुलांना खाऊ घेऊन जातो... आपण खाऊ घेऊन गेलो याबदल्यात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवतो का..? मग कुठल्याही अनाथाश्रमातील मुलांना काही देण्यासाठी आलो की, त्यांनी आम्हांला नाचून-गाऊन दाखवावं, नकला, हावभाव करावेत अशी वेगळी अपेक्षा ठेवणारा वर्ग ही आपल्यात आहे हे कमी व्हायला हवं.!पोटच्या लेकरांना काही देताना त्याला झालेला आनंद आपल्याला हवा असतो... बस इथं ही देताना तो आनंद आपण या मुलांच्या चेहऱ्यावर शोधावा... बस इतकी ही सहजसुलभ निरपेक्ष भावना अश्या ठिकाणी अपेक्षित आहे... एकदा का ही मुलं मोठी झाली की, जीवनाची खडतर वाट त्यांना तुडवायची आहे पण त्या आधी हे बालपण त्यांना मनसोक्त आनंदाने उड्या मारू द्या... बालपणाचा प्रत्येक क्षण निखळ स्वछदीपणे जगू द्या... तो अनाथ आहे म्हणून केवळ त्याच्या हक्काच्या बालपणावर अन्याय नको व्हायला... या लेकरांनाही त्यांचं सांगणं आहे... तुम्हीं डॉक्टर, वकील, अधिकारी जे काही व्हायचं ते व्हा... पण त्याच्या आगोदर एक चांगला माणूस होता आलं पाहिजे... आणि पहिल्यांदा तो संस्कार इथं त्यांच्यावर घडवला जातो."

                            आज मागे वळून पाहताना... या सत्कर्माच्यामागे संतोषजी, पत्नी प्रीतीजी आणि त्यांच्या कुटुंबाचा खुप मोठा त्याग आहे... संतोषजींनी आजपर्यंत खुप मोठा संघर्ष... अनेक आव्हानं आणि धोकेही पेलले आहेत... अशा कार्यात स्वतःला झोकून देताना अर्थातच संतोषजींना स्वतःच्या घरादाराकडे लक्ष देता आलं नाही अर्थातच आता वेगळं असं कुटूंबचं राहिलं नव्हतं... आईबाप अखंड गरिबीशी झगडत राहिले... मुळच्या गरिबीने असह्य चटके दिले होते... आईबाप ऊसतोड कामगार... पोटाची परवड व्हायची... घरात सणवार कधी आनंदात पार पडला असं कधी झालंच नाही... सण साजरा व्हायचा तो दुसऱ्यादिवशी... आई कुणाकडून तरी हातपसा मागून... उसनवारी करून पुरवून पुरवून पोटच्या लेकरांसाठी गोडाधोडाचं करायची... कुणीतरी शेजाऱ्यांनी उरलं-सुरलं दिलं तर तेवढंच रांधायची... बापानं ही खुप कष्टानं संसाराचा गाडा हाकला होता... दोन हातांच्या जीवावर  फाटक्या संसाराला ठिगळं लावत लावत सांधला होता... बऱ्यापैकी आकार दिला होता... पण संसाराचे धागे जिथं तिथं उसवतच होतं...

                             तीन लेकींची लग्नं अजून तीन लेकरं पदरात... त्यांची निरवानीरव... त्यात एक लेक तरुणपणातच सोडून गेली... लेकीच्या नात्याला हळवा असणारा बाप तितच खचला... देहाला अनेक व्याधी जडल्या होत्या... संसारातली जीवघेणी परवड असह्य झाली... सुखदुःखाच्या पलीकडे मनाने धाव घेतली... आणि 'संसाराच्या गाठी... न पडो भेटी इथूनच आता ताटातुटी'... संसारातून निवृत्ती घेतली... मनाची विरक्ती दृढ झाली... एक दिवस बाप गहृत्याग करून परागंदा झाला... आईने कुठं कुठं शोध घेतला... लोकांच्याकडून व्याजावरी पैसे घेऊन दोन वर्षें बापाचा खुप शोध घेतला...  कोण म्हणायचं इथं दिसले तिथं दिसले... लगेच तिथं धाव घ्यायची... आणि रिकाम्या हातानं मागं परतायचं... शेवटी बाप गावला नाही तो आजतागायत... 

                      परिस्थितीचे असे असंख्य चटके सहन करत संतोषजी आपले हे दिव्य काम करीतच राहिले. आज संतोषजींच्या कार्याचे योगदान समाजाला पटले आहे विविध स्तरावर याची देखल घेतली जात आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे म्हणतात...आजवर खूप संघर्ष केला,त्रास सहन केला,असंख्य अडचणी झेलल्या...असह्य वेदना- यातना भोगल्या...कधी काळी हेटाळणी करणारा हा समाज आज एखाद्या कार्यक्रमाला त्यांना अगदी सन्मानाने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करतो...आजपर्यंत शेकडों सन्मान सोहळे झाले आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सोहळा झाला तरी नवल नको वाटायला.


पुरस्कारांची तरी गिणती कशी करावी..? तरीही 'मा.श्री.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई युवा सामाजिक पुरस्कार-२०१६' अशा प्रतिष्ठित पुरस्कारासह जवळपास ७० च्यावर पुरस्कारांनी त्यांला सन्मानित केलं गेलं आहे..झी टेलिव्हिजन या आघाडीच्या दुर्दशन वाहिनीने २०१८ सालच्या झी युवा गौरव पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. 


तसेच आज टी. व्ही.चॅनेल दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे




               एका ऊसतोड कामगार मायबापाचा लेक आज शेकडो अनाथ लेकरांचा मायबाप झालाय... धन्य धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा.'   आज खऱ्या अर्थाने या मायबापाच्या जन्माचे पांग फिटले. आज त्या कष्टकरी माऊलीच्या हृदयात या लेकराबद्दल अपार अभिमान आणि कौतुक आहे... जन्म सुफळ झाला... ऐसा पुत्र पोटी जन्मला... त्या पुण्यवंत आईबापाला वंदन... संतोषजी आपल्या भव्यदिव्य उदात्त कार्यकर्तृत्वाला सलाम... आणि ... मुलांनो..खुप हसा... खुप रुसा...  बालपणाचा आनंद खुप खुप लुटा... नात्यांची पोकळी भरून काढा... नाती जोडा... नाती निर्माण करा. खुप शिका... मोठे व्हा... आणि आपल्या घरट्याला कधी विसरू नका... मुलांनो...असंच हसतं खेळतं बालपण तुम्हां मिळो... निखळ आनंदाचे क्षण सदा लाभो.  जे जे तुम्हांस हवे ते ते मिळो...

                   


   

'इवलेसे रोप लावियेलें दरी त्याचा वेलू गेला उंच गनागनावरी.'

संतोषजींच्या हृदयात रुजलेल्या त्या विचारांच्या बीजांकुराचं त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोराने कायाकल्प केला आहे.त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय.त्याच्या निवाऱ्यात कित्येक गोडगोजिरी फुलं उमलताहेत... फुलताहेत...आनंदानं झुलताहेत..त्या माळावर आज हसऱ्या-खेळऱ्या निरागस कोवळ्या मुलांच्या फुलांचं नंदनवनचं फुलंलय...असं आनंदाचं भरलं गोकुळ बघायला...आपण  या सारेजण या...इथलं सुख पहा...आनंदानुभव घ्या...त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा...मिळा...मिसळा...इथल्या बालचमुच कोड कौतुक करा...तुमच्याशिवाय ते कोण करणार..? तुमच्याशिवाय आहेच कोण त्यांना...तुमच्या प्रेमाची..आधाराची आणि दातृत्वाची आज सहारा अनाथालय बालग्राम परिवारास गरज आहे.


"हरवले आभाळ ज्या चिमुकल्या जीवांचे,

ओस पडल्या घरट्यात त्या कोणी ना तयांचे.

आभाळ होऊ आम्हीं आपुल्या पंखाखाली घेऊ.

धरुनी हृदयाशी या पिल्लांना जगण्याचे बळ देऊ."

                  'जय हो..! मंगल हो..!!'


श्री.संतोष गर्जे यांचा आपल्याला संदेश :                                    "समाजातील संवेदनशील माणसाने अश्या संस्थेच्या पाठिशी उभे राहून पाठबळ दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे तिथल्या लेकरांचं कोडकौतुक केलं जावं... स्वतःच्या आयुष्याकडे एका नव्या उमेदीने बघण्यासाठी आपण बालग्राम (सहारा अनाथालय) परिवारास भेट द्यावी ही मनिच्छा व्यक्त करतो. "

सहारा अनाथालय परिवारा बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण www.aaifaundation.org या संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या.

सहारा अनाथालय बालग्राम परिवाराचा हा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.


श्री.संतोष गर्जे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क क्रमांक: मोबा - 9763031020.

-------------------------------------------------------

                                - किरण चव्हाण.

                                 मोबा- ८८०६७३७५२८.





बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

'बामणकीच्या मळीतली गोदा.'- किरण चव्हाण.

    


                       'बामणकीच्या मळीतली गोदा.'

                

                         कदमाचा बापू आला आसल गावासनं...आता चार दिस झालं की, किती वाट बघायची...? चार दिसामागं बापू लेकीकडं गेलता...त्यायळेला बापू म्हणालता ...आता मी येणार त्ये सरळ पा-सा दिसांनच.मग आज किती दिस झालं...बोटांवरचा हिशोब आज परतच्याला मांडला.. शेवटाला अंगठा दुमडला म्हंजी बक्कळ पाच दिस झालं...आला आसल बापू..? एक मन म्हणतंय आसल एक म्हणतंय नसल.पण आता न्हाई थार व्हइत...डोसक्यात राग घालून जायाची पाळी यील.न्हाई... खुळाचं व्हईनं मी..काय व्हईल ते व्हईल...आता थांबायचं न्हाई...बापूदा आला आगर नसलबी पर आपुन तिथं जाऊन धडकायचंच.  त्याशिवाय आत्मा थंड व्हायचा न्हाई माझा...एक दिस कधी सोडून ऱ्हाता आलं न्हाई...चार दिस कसं काढलं आसतील ते माझं मला म्हाइत...डाव्या आंगाला सुमी बिनघोर निजल्याली...कवाची झोप लागल्याली तिला.आंगावरनं साप गेला तरी सूद गावणार न्हाई....झोप बाई झोप...हिजा आयला हिजा कारटखाऊ बाई...सकाळी उठल्या पासनं नुसती बोंबलत आसतीया माझ्या नावानं...मी बी आसू दे तिकडं म्हणून सोडून देतोय म्हणून..न्हाई तर..? .मरणाचं काम करतीया... हाताला थाराचं न्हाई तिच्या... मी ह्यो आसला.. न्हाई तरी ह्यो प्रपंचा चाललाय कुणाच्या जीवावर...? ती हाय म्हणून तर मी हाय.

                                     भांगलणीचं पैसं मिळाल्यात कायसं आज.तवाच दिवळीतल्या जरबंदी डब्यात मगाशी मेजून ठेवत व्हती. कानावर गल्लीतल्या भजनाचा सबळ आवाज इत व्हता आता कुठं पंचपदी सुरू झाल्याली.तेवढंच देवाधर्माचं चार शबुद कानात शिरत व्हतं.तसंच उताणी पडल्या छातीवर हात जोडलं..'पांडुरंगा तुझं चार चांगलं शबुद कानावर पडल्यात...जसं आता ठरवलयचं तवा तिथं गेल्यावर आमचा बापुदा तेवढा गाठ पडू दे बाबा....आज बारादी न्हाई का धोंडूतात्याची. झोपत बारक्या पोराचा दात खात्याला आवाज यावा तसा वरच्या येळवाच्या जुन्या कोराटलेल्या वास्यातनं कीडा पोखरत्याला आवाज इत व्हता...आणि गोम्याच्या डोसक्यात कवाधरनं निराळाच किडा वळवळालता..डावा हात कोपरात दुमडून त्यानं उशाला घेतल्याला...रातीच्या काळोखात डोळं सताड उघडं... डोळ्याम्होरं तर सगळा आंधार गुडूप... कुठं तरी अंधारात उडी मारावी आणि पार तळाला जावावं तसा उरावर सगळा अंधारचं अंधार.अंधाऱ्या काळोख्यान डोळं पाक लिपल्यालं..डोळं मिटलं काय आणि उघडं काय सारखंच.

                                                  तरीबी कुठल्यातरी इचारानं  गोम्या गापक्यान उठलाच...पायथ्याला भीतीकडं पाण्याच्या डेऱ्याची कट्टी व्हती...तसाच खाली खाली सराकला... जाग्याचा आदमास घित घित रांगतच दमान वरच्या आंगाला सरकू लागला...एकदम दमानं न्हाई तर मग सुमी उठली की धडगत न्हाई...दोन हात भुईला टेकवून ढोपरावर जरा जरा सरकत आला भांड्याच्या लाकडी निकारड्यापाशी...मागच्या भीतीत उजव्या बाजूला दिवळी व्हती..जिथं सुमीनं डब्यात पैसं ठेवलं हुतं... पाची बोटांनं हळूच डब्याचं टोपान उघडलं..हाताला पैशाची उळी गावली...तळाला सुट्ट पैसेबी व्हतं...आज्याबाद आवाज होऊ न देता वरच्या वर नोटांची उळी फकस्त अलगद उचलली.. मुठीत पैसं दाबून मुठ आवळली...टोपान लावून व्हता तसा डबा जग्याला ठेवला...परत खाली बसला बारक्या पोरागत रांगत रांगत...चोरट्या मांजरांगत पुढं पुढं सरकत दाराबशी आला...वर उठला.बेचक्यात आडवा टाकल्याला आडना दमान वर उचलून...उजव्या हाताची फळी मागं केली... मांजरांनं खिडकीच्या गजातनं आपलं आंग अलगद बाहीर काढावं तस मागच्या दारानं एकदासा गोम्या बाहेर आला..परत व्हतं तस दार मिटवून घेतलं आणि बाहेरनं साखळी लावली.परड्याआंगाला अंधार  मावना चिमटीन चिमूटभरबी उजेड कुठं दिसना त्यात खालच्या गावंदरीला बांधावरच्या चिचवर घुबाड घुमायला लागल्यालं...त्ये कानांत घुं$$ घुं$$ आवाज करत म्हवाच्या माशा घुसव्यात तसं वाटत हुतं... ते भेसूर इवाळण एकट्यादुकट्या जीवाला घाबराघुबरा करून सोडत व्हतं...

                                                 गोम्या तसाच खायल्या आंगच्या चांदकीच्या भीतीला उजवा हात घासत घासत मुगळातनं गल्लीआंगाला जाय लागला...तसाच पुढं आला भीतीला सायकल टेकवल्याली हाताला गावली... तसंच तिला मागं ढकलत एकदासं सायकल घिवूनच गोम्या गल्लीला बाहेर पडला...धोंडूतात्याच्या घरासमोर तेवढा पिवळाधमक उजेड पडल्याला...न्हाई तरी बाकी सामसूम गल्ली अंधारात गुडूप झाल्याली.आता तर भजनाचा आवाज सपय कानांवर इत व्हता...टाळांचाखणखणाट,.दुमदुमणारा तबल्याचा ठोका,लव्हारचा इसनुमा पेटीवर अभंग गाईत व्हता..."क्षणोक्षणी हाची करावा विचार,नाशिवंत देह जाणार सकळ"....पण आम्हांस्नी कसला इचार नी फिचार...काय व्हायचं त्ये व्हवू दे आम्हीं त्याचं वाटवर जाणार..असा इचार करतच गोम्या आपला सायकल घेऊन त्या अंधाऱ्याखाईत वरती कडच्या वाटला लागला व्हता..गल्ली संपली...भजनाचा आवाज मागं पडला..दोन्हीं अंगानं चिकाचा घनदाट कूप सुरू झाला...त्या गचपणातन रातकिड्यांच्या किरकिरीला तुटवडाच न्हवता...कांन भरून पावलं हुतं..पुढ जरा धाकल्या घसव्याला गोम्यानं एकदासी सायकवर टांग टाकली...काळ्याभोर अंधारातनं रस्त्याचा आदमास घीत दमान पायातलं पॅडेल रेटू लागला...

                                                 अंधाराला कातरत गोम्याची सायकल पुढं पुढं सरकू लागली...एखाद्या दगडावरनं पुढचं चाक निस्टांयच...हेलपाटायला व्हायचं...मुठीतला ब्रेक आपसूकच आवळला जायचा गती कमी व्हायची...खाचखळगं...दगुडधोंडा आडवा आला तरी आता आंधळ्याची गत व्हती...अंधारात बाण मारावा तशी सायकल मारायची...पर एकच करायचं रस्त्याचा आदमास घित पुढं जायाचं..त्यात चीनवरचा पत्रा चीनला घासून 'खारखार' असा एकसारखा आवाज इत व्हता...काळ्याकुट्ट रातीच्या भयाण शांततेला चिरत गोम्या मजल दरमजल पुढं सरकत व्हता...गावापासनं बरंच अंतर मागं पडलं आता पुढं ती  बामनकीची मळी..मळीच्या डाव्या कुशीला नदीनं घेतल्याला वळसा... रानावनातनं, शिवारातन माग काढत आल्याली नदी बामनकीच्या मळीला यायला उघडी दिसायची...हमस्स्त्याच्या खाली घसव्याला वीसेक पावलांवर तिचं अंतर...नदीच्या अलिकडचा काठ म्हंजी खरबुड उच सखल..नुसत्या काळ्या काळ्या कातळ खडाकाचा.कासवाच्या पाठकवचागत दिसत व्हता...पलीकडंच्या कडन तर हुंबराची,जांभळी,करंजीची झाडं, खसखशीच्या झाडांचं हिरडं,काट्याकुटची झाडूरं...दरडंकडला पाण्यात मुळकांड शिरल्याल्या करंजीच्या झाडांची हिरवीगार कमान नदीच्या पाण्यावर झुकल्याली.. वाऱ्याच्या झोताबरोबर खायच्या ढाळ्यांचं शेंडं पाण्याला शिवून वर यायचं. रानवैरण..घानेरीची घुसपं...हरेक नमुन्याची झुडपं...अशा दाटीवाटीनं पलीकडचा काठ नुसता मुजून गेलता...काठावर सरमधी येळवाचं बेट. रातध्याड त्येंची करकर...आडव्यातिडव्या काट्याकुट्याच्या त्या गचपणात दिवसाउजेडी सावळा अंधार असायचा...वरल्या आंगच्या त्या बेटाच्या बुडक्याजवळ त्यो मॉन ढव..कुणाची बिशात हाय तिकडं फिरकायची..त्या डमकातलं पाणी शांत शांत..तिथंन पुढं पुढं जाईल  तसं चवताळल्यासारं खायल्या उतारीला जोमानं पळायचं...

                                               डावं वळाण घेऊन  गोम्या या बामणकीच्या मळीजवळ आला.रस्त्याच्या खायल्या बाजूनं पाण्याचा झुळझुळाट कानांवर पडत व्हता.तिथं तेवढा छातीत धुडधुडल्यासारं व्हईतं...त्या खायल्या बाजूला न बघता..तितन येगात पायातलं पॅडल फिरवत सायकल रेटली...आणि तेवढा पल्ला कसल्यातरी भ्यानं गोम्यानं पार केला...पुढं जाऊन एका  रस्त्याच्या चढणीला धपापत्या उरानं निस्वास सोडला...'मळी तरी मागं सरली.आयला काय म्हणायचं हे...आसल्या अंधाऱ्या रातीला आपुन एकटं दुकटं बाहीर पडून आलू...खुळ लागलं आसल काय मला ?पुढचं मागचं कायचं दिसना...रात एवढी माजलीया छाती आतल्या आत दडपालिया...गप घरात निजलो आसतो तर लई बरं झालं आसतं...पर बघितलं नव्ह चार दिस झालं  डोळ्याला डोळा लागतोय का ते...आज बापुदा आला आसल म्हणूनंच आलो नवं.आसू दे बापुदा गाठ पडला म्हणजे झालं.अशी मनाची समजी घालत गोम्या सायकल हाकत व्हता...झालं आता ह्यो पाटलाचा उसाचा फड तेवढा मागं टाकला की...हनमनकीच खडाक तितन काय मग जवळच बापुदाची ऱ्हावटी... जाधवाच्या शेतीकाठाचा रस्ता उभ्या चढतीच्या धाटणीचा...सायकलवरनं उतरून तिला ढकलत गोम्या ती दांडगा चढ चढू लागला.

                                             पुढं सपय रस्त्याला परत गोम्यानं सायकलवर टांग टाकली...आणि सायकलला गती दिली...आता कुठंच उतरायचं न्हाई...सरळसोट हणमणकीचं खडाक..पाटलाच्या तोऱ्यागतचं पाटलाचा ऊसबी काठाला तोऱ्यात उभा व्हता...उजव्या बाजूनं मागं सरकत व्हता...त्येजा पुढं गेल्यावर एका डाव्या बगला हावळाचं जुनंपुराणं मोठं झाड...माळतलं मणी तुटून चौखूर इस्कटून पडावं तशी झाडाखाली वाळीखड हावळं पसरून पडल्याली.त्याच्या पुढं आडवा वडा पार करून गोम्या एकदासा माळाला आला...आदमासान रस्त्याच्या उजव्या काठान सायकल वळवून पडीवर घेतली...आणि त्या पडीवरनं सरळ खाली जाऊ लागला...त्या माळावर धाकल्या घसव्याच्या खायल्या टोकाला काठावर चिचंच तरण झाड व्हतं.तिथंच त्या चिचंच्या खोडाला सायकल टेकवली...आणि गोम्यानं  पुढं व्हवून समोर नदार टाकली... एक तांबूस ठिपका नजरला पडला... आणि आनंदाच्या उकळ्या मनात फुटल्या...पक्की खात्री पटली बापुदा आलाय...आपल्या आगुदर मनानं तिथं धाव घेतली...झपापा पावलं त्या दिशेनं पडायला लागली...आता काय रोजचीच पायाबुडची वाट...सकाळ संध्याकाळ या वाटनं फेरी झडायची. आता डोळं झापुन जरी चाललं तरी पायासनी आपोआप माग गावल... एवढा खात्रीशीर आदमास..

                                                       पायाखालचं मातीहेंडं कुस्करत गोम्या चालला अगदी जोमानं..मनाला आनंदाचं उधाण आल्यालं.बक्कळ चार दिसांनी आज ही वाट तुडवत व्हता...काटं सावरीच्या तळाला वळसा घालून लमानकीच्या चिवळाटातन वर आला..दोघातिघा बापयांच बोलणं नीटच कानांवर इत व्हतं.. झालं आता बिनधोक.आता कुठला आडसर न्हाई...अगदी डोळ्यासमोर धा हातांवर बापूदाची शेतातली कुडामेडाची ऱ्हावटी...

"बापुदा.." लांबनच एक जोराची हाळी गोम्यानं ठोकली...तसं कंदिलाच्या उजेडात खोपी बाहेरच्या शेड्यात बसल्याली माणसं अंधारात नजर घुसवून बघायला लागली...डोळ्यासमोर सगळा अंधारच...बापुदा एकदम कावराबावरा होऊन गेला.

  उजवा हात उपडी करून कपाळाला लावत बारीक डोळं करीत बापुदा जोराच्यानं बोलला.

"आरं कोण रं त्यो..?"

तसा अंधाराच्या कचाट्यातन निसटल्यागत पुढ्यात गोम्या हजरचं.कंदिलाच्या उजेडात त्याचं तोंडं सरळ रापलं आणि आवाक होऊन बापुदा बोलला..."आरं गोम्या तू..? आणि या येळला..?"

गोम्या खायच्या घोळक्यात बसत म्हणाला..

"बापुदा तुला पयल बघून लई झ्याक वाटलं बघ...किती दिस झालं...? जीव तळमळतोया माझा "

"तर तर लई बघितलाय... माझ्या वढीचा...दारूसाठी मेल्याला उठशील..चार दिस न्हाई तर कायली झाली आसल तुझ्या जीवाची.."

"बापुदा काय करू सगळं चीनभिन झालतं... काय सुदरना...राची झॉप न्हाई आणि दिवसाला सुमीच्या शिव्यांची घाई..."

"आरं पण एवढ्या रातीला यायला एवढी नड व्हती का..?"

"...मग तुला आता काय सांगालोय...त्यात आज येळचं चांगली म्हणायची...सुमी झोपल्याली बिनघोर...ती झोपायचीचं वाट बघूत व्हतो...ती कधी हातात पैसा टेकवतीया व्हय...ती झोपल्याली बघून बरोबर डल्ला मारला... आता एकदम चार दिसाची पिणार बघ..."

"आरं लेका उद्या आला आसतास तर काय बिघाडलं आसतं.. रात किती झालीया बघ आमचं काय गांव जवळ, घर जवळ."

शेजारी बसलेल्या तीन चार लोकांच्या पंगतीकडं बघत बापुदा पुढं बोलू लागला."..त्यात हे काय सुकाळीचं मला झोपू द्येत्यात.मी आलोय म्हटल्यावर मला गावातनं  पुढं घालून गुत्त्यावर घेऊन आल्यात.."

"आसू दे की मग चांगलंचं झालं की...तान लागल्यावंच माणूस हीर खणतया नवं"

"लई शाना हाईस आरं तू परगावसनं यायचा...गोम्या आरं आजची रात ही भर आवसची ...भुताखेताची रात.."

"ये बापुदा कायबी बोलू नगस... आत गपगुमान पेलं भर बघू...इथं आम्हीच भुतं हाय..आमचा आत्मा पयला थंड कर मग बघू त्या भुतांचं..लागलाय मला शिकवायला.."

गोम्यानं पँटच्या चोरखिशात ठेवल्याली पैशाची उळी दोन बोटांच्या चिमटीतनं वर काढली...आणि तशीच बापुदाच्या हातात ठेवली...

"बापुदा हे घे..आज रोख...आज रोखीनं मनासारखी पिणार बघ..तिजायला मला पैसं दित न्हाई काय...? कशी हातचलाखी केली...मागचीबी उदारी घे चुकती करून..सारखं पिताना टोमनं दित आसतोस"...

"लेका बायकोचं पैसं धापुन तिलाच आन वर शिवा देतोयास व्हय.." बापुदानं पैसं हातात घित आडवी मान हालीवली... उठून आतल्या आंगाला गेला.येताना रमरमीत दोन गेळं भरून घेऊन बाहीर आला.

 कधी एकदा व्हटाला भरला  पेला लावतोय आसं गोम्याला झालतं.

बापुदानं मापाच्या पेल्यात काठोकाठ दारू वतली आणि पेला गोम्यापुढं केला...बाजूच्या मंडळींची आता भागली व्हती..ती उठून जायच्या तयारीला लागल्याली..पण कवाधरनं ती वर उठायचीचं तयारी करीत व्हते...

इकडं गोम्या हावराटासारा एकेल पेला ओठांआड करत व्हता...

"गोम्या बास कर आता.निघ बघू मध्यान रात व्हयाला आली.."

डोळ्यावर तवंग आल्याला अंगात धुंदी माजल्याली... जीभ जड झाल्यागत शब्दाला तान दित गोम्या बोलू लागला.

"बापुदा...आसं काय करतोस...वत आजून वत... वतत ऱ्हा नुसता...."

आता ह्येला काय करावं...ह्ये उठल्याशिवाय तरी आपण कसं उठायचं..बापुदाला कोडं पडलं.

"आरं आरं गोम्या एकदम पिऊन काय मरायचं हाय व्हय रं... थोडी उद्या पी उठ उठ बघू आता..

आज आवसची रात हाय...जातावक्ती बामनकीच्या मळीची जागा चांगली न्हाई...माहिती हाय नवं...आवर बघू लगबगीनं घर जवळ कर.."

"ये बापुदा काय बी सांगू नगस ,मला भ्या घालतोस व्हय...आरं मी वाघ हाय वाघ भितो काय..कोण समजलास तू मला.."

"व्हय व्हय तू वाघच हाईस पर आता उठ तुला हात जोडतो...रात लई झालीया..."

कसतरी करून बापुदानं गोम्याला उठीवलं कामटांचं दार वडून घेतलं साकळी हुकात आडीकली आणि कुलूप घालणार ते कंच्या तरी इचारात त्यानं मागं बघित गोम्याला म्हणाला..." गोम्या... काय पडतोस रं इथं. एवढ्या रातीला कसां जाणार तू..."

..."न्हाई...न्हाई...बापुदा...सुमीचा डोळा चुकवून आलोय...इथंच थांबलो तर ती कैदासीन सकाळच्याला घरात घ्यायची न्हाय.."

"..मग जा तर लवकर जा.पयला..आधीमधी कुठं थांबू नगस आणि व्हय बामनकीची मळी तेवढी झाटदिश्यान गाठून म्होरं व्हो..म्हंजी मग घोर न्हाई.." बोलताना गोम्याची जीभ वळत व्हती.

"आगा सोड की गा...कशाला काळजी करतुयास...तू लाग तुझ्या वाटला मी लागतो माझ्या वाटला."

पाठमोरी व्हवून बोलतच गोम्या आपल्या वाटला आणि बापुदा आपल्या वाटला लागला. बापुदाचा पल्ला काय लांबचा नव्हता...वाटनं जाता वक्ती उगाच काय तरी मनात वाईटसाईट यालतं... आज तर भर आवसची रात...आपोआपच ती बामनकीची मळी बापुदाच्या नजरला यायला लागली. पार मनाच्या तळाची गोष्ट आपोआप वरती येऊ लागली.किती वरसं झाली त्या गोष्टीला. किती न्हानगा व्हतो त्यायेळला जरा कुठं कळत व्हतं....आमच्या गावातली गोदाक्का..चार खेड्यात आसली बाई नसलं.दिसायला लई सुदंर बाई... लगीन झालं. आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षीचं ती घटना घडली.त्यो दिवस आवसचा.. भर दुपारच्याला ती एकटीदुकटीचं तरणीताठी बाई नदीला बामनकीच्या मळीला गेली.आणि काय कसं कुणास ठाऊक तिथल्या त्या खॉल मॉन ढवात बुडाली...तिसऱ्या दिशी मडं पाण्यावर तरंगायला लागलं ...ज्या ढवात तिचा जीव गेला तिथंच दुसऱ्या वर्षी पाण्यातली म्हस त्या ढवात जिती वडून नेली..तिजा आजुनबी जीव तिथं घुटमळतोय म्हणत्यात...आवसच्या रातीला बाईमाणसाचा किचाळत्याला आवाज बामनकीच्या मळीला घुमतोय..म्हणून कोण जातंय व्हय आवसला तिकडं..'पण आज गोम्याचं जाईत व्हता...अलीकडच्या पोरास्नी यातलं काय ठाव हाय.कुणाचं ऐकायचं न्हाई काय न्हाई.कुठंबी हुमदांडगापणा करत्यात....कसं व्हायचं या गोम्याचं इचार करत बापुदा घरात कधी पोचला तेजत्येलाच कळलं न्हाई.

                                इकडं परतीची वाट कातरत शेतवडीतनं, सड्या बांधावरनं हेलपाटत गोम्यापुढं सरकू लागला...खायल्या बाजूवर करंजीचं एक मोठं झाड व्हतं.तेज्या वरच्या झावळ्या खाली लोंबत व्हत्या... हाताला गावणाऱ्या त्या तेलकट पानांच्या झावळ्यास्नी मुठीत धरून गोम्या घटकाभर तिथंच थांबला...दारू चांगलीच अंगात भिनली व्हती...वगळाच्या काठानं वाढलेल्या लिंगडीच्या थोरल्या घुसपात... रात किड्यांचा नुसता दंगायोट चालला हुता...रात बरीच झाल्याली पण आता त्यो एकटा कुठं व्हता.सोबत तीबी व्हतीच की,अंगात शिरल्याली...गोम्या तंद्रीत बिनघोर पावलं टाकू लागला...चिचच्या झाडाची वळख गावली...खोडाला टेकवल्याली सायकल घेतली..आता तिला सोबत घेऊन पुढची वाट धरायची...हनमणकीचं खडाक रस्त्याला लागूनच.त्या खडकावरनं रस्त्यावर आला..घसवा व्हता..आता सायकलवर बसायला हरकत नव्हती...डावा पाय एका पॅडेलवर ठेवून कशी तरी पलिकडं ढेंग टाकली सायकल एकदम भेलकांडत शेजारच्या कुपात जाता जाता वाचली..पुन्हा तिनं बरोबर रस्ता धरला आणि एकदासी कशीबशी सायकलसवारी सुरू झाली..एखादा साप वळवळत पुढं जावावा तसं समोरचं चाक एकदा डावीकडं एकदा उजवीकडं वळत व्हतं...रस्ता सपय खरं अंधारानं मुजल्याला.डाव्या अंगानं पाटलाचा ऊस मागं पडला...आणि जाधवाच्या शेताकाठची थोरली घसरण लागली...

                       आता  सायकलंच काम.आपुन फक्त बसायचं मुठीतला बीरेक धरून...सायकल तिचं काम ती करालती..गोम्यान मुठीतला बीरेक आर्धा आवळून धरल्याला तरी त्या घसारतीला तिला जोरात पळू वाटालतं...दगडधोंडा-खाचगळगा माहिती नाही दणादण आपटत तशीच जोमात आली.पुढं  मुर्ग्याला यायला तिला दम लागला..तसं गोम्यान हलक्या पायानं पॅडल रेटलं आणि बरोबर मुरगा सपायला बामनकीची मळी लागली...आणि अंधारात बिनधोक फिरणाऱ्या चाकास्नी गोम्यानं एकदम गाचकन बीरेक लावला तशी जाग्याला सायकल थांबली. सायकलवरून एक पाय खाली टेकवून पुढं बघू लागला.एवढ्या काळ्याधोक अंधारात समोर साऊट कसला.? परत परत पापण्या मिचकून बघितल्या...काय तरी नजरला पांढरधोट दिसालतं एवढं खरं.बघून खिणभर श्वास रोखला.. छातीत एकदम लुकलुकाय लागलं..सगळा जीवचं डोळ्यात जमा झाला...त्या नीसुर रातीला मंद वाऱ्याच्या झुळकेचा सुंकार कानात भरत व्हता...काय करावं..?.पुढं पाऊल टाकावं की नगो....नक्कीच काय तरी भानगड हाय...पांढरंधोट काय तरी नजरला झळमालतं एवढं खरं...पण मी भितोय काय.?..आसा वाघ पुढ्यात आला तरी फाडून ठेवीन...असा ताव दारूमुळं गोम्याच्या अंगात रसरसुन भरल्याला... 

                                         त्या तावातावातच गोम्या पुढं झाला....बघतोय तर काय...बाई..बघून मन चराकलच..टाळा कोरडा पडला...'आता रं हेज्या भन...या रातीला समोर बाई... पुढं जायाचं काय मागं जायाचं उमजना.तिथंच उभा राहून निरीखलं...ती पाठमोरी व्हवून उभा व्हती....

भरजरी साडी नेसल्याली.. पुनवच टिपूर चांदणं फकस्त तिच्या अंगावर पडावं तसं तिच्या अंगावरचा पांढरा उजेड डोळ्याला फेकच दिसालता... पाठीवर मुरत्या काळ्याभोर झिंजोळ्या कंबरपतोर लोंबालत्या...नाजूक साजूक बांध्याचं ते पाठमोरी रुपडंच एवढं गॉड दिसालता मग मुखडा कसा आसल...? गोम्याला भानचं उरलं नव्हतं.. एका जाग्याला ढिम्म उभी ती लावण्यवती.तंवर डाव्या बाजूनं हळुवार तिनं वळण घेतलं..आणि...आणि गोल घडीच गोरंगुमटं मुखकमल नजरेस पडलं..देखणं आरस्पानी सौंदर्य. काळ्याभोर केसांची पिरंगळलेली बट दोन्हीं गालांवर घरंगळलेली..साजरी दिसत व्हती. गोऱ्यागुमट्या गोंदल्या कपाळावर सवासनीच वाण..कोरल्या भुवयांच्या काठाळी खाली नाजूक पापण्यांच्या पाकळीत पाणीदार नितळ काळंभोर टपोरं डोळं...देखणेपणा उठावदार करणारी नाजूक नाकेली.मऊशार गुलाबी दुमडलेली ओठाळी...

नितळकाच पाण्यासारखी ती नितळ कांती.बघून नजर भुलावी...समाधी लागावी...ऐन रातीला कोण अवतरली म्हणायची ही. तिच्याकडं एकटक बघून गोम्या पाकच खुळा झाला..?त्येला काळावेळाचं भानच राहील न्हाई. गोम्या पुरता भुलला..मागं सरत्याला एकेक पाऊल पुढं आपसूकच सरकू लागला...

"कवाधरनं वाट बघतीया नवं तुमची..." तिच्या गोड गळ्यांतनं गुळासारखं गुळमाट शबुद बाहीर पडलं..

तसा गोम्या आवाकंच झाला..

"ऑ$$माझी आणि वाट.?.."

त्या मधाळ नाजूक बोलण्यानं गोम्या पुरता घायाळ झाला.'आयला लगीन झाल्यापासनं सुमी कधी अशी गॉड बोलली न्हाई आणि ही बया म्हणतीया 'वाट बघातूया नवं मी तुमची' नवलच म्हणायचं...

एकेक पाय टाकीत ती गोम्याच्या दिशेनं पुढं सरकू लागली. 

भरजरी साडीच्या खालच्या घोळातन खालचं पाय सबळ दिसत नव्हतं...पण नाजूकशी किणकिण पायतळाला होत होती.

गोम्यानं आवंढा गिळला...नकळत त्यो मागं सराकला...'आता रं... ही तर बया जवळ जवळ यायलिया.'

ती पुढं पुढं आणि ह्यो मागं मागं...दोघांच्यात तिसरी सायकल. तिची चाकं उलटी फिरत व्हती...

"आवं आसं मागं मागं कुठं सरकालाईसा...?"

ती जवळजवळ गोम्याच्या पुढ्यातच गेली....

"मी तुम्हांलाचं न्यायला आलोय नवं"

आणि एकदम तिनं आपला हात गोम्याच्या हातावर ठेवला...गोम्या डोळं बंद करून जाग्याला किचाळलाच...तसा तिनं डावा हात त्याच्या वठावर अलगद ठेवला...मऊ मऊ गरगरीत गार असल्यालं हात आंगाला लागलं...आणि गोम्या मंतारल्यासारखा जागच्या जागला खिळला...काय बोलायचं काय करायचं कायच सुदरना...

मऊशार उजव्या हातानं तिनं गोम्याचा डावा हात गच्च पकडला....आणि जवळ खेचलं..गोम्याला तो स्पर्श हवाहवासा वाटला..

"चला"

"पर कुठं जायाचं..?" गोम्या जीभ आडवी घालत बोलला..नशा दाबून अंगात भरल्याली.

"तुम्हीं चला तर खरं माझ्यामागोमाग.."

गोम्याच्या हातातन सायकल गळून खाली पडली.आता  त्येज त्येलाच दरकार ऱ्हायला नव्हता..आगुदरच दारूची आणि आता बाईची नशा त्याला चढली व्हती...ती पुढं आणि ह्यो  मागणं चालली...पर कुठं..? ती भयाण रात...तशीच ती बामणकीची मळी.. रस्त्याच्या डाव्या बाजूला खायल्या घसव्याला नदीची झुळझुळ...बेटांच्या गचपणातली भेसूर करकर...एरव्ही मॉन ढवाच शांत असणारं पाणी या काठासनं त्या काठाला डचमाळालतं..वाऱ्याचा मंद सुंकार... आणि ही जोडी आपली मंद गतीनं पुढं पुढं चालली..रस्त्याच्या खाली उतारली त्ये सरळ नदीच्या बाजूला...गोम्या आपल्या तंद्रीत टाकतोय आपली पावलं तिच्या मागून... आपण  कुठं जातोय..?कुणा संग जातोय...? कायच ठावं न्हाई....बाईन गोम्याचा हात गच्च धरलेला...दारूच्या नशेत हुल झालेला गोम्या तिच्या संगतीनं चाललेला....नदीकाठ लागला..कातळ काळा खडाक पायाबुडी लागला...थोडीशी जाणीव गोम्याला झाली..." आंग ये ये बया...नेमकं जायाचं तरी कुठं...कुठं न्यालीस मला त्ये तरी सांग बये.." दारूच्या नशेत तेवढी तरी बोलायची शानपती गोम्याला गावली म्हणायची..."आवं रावसाब इथंच ऱ्हाते नवं का मी..किती वरसापासन."

"इथं या आसल्या जाग्याला..?"

"आंग बये तुझं घर कुठाय..? तू मला नेतीस कुठं..? मला कायबी कळना बघ." भोळाभाबडा गोम्या बारक्या पोरानं प्रश्न करावा तसं इचारत व्हता.

गोम्या आसं बोलायला ती बया पाण्यात उतारली आणि एकदम बोलली...

"ते बघा तिथं वयल्या आंगच्या मॉन ढवात हाय माझं घर.." गोम्याचा पयला पाऊल पाण्यात पडायला आणि मॉन ढवात..एवढंचं शबुद ऐकायला एकंच गाठ.झार झार झार...अंगातली दारू उतारली... टकामका तिच्याकडं बघायला लागला...आता तिनं खरं रूप दावलं.बटबटीत डोळ्यातली बुबळांची निशाणीचं गायब झाल्यालं ते निव्वळ पांढुरकं डोळं... भ्यायजोगतं..

".कोण कोण तु..सोड सोड मला..."

"मी व्हय गोदा..म्हाईती न्हाई व्हय..."

 कानावर इस्वासचं बसना...दरदरून आंगाला घाम सुटला घसा कोरडा पडला...गोम्याची पुरती घाबरगुंडी उडाली...

"ये ये बये सोड सोड मला...." गोम्यानं हात झिडकारला...

"आता न्हाई मी सोडायची...मी तुम्हाला घिऊन जायला आले नवं."तीन गच्च हात पकडल्याला...नजरंचा बाण गोम्याकडं रोखून ती हासत व्हती.

                           आता तिच्या आवताराकडं बघून गोम्याला जीव गेल्यागत झालं हुतं.गोम्यानं डाव्या हातानं एक खचून बोंब मारली...ती बोंब त्या नदीकाठाला घुमत राहिली..सगळ्या रानशिवारी पसरली... पण कोण व्हतं तिथं..गोम्या आणि ती गोदा..गोदा नव्ह तिचं भूत...नदीच्या कंबरएवढ्या पाण्यात झटापट सुरू झाली...जिवाच्या अंकातांनं ओरडून बोंबलून सुटायसाठी गोम्या धडपडाय लागला...हातपाय झिंजडाय लागला..गटांगळ्या खायाय लागला...पण काय आणि कसं जीवाची दोरी घट्ट व्हती म्हणायची.. तिच्या हातातनं जो का हात निसाटला तशी एका दणक्यात गोम्यानं नदीच्या बाहेर काठावर उडी मारली...तशाच पायगतीन  म्होरं धावला...मागनं ती बया आरडत व्हती

 "थांब जातोस कुठं मला सोडून..?"

कुत्रं मागं लागल्यागत हेलपाटत त्या काळ्याकुट्ट अंधारातनं कसतरी रस्त्याला आला. नशीब म्हणायचं  पायालालगतच सायकल लागली...कशीतरी ती उचलली सरळ करून ढँग टाकली.गरारा पॅडल फिरवीत गोम्या जीवतोडून रस्ता कापू लागला...पार पार फटफजिती झाली व्हती...अंगावरची धडूती सगळी भिजली व्हती...कापरा भरल्यालं आंग नुसतं थडथडालतं..निम्मा पाण्यानं निम्मा घामानं आंग डबडबून गेलतं...आजूनबी गोदा मागं हायच आस वाटत हुतं... "जातोस कुठं आलो थांब..".हे तिचं शबुद आजुनबी त्येजा मागं लागलं हुतं...दगडाधोंड्यारनं टणाटण उड्या मारत सायकल अंधारातनं जोराची पळत हुती..

                                           पुढची वाट कशी तोडली आसल त्येज त्येला माहिती...सगळा शिवार मागं पडला नी गावची येस सुरू झाली...तरी गोम्या धापा टाकत वडून ताणून सायकल मारतच व्हता...आला आला गल्लीत आला...घरासमोर आला आणि एकदम रापदिश्यांनं घरासमुर आदळला...जोराचा आवाज झाला.नुकतंच भजन सपवून माणसं घरला निघाल्याली...आवाज कसला म्हणून ती आवाजाच्या दिशेनं धावली..तर गोम्या घरासमुर पडुन आरडालता..उभ्या अंगानं लाट लाट कापालता.धपापत्या छातीनं बोलालता.."आली आली गोदा आली वाचवा वाचवा मला.." ह्यो आवाज ऐकून सुमी पण एकदम दार उघडून बाहीर आली...माणसं भोवतीभोर येरगाटली..."आरं गोम्या काय झालं रं आसं आरडायला.?" 

"भूत...भुत... गोदाचं भुत.." त्या तंद्रीतएवढंच गोम्या बरळालता..

सुमी बाहेर आली तशी काय तरी येवजून लगीच घरात गेली..आणि  दाण दाण पाय आपटतचं बाहेर आली..टोपणासकट रिकामा डबा गोम्याच्या आंगावर भिरकावला..आणि तोंडाचा पट्टा सुरू केला.

"बघा बघा चोराच्या उलट्या बोंबा बघा...आज भांगलणीचं पैसं आणून ठेवल्यालं पाक उडाप केलं..सत्यानास केला सगळ्या पैशाचा .आणि वर दारू पिऊन ही कशी मस्ती चाललीया..."

"आरं काय झालं गोम्या...कुठंन आलाइस एवढा घाम्यावून...?" सखुआज्जानं पुसलं.

 " वरतीकडनं आलो...आन बामनकीच्या मळीला..." बोलायचं मधीच थांबला आणि.. "गोदा..गोदा...गोदाचं भुत..गोदाचं भुत.." म्हणून बरळायला लागला.पुढचं बोलायचं त्येला कायच समजना.

जे समजायचं त्ये सखुआज्जानंचं समजलं.आज आवसची रात...सुमीला ते कसं उमगणार...?

"पोरी पुरतं भ्यालंय त्ये त्येला घरात नेजा.."

सुमीला काय कळणार गोम्याची दैना...तिच्या डोक्यात तिडीकच भरल्याली गोम्याची.

"मामासाब आंगमस्ती हाय ती ...दारू जरा कमी प्यायची व्हती....प्यायची ते प्यायची आणि वर हे आसं ढवाऑग  करायचं"..

"पोरी आसू दे पयलं त्येला घरात घिऊन जा बघू.." आसं म्हणून सखुआज्जानं सुमीला जरा दटावलंच..आणि सखुआज्जा कसल्यातरी इचारात आपली वाट तुडवायला लागला.सोबतीची माणसंबी आपापल्या घराच्या वाटला लागली.

                         गोम्या गोदाच्या तावडीतनं सुटला खरं आता सुमीच्या कचाट्यात सापडला व्हता .एकयेळ ती परवाडली पर ही नको अशी गत झालती..कुठंन अवदसा सुचली...आता गोम्याचं काय खरं नव्हतं....सुमीनं गोम्याच्या रट्याला धरलं आणि टरारा वडतचं घरात नेलं..तरीबी गोम्याला वाटतंच हुतं...सुमी न्हाई गोदाचं वडत आपल्याला घरात न्यायलीया...आजूनबी आंग लाट लाट कापालतं.सुमीला त्येज कायच वाटत नव्हतं धाडकन तिनं दार लावून घेतलं.

(या कथेचा मनोरंजन हा फक्त उद्देश असून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही अथवा वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही.)

                                               -किरण चव्हाण.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

'गावंदरीतलं जुळं' - किरण सुभाष चव्हाण.

    
                        'गावंदरीतलं जुळं'


                               तरीबी या गोष्टीला बारा वरसं गुदरली आसतील.. सुगी नुकतीच मागं सरल्याली.भातकापणी झाल्याली मुंडरी वावरं सगळीकडं दिसत व्हती.भवतीनं जुंधळ्याच्या धाटांचं सड आणि डुई भादरल्यासारं भाताचं मुठ मूठभर गड्ड.सारा शिवार कस मोकळा ढाकळा. आमच्या गल्लीच्या खायल्या आंगची गावंदरबी आता रिकामी झालती.बिचारीला आता सकाळ दुपार संध्याकाळ एकेक पाहुणा अवचित भेट द्यायचाचं.रस्त्याच्या खायच्या बाजूला उतरणीला चार लांबसडक टपणी.तिसऱ्या टपण्याच्या बांधाच्या तळाला चार हात रूंद अशी लांबसडक चिरुटी व्हती त्यानंतर चौथं टपण वलाडंल की,मधी आडवा थोरला बांध..बांधावर मोजून दोनच झाडं एक काट्या बाभळीचं आणि दुसरं लिंबाचं.त्याच्याखाली उरलीसुरली टपणी.थोरली जाणती लोकं या बांधाच्या खाली परसाकडं जायाची. तवा घरा घरात संडास कुठलं...?गावंदर म्हणजे त्यायेळला मोकळं व्हायचं हक्काचं ठिकाण.
                               भर उन्हाची दुपार झालती.उन्हाचा नुसता चटका मारत व्हता.आणि आसल्या वक्ती सातूतात्या टमरॅलाचा गळा पाची बोटांत पकडून आपला दाबात गावंदरीच्या दिशेनं जात व्हता. दोन टपणी वलांडून तिसऱ्या टपण्याच्या काठाला गेला आणि समोर बघून भर दिवसा त्येजा डोळ्यासमोर चांदण्या चमचमल्या.तिथंच टमरॅल भिरकावून सातूतात्या दणाट मागं....
                                   आताचं तर डोळ्याम्होरनं गेल्याला गडी लगीच मागं परातला..म्हटल्यावर पानाची उळी दाढत धरून उगाच चघळत शेड्यावर बसलेल्या शिवामानं म्होरं व्हवून विचारलं...

"आरं... सातबा काय झालं रं... आसं घाबराघुबरा का झालाईस..?"..

आता सातूतात्या काय बोलणार, त्याची पाकच बोबडी वळाल्याली.. तवर आणि चार पाचजण तेज्याभवती जमली...सातूतात्याला भर उन्हाची थंडी वाजून आल्यासारा हुडहूडा भरून आल्याला..आगुदरच भित्राभागु.नक्कीच काय तरी भानगड हाय..लोकांनी आपलं हेरलं...

"आरं बोललास तर कळल नव्ह आम्हांला...काय झालं...बोल की झाटदिश्यान.."

....आंग सारं घामेजून गेल्यालं. थरथरत्या हातानं कपाळाचा घाम पुसत सातूतात्या बोलू लागला.

"आंगा.. बोलण्यासारं काय न्हाई...खाली जाऊन बघा जावा केवढं मोठं जनावार.. लोळाय लागलंय त्ये.."

"काय बोलतुयास..कसलं जनावरं आणि कुठं.." सातूतात्यानं खायल्या बाजूला पुढा केला तसा शिवामानं एक लालभडक पिंक चिकाच्या कुपावर मारत...खायल्या अंगावर नदार टाकली.

सातूतात्यानं खूण दावली तशी समद्यानी खाली धाव घेतली.आणि तिसऱ्या टपण्याच्या टोकाला यायला सगळ्याचं पाय जागच्या जागी थांबलं.बघत्यात तर काय.?मधल्या चिरुटीत चांगलं धा फूट लांबसडक.अशी एकाला दोन सापांचं जुळं....एकमेकात येटोळ घालून आपल्याच नादात दंग व्हती....पायाच्या पेंढरी एवढं जाड.लोदाच्या लोदा..आंगाला तांबट काळसर रंग, तळाला पसरट आणि टापला निमुळता होत गेलेला त्रिकोणी आकार.. मधशीर उठून दिसावी अशी भांगलनीच्या खुरप्यासारी खरबुड धार...असं सरसरून कंबरजोगतं उभा ऱ्हायाचं... एकमेकांच्या आंगाला पीळ द्यायचं...काय हालत हुतं... डुलत व्हतं..डोळ्याचं पारणं फिटावं असं दिसतं व्हतं.

"आरं बाबा...बाबा...सातू म्हंतोय ते खरंच की...दांडगंच हाय की गां  ह्ये..."

"आसलं तसलं न्हाई..बघ तरी फडीवर आकडा हाय.."

"आशील नाग आणि नागीण हाय ती..."

"बाप रे...बाप" नाम्याला स्वर्गातला बाप आठीवला.

तवर गल्लीतलं येणारं जाणारं माणसांचं भिरंच्या भिरं गावंदरीत बघायला जमा झालं..नाक गळकी शेंबडी पोरंबी टाचा उच करून बघायला लागली.तसं शिवामानं त्यासनी हाकलून लावायचा..

"ये..ये...कार्ट्यानों जाताईसा का तिकडं...इथं काय नाचगाणं चाललंय व्हय रं पळताईसा इथनं.."

तशी पोरं बांध चढून रस्त्याला जायची परत नजर चुकवून खाली यायची.घोळका करून एकमेकाला हळूच म्हणायची "केवढा मोठा साप हाय बाबान्या" आणि बोलून आबदार दातानं जीभ चावायची.

केरुनाना मध्येच बोलला..."आगा शिवूदा एवढं मोठं जनावार कधी जलमात बघितलं नसल बघ.."

"व्हय की एवढ्या माणसांच्या वस्तीकाठाला कुठून आलं आसल बघ की ब्येनं...."

"ते पण हाय...आन आसं जुळं कधी बघायला मिळतंय व्हय..." 

" लोकं म्हणत्यात म्हण आसं जुळं कधी बघायचं नसतंय घरादाराला वाईट आसतय म्हण त्ये..आपशकून व्हतोय म्हंत्यांत"...दत्तबा धीरगंभीर बोलला...

"मग रं आता...काय करायचं...?" .

तसा शिवामा पुढं बोलला..."मी ऐकल्यालं आसं जुळं कधी दिसलं तर तेजावर लाल फडकं तरी टाकायचं येक, न्हाई तर..."

"न्हाई तर काय..?" 

"न्हाई तर दोघास्नीबी जीतं सोडायचं न्हाई.."

"आरं मग इचार कसला करताईसा...त्यात आमची पोरटारं इथं गावंदरीतच खेळत्यात नवं..." केरुनाना जरा जोर लावूनच बोलला.

तसा मागचा पुढचा इचार न करता 

"घ्या...घ्या...काठी घ्या...हाणा मारा.." 

लोकांच्या गर्दीतनं एकच सूर उमटला आणि सगळा गोंधळ उडाला...तसा शिवामा हळूच दमात बोलला..
"आरं आरं दमा...कालवा करू नगसा जनावार बुजल की.." 

पण कोण ऐकून घेतोय आणि कुणाच्या छातीत एवढा दम व्हता पुढं जायाचा..जो तो बोलायचा भले धा हात मागं सरकून...माणसं नुसती बोलायची आणि तिथंच वळवळायची..

तितक्यात शिवामा बोलला..."आता एकच गडी हाय... हे काम करावं तर म्हारतुमानच.." 

तसा गर्दीनं एकादमात होकार भरला...

"व्हय व्हय त्येलाच बलवायला पायजे.."

"संप्या पळ लवकर म्हारतुमा घरातच आसल बघ लवकर ये म्हणावं आणि येताना हातातनं टोणा घेऊनचं ये म्हणावं.."

शिवामान त्याला पिटाळून लावला...एवढ्या साऱ्या गर्दीच्या गोंधळानं त्ये मुकजनावार बिथरलं असावं खायच्या चिरुटीत कवाधरनं एकमेकाला बिलगल्याली ती जोडी फुटली...त्यातला एक साप लोकांच्या नजरंसमोरच चपळाईन सळसळत त्याच टपण्याच्या कोनाड्यात असलेल्या बेटाच्या बुडक्याच्या बिळात शिरला...पण दुसरा मात्र भला दांडगा साप तिथंच जाग्याला वळवळत व्हता...सोताच आंग जड झाल्यागत त्येला पुढं सरकायलाच इना झालंतं.डोळं पांढरंफिट दिसत व्हतं.

      "चांगलंचं कातीला आलंय"
गर्दीतनं आसं माणसं कायबाय बोलत व्हती.
                         पयल्या बॉनीची ढोसून आडभीतीला चांगला तनगा लावल्याला म्हारतुमा उठून सदा हातात बाळीगत्याला नेटका टोणका घेऊन हालत डुलत आला.ह्यो म्हारुतमा म्हंजी जगावेगळा माणूस दगडाच्या काळजाचा..एकदा गल्लीत एक पाळीव कुत्रं पिसाळल्यालं कुत्र्याच्या मालकांनं म्हारतुमाला दारूला पैसं दिलं आणि कुत्र्याची वाटाघाट लावायला सांगितली...म्हारतुमानं धिटाईन कुत्र्याच्या गळ्यात दोरी आडीकली आणि अंधार पडायला कुत्र्याला वडत वयल्या डागला नेलं आणि त्याच्या डोक्यात सोटका घालून त्येला ठार मारलं...कधी कधी शिवारात धनगराच्या कळपातलं बकरं मान मुरगाळून गप करायचा आणि कवा बिनपत्या घरला आणायचा.. आसला हा म्हारतुमा...

आला साऱ्या गर्दीच्या तोंडाला आला... पुढ्यात वाट आडवावी तसं ते जनावार जागच्या जाग्याला पडून व्हतं..

गर्दीतन कुणीतरी म्हारमाला उकसावलं.

"म्हारतुमा हाण... बरोबर कात्रीत सापडलंय बघ."

तसा त्येलाबी चेव चढला..म्हारतुमा वावंभर पुढं झाला. हातातला टोण्याचा मागं पाठीला वळंबा केला...मुठी आवळल्या आणि वाऱ्याच्या वेगानं पयलाच पेट टाकला तो सरळ सरळ पाठीच्या कनोट्यातच...तो मुका जीव कळवळला..एकदा डाव्या एकदा उजव्या बाजूला हेलकावं देऊ लागला...भाकरीएवढी फडी काढली...काय वाटलं आसल त्या मुक्या जीवाला आतल्या आत... एवढ्या उन्हाच्या रकात...पाठीवर रगात फुटायजोगता घाव बसल्याला..

लोकं म्हणायची बिळात शिरल्याली ती नागीन आणि ह्यो नाग...बेटाच्या बुडक्यातल्या बिळातन जिभल्या चाटत ती हळूच मुंडकं काढून बघत व्हती...

समोरच तिच्या प्रियकराला ही लोकं आस्मान दाखवत व्हती.

तवर मधी कुणी शानपती केलीच..

."आगा म्हारतुमा...मधी कुठं... डोक्यात हाण की एका दमातच कसा जीव सोडतंय बघ..."

                           तसा कुठंतरी अंगावर येणाऱ्या शत्रूवर तलवारबाजी करावी तसं रागानं फडी काढलेल्या त्याच्या डोक्यावर पेटात पेट टोण्याचं तीन चार तडाख हाणलं...तसं त्या भुईवर त्याचं डोकं चिंदाललं..जिवाच्या आकांतानं कळवला.. कळवला तो बिचारा मुका जीव...पार अंगाची त्यानं तिरपिट केली...जाग्यालाच दोन तीन पलट्या खाल्या.मगाशी जड झाल्यालं आंग आता कसंच काय हालवालतं... उसाचं चिपाड व्हावं तशी तोंडाची गत झाल्याली...लालभडक रक्ताचा सडा तापलेल्या मातीवर भोवतीभर शिपल्याला..म्हारतुमाच्या हातातल्या टोण्याचा शेंडा ताज्या ताज्या रगतानं पाघळत व्हता..शेपटीत तेवढा जीव व्हता कायसा...नुसती इकडं तिकडं घोळसत व्हती...ती बी हळूहळू शांत झाली...मुका जीव निपचित पडला.गतप्राण झाला. तसा इकडं माणसांच्या गर्दीला विजयाचा आनंद झाला.

'है शाबास...' गर्दीतला प्रत्येकजण म्हारतुमाला शाबासकी दित व्हता...बुडक्याच्या सांदरीतल्या बिळातनं जिभल्या चाटत ती नागीण अजूनबी डोकावत व्हतीच...जिवंत असताना धा फुटावरनं बघणारी गर्दी आता गपघार झाल्याल्या त्या नागाभवती जमून तोंडात बोटं घालून अगदी जवळून निरखत व्हती..
                         नाग मारला आता राहिली नागीण..लिंबाच्या सोबतीला असल्यालं त्ये मेसकाटींचं बेट...  दहा बारा मेसकाटींचा त्यो बुडका..लिंबाच्या अन मेसकाटीच्या वाळ्या पानांचा खच अवतीभवती पडल्याला.. तळाला दोन तीन बिळं व्हती. आता लोकांचा मोर्चा म्हारतुमाला पुढं करून या बुडक्याकडं वळाला.पण एकदा का ती बिळातली नागीण आत कुठं सराकली ती पुन्ह्यांदा तिनं तोंड दाखवलंच न्हाई...काय काय खटपटी केल्या खरं ती काय बाहीर आलीच न्हाई...कुणी हातात लांब लोखंडी तारनं घेऊन आत खोचकायचा कुणी रकेल बिळाच्या तोंडातनं आत वतायचा.. तर कोण बिळाच्या तोंडाला डिवळायचा...सगळं उपाय करून बघितलं खरं आतली नागीण काय बाहीर यायला तयारच न्हाई...मारायचं तर दोघास्नीबी मारायचं ठरल्यालं...पण आता काय करायचं...प्रश्न पडला..तसा शिवामा बोलला "आरं ये पोरांनू तुम्हीं इथं थांबू नगसा जावा आणि गल्लीतन एकदोन एकदोन शिणी गोळा करा जावा त्या मुडत्या सापाला आगीन तरी देऊया.."

दोघबी तडाख्याला गावतील वाटल्यालं पण...
सगळ्यांचा हिरमुस झाला त्यात मनात नवीनच शंका इत व्हती ती येगळीच..

पोरांनी आपलं काम चोख पार पाडलं चांगलं डालगंभर शेणी जमा केल्या....जाणत्या माणसांनी वयल्या टपण्यात माणसाचं सराण रचत्यात तशा शेणी रचल्या त्यावर त्या मेलेल्या सापाचा लोळागोळा घातला इकडच्या तिकडच्या काटक्याकुटक्या गोळा करून घातल्या आणि कलत्या उन्हाला इकडं दहीन दिली..शेवटचा एक डाव म्हणून चार पाच शेणीची पेटती खांडं त्या बेटाच्या बुडक्याला टाकून धुमी केली पण शेवटी काय बिळातली नागीण बाहीर आली न्हाई...ह्यो सगळा कारभार आटोपायला सांजवकोत झाला. 
                        सगळी माणसं वर येऊन शिवामाच्या घरासमोर जमली...सगळ्यांच्या मनात एकच पाल चुकचुकत व्हती... आपण जोडी फोडली...एकाला मारलं नि एक वाचलं...मारल्याला नाग हाय आणि वाचल्याली नागीण...आता ती काय गप बसणार न्हाई...ती आपला माग काढून बदला घेणार...म्हणून सगळ्या माणसांनी हे पातक एकट्या म्हारतुमावर ढकललं... माणसांनी आपापसांत एक निर्णय घेतला आणि म्हारतुमाला पुढ्यात घेऊन साऱ्यांच्यावतीनं शिवामा बोलू लागला..."म्हारतुमा...घडलं ते इपरितच घडलं म्हणायचं.आम्हांला वाटलं दोन्हींबी गावतील तावडीला पण एक गावलं नि एक निसाटलं...झालं ते बराबर न्हाय...नागाला मारलं की म्हण नागीण डुख धरतीया..जीवच घेतीया..तवा बरंवाईट काय नगो तु आपलं आता असं कर...आम्ही सगळ्यानी मिळून ठरवलंय.तुला आम्ही पैसं काढून देतो तु आताच्या आता वाघापूर गाठायचं..देवाचा भंडारा ल्यायचा... चुकी झाली म्हणायची आणि देवळातच वस्ती करायची...म्हंजी मग जीवाला घोर न्हाई.."

"व्हय व्हय...शिवा म्हतोय ते खरं हाय...म्हारतुमा तु आपला आताच्या आता निघ बघू.." बोलतच केरुनानानं बंडीच्या आत हात घातला आणि  धा ची नोट काढून म्हारतुमाच्या हातावर ठिवली. तसं सगळ्यांनीच धा-पाच..धा-पाच रुपये म्हारतुमाच्या हातावर ठेवलं...निष्पाप जीवाचा बळी घेतल्याली ती सुपारीचं जणू प्रत्येकजण त्याच्या हातावर ठेवत होता...घडल्या पापाचं खापर त्याच्या डोक्यावर फोडून जो तो हात झटकून मोकळा होत होता.
                          म्हारतुमापण काय कमी हुशार नव्हता...अंधाराची गाठ पडायला म्हारतुमा चालला.आणि गल्लीन निःश्वास सोडला.म्हारतुमा चांगल्या खुशीत झपाझप पाऊल टाकीत व्हता.कधी नव्ह ती पैशांची एवढी बेजमी झाली व्हती. खिशाला कधी एवढ्या पैशांची सवय नव्हती पावलागणिक नुसता खिसा खुळखुळत व्हता.बायकोसंग हुज्जत घालून कवातरी एखादी पाच ची नोट हातात पडायची त्येबी ती शिव्यांनी  वसूल करून घ्यायची.दुधाची तान ताकावर भागायची..पर आता जिथं तान भागायची तिथपर्यंतच म्हारतुमानं धाव घेतली.दारूच्या गुत्त्याबशी पावलं आपोआपच थबकली...तिथनच देवाला नमस्कार केला..आणि गड्यानं वाट वाकडी केली...दारूच्या गुत्त्याची वाट धरली...आज म्हारतुमाची चंगळच व्हती..पायजेल तेवढी दारू प्यायची मनानं पक्कंच केल्यालं.आज म्हणायची खरी हाऊस फिटली..मनाजोगती दारूची तलप भागली...बराच वकोत म्हारतुमा दारू ढोसत बसला.आणि सारी गल्ली सामसूम झाल्यावं मध्यान रातीला घरात येऊन निजला.दुसऱ्या दिवशी गल्लीला माहिती पडलं.म्हारतुमा वाघापूरला गेलाच न्हाई...तवा ज्येला त्येला वाटू लागलं आता म्हारतुमाचं काय खरं न्हाई.
                              पण आज बारा वरसं गुदरली या गोष्टीला.म्हारतुमाच्या घरात ना दारात ती नागीण राहू द्या साधं साप-किरडूबी नजरला पडलं न्हाई.म्हारतुमा रानाशिवारातनं नदीवताडातनं कुठं कुठं फिरला पण साधा इचु चावल्याला आजतागायत माहिती न्हाई.गल्लीला वाटत व्हतं..माग राहिल्याली नागीण बदला घिल...हातात टोणा घेऊन जीव घेणारा म्हारतुमा जसा दोषी व्हता तसा हाणा मारा..म्हणणारा तिथला प्रत्येकजण दोषी व्हता जो की स्वतःला निर्दोषचं समजत व्हता..खरं तर व्हायचं असतं तर कुणाचंबी बरं वाईट झालं असतं... पण तसं काय झालं न्हाई...नुसती लोकं म्हत्यांत म्हणं..पण ती कुठली लोकं... ती काय कुणाला आजून ठाव झाली नाहीत...आणि कधी व्हणारबी न्हाईत...पण एक खरं हाय...त्ये बिचारं मुकं जनावार  कुणाच्या वाटला जाईत न्हाई याचा इस्वास पटला खरा पर अशा माणसाचा इस्वास कसा धरायचा..? देवळात मुर्तीचा...नागपंचमीला मातीचा नाग पूजायचा आणि  इकडं मातूर जिवंत नाग दिसला रं दिसला की ठेचायचा...'जुळं दिसलं की आपशकुन व्हतोय...साप म्हणं डुख धरतोय आणि बदला घेतोय असं लोकं म्हंत्यात म्हणं.' माणसाच्या मनातला ह्यो आंधळा इस्वास कधी जायाचा कधी सुधारायची माणसं..? आवं ते मुक जनावार कधी आपल्या वाटला आलं नव्हतं आणि येणारबी नव्हतं पण त्याच्या वाटला जाऊन त्याचीच यांनी वाट लावली.. जिवाभावाची जोडी फोडली...कायमची ताटातुटी केली...मुक्या जीवाचा हाकनाक बळी दिला.. त्या लोकांच्या निंदनीय करामतीची ती मुकी गावंदर आजही साक्ष देते..गल्ली खायच्या गावंदरीत पाय ठेवला की सगळं कसं ध्यानी मनी येतं आणि आपसूकच गावंदरीतलं ते जुळं नजरला उभं राहतं.

----------------------------------------------------------
                                     - किरण सुभाष चव्हाण.
                                       ८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...