फॉलोअर

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

गावकुसातली कथा: 'डोरलं' - किरण चव्हाण (पांगिरे)

             
                         
     
          
                  'डोरलं'

                    एका नीजंवर या कुशीवरनं त्या कुशीवर आंगाची नुसती तळमळ सुरू झाली. जीवाची आतल्या आत तगमग.आंगात फणफणून ताप नी उरात धाप.जरा हातरुणात आडवं पडलं तर वरची वर आणि खालची खाल हवा व्हायची.छाती नुसती भात्यासारखी धापत व्हती.आत किती भरून घिवू नी बाहेर किती सोडू.दम घोटायचा.पाण्यावाचून माशाची तळमळ व्हावी तशी जीवाची गत.. गडी घोटमाळून गेलता. रखमाला तर ती कळकळ बघवत नव्हती...जीवात जीव नव्हताच तिच्या.कुठं छातीत चोळ... पाठीत चोळ..पदरानं आंग पूस.फडक्यानं वारा घाल.अशी ती करत व्हती.आता या वक्ताला राचं गावात कुठला डाक्टर..? आता कुठं घिऊन जाऊं नी कुठं ठेऊ असं तिला झालतं... जरा तांबडं फुटलं आसतं म्हंजी कशीबी वाट धरली आसती... जरा सलोम पडायचा आणि परत धाप सुरू व्हायची... जीवाचा ह्यो खेळ बघण्यापलीकडं कायच करता इत नव्हतं.
ती बया तरी काय बिचारीची भाबडी आशा. जरा कोरा 'चा' करून द्यावा जीवाला बर वाटल आस तिला वाटत व्हतं...



"आवं करतो की नकाडा... वाईच घोटभर घ्या..जरा बरं वाटल जीवाला."

" आगं इथं हवा घोटना...आणि तुजा 'चा' कसा घोटल..."

तात्याबा इवळतच मधी बरळायचा.."माझं काय खरं न्हाई बघ...आरं ईठ्ठला मला वर तरी घे की रं बाबा आता पंधरा दिस झालं ..कायबी कमी न्हाय...कशाला परीक्षा बघतोस गरिबाची.."

त्याला सोसवत नव्हतं त्येजा एकेका शब्दांनं रखमाच्या डोळ्याला धार लागायची.पदराचा बोळा तोंडाला लावत ती बोलायची.

"आवं गप बसा की,कशाला आसं वंगाळ नगो ते बोलताईसा..तुम्हीं आस ढळलासा तर म्या बाईमाणसानं काय करायचं..कुणाच्या तोंडाकडं बघायचं...जरा कड काढा...भागाटलं की कुठलाबी दवाखाना गाठूया..मी तुम्हाला काय बी व्हवू देणार न्हाई...जरासा धीर धरा"

                                    पण तात्याबा तरी काय करील... परान कंठाला आल्यासारं त्याच त्याला झालतं.. जरा रात ढळली आणि डाव्या कुशीवर मुरगाळून पडल्याजागी, जराशी पापणीला पापणी डिकली... रखमाला जरा हायसं वाटलं.उशाला बसून तिच्या हाताचा पंखा चालूच व्हता...आणि डोक्यात आता येगळीचं चकरं फिरत व्हती...पुढ्यात एक काळजी आणि वरती त्या दुसऱ्या काळजीनं मनाची पुरती कोंडी झाल्याली...काय करायचं..?  काय सुचत नव्हतं...आता बाहेरच्या दवाखान्याला जायचं म्हंजी हातात जादाकमी पैसं पायजेत... पैसं..? आता या प्रश्नानं तिच्या काळजाला खरा पीळ पडल्याला...सभागती नजर त्या फळीवरच्या जरबंदी डब्याकडं गेली...उठून तिनं डबा जवळ घेऊन उघडला..दोन हिरव्या शंभर रुपयच्या नोटा आणि वरती थोडं सुटं पैसं व्हतं...
                       पंधरा दिस झालं..कमी जादाला इथल्या डाक्टरला दाखवून बघितलं पण...'आमच्याकडनं काय इलाज व्हणार न्हाई...शहरातल्या डाक्टरला दाखवाव लागल...जमलं तर दोनाला चार दिस ठिवूनबी घेतील..' हे डाक्टरचं बोलणं आठीवलं.. तिच्या डोळ्यासमोर अंधारच दाटला..हातातल्या नोटा कधी गळून खाली पडल्या तिलाच कळालं नाही...भानावर आली..पडल्यालं पैसं उचलून घेतलं..तसंच डब्यात ठेवताना ती इचार करायला लागली...हे पैसं दोघांच्या गाडीउताऱ्यालाबी पुरणार न्हाईत...इचार करता करता तिला काय सुचलं कुणास ठावं..? तिनं एकवार धन्याकडं नजर टाकली...जरा गडद झोप लागली व्हती...उशाला ढणढणीत चिमणी पेटत व्हती...पुढं व्हवून ती जरा मिणमिणती केली.भोवतीभोरच्या तांबूस उजेडानं माघार घेतली.रखमा हातरुणापाशी आली. पायाची चादर आबदार अंगावर वढली. आणि आपल्या हातरुणात लवाडंली.पर डोळा कुठं लागतोय.मनात इचार घोळतच व्हतं.यातनं कसं बाहीर पडायचं पण जराशी सांदर गावल्यावाणी झालतीं. आता ती भगटायचीच वाट बघत व्हती.
                       आतास कावळं करकरायला लागल्यालं.तशी वर उठुन चुलीजवळ आली.चुलीत तुरकाट्या लाकडं कोंबून जाळ केला. पाण्याचं भुगुण चुलीवर ठेवायला...इकडं खोकल्याच्या उबाळीन तात्याबाला जाग आली.तशी पुन्हा धाप सुरू झाली.तसच गडबडीन भुगुण ठेऊन ती हातरुणाजवळ आली.

"आता कुठं झोप लागल्याली, पेटली ती धाप जरा बंद झालती आणि सुरू झाली..दमा घोटभर 'चा'करती जरा बरं वाटल.." तिनं लागलीच 'चा'चं भुगुण चुलीवर चढीवलं.. बाहीर गेली चार तुळशीची पानं घेऊन आली..उकळी आलेल्या 'चा' त टाकली..'चा' बशीत वतून जरासा फुकरून हातात दिला..तात्याबानं थरथरत्या हातान बशी तोंडाला लावली.

"मी जरा येतू जाऊन..तूमी पिऊन घ्या तवर..आशी गेलो नी आलो.."

"आगं तू आणि कुठं जातीस ."

"तुमी आणि कुठू नगसा...आठला पहिली गाडी हाय आवरायला हूवं पयला दवाखाना गाठायचा आता थांबून न्हाई चालायचं.."
                  कसल्या तरी इराद्यान ती बाहीर पडली..दणाणा पाय टाकीत पांदीच्या वाटणं गावातला रस्ता धरला..ईठुबाचा कळस नजरला आला तसं तिथनच तिनं हात जोडलं. डोळ्यांतनं टीप गाळीत वठातल्या वठात कायतरी पुटपुटली..आणि पुन्हा पुढचा रस्ता कातरु लागली..गोठ्यातन गाई-म्हशीचं हांबरनं.. गळ्यातल्या घाठीचा किणकिणत्याला आवाज कानावर इत व्हता.एव्हाना धारा काढायला गोठ्यात बसल्याली.. गोठ्यात शिरणारी माणसं नजरला दिसत व्हती..रखमा चटाटा पाय उचलीत म्होरं सरकत व्हती..आली आली दिसाचा गोंडा फुटायच्या आत ....सुदंराबाई पाटलीनीच्या घरापाशी आली..आबा पाटील म्हंजी गावातलं दांडगं कुळ. धान्यांचा व्यापार व्हता...पैसा मिळू लागला..धंदा त्यानं  नी बायकोनं पैशाचा कारभार बघायचा..बायको मात्र चापटर तशी चलाखबी व्हती...येजान पैसा फिरवायची...अडला नडला हरी...गावकरी मोठ्या आशेनं हुंबरा चढायचा...आताबी रखमा मोठ्या आशेनं आली व्हती....सुंदरा पाटीलीनीला बघताच तिचा ढळ फुटला...आणि सरळ तिनं पाय धरलं...

"बाईसाब मला गरिबाला एवढं या संकटातनं वाचवा..लई उपकार व्हतील तुमचं."

"आगं हो..हो..रामाधरमाच्या पारी आसं रडायला गं काय झालं..नीट सांग तरी."

"बाईसाब काय सांगू तुमास्नी... आता गेलं पंधरा दिस झालं त्येंच्या जीवाला बरं न्हाई..पल्याड गावच्या डाक्टरला दावलं पर काय उपेग न्हाई...आता म्हंत्यात शहरातल्या मोठ्या दवाखान्यात दावायला हुवं..आता तुम्हींच सांगा त्या डाक्टरला द्याया आमच्यासारख्या गरिबाकडं कुठला आलाय एवढा पैसा..."

"आगं व्हय...बरोबर हाय सगळं पर आम्हीं इथं पैसा काय वाटत बसलोय कागं बाई.सकाळी सकाळी आमचंच घर गाठायला"

"आसं बोलू नगसा..एवढी 'धा' हजाराची नड काढा..."

"धा.. हजार.??" आंगला कुसाळ बोचावं तसं पाटलीनीन केलं.एखादा इंगोळ पुढ्यात पडावा नी आंग माग घ्यावं तसं ते बोलणं मागं सारत बोलली.

"आगं आता एवढा पैसा काय जवळच घिवून बसलीया व्हय मी.."

 " मी पाया पडतु तुमच्या .मी एकटी बाई काय करणार.?..कुकवाचा आधारच असा संकटात सापडलाय...तुम्ही देव माणसं हायसा..या येळप्रसंगाला या गरिबाला तुमचाच आधार बघा...माझं कुकू तेवढं यातन घट्ट व्हवू दे रातध्याड राबून तुमचं पैसं परत करतो...खरं या जिवावरच्या परसंगातनं बाहेर काढा.."

रखमा पायाशी गयावया करालती...खरं दगडाच्या काळजाची बाई म्हंत्यात तिला.तिला कुठला पाझर फुटतोय...

"आगं तू एवढं पैसं मागालीस खरं कुठल्या भरवश्यावर द्यायचं गं बाई तुला...तुझ्या कडं जमीन नाजुमला..ऱ्हातं नकाड घर..कसा इस्वास धरायचा.?."

"बाईसाब...आम्हीं तुमचं पैसं बुडवणार न्हाई...फकस्त एक डाव इस्वास ठेवा माझ्यावर शब्दाला बांधील हाय म्या. दिस रात एक करीन पर तुमचं पै न पै फेडीन...माझ्या धन्याला यातन बरा व्हवू द्या.."

"आगं आसं पैसं न्हेताना लई काय बाय मोठं बोलत्यात..शबूद देत्यात... आणि गरज सरली की,मग इसरत्यात.."

"न्हाई...न्हाई बाईसाब....आसं न्हाई व्हणार एक डाव इस्वास ठेवा या गरीबावर... हावं तर तुमच्या शेता मळ्यात आम्हीं नवरा बायको..राबून तुमचं पैसं फेडतो...पर मागं एक रुपया ठेवणार न्हाई."

"व्हय हे बोलाय लई सोपं हाय...बस थोडा येळ आलो म्यां.."

.तशी सुदंराबाई आत गेली..

रखमानं डोळ्याचं पाणी पदरानं निचरून घेतलं...पैसं मिळालं तर बरं....न्हाई तर..??

न्हाई...हा इचारच मनाला अजिबात सोसवत नव्हता ती लगीच झटकून  टाकत व्हती... देवालाच हात जोडायची त्येजाच धावा करायची..

काय बी व्हवू दे पैसं घेतल्याबिगार माघारी वळायचं न्हाई..ती आता ठाम झाली व्हती..तवर मधल्या हुंबऱ्यास्न सुंदराबाई बाहेर आली.

येऊन आपल्या जाग्यावर बसली..काय तरी येवजूनच बाहेर आली व्हती..

"रखमा आता तू एवढी काकुळतीलाच आलीस म्हटल्यावर तुला पैसं दिन..पण एका अटीवर.."

'पैसं दिन' हे ऐकूनच रखमाला आभाळ खुज्ज वाटायला लागलं...मनाला लई आनंद झाला..बाई साब लई उपकार व्हतील तुमचं. तुमी कायबी सांगा मला मंजूर हाय.."

"रखमा...बघ नंतर न्हाई म्हणशील."

"आवं बोला तुमी मी न्हाई म्हणणार न्हाई."

"तुझ्या गळ्यातलं डोरलं घानवट ठेवायला लागल..."
                  एखादी इज अंगावर कोसळावी तशी गत झाली,वल्या जखमवरच घाव बसल्यागत झालं...ज्याच्यासाठी मगाधरनं आटापिटा केला..त्यालाच हिसडा दिल्यागत झालं...काय बोलावं तिला सुदरना...तिचा घसा कोरडा पडला...बाईसाब...आवं माजा जीव मागितला असतासा तरी मी मागं घेतलं नसतं पर... डोरलं..?" तिला दाटून आलं.

"आवं ते तर गळ्यात शाबूत ऱ्हावं म्हणूनच तुमच्या दाराला आलो नवं.."

"हे बघ जास्त लांबड लावू नगस.काय ते ठरीव कबूल आसल तर बोल न्हाई तर दुसऱ्या कुणाकडंबी जाऊन घे जा पैसंं.माझ्याकडं मिळणार न्हाईत.."
                        रखमाला आता चांगलंच कोडं पडल्यालं.. काय करावं.. एक तर येळ टळत व्हती...आता लई इचार करून उपेग नव्हता...आठची गाडी गावायला हुवी... माग घराकडं आणि कसं झालंय कुणास ठावं..?
मन बधिर झाल्यालं...ज्याच्यासाठनी आटापिटा करायचा त्येला हात घालायचा...पर काळजावर दगड ठेऊन निर्णय घेतला आणि गळ्यात हात घातला तिथंच आत गळ्यात हुंदका दाटल्याला..डोळं मिटून ती दोरल्याची मुठ त्यांच्या हवाली केली....नवरा तिकडं  जिता हाय आणि इकडं बाईचा गळा रिकामा झाला.. देव कसली परीक्षा बघत व्हता ही..?

'सा महिन्याच्या परतीवर देतोय बघ तुला...'धा'हजाराचं 'धा'टक्क्यानं  'सा' हजार याज व्हतय..एकूणला सोळा हजार दिलं पायजेस.ते बी येळवर..."

नाईलाज व्हता त्येनी  बोलायचं आणि बिचारीन कबूल करायचं..इलाज नव्हता..दगडाखाली हात व्हतं...येळ वाईट आल्याली...मान हलवून होकार भरला...डुईवरचा पदर सळा केला...हातात पैसं घितलं..

पदराच्या एका धडीत पैसं घेतलं त्योच पदर गळ्याभोवती घेतला.. मोकळा गळा झाकला.पदरात नवऱ्याचं नशीब बांधून गळक्या डोळ्यानं बाहीर पडली.
                           लगबगीन घर गाठलं..तवर गल्लीतल्या आयाबाया घरात जमल्याल्या... तात्याबा जरा कलंडला व्हता पर उरातली धाप सुरूच व्हती...आत पाय ठेवता तवर....पाराक्का पुढं व्हवून बोलू लागली.

"आगं पोरी आसं  ह्येला एकटं टाकून कुठं गेलतीस..थार पडना त्येला..कणत्याला आवाज ऐकून आत आलो तर ह्यो आपला धापा टाकालाय...काय कमी न्हाई व्हयगं.."

तिला भडभडून आलं ती पाराक्काच्या गळ्यालाच पडली.

 "पारूमावशी मी आता काय करू..."

"गप लेकी गप...काय करुया दुखण्याच्या पुढं कुणाचं चालतय..." पाराक्कानं तिला गप केलं...नी एकाकी नजर तिच्या मोकळ्या गळ्याला गेली तशी चपापली...पोरी.. गळ्यातलं डोरलं गं काय केलीस..?

आता काय सांगायचं नी कसं सांगायचं..  रखमा येडबाडली...नवरा तर पुढ्यातच..खाली मान घालून हुंदकं दीत सांगू लागली..

"सुंदराबाईकडं 'धा' हजाराला घानवट ठेवलं..."

"तिला रोग आला.. मोळा मोडला तिजा. कडू ब्याची रांड... जगाला बुडवून इमला रचालीया पैशाचा.." पाराक्का एकदम संतापली.

"आता काय करायचं कुठंन आणायचं एवढं पैसं दुसरी वाटच न्हाई. बाई तर जुमानायला तयार न्हाई...हातात पैसं तर पायजेत." रखमा.

"एक डाव दाल्ला बरा त्येला जरा तरी दयामया इल खरं ही बया लई पैशाला हापापल्याली...नवऱ्याला आपल्या अंकितच करून घेतलाय आणि पैशाचा कारभार बघती... येजाचा पैसा खोऱ्यान वडतीया..असू दे लेकी येळला मिळालं म्हणायचं पर तू तुज आवरून घे मी आलूच.." तशी पराक्का आपल्या घराकडं गेली..

रखमा आपल्या तयारीला लागली.. खिनभरातच पराक्का माघारी परतली.एका दोऱ्यात काळं मणी टवून आणल्याला दोरा तीन रखमाच्या हातात दिला..

"घाल लेकी तसा मोकळा गळा ठिवू ने पदरात एवढा भरभक्कम नवरा असताना भुंडा गळा सोबत न्हाई..."

तसं त्यो काळ्या मण्यांचा धागा तिनं गळ्यात घातला...गाडीची येळ व्हईत आलती...घाईगडबडीत आटीपलं आणि रखमा तात्याबाला घिऊन बाहीर पडली..
                           आठच्या गाडीनं शहरातला दवाखाना गाठला.डाक्टरनं तपासून बघितलं नी निदान गावलं..तात्याबाला 'न्यूमोनिया' झालता. तरी येळवर इलाज सुरू झाला म्हणून बरं न्हाई तर जीव धोक्यात व्हता.डाक्टरनं चांगलं पंधरा दिस दवाखान्यात ऍडमिट करून घेतलं...तब्येतीत सुधारणा व्हवू लागली,त्याच्या नशिबाची दोरी घट म्हणून निभावलं तात्याबा यातन वाचला.खरं तर रखमान आखीरला त्येला बरं करून घरला आणला.येळच्या येळ गोळ्यावशीधं,पथ्यपाणी नीट केलं आणि गडी महिन्याभरात झाला की ठणठणीत. आता कुठं रखमाचा जीव भांड्यात पडला. कपाळाचं कुकू तरी घट्ट झालं म्हणायचं.आता घोर व्हता गळ्यातल्या दागिन्याचा..आता त्याची कशी उसाभर करायची..? दोघा नवराबायकोच्या जीवाला मोठा घोर लागून राहिल्याला...पर कच खाऊन चालणार नव्हतं...दोघबी इरला पेटली.रातध्याड नुसतं जीवापाड राबनं सुरू झालं.इस्वाटा असा न्हाईचं.पोटाला जरा चिमटा काढून पै पै गाठीला मारून ठिवला...
                           पावसाळा मागं पडला तरीबी चार महिनं झालं असतील..एका सांच्यापारी सुदंराबाईनं रखमाला बलवून घेतलं तवा ती भीतभीतच गेली आणि माघारी वळली.तवाधरनं तिनं दोन दिस हातरुनच धरलं.खाण्यापिण्याची सूद न्हाई का कसल्या कामाधंद्यांची.नुसती चिनभिन झाल्याली...तात्याबानं तिच्या मनाची खूप रुजवात घातली खरं.. तिचं मन ऐकून घ्यायलाच तयार न्हाई..गल्लीतल्या आयाबाया मनधरणी करीत व्हत्या...आकिरला पाराक्कानचं तिला कसंबसं समजावलं.." आगं रखमा एवढी शानी पोर तू आशी खुळ्यावाणी काय करालीस..अगं सावित्रीनं जसा नवऱ्याचा जीव परत आणला तसा गळ्यातला दागिना ठेऊन तू दाल्याचा जीव वाचवून घेतलीस.. एवढं जीवावरचं संकट मागं सारलस आणि या एका दागिन्यांचं काय..घेऊन बसलीस..? ती म्हणती न्हवं दोरलं घाळ झालं तर व्हवू दे नशीबातल तरी काय घेऊन गेली न्हाई नव्ह..हे बघ तुझं केवढं मोठं नशीब तुझ्यासमोर भरभक्कम हाय...आगं तरुण हायसा माप राबशीला आगं डोरलंच काय माप सोन्यानं मडशील बघ पोरी..आग लबाडीचं ढोंग कुठपातोर..? बघशीलच तू चालत न्हाई ते...गरीबाचा तळतळाट लई वाईट आसतोय पोरी.. न्हाई लाभत हे आसलं." तशी पाराक्काच्या गळ्याला पडून रखमानं आपलं मन रीतं केलं.आणि झालं गेलं सारं मागं सोडलं.
                          सुदंराबाईला वाटत हुतं आता कुठलं रखमाकडनं पैसं मिळत्यात. म्हणून तिचं डोरलं घाळ झाल्याचं खोटनाटं सांगून डोरलं मोडून तिनं आपल्या लाडक्या नातीला नवा दागिना केला व्हता.दिस माग सरत व्हतं..पण वरीसपन व्हाय नसल ...मळ्याकडं जाताना वाटला छातीत कळ मारून जोराचा झटका आला आणि वाटतच आबा पाटील सपला...सुंदराबाईच्या  कपाळाचं कुकू असं अवचित पुसलं गेलं. ढिगान पैसा व्हता खरं दवाखानाबी गाठू दिला न्हाई..तिला आपलं कुकू शाबूत ठेवता आलं न्हाई..
काळयेळ कुणाला सांगून येत न्हाई.
कुणाला लुबाडून आणि फसवून जन्माला पुरत न्हाई.. खोटं जादा दिस टिगत न्हाई..कधी रावचा रंक नी रंकाचा राव व्हईल सांगता येत न्हाई..
                        सुंदराबाईनं लबाडीन रखमाचं डोरलं वरबाडून घेतलं खरं, कष्टाच्या जीवावर दिसरात एक करून आकिरला रखमाच्या गळ्यात नवं डोरलं आलं..पण सुदरांबाईच्या गळ्यातलं डोरलं काळानं हिसडा मारून घेतलं ते तिला परत मिळल...?

------------------------------------------------------

- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा- ८८०६७३७५२८.              

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

'जोडी... पांडू आणि हौसाची.'



                'जोडी... पांडू आणि हौसाची.'
                                             
                          गल्लीच्या वयल्या अंगाला पांडू नी हौसाच्या जोडीचं छोटसं घरटं. तरीबी 'धा' वरसापूर्वी दुसऱ्या डाव बेघर म्हणून बांधल्यालं. दारालगत आत आर्ध्या भीतीच्या आडोश्याला चूल. चुलीच्या बानोश्यावर अर्ध्यापतोर रकॅल भरल्याली संत्रा बाटलीची तयार केल्याली चिमणी. नावाला मोजकी जरबंदी भांडीकुंडी, बुडाला काळ्या ठिपक्यांची जरबंदी भुगुणी.सतरा ठिकाणी चेप खाल्याला स्टीलचा तांब्या.पाणी साटपाला दोन तीन लबरी घागऱ्या,एक मोठं जरबंदी भुगुण.तिथंच मागं जळणाच्या लाकडांचा ढीग.त्येला तिरपा करून ठेवल्याला तुरकाटीचा भारा.चार इटावर ठेवल्याली लाकडी पेटी.खोपड्याला लागून कंबरंएवढ्या मापाची न्हानगी कनींग.त्येजावर धडूतं-बिडूत कायबाय ठिवल्यालं.एका खुट्टीला दोन चार नव्यापाण्या दोरीच्या जोड्यांची गुंडाळी आडीकल्याली.कुणी दोऱ्या करायला दिलेली जुनी लुगडी.तर एका बगलला त्याच्या काठपदराच्या काढल्याला धडपा.साळोतं आवळायासाठी मारलेला खुट्टा.साळोतं किसायची किसनी खोपड्याच्या संदरित कोंबून ठिवल्याली.असा गरिबा घरचा संसार...
                      पांडू नी हौसा या नवराबायकोची जोडी तशी मुलखायेगळी.पोटाला पॉर नाही.पांडू...डोक्यावर पांढरी टोपी,अंगात ढगळा शर्ट...गुडघ्यापतोर काळीसावती चड्डी.तसाच रंगानंबी.खिडखिडीत अंगाचा गडी.पांढऱ्या मिशा,दोनी बाजूची गालफाट रुतल्यावाणी...डोळ्यांत सदा नशेची धुंदी.असा त्याचा येबाव.रातध्याड नुसत्या दारूच्या लहरीत असणारा... पांडू सुद्धीवर असलेला असा एकबी दिस नसल.बघल तवा दारू पिवून तर्रर्र. लडबडत चालायचा...रस्त्यानं साधं घर गाठताना स्वारी कित्येक येळला कलंडायची.एक दिस कधी शिवीशिवाय पाणी प्यायला न्हाई..बायकोला रांड-उंडगी म्हणून शिव्या द्यायचा...आई भन काढायचा..नजरंसमोर बायको लागायची..जरा कुठं हौसाई बाहीर चालली की,नकाड्या पोरागत पांडू तिच्या माग माग जायाचा..तिच्या पदराचं आपल्या हाताला पिळोकच घालायचा..हौसाईला कुठं जायची सोय न्हाई.गडी आलाच मागणं.. तरीबी डोळा चुकवून कुठं गेली.की मगं धडगत नसायची.स्वारी रागानं घरात कुठं भांडी आपट.. एखादी वस्तू बाहीर दारात फेकून दे,तोंडात आशील शिवी घेऊन घरातन गल्लीत...गल्लीतन घरात नुसत्या येरझाऱ्या मारायचा...तोल जायचा.. "येऊ दे रांडला मग बघतो."..दारूच्या लहरीत वेडावाकडा शब्द फुटायचा...पांडूची अशी फजिती बघून बघणाऱ्याला चांगलीच गंमत वाटायची.एकेकदा दारुसाठनी बायकोमाघारी घरातलं धान्यदुणं कवा बिनपत्त्या बाहेर इकायचा.
                           एक बायको आणि दुसरी दारू याशिवाय पांडू एक दिस नव्ह एक तासबी कधी इसमून ऱ्हायचा नाही.सकाळी उठल्या उठल्या 'चा' नको खरं दारू पायजे..उठायचा ते पहिलं दारूच्या गुत्ता गाठायचा.ती बया एकदा अंगात भिनली की,दिसभर पांडू आपल्याच नशेत.असल्या खुळ्याकावऱ्या दारुड्या नवऱ्याबरोबर हौसाईचा संसार. असंच निम्मं आयुष्य मागं सरलं.हौसाई..जुन्यापाण्या नऊवारी साडीतली बाई.गोल चेहऱ्याची,अंगानं तशी भरभक्कम व्हती.मक्याच्या कणसागत तिचं दात दिसायचं.बोलताना तोंडावर उजाळा असायचा.नवरा इतका तरास दिवूनबी कधी जोराच्यानं तिनं त्येजासंग भांडाण-तुंडाण केलं नाही...ना कधी रुसून-फुगून त्याला सोडून गेली..जसा तो म्हणलं तशी वागत आली.नवरा शिवीशिवाय पाणी प्यायचा न्हाई तरीबी त्याच तिला काही वाटत नसायचं.तिला ते रोजचचं झाल्याल.सगळ्या आयबायासंग बोलून सवरून गॉड वागायची. कधी कुणाच्या कामाला न्हाई म्हणायची न्हाई.कुठल्या बी बाईला हाळी मारताना "आवं बाईसाब" आणि 'येवा-जावा' शिवाय बलवायची नाही.नवं लगीन व्हवून आल्याली बया असू दे तिला बी आदबिन बोलवायची.दुसऱ्याला लई मोठेपणा द्यायची..लहान थोर कुणासंगबी आदबिन वागायची.बोलताना सदा तिच्या चेहऱ्यावर एक हासरेपणाची छटा असायची.
                             गावचा मांग म्हणून पांडू देवाच्या पालखीला दिवाळी दसऱ्याला गावच्या वाजत्र्यांच्या वाजपात सामील होऊन हालगी वाजवायचा.तवा बी त्यो सुद्धीत नसायचा.तर हौसाईला मांगीन म्हणून गावच्या आयबाया यल्लमाच्या यातरला जाताना तिचा खर्च घालून न्यायच्या. तिच्याकडन लिंब नेसयच्या.मग थोडीफार बिदागी मिळायची. चोळी पाताळ.. तांदूळ नाराळ मिळायचं.गावकी हौसाईकडं  असायची तवा गावात कुणाचीबी कथा आसली की,त्या घरची माणसासनी लिंब नेसवायचं..सुवासिनी डुईवर पाण्याचा कळस घेऊन मांगाच्या कुंडाला येत..त्यावेळी हौसाई जावंच्या दारातल्या तुळसकट्ट्याची जागा झाडून लख्ख करायची एखादी चटई हातरायची..लई हौसेनं सगळं करायची.. त्या दिशीचा तिचा दिस त्या घरात याच उसाभरीत जायाचा..कुठणं लांबन शिंदीचा बिंडा आणायचा त्यो किसून घरात त्येजं साळोतं तयार करायचं.ते बाजारात इकायचं,पावसाळा सपायला दसरा दिवाळीला नदीत बंडू मांगाच्या मागणं साट लावायचा,त्या साटावर गावल्याल मासं बुट्टी घेऊन गावागावांत बुट्टी डुईवर घेऊन इकायचं. राचंईळाच साटावर जायाय लागायचं. कधी नवरा असायचा कवा दारू पिऊन ल्हास असला की बंडूमासोबत जायाय लागायचं...
                                                      गावातन जुनी लुगडी-पातळं मागून आणून त्याच्या लांब धडपा काढून दोऱ्या इनायच्या..दाराम्होर ऱ्हाटं व्हता..त्येजावर लांबलचक दोऱ्या बनवायच्या..पोटाची खळगी भरण्यासाठी कुठलाबी उद्योग करणं भाग असायचं,वैशाखाच्या वणव्यात उन्हातान्हात नदीवताडातनं करंज्या गोळा करायच्या, घरला आणायच्या, त्या फोडून करंज्याच्या बिया कापशीच्या बाजारात इकायला न्यायच्या.कोंबड्या पाळायची.संसाराला लागणाऱ्या हरेक गोष्टीसाठी हौसाई असं नानातऱ्हेचा खिडुकमिडुक उद्योग करायची.शिंदी किसून साळोतं तयार करायला आणि लुगड्याच्या पदराच्या दोऱ्या करायच्या या कामाला तेवढाच काय त्यो पांडूचा हातभार लागायचा.ते बी तेजाकडून करून घेताना हांजी हांजी करायला लागायचं. नाही तरी हौसा एकहाती एकटीच संसाराचा गाडा हाकत व्हती.खरं कुणाकडं आशा ठेवत नव्हती.इल तसं दिस कटत व्हती.मिळल त्या कमाईतलं निम्यापेक्षा जादा नवऱ्याच्या दारूवर खर्च व्हायचं.घरात तेलामिठाला कमी खरं नवऱ्याच्या दारूला जादा खर्च व्हयाचा.एक दिस जेवाण नसलं तरी चालल पण दारू पायजे..त्येज आयुष्य दारुतच गेलं..अशा दारू.. दारूनं गडी पार आत आला...अंगाला नुसता कापरा भरायचा. कायबी करताना हात थरथर कापायचं.चालताना लडबडायचा.तरीबी दारू प्यायची कमी न्हाई.रोज सकाळ संध्याकाळ लागायचीचं.
                                आता दारूच्या गुत्त्यापतोरबी चलवना.जेवान जाईना,बसला जागा उठवना..पांडूची खरंच आता रया बदल्याली.आता त्येला चार पावलं चालायचं सुदरत नव्हतं.दारूनं सगळं शरीर खगुंन गेलंतं.बसल्या जाग्यासन घस्टत पुढं सरकायचा..खरं अजूनबी जीव तळमळायचा नुसता दारूसाठी.एवढं घडूनबी दारू काय सुटत नव्हती.एक दिस दारू नसून भागायचं नाही.दारू दिली नाही तर अंगाला कापरी सुटायची.कायली करून घ्यायचा.तसं आता दारू आणून देण्याचं आणखीन एक हौसाचं काम वाढलं.ती सोता दारूच्या गुत्त्यावर जाऊन तांब्यातनं दारू घेऊन यायची.एकेकदा रात्रीचं तर रात्रीचं नदी पल्याड  दारू आणायला जावं लागायचं.. नाही तर गडी थार खाऊ द्यायचा नाही. आणि मग दररोज असंच सुरू झालं...माणसं तिला म्हणायची 'तुच त्येज लाड करतीस बघ कशाला आणून देतीस दारू..?' पर काय बोलायचं ज्याचं दुखणं त्यालाच ठावं... बोलून उपेग नव्हता.आता तरी रोजचचं झाल्यालं. रात्री जाऊन दारू आणून देणं...हळूहळू पांडू पाकच खराब झाला..नव्ह दारूनच त्येला बाद केला..दवाखाना केला पण कुठलं काय..आतली आतडी काळीनिळी पडल्याली.. आतला दागिना दारूनं बाद झाल्याला..डाक्टराचा आता कायबी इलाज चालत नव्हता...पांडूनं हातरुन धरलं, खाणं-पिणं सोडलं,पोटाचा नगारा तेवढा वर खाली व्हईत होता.हौसा नवऱ्याची सेवा बजावत व्हतीच.. आणि...एका पाटला त्यानं प्राण सोडला... गेला हौसाचा पांडू गेला..दारूपायी संसाराचा खयोळ करून गेला... बायकोची नुसती झडती घेतली.      गेला हौसाचा पांडू गेला..ती कासावीस झाली..कसाबी आसना का कपाळाच्या कुकवाला आधार व्हता...                 
                  तिनविला त्येजा गोरीवर काकनं फुटली..गळ्यातलं दोरलं काढलं तवा ती म्हणत व्हती..."माझा राजा कसाबी असना व्हता.. खरं माझ्या कुकवाला आधार व्हता की गं बया.... आता मी कुणाकडं बघून दिस काढू गं बया..." हौसाचं रडगाणं तिच्या दुःखाला सजवत व्हतं..पांडू गेला...हौसाई एकटी पडली.. तसा मागं भावाचा आधार व्हता खरं तिनं आपलं घर सोडलं न्हाई.तेवढीच चार दिस माहेरात ऱ्हावून मागं परतायची...पांडूबिगार तिला आता सोभा नव्हती.कितीबी झालं तरी दोघ एकमेकाला इसमून ऱ्हायाची नाहीत..लई जीव दोघांचा एकमेकांवर.गल्लीच्या वरच्या बाजूला दोघा नवराबायकोची रोज काहींना काही बात कानावर पडायची. आता पहिल्यासारी रया तिच्या तोंडावर नव्हती..त्यो तजेला आता दिसत नव्हता..नवरा गेल्याचं दुःख तिला आतल्या आत खाईत असावं.नवरा एवढा छळायचा खरं त्याची तिला लई काळजी..नकाड्या पोराला जपावं तसं नवऱ्याला जपत व्हती.ते घरं कसंबी आसना का पांडू हौसाच्या जोडीनं घराला सोबा व्हती..तीच निघून गेली.  रातीला त्या घरात एकटीला झोप लागायची न्हाई.कसली कसली वाईट सपनं पडायची म्हणून शेजारच्या घरात अंगाची वुळकुटी करून पडायची...त्या दिशी म्हण कुणाच्यात बांध वडायला गेली... इळभर काम करून आली.रातीला गल्लीतल्या डापळ्याच्या घरात बसली अंड्यांचं सांबार व्हतं तिथंच नकाडं जेवली.आणि दाराला येऊन रांकुंडी लावत बसली..तवर का छातीत कुठंन कळ मारली..तशी किचळतच आत मधल्या सोप्याला आली.."बाईसाब.. माझ्या छातीत दुखालय...चोळा...जोरानं चोळा..आवं मला आस काय व्हायलय...छातीत..पाटीत दुःखालय की वो बाईसाब..".हौसाई कायली करून घ्याय लागली कडची शावाक्का तिच्या छातीवर चोळाय लागली..घरात धांदल उडल्याली..तवर आजूबाजूच्या आयबाया जमल्या व्हत्या..कुणी गावातल्या डाक्टरला बलीवलं.गल्ली जेवून निवांत झाल्याली पर डापळ्याच्या घरातला गलका ऐकून जो तो तिकडं पळायला लागला..बघतोय तर हौसाई त्या घराच्या सोप्यात कायली करून घ्यालती.. आयबाया सगळ्या तिच्या भवतीनं.. कुणी तिला पाणी पाजत व्हत्या.. कुणी तिच्या डोक्यावर थापटत व्हत्या...डाक्टर आला तपासलं..हौसाई "माझ्या छातीत लई दुःखालंय" एवढंच बोलत व्हती..तिचं अवसांनच गळाल्याल..तिची तगमग व्हयालती.प्रकरण हाताबाहेर हाय डाक्टरनं जाणलं..बाहेर येऊन अंबुलन्सला फोन लावला.. अगदी पंधरा मिनिटांत गाडी दारात आली..लोकांनी हौसाला उचलून आंबलूनस मधी ठेवलं.. तशी ती बोलली "आता मी काय यातन जगत न्हाई..परतून माघारी येत न्हाई.."असंच बडबडायला लागली..तशी तिला सगळ्यांनी गप केली..'गप काय व्हईत न्हाई तुला कायबी बोलू नगस..भिऊ नगस" आयाबाया समजून सांगत व्हत्या..गाडी गेली...चांगल्या धडधाकट बाईला असं अचानक काय झालं..? माग चर्चेला उधाण आलं.
                                तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात घेतलं न्हाई म्हणून जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं तिथं इलाज सुरू झाला.तरीबी आठ दिस झालं असतील आणि एका सांच्यापारी गल्लीच्या कानावर बातमी धडकली.... हौसाई गेली...बिचारीला मराण कळलं व्हत का कुणास ठाऊक.. जाताना बोलली ते खरंच झालं.तिच्या दारबंद घरासमोर गल्लीतली लोकं जोडणी घालू लागली.एकेक पावना जमू लागला..नातंगोत जमा व्हायला लागलं.तरीबी मड्याची गाडी यायला रात्र झाली.खूप माणसं गोळा झाल्याली.दाराम्होरं खाटंवर पांढऱ्या कापडात गुंडाळल्याला हौसाईचा मुडदा. एक जुनी चादर त्येजावर टाकल्याली. बघता बघता हौसाईच्या घराम्होर माणसांची गर्दी फुलल्याली.कुठल्या कुठल्या गल्लीतल्या आयाबाया फुटून साऱ्या हौसाईला बघायला.तिला बघायच्या आणि डोळ्याला पदर लावत मागं सरायच्या...वल्या डोळ्यांनी चूकचुकत व्हत्या....तेल्याचा बाळूआण्णा तर किती येळला तिच्या पायाला हात लावून डोळं मिटून रडत व्हता.माणसांच्या गर्दीतनं मड नजरला पडणं मुश्किल झालतं..हौसाई माणसांच्या गर्दीत मुजली व्हती.खरं तर या येळला तिचं खरं सत्व कळत व्हतं...बिचारी गरीब गाय पण जिवाभावाची नातीगोती नुसत्या शब्दांवर जोडली व्हती...ही म्हणायची तिची खरी श्रीमंती... तिच्या मड्याला माणसं मावनात.
                                हौसाई गेली खरं तिचा गुणवाण कुणाला जमणार नाही. तिच्यासारखी तिचं.नवरा दारुडा..पोटाला पॉर ना घराला ढ्वार.ना नवऱ्याचं सुख ना पोराचं...आयुष्यात कसली हौस नाही...कसली आशा ठेवली नाही..पदराची चिंधी इणली...वताडाच्या करंज्या फोडल्या...दुसऱ्याच्या मातीत राबली नी संसार केला..खरं माघार घेतली न्हाई...कधी या कर्माला कावून म्हायरला गेली न्हाई...काडी काडी जमवून संसार केला..इल ती कमाई नवऱ्याच्या दारूवर खर्च व्हायची...पण कधी कुणाकडं रुजवात घातली नाही...माशासाठणी राचंइळाचं नदीवर साटावर जायाय लागायचं..संग कधी नवरा असायचा नसायचा...परक्या माणसाबरोबर जायाचं..पण कधी आपल्या बाईपणाला बट्टा लागू दिला नाही...साधीभोळी कुणाच्या कामाला नाही म्हणायची नाही...माणसाला लई चांगली..अजूनबी गल्लीगावातल्या आयाबाया हौसाचं नाव काढून चुकचुकत्यात..तिच्या कान्या एकमेकीला सांगत्यात..खरी जातिवंत बाई म्हणायची...वागण्यात प्रामाणिक...सात्विक..पतीव्रता...सोशिक नी गुणी होती.हौसाई गेली खरं अजूनबी मागं आयाबाया तिचं गुणगान गात्यात...पांडू आणि हौसाची जोडी फुटली...पांडूमागोमाग हौसाईबी गेली आणि गल्लीची सोभा गेली..आता ते ओकबोकं कुलूपबंद घर बघितलं की,त्यांच्या गजबजलेल्या आठवणी मनात आपसूकच घर करतात.

- किरण सुभाष चव्हाण(पांगिरे)
  मोबा- ८८०६७३७५२८.

सोमवार, २ मार्च, २०२०

चिक्केवाडी या दुर्गम वस्तीची जाणून घेतलेली दुर्दशा..






'चिक्केवाडीला विकासाची वाट कधी मिळणार..?'
                                               
                      भुदरगड तालुक्यातील गारगोटी या मुख्य ठिकाणापासून पाटगाव हे ३५ किलोमीटर अंतरावरचे गांव.१६ व्या शतकात मौनी महाराजांचे या गावी वास्तव्य होते.छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर जात असताना मौनी महाराजांची या ठिकाणी राजांनी भेट घेतली होती असे हे ऐतिहासिक ठिकाण. दोन महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी...अजूनही मौनी महारांचा मठ त्या पुण्यभेटीची साक्ष देतो.मावळत्या अंगाला विस्तीर्ण असे पाटगाव धरण...संपूर्ण परिसर जलमय दिसतो.या धरणाच्या पाण्याने चहूबाजूंचा परिसर अगदी सुजलाम सुफलाम झालेलाय.हिरवाईने नटलेला शिवार..सुखासमाधानं नांदणारी देखणीपान घरं. घरासमोर अंगण.असं कोकणरूप ल्यालेलं पाटगाव.या गावापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर  घनदाट झाडीझुडपांच्या जंगलात वसलेला प्राचीन असा रांगणा  किल्ला आहे आणि या किल्ल्याचा पायथ्याशी चिक्केवाडी ही छोटीशी लोकवस्ती.
चिक्केवाडीला जाताना खडकाळ चढसखल टपोऱ्या बुरमाने भरलेला खाचखळग्यांचा रस्ता.कुठून वाट काढावी असा प्रश्न घेऊन चालावे लागते.आजूबाजूला निबिड घनदाट जंगल...दोन्हीं बाजूला थाटामाटात उभा असलेली ती उंचच उंच झाडांची गर्दी..त्यात झुडपांची मांदियाळी... जंगलात  हिंस्र प्राण्यांचा वावर.. खासकरुन गवा प्राणी या जंगलात जास्त आढळतात..


                      प्राचीन रांगडा रांगणा किल्ला... या किल्ल्याच्या पायथ्याशी चिक्केवाडी ही अतिशय दुर्गम अशी वस्ती..सभोवार लाकडी दांड्याचे कुंपण.उतरत्या बंगलोर कौलारु छपराची आणि पावळणीला केंबळाची हातभर रुंदीची आडवी पट्टी बांधलेली.जाडजूड मातीच्या भिंती बऱ्यापैकी चांगली घरे. घराला समोर ओटा..बसायला सोपा अशी रचना. एकूण या वस्तीत सात घरे आहेत.



                            पंधरा माणसं इथं राहतात.दोन पुरुष आणि दोन महिला तेवढ्या सोडल्या तरी सर्वजण म्हातारेकोतारेच.काही वृद्ध वयाने सत्तरी ऐंशी पार केलेली. पुरुष शिडशिडीत वाळलेल्या खारकेगत खीडखीडीत अंगाचे.काही म्हाताऱ्या माणसांच्या अंगावर कपडेच नव्हते.जीर्ण झालेल्या नऊवारी लुगड्यातल्या,गोल साडीतल्या आयाबाया.
     
                     
 आपण इथं राहता कसे..?आपल्या काय अडचणी येतात.? आमचा पहीला प्रश्न "काय करायचं तसंच ऱ्हायाचं.."त्यांनी लागोपाठ आपले गाऱ्हाणं आमच्यापुढे मांडायला सुरुवात केली. "काय बी इथं सोय नाय..." "कस आसल तर दिस काढायचा.." ".दवाखाना नाय...माणूस आजारी पडला तर त्याकां घोंगड्यात घालून न्यावा लागता...रस्त्याची सोय नाय." ."मधी पाण्याचं वढा लागता लै अडचणी येता...इथं सगळी म्हातारी माणसंच" एका तरुणाकडे पाहत ती माऊली बोलली..' ह्यो मुलगा हाय तरुण,त्यो बी पोटासाठी खाली(कोकणात) असतो कसं न्याचं...आजारी माणूस एकेकदा इथंच सपता." मुलां का शाळेची सोय नाय...आमची मुलं शाळा शिकली नाय...आता कोलापूरात हाटीलात काम करत्यात..आताची लहान पोरं शिकायला पाव्हण्याघरी आहेती". .एक तरुण भाऊ बोलत होते" पावसापाण्याची कुठं जाण्याची सोय नाय...इथंच थांबावं लागता..आता माया बापच आजारी हाय..लकवा मारला..दवाखान्याला कसं न्याचा ह्यो प्रश्न हाय..."

                          मग आपण काय काम करता उत्पन्नांच कसं..? आमचा पुढचा प्रश्न.." काय उत्पान.. रोपं करताव भाताची शेती कराची..आता तुमी येताना बघितल्यानं तेवढीच बगा शेती." एक आजोबा बोलले " ती शेतीबी आमच्या नावावर नाय...गवं रेडा.. रानडुकरं पिकाची नासधूस करत्यात..तेज्यातन काय उरलं ते पदरात पडतं... या जंगलामधी वाघ..हत्ती..अस्वल प्राणी हाय..तेंच्यापासून धोका आसतो.."
मग आपली जनावरे किती...दूध वैगेरे काय करता..?
"कसली जनावरां औतावाट दोन जनावरे हायत...गायी म्हस लै न्हायत."
"मग घरात काय साहित्य लागतं साखर चहापूड वैगरे असा किराणामाल कोठून आणता..बाजार कुठे करता..?"
 एक माऊली बोलली "इथून बगा भटवाडीला चालत जावं लागता..चालत यावं लागता दिस मोडतो .पंधरा दिसातन एकदा जातो.".मी निरखत होतो..मनातलं दुःख ओठांवर मांडताना एक ताई हे सगळं सांगताना बाकीच्या त्या माऊलींना गलबलून गेल्या होत्या. मी त्यांचे डोळे निरखले त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं...जास्तीजण वृद्ध दिसत होते म्हणून मी प्रश्न केला तुम्हांला पेन्शन मिळते का..? "हो मिळते ना महिन्याका साशे रुपय भेटता.पण तेबी आणाया वीस पंचवीस मैल लांब तांबळ्याला बँकत जावं लागता"....

                       "तुम्हाला रेशनकार्ड आहे..दोन रूपयांचे धान्य मिळते..?"  " हो आमका दोन रूपायाचे कार्ड हाय..तांदूळ गहू भेटता"...माझी नजर समोरच्या एका ठिकाणी विजेचा डांब होता तिकडे गेली आणि मी प्रश्न केला..तुमच्या वस्तीत वीज कधी आली...? "गेल्यावर्षी ही लाईट आली नाय तर आतापतोर आमी अंधारातच होतो".
.".शासनाने जर ठरवलं आपलं पुनर्वसन करायचं.. तर आपली तयारी आहे का..?यावर एक आजोबा बोलले..."मग काय आमच्या देवाचा कौल घेऊन करू इचार पुढचा"..बरं याहून आणखीन तुमची सरकारकडं काय मागणी .? त्यावर मागच्या खांबाला टेकलेले खिडमीडीत आजोबा बोलले..."आवो सरकार आमच्या वरच्या आंगच्या रांगणा किल्याला म्हणं आता कोट रुपय खर्च करालय...आमच्या किती पिढ्या या जंगलात हालवनवसात खपल्या..जित्या माणसांकडं कधी बघणार हाय.? एक माऊली बोलू लागली..".पयल भाऊ आमच्यासाठी रस्ता झाला पायजे...शाळा नाही मुलां का शाळा झाली पाहिजे... दवाखान्याची सोया नाय...ती सोय झाली पायजे...खरं तर त्या सगळ्या  माऊलींचे डोळे उचंबळून आले होते..डोळ्यांत पाणी साठलं होतं... आतापर्यंत जे भोगलं जे सोसलं.त्या ठसठसणाऱ्या वेदनांचं प्रतीक त्यांच्या डोळ्यांत चमकत होतं.आम्हीही गलबलून गेलो होतो.आम्हीं त्यांच्या दुःखाशी एकरूप झालो होतो.
 तिथून मग आम्हीं जे आजोबा लकव्याने आजारी होते त्या घरी गेलो..सोप्यावर एका आराम खुर्चीत आजोबांना बसवलं होतं.



(प्रत्यक्ष पहा आजोबांची स्थिती खालील लिंकवर)
     https://youtu.be/jfQJ-lNWwmw

                          वय साधारण साठीच्या आसपास.त्यांच्या मुलग्याने सारी माहिती सांगितली..पंधरा दिवसांपूर्वी लकवा मारला आणि शरीर लुळे पडले..बोलता येत नाही ना काही खाता येतं.. टाळा पगळलेला आवासून दिनवाणी झालेला चेहरा..पापण्यांची मंद उघडझाप..तशीच मंद हालचाल... किती दिवसांपासून अन्नाचा कण पोटात गेलेला नाही..काही खावं म्हटलं तरी ठचका लागतो अन्न गिळत नाही..साधी भाताची प्याज करून जरी पाजली तरी ठचका लागतो..गळ्याखाली पाण्याशिवाय काहीच उतरत नाही...मग काय अवस्था होणार..हाडांचा सांगाडा शिल्लक आहे. उपचारासाठी दवाखान्यात न्यावे म्हटले तरी कसे नेणार कसे..?.रस्ता नीट नाही ..म्हणून एका आयुर्वेदिक वैद्याचा झाडपाल्याचे औषधोपचार सुरू केलेत काही फरक नाही..जीवाची नुसती तगमग होते...रात्रीला जराही झोप लागत नाही..वेदनेने अंग ठसठसत... कुणाला दुखणं खुपण सांगायचं म्हटलं तरी तोंड नाही आतल्या आत सहन करायचं..रात्रभर नुसती कणकण विव्हळण सुरू असत. ते सगळं चित्र पाहून आणि ती व्यथा ऐकून थक्क झालो आम्हीं...काय बोलावं..? आतून सगळं भरून येत होतं..डोळ्यातून फक्त गळायचं बाकी राहिलेलं...त्या दुःखाने बधिर झालेल्या मनाने आम्हीं सर्व बाहेर पडलो..

                         कोल्हापूरसारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यातील ही शेवटच्या टोकाची लोकवस्ती. वाळीत टाकलेल्या अवस्थेत असणारी.ज्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत...एकीकडे भरभराटीला आलेली स्वच्छ सुदंर अशी विकास पावलेली गावं. आणि दुसरीकडे चिक्केवाडीसारख्या दुर्गम वस्त्या ज्या विकासापासून कोसो दूर असलेल्या.असा आपल्या राज्यात विकासाचा विरोधाभास दिसून येतो.  छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन विकासाची स्वप्नं दाखवणाऱ्या महाराष्ट्र शासनाला आम्हांला हे प्रश्न विचारायचे आहेत..या महाराष्ट्राच्या नकाशावर सात घरांची चिक्केवाडी नावाची अर्थात माणसांची वस्ती आहे हे ठाऊक आहे का..?.आणि माहीत असेल तर ती याच राज्यात अशी अजून का वाळीत पडली?जी लोकवस्ती स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही आपल्या मूलभूत गरजापासून वंचित आहे...आपलं सरकार वर्षावर्षांला राज्याचं आर्थिक बजेट सादर करतं त्यात चिक्केवाडीसारख्या गावाच्या वाट्याला काय जात..? हजारो-लाखों कोटी रुपये खर्च करून विकासाचे जाळे विणणारे आपले गुळगुळीत हायवे तयार होतायेत..गावोगावी गल्लीबोळातील रस्त्यांचे नुतनीकरण होते... कोटींची मंदिरे गावोगावी उभारली जातायत..
                           पण ज्यांचं जगणं-मरणं ज्या रस्त्यावाचून अडून राहिलं अशा चिक्केवाडीसारख्या दुर्गम भागातील गावांना जोडणारा रस्ता म्हणजे त्यांची जीवनवाहिनी का नाही होऊ शकत..? अशा २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी का नाही निधी देता येत..? राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविले जाते शिक्षण सर्वांच्या हक्काचे असे म्हणतात.मग या वस्तीवरच्या मुलांना शाळेची सोय का नाही.? आतापर्यंत ती मुले निरक्षर राहून सध्या हॉटेलमध्ये कपडा मारायचे काम करतात...मग सर्व शिक्षा अभियानाचा फायदा त्यांना काय झाला नी नेमके हे अभियान कुठपर्यंत पोहोचले..? आज तिथल्या लोकांना आपली मुले पाहुण्यांच्या ठिकाणी शिकण्यासाठी ठेवावी लागतात...दुसऱ्यांच्या आधारावर ती मुले कितपत शिक्षणाची उंची गाठणार आणि आपली परिस्थिती कशी बदलणार..? आजही चिक्केवाडीसारखी गावे आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहेत..एकीकडे राज्यात जलद आणि आरामदायी प्रवासाच्या उद्देशाने मेट्रोसारखे प्रगत प्रयोग अंमलात आणताना इकडे आमच्या चिक्केवाडीसारख्या वाडीवस्त्यावरचा एखादा माणूस आजारी पडला तरी १०८ नंबरची अम्ब्युलन्स तिथे जाऊ नाही शकत.कारण रस्ताच नाही...पाच ते सहा पाण्याने भरून वाहणारे ओढे लागतात.पावसाळ्यात तर त्या ओढ्यांच्यामुळे रस्ता पूर्णपणे बंदच..आजही आजारी माणूस घोंगड्यातुन चार माणसांच्या खांद्यावरून दवाखान्याला आणावा लागतो..पावसापाण्यात रस्ताच बंद अशावेळी तिथेच आजारी माणसाला तळमळून तळमळून जीव सोडावा लागतो..असे कित्येक जीव मातीआड झाले असतील त्यांच्या पापाचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे.? त्या लोकांना तुमच्या आरोग्य सेवेचा फायदा काय..?आज चिक्केवाडीतील त्या लकवा मारलेल्या आजोबांना रस्ता नसल्याने दवाखान्याला घेऊन जाता येत नाही..आज त्यांना आय.सी.यू. ची गरज असताना एका प्लास्टिकच्या खुर्चीत जीव जात नाही म्हणून तळमळत पडावं लागतं पंधरा दिवसापासूअन्नाचा कण पोटात नाही...घरच्या मालकाला आणि जन्मदात्या बापाला उपाशी ठेऊन त्या मायलेकरांना रोजचा घास गळ्याखाली कसा उतरत असेल..? विकासाची जबाबदारी घेणाऱ्या या शासनकर्त्यांना आम्हाला विचारायचंय.ही पण आपल्यासारखीच एक माणसं आहेत ना.
                                 व्यवस्था ही माणसांची अवस्था बदलण्यासाठी उपयोगात आणावी लागते. पण  इथे खरंच आपण  मान्य करा की,आपली ही व्यवस्था या लोकांची अवस्था बदवण्यासाठी अपयशी ठरली आहे..तुम्हीं म्हणताय ना..विकासाच्या बाबतीत आपले राज्य आता सगळ्या राज्यात  पुढे पण मागे राहिलेल्या मागास अशा या एक दुर्गम चिक्केवाडीं आणि अशासारख्या वाडीवस्त्यांचं काय..?.महाराष्ट्राचा विकास झाला असं म्हणताना इथं आल्यानंतर तो आपला विकास खरंच मृगजळासारखा भासतो.इथं आल्यावर कळतं की, आपल्या राज्याचा कितपत विकास झाला आहे..मी तर म्हणतो...जोपर्यंत आपल्या चिक्केवाडीसारख्या रानावनातल्या दुर्गम वस्तीवरच्या माणसांच्यापर्यंत  विकास पोहोचणार नाही तोपर्यंत तुमच्या विकास या शब्दावर आमचा विश्वास कदापिही बसणार नाही...देश महासत्ता होण्याची स्वप्नं बघताना चिक्केवाडीसारखी गांव बघितली आणि अजूनही घोंगड्यात घालून लोकांना दवाखान्याला आणावं लागतं हे चित्र डोळ्यासमोर आणलं तर ते स्वप्नंच भंगून जातं.विकासाला अजून किती मुळापासून हात घालावा लागेल व त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची जाणीव होते.
                           आज शेजारी असणाऱ्या रांगणा किल्याच्या दुरुस्तीसाठी आपण कोटी रुपयांचा निधी खर्च करता..हरकत नाही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारे हे किल्ले जरूर साजिवंत करा.पण त्याच्या पायथ्याला राहणारी जिवंत प्रजाही महाराजांना तेवढीच प्यारी होती...त्या रयतेच्या कल्याणाचेही बघा...तुम्हीं जसा किल्ल्यासाठी निधी मंजूर केला तसा चिक्केवाडीच्या विकासासाठी निधी मंजूर कधी करणार..?त्यांनाही त्यांच्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधा कधी मिळणार ..? ज्या रस्त्यासाठी त्या मायमाऊलींनी डोळ्यात पाणी भरलं तो त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवणारा रस्ता कधी होणार..? अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे चिक्केवाडीतील त्या गोरगरीब लोकांना या शासनाच्या कृतीतून मिळाली तर बरे होईल.एक तर चिक्केवाडीला विकासाकडे नेणारी नवी वाट तयार करा नाही तर चिक्केवाडीला तरी विकासाच्या वाटेवर आणा.


(आपण संवाद साधू शकता.)
श्री.राजाराम शिंदे.(स्थानिक चिक्केवाडीकर)
- 9420878752
------------------------------------------------------

               - किरण सुभाष चव्हाण(पांगिरे)
                मोबा- ८८०६७३७५२८.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी हु||) यांचा जीवन व लेखनप्रवास.




       '...आणि जगण्याला शब्दांचं बळ मिळालं.'

                  आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला
जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.
                 ते साल होतं १ जानेवारी १९९८. अंगात तारुण्याची रग होती.त्या दिवशी नंदूजींनी उत्साहाच्या भरात,एक मण भाताचं पोतं डोक्यावर घेतलं नी तसेच घराच्या दिशेनं चालू लागले. आणि काही कळायच्या आत डोक्यावरच्या पोत्यासह नंदूजी खाली कोसळले.पोत्याखाली दबले गेले.मोठा अनर्थ घडला.नियतीने आपला डाव साधला.दुर्देवी वेळेनं मोठा घात केला,पाठीच्या कण्याला जबर मार लागला,गंभीर दुखापत झाली.त्यानंतर उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नंदूजींचे अर्धे शरीर गारद झाले होते. त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.तीन महिने उपचार सुरू होते पण इलाज चालला नाही. मेंदूपासून खाली पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या संवेदनशील नसा दबल्या गेल्याने कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला. शेवटी डॉक्टरांनी घोषित केले की,नंदूजी आता इथून पुढे कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत.

किती मोठा धक्का नंदूजीसह साऱ्या कुटुंबाला होता.हसत्या खेळत्या उमलत्या आयुष्यालाच त्या घटनेने सुरुंग लावला.जिवलगांच्या काळजाला भेगा पडल्या. नंदूजींच्या मनावर तर नकारात्मक विचारांनी कब्जाच केला. टोकाचे विचार सतत  मनाला टोकरू लागले. तिथून पुढे नवी मुंबई वाशी येथील 'शरण अपंग पुनर्वसन केंद्र' येथे भरती केलं गेलं.आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं.
                     शालेय जीवनापासून वाचनाची थोडी गोडी होती,ती कामाला आली. हळू हळू पुस्तकांची जवळीक वाटू लागली. या घटनेनंतर वाचनाची गती वाढू लागली.

पायांनी तर आता चौफेर उधळता येणार नव्हतं. पण मनाचा मात्र वारू शब्दांच्या सहवासात चौखूर उधळत होता. आणि जगण्याचं एक तत्व गवसलं.'शरीरानं अपंग झालो तरी, आपण मनानं कधीच अपंग नसतो.' शब्दांच्या पाठीवर स्वार होऊन आपण चहूमुलखाची सफर करू शकतो.आणि मग मनाला शब्दांची साथसंगत मिळत गेली. शब्द इतके घनिष्ट झाले की, या अपंग पुनर्वसन केंद्रात असताना शांत समयी शब्दांना अर्थाच्या धाग्यात ओवून  कवितेच्या एकेक  माळा बनवण्याचा मनाला छंद जडत गेला.
                         तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप संत साहित्याचे वाचन केले.वाचनाच्या विस्तीर्ण प्रदेशात धुंडाळताना विविधांगी वाचनाची आवड जोपासली. कथा,कविता,कादंबऱ्या मनाला भुरळ पाडत गेल्या. किती वाचू नि किती नको.आता फक्त बेभान होऊन वाचत राहणं.आधाश्यासारं मन पुस्तकांच्या पानापानावर रुंजी घालत होतं.आणि खरंतर उद्ध्वस्त जगण्याला दुरुस्त करण्याचं, मोडून पडलेल्या आयुष्याला पुन्हा उभा राहण्याचं,मरण्यासाठी विष मागणाऱ्या मनाला जगण्याचं बळ देण्याचं काम या शब्दांनी केलं,पुस्तकांनी केलं.
                              आता ''शब्दची आमुच्या जीवाचे जीवन" हे शब्द नंदूजींच्या जीवाचे जीवन झाले. हळूहळू विविधांगी वाचनातून लिखाणाची गोडी लागली. आणि नंदूजी म्हणतात तसं 'संत महंतांच्या पंक्तीतल्या उष्ट्यावर आमच्या शब्दांच्या पंक्ती झडतात.'वाचनाने प्रगल्भता लाभली आणि त्या ओघात त्यांची लेखणी प्रसवली. पानांवरचे शब्द वाचायची सवय होती आता  पानांवर शब्द उमटवायची सवय जडली.सुरुवातीला लेखणीस प्रारंभ झाला.सुरुवातीला कविता त्यानंतर कथा,कादंबऱ्या,लेख असे विविधांगी लेखन स्फुरत गेले.धामणे गावचे ज्येष्ठ साहित्यिक शि. गो.पाटील या गुरूंचे बोट धरून या शिष्याने लेखनप्रवासातले पहिले पुस्तक साकारले. यासाठी डॉ. संभाजी जगताप साहेबांची प्रेरणा मिळाली.आणि पहिल्यांदा २०१५ साली ग्रामीण ढंगातलाहा पहिला वहिला 'लुगडं'कथासंग्रह नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

कोहिनूर फाउंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य वाङमयीन पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.त्यानंतर ग्रामीण समकालीन जीवन कवेत घेणारा 'जांभळीखालचा झरा'  हा दुसरा कथासंग्रह श्री. पावले सर यांच्या सहकार्याने २०१६ साली प्रकाशित झाला.दक्षिण महाराष्ट्र साहित्य  सभेचा उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. तसेच साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी यांचे समारंभपूर्वक गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.या दोन कथासंग्रह नंतर २०१८ साली 'केतकी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 


अशा साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक कोल्हापूर व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर साहित्यभूषण पुरस्कार २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांची सुंदर प्रस्तावना लाभलेली 'इपळाप' ही 'कादंबरी आता लवकरच प्रकाशित होत आहे. 

तर 'आठवणीतील साठवण' व 'काळोखाला सूर्य बिलगला'(दोन्हीं आत्मचरित्रात्मक पुस्तके) या कादंबऱ्या तर 'बिवाळा' व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक आगामी प्रकाशाच्या वाटेवर आहेत.अनेक मासिक,दिवाळी अंक ,वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन चालूच असते.
                      जीवन प्रवासात एका क्षणी नियतीने दगा दिला अर्ध शरीर जायबंदी केलं.आज २२ वर्षे झालीत हे अपंगत्व येऊन. शरीर अंथरुणाला खिळलं आहे,मातीत धडपडणारे पाय आज गादीवर निर्जीव होऊन निपचित पडलेले असतात. खूप त्रास होतो,वेदना अव्याहतपणे साथ देत असतात. कधी पाठीला जखमा होतात ,पचनक्रिया बिघडते, मूत्राशयाचा संसर्ग हा तर ठरलेलाच. कधी तापानं अंग फणणतं. कधी अवघ्या अंगाला कापरा भरतो.शत्रूसारखे एकेक आजार या शरीरावर विजय मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात. काही लिहायचे म्हटले तरी हात कापतात.नीट बसता येत नाही,एका कुशीवर होऊन लेखन करावे लागते.  पण हार मानणारे ते नंदूजी कसले..? त्यांनी सर्वांवर  कधीच मात केलीय. अशा आजारपणात धावून येतो,तो एक माणसातला देव तो देव म्हणजे डॉक्टर संभाजी जगताप. नंदूजींच्या कसल्याही आजारपणात ते एकेकदा घरी येऊन उपचार करतात. सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात.नंदूजींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात त्यांचा खूप मोठा आधार आहे. शारीरिक पातळीवरचा हा संघर्ष खूपदा मानसिक स्वास्थ्याला आव्हान देत असतो.सुरुवातीला चिडचिडेपणा व्हायचा, राग अनावर व्हायचा. सगळ्यांचा त्रागा वाटायचा. पण वेदनांच्या या नानाकळांची अनुभूती आता सर्वांगाला झाली होती.आणि म्हणून या अनुभूतीला मनाच्या सहानुभूतीची जोड मिळत गेली.आजतागायत असहाय वेदना शरीरानं झेलल्या अन मनानं सोसल्या पण आता अशा सहनशीलतेतून मनाला शांती नी संयमाची स्थिती प्राप्त झाली. आता मनाच्या शांतीत सारं काही विरून जातं.
                                    आई-वडिल या पोटच्या गोळ्याला आजही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताहेत. लेकराचं उभं आयुष्य असं अपंगत्वाच्या तावडीत सापडलं हा त्यांच्या काळजावर पडलेला घाव कधी न भरून येण्यासारखा आहे. तो घाव इतका वर्मी होता की, उभ्या आयुष्यभराचं दुःख पदरात घातलं.आजही या कष्टाळू आई-बापाचे हिरमुसलेले चेहरे हृदयातल्या त्या ओल्या जखमांची साक्ष देतात.
१४ वर्षे वनवास भोगणाऱ्या  रामाला जशी लक्ष्मणाची अखंड साथ लाभली. तशी आज २२ वर्षे हा अपंगत्वाचा वनवास भोगणाऱ्या भावाला लक्ष्मणागत साथ मिळते आहे ती आपल्या पाठच्या भावाची म्हणजेच सागरजी यांची.नावाप्रमाणेच मायेचा हा सागर आहे.आजच्या कलियुगामध्ये दुर्मिळ अशी ही  राम लक्ष्मणागत भावांची जोडी आहे.

आपल्या थोरल्या बंधूची सेवा अखंडपणे हा भाऊ करत आला आणि आजही करतो आहे.घरातील ऊठ-बस किंवा बाहेरचा प्रवास असू दे ,चाकाच्या खुर्ची मधून दोन हातावरती अंतराळी घेऊन एखाद्या ठिकाणी बसवायचं नी पुन्हा चाकाच्या खुर्चीत ठेवायचं अशी सगळी मायेची उठाठेव  बंधू सागरजी करतात. अतिशय प्रेमळ,जिव्हाळा असणाऱ्या भावाची आणि त्यांच्या पत्नीची साथ नंदूजींना मिळते आहे.
                         सागरजींच्या संसाररुपी वेलीवर फुललेली दोन फुले केतकी आणि स्वरा. यांचा तर नदूजींना विशेष लळा.या फुलांच्या सहवासात त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध आला आहे. शब्दांनी जगण्याची हिंमत दिली, पुस्तकांच्या सहवासात जगणे साध्य झाले,वाचनातून समृद्धता आली.समृद्ध व प्रगल्भ ज्ञानातून लेखणीचा उगम होत राहिला आणि या शब्दांच्या प्रवाहामध्ये अनेक संवेदनशील मनांची नाती जुळत गेली. जीवंत हृदयाची माणसे भेटत गेली. आज सभोवार संत सज्जनांचा जीवलगांचा गोतावळा निर्माण झाला आहे. संतरुपी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी सारख्या गुरुभेटीने तर नंदूजींचे अवघे जीवन धन्य धन्य झाले आहे.

                            आज काय गमावलं नी काय कमावलं..? याचा हिशोब मांडताना...काय गमावलं. तर नियतीने दोन पायच हिरावून घेतले ना..? पण याच्या उलट आज नदूजींच्या एका हाकेवर धावून येणारे असंख्य पाय हे त्यांचे झालेत.शरीर जरी एका ठिकाणी स्तब्ध असलं तरी मनानं मात्र उंच भरारी घेतलीय,शब्दांच्या जगात भटकंती करताना स्वतःमधला एक उत्तम संवेदनशील लेखक गवसला.त्यांच्या शब्द सामर्थ्यामधून वाचकांची नाळ त्यांच्या लेखणीला जोडली गेली.माणसातला एक वेगळा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली.समाजातील मान,सन्मान,प्रतिष्ठा चालत त्यांच्याकडे आली.

जगण्याच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना आज नदुजींच्याकडे पाहून पुढे चालण्याची प्रेरणा मिळते... आज हे नदुजींनी कमावलं.नंदूजी आपली पाऊले कधीही थांबली नाहीत तर तर धडपडले आजपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या पावलांच्या रूपातून,आज धडपडताहेत भाऊ सागरजींच्या रूपातून आणि इथून पुढे सदैव धडपडत राहतील तुमच्या लाडक्या लेकी केतकी आणि स्वरा यांच्या पावलांच्या रूपातून.

               'जय हो...मंगल हो..!!'

               
                  - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
                    मोबा - ८८०६७३७५२८.

ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे अवश्य पहा खालील लिंकवर.

https://youtu.be/ztOP6VYdiXY

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

मराठी वाचुया,मराठी लिहुया,मराठी जगुया.






       
       
           'मायबोलीचा टक्का का घसरला.?'
                               
 "माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके"
                  ज्या माय मराठीच्या लेकरांनं अवघ्या १६ व्या वर्षी असा मराठी भाषेचा गौरव करत... ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून या मराठी भाषेला समृद्ध केले. त्याआपल्या मराठी भाषेच्या प्रांतात मायबोलीचा टक्का का घसरला..?असा प्रश्न तिच्या  लेकरांना स्वतः आपल्यालाच करावा लागतोय हे किती मोठं दुर्दैव आहे.एकेकाळी वैभवशाली समृद्धसंपन्नतेच्या शिखरावर असलेली मराठी भाषेची आज एवढी घसरण का झाली? म्हणून का  हा प्रश्न आपल्याला करावा लागतोय.मायबोलीचा टक्का का घसरला..?.या प्रश्नाच्या शोधात कुठे खोलवर जाण्याची गरज नाही. कारण ती उत्तर आपल्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारात सहज आपल्याला सापडू शकतात.
                                       आपलं जगणं आणि आपला भोवताल समृद्ध करते ती म्हणजे भाषा.रोजच्या व्यवहारातल्या वापरावर भाषेचं बरंच अस्तित्व अवलंबून असतं.आपल्या लेखणी,वाणी,कथनीतून भाषेच्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड वाहत असतो.पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, व्यवहारातल्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ज्या भाषेला महत्व आलं आहे त्या भाषेकडे आपला ओढा वाढत चालला आहे.आणि म्हणून केवळ आज २१ व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात ज्या भाषेचे बोट धरून आपण यशाच्या टोकाला पोहोचू शकतो...असा विश्वास ज्या भाषेने प्राप्त करून घेतला आहे आणि आपणही असा विश्वास जिच्यावर ठेवला आहे अर्थातच ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा.
                                      आणि हेच मूळ कारण आपल्या मायबोलीच्या मुळावर उठले आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे हा इथला नियमच झाला आहे.आणि मग या इंग्रजीबाईच्या बेगडी प्रेमात पडून आपल्या माय मराठीच्या प्रेमाला इथला मराठी माणूस दिवसेंदिवस दुरावतो आहे...  आणि म्हणून 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' असे अभिमानाने आपल्या भाषेचे गोडवे गाणारे आम्हीं...
"लादले आम्हांवरी आम्हीं बोलतो इंग्रजी,जाहलो खरेच धन्य ऐकतो इंग्रजी.
लिहितो इंग्रजी आम्हीं, वाचतो इंग्रजी,
रोजच्या व्यवहारात आम्ही वापरतो इंग्रजी.
आमच्या लहानग्यात, आमच्या मुलामुलात,
आमच्या मनामनात आमच्या घराघरात वाढते इंग्रजी.
आमच्या जगण्यात आणि वागण्यात आता फक्त इंग्रजी".
असे आमचे हळूहळू इंग्रजीकरण होत आहे.आणि यास्तव आज आपल्याला टिकायचं असेल नी आपल्या पुढच्या पिढीला टिकवायचं असेल तर फक्त इंग्रजी भाषा ही अनिवार्य आहे अशी आपण ठाम समजूत करून घेतली आहे.आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचे  सर्वत्र फुटलेले पेव हे एक असे चित्र निर्माण करते आहे की,इथून पुढच्या जगण्याला प्रगतीची दिशा देणारे एकमेव माध्यम म्हणजे इंग्रजी भाषा.म्हणून अशा धारणेतून या इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा फोफावत आहेत याचा अंदाज फक्त या एका उदाहरणावरून आपल्याला येईल.. एका गावातील एका मराठी शाळेच्या एका वर्गाची संख्या एकेकाळी १२० पटापर्यंत होती..आता पूर्ण शाळेची मिळून एतकी संख्या भरते आहे.त्याच गावात आज रोजी दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आणखीन आजूबाजूच्या परिसरातील निर्माण झालेल्या वेगळ्याच..आज माय मराठी भाषेच्या प्रांतात अशा इंग्रजी ज्ञानाची मंदिरे दिवसेंदिवस वाढत आहेत... आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मराठी भाषेच्या विद्येची मंदिरे मात्र ओस पडत चालली आहेत. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं पेव फुटत असताना दुसऱ्या बाजूला झपाट्याने डबघाईला येत असलेल्या मराठी शाळा अशा ओसाड पडत चालल्या आहेत तर मग तिथं मायबोलीचं बीज पेरायचं तरी कसं आणि अशा ओसाडवाण्या परिस्थितीत मायबोलीचं पीकं उगवणार तरी कसं.?  ... आज आपल्याच मराठी विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या इंग्रजी शाळांना सुगीचे दिवस आलेत.शाळा सुरू करणारा मराठी...ती चालवणारा मराठी...शिकवणारा मराठी...शिकणाराही मराठी...स्वतःच्या मराठी प्रांतात इंग्रजी बाई रुबाबात आणि आमची मराठी आई दिनवाणी झाल्यासारखी अवस्था आहे मग आमच्या मायबोलीचा टक्का घसरणार नाही तर काय होणार...?
                      मायबोलीचा टक्का का घसरला याचे उत्तर शोधताना आपण आपल्यापासूनचं शोधुया ना. या इंग्रजीकरणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण ही गुलाम झालो आहोत हे ही कारण पुष्कळस जबाबदार आहे..कधी तर विचार करा आपल्या तोंडवळणी पडलेले साधेसे असणारे शब्द मग (कप,टेबल,टीव्ही) यांसारखे असे बरेच.हळूहळू अशा साध्या शब्दांपासून तिने आपल्या भाषेवर कधीच कब्जा सुरू केला आहे.अहो जिथे घरातल्या आई नावाच्या व्यापक शब्दाची जागा 'मम्मी' आणि बाबा या नावाची जागा 'पप्पा'या इंग्रजी शब्दाने घेतली तिथे बाकी शब्दांचं काय घेऊन बसलात...आज इंग्रजी शब्दसंपदा वाढावी म्हणून इंग्रजी अर्थाची डिक्शनरी प्रत्येक घरात असेल पण मराठी शब्दसंपदा वाढावी म्हणून मराठी शब्दकोष कुठल्या घरात असेल का ?ते शोधावे लागेल.अशी विरोधात्मक परिस्थिती आहे.बघा मोबाईलवरून बोलताना आपण सर्वजण कुठल्या शब्दाने आपल्या बोलण्याची सुरुवात करतो.आपल्या मोबाईलमध्ये आपण भाषेचे कोणते माध्यम वापरतो..? व्हाट्सएप,फेसबुक,ट्विटर अशा सोशल माध्यमांवर एकमेकांशी चॅटिंग करताना जास्तीत जास्त कोणत्या भाषेचा आपण वापर करतो आहोत.? .आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवर कोणत्या भाषेतील अंक आहेत..? बाहेरील बोर्ड असो नाही तरी आतील मेनू कार्ड असो...जिथे तिथे इंग्रजी भाषेचं अस्तित्व ठळकपणे आपल्या लक्षात येईल...पण  आपण गांभीर्याने याचा विचारच कधी केला नाही आणि करणारही नाही अशा गांभीर्याचे आपल्याला गांभीर्यच नाही हे एक गंभीर कारण नाही का..? नाही इथे कुठल्या भाषेला विरोध नाही..कोणतीही भाषा आपण शिकली पाहिजे...कोणतीही भाषा आत्मसात केली पाहिजे पण हे करत असताना एका भाषेचं अस्तित्व दुसऱ्या भाषेच्या अस्तित्वाच्या नाशाला कारणीभूत ठरू नये याची काळजी नको का घ्यायला..?.कुसुमाग्रज म्हणतात तसं..
"परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देश ही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषक होऊनि आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका"
              या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये इंग्रजीच्या नादाने आपल्या प्रगतीच्या दिशेने आपण पाऊल टाकताना मराठी भाषेच्या अधोगतीचे काय..? इथे कुठल्याही परभाषेवर बंधन नाही..पण इतकी वर्षे जी आपली मराठी भाषा संस्कृतीचा ठेवा जोपासत आली...जगण्याची प्रेरणा आणि.लढण्याची चेतना देत आली...आज तिच्या अस्तित्वाचा कधी तरी आपण गंभीरपणे विचार करतो का..?आपण आपल्या सोयीनुसार  आपल्या अस्तित्वाच्या शोधात आपल्या मायबोलीच्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडतो आहे...आणि म्हणून मायबोलीच्या अवस्थेला आपल्या सोयीच्या भाषेची व्यवस्था कारणीभूत ठरते आहे. आज इंग्रजी शाळांच्या अभ्यासक्रमात शासनाला सक्तीने मराठी विषय अनिवार्य करावा लागतो...यावरून आमच्या लेखी तिचे महत्व हे सक्तीचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.
                       एखादं लेकरू इंग्रजीतून एखादं वाक्य अस्सलिखितपणे बोललं तर आईला किती आनंद होतो...त्या लेकरांचं किती कोडकौतुक ती करते...पण मराठीतील एखादं सुभाषित...एखादा अभंग...सायंकाळची शुभंकरोती आपल्या लेकरांनं म्हणावी म्हणून किती हट्टाहास ही माऊली धरते..लेकरांनं इंग्रजी जरूर शिकावं पण आपल्या मराठीच्या संस्कृतीचा संस्कार आपण जाणीवपूर्वक त्याच्या कोवळ्या मनावर करतो आहोत का...?हा खरा प्रश्न आहे.इथे एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे.आपलं मुलं इंग्रजी शाळेत शिकावं....त्यानं इंग्रजी अस्संलिखित बोलावं...म्हणून इंग्रजी भाषेचा ध्यास घेणारे आम्हीं...जरूर इंग्रजीविषयीचा ध्यास धरूया पण आपल्या मुलांनं मराठी भाषेत ही पारंगत व्हावं अशी आस त्याच्या मनात आपण कधी निर्माण करणार आहोत का..?..कारण आज ही मुलं इंग्रजी ज्ञानाच्या जीवावर कदाचित स्पर्धेच्या युगात टिकतीलही पण मराठी भाषेशिवाय ती ज्ञानान इतकी समृद्ध होणार नाहीत...की जी आपल्याबरोबर इतरांनाही समृद्ध करतील... इंग्रजी भाषा अवश्य तुम्हांला जगवेल. पण मराठी भाषेचा आजपर्यंतचा इतिहास आहे...ती जगवते आणि स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जगवायला शिकवते..आठशे वर्षांपूर्वीचा आमचा ज्ञानोबा, संत नामदेव,संत एकनाथ,तुकोबा मराठी भाषेला समृद्ध करणारी ही माय मराठीची लेकरं आज कळीकाळावर राज्य करताहेत...तुम्हांला आहे असा आत्मविश्वास..? की केवळ इंग्रजी भाषेतून शिकणारी आपलं लेकरं अशाप्रकारे ज्ञानान समृद्ध होऊन करेल काळावर राज्य..?.काय आपला हेतू फक्त एवढाच की,त्यानं शिकावं आणि आताच्या काळापुरतं फक्त टीकावं...? त्याच्या जगण्याच्या क्षमता जर एवढ्या पुरत्या मर्यादित असतील तर काही हरकत नाही...पण जर आपलं लेकरू ज्ञानान समृद्ध व्हायचं असेल..उत्तुंग व्हायचं असेल ते त्याला इतकं समृद्ध सामर्थ्यशाली करायचं असेल की, येणाऱ्या कित्येक कळीकाळावर त्याच्या कर्तृत्वाचं राज्य असलं पाहिजे आणि म्हणून...त्याला खऱ्या मराठी मायेच्या अमृतरुपी संस्कारांचा दुग्धचिरा त्याला प्यावयास दिला पाहिजे.
"आकंठ प्यालो हिचे दूध
अंगी पहा या रोमारोमातुनी खुणा
तोडा चिरा दुग्ध धाराच येती
न हे रक्त वाहे शरीरातूनी
माझी मराठी मराठाच मी ही
असे शब्द येतील हो त्यातुनी"
 अहो म्हणून तर ते माय मराठीचं ते लेकरू आहे पहिल्यांदा त्याला तिचंच दूध पाजलं पाहिजे...नंतर मग त्याला कुठल्या भाषेचे लाड पुरवायचे ते पुरवा...कारण येणारी पिढी ही वारसदार आहे ती मराठी भाषेच्या अस्तित्वाची तिच्या अस्मितेची...
                  आमच्या ज्ञानोबा, तुकोबांनी आपल्या समृद्धसंपन्न ज्ञानाने श्रीमंत केलेल्या या मायबोली मराठी भाषेची श्रीमंती अखंडित राखणं ही आपली जबाबदारी आहे...आणि म्हणून या जबाबदारीचं भान ज्यांना आहे त्यांनी आपल्या मायबोलीचा टक्का का घसरला..?या प्रश्नाचे उत्तर स्वतःपासून शोधायला सुरुवात केली तर आपण त्या उत्तरापर्यंत नक्की पोहोचू असा मला विश्वास आहे.
                       - किरण सुभाष चव्हाण.
                        -पांगिरे, ता-भुदरगड,जि-                                  कोल्हापूर .
                         मोबा- ८८०६७३७५२८.



सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

'अजून अशा किती निर्भया..? - किरण चव्हाण.


          
'उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये आज पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी  घटना घडली...? राक्षसांनी पुन्हा एकदा डाव साधला...वासनांध भुकेने आणखीन एका निष्पाप जीवाचा घास घेतला...'


                  'अजून अशा किती निर्भया..?'

परवा दिल्ली,काल कोपर्डी, प्रियांका रेड्डी,हिंगणघाट आणि आता हाथरस...
'अजून अशा किती निर्भया..?'
नाही ना थांबला हा अत्याचार.. आपल्या समाजातील नाही ना बदलल हे चित्र....
अजूनही घडतायेत राजरोसपणे बलात्कारी घटनांचे सत्र...
दिल्लीत घडल्या त्या घटनेने गल्लीपर्यंत हादरलो होतो आपण..
आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती केली होती आंदोलने आपण..?
किती पेटल्या मेणबत्त्या श्रद्धांजलीसाठी...?
किती केला आकांडतांडव..? त्यावेळी...आजही...अजूनही करतोय आम्हीं.
पण नाही थांबवू शकत...नाही संपवू शकत... समाजातील ही वृत्ती अघोरी..
निर्भयासारखीच पुनरावृत्ती घडतेय आमच्या डोळ्यामाघारी..
सोसणाऱ्या अशा किती निर्भया जगताहेत मरणयातना घेऊन भयाप्रमाणे...
आणि भोगणारे मात्र निर्लज्ज नराधम फिरताहेत उजळ माथ्याने आणि जगताहेत निर्भयपणे...
सोसणाऱ्यांना निखळ श्वास आपण देऊ नाही शकत..
आणि भोगणाऱ्यांचे श्वास आपण घेऊ नाही शकत..
वासनांध राक्षस विझवून टाकताहेत आमची एकेक पणती..
आणि मग काय उरतं आमच्या हातात..?
तिच्याच श्रद्धांजलीची एक मेणबत्ती...?
उरावरचा राक्षस झेलताना आठवला असेल ना तिला आपला बाप ...आई...भाऊ...बहीण..
घातली असेल ना साद एखाद्या माणूसपणाला..
जिवाच्या आकांताने फोडली असेल ना आभाळभरून किंकाळी तिने..?
वेदनेची ती किंकाळी कुणाच्याही कानात शिरली नसेल का.?
 .....त्या नराधम राक्षसांना हे पाप करताना वाटलं नसेल का अशीच एक मागे.....
माझी आई आहे,माझी बहीण आहे..अशीच पोटची लेक आहे..
वाटली नसेल का थोडी तरी लाज..?
अखेर तळमळणाऱ्या शरीरातील प्राण घेऊनच त्यांनी तिची सुटका केली.
हीच पद्धत आहे अशा नालायकांची...निष्पापाचा बळी देऊन शेवटी वासनेची भूक भागवायची.
अरे एकट्या नारीवरती तुम्हीं वासनेचं बंड केला.
अरे तिथेच तुम्ही तुमच्यातला षंढ पुरुषार्थ सिद्ध केला.
नराधमांनो...
               तुमच्या नरडीचा घोट घेणारा दोर...
तुमच्या गळ्याभोवती जोपर्यंत आवळणार नाही...तोपर्यंत त्या निष्पाप जीवांचा आत्मा...
आणि आमच्या उरातील आग थंड होणार नाही...
कायद्याने हात बांधलेत म्हणून...
 नाही तर...
इथे टकमक टोकाचा...आणि कलम करण्याचा इतिहास आहे...
खबरदार...

-------------------------------------------------------
खालील लिंकवर क्लिक करून ऐका...



बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.' प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी साहेब .




'प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी प्रशासनातले कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.'



            पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील मंगळूर हे एक छोटंसं खेडेगाव.या छोटयाशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात डॉ.संपत कोंडाजी खिलारी यांचा ५ सप्टेंबर १९७५ साली जन्म झाला.आई वडील दोघेही अशिक्षित.पण म्हणतात ना
'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.' तसे  आपल्या तीन भावंडांमध्ये हे शेंडेफळ.घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा.त्यामुळे अध्यात्माचे संस्कार लहानापासून मनावर बिंबलेले.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मंगळूर या शाळेत झाले.उपजत हुशारपणा आणि कुशाग्र बुद्धिमता असल्यामुळे.इ ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.आणि इथेच पुढच्या यशस्वी कार्यकिर्तीचा पाया रचला गेला.पुढचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कुल पारगाव येथे झाले.व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मेनन कॉलेज भांडुप मुंबई येथे पूर्ण केले.त्याचबरोबर मुंबई येथे राहूनच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात एम.व्ही. एससी.(पशुपोषण) शास्त्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.आणि पुढील दोन वर्षे जनावरांचे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू राहिली.पण मनात याहून काहीतरी वेगळे करण्याची उमेद होती प्रशासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मनात होते.आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली.अंगभूत कुशाग्र बुद्धिमत्तेला जिद्द,चिकाटी महत्वकांक्षेची जोड मिळाली.दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेच्या परीक्षेतून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पुणे  महसूल विभागात परिविक्षाधीन तहसीलदार या पदावर रुजू झाले.२००२ पासून २००५ या कालावधीमध्ये ते या पदावर कार्यरत राहिले...इथून त्यांच्या कार्याचा व पदांचा चढता आलेख सुरू झाला.२००५ ते २००८ या कालावधीत मावळ जि- पुणे येथे तहसीलदार..२००८ ते २००९ पर्यंत तहसीलदार, संजय गांधी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.त्यानंतर २००९ ते २०११ तहसीलदार कागल,जि- कोल्हापूर.२०११ ते २०१२ तहसीलदार शिरोळ,जि-कोल्हापूर.असा तहसीलदार पदाचा कार्यकाळ सुरू असताना. १ ऑगस्ट २०१२ रोजी उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती प्राप्त झाली.आणि मग ऑगस्ट २०१२ ते जून २०१३ उपजिल्हाधिकारी म्हणून भूसंपादन अमरावती. त्यानंतर जून २०१३ ते ऑगस्ट २०१४ कुलसचिव,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)नागपूर येथे कार्यरत.सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१७ पर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल भंडारा जि- भंडारा.आणि सध्या जून २०१७ ते आजअखेर उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड, उपविभाग गारगोटी, जि-कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.   
            अशा एकूण प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त असे निर्णय घेऊन ते अंमलात आणले.
१)कागल येथे तहसीलदार असताना tahsildarkagal.com व शिरोळ येथे तहसीलदार असताना tahsildarshirol.com या वेबसाईटची निर्मिती केली.आपल्या कार्यात्मक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्यातला पहिलाच एक अभिनव उपक्रम साकारला.
२) शिरोळ तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना तहसीलदार कार्यालय,शिरोळ यास आय.एस.ओ. 9001-2008 मानांकन प्राप्त करून देण्यास महत्वाची भूमिका बजावली.तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण व महसुलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात महाराष्ट्र राज्य. यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
३) मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील १८०० पेक्षा अधिक आदिवासी कुटुंबाना व आजरा-भुदरगड तालुक्यातील ३५० धनगर कुटुंबाना जात प्रमाणपत्रांचे शिबिराद्वारा वाटप केले गेले.म्हणजे अडथळ्यांची किती शर्यत पार करून वैयक्तिक जातीचे प्रमाणपत्र काढत असताना करावी लागणारी पराकाष्ठा ओळखून डोंगराळ व जंगल भागात राहणाऱ्या या गरीब,गरजू वंचित लोकांना एकाच छताखाली शिबिराद्वारे जात प्रमाणत्रांचे वाटप केले.
४)सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राज्यस्तरावर स्वीकृत कोल्हापूर जिल्ह्यातील उपक्रम 'ई चावडी योजना' व चावडी वाचन योजना या योजनांची निर्मिती व यशस्वीपणे अंमलबजावणीमध्ये महत्वपुर्ण योगदान दिले.
४) माफसू अंतर्गत  कार्यरत पशुवैद्यकीय, मत्स्य व दुग्ध तंत्रज्ञान शाखा अंतर्गत महाविद्यालयांकरीता शासनस्तरावरून एकूण २९५ नवीन पदनिर्मिती मंजूर करून घेणेकामी महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
५) सन २००८ पासून प्रलंबित दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय,उदगीर जि-लातूर करिता नवीन ५५ पदनिर्मिती व रु.५७.५८ कोटी इतका निधी शासन स्तरावरून मंजूर करून घेणेकामी महत्वपुर्ण सहभाग राहिला आहे.

एकंदरीत असा प्रभावीपणे कार्य करण्याचा धडाका आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अनेक संस्था व शासन स्तरावरून पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे...
प्राप्त पुरस्कार-
१) मावळ वार्ता वृत्तवाहिनीतर्फे"कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी"म्हणून सन २००६ चा पुरस्कार.
२) सन २०१०-११ या वर्षाकरिता "उत्कृष्ट तहसीलदार" म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा "उत्तम कार्यकर्ता प्रशासकीय अधिकारी" २०१२ चा पुरस्कार मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
४)ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे जागतिक पशुवैद्यकीय दिनी २०१३ रोजी पशुवैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील कामकाजाच्या अनुषंगाने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
५) सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता "उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी"म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडून विभागीय स्तरावर शिफारस.
६) २०१८ चा अनुलोम संस्थेचा अनुलोम संमित्र पुरस्कार मिळाला.
७) नुकताच २०१९ चा आपल्या मंगळूर गावचा मंगळूर भूषण पुरस्कार मिळाला.

                एका छोट्याशा खेडेगावात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात अशिक्षित आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा मोठा साहेब झाला.प्रशासनातला उच्चपदस्त अधिकारी बनला.घरामध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरणात, अध्यात्माचा प्रभाव यामुळे "बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे."
असा अवघ्यांच्या कळवळ्याचा,संवेदनशीलतेचा संस्कार लहानवयात कोवळया मनावर कोरला गेला होता..त्यामुळे उपजतच समाजसेवेच्या कार्याची ओढ मनात होती...म्हणून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून आपल्याला समाजातील अनेक घटकांविषयी चांगले कल्याणकारी काम करता येईल ही महत्वकांक्षा ठेवून  एक वर्ष जनावरांचे डॉक्टरची प्रॅक्टिस तिथून तहसीलदार व सध्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंतची यशस्वी वाटचाल सुरू राहिली.  लोकाभिमुख काम हीच त्यांची ओळख.सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांच्या कार्याची नाळ जोडली गेली आहे.प्रशासनामधला स्वच्छ व पारदर्शी,प्रामाणिक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा सर्वपरिचित आहे.प्रशासनाचे काम हे लोकाभिमुख असते पण त्याची अंमलबजावणी करणे हे सर्वस्वी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते.म्हणून हा असा लोकाभिमुख अधिकारी आहे की जो लोकहितासाठी आपली प्रशासकीय सेवा प्रभावीपणे राबविण्याचे काम अत्यंत प्रामाणिक व तळमळीने करत असतो.कोणत्याही कामाचे जर स्पष्टपणे उद्दिष्ट ठरले असेल तर ते काम नेटाने व अधिक जोमाने होत असते.आणि म्हणूनच खिलारी साहेबांच्या सेवेचे उद्दिष्टचं ठरलेले आहे...लोकाभिमुख काम...तळागाळातील लोकांपासून सर्वसामान्य घटकापर्यंत जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत रहायचं...आणि म्हणून त्यांच्या चांगुलपणाची ओळख समाजात अशी निर्माण झाली आहे की,डॉ.संपत खिलारी साहेब म्हटलं बांधावरच्या शेतकऱ्यांपासून ते नोकरवर्ग, सर्वसामान्य लोक आदराने व आपुलकीने त्यांचे नाव घेत असतात.प्रशासनात त्यांच्या अखत्यारीत ज्या स्नेहीवर्गाने काम केले त्यांच्यामध्येसुद्धा ते बदलून जरी गेले तरी त्यांच्याविषयी एक आपुलकी,आदर व काम करत राहण्याची प्रचंड प्रेरणा त्यांच्याकडून मिळते अशी भावना ऐकायला मिळते.पुढे जाताना मागे आपल्या नावाचं एक प्रेरणादायी अस्तित्व निर्माण करणं...आणि चांगल्या कार्याशी ते नांव जोडलं जाणं हे उत्तम कार्यकर्त्या कर्तव्यदक्ष अधिकाराच्याचं लक्षण समजलं जातं आणि म्हणून
अधिकारी कसा असावा..? तर तो असा असावा ही त्यांच्याविषयीची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
           प्रशासकीय सेवा बजावताना हळुवार समाजाच्या कुशीत शिरून दुःखीतांच्या दुःखाशी समरस होऊन ते निवारण्याचे काम करत राहणं हे त्यांच्यातल्या समाजसेवकाचे दर्शन घडवतात.या त्यांच्या चांगुपणाचा एक प्रत्यय म्हणजे मागील वर्षी आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाड्यातील पांढरंमिसे कुटुंबातील सहा मुली ज्यांचं पितृछत्र हरपलेलं.उपविभागीय अधिकारी डॉ संपत खिलारी साहेबांच्या पुढाकाराने आजरा महसूल विभागाने प्रत्येकी दहा हजार अशी एकूण ६०००० रु रक्कम या सहा मुलींच्या नावे पोस्टाच्या बचत खात्यात ठेव म्हणून ठेवली.
तसेच याच किटवडे धनगरवाड्यात शाळेसाठी  इमारत नाही..शाळा एका गोठ्यात खाजगी जागेत भरते हे लक्षात आल्यावर प्रांताधिकारी म्हणून विशेष लक्ष घालून योगायोगाने ५ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांच्या भूसंपादनाच्या आदेशाचे पत्र त्यांनी तहसीलदार व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडे सुपूर्द केले.धनगरवाडा शाळेला शिक्षकदिनी हक्काची जागा मिळवून देऊन खरा न्याय दिला.
                 "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले.." या अपलेपणाच्या वृत्तीने समाजातील दिनदुबळ्या, वंचीत,निराधार ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले आहे अशा लहानसहान मुलांना आपलेसे करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवणे यासाठी स्वतः योगदान देत समाजातील दानशूरवतांची मांदियाळी एकत्र आणून देण्याचे आवाहन करण्याचे काम अधिकारी रूपातला त्यांच्यातला माणूस करत असतो.
               तर कोणत्याही प्रसंगात त्यांच्यातला एक अधिकारी कर्तव्याशी कसा एकनिष्ठ राहतो याचा प्रत्यय या एका उदाहरणावरून येतो.नुकत्याच उदभवलेल्या पूरपरिस्थितीच्या दरम्यान कोल्हापूर येथे जन्मदाता बाप दवाखान्यात उपचारासाठी ऍडमिट होता.पण दवाखान्यात न जाता त्यांचा मुलगा इकडे गारगोटी येथे वास्तव्यास राहून आपले कर्तव्य बजावत होता.बापाची काळजी काळजात होतीच पण पुराच्या संकटात अडकलेल्या असंख्य मायबापांची काळजी घेणं त्याहून त्यांना अधिक महत्वाचं वाटलं.
                   
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा..
कन्या देई ऐसी संत मीराबाई,जनाबाई जैसी" अशी ही पोटाला आलेली चारी भावंडे आहेत.वारकरी संप्रदायाच्या वातावरणात घडलेली...काळ्या मातीच्या जीवावर पोसलेली.
जशी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,मुक्ताई जन्मले तशी  कोंडाजी व निरक्षर पण त्यांनी संस्कारांनी साक्षर केलेली दांपत्याच्या पोटी ही साजेशी ज्ञानवंत,प्रज्ञावंत लेकरं जन्माला आली...आणि ती आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च पदाला पोहीचली.
"इवलेसे रोप लावीयले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी"
या लेकरांनी आपल्या कर्तृत्वाने गगनाला गवसणी घातली आहे.जमिनीवर राहून अवघे आकाश कवेत घेतले आहे.ज्या आईवडिलांनी अंगाखांद्यावर मिरवलं,ज्या मातीवर त्यांची इवलीशी पावलं धडपडली त्या लेकरांनी त्या आईवडिलांचं आणि मातीचं पांग फेडलं. आईवडिलांचे मनात आणि तिथल्या मातीच्या प्रत्येक कणात त्यांच्याविषयीचा अभिमान भरून उरला आहे.
                 खिलारी साहेब ज्यावेळी गावी जातात.त्यावेळी आपल्या माणसांशी एकरूप होतात.. आजही ते शेतात जातात...काम करतात..त्या मातीत मिसळतात...कारण त्या मातीतच हा पिंड घडला आहे...घरात वारकरी संप्रदायाचा वारसा तेवढ्याच भावभक्तीने त्यांनी सुरू ठेवला आहे.गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे, आषाढी वारीकाळात परिसरातील दिंड्याना सहकार्य करणे...अशा कार्यातून भगवंतांची सेवा करण्याचा वसा व वारसा आजही ते आपल्या व्यापातून जोपासत असतात.
           आमचे गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजी अधिकारी व प्रशासकीय सेवेविषयी सांगतात...अधिकाऱ्यांचे प्रकार चार आहेत.पहिला प्रकार सुस्त,दुसरा त्रस्त,तिसरा व्यस्त आणि चौथा मस्त जो चौथा प्रकार आहे तो परिपक्व अधिकाऱ्याचे लक्षण आहे.कारण माहिती,ज्ञान आणि शहाणपणा यांच्या अनुषंगाने आलेली परिपक्वता ही चौथ्या प्रकारात मोडते.  जीवन जगण्याचा प्रक्रियेत व्यक्ती,परिस्थिती, घटना यांच्या सहयोगातून ही परिपक्वता आयुष्यात येत असते.आणि म्हणून उपजतच समाजीकतेचा वसा घेऊन आलेले.जो स्वतःसाठी जगतो तो कधीच मेलेला असतो आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो..असे खऱ्या अर्थाचे जीवन जगणारा आणि परिपक्व असा जबरदस्त अधिकारी म्हणजे आमचे डॉ. संपत खिलारी साहेब.
प्रशासनात दोन PR महत्वाचे असतात.एक म्हणजे public relations  आणि दुसरे person relation अंतर वैयक्तिक संबंध आज समाजाशी संबंध आणि हे संबंध त्याचीच ताकदीची होतात ज्याच्याकडे दोन सद्गुण आहेत.एक म्हणजे निर्भयता आणि दुसरी नम्रता.आणि या सद्गुणांनी समृद्ध असे आपले व्यक्तिमत्त्व आहेच.आणि म्हणून तर समाजाच्या तळागाळापर्यंत आपल्या संवेदनांची नाळ जोडणारा कसदार अधिकारी अशी आपली ओळख आहे.
                    प्रशासनाचा नेमका अर्थ आहे कल्याणकारी राज्य निर्माण करणं आपल्या अस्तित्वानं,सामर्थ्यानं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याच्या आयुष्यात आनंदात जगण्याच्या लायकीची पात्रता निर्माण करणं...आणि ती आपण कराल असा आम्हांला विश्वास आहे.आपली ही यशस्वी वाटचाल अशीच चालू राहो.आणि लवकरच जिल्हाधिकारी रूपातला  अधिकारी आपल्यातून पहायला मिळो...हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...

राम कृष्ण हरी.!!

जय हो..!मंगल हो..!!

किरण सुभाष चव्हाण.
८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...