फॉलोअर

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे.

 


'बहिरेवाडी गावच्या योगदानाचा, शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बलिदानाचा देशाला सार्थ अभिमान आहे'.

                                     भारतीय सीमेवर  पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खडे ठाकलेले वीर जवान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे वीर सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना वीरमरण प्राप्त झाले.शेतकरी कुटुंबातला ऋषिकेश (जन्म ४ जून २०००) .वडील रामचंद्र जोंधळे आणि आई कविता रामचंद्र जोंधळे...बहीण कल्याणी असं हसतखेळत छोटसं सुखी कुटूंब.ऋषिकेशचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावच्या भैरवनाथ हायस्कूल शाळेत झालं.तर पुढील शिक्षण शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे झालं.उपजतच हुशार आणि विशेषतः अंगात खिळाडूवृत्ती. डॉजबॉल या खेळप्रकारात विशेष कौशल्य होते.अनेक क्रीडा स्पर्धेत त्याने आपली निपुनता दाखवून दिली, पदके पटकावली.तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.अंगी खिळाडूवृत्ती होती तसेच मनात एक जिद्द होती की,भारतीय सैन्यदलात भरती होऊन प्राणपणाने आपल्या देशाची सेवा करायची. वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय असल्याने हा व्यवसाय ऋषिकेशने सांभाळावा अशी वडिलांची अपेक्षा होती.त्यातच एकुलता एक मुलगा म्हटल्यावर कुठल्या बापाचा धीर होईल आपल्या लेकराने एवढी मोठी जोखीम पत्करावी म्हणून.पण देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या पोराला कोणी थांबवू शकलं नाही आणि अखेर २०१८ ला ऋषिकेश सैन्यात भरती झाला.

मराठा लाईफ बटालियन इन्फट्रीमधून देशसेवेच्या कार्यात रुजू झाला.उरातल एक दिव्या स्वप्न साकार झालं होतं.आईवडिलांनाही एकीकडे आनंद आणि अभिमान वाटत होता.या आनंदाप्रित्यर्थ जोंधळे परिराने आपल्या गावाला स्नेहभोजन घातले होते.सगळं कसं सुरळीत चालू होतं.

                                       कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे ऋषिकेश गावाकडेचं अडकून पडला होता. पण आपल्या कर्तव्याची जाणीव त्याला स्वस्त बसू देत नव्हती.आणि म्हणून मग जून महिन्यातच ऋषिकेश पुन्हां आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी नव्या जोमाने उभा ठाकला.पण आपल्या समोरचा शत्रू जो कधी सुधारत नाही आणि कधी सुधारणारही नाही..ज्याची खुल्या रणांगणात आमच्याशी बरोबरी करण्याची कधी हिंमतचं होत नाही.म्हणून वारंवार पाठीवर वार करणारा भ्याड शत्रू. ज्याला शत्रू म्हणवून घेण्याचीही लाज वाटते असा पाकिस्तान. या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरजवळील सीमेवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला पण आमच्या हिंमतबाज भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे ११ सैनिक अनेक चौक्या,बंकर उध्वस्त केले.आजवरचे सर्वात मोठे नुकसान केले.इकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना तिकडे आमचे हे वीर जवान शत्रूवर  गोळीबारांचा धुमधडाका करीत होते.प्राणाची बाजी लावून होळी खेळत होते.पण दुर्दैवाने आमचे चार सैनिक या चकमकीत शहीद झाले.महाराष्ट्रातील काटोलचे सुपुत्र नायक भूषण रमेश सतई व कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावचा आमचा थोर सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले.जिथे चकमक झाली तो  इलाका पहाडी व किर्रर्र  जंगलाचा होता.दोन अडीच तास चाललेल्या या चकमकीत शुक्रवारी दुपारी १:१५ दरम्यान ऋषिकेशला विरणमरण प्राप्त झाले.

                                                      दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच अवघा बहिरेवाडी गाव शोकसागरात बुडाला..दिवाळीचा एवढा भरला सण...पण गावात एकाही दारात पणत्यांची आरास सजली नाही..आकाशकंदील पेटला नाही की दारात रांगोळीचा सडा घातला गेला नाही.

'पणत्या मुक्या झाल्या

आकाशकंदील विझले

कशी करावी साजरी दिवाळी

आमच्यासाठी लेकरू प्राणाला मुकले.:

 आज तीन दिवस झाले बहिरेवाडी गाव आणि आख्खी पंचक्रोशी आपल्या या लाडक्या वीर सुपुत्राच्या पार्थिव देहाची शोकमग्न अवस्थेत डोळ्यांत प्राण आणून वाट पहात होता.आणि अखेर आज पहाटेला तिरंग्यात लपेटलेला पार्थिव देह फुलांच्या माळांनी सजलेल्या बंद पेटीतून आपल्या मायेच्या गोतावळ्यात दाखल झाला. देशापायी कामी आलेल्या आपल्या एकुलत्या एक लेकराचा पेटीबंद असलेला निपचित देह पाहून त्या आईवडीलांनी ,पाठच्या बहिणीने फोडलेला हंबरडा.जिवाच्या आकांताने केलेला आक्रोश..उपस्थितांचे मन पिळवटून टाकत होता.आपल्या लाडक्या वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी बहिरेवाडी गावी आज अवघा जनसागर लोटला होता.माणसांच्या दर्याला जणू भरतीच आली होती.जागोजागी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करणारे किती तरी मोठं मोठे होर्डिंग्ज दिसत होते.ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव देह असलेली पेटी ठेवलेली.फुलांच्या माळांनी सजली होती.. फुलांची आरास थाटली होती.ज्या गल्लीतून ज्या गावातून ऋषिकेश लहानपणापासून बागडला...दौडलेला होता..त्या वाटेवरून शहीद ऋषिकेशची अंतिम मिरवणूक काढण्यात येत होती.गल्लीतून लोक दाटीवाटीन डचमळत पार्थिवाचे दर्शन घेत पुढे सरकत होते.घरादारासमोर आयाबाया भरल्या डोळ्याने अखेरचे दर्शन घेत होत्या.इवलासा जीव सुद्धा ती अंत्ययात्रा पाहून हुंदके देत होता. तरुण वर्गाची उपस्थित लक्षणीय होती..आजूबाजूच्या पंचक्रोशीतून  तरुण वर्ग या अंत्ययात्रेत सामील झाला होता...अवघे वातावरण ऋषीमय झाले होते.

'अमर रहे अमर रहे ऋषिकेश जोंधळे अमर रहे.'

'जब तक सूरज चांद रहेगा ऋषिकेश तेरा नाम रहेगा.'

'भारत माता की जय'

अशा घोषणांनी अवघा परिसर निनादत होता.अवघे आबालवृद्ध आपल्या लाडक्या वीर जवानाला निरोप देण्यासाठी आले होते.एखादी माऊली कडेवर नकळतं लेकरू घेऊन या अंत्ययात्रेत सामील झाली होती.

                                  भैरवनाथ हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणात शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.अवघी अलोट गर्दी पटांगणात सामावली.जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवर आणि आजी माजी सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.ज्या पटांगणात  ऋषिकेश खेळला त्याच्यातला खेळाडू घडला.आपल्या दौडत्या पायाने जी माती चौखूर उधळली तिच्या उरावरचं ऋषिकेशच्या अंत्यसंस्कारासाठी चबुतरा बांधलेला होता.त्या चबुतऱ्यावर रचलेल्या सरणावर तो निपचित देह ठेवला.आणि मग ऋषिकेशचा परिवार अंतिम मुखदर्शन घेऊ लागला पोटच्या गोळ्याला डोळ्यांत मनात किती किती भरून घ्यावं...आता केवळ ते गोजिरवाण निपचित रुपडं मनात साठवून ठेवावं...आता माझा ऋषिकेश पुन्हां कधी डोळेभरून दिसायचा नाही.आता ही शेवटचीचं छबी हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी आयुष्याच्या हयातभर तिला रोज मनात आठवावी.आईबापानं लेकराकडं घेतलेली ती झेप..दुःखान घायाळ झालेली बहीण सर्वांचा आक्रोश. साऱ्यांच्या नेत्रकडा ओल्या करीत होती...अवघी माणसांची गर्दी सदगदीत होत होती.

                                            आज भाऊबीज आणि या शुभदिवशी असा दुर्दैवी क्षण एका बहिणीच्या वाट्याला यावा...सरणावरती निपचित पडलेल्या आपल्या भावाच्या पार्थिव देहाला अश्रूंचा अभिषेक घालून दुखऱ्या घायाळ अंतकरणाने बहिणीने हातात निरांजनेचं ताट घेऊन ओवाळणी करावी...

ओवाळणी म्हणून काय मागावं तिनं आपल्या लाडक्या भावाकडं..?.आजच्या भाऊबीजेला आपल्या जिवाभावाच्या लाडक्या दादुचा जीव कोणी परत आणून देईल का तिलाओवाळणी म्हणून..?.आजच्या दिवशीचा तो कठोर कटू प्रसंग म्हणजे बहीण भावाच्या ताटातूटीचा न बघवणारा सर्वात मोठा दुःखी प्रसंग...बघणारे डोळे पाणावून गेले.. अवघी हृदये दुखवेगाने डचमळून गेली.दाटलेल्या कित्येक हुडक्यांना कंठ फुटले...आपल्या लाडक्या दीदीचं लग्न ठरलं होतं.. साखरपुडा झाला होता..थाटामाटात लग्नं पार पडायचं होतं.घरादाराला खुप आनंद झाला होता. पण ऋषिकेशच्या अशा जाण्यानं साऱ्या आनंदावर विरजण पडलं...आता आपल्या लाडक्या दिदीच्या लग्नात भाऊ म्हणून कोण मिरवेल.. पुढं होऊन सगळं कोण लगबगीनं पार पाडेल...? माहेरपणाचा भरभक्कम आधार म्हणून तिनं कोणकडं बघावं..? मनात येणाऱ्या अशा विचारांनी मन तीळ तीळ तुटतं तिथं त्या बहिणीच्या मनाची अवस्था काय होत असेल.? 

                    पोलीस दल व भारतीय सैन्य दलातर्फे हवेत फैरी झाडून आपल्या देशवासियांच्या तर्फे अखेरची मानवंदना ऋषिकेशला देण्यात आली.


       आणि अखेर लालबुंद ज्वाळानी आमच्या लाडक्या जवानाला कवेत घेतले...गर्दीच्या डोळ्याला पान्हा फुटला..जे लेकरू जिच्या छायेत मायेत वाढलं जिच्या अंगणी खेळलं बागडलं शिकलं सवरलं.. आणि आज देशाच्या कामी आलं ती ऋषिकेशची शाळा मूकपणे आपल्या लेकराचा अंतिम दर्शन घेत ते अंत्यसंस्कार भरल्या अंतःकरणाने पाहत होती...तिचाही उर आज अभिमानाने भरून आलं असेल..पण मूकपणे ती ही आतल्या आत रडत होती..

                                कुठून येते एवढी जिगर.अवघ वीस वर्षांचं कोवळं वय..ज्या वयात जीवनाची मजा लुटायची..eat,drink and be happy 'ये दिल मांगे मोर खाओ पीओ मजा करो...' अशा दळभद्री जगण्याला ठोकर देऊन आपल्या देशासाठी अवघ जीवन वाहणारी अशी लेकरं जन्माला येणं..हे खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांचं आणि त्या देशाचं खुप मोठं भाग्य आहे...धन्य धन्य ते मातापिता असा जिगरबाज कर्तृत्ववान पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला...'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा'

बहिरेवाडी सारख्या मातीत जन्मलेला हा शूर वीर  सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करता करता धारातीर्थी पडला. भारतमातेला आपला रक्ताभिषेक करून आपल्या मातीची..गावची आईवडिलांची..देशाची आण बाण शान राखून जीव बहाल करून गेला...मरणार तर आपण सगळेच आहोत..पण डोक्याला कफन बांधून निधड्या छातीने देशासाठी लढणारे आणि लढता लढता असं मरण वाट्याला येणारे खरे भाग्यवान तेच असतात..आणि त्यांच्याच वाट्याला असा मरणाचा देखणा सोहळा लाभतो.ज्याला देशासाठी मरण आलं पण ते  कधीच मरत नसतात..ते तर त्या दिवसापासून अमर होतात.

                          मायबापा आपला लेक कुठंही गेला नाही तो आज अवघ्या देशवासियांच्या हृदयी विराजित झाला आहे...तो कळीकाळालाही पुरून उरणारा आहे..

सरणावरती जळती जरी आज आमुचे प्रेते

या राखेतून जन्म घेतील उद्याचे भावी  नेते 

आपल्या ऋषीकेशच्या पराक्रमाची  गाथा इथे प्रत्येक माणूस गाईल..त्याच्या विंरमरणाची.प्रेरणा घेऊन इथल्या प्रत्येक घरांत घरात असा ऋषिकेश जन्माला येईल जो देशसेवेच्या कार्याला वाहून घेईल..आणि कल्याणीदीदी तुझा भाऊ कुठेही गेला नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे..तू कधीही दादा म्हणून हाक मार...अवघा महाराष्ट्र भाऊ या नात्याने तुला प्रतिसाद देईल..भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.आमच्या शूर वीर ऋषिकेशचे बलिदान वाया जाणार नाही..सीमेवर असणारा माझा प्रत्येक सैनिक त्या कडेकपारीत ओघळलेल्या ऋषिकेशच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेईल...

सरफरोशी की तमन्ना 

अब हमारे दिल में है !

देखना है जोर कितना,

बाजु ए कातिल में है ?

                               या देशाच्या उभारणीत बहिरेवाडी गावाने खुप मोठे योगदान दिले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक सारखे  रत्न देशाला दिले..तसेच वीर जवान प्रवीण जानबा येलकर आणि आता शहीद ऋषिकेश जोंधळे यांसारखे वीर सुपुत्र या गावाने देशाला सुपूर्द केले. देशकार्यात बहिरेवाडी गावचे असलेलं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही..बहिरेवाडी गावचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो.


शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण आदरांजली...

वीर जवान तुझे सलाम

जय हिंद जय भारत..


शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

बालकविता - चांदोमामा चांदोमामा - किरण चव्हाण.


 

"चांदोमामा चांदोमामा..."


चांदोमामा चांदोमामा

या ना एकदा घरी

रोज वाट पाहतो मी

उभे राहून दारी.


चांदण्यांना घेऊन या हं

तुमच्या बरोबरी

गप्पा मारू मिळून सारे

मज्जा येईल भारी


छान छान गोष्टी सांगा

ऐकू आम्हीं सारी

जराशीही चुळबूळ 

करणार नाही.


नाचू गाऊ मिळून आपण

धमाल मस्ती करू

तुम्हींच किती फिराल

आम्हीं तुमच्या भोवती फिरू.


खुप खेळून दमून भागून

थोडी विश्रांती घेऊ

हवं तर मग पुन्हां

 आपण शिवपाट्या खेळू


तुमच्यासाठी आई बनवेल 

तुप रोटी मऊ

अंगणात बसून आपण 

सारे पोटभर खाऊ.


मग शेवटी सांगा तुम्हीं

कशा बदलता हो कला

हळूहळू छोटे कधी मोठे 

होता कळत नाही मला


आकाशातले घर तुमचे

आहे तरी कोठे..?

फिरायाला अंगणही असेल

किती मोठे..


खूप काही बोलायचंय 

एवढं मनावरती घ्या ना.

नका आता उशीर करू

तुम्हीं भेटायाला या ना..

 

 चांदोमामा बघा हं 

मी तुमची वाट पाहेन

नाही आला तर तुमच्याशी

'गट्टी फू' चं करेन


याल ना हो चांदोमामा 

तुम्हीं माझ्या घरी.

सोडेन ना हो तुम्हाला 

मी नक्की वेळेवरी.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

आजी सोनियाचा दिनु - काकाजींचा जन्मदिन विषेश.

             

             🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकांजीचा जन्मदिन...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

"अद्वैताचं लेणं करू शब्दसुमानांनी लिंबलोण"

🌸🌸🌺🌺🌼🌼🌹🌹🌼🌼🌷🌷🌸🌺🌻🌺


इं - द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी..

ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी


द्र - वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने

धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी प्रत्येक तने-मने.


जी - वा सवे जीव जडण्या मायेचा धागा गुंफती आपुली वचने.

चांगुलपणाच्या सुवासाने दरवळतात इथे सुमने..


त - याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी

अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.


                     बापा...कंचे शब्द आपल्या चरणावरी घालावे...कंच्या शब्दांचा सेतू बांधावा आपुल्या पवित्र हृदयी भेटीसाठी... पण इथे का म्हणोनि शब्दांवरी भार घालावा...की जे...

'आपणची ठावें आपणासी' आपला ठाव आमच्या हृदयी विराजितआहे.. शब्देविन संवादीजे... बापा आपल्याशी संवाद सांधण्यास शब्दांची गरज नाही... आमच्या भावना आपुल्या हृदयी रुखातंळी निजभावें विसावण्यासाठी शब्दांविना ओढ घेत असतात...बापा आपण अद्वैत...अखंड...रूपे अनके जरी आपण एकरूप...आपुला एकची जिवात्मा...जैसे देह अखंड.. करंगळीस दुखावे आणि डोळीयाने पाणी भरावे... तैसें बापा आपुले नाते...अखंड भरलेले...

                  बापा आपुली भेट म्हणजे भुकेलिया चिमुकल्या बाळा माय गवसावी.आणि ..आणि वाणी..? ती वाणी म्हणजे दुधाअमृताच्या धारेने तान्ह्या लेकुराची तृप्तता व्हावी...आमच्या ज्ञानामृतांची धार.आसवल्या तृष्णमनानी ती घोटावी...आणि तृप्तीच्या आनंदाचा लाभ भर भरोनी घ्यावा...आपुल्या सहवासी मायेची अनुभती येते...जसे माहेरी आलेल्या लेकीचा मायेच्या भेटीत सारा सोस गळून पडावा ती बंधनातून मुक्त व्हावी.मायेच्या पुढ्यात लहानगी होऊन ती पुन्हा आनंदावी..सुखाने हारपुन जावी..तैसे बापा आपुल्या भेटीत आम्हां जीवनाचा सोस गळून पडतो...आनंदांचा आवारू आम्हांस गवसतो...बापा दुःखाचा भार हलका होतो.नी आपल्या सहवासाच्या अंगणी आम्हीं सुखाने हारपुन बागडतो...

               बापा तूच आमचा पंढरीचा विठोबा...आमचा ..निवृत्ती....ज्ञाना... सोपाना...मुक्ताई,एकनाथ,नामदेव,तुकोबा..सर्व काहीं...अवघ्या संतांच्या मांदियाळीशी भेट घालून देते आपली वाणी...वाटते की तिच्या वर्षावी चिंब चिंब भिजोनी...शिरावरी नाचावे घेवोनी...काय सांगू बापा आपली ओघवती वाणी म्हणजे विचारांची चंद्रभागा आणि संस्कारांची इंद्रायणी.जिच्या काठावरी बैसोनि "ब्रम्हांनंदी सदा डुलतू.." अशा स्वानंदात तल्लीन होण्याची प्रचिती येते.

             एक तरी ओवी अनुभवावी..तैसे "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक" हा माऊलींचा संस्कार जनीमनी पेरून अवघ्या मानवांच्या हृदयी  चांगुलपणाचा मळा फुलवण्यासाठी रातंदिस कष्टत असता...अवघ्यांना एकोपी आणून आनंदाचे आवारू जगी मांडत असता...

                  ऐसें आमुचे माय-बाप हृदयाचे काकांजी...

धन्य ते माता-पिता...ज्यांचे पोटी आज दिनी असे रत्न जन्मासी आले...शुद्धबिजापोटीचे हे रसाळ, गोमटे फळ...ज्याचे गोडवे गावे किती..?.वर्णावे किती...?चाखावे किती..?.आज सोनियाचा,पुण्याचा दिन अशा दिनी आमचे अद्वैत जन्मले.इंद्रजीत देशमुख काकांजी.

आमच्या या अद्वैत गुरूंचे आज कशाने लिंबलोण करू...?

 अखेर घालूनिया शब्दांवरीच भार करितो शब्दसुमनांची उधळण ...

पंचप्राणांच्या ज्योती लावूनी.. 

हृदयाचे निरांजन करोनी करितो बापा तुझी ओवाळणी.

अंतःकरणपूर्वक वाढदिनीच्या शुभेच्छा अपूर्ण करितो आपुल्या चरणी...

परमेश्वरा एकचि मागणे तुझ्या ठायी...

 निरोगी,उदंड आयुष्य लाभू दे या माया बापास....

सर्व इच्छा..आशा-आकांक्षा जावो पूर्णत्वास...


बापा...काकाजी आपणासी अनेकवार वाढदिवसाच्या अंतःकरणपूर्वक अनंत शुभेच्छा....


         🙏राम कृष्ण हरी.🙏


       "जय हो..!मंगल हो.".!!


'आपलीच लेकरं...शिवम साधक... शिवम परिवार.'


सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

'मृत्युंजया कोमलदीदी...' - किरण चव्हाण.

 


                  'मृत्युंजया कोमलदीदी...'

काल तर आमच्यात होतीस आणि आज अशी अचानक आम्हांला सोडून गेलीस.?
नाही अजूनही विश्वास बसत..
वादळवाऱ्याशी झुंजणारी पणती अखेर विझली..?
कालपर्यंत तर तेवत होती ना...उजळवत होती आपला भोवताल...
किती निखळ, निरागस, स्वछंदीपणे लखाखत होती...
मृत्यूच्या काळ्या छायेत दडलेल्या..
चाचपडणाऱ्या जीवाला जगण्याचा प्रकाश दाखवत होती...
असहाय्य वेदनेने विव्हळणाऱ्या जीवांच्या जखमेवर फुंकर घालत होती.
नियतीने किती छळलं ना तुला..? 
किती यातना.. वेदना दिल्या..
तरी सगळं सहन करीत राहिलीस.
कधी हार मानली नाहीस,डगमगली नाहीस.. 
लढत राहिलीस धीरोदात्तपणे.
जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने अखेर मृत्यूवर मात केलीस आणि तू झालीस मृत्युंजया..
जगता जगता अनेकांना  जगण्याची प्रेरणा देत राहिलीस..
जीवनप्रेरणा बनून गेलीस.
किती भरभरून जीवन जगत होतीस.
प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत होतीस.
ज्याने तुला अवयवदान केले...
ज्यांच्यामुळे तुला जीवदान मिळाले.
त्यांना क्षणाक्षणाला धन्यवाद देत राहिलीस..
अवयवदानाचे कार्य हे तर तुझ्या जीवनाचे ध्येय बनून गेले.
झपाटून कार्य करत दुर्धरांना मुक्त करणे हेच जीवितकार्य ठरले.
पण माहीती होतं तुला...?
मृत्यू मागून तुझा पाठलाग करतोय..?
मग काय म्हणावं तुला...?
जगापासून मात्र हे दुःख लपवून तु हसत खेळत आनंदाने जगत होतीस.
कीती उरलंय आयुष्य याचा विचार कधी केलाच नाहीस..
उरलेल्या इतुक्या आयुष्यात कितुके करून गेलीस.
अखेर  गाठलेच ना त्याने तुला..
किती निर्दयी तो..
तुलाच नाही तर अनेकांच्या जगण्याची प्रेरणा घेऊन गेला.
आमच्यापासून मृत्यूने दिदी तुला हिरावून घेतलय..पण...पण देहाने.
पण कसे हिरावून घेईल तो आमच्यापासून..
दिदी तुझे विचार...कार्य...प्रेरणा...ऊर्जा...
 तु कुठेही गेली नाहीस
तु सदैव आमच्या हृदयात जिवंत आहेस आणि पुढेही  राहिशील...चिरंतन.
अवयवदानाचे बीज सर्वांच्या हृदयात तू पेरून गेलीस...तो अंकुरेल.. फुलेल बहरेल...त्याचा वटवृक्ष होईल..जिथे जिथे अवयवदान असेल तिथे तुझी प्रेरणा असेल...
तुझे अवयवदानाचे व्रत आम्हीं कायम सुरू ठेऊ.
आणि पुढे पुढे घेऊन जाऊ...
दीदी...



'अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान.'
           


खालील लिंकवर क्लिक करून कोमलदीदीची जीवनसंघर्षकहाणी वाचा.



------------------------------------------------------------------------        
"मी माझा अवयवदानाचा संकल्प केला आहे कोमलदिदीने स्वतः हे अवयवदानाचे प्रमाणपत्र मला सुपूर्द केले आहे...आपणही अवयवदानाचा संकल्प करा."





बालकविता- :'चंपू आणि ससोबा.' - किरण चव्हाण.


 'चंपू आणि ससोबा.'


एक होता चंपू त्याचा मित्र गंपू

मारत होते गप्पा चंपू आणि गंपू


चंपू बोलत होता आणि गंपू ऐकत होता

काय बरे चंपू गंपूला सांगत होता..?


रात्री म्हणे एक पडले होते स्वप्न

चंपूच्या स्वप्नामध्ये आले बरे कोण..?


दिसत होते मला हिरवे हिरवे रान

रानावरती आले सशाचे पिल्लू छान


गुबगुबीत त्याचे इवलेसे अंग

अंगावरच्या केसांना पांढुरका रंग


येऊन माझ्या जवळी म्हणतो कसा मला

चंपूदादा तुम्हीं माझ्या घरी चला


मग गेलो ना हो मीही मागून त्याच्या घरी

गाजरांची बाग होती परसात भारी.


ससोबाने मला खायाला दिले गाजर

तेवढ्यात त्याचे आईबाबा झाले हजर.


ससोबाच्या संगे मी खुप खेळलो भारी.

फिरायला गेलो आम्हीं जंगलात दुपारी


कुठून कशी ऐकू आली वाघाची डरकाळी

माझी तर पार बोबडी वळाली.


ससोबा गेले पळून मला रडू आले

तेवढ्यात मला आईने जागे केले.

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

'कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.' - किरण चव्हाण.



कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.'✊

                                                                                                कोरोना...कोरोना...कोरोना... ऐकावं...पहावं...बोलावं असं सर्वकाही व्यापून ठेवलं आहे कोरोनानं...आज संपूर्ण जगभरात या विषाणूनं थैमान घातलय... अखंड मानवजातीला हैराण करून सोडलंय..एखाद्या दुरदेशात ज्याची उत्पत्ती व्हावी आणि बघता बघता आपला देश.. राज्य...शहर..गाव आणि घरापर्यंत मजल मारावी..याचाचं अर्थ आज त्यानं कोणत्याच सीमा मागे ठेवलेल्या नाहीत.. मानवी शरीर हे त्याचं आश्रयस्थान.. माणूस हा त्याचा वाहक.. माणसाकडून माणसाकडे संक्रमण करीत सुरू असलेला त्याचा सर्वव्यापी प्रवास...माणसामाणसांची शृंखला जोडून त्याने आज जगभर आपलं जाळं विणलय.संपूर्ण जग  व्यापलंय. आणि कोरोना नावाच्या या अदृश्य विषाणूने जणू माणसांविरुद्ध युद्ध छेडलंय..दिवसेंदिवस अधिकच तो आपल्या जाळ्यात माणसाला ओढत चाललाय.

                                    कोरोनापासून सुटका करून घेण्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे प्रयत्न युद्धपातळीवर सुरूच आहे.संपूर्ण जग आज या कोरोनाशी सामना करीत आहे.आपले शासन प्रशासन डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार,आशा अंगणवाडी सेविका,शिक्षक कोरोना योद्धा म्हणून या अदृश्य शत्रूशी प्राणाची बाजी लावून लढत आहेत.तसे तर आपण सगळेजणचं त्याच्याशी सामना करतोय..पण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर विज्ञानाच्या बळावर अपूर्व प्रगती साधलेल्या मानवाला,आज हा कोरोना आव्हान देतो आहे.नेमकेपणाने त्याच्यावर कशी पूर्णपणाने मात करावी याचे उत्तर सध्या तरी मानवाकडे नाही..एका बाजूला कोरोना आपले साम्राज्य विस्तारत चालला आहे तर दुसरीकडे मानव आपल्या अस्तित्वासाठी  निकराची झुंज देतो आहे.आपल्या हातात जेवढं आहे तेवढा जोरकसपणे त्याच्या विरोधात लढा सुरूच आहे. पण परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही.आजतागायत देशभरासह जगभरात लाखो करोडो मानवी जीवांचा बळी या कोरोनाने घेतला आहे..आणि दिवसेंदिवस आपल्यावरील कोरोना महामारीच्या संकटाचे सावट घनदाट होत आहे.

                             त्यातच आणखीन एक चिंतेचा विषय म्हणजे कोरोना फक्त शरीरावरचं नाही तर मनावर देखील आक्रमण करू लागलाय.कोरोना महामारीमुळे आज कित्येक जीव धास्तावलेत,चिंतेच्या गर्तेत सापडलेत...कोरोना फोबिया आजाराचे बळी ठरलेत..मानसिक समतोल ढासळून नैराश्यग्रस्त झालेत..कोरोनामुळे जगण्याची व जीवनाची घडी विस्कटून गेलेले जीव कुठे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतायेत.तर कुठे कोण  टोकाला जाऊन जीवनाचा शेवट करून घेतो आहे...त्यात भरीस भर म्हणजे 'आजची धक्कादायक बातमी' असं म्हणून गेली आठ महिने धक्क्यावर धक्के देणाऱ्या बातम्या रोज आपल्या कानांमनावर आदळतायेत..आधीच कोरोनाच्या चिंतेने ग्रासलेल्या मनाला  माध्यमातून येणाऱ्या रोजच्या कोरोनाच्या ब्रेकींग बातम्या..अधिकच चिंतेत टाकत आहेत..

                                  सुरुवातीला ज्याला आपण लांबून ऐकलं होतं तो आता आपल्याला अनुभवायला मिळेल की काय याची कुठे तरी प्रत्येक मनांत दाट शंका आहे..कोरोना अजून आपल्या शरीरावर आक्रमण करायचा बाकी आहे तोपर्यंत अगोदरच तो आपल्या मनावर आक्रमण करीत आहे.. वरून जरी सगळं सुरळीत आहे असं वाटलं तरी मनात कुठेतरी कोरोना विषाणूने प्रचंड दहशत माजवली आहे..नेहमीसारखा साधा सर्दी,खोकला, ताप आला तरी मला कोरोनाचं झाला..आता संपलं सगळं  म्हणून लोक गर्भगळीत होतायेत..त्यांच्या मनाचा समतोल ढासळतोय. वास्तविक कोरोना झाला नसेल तरी मला कोरोना झाला आहे असे लोक स्वतःला समजताहेत म्हणजेच कोरोना फोबियासारख्या आजाराला बळी पडताहेत..कोणी कोरोनाच्या धास्तीने या जगाला हाकनाक पारखे होतायेत. तर काही कोरोनाच्या भीतीमुळे किंवा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे वा झालेल्या नुकसानीमुळे आपल्या जीवनाचा शेवट करून घेतायेत..आणि हे वास्तव कोरोनापेक्षाही भयंकर आहे....पण आपल्या हे कसं ध्यानात येत नाही की कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करून बरे होण्याची संख्या किती तरी पटीने अधिक आहे..

म्हणजे कोरोनाची मुळात धास्ती घ्यायची ती केवढी..? आपण त्या पळणाऱ्या हरणाचे उदाहरण वाचले असेल ताशी ८० कि. मी वेग असूनही ताशी ६० कि.मी वेग असणाऱ्या वाघाच्या कचाट्यात ते सापडते का तर आपण सापडणार या भीतीने..आपलेही असेच होतेय का..?आपणही असे कोरोनाच्या भीतीने ग्रासले जाऊ..गर्भगळीत होऊ, आत्महत्या करीत असू तर मला म्हणायचं आहे...आपण त्या हरणापेक्षादेखील कचदिल निघालो.. कारण शत्रू मागे असताना ते हरीण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न तरी करते पण इथे केवळ कोरोनाच्या धास्तीने आपण कोणताही प्रतिकार न करता जीवाला मुकतो आहोत...

                          लक्षात घ्या कोणतंही युद्ध असो त्याचा मुकाबला करायच्या  अगोदर आपण शरीराने आणि महत्वाचे म्हणजे मनाने सज्ज असलो पाहीजे...मला अखेरच्या श्वासापर्यंत लढायचं आहे हा मनाचा खंबीर निर्धार आताच्या काळात आपल्याला तारू शकतो.पण होतंय काय इथेच आपली फार मोठी फसगत होतेय...आपण स्वतःला एकदा प्रश्न विचारा की या कोरोनाच्या शत्रूविरोधात लढण्यासाठी आपण मनाने खरंच सज्ज आहोत का..? आणि वेळ पडलीच तर कोरोनाशी प्रत्यक्ष लढताना आपल्या शरीराला मनाची खंबीर साथ मिळणार आहे का..? नाही तर आपल्या मनाची तयारीचं नसायची मग एकट्या शरीराचा शत्रूविरोधात कसा निभाव लागेल..? साधं उदाहरण आहे कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिची पूर्वतयारी म्हणून अभ्यास करणे हा अपरिहार्य आहे.. मग ही कोरोनाची लढाई आपण आपल्या  तयारीविना कशी जिंकू आणि ती जर जिंकायची असेल तर त्याला परिपूर्ण तयारीनिशी आपल्याला सामोरे जावे लागेल.आज आपण बाह्य सज्जता घेतोय म्हणजे मास्क वापरणे,सानिटायजरचा वापर डिस्टनसिंगचे पालन करणे हे नियम आपण पाळत असू तशी जनजागृतीही केली जातेय पण आपल्या आंतरिक सज्जतेचं काय..? उद्या आपल्याला कोरोनाशी प्रत्यक्ष सामना करताना काही काळ एकांतवास स्वीकारायची.काही काळ आपल्या कुटुंबापासून ,आपल्या माणसांपासून दूर राहण्याची वेळ आलीचं तर आपण आपल्या मनाची मानसिकता तयार केली आहे काय..?आणि म्हणून बाह्यसज्जतेबरोबरचं आंतरिक सज्जताही खूप महत्वाची आहे.. आणि ती आपली आपल्याचं करावी लागेल. 

                         आणि त्यासाठी आपले विचार व कृती यांचा मेळ आपल्याला घालावा लागेल. आणि त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करू शकतो..? पहिल्यांदा मनातून नकारात्मक विचार बाजूला सारा.नेहमी सकारात्मक रहा..सकारात्मक विचार करा..खाण्यापिण्याकडे लक्ष द्या..उत्तम आहार घ्या.शरीराला आणि मनाला समतोल साधायचा असेल तर नित्यनेमाने योगासने करा ...ध्यानधारणा करा.मनाची एकाग्रता वाढवा.जे जे मनाला उर्जादायी ठरेल ते ते करा..आपले छद जोपासा..कोणाला वाचनाची आवड असेल तर मनाला बळकटी देणारी पुस्तके वाचा..लिखाणाची आवड असेल तर एखादं छानसं पुस्तक लिहून पूर्ण करा..कुणाला चित्रकलेची कुणाला संगीताची आवड असेल किंबहुना ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे त्यामध्ये मन गुंतवा..संतसाहित्यांचा अभ्यास करा..अध्यात्माशी नातं जोडा...आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.. त्यांच्या आवडीनिवडी जोपासा,आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तींशी मनमुराद सुखसंवाद साधा..ज्या व्यक्तींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्याशी संवाद साधत रहा..प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात रहा.मनात कोणत्याही प्रकारचे साचलेपण ठेऊ नका...आपले मन नेहमी प्रवाही ठेवा..निखळ बोलत रहा आपल्याकडे हक्काचे मुक्तव्यासपीठ आहे व्हाट्सएप,फेसबुक अशा समाजमाध्यमावर व्यक्त होत रहा.कोणी जर या आजाराची मुकाबला करीत असेल तर त्याला शब्दांचा आधार द्या...आपल्यावर जर ही वेळ आली आले तर शब्दांचा आधार घ्या...एकमेकांना आधार देत आपण पुढे जायचे आहे.लक्षात घ्या माणसांमाणसातलं अंतर वाढलंय पण आपल्याला माणुसकीतलं अंतर कमी करून ते नातं अधिक घट्ट करायचंय.कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनातील भीती,चिंता,नैराश्य, 'हे आपले शत्रू कोरोनाला साथ देणार नाहीत याची काळजी घ्या.त्यांना मनात जराही थारा देऊ नका उलट संयम,धाडस आणि शांतता याच्या जोरावर आपल्याला हे आक्रमण परतवून लावायचे आहे.आज आपणच नाही सारं जग किंबहुना आपला देश या कोरोनाशी लढतो आहे.युद्धपातळीवर डॉक्टर, परिचारिका, पोलीस हरेकजण आपला जीव धोक्यात घालून लढतो आहे.जगभरातले संशोधक कोरोनवरची लस शोधण्यासाठी अहोरात्र जुटले आहेत..मग आपल्यालाही संयम ठेवावाच लागेल कोरोनाशी धैर्याने मुकाबला करावाचं लागेल..नक्कीच आजचा काळ सर्वांसाठी खूप कठीण काळ आहे पण विश्वास ठेवा हे पण दिवस जातील.'..आजच्या काळरात्रीनंतर उद्याचा उषःकाल ठरलेला आहे...गरज आहे ती शांततापूर्ण धैर्य ठेऊन वाट पाहण्याची.

                            मृत्यूला कदापीही घाबरू नका...मरणाला घाबरण्याची इथं परंपरा नाही.. तर मरणाला तळहातावर घेऊन लढण्याची झुंजण्याची इथं परंपरा आहे...हे आपल्याला सांगायला लागू नये...आपल्या जगण्याची प्रेरणा आहेत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज.आजच्या कठीण काळात त्यांचे अखंड स्मरण करीत रहा.एकदा शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ग्रंथ वाचा. वाचलं असेल तरी पुन्हा वाचा.आपल्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाचं याहून मोठं उदाहरण मानवी इतिहासात नाही.आणि हीच प्रेरणा आजच्या काळात आपल्या जगण्याला पुरेशी आहे.ज्यांनी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला...आपल्या मावळ्यांनी स्वराज्याकरीता मरणाला पाठीवर बांधून निधड्या छातीने निकराची झुंज दिली...ते स्वराज्यासाठी लढले आपल्याला आज स्वतःसाठी लढायचं आहे...प्रसंगी एकवेळ कोरोनाशी झुंजताना मरण आलं तर बेहत्तर पण  गर्भगळीत होऊन हे रणांगण सोडून परागंदा होत असाल, प्राणाला मुकत असाल तर खबरदार...! इथे शत्रूला घाबरण्याचा नाही शत्रूशी दोन हात करून लढण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून या मातीच्या कुशीत आणि मुशीत जन्मलेली आम्हीं लेकरं आहोत..त्या मावळमनाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याची ही वेळ आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रबळ इच्छाशक्तीने ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे.

'जगावे तर असे जगावे की आपल्या जगण्याकडे पाहून इतरांनाही जगण्याचे बळ मिळावे'...असे जगुया.आपण प्रत्येकाने कोरोनाच्या विरोधातली ही लढाई  दृढ आत्मविश्वासाने लढूया कोरोनाला हरवुया...आपण जिंकूया आणि येणाऱ्या काळात इतिहासाचं एक पान आपल्या नावाने राखून ठेवूया..


                     जय हो मंगल हो..!!


हे वाचा...









                                           

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....- किरण चव्हाण.


कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....


"मामा...मावशी...दादा...ताई कोण आहे का घरात.?."

"या बाहेर...या..."

"चला हात पुढं करा...थोडे लांब उभे रहा..."

"मावशी...ऑक्सिजन चांगला दाखवतोय तुमचा ..टेम्प्रेचरही चांगलं आहे.."

"आज्जीबाई तुमचं ऑक्सिजन कमी दाखवतोय..".

"काय त्रास होतोय..?"

"कुणाला काही.. बी.पी..शुगरचा त्रास..?

"घरात कोणाला थंडी- ताप, सर्दी-खोकला..."

"कुणाला काही त्रास..असेल तर सांगा...दवाखान्यात दाखवून स्वॅब तपासून घ्या."

"घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करायचा.."

"वरचेवर साबणाने हात धुवायचे किंवा सॅनिटायजर वापरायचे... कारण नसताना घराबाहेर पडायचं नाही....अशक्तपणा वाटत असेल तर लिंबूपाणी प्यायचे.."

"आणि हो कोरोनाला घाबरायचं नाही पण काळजी घ्यायची आपली व आपल्या माणसांची...कळलं का...?"


हे काळजीवाहू बोल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतील...प्रत्येक गाव,शहर गल्लीबोळ, अगदी सांदीखोपड्यातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन कोविड सर्वेक्षण करणाऱ्या या आहेत आपल्या आशा व अंगणवाडी सेविका..महाराष्ट्र शासनाने नुकतेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम सुरू आहे त्यामुळे यां उपक्रमांतर्गत आशा व अंगणवाडी सेविकेंच्यासोबत शिक्षकवृंदही सहभागी झाले आहेत..त्यामुळे मलाही या मोहिमेत सहभागी होता आले..अगदी जोरदारपणे सगळीकडे  ही मोहीम राबवली जाते आहे.. आमच्या टीममध्ये शिक्षक म्हणून मी,आमच्या भगिनींवंद्य आशा सौ.ज्योती मॅडम,सुनीता मॅडम ,भाग्यश्री मॅडम आणि अंगणवाडी सेविका छाया मॅडम असे आम्हीं पाचजण आहोत.. 

कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम (दादा) आणि आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक मॅडम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली आमची ही कोविड सर्वेक्षणाची टीम कात्यायनी गाव व परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहे...दररोज किमान ५० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे...सकाळी ९:३० वाजता सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होते.प्रत्येक घरासमोर जाऊन घरातील प्रत्येक माणसांची माहिती नोंद करून घ्यायची..बोटाला ऑक्सीमीटर लावून ऑक्सिजन तर कपाळासमोर थर्मल धरून टेम्प्रेचर तपासायचे..


कुणाला बी.पी,शुगर आणखीन काही आजार...ताप थंडी,खोकला,सर्दी अशी काही लक्षणे आहेत का.? याची विचारणा करायची...लक्षणे असलीच तर स्वॅब तपासायला सांगायचे...मास्क वापरा,वरचेवर हात धुवा,सॅनिरायझरचा वापर करा शक्यतो गर्दीत जाणे टाळा असे एकंदरीत कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन पुन्हा पुढील घर गाठायचे...ग्रामीण भागात विरळ लोकवस्ती तर एक घर या टोकाला तर दुसरे त्या टोकाला...तर काही घरे रानात वसलेली... तर कुठे अगदीच आडरानात एखादे घर अशावेळी पायी चालत जावे लागते.कच्चा खाचखळग्यांचा रस्ता,कुठे राडीचिखलातून तर कुठे गवतातून असलेल्या पायवाटेने जावे लागते.....घर.. मंदिर...शेतात..बांधावर जाऊन तर कुठे रस्त्याच्या काठाला जिथे कुठे माणसे भेटतील तिथे लोकांची तपासणी करीत पुढे सरकायचे...हा सर्व्हे करताना एकंदरीत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे...त्याचबरोबर

काही अपवाद वगळता खुप सुखद अनुभव अनुभवायला मिळत आहेत.  

                         दोन अनुभव मात्र मनाला अत्यंत वेदना देऊन गेले. ते असे की, त्या दिवशी कडकडीत  उन्हांत आम्हीं एका घरासमोर गेलो...घरातील लहान मुलांनी तपासणी करून घेतली..मोठ्या लोकांना बोलावण्यास सांगितलं मुलं म्हणाली बाबा झोपलेत...उठवायला सांगितलं...मुलं आत गेली थोड्याच वेळात मुलांचे वडील आतून चडफड करीतच बाहेर आले.आणि अशोभनीय भाषेत आम्हांला बोलू लागले..

 "चला चला इथून... आम्हांला काही तपासणी करून घ्यायची न्हाई..."

 "अहो काका,शासनाचं काम आहे आपल्यासाठीचं आह हे सगळं."  थोडं समजावण्याच्या प्रयत्नात सांगू लागलो

 तर उलट आम्हांलाचं ते  शिकवू लागले..

"काय सांगतंय ते शासन कसली तपासणी करता..चार महिने झालं लोकडाऊन केलं..कोरोना कमी न्हाई त्यो न्हाईचं नआणि आता म्हण तपासणी करत्यात." आम्हीं जाणलं होतं त्यांची  झोपमोड झाल्याचा हा सगळा त्रागा आहे त्यांनी आमचा चांगलाच अपमान करून तो आमच्यावर खपवला होता.

वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की, उन्हातान्हात उपातपाशी पायपीट करत आम्हीं या लोकांच्यासाठी फिरतो आणि ही लोकं दारी आलेल्या आम्हां लोकांचा वाटेल तसा अपमान करतात..

या गोष्टीवरून सिद्ध होते की,या कोरोनाच्या काळात सर्व्हे करताना या आशा व अंगणवाडी सेविकांना असा त्रास सहन करावा लागतोय  त्यांचा अपमान केला जातोय तर कुठे मारहाण करण्यापर्यंत मजल जातेय समाजातील अशा विकृतीला म्हणावं तरी काय..?

 दुसरा अनुभव असा एका बंगल्यासमोर गेलो  बाहेरुन गेटला कुलूप आतून एक व्यक्ती सांगत होती...आम्हीं आमची काळजी घेतोय...आम्हीं सुरक्षित आहोत...आत येण्यास कोणालाही परवानगी देत नाही...शेवटी त्यांनी काय आम्हांला आत घेतलेचं नाही  तपासणी तर दूरच. अशाचंप्रकारे काही घरांतून आम्हांला नकारात्मक प्रतिसाद मिळाला... म्हणजे हे असं झालं बाहेर आक्रमण सुरू असताना आपण काचेच्या घरांत राहून आम्हीं सुरक्षित असण्याचा कांगावा करायचा.

                                  कळंबा परिसरात सर्व्हे करताना करवीर तालुका तहसीलदारसो आदरणीय सौ. शितल भामरे-मुळे मॅडम,कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम दादा,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक यांनी आमच्या सर्वेक्षण टीमला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली..एका कुटूंबाशीही त्यांनी संवाद केला..तहसीलदार मॅडमांनी आपुलकीने सर्वांची चौकशी करून अगदी मोलाचे असे अल्पशा मार्गदर्शन केले..ही भेट आमच्या कार्याला खुप ऊर्जा देऊन गेली.




सर्व्हे करताना हळूहळू उन्हाचा कडाका वाढतो. वरून उन्ह आणि आत रिकाम्या पोटात भुकेने व्याकुळ कावळे ओरडायला लागतात...उपातपाशी वणवण फिरत एकन एक घराचा सर्व्हे करत पुर्ण पन्नास  घरांचा सर्व्हे करून घरी परतायला अडीच तीन वाजतात..

                            सर्व्हेच्या अनुषंगाने  प्रत्येक घरासमोरच्या प्रत्येक माणसांचे अनुभव खूप चांगले होते म्हणायला हरकत नाही..काही गोड मनाला सुखावणारे..जिकडे तिकडे नुसती कोरोनाचीचं चर्चा....एखाद्या घरासमोर गेले की माणसं आपुलकीने आपली माहिती देतात..तपासणी करून घेतात.कुणाची तपासणी राहून गेली तर स्वतःहुन पुढे येतात..आमचा आदर करतात....मॅडम या बसा.. चहा करूया हे प्रेमळ वाक्य ठरलेलेचं.म्हणजे अतिथी देवो भव ही संस्कृती या कोरोनाच्या काळातही प्रत्येक घरांत नांदत असलेली दिसून येत होती. .एखादी मावशी आपुलकीने अंगणातील  पेरवीच्या झाडावरच पेरू देते... एखादा मामा हौसेने आपल्या दरातल्या वेलीवरचा दुधी भोपळा देतो...तर आणखीन एक माऊली आपल्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा खायला देते..


तर कोट्याधीश असणारे पाशासाहेब सारखी माणसे आग्रहाने आम्हांला चहा देतात...खरं तर ही माणसं म्हणजे आमच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी जिवंत हृदयाची माणसं .म्हणजे यावरूनचं कळते की समाजात कुठे तरीच वाईट माणसं आहेत पण चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त आहे. जरी कुठे आमचा अपमान झाला असेल तरी त्याहून आमचा सन्मान करणारी माणसं ही कितीतरी पटीने जास्त होती...  

                    खरं तर या सर्व्हेच्या निमित्ताने आशा व अंगणवाडी सेविकां यांचे समाजसेवारूपी कार्य जवळून बघता आले..त्यांना येणारे  बरे वाईट अनुभव याची देही याची डोळा अनुभवता आले.. गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत.. हे काम करताना एकही घर सुटता कामा नये याची काळजी घ्यावी लागते.शहरठिकाणी एक ठीक आहे पण ग्रामीण भागात सर्व्हे करताना अनेक अडचणींचा सामना या सेविकांना करावा लागतोय..प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेचं पाहिजे...त्यामुळे जिथे कुठे घरे वसली असतील तिथे जावेच लागते...मग काही घरे गाव सोडून वाड्यावस्त्यांवर..काही एकदोन शिवारात...तर एखादे घर लांब कुठे निबिड रानात  असते ..या सर्व घरांना भेटी देऊन तेथील लोकांची माहिती गोळा करावी लागते.आज आमच्यासारखे शिक्षक सोबत आहेत म्हणून नाही तर इतर वेळेस या आशा  व अंगणवाडी सेविकांना जीव धोक्यात घालून मोठी जोखीम पत्करून या आडरानातून त्या घरापर्यंत भेटी द्याव्याचं लागतात.


                              आज कोविड महामारीच्या काळात आपले सर्वस्व पणाला लावून या आशा व अंगणवाडी सेविका कोविड योद्धा म्हणून आपले समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे बजावत आहेत.खरं तर ही समाजाची दाई आहे जी आई होऊन आज आपल्या घरासमोर येते प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करतें काळजी घेण्यास सांगते..हा समाज म्हणजे तिचा कुटूंब आहे..हा समाजरूपी कुटूंब सुरक्षित रहावा म्हणून ती आज आपल्या दारी येतेय...पण तरीही आपल्या समाजात कुठे तरी वाईट अनुभवांचा सामना या भगिनींना करावा लागतोय..काही अपमानास्पद घडलेल्या वाईट बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचतोयही.आज मी जवळून पाहतोय की, हे काम या समाजसेविका प्रामाणिकपणे करीत आहेत आपल्या जीवनातला सर्वात जास्त वेळ त्या समाजासाठी खर्च करीत आहेत.आज बाहेर फिरणं किती धोक्याचं असताना तो जीवावरचा धोका पत्करून या भगिनी तुमच्या आमच्यासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहे...दुर्दैवाने हे काम करत असताना काही आशा  कोरोना संक्रमणाच्या शिकार झाल्या..काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे एवढं जीवावर उदार होऊन काम करीत असताना  शासनस्तरावरून त्यांना मानधन किती मिळते..? महिन्याकाठी फक्त १००० रु. आणि सर्व्हे करताना कोरोनामुळे काही बरे वाईट घडले तर पन्नास लाखाचे विमा कवच आहे...म्हणजे इथे जिवंत असण्याचे मोल नाही पण मृत्यू पश्चात मात्र लाखोंरुपयांचे मोल आहे..मुळात ७८ प्रकारची कामे या आशा सेविकेंना करावी लागतात...आणि त्यांच्या एकूण कामावर मानधन दिले जाते ते ही तुटपुंजे आहे..खरं तर स्थानिक पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या लेकीकडे शासनाने बापपणाच्या भूमिकेतून दखल घेऊन त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देणे आवश्यक आहे...खरं तर आताच्या सर्वेक्षणाचे मानधन भरभक्कम दिले पाहिजे...म्हणजे माझ्या या भगिनीची गाडी पेट्रोल संपल्यामुले कुठे अर्ध्या रस्त्यात बंद नाही पडणार..?.अहो तुमच्या त्या १००० च्या मानधनात महिन्याचा प्रवास खर्चही भागत नाही..


                                 जसे सीमेवर बाहेच्या शत्रूसंगे आमचे सैनिक लढत आहेत तसे इथे या कोरोनाच्या अदृश्य शत्रूविरोधात डॉक्टर, पोलीस,परिचारिका यांच्या बरोबरीने या आशा व अंगणवाडी सेविका लढत आहेत. आताच्या कोविड महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या  आशा व अंगणवाडी सेविका म्हणजे आमच्या रणरागिणी समाजसेविका आहेत...आता आपली किंबहुना  समाजाची एक जबाबदारी बनते की या कोविड योध्यां रणरागिणीच्या पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणण्याची.... जेंव्हा या रणरागिणी आपल्या दारापुढे येतील जेंव्हा कुठे भेटतील तेंव्हा त्यांचा योग्य आदर करा...त्यांना सन्मान द्या...आणि म्हणा..."ताईनों तुमच्या कार्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो...आपणही काळजी घ्या." शासनाकडून त्यांना भरभक्कम मानधन मिळेल न मिळेल पण मंडळी तुमच्याकडून मिळणाऱ्या  मानाचं धन हे त्यांच्यासाठी लाखमोलाचं आहे..बघा त्यांच्या कार्याला किती पटीने ऊर्जा मिळते...

                     सर्वांनीच काळजी घेऊया माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला उदंड प्रतिसाद देऊया..आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया...आणि कोरोनाला हरवूया....सर्वांनीच घेऊया ही खबरदारी.. माझे कुटूंब माझी जबाबदारी..

पुनश्या कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या या आशा व अंगणवाडी सेविकांच्या कार्याला सलाम...सुरक्षित रहा...काळजी घ्या..


तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो

सकळांचे लक्ष तुजकडे वळो

मानवतेचे तेज झळझळो

विश्वामाजी या योगी


जय हो मंगल हो..!!


आमच्या कोविड सर्वेक्षण टीमचा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.






                                   - किरण सुभाष चव्हाण.
                                      ८८०६७३७५२८

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

गावकुसातील कथा - 'तानी' - किरण चव्हाण.





 'तानी...'

                            

                                  वरल्या आंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत व्हता.रानाशिवारात नुसता हैदोस घातल्याला.जमिनीला जरासुदीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम व्हता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातन पाण्याचा मुसोंडा खाली उतरीता..बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत,जवळच्या वड्या वताडाला मिळत व्हतं...वड्या वताडातलं गदुळ पाणी उर भरून खायल्या आंगाला सपाट्यानं धावतं.हिरव्या लुसलुशीत रान कुरणाच्या उरावर वरनं रापराप थेंबका आदळालता...आंगचा पाझर फुटावा तसं एकेक दगुडधोंडा वरनं खाल पाझरत व्हता.आंघोळीचं पाणी आंगवळण घित खालपतोर नितळावं तसं झाडीझुडीच्या उभ्या आंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घीतं.

                                       धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलधारेचा अभिषेक व्हावा, तशी मुसळधारनं नितळत व्हती. दिसामासानं  शेतीभाती हिरव्या अंगानं पोसवालती.जिकडं तिकडं बघून नजर हिरवीदाट व्हायची..कवळ्या पोरीगत वाढत्या आंगची रोपलावण हिरवेपणाचा साज चढवून थाटात उभी व्हती.आंगावाटं आडोसा धरणारी मोठ्या खोळाची इरली खाली रोपच्या वावरात वळाबंल्याली.        

"बघ बाई...रातध्याड दम न्हाई की गं या पावसाला.." 

"....तर गं तरण्याला न्हाय आणि या म्हाताऱ्यालाचं कुठनं एवढा जोर आलाय कुणास ठाऊक..?"

"नुसता मोग्यान वतालाय बग.. जरा सुदीक ठेमका बंद न्हाई की गं."

गुडघाभर पाण्यात वाकून आया बाया बोलचालत दोनी हातांनी रोपा वरबडत व्हत्या.

                                       आतासा गावंदरीच्या मळीस्न कंच्यातरी म्हशीच्या गळ्यातल्या घाटीचा किणकिण आवाज कानावर इत व्हता..

        "आगं ये बायानों उठा,आता भाकरीचा वकुत झाला...ती बघा तानीची सुंदरी यायलीया इकडं."

" व्हय तर,बापडा जरा थांबलाया तोपतूर भाकरीतुकडा खाऊन घेऊया तिकडं." पिकल्या केसाची जनाक्का मागनं बोलली.

गदुळ पाण्यात हात खदबळूनं बाया पाण्यातनं पाय वडीत काठाला आल्या...

पावसानं जरा ईस्वाटा घेतला व्हता, तीचं येळ साधली.पदरानं हाताची वल पुसत आयाबाया रानमाळावर पईसपरभारी पगळून बसल्या...जनाक्काच्या सूननं फडक्यात बांधल्यालं भाकरीचं कडाप सोडलं....जरबंदी डब्यातली मटकीची उसळ डावंनं रग्गड भाकरीवर घातली. एका बगलला भुईमुगाचं दाण घालून केल्याला हिरव्या मिरचीचा हिरवादाट ठेचा घालून परतिकीच्या हातावर भाकरी  ठेवली.बोलबोलत बाया तुकडा मोडू लागल्या..

                           हिरव्यागार पडीवरचं लुसलुशीत कवळ्या गवताचा मुडापा करून तानीची सुंदरी चरत व्हती...तरीबी आज वीसेक दिस झालं आसतील ,तिला असं बेमालूम काय चरताच आलं नव्हतं...दाव्याला बांधूनचं व्हती...किती दिसानं आस तिला मनमुराद चरायला मिळत व्हतं.अंगावर कागदाची खोळ घेतल्याली तानी करवंदाच्या जाळीखाली बसून,आपल्या लाडक्या सुंदरीला एकसारखी न्ह्याळत व्हती..तशातंच अवचित खायल्या आंगास्न हाळी कानांवर आली.

           "ताने आगं ये ताने...ये इकडं.."  जनाक्कानं मोठ्या सादान हाळी मारली.

        "ये गं संग संग नकाडी भाकर खा ये.."

तसं तानी दमशीर पावलं टाकीत बायकांच्या घोळक्याकडं चालली..

बायकांच्या कडला जनाक्काच्या बगलला येऊन तानी बसली..

"...बस बाई बस..."

" सगुणे...त्यातली एक भाकरी, त्यावर चांगली रग्गड भाजी घालून दे गं माझ्या बाईला.." जनाक्कान सुनला सांगितलं.

बोलतचं तानीच्या डुईवरनं हात फिरवायला लागली..

तानीच्या आवताराकडं बघत आयाबाया एकेक तुकडा मोडायला लागल्या.

जनाक्काच्या सुननं तानीच्या हातावर भाकरी ठेवली..तानीनं जरा लाजत चोरट्या अंगानं कशीतरी ती व्हट्यात घेतली.

"घे घे लेकी आन खा सरळ बसून.." 

तशी त्या वलीत... बारक्या पोरागत मांडी घालून व्हट्यातली भाकरी तानी  खायायला लागली.

तोंडातला घास घोळवत बाया तानीला निरखत व्हत्या.

"बाईसाब... तानीचं एक जीवाला लय वाईट वाटतंया बघा..." लुगड्याची तुळसा खाईत खाईत बोलली.

"...तर गं बाई...आदीच खुळीकावरी पोर..एकीला दोघी मायलेकी ऱ्हाईत व्हत्या."

"मायजाळ तुटला म्हणायचा पोरीचा, आईला पारखी झाली बग पोर.." जनाक्का चुकचुकत बोलली.

"वयबी झालतं म्हणायचं.. त्यात ह्या भोळ्याभाबड्या खुळ्या लेकीची झुरणी जीवाला व्हतीच तिज्या..."

"काय करायचं मरान कुणाला चुकलंया दिवाणसाब.. तरी पंधरा दिस झालं आसल नव्ह म्हातारीला मरुन...?"

" ते गं का आणिक आठादिसानं उद्याच्या पुनवला म्हयना व्हतोया..."

"तानीवर लई जीव व्हता तिजा...जरा कुठं वकुत झाला म्हंजी दाराम्होरं बसून वाट बघायची लेकीची."

"आता कोण बघल गं वाट.. माय ती मायच तिची मया कुणाला इल व्हय... लई वंगाळ वाटतंया बग तानीचं..."

"गिरीजा आज्जीचा..ल्योक हायसं वाटतया आजून..?" जनाक्का प्रश्नार्थक बोलली.

"हाय नवं आजून बायकापोरंबी हाईत... जाणार हाईत वाटतं आता चार दिसात."

"जनाक्का...ऐकायला आलंय का तुझ्या कानावर..?"

"न्हाई बा. का गं..काय झालं..?" जनाक्का एकसारखी लुगड्याच्या तुळसीकडं बघायला लागली.

तशी तुळशी सांगायला लागली.

"तानीचा भाव..म्हण तानीला संग मम्बयला न्यायचं म्हंतोया.."

"खरंच काय गं..?"

"तानीची सुंदरा  म्हसबी इकणार हाय आण तानीला तिकडच नेणार हाय.."

" काय म्हणतीस..मला ह्ये आताच कळतंय बघ तुज्याकडनं." 

"तेज बी खरंच हाय म्हणा...आता आई गेली ही खुळी भन.. एकटी कशी ऱ्हायाची मागं... पर ही रानावनात फिरल्याली पोर कशी ऱ्हायाची तेवढ्या लांब शेरसिटीला.." जनाक्का तानीकडं मायेनं बघत बोलली.

तसं वठाला लावल्याला पाण्याचा तांब्या भुईला ठेवत दाटून आल्याला गळ्यातला हुंदका सोडवत एकाकी तानी जनाक्काच्या गळ्यातचं पडली..हुंदक्यावर हुंदक दित ढसासा रडायला लागली...

पोरं अशी अवचित गळ्याला पडल्याली बघून जनाक्काबी भाबांवली...हातातल्या भाकरीचा चतकोर तुकडा खाली ठिवून जनाक्कानं तानीला सावरलं.

"आंग ये माजे लेकी...काय झालं गं..? गप रडू नग गप..मी हाय नवं."

जनाक्का तिला गप करायला लागली पण तिज्याबी डोळ्याची आकनं पाण्यानं भरली. पोरीचं आंगावर पडल्यालं धावाण बघून आकीरला डोळ्याला धार लागली. 

"आंग लेकी आमी कोण परकी हाय व्हय तुला...मी हाय नवं रडू नगस..माजी शानी गं ती.." जनाक्का आय हुन तिला समजी घालालती.

बघणाऱ्या प्ररंत्येकीचं हुर्द भरून आलं हुतं.

 छातीला बिलगल्याल्या तानीला

जनाक्कानं आंजारलं गोंजारलं आणि शेवटी कसतरी तिला गप केलं..

"पोरीच्या मनात न्हाई बायांनो...भावासंग जायाचं." जनाक्का.

"पण त्यो बी काय करल.....आता आई गेली ही खुळी भन, एकटी कशी ऱ्हायाची मागं... सगळं कॉडचं हाय."

पावसाचा चिटका सुरू झाला.. घटकाभर असाच गेला..

"आय मी जातो गं.." तानी वर उठत बोलली..

"व्हय ...जा लेकी आणि मनाला वाईट वाटून घिवू नगस हूं.जा दमान जा.."

जनाक्कानं पुन्ह्यांदा धीर दिला.

तानी आपल्या सुंदरीच्या दिशेनं वाटला लागली...सुंदरी आपली चरायच्या नादात लागल्याली. बायकांनीबी बसल्याला जागा सोडला..पण मनात तानीनं जागा धरल्याला..

"माधूचं बी खरंच हाय... आई व्हती तवा एक ठीक व्हतं...एकटी पोर कशी ऱ्हाणार इथं..कितीबी केलं तरी बाईमाणसाची जात...नात्याचं नात्याजवळचं आसल पायजे."

" देव बी असा कसा म्हणायचा...रूप दिलं गुण दिलं पण नको व्हतं ते पोरीला खुळपणबी दिलं. आज दोन लेकरांची आय झाली आसती." जनाक्का पाण्याचा घोट घित वर उठली.

बोलत चालत बाया वावरात शिरल्या...

                       गिरीजाआजीला वारून आज बक्कळ म्हयना व्हइत आला .गिरीजा आजी आणि तानी दुगी मायलेकी. एकमेकीला दुगीजनी ऱ्हाईत व्हत्या..गिरीजाआज्जीचा थोरला ल्योक माधू बायका पोरं घिवून कामानिमतांनं मम्बयला ऱ्हायचा...मधन आदन गावाकडं फेरी मारून जायचा.तानी दिसायला गोरीगुमटी.एखाद्या माडासारखी वाढल्याली पोर..बरुबरीच्या पोरींची लग्न व्हवून दोन तीन पोरंबी झाली पण  खुळ्याकावऱ्या पोरीला कोण करून नेणार.? पर तानी सगळं कामबीम जिथल्या तिथं करायची...माणसाला चांगली बोलायची...हासायची खिदळायची... वागणं आजूनबी नकाड्या पोरीसारखं..म्हातारीच्या जीवाला नुसता या खुळ्या पोरीचा घोर...लई जीव तिजा पोरीवर...माझ्या माघारी या पोरीचं कसं व्हयाचं..? नुसतं याचचं तिच्या जीवाला कोडं पडल्यालं...वय झाल्यालं पण या काळजी आजारानं तीन आकीरला प्राण सोडला..थकल्या काळजाच्या आईनं पदरातल्या एका खुळ्याकावऱ्या जीवाला मागं ठेवून कायमची पलांग मारली.आणि तानी आईइना पोरकी झाली.

                                  सांजवकुत झाला पोटाचा नगारा भरून आता सुंदरी घराच्या वाटला लागल्याली.मागनं तानी चालत व्हती. वरनं पावसाची एकसारखी रिपरिप चालूच.पांदीची वाट माग पडली.कोपऱ्यावरचं पांडू केसरकराचं घर लागलं.. घराचा कोनाडा वसड्याच्या वलीन उकलून पडल्याला.गल्लीन सुंदरीच्या गळ्यातल्या घाटीचा आवाज घुमत जाईत व्हता..घराच्या उजव्या आंगच्या गोठ्यात सुंदरी शिरली...आपल्या दाव्याला जाऊन शांतपणी उभारली..गोरणीत पडल्यालं दावं उचलून तानीनं सुंदरीच्या गळ्यात आडकीवलं.बाहेर आली हुंबरा वलंडायला आईची आठवण मनात दाटली.सोप्याला येऊन आय म्हणायची.."लेकी किती वकुत केलास..कवाधरनं वाट बघत इथंच बसलूया." 

पण आता आसं इचारणारी आय नव्हती...आसं काळजीनं कोण बोलल आता...? तानीच्या डोळ्यांत टचकन पाणी उभारलं..

दादा सोप्याला कंच्यातरी माणसांसंग बोलत व्हता..तितनं चटाटा पाय उचलत ती मधल्या चौकटीतनं आत शिरली.

         "...चला पावणं...या माझ्या मागणं  ...एकदा बघून घ्या जनावार मग बघू येवाराचं .." माधू बोलत पुढं झाला.

तसं उठून...ढगळ्या इजरीतलं गडी बिडी फुकत गोठ्याकडं गेलं.

वयनंखायन निरखून चांगलं तपासून खात्री करून ती माणसं पुन्हा बाहीर आली.सोप्याला बराच उशीर बोलणी सुरू व्हती..आकीरला घासाघीस करून एक हिरवी नोट त्यांनी सस्कार म्हणून माधूच्या  हातावर ठेवली...

      "दोन दिस जाऊ दे मग चांगला दिस बगून येतू न्यायला आमी." जाताशेवटी आसं बोलून ती माणसं बाहेर पडली...

चला एक चिंता मिटली..या समाधानात माधू घरात आला आणि बायकोम्होरं सभागती बोलला.

"शेवटी झाला येवार दोन दिसात येतील माणसं म्हस न्यायला" कानांत उकाळत्या त्येलाचा थेंबका शिरावा तसं झालं..त्ये ऐकूनचं तानीच्या काळजात कसलीतरी कळ दाटली..नुकताच व्हटाला कप लावल्याला.त्यो गुळमाटं 'चा' चा घोट कडूकडूजार लागला...डोळ्याला आपोआप पानगळती लागली..आता काय बोलू नि कशी बोलू...? गपगुमान ती भरल्या डोळ्यांनं परड्याआंगाला गेली.

                                         एक माय व्हती तीबी गेली निघून आणि आता जिला लाडीगोडीन वाढीवलं... घासातला घास दिला..माया केली ती जिवाभावाची सुंदरीबी आता मला जाणार सोडून या इचारानं तानीला त्या रातीला कसली ती झोप लागली न्हाई...रातभर नुसती या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत व्हती...मध्यान रातीला उठून तानी सुंदरीजवळ जाऊन रडत बसली. कुणासमुर उरातल दुःख मांडायचं.? कोण ऐकून घेणार माझ्या खुळ्याकावऱ्या जीवाचं..? त्या दिशी तानीन सुंदरीला  चरायला सोडली..धुळणीच्या माळावर चरत्याल्या सुंदरीच्या पाठीला बिलगून तानी रडली. सुंदरी खाली बघून गपगुमान चरत व्हती.. तिच्याकडं एकसारखं बघत तानी डोळ्यांतून टीप गाळीत व्हती...आज समोर चरत्याली माझी सुंदरी उद्या मला दिसणार नाय या दुःखानं ती ठार खुळी झाल्याली...रानात आली की तानी तिच्यासंग बोलायची. मनातलं सगळं तिलाच सांगायची...आता कुणासमोर मन मोकळं करायचं..? कोण व्हतं एवढं जिवाभावाचं... सुंदरी  मुकी व्हती..तिला काय कळणार उद्या त्या दोघींची ताटातुटी व्हणार व्हती.त्या मुक्या जीवाला जर हे समजलं आसतं तर ती बी तानीच्या गळ्याला पडून रडली आसती...तानीचा जीव नुसता तीळ तीळ तुटत व्हता.सांज झाली तरी घरला जाऊ वाटत नव्हतं.

                                     सगळा  नाईलाज व्हता..  जड पावलांनं तानी सुंदरीला घिवून घरला परतली. ठरल्याप्रमाण दुसऱ्या दिशी ती माणसं आली..कुणीतरी वैरी चालून आल्यासारखं तानीला वाटत हुतं..त्येंच्याकडं बघून ती दातवठ खाईत व्हती..सुंदरीच्या गळ्याला त्यांनी हात घातला...आणि तानीन एकंच हंबरडा फोडला.."दादा..नको गा माझ्या सुंदरीला दिवू.." पुढं जाऊन तानी सुंदरीच्या गळ्याला पडली..गळा काढून रडायला लागली...माधु आन तिची बायको म्होरं झाली आणि त्यांनी तानीला आवरलं....माधु तिला गप करायला बघत हुता, पण तानी ऐकायलाचं तयार नव्हती..

सुंदरीच्या गळ्यातली दोरी  ताणली ..सुंदरीला वडत ती माणसं नेऊ लागली.

"नगा वो माज्या सुंदरीला नेऊ नगा..".मागणं कळवळून तानी  रडत व्हती....आई गेली तवाबी तानी आशीच रडालती.. आईला ज्या वाटनं नेली व्हती त्या वाटनं सुंदरी आता जाईत व्हती.जाताना मागं बघत हुती...मागं मागं वड खाईत .ती बी आता तानीसाठी हांबरत हुती..   

                        आज चाराला आठ दिस झालं.. .माधू .तानीला सांगून दमला व्हता..ती काय केल्या जुमानतचं नव्हती..."मी येणारच न्हाय बग मम्बयला" तानी आपल्या मतावर ठाम. शेवटी तिच्यामुळ सगळी रुंदी लागत व्हती नाही तर आता पतोर मुंबई गाठली असती. गल्लीतली चांगुणाक्का तेवढी एकच तानीच्या मर्जीतली..आता तेवढीच काय ती ऱ्हायल्याली समजूत घालायची.

 "काकू बघ तुला तरी वठतीया का तानी..?" माधू कळवळून चांगुणाक्काला बोलला.

"...लेकी आसं खुळ्यागत करू नगस.तानी आमची शानी हाय नव्ह" चांगुणा आपल्यापरीनं तानीची समजूत घालत व्हती.

"...आंग आई व्हती तवा तुला कुणी चल म्हटलं का कुठं...आता आय गेली तू एकटीदुकटी कशी ऱ्हाशील इथं..? तुझा भावचं नेतोय नवं तुला..लेकी पाटचं तरी असावं न्हाई तरी पोटचं तरी असावं... ज्येची त्येलाचं मया येणार...लेकी तुला मागं ठिवून त्येचा पाय उचलल काय सांग बगू.?'

"दांडग्या मयेचा हाय भाव तुजा...कोण लेकी कुणासाठनी एवढं करतय... स्वतःच पॉर ज्येचं त्येला जड झालंय.."

"माधबा येतीया रं तुझ्या संग माझी पोरं..पण माझ्या वासराला महिन्याला हिकडं घेऊन यायचं बग.." जुन्याराचा शेव डोळ्याला लावत चांगुणाक्कानं तानीला छातीला धरलं..डोळ्याची धार तुटून तानीच्या मस्तकावर पडायला लागली.चांगुणाक्काच्या कुशीत शिरल्याल्या तानीच्या डोळ्याचं पाणी चांगुणाक्काच्या चोळीत मुरायला लागलं...

"काकू तू म्हणतीस तसं करतु बग.तिला जवाकवा गावाकडं यावस वाटल त्या येळला आणीन बग इकडं मग तर झालं." 

"व्हय...व्हय..हे मातूर कबूल..व्हय कणी माझ्या वासरा.." चांगुणाक्कानं आपल्या पदरानं तानीचं  वलकीच डोळं दांडग्या मायेनं पुसलं...

चांगुणाक्कानं एवढी मायेची पाखरण केली म्हटल्यावर तानीला न्हाई म्हणताच आल न्हाई..शेवटाला कसतरी ती कबूल झाली आणि माधूसकट सगळ्यांचा जीव भांड्यात पडला....

                        दुसऱ्यादिशीच माधूनं सगळा काजावाजा गुंडाळला आणि बायकापोरासह माधू बाहीर पडला..आईच्या फोटुला हात जोडून तानीनं घराचा हुंबरा वलाडंला..न ऱ्हावून उजव्या आंगच्या गोठयात तिनं पाय ठेवला..समुर नदार टाकली गोरणी रिकामी व्हती..सुंदरीच दावं निपचित पडल्यालं...फक्त सुंदरीचं तिथं नव्हती...पण तरीबी सुंदरी नजरत भरत व्हती.. तशी डोळ्यांत आसवं दाटली..डोळं गाळीत ती तितनं बाहीर पडली.गल्लीतल्या सगळ्यां आया बायांस्नी भेटून गळ्यात पडून रडली..चांगुणामावशीच्या गळ्याला पडून रडताना तर तिनं सगळयांच्या डोळ्यांत पाणी आणलं.अखेर साऱ्यांचा निरोप घेतला आणि भावाच्या कुटुंबकबिल्यासंग तानी शहराच्या वाटला लागली.

                               आयुष्यात आज पहिल्यांदाच तानी मुंबईला येत व्हती..जिकडं तिकडं मुंगीच्या रिवनागत माणसं दिसत व्हती.गुळगुळीत रस्त्यांवरनं  वार वार धावणाऱ्या गाड्या..त्येंच्या रॉय रॉय आवाज एकसारखा कानात शिरत व्हता.चवूबाजूला हरतऱ्हची नाना नमुन्याची दुकानं...टापला नजर पोचत नव्हती एवढ्या उच्याल्या इमारती...गावाकडं जत्रयंत्राला गर्दी फुलावी तशी चहुकडं माणसांची गर्दी...जे कवा बघितलं नव्हतं ते ते नजरला दिसत व्हतं..गावच्या स्टँडवर परगावाला जातावक्ती नव्या कापडातली माणसं दिसायची आता तर इथं बघिल तिकडं झ्याकपाक कपड्यातली माणसं...हे नवलच म्हणायचं इथं बायकाबी शर्ट पॅन्टत दिसत व्हत्या..ही कुठली न्यारीचं दुनिया व्हती.एखादं चुकार जनावारं जंगलात चुकाव आणि भांबावून जावं तशी तानीची गत झाली व्हती...लाल मातीतल्या झाडाझुडपांच्या जंगलातली पोरं आता सिमेंटच्या जंगलात आली व्हती..

                                       तानीला आता या वेगळ्या दुनियेत ऱ्हाण्याची सवय करून घ्यावी लागणार व्हती.दिवस माग सरकत व्हते...पण गावाघरात.. रानावनांत हुंदडणारा जीव या चार भिंतीच्या घरात कसा राहील..तिच्यासाठी ते घर नव्हतं जीवाचा कोंडमारा करणारी ती कोठडी व्हती..जिकडं तिकडं सैरावैरा पळणाऱ्या पावलांना खीळ बसली व्हती...उडत्या पक्षाला पिंजऱ्यात डांबावं अशी तानीची गत झाली हुती...होईल सगळं हळूहळू सुरळीत. आज ना उद्या तानीला गमायला लागंल,या इचारात माधू आपल्या कामाला लागला हुता.. पण तानीचा जीव काय इथं रमत नव्हता..दिस उजडायचा मावळायचा पण कशातच तिज चित्त थरत नव्हतं.. सगळं इसरून जाऊ दे तानीच्या जीवाला गम पडू दे म्हणून माधूनं तिला मुंबई फिरवून दावली..बिचारा माधू आपल्या भोळ्याभाबड्या भणीसाठी जमलं तस करतच व्हता...पण तानीचा काही केल्या इथं जीव गमायलाच तयार नव्हता.सारखा जीव मागं वड खायाचा.माधूची बायकोबी मनानं चांगली.तानीची ती चांगली काळजी घ्यायची... तिला समजून उमजून सांगत व्हती..कधी मुलंबी तानीसंग खेळायची  तेवढ्यावाट तानी रमायची आणि मग कशात तरी हरवल्यासारखी बसायची.

                                   ..उघड्या डबीतला कापूर हवेत उडून जावा तसं दिस जात व्हते..दोन महिन्याला गाठ पडायला आली.

"दादा मला माझ्या गावाकडं सोड..." अशी माधूच्या मागणं नकाड्या पोरीगत तानीन एकच रट लावल्याली...त्येला तर पार भंडावून सोडल्याला... आज जाऊ,उद्या जाऊ असं करत करत माधू येळ मारून नित व्हता..खरं जीवाला नुसता घोर लागून राहिला हुता. रानावनातली हरणी ' तानी' चांगलीचं कचाट्यात सापडली व्हती. आता तिची सुटनुका नव्हती हे तीनही जाणलं...रोज डोळ्यांम्होरं गाव उभा ऱ्हायाचा..सुंदरीला चारत्याला धुळणीचा माळ..धुळणीच्या टेकडीवरची पसरट धोंड जिथं बसून ती सुंदरीवर नजर ठेवायची..

त्याच धुळणीच्या माळावर एका बगलला असल्यालं सुगरणीच्या लोंबत्या खोप्यांच बाभळीचं झाड. कंबरपट्यासारखं गावाला विळखा घातल्याली शेतवडी...बंधावरची झाडंझुडपं...गावालगतच्या पांदीपासून रानाशिवारातला सांदीखोपडा एकूण एक नजरंम्होरं जसंच्या तसं उभा राहीतं..मनाला कोण बांधून घालणार ते आपलं एकटंच हिंडूफिरून यायचं..आईची... सुंदरीची...गल्लीतल्या चांगुणामावशीची मनात लई सय दाटून यायची...डोळ्यांच्या कडा उतरून पाण्याची धार उलटायची...कुणासंग बोलत नव्हती...मनातलं कुणाला काय सांगत नव्हती..तानी आपली एकटीच असा ह्यो आठवणींचा सगळा पसारा मनात  मांडून बसत व्हती.

तिच्या देहाच्या घरट्यातन मनपाखरू उडून कधीच गावयेशीवर पोचलं व्हतं..आता तिलाही तिकडं धाव घ्यायची व्हती.

                                   आणि त्या दिशी तानीन मनाशी एकदम पक्कंचं केलं. रोजच्यासारखं माधू  आपला उठून आपल्या कामाला निघून गेला...पोरं शाळला गेली घरात भावज आणि तांनी दोघीचं... जेवणाखाण्याचं आटपल्यावर  भावज आपली भांडीकुंडी घासण्यात गुतली..बाहेरच्या बैठ्या  खोलीत कसल्या तरी तंद्रीत तानी मगाठावन बसून व्हती...डोळं खोलवर कुठं हरवलं व्हतं...आज तरी वादळवाऱ्याच्या गतीन मागच्या आठवणींचं वादळ मनात भिरभिरत व्हतं... वादळाच्या एका ताडक्यानं माळावरची पिंजराची व्हळी अल्लादी उचलावी आणि विस्कटून जावी तशी ताडकन तानी उठली...भिरभिरत वादळ कुठं जाईल सांगता यायचं न्हाई...तानी आता वादळ झाली व्हती..वादळासारखी बेभान झाली हुती..त्या कुठल्या आवेशात तिनं घराचा हुंबरा वलंडला. कवा तानी बिनपत्या आपलं घरं सोडून निघून गेली इकडं भावजच्या जरासुदीक ध्यानीमनी आलं न्हाई...

                                           तानी आता रस्त्याला लागली...रांना शिवारात सैरावैरा पळणारी तिची पावलं या गुळगुळीत रस्त्यावरनं हरणाच्या गतीनं  धावतपळत व्हती...ती कुठं जाईत व्हती..? जिकडं मनानं धाव घेतली व्हती तिकडं तिला जायाचं व्हतं...गावची माती...मायेची नाती...आई...सुंदरी...चांगुणामावशी तिला साद घालत व्हती...आणि  म्हणूनच तानी जिवाच्या आंकातान धावत सुटली..तानी नावाचं हे वादळ आता पुरतं बेभान झालं व्हतं..हमरस्त्यावरनं बेफामपणे उधळत व्हतं..रस्त्यावरची माणसं मोठ्या कुतूहलानं तानीकडं बघत हुती....आणि.... आणि एका वळणावर  या वादळाची जणू काळाशीचं टक्कर झाली..तिकडून वेगाने एक बस येत होती..आडवी तिडवी पळणारी तानी काही कळायच्या आत नेमकी या बसच्या आडवी आली...आणि एका क्षणात तानीच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवत ती बस पुढे जाऊन थांबली..तानी जागीच गतप्राण झाली.

ती कैदासीन बस एकदासा तिचा जीव घेऊन मोकळी झाली.गावमातीसाठी आसुसलेला खुळाकावरा जीव कुडीतनं बाहेर पडून एकदासा मुक्त झाला...हाडामासात रुतलेली चाकं ताज्या रक्तानं निथळत व्हती...डोक्याचा पार चेंदामेंदा झालता..हाडांमांसाचा नुसता लगदा सगळीकडं विखुरला व्हता. तानीच्या देहाची पार दैना उडाली हुती....रक्ताचा नुसता सडा रस्त्यावर शिंपला व्हता...एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं हुतं.एक बेभान वादळ पार इस्कटून शमलं हुतं. गाड्यांची वर्दळ जिथल्या तिथं थांबल्याली..माणसांचा आरडाओरडा सुरू व्हता..बघ्यांची झुंडी भोवतीभोर जमल्याली. जशी तानी मगाशी वाट मिळल तिकडं धावत हुती. तसं आता तानीच्या आंगाबुडनं लालभडक रक्ताचा हुणहुणीत पाट, वाट मिळल तिकडं धावत हुता...

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

कविता - 'आयुष्याचे कोडे..' - किरण चव्हाण.



 'आयुष्याचे कोडे..'


भंगू दे आयुष्य माझे

जाऊ दे जीवनाला तडे

या जगण्याचे का आता

थोडेच माझ्यावाचूनी अडे..?

माझ्याच आयुष्याचे मजला

सुटे ना कोडे...


कसे जगावयाचे आणि 

कुठे जावयाचे अजुनी..? 

मला काही ना कळे.. 

जळो...जळो हे जिणे लाजिरवाणे..

माझ्यावाचूनी का इथे काय उणे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


चुकून का आलो असेन 

या माणसांच्या झुंडीत.

माणूस म्हणून जगताना 

का मीच सापडलो खिंडीत..

जगण्याची का एखादी  

मला वाट ना सापडे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


पोट भरल्या दुनियेचे 

नुसते ऐकावे मी ढेकर..

भूक भागल्या पोटाचे 

मीे सोंग घ्यावे कुठंवर.

भरले पोट दावितो

 पण आतून आतडे कोरडे...


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


खरे आसू लपवितो 

आणि खोटे हासू दावितो.

दुःखं भरल्या चेहऱ्यावर मी 

आनंदी मुखवटा चढवितो.

प्रसन्न वाटतसे माझे मन 

पण आतून किती कितींदा रडे...


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


 जगण्यासाठी मला का

 इथे कशाची गरज पडे..?

 आशेवरती जगणे आता

 जराही ना परवडे 

म्हणे जगा आणि जगू द्या 

गातात माणूसपणाचे पोवाडे

माणूस म्हणून जगण्यासाठी 

मग माझेच का वावडे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


भंगू दे आयुष्य माझे

जाऊ दे जीवनाला तडे...

 माझ्याच आयुष्याचे मजला 

सुटले ना कोडे...

उरलो देहानेच नुसता 

माझे काय मागे ना पुढे..


जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...

      जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...           

                              

          - किरण चव्हाण.


खालील लिंकवर क्लिक करून कविता ऐका माझ्या यू ट्यूब चॅनेलवर.

https://youtu.be/lm6DrELOJEo

----------------------------------------------------------

'आयुष्याचे कोडे ' या माझ्या कवितेच्या अनुषंगाने...

          या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...किंवा असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर...आयुष्य किती सुंदर आणि देखणं आहे हे  सांगणाऱ्या या कविता...असं आयुष्य जगायला कोणाला नाही आवडणार...पण जगणे जेव्हा वारंवार छळू लागते...केवळ जगण्यासाठी जगणे शिल्लक राहते...आणि खरे जगायचे राहूनच जाते...तेंव्हा मात्र कडेलोट होतो.

 आम्हांलाही जगावस वाटतं म्हणून का जगण्याला असं छळावसं वाटत.तेव्हा जगणं किती सूंदर आहे हे सांगणारी कविता..जगण्यालाही ठणकावून सांगते...'जगण्यानेही छळले होते मरणाने सुटका केली'.

 जगण्याचे गोडवे गाणारी कविता..मग निर्वाणीचेही गोडवे गाते...मरणाचे गोडवे गाण्याची तिला भीती नाही वाटत...तिच्या आहे ते सामर्थ्य मृत्यूलाही सुंदर करण्याचं....

कविता नसते कुणालाही बांधील...उगीच नाही कुणाचे गोडवे गात...तिने नाही केवळ 'सूंदर आहे जगणे' सांगण्याचा ठेका घेतलेला...म्हणून तर ती जगण्याच्या विरोधातही बंड करते.. 

.मनातील व्याकुळ झालेल्या असह्य वेदना...यातना...भावना यांचा उद्रेक ती थंड करते...शब्दांच्या सामर्थ्यावर मनातील अव्यक्त भावनांना बाहेर काढतें ती कविता...निर्वाणीचे रूप घेते आणि ती देते समर्पण...ती जाते पुढे पहिल्यांदा सरणावर..

तेंव्हा कुठे जगास कळते...

नेमके माझ्या मनात काय सुरू होते...जगाला काय वाटेल याचा विचार नसतो कधीच मनात असतो तिचा तो त्याग  फक्त नि फक्त मागे मी जिवंत राहण्यासाठी...

मला न सुटलेले आयुष्याचे कोडे अखेर माझी कविताचं सोडवते... ते कोडे अखेर ती सरणावर घालून मोकळी होते.. 

जगणे किती सूंदर आहे हे सांगणारी जशी कविता असते. 

तसेचं खचलेले दुभंगलेले मन मोकळे करून जगायला भाग पडणारी कविता असते जी त्या जगण्यापेक्षाही किती सुंदर वाटते...अशी ही माझी कविता.

            - किरण चव्हाण.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...