फॉलोअर

शुक्रवार, ५ जून, २०२०

प्रयोगशील शेती.


प्रयोगशील शेतीमधून आधुनिक पद्धतीने मिळविले जाते भरघोस उत्पादन.
                     
                            श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर मूळ गाव-बेगवडे एक धरणग्रस्त... परंतु शासनाकडून पुनर्वसनातून बामणे सरहद्दीत त्यांना ६६ गुंठे जमीन मिळाली.पेशाने प्राथमिक शिक्षक पण त्यांच्यात दडला आहे एक कुशल शेतकरी.आणि त्यांच्यातल्या शेतकऱ्याने अगदी नियोजन पध्दतीने या  जमिनीत नंदनवन साकारले आहे..६६ गुंठ्यापैकी ४५ गुंठ्यांत ऊसाची लागवड केली आहे.आणि उरलेल्या २० गुंठ्याच्या एका सरळ पट्टीमध्ये शतावरी पीक घेण्याच्या उद्देशाने ३ फूट अंतरावर सऱ्या काढल्या आहेत.शतावरी औषधी वनस्पतीच्या पीकाचा कालावधी साधारण दीड वर्षाचा आहे. त्याच्या मुळकांड्या सरासरी २०० रु किलो दराने विकल्या जातात.पण शतावरी पिकाची लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २९ जानेवारीला आंतरपीक म्हणून TAG-24 (फुले-२४) हे उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले.तीन फूट अंतरावर असलेल्या बोदावर दोन फूट अंतरावर फक्त दोन दाण्यांची टोकणनी केली. एकूण २० गुंठ्यांसाठी ४ किलो भुईमूगाचे दाणे लागले.त्यानंतर मध्ये २ मार्चला त्या भुईमुगाच्या दोन टोकणणीच्यामध्ये शतावरीची लागवड केली.

या शतावरी औषधी वनस्पतींची रोपे खास उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथील 'औषधीय खेती विकास संस्थान' या संस्थेमधून ५०००  रोपे मागवली पैकी ४५०० रोपे लावली  या शतावरी पिकामधून दीड वर्षांनंतर चार लाख रुपये इतक्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.संपूर्ण पिकांसाठी ते आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात.
भुईमुगाच्या पिकासाठी ४ दिवसांच्या अंतराने २ तास पाणी दिले गेले... खत म्हणाल तर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नाही...तर सेंद्रिय व जिवाणू खतांचा वापर केला. आणि बघता बघता चार महिन्यांत भुईमूगाच्या एकेका जाळीने आपल्या भोवतालचा तीन फूट जागा व्यापून घेतला इतकी त्याची भरघोस वाढ झाली.
बोदाच्या टापेपासून तळापर्यंत पसरलेल्या हिरव्याकंच जाळ्या आणि जमिनीला जखडून ठेवलेले ताने...संपूर्ण २० गुंठ्याचा प्लॉट हिरव्यागार भुईमुगाने आच्छादून घेतला.
आपल्या सामान्य भुईमुगाच्या तीन चार जाळ्या समान ती एकच जाळी...४ महिन्याच्या कालावधीत काढनीला येणारे हे पीक सरांनी २५ मे ला या भुईमुगाची काढणी केली..

तर काय आश्चर्य..? एका जाळीला सरासरी १८० ते २५० च्या दरम्यान लगडलेल्या भुईमुगाच्या शेंगा.हिरवीगार वजनदार टपोर शेंगांचे घोसच्या घोस असणारी एकेक जाळी.
अशा २० गुंठ्यांतून तब्बल १२ पोती शेंगांचे उत्पन्न झाले आहे. ४ किलो बियाण्यांतून १२ पोती शेंगा. म्हणजे १ किलो बियाण्यां मागे ३ पोती शेंगा असा या पिकाचा उतारा पडला आहे.
यासाठी एकूण खर्चाचा विचार केला तर १३५ रु प्रमाणे ४ किलो बियाण्यांचे ५४० अधिक जिवाणू खत एकूण साधारण १००० रु खर्च आला. आणि यातून उत्पन्न म्हणाल तर १ क्विंटल शेंगाचा दर ५,५०० एकूण चार क्विंटल शेंगा झाल्या म्हणजे २२००० रु.उत्पन्न फक्त चार महिन्यात मिळाले
 ते ही मुख्यपिकातून नव्हे आंतरपीक घेऊन.
एवढेच नाही तर शेजारी असणारी ऊसाची चार महिन्याची लावण सुद्धा तरारून आली आहे.

त्याचबरोबर शेताच्या सभोवती हापूस आंब्याची सहा,नारळाची सहा,सीताफळ एक अशी झाडे आहेत या झाडांच्या मोहराकडे मधमाशा आकर्षिल्या जाऊन नैसर्गिक अधिवास मिळाल्यामुळे पोळे बनवतात व शेतात राहतात

या मधमाश्यांनी भुईमुग,कारले,काकडी यांच्यावरील विविध फुलांचे नैसर्गिक परागीभवन केल्यामुळे भुईमूग पिकाबरोबर भाजीपाल्या मधूनही जवळपास पाच हजार रुपये चे इतर उत्पादन मिळाले आहे असे येलकर सरांचे म्हणणे आहे.
                       श्री.येलकर सरांना यासाठी धामणे गावचे श्री.प्रकाश रावण सरांचे शेतीविषयक मार्गदर्शन लाभले.या यशाचे सर गमक सांगतात की,आपल्या शेतकरी बांधवांनी योग्य मार्गदर्शन घेऊन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे तसेच अधिकाधिक रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.एकूणच काय तर योग्य मार्गदर्शन... नियोजन,ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर करून आपण कमी खर्चात कमी कालावधीत  चांगले पीक घेऊन चांगला नफा घेऊ शकतो...

खालील व्हिडीओवर क्लीक करा आणि प्रत्यक्ष पहा.
------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर.
मोबा - +917038868508

बुधवार, २७ मे, २०२०

'मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'



'मृत्यूशी कडवी झुंज देऊन मृत्यूवर मात करणारी मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'

                                एक प्राणज्योत...तेवतेय आपल्या नादात.स्वयंस्फूर्तीने उजळवतेय आपला भोवताल.पण अचानक तिच्या अवतीभोवती घोंगावू लागतं ते काळवाऱ्याचं वादळ...ती थरारते.. बिथरते...तिचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होतो त्या वादळाशी...ते वादळ तिला मालवू पहात होतं... पण ती मात्र विझायला तयार नव्हती...पण भयाण काळवाऱ्याच्या वादळात अडकलेली ती ज्योत...हळूहळू क्षीण होत होती.तिच्याभोवतीचा काळोख अधिकच दाट होत होता.पुढचं अंधकार भविष्य कसं लख्ख दिसू लागलं होतं..तो निष्ठुर काळ तिला झुंजवत..छळत होता तिच्या प्राणांसाठी आतुरला होता..प्राण तिच्या कंठाशी आले होते.त्याने पुरता कब्जा केलाच होता. पण आता तिचाही संयम ढळत होता...तिला ही आता स्वतःहून विझू वाटत होतं...पण मुळात ती एकटी नव्हती जीवलगांचे अनेक हात  तिला विझण्यापासून वाचवत होते.त्यांच्यामुळेच तर  विझता विझता सावरून ती पुन्हा उभी ठाकत होती..प्रत्येक श्वासागणिक तिचा संघर्ष ठरलेला.हळूहळू प्रत्येक श्वास अपुरा पडत होता.अपुऱ्या श्वासांविना तिची तडफड होत होती...तरीही जीवाचा आकांत पुकारत होता..."मला जगायचंय...मला माझ्या हक्काचा पुरेपूर श्वास घ्यायचाय"..अखेरपर्यंत झुंजत राहिली...ही झुंज साधीसुधी नव्हती तर ती होती प्रत्यक्ष मृत्यूशी.मृत्यू सतत तिच्या भोवती घोंगावत होता.. पण ती ही प्राणपणाने लढली...आणि अखेर तिने मात केलीच त्याच्यावर.तो तिचा विजय काही साधासुधा नव्हता तर तो होता मृत्युंजय....
आणि जीवनमरणाच्या रंगणागणातील ती विजयी वीरांगना होती अर्थातच कोमल गोडसे-पवार...

                     साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटूंबात २८ डिसेंबर १९९० रोजी कोमलचा जन्म झाला.वडील बजाज कंपनीत नोकरीला होते तर आई साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून.एक मोठा भाऊ.असं चौघांचं छोटेखानी सुखी कुटूंब.तशी परिस्थिती बेताचीच.कोमल एक हसरी खेळकर आईबाबाची लाडकी अशी गोड मुलगी.बोलक्या स्वभावाची,चुणचुणीत आणि हुशारही.शालेय शिक्षण निर्मला कान्व्हेंट स्कुल येथे पूर्ण केलं.त्यानंतर रयत शिक्षण संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली तसेच पुणे विद्यापीठातून एम.ई. सिव्हिल ही पदवी प्राप्त केली.मुळातच तिला  देखण्या रुपाचं वरदान लाभल्यामुळं महाविद्यालयीन काळात आपला अभ्यास सुरू ठेवत तिने विविध सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविले.


२०१३ ते २०१५ या काळात मिस कराड,मिसेस सातारा आणि मिस पुणे असे सौंदर्य स्पर्धेतील मानाचे किताब जिंकले.नुकतीच यशाची अशी गोडी चाखत असताना एक कडू घास लागला.तो म्हणजे ३० जून २०१३ साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आईचं अचानक निधन झालं.हा कोमलसह कुटूंबाला खूप मोठा धक्का होता.


उमलती लेकरं आणि भरला संसार अर्ध्यावर टाकून ती माय निघून गेली.एकीकडे मायेचं छत्र हरपलं त्यात नोकरीतून निवृत्त झालेले वडील,एक भाऊ तो ही शिकत होता अशातच घराची संपूर्ण जबाबदारी कोमलवर आली.
                                    कुटूंबाची आर्थिक घडी सावरणे महत्वाचे होते.त्यामुळं आईच्या दुःखातून सावरत तिने आपलं मन खंबीर केलं आणि सातारा येथील यशदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापन सुरू केले.आईवडिलांनी कष्टातून दिलेलं ज्ञान अशा अडचणींच्या काळात फळाला आलं.आर्थिक भार सगळा तिच्यावर असल्याने सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत सहा.अध्यापक म्हणून काम करून पुन्हा खाजगी शिकवण्या घ्यायच्या..अत्यंत चिकाटीने परिस्थितीचा सामना करत आर्थिक गणिते जुळवण्याची कष्टप्रद वाटचाल सुरू झाली होती...कुटूंबाची करती धरती झालेल्या कोमलने मोठ्या जिद्दीने आईच्या माघारी आपले घर सावरले...त्या बापलेकाची ती जणू मायच झाली होती. आपल्या पित्याला आणि भावाला आधार देत येणारी सगळी आव्हाने ती आता समर्थपणे पेलत होती.
                                   तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारं वय..कॉलेज जीवनातील स्वप्नवत सोनेरी क्षण बेधुंदपणे लुटायचे पण त्याच वयात ती प्रत्येक क्षण आपल्या कुटूंबासाठी वेचत राहिली.  मुलगी उपवर झाली की बापाचं मन काळजीनं आतल्या आत झुरतं.आपल्या घरासाठी जीवाचं रान करणारी लेक.पण तिच्या घराचं काय..? आता तिने लग्न करायचा नवीन संसार थाटायचा..पण हा विचार तिच्या मनात येतच नव्हता...तिने फक्त आपल्या कर्तव्याला वाहून घेतलं होतं.पण बापमन स्वस्थ कसे बसेल...?त्यांनी तिच्या लग्नासाठी तयारी सुरू केली...पण तिला अजून बरंच काही करायचं होतं त्यांच्यासाठी...
                   पण वडिलांच्या आणि नातलगांच्या आग्रहाखातर ती बोहल्यावर चढली.१४ मे २०१५ साली उच्चशिक्षित असणाऱ्या फलटणच्या धीरज गोडसे यांच्याशी ती विवाहबद्ध झाली.

सासरचीही सगळी मंडळी अतिशय प्रेमळ..मनासारखी माणस मिळाली होती.एका नव्या सहजीवनाला सुरुवात झाली.अनेक सुखस्वप्ने खुणावू लागली...संसाराची ती कोवळी वेल नाजूक क्षणांनी नटून थटून नव्या नवलाईने सजलीधजली होती..नवीन घर नवीन माणसं..तोरणा दारी नवी स्वप्नं...नवी आशा...आकांक्षाची झुबर आनंदाने झुलत होती... नुकतीच सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती.कसे तरी चार पाच महिने उलटले नव्याकोऱ्या  संसाराला,हसत्या खेळत्या जीवनाला दृष्ट लागावी तसं झालं.चार महिन्यानंतर अचानक धाप लागायला सुरुवात झाली,बोलताना चालताना धाप लागायची,चक्कर यायची,थकवा जाणवायचा.जेवण जायचं नाही..सुरुवातीला याची कल्पना घरी दिली परंतु नवीन लग्न झालंय असं व्हायचंच, असे मानसिक, शारीरिक बदल होतच असतात अशी त्यांची समजूत झाली होती.तरीसुद्धा उपचारासाठी साताऱ्यातील मोरे नर्सिंग होममध्ये कॅल्शियम, आयर्न रक्त वाढीचे उपचार सुरू केले.आतापर्यंत वयाच्या २५ वर्षापर्यंत कसलाच त्रास नाही,धाप नाही कधी दवाखान्यात ऍडमिट झाली नाही..इतकी शरीरानं धडधाकट.. तब्येतीनं ठणठणीत असणारी मुलगी त्यामुळे अचानक सुरू झालेल्या या त्रास कुणी फारसा मनावर घेतला नाही.त्यात  किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला.त्यामुळे उलट्या व्हायच्या.उपचारांनंतर हा त्रास कमी झाला.पुन्हा कॉलेजला जाणं सुरू झालं.पण एक दिवस कॉलेजमध्ये लेक्चर घेत असतानाच तिला रक्ताची उलटी झाली....लागलीच दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं.

काही तपासण्याअंती कोमलला 'हाय प्रेशर लंग्ज' म्हणजे फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे निदान झाले.आणि साऱ्यांनाच धक्का बसला.तब्येत अधिकच खालावल्याने तिला साताऱ्याहुन पुण्याला रुबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.तिथे डॉ.जगदीश हिरेमठ यांनी उपचार सुरू केले..कोमलच्या साऱ्या तपासण्या केल्या आणि शेवटी आजाराचं निदान झालं..'प्रायमरी पल्पनरी हायपर टेन्शन.'.म्हणजे  फुफ्फुसाचा आजार यामध्ये फुप्फुस निकामी होते.ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी होते आणि ती व्यक्ती कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहते...कोमलला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं...आता धाप खूप वाढली होती..डॉक्टरांनी धीरज यांना सांगितलं की,"कोमल आता काहीच दिवस जगू शकणार आहे..म्हणजे जेमतेम सहा महिने."खरं तर हे न पटणारं होतं.हसतमुख असणारी कोमल क्षणात दुर्धर आजाराने बेडवर आली होती आणि आता काहीच दिवसांची ती सोबतीन होती.पण धीरज यांनी धीर सोडला नाही.या दुर्धर आजारावर मेडिसिन उपलब्ध नव्हती म्हणून ट्रायल मेडिसीनवर ठेवण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस तब्येत अधिकच खालावत होती.



                         ५६ किलोचे वजन झपाट्याने २० किलोने कमी झाले होते.असह्य वेदना होत होत्या..दिवसरात्र रक्ताच्या उलट्या..कफिंग व्हायचं...रात्रीचं अंग काळं-निळं पडायचं..२४ तास ऑक्सिजन लागत होता..तहानलेला जीव जसा पाण्यासाठी व्याकुळ होतो तसं ऑक्सिजनसाठी जीव व्याकुळ व्हायचा..ऑक्सिजन द्या म्हणून ती आकांडतांडव करायची...पाण्याबाहेर काढलेल्या माशाची पाण्याविना तडफड व्हावी तशी ऑक्सिजनशिवाय तिच्या जीवाची तडफड होत होती...तारुण्याच्या उमलत्या वयात आई गेली आणि लागोपाठ आता या असाध्य व्याधीनं ग्रासलं...अशावेळी मनात प्रश्न पडायचा...हे माझ्याच नशिबी का..?  यासाठी मीच का..? पण आता तरी या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती..एकबाजूला धीरजजींचे पराकोटीचे प्रयत्न सुरू होते.आयुर्वेदिक, होमिओपॅथी जे काही पर्याय असतील ते सर्व केले जात होते...पण यश येत नव्हतं..


                    आजाराला आता दीड वर्ष होत आलेलं. जगण्याची कोणतीच आशा आता तरी वाटत नव्हती..आशेचा एकही किरण गवसत नव्हता..प्राणांतिक तळमळ असह्य होत होती..जसं या आजारानं शरीराला ग्रासलं तसं आता नैराश्याने  मनाला ग्रासलं होतं...जगण्याची आशा धूसर वाटत होती..मृत्यू अगदी समीप दिसत होता...अशावेळी मृत्यूने आपल्याला कवटाळण्या पेक्षा आपणच त्याला कवटाळूया म्हणून कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं, सगळी औषधं एकादमात खाऊन टाकली...त्यामुळे तर तब्येत आणखीनच खालावली...परिस्थिती अत्यंत अत्यवस्थ झाली..दुर्दैवाने मृत्यूच्या सापळ्यात आपणहून जीव अडकायचा पण सुदैवाने तसं काही झालं नाही..अशा कठीण प्रसंगात धीरजींनी तिला सांगितलं..."तू एवढी शिकली सवरलेली मुलगी आहेस..तू आजारपणाला कंटाळून आत्महत्या करू नकोस, तर उलट त्या आजाराचा प्रतिकार कर..तू त्याच्याविरुद्ध लढत रहा."... आणि धीरजजींचे ते धीराचे  बोल ऐकून खऱ्या अर्थाने तिला धीर मिळाला.ते बोल मात्र नंतर तीने कायम जपले..तिला लढण्याची हिंमत मिळाली आणि पुन्हा तिने मनाला सावरलं..आपली हार मानली नाही..पण मृत्यूही मागे हटायला तयार नव्हता.
                                         ३ मे २०१७ ला प्रकृती चिंताजनक झाली...

२४ तास ऑक्सिजन सुरू होता.ऑक्सिजनची गरज १ लिटरवरून ११ लिटरवर गेली.डॉक्टरांनी सांगितलं..."परिस्थिती इतकी नाजूक आहे की,आता ती एक दिवसही पुढे जाऊ शकणार नाही. तुमच्या हातात फक्त १% टक्का आहे."...याचा अर्थ मृत्यूने९९% विजय मिळवलाच होता.धीरज यांनी आशा सोडली नाही त्यांनी डॉक्टरांना विचारलं १ टक्क्यासाठी आपल्याकडे कोणता पर्याय असू शकतो...?  त्यावर डॉक्टरांनी यावरती एकच पर्याय सांगितला..तो म्हणजे 'हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण.'आणि अशाप्रकारे जगण्याच्या आशेचा १ टक्का घेऊन ९९ टक्के विजय काबीज केलेल्या मृत्यूशी खऱ्या अर्थाने अखेरचा मुकाबला सुरू झाला.

                         पुढील प्रत्यारोपणाच्या उपचाराकरिता कोमलला एअर एम्ब्युलन्सने चेन्नई येथे आणण्यात आले. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.प्रकृती गंभीर होतीच..जवळपास दीड-दोन वर्षे या आजाराशी झुंज सुरू होती.आता वजन फक्त २० किलो झालं होतं.दररोज ११ लिटर ऑक्सिजन लागत होता. शरीराच्या सर्व हालचाली मंदावल्या होत्या...एकेक अवयव क्षीण होत चाललेले.आणि अशी ही आव्हानात्मक केस तेथील डॉ.संदीप आतावर यांच्या टीमने स्वीकारली.खरं तर हे मोठं आव्हान होतं. मरणाच्या दारात गेलेला जीव परतवून आणायचा होता.पुन्हा सगळ्या तपासण्या केल्या.आणि आणखीन एक धक्कादायक निदान समजलं की,फुप्फुस निकामी झाल्यामुळे हृदय ही निकामी झालं आहे.पण या ही अवस्थेत आशा न सोडता डॉक्टरांनी विश्वासात घेऊन कुटुंबाला सांगितलं की,"आपण आशा ठेवूयात. आपण फुफ्फुस व हृदय अशी एकाचवेळी अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करूया..so we go to the transplant."त्यासाठी कोमलची मानसिकता तयार करण्यासाठी समुपदेशन करण्यात आलं डॉ. संदीप आत्तावर सरांनी कोमलला सांगितलं.."कोमल या आजारावर मात करण्यासाठी ९०% तुझी ईच्छाशक्ती काम करणार आहे आणि बाकीचे १०% मेडिसिन तेंव्हा तुझी जगण्याची इच्छाशक्ती बुलंद ठेव."

आणि कोमलनेही अगदी तशीच मनाची तयारी केली आणि मग सर्जरीचा पुढील प्रवास सुरु झाला...
                                                      पण हे सर्व करत असताना या उपचारासाठी तब्बल पन्नास लाख इतका खर्च येणार होता.आगोदरच इतक्या संकटाचा,दुःखाचा डोंगर त्यात एवढ्या पैशाचा डोंगर उभा करावा लागणार होता.आतापर्यंतच्या उपचारासाठी जवळपास १० लाखापर्यंत खर्च झाला होता.मग एवढे पैसे कसे उभे करायचे...? पण थांबून चालणार नव्हते..वर्तमानपत्र.. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आलं.साताऱ्याने तर आपल्या या लेकीची केस उचलून धरली..साताऱ्यातील सर्व कॉलेज यासाठी पुढे सरसावले...घरच्यांनी क्राऊड फडिंग संकल्पना राबवली..आणि बघता बघता या लेकीसाठी अवघा महाराष्ट्र एकवटला.कानाकोपऱ्यातून मदत जमा होऊ लागली..दानशूरवतांचे हात मदतीला धावले .आणि अवघ्या पंधरा दिवसांत पन्नास लाखाची मदत गोळा झाली.कोमलच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी पैशांबरोबर आशीर्वादही मिळाले.एक आव्हान तरी पूर्ण झालं होतं आता आणखीन एक सर्वात मोठं आव्हान होतं ते अवयवदाता म्हणजे मॅचिंग डोनर भेटणं.डॉक्टरांची टीम पूर्णपणे या कामाला लागली होती पण अजूनही मॅचिंग डोनर भेटत नव्हता...कारण वीस किलो वजन झाल्यामुळे कोमलला आता पिडॅट्रिक डोनर हवा होता. 'पिडॅट्रिक डोनर म्हणजे अवयवदात्याच वय हे २० वर्षांच्या आतील असलेल्या लहान वयाचा डोनर हवा होता.'कारण कोमलचं वजन आता फक्त २० किलो झाले होते..त्यामुळे त्या शरीराला जुळतील असे अवयव हवे होते. अजूनतरी यश मिळत नव्हतं... त्यामुळे हे सारं असह्य होऊन २७ मे च्या दिवशी तिने ठरवलं की,जर मला जर आता नवा श्वास नाही मिळाला तर हा उरलासुरला श्वास ही मी रोखणार आहे, आता हे जीवनच संपवणार आहे..ती पुन्हा ठाम झाली होती...पण सुदैवाने योगायोग असा की त्याच रात्री कळालं.. की केरळमध्ये असा एक तिला मॅचिंग डोनर भेटला आहे
                                        रस्ते अपघातात एका सोळा वर्षांच्या मुलाचे ब्रेनडेड झाले होते आणि त्याच्या आईवडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता...त्यांचा तो एक निर्णय कोमलच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवणारा होता.आणि तसंच झालं.स्वतःचं मुल गमावलं परंतु त्याचे अवयव दान करून दुसऱ्या एका जीवाला जीवदान देण्याचा त्या आईवडीलांचा संकल्प सिद्धीस आला..कारण ते हृदय आणि फुप्फुस दोन्हीं अवयव कोमलला मॅच झाले...आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नांती २८ मे २०१७  ला  जवळजवळ ३० डॉक्टरांच्या टीमने १६ तासांची सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली.कोमलला तीन दिवस पूर्णपणे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलं.आणि चौथ्या दिवशी तिला त्या प्रदीर्घ काळझोपेतून उठवलं..तिने डोळे उघडले..तिच्या आजूबाजूला ते सर्वजण होते ज्यांच्यामुळे आज ती त्यांना डोळेभरुन पहात होती... तिला सांगत होते.."कोमल श्वास घे...आता तुझ्या हक्काचा तू श्वास घे.." आणि कोमलने मोठ्या सायासाने तो नवा कोरा श्वास घेतला... त्या श्वासाने तिला पुनर्जन्म दिला.'काळरात्र होता होता तिच्या आयुष्यात उषकाल झाला होता.' तिची त्या मृत्यूच्या कचाट्यातून सुटका झाली होती... तिने अखेर त्याच्यावर मात केली. जगण्याच्या बुलंद
ईच्छाशक्तीच्या बळावर तिने अखेरपर्यंत कडवी झुंज दिली आणि ती ठरली मृत्यूवर विजय मिळवणारी मृत्यूजंया..


                  जी कोमल स्वतःचा श्वास घेऊ शकत नव्हती.. ती आता स्वतःचा श्वास घेऊ लागली,जी दोन वर्षे बेडवरून खाली उतरू शकत नव्हती..उठून चालू शकत नव्हती.. जी चार भिंतीच्या आत कोंडली गेली होती.तिच्या नजरेला वरचा फक्त फिरणारा सिलिंग फॅन दिसत होता.त्या तुरुंगातून तिची सुटका झाली होती ती आता स्वतः चौफेर फिरण्यास सज्ज झाली होती.. अशी ही कोमल पुढे जाऊन तिने आत स्वतःच वजन वाढवलं, फिजियो थेरपी,जिम, डाएट करून आपली प्रकृतीमध्ये उत्तमप्रकारे सुधारणा केली आणि महाराष्ट्राची लेक सहीसलामत सुखरूपणें महाराष्ट्रात परतली.


                     एकाचवेळी हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाची  महाराष्ट्रातील ही यशस्वी झालेली पहिलीच केस होती.पण असे असले तरी महाराष्ट्रात आजही अशा अनेक कोमल आहेत..जे अजूनही उपचारविना या आजाराने खितपत पडले होते मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरत होते...कोमलला जे स्वतःला प्रश्न पडत होते..मीच का..?आणि मलाच का..? पण ती अशा आजाराशी लढणारी एकटी नव्हती..असे असंख्यजण होते....म्हणून त्या प्रश्नांची उत्तरे तिला आता  खऱ्या अर्थाने सापडली होती.. कारण ती त्यांच्यातली अशी एकटी होती की जिने या आजारावर यशस्वीपणे मात करून आपण या दुर्मिळ आजारातून कसे बाहेर पडू शकतो हे दाखवून दिले होते...ती आता त्यांच्या जगण्याचा एक आशेचा किरण झाली होती."मृत्यू जिंकणार नाही कारण जोपर्यंत मी हारणार नाही." अशा तिच्या जगण्याच्या प्रबळ ईच्छाशक्तीच्या संजीवनीमुळे तिला हे नवजीवन मिळाले होते.


                  मरणाच्या दारातून आपल्या पतीचा प्राण आणणाऱ्या सत्यवानाला जशी पतीनिष्ठ सावित्री पत्नी म्हणून लाभली तशी कोमलसारख्या पत्नीचा जीव मरणाच्या दारातून परत आणणारा आजच्या काळातील हा पत्नीनिष्ठ सत्यवान पती म्हणायचा.कठीण समयात अजिबात धीर सोडला नाही असा धीरजसारखा पती तीला  लाभला हेच तिचे सर्वात मोठे भाग्य.कोमलने हे सारं असह्य झाल्याने आतापर्यंत तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे पुन्हा असे कधी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून तो सतत तिला डोळ्यासमोर ठेवत होता.रात्री झोपताना तिच्या हाताला दोरी बांधून ती आपल्या हाताला बांधून झोपी जाणारा खरा जीवाचा सखासोबती.


                     आईवडीलाप्रमाणे प्रेमाची साऊली देऊन भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे सासूसासरे असा एकूणच सर्व परिवार,नातलग मंडळी.ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाचे अवयवदान करून या लेकीचे प्राण परत आणले...ते तिला पुनर्जन्म
देणारे  तिचे दुसरे आईवडिलच.डॉक्टरांनी तर अक्षरशः तिच्या शरीरात प्राण फुंकले ते तर तिच्या आयुष्यातील जीवदान देणारे देवदूतच.

अवघ्या महाराष्ट्राने या लेकीसाठी भरभरून मदत केली..प्रत्येकांनी शुभकामना,आशीर्वाद दिले...खऱ्या अर्थाने माणुसकी जपली...या सर्वांमुळे आज ती हे दिवस पाहते आहे त्या सर्वांच्या योगदानाच्या जाणीवेतून त्या ऋणाईतले कर्तव्य म्हणून कोमलने पहिलेवहिले पाऊल उचलले ते म्हणजे  प्रथम आपल्यासारखे या आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना या उपचाराची माहिती नाही त्यांना प्रत्यारोपणाविषयी माहिती देणे,त्यांना आपल्या वेदना अवस्था सांगून उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणे... प्रत्यारोपणासाठी प्रोत्साहित करणे,त्यांना समुपदेशन करणे,आपल्या पातळीवर जनजागृती करणे.   
                            आणि त्यानंतर कोमलने जशी मोठ्या जिद्दीने आलेल्या संकटावर मात केली तशी दुसऱ्यांनाही ते बळ मिळावे यासाठी कोमलने २८ डिसेंबर २०१७ साली कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली..

ज्यांचे आयुष्य मृत्यूच्या काळोखाने वेढले आहे त्यांच्यासाठी ही कोमल आता जीवनज्योत बनली...आज तिच्याकडे पाहून असे दुर्धर आजारग्रस्त असलेले २९० रुग्ण पुन्हा नव्याने जगताहेत म्हणजे त्यांची ती जीवनप्रेरणा बनली.या फाउंडेशनच्या माध्यमातून आज हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या रुग्णांना मार्गदर्शन करणे,या उपचारासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,प्री पोस्ट वर्कअप देणे..या उपचारासाठी कुठे जायचं, कोणता दवाखाना चांगला आहे.महत्वाचे म्हणजे लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे इ कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून चालत आहे.या कार्यात पती धीरज व कुटुंबीयांची समर्थ साथ कोमलला लाभत आहे.सध्या  महाराष्ट्राबरोबर इतर राज्य, भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान,दुबई,इराण, युक्रेन अशा परदेशातील रुग्णांना या उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे.संस्थेच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ५०० च्यावर रुग्णांना या गंभीर आजाराच्या उपचाराची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

                                       कोमल स्वतः अवयव प्रत्यारोपण रुग्ण असल्याने प्रत्यारोपनासाठी इतर रुग्णांना धाडस मिळावे,त्यांच्यात जगण्याची आशा व उमेद निर्माण व्हावी या उद्देशाने अनेक मरोथॉन, ट्रेकिंग,पॅराग्लायडिंग यामध्ये सहभागी होऊन आपली शारीरिक क्षमता सिद्ध करून आपण कशात कमी नाही आहोत हे दाखवून देत आहे. अनेक प्रसार माध्यमांतून वेळोवेळी अवयवदानाचे महत्व ती पटवून देत असते.मग त्यामध्ये आकाशवाणी,माय मेडिकल मंत्रा,मुबंईसारख्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती,कॉलेजची नियतकालिके, कंपनी मॅगझीन ,दिवाळी अंक,वृत्तत्रांतून लेख लिहून तसेच आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास शेकडो ठिकाणी जाऊन व्याख्यानाच्या निमित्ताने आपला संघर्षमय जीवनप्रवास उलघडून आपल्या ओघवत्या वाणीने अव्यवदानाचे महत्व पटवून देत असते.आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभागी होऊन तिने आपल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव अधोरेखित केले आहे.
                                फिनिक्स पक्षाने राखेतून उठून जशी उंच भरारी घ्यावी तशी मरणाच्या दारातून परतून पुन्हा जगण्याच्या दिशेने सुरू झालेला प्रवास.माऊली गाथा फिल्म यांनी तिच्या या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित रिबर्थ (पुनर्जन्म) नावाची फिल्म तयार केली आहे.आज कोमल आपल्या कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची अध्यक्षा आहे.तसेच तिला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शारदा सन्मान महाराष्ट्र पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पुरस्कार, प्रेरणास्रोत व्यक्तिमत्त्व पुरस्कार, महीलारत्न पुरस्कार, आदर्श नारी पुरस्कार, झाशीची राणी पुरस्कार, जैन सामाजिक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी तिच्या जगण्याच्या लढाईचा गौरव केला आहे.


                          आजही तिला दररोज २० गोळ्या घ्याव्या लागतात..इथून पुढेही कायम घ्याव्या लागतील.बाहेरचा एकही पदार्थ खाण्याची किंवा बाहेरील पाणी पिण्याची तिला परवानगी नाही..खाण्यापिण्याची ही पथ्ये पाळावीच लागणार आहेत त्याचबरोबर दर महिन्याला रक्ताची चाचणी करून प्रत्यारोपण केलेले हृदय व फुप्फुस यांचे कार्य नीट सुरू आहे का ते पहावे लागते. जगण्याच्या आशा मावळलेल्या असताना१टक्क्याच्या भरवशावर जगण्याच्या प्रबळ ईच्छाशक्तीमुळे आज पूर्ण १००% जगते आहे... इतरांनाही जगण्यास प्रवृत्त करते आहे.
                             माहिती आहे आपल्याला सगळ्यात मोठी संपत्ती कोणती..? हिरे-माणके,सोने-नाणे नव्हे तर ती अनमोल संपत्ती म्हणजे आपली शरीरसंपदा.पण येनकेन कारणाने आपलं आपल्याच शरीराकडे दुर्लक्ष होतं. शरीराच्या एखाद्या अवयवाचं मोल हे अनमोल आहे.निसर्गानं दिलेली ही सर्वात सुदंर अशी भेट आहे.पण किती जणांना याचे महत्व आहे..?.आजच्या धावपळीच्या जीवनात पैशाच्या मागे लागून आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो...रस्त्याने बेफिकिरीने सुसाट वाहन चालवतो..अपघातास कारण ठरतो...विनाकारण नको त्या व्यसनांच्या आहारी जातो...आणि अशाप्रकारे आपल्याला फुकटात मिळालेल्या या शरीर संपत्तीचे आपण नुकसान करून घेतो...दोन पायाची किंमत काय आहे ती पाय नसलेल्या अपंग व्यक्तीला विचारा.. दोन हातांची किंमत हात नसलेल्या व्यक्तीला विचारा...दोन डोळ्यांची किंमत अंध असणाऱ्या व्यक्तीला विचारा...आणि हृदयाची व फुप्फुसाची किंमत काय असते ती आता नव्या हृदयाने...नव्या फुफ्फुसाने.. नवा श्वास घेणाऱ्या कोमलदिदीला विचारा.छोट्या छोट्या कारणावरून आपण जगण्याची लढाईत हार पत्करतो...नव्हे तर संघर्ष करायला विसरतो...मागचा पुढचा विचार न करता भावनेच्या भरात टोकाचं पाऊल उचलतो...आत्महत्या करतो...मरण किती सोपं वाटतं ना आपल्याला...मरण जवळ करायला उशीर लागत नाही पण दाराशी आलेलं मरण दूर ढकलायला किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो..श्वास रोखायला कष्ट पडत नाहीत पण ते श्वास घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते...अशावेळी कोमलदिदीने जगण्यासाठीचा जो संघर्ष केला तो बरंच काही शिकवून जातो.


                               एक व्यक्ती आपल्या अव्यवदानातून आठ जणांना जीवदान देऊ शकते...का नाही आपण आपल्या मरणानंतर कुणाला जीवदान देऊ शकणार..? मरणानंतरही आपण या अवयवदानातून जिवंत राहू शकू.आज आपल्या समाजात असे हजारो बांधव आहेत..कुणाला हृदय..कुणाला फुप्फुस... किडनी हवीय...पण जर आपल्यातून अवयव दात्ता जर पुढे आले तर याच आपल्या बांधवांना पुनर्जन्म मिळू शकतो... अशा अवयवदानातून माणसांमाणसातील माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट करू शकतो. तर चला आपणही असा अवयवदानाचा निर्णय घेऊया आणि कुणाच्या तरी आयुष्याचं सोनं करूया ..जसं आज कोमल दिदीच्या आयुष्याचं सोनं झालं.
                  जय हो..! मंगल हो..!!

               'अवयवदान सर्वश्रेष्ठ दान'
     


खालील व्हिडीओवर क्लिक करा प्रत्यक्ष पहा.
                        
   
                

  ◆ संपर्क-सौ.कोमल गोडसे-पवार         +919503883404

'कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या या लिंकला अवश्य भेट द्या.'
https://www.youtube.com/channel/UCR8zXmTQoiw-_QcB7BkBArQ

 कोमल दिदीने स्वतः बनवलेला वाचक प्रतिक्रिया व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.




मंगळवार दि.१ सप्टेंबर २०२० रोजी या अद्वितीय संघर्षमय कहाणीचा अस्त झाला.कोमलदीदी आपल्याला सोडून गेली.


                  'मृत्युंजया कोमल दीदी...'

काल तर आमच्यात होतीस आणि आज अशी अचानक आम्हांला सोडून गेलीस.?
नाही अजूनही विश्वास बसत..
वादळवाऱ्याशी झुंजणारी पणती अखेर विझली..?
कालपर्यंत तेवत होती...उजळवत होती आपला भोवताल...
किती निखळ, निरागस, स्वछंदीपणे लखाखत होती...
मृत्यूच्या काळ्या छायेत दडलेल्या..चाचपडणाऱ्या जीवाला जगण्याचा प्रकाश दाखवत होती...
किती छळलं ना तुला...किती यातना.. वेदना दिल्या..तरी सहन करीत राहिलीस.
कधी हार मानली नाहीस डगमगली नाहीस.. 
लढत राहिलीस धीरोदात्तपणे.
जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने अखेर मृत्यूवर मात केलीस आणि तू झालीस मृत्युंजया..
जगता जगता अनेकांना  जगण्याची प्रेरणा देत राहिलीस..जीवनप्रेरणा बनून गेलीस.
किती भरभरून जीवन जगत होतीस.
प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत होतीस.
ज्याने तुला अवयवदान केले...
ज्यांच्यामुळे तुला जीवदान मिळाले.
त्यांना क्षणाक्षणाला धन्यवाद देत राहिलीस..
अवयवदानाचे कार्य हे तर तुझ्या जीवनाचे ध्येय बनून गेले.
झपाटून कार्य करत दुर्धरांना मुक्त करणे हेच जीवितकार्य ठरले.
पण माहीती होतं तुला...?
मृत्यू मागून तुझा पाठलाग करतोय..?
मग काय म्हणायचं तुला.
हे दुःख लपवून तु हसत खेळत आनंदाने जगत होतीस.
...अखेर आज त्याने तुला गाठलेच.
आमच्यापासून मृत्यूने दिदी तुला हिरावून घेतले...पण देहाने.
दिदी तुझे विचार...कार्य...प्रेरणा...ऊर्जा कशी हिरावून घेईल तो आमच्यापासून...
दीदी तु कुठेही गेली नाहीस
तु सदैव आमच्या हृदयात जिवंत आहेस आणि पुढेही  राहिशील...चिरंतन.
दिदी तुझे अवयवदानाचे व्रत आम्ही कायम सुरू ठेऊ.
तुझे कार्य प्राणप्रणाने आम्हीं पुढे घेऊन जाऊ...
दीदी...


"कोमलदिदीचा आपल्याला संदेश..."


           "अवयवदान करा...जीव वाचवा."

--------------------------------------------------------
                       
"मी माझा अवयवदानाचा संकल्प केला आहे कोमलदिदीने स्वतः हे अवयवदानाचे प्रमाणपत्र मला सुपूर्द केले आहे...आपणही अवयवदानाचा संकल्प करा."


  
                                    - किरण सुभाष चव्हाण.
                                      मोबा- ८८०६७३७५२८

मंगळवार, १२ मे, २०२०

कोरोनातल्या कविता-'गड्यानों आपला गाव वाचवूया'. -किरण चव्हाण.(पांगिरे)


           'गड्यानों आपला गाव वाचवूया'.

बघताईसा नवं जगामधी काय चाललंया.
आपल्या देशातबी कोरुनानं थैमान घातलया.
परमुलखातनं आता ह्यो आपल्याकडं येतूया.

...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.

दिवसाला हजारानं लाखामधी माणसं मरत्याती.
मोठ्या देशांनीबी या रोगापुढं हात टेकल्याती.
इचार करुन प्रत्येकानं काळजी घेऊया.

...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.

तोंडाला मुसकं घालावंच लागल.
चारचौघात अंतर ठेवावच लागल.
इनाकारण कुठबी फिरायला नगं.
कुठल्याबी गावाला जायला नगं.
जवळच्या पाहुण्यालाबी लांबनच रामराम करूया.

...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.

पोलीसपाटील, सरपंच, कोरोनासमिती.
गावची बघा किती काळजी घेती.
गावच्या येशी साऱ्या बंद केल्याती.
कोण येतंय जातंय त्यांवर पाळत ठेवत्याती.
आपणबी त्यास्नी पुरेपूर सहकार्य करूया.

...तवा गड्यानों आपण आपला गाव वाचवूया.

आता गावाकडं येतील मुबंईपुण्याची लेकरं-बाळं.
तवा त्यास्नी लांबच ठेवावं लागल कोरोनाच्या धोक्यामुळं.
खाण्यापिण्याची,ऱ्हाण्याची येवस्था बाहीरच करावी लागल.
जीवाच्या काळजीसाठी थोडं कठोर व्हावं लागल.
पुन्हा जवळ येण्यासाठी आता लांबच ऱ्हाऊया.

...तवा गड्यानों आपणच  आपला गाव वाचवूया.

लई मोठं संकट हाय खबरदारी घ्यावीच लागल.
बेफिकिरी चालणार न्हाई,न्हाई तर मोठी किंमत मोजावी लागल.
कुणा एकाच्या चुकीमुळं सारं गांव दानीला जायला नगो.
म्हणून एकांनही बिलकुल बेसावध ऱ्हायाला नगो.
पुढचा धोका वळखून आपण आताच सावध होऊया.

...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया.
-----------------------------------------------------                        -किरण सुभाष चव्हाण.
                       मोबा- ८८०६७३७५२८.

सोमवार, ११ मे, २०२०

कोरोनाच्या संकटकाळीन परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात.


'कोरोनाच्या संकटकाळात गरजवंतांना नाम फाउंडेशन,मुरगुड,पांगिरे शिवम परिवाराचा मदतीचा हात.'
               
                      आमच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर लमाण लोकांची पालं उतरली आहेत..एकूण पाच पालांमध्ये सात कुटुंब आहेत. आम्हांला माहिती समजली की,त्यांच्याकडील शिधा संपत आलेला आहे..त्यांना मदतीची गरज आहे. लागलीच आम्हीं त्या पालावर जाऊन त्या लोकांची भेट घेतली.. महिला आपल्या पालासमोर हताश होऊन बसलेल्या होत्या.पुरुष मंडळी खालच्या शिवारात एकेठिकाणी हातावर हात बांधून बसलेली.त्या महिलांचे चिंताक्रांत आणि त्यांच्या पुढ्यातील मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्यावरून सगळी परिस्थितीत लक्षात येत होती..तरीही आम्हीं त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली... साधारण महिनाभरापूर्वी हसूर येथून धान्य व किराणा स्वरूपात मदत झाली होती तसेच पांगिरे स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ देण्यात आले होते..भुदरगड प्रतिष्ठानतर्फेही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. पण तो शिधा संपत आला होता..आणि आता कसेतरी दोन दिवस पुरतील इतकेच साहित्य होते... दिवसातून एकदाच जेवण रांधत होते..राबणारे हात पण हातावर हात बांधून बसण्याची वेळ आलेली होती...या हातावरच्या पोटांना कोरोनामुळे चांगलीच झळ बसलेली होती....काम असेल तर दाम पण आता कामच नाही तर दाम कुठून मिळणार..? सारी कर्ती पुरुषमंडळी हताश होऊन बसलेली.बायकामुलांचे दिनवाणे चेहरे त्यांना पाहवत नसावेत पण काहीच करू शकत नव्हते..आपले गाव गाठावे पण ते ही शक्य नव्हते...त्यांचा नाईलाज होता.त्या महिलांनी  त्या एका कोपऱ्यातील आज्जीविषयी सांगितले   .तिच्या नात्यातली दोन माणसे वारली आहेत यामध्ये तिचा पंधरा वर्षांचा नातू आहे.विजापूराकडे त्यांचे गाव आहे पण सध्याच्या परिस्थितीत तिकडे जाता येत नाही. बिचारी रात्रंदिवस रडते आहे.कोपऱ्यातील  पालाजवळ आम्हीं गेलो.आज्जीचा डबडबलेल्या डोळ्यांचा व्याकुळ चेहरा बघितला आणि आम्हांला गहिवरून आलं..कोणत्या शब्दांनी तिचे सांत्वन करावे...एवढ्या मोठ्या दुःखाला ते अपुरे पडत होते..आज्जीने नुकतंच तीन दगडांच्या चुलीवर तवा ठेवलेला होता एक गुळगुळीत फरशीवर दोन तीन चपाती होतील इतका पीठाचा गोळा मळून ठेवला होता.दुःखाला मागं सारून तिनं कसंतरी चुलीसमोर ठाण मांडलं होतं.अखेर पोटची भूक त्या दुःखावर मात करत होती...
                   तिथूनच आमच्या सोमनाथ माऊलींना फोन केला.इथल्या परिस्थितीची सर्व माहिती देताच माऊलींनी धाण्याचे किट उपलब्ध करून देण्याची हमी दिली...आणि लागलीच तीन दिवसांनंतर
शिवम परिवार मुरगुड विभागाने हे किट उपलब्ध करून दिल्यानंतर आम्हीं ते या पाच पालातील कुटूंबांपर्यंत शिधा साहित्य पोहोच केले.एक क्षण तर असा की,बिस्किटांच्या पुड्याची पिशवी त्या लहान मुलांच्या हातात दिल्यानंतर अगदी आनंदाने नाचत त्या चमूने आमच्या पुढ्यातच ते पुडे फोडले.त्या निरागस चेहऱ्यावरचा ते आनंदी भाव पाहून आम्हांला पराकोटीचे समाधान लाभले.
                   या ही अगोदर शिवम परिवार मुरगुड विभागाने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आलेली ११ किट उपलब्ध करून दिली. ती ११ व शिवम परिवार पांगिरेच्या वतीने ७ अशा एकूण १८ किटचे वाटप नागणवाडी येथील दोन व पांगिरे गावातील १६ अशा अत्यंत गरीब व गरजू कुटूंबाना त्या किटचे वाटप करण्यात आले...
             गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांजींची प्रेरणा सदैव आमच्या हृदयस्थळी असतेच तसेच शिवम परिवार मुरगुड विभाग आमच्या पांगिरे शिवम परिवाराच्या थोरल्या भावासारखी भूमिका पार पाडत असतो...वेळोवेळी मुरगुड विभागाकडून कार्यप्रेरणा व पाठबळ घेऊन आमची वाटचाल सुरू आहे....नाम फाउंडेशन...शिवम परिवार मुरगुड विभाग तसेच या कार्यात आमचे सामाजिक कार्यकर्ते शिवम साधक श्री सागर गुरव व आकाश पाटील यांची मोलाची साथ लाभली या सर्वांच्यामुळे आताच्या संकटकाळीन परिस्थितीत या गरजवंतापर्यंत मदत पोहोचवण्याचे सारथ्य पार पाडण्याचे भाग्य आम्हांला लाभले याबद्दल..पांगिरे शिवम परिवाराकडून या
सर्वांचे धन्यवाद...

यानिमित्ताने समाजातील थोर मनांच्या दानवतांना दत्ता हलगीसकरांच्या या कवितेतून मला सांगायचं आहे...
  'ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत.
 ज्यांचे सूर जुळून आलेत* *त्यांनी दोन गाणी गावीत
आभाळाएवढी ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे आणि मातीत मळले जीवन ज्यांचे त्यांना उचलून वर घ्यावे...
हीच खरी वेळ आहे देण्याची....आज या ओळी खऱ्या अर्थाने जगण्याची ..आपल्या गावात,आजूबाजूला जी गरीब,गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या मदतीचा एक हात पोहोचावा..आपल्या घासातीत एक घास त्यांच्याही मुखी लागावा...
हीच अपेक्षा..

 'जय हो मंगल हो'...!!

शिवम साधक- किरण सुभाष चव्हाण.
शिवम परिवार पांगिरे.

रविवार, १० मे, २०२०

कविता- 'सलाम तुमच्या कार्याला'.कोरोना लढाईतील योध्याप्रति. -किरण चव्हाण.(पांगिरे)


'सलाम तुमच्या कार्याला'

तुमच्या कार्याचा आम्हांला आहे खूप खूप अभिमान.
तन-मन अर्पण करून तुम्हीं जपता आहात समाजभान

कर्तव्याला बांधील राहून तुम्हीं वाहून घेतले सेवेसाठी.
कर्तव्याचा प्रत्येक क्षण तुमचा जनतेच्या कल्याणासाठी.

डॉक्टर,परिचारिका रात्रंदिवस जपताहेत जीवांची सुरक्षितता.
उपचार,काळजी,सेवा करणारे तुम्हीचं आमचे रक्षणकर्ता.

नियमांचे कठोर पालन करण्या नेहमी पोलिसांची खबरदारी.
नियम जो पाळणार नाही त्याची मोडून काढतात दादागिरी.

कायदा-सुव्यवस्था बळकट करण्या तुम्हीं कार्यतत्पर असता.
उल्लंघन करील जो कोणी त्यास खाकीचा धाक दाखवता..

सफाई कामगार,अधिकारी,कर्मचारी
कोरोनाची ही लढाई प्राणपणाने लढता आहात.
रणांगणावरचे आमचे शूर योद्धे तुम्हीं शोभता आहात.

देवळात देव नाही आमचा तो तर आहे तुमच्या सर्वांच्या रुपात.
अखंड काळजी वाहता आहात कारण आम्ही रहावं सुखात.

स्वतःच्या जीवलगांना दूर लोटून तुम्हीं आमचा जीव वाचवता आहात.
आम्हीं घरी सुरक्षित रहावं  म्हणून जिवावरची जोखीम पत्करता आहात.

आले जसे हे संकट तसे निघूनही जाईल हे पण दिवस जातील.
पण खरंच तुमच्यासारखे लढवये आमच्या सदैव स्मरणात राहतील..

मात करूच आपण संकटावर पण दाद आहे तुम्हीं दाखवलेल्या शौर्याला.
कोरोनाच्या लढाईतील हिंमतबाज बहाद्दूर योद्धे सलाम तुमच्या कार्याला.

------------------------------------------------------
                       -किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
                        मोबा-८८०६७३७५२८.

शनिवार, ९ मे, २०२०

कविता- 'आमच्या गावाला जाऊ द्या.'...किरण चव्हाण.(पांगिरे)


        'आमच्या गावाला जाऊ द्या.'

आसला कसला त्यो कुठंन कुरुना आला.
जिंदगीचा साऱ्या खेळ खडूंबा झाला.

पोटासाठी आम्हीं माणसं परमुलखातून आलो.
पॉट तर उपाशीच वर भिकारी झालो.

दिनरात दगडा मातीसंग झट्ट दियाचं.
तवा कुठं पोटाला पोटभर खायाचं.

आता सगळंच बंद झालया हाताला मिळना काम.
काम न्हाई तर आम्हांला कोण बरं दिल दाम..

रेड्यासारखं गडी आमचं,हातावर हात बांधून बसलं.
बायांनी शिजवायचं काय आणायचं तरी कुठलं.?

पोटाची भूक ती आम्हीं कशी तरी आवरू.
पर कसं ऱ्हाईल वं उपाशी आमचं   नकाडं लेकरू.

रक्ताच्या नात्यातली घरची दोन माणसं मेली.
नाही जाता आलं गावाला गोतावळ्या माघारीच नेली.

कायली व्हती नुसती जीवाची कायबी कळना.
डोळ्याची धार आता तुटता तुटना.

आणि काय वाट्याला यायचं हुतं लई भोग भोगलं.
असं जिण्यापरीस वाटतं मराण लई चांगलं.

गावाकडं जायाचं कसं वाट गवसना.
आणि किती दिस सोसायचं आता राहवना.

कुरुनामुळ आलं एकदासं मराण तरी येऊ द्या.
पर पयल आम्हांस्नी आमच्या गावाला जाऊ द्या..

----------------------------------------------
              - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
                मोबा-८८०६७३७५२८.

रविवार, २६ एप्रिल, २०२०

कोरोना गीत- कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...किरण चव्हाण.(पांगिरे)


(आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं...या चालीवर)
----------------------------------------------
                कोरोना गीत...
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...

आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...(कोरस)...!!धृ!!

समजून घे तू या कोरोनाचा धोका
कुठं कसा पसरलं नाही तो भरोसा
गाफील तुम्हीं राहू नका,सावध असा रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...!!१!!

साऱ्या जगामधी त्यानं थैमान घातलया,
माणसाच्या जीवासंग खेळ खेळतुया
मरण झालंय स्वस्त इथं भान असू द्या रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!२!!

तरी तुला कसं....कळना माणसा..?
फिरतोस जिथं तिथं वाचशील कसा..?
नको येड्या फिरू कुठं घरी थांबूया रं..
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!३!!

देव आपुला रं आता देवळात नाही
डॉक्टर,नर्स,पोलिस तोच, काळजी आमुची वाही
नको होऊ कृतघ्न तू त्यांचे जाण उपकार
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!४!!

नको घाबरू तू नको सोडू आशा
दूर होईल संकट मिळल जीवाला दिलासा..
कोरोनावर मात करूया  पुढं जाऊया रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!५!!
----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.
मोबा-८८०६७३७५२८.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

'गावकुसातील कथा' -'इस्वासघात' - किरण चव्हाण. (पांगिरे)

           

'इस्वासघात'

                                सात वरसाची आसल तवा गळ्यात माळ पडली.एक सवतर भण आदीच या घरात दिली व्हती.आणि आता दोघी सख्खा भणी सख्या जावा म्हणून अशा मिळून तिघी भणी एकाच घरात नांदणार व्हत्या.आडमुठ्या तिघी एकाच घरात कशा द्यायच्या...? पानोठ्यावरनं तिघीनी पाणी कसं आणायचं..? म्हणून.. दोघा पाहुण्यांस्नी कोडं पडलं.मग काय नवरीच्या बापानं मंडपात गायच आणली आणि एक आगुदरच दिल्याली लेक, आता दोघी सख्या भणी आणि चवथी गाय अशी तडजोड करून घर भरणी करून दिली. सखू आणि शारु सख्या भणी आणि मालू सवतर भण सख्या जावा म्हणून नांदायला लागल्या...सखु रंगानं काळी आणि शारु तिच्यापरास उजवी व्हती,रंगानं पण गोरी.साताप्पा मुंबईत कामाला.. त्यामुळं राहणीमान जरा शहरी..थोरला भाऊ गावाकडं शेतीभाती बघायचा. धाकटा साताप्पा नवरा म्हणून एकटाच नवऱ्या बघायला आला..थोरला आलाच नाही त्यानं सांगूनच टाकल्यालं "आप्पा तू एकटाच जा पोरगी बघायला..मी आदीच एकदा बघितल्यात ती काळी हाय ती थोरली मी करून घेतो..नी धाकटी गोरी हाय ती तू करून घे.." अशी सगळी गंमत आणि मग सख्या बहिणीला बघायला एकच नवरदेव आला...
                          शारु कवळी पोर सात वरसाची.साताप्पा कवळ्या मिसरूटाचा सतरा आठरा वरसाचा.संसार सुरू झाला.नव्याच नऊ दिस सरलं आणि नव्याकोऱ्या कवळ्या नवरीला मागं ठेऊन साताप्पा पोटासाठी मुंबईला आला.पिल्यास्टीकच्या पिशव्या तयार करण्याऱ्या कारखान्यात काम करत व्हता.खेळकर पोरसवदा वयाची शारू.गळ्यात काळ्यामण्याचं दोरलं आलं. कपाळाला कुकू ल्याचं.अंगणात परसात खेळायचं बागडायचं,जेवणापाण्यानं खेळायचं वय पर चुलीम्होरं बसून जेवाण करायचं.. थोरल्या माणसानी वाढायचं.. आणि मग शेवटाला नकाड्या पोटाच्या मोठ्या भुकंला चार घास पोटात ढकलायचं.चिमुरड्या हातात लुगडी मावायची नाहीत खरं ती चोळायची धुवायची.अगदी धाकल्या वयात ही प्रपंचाची जबाबदारी तिच्यावर आली.तरी थोरली जाऊ म्हणून सवतर भण नी तिच्या पाठीवरची सखी भण व्हती म्हणून जरा त्या दोघीजणी सांभाळून घ्यायच्या...पर एकीन नांदनं जास्त काळ टिकलं न्हाई.
                        पुढं पुढं भावाभावांनी येगळं घेतलं..आणि आता तिच्या एकटीवर सगळी जबाबदारी  पडली.त्यात नवरा जवळ न्हाई..मुंबईला घेऊन जायाचं जायाचं म्हणता खरं किती दिस झालं. म्हणं तिथं त्येजाचं मेळ लागत नव्हता..तवा बायको आणल्यावर खोलीभाडं.. भांडीकुंडी.. प्रपंचाला काय एक लागतंय मुंबईसारख्या नगरीत आता नवीन संसार उभा करायचा एवढं सोपं हाय का..?...त्यात पगार तुटपुंजा. म्हणून त्यो टाळत व्हता...पर इकडं शारूचा जीव लई तळमळायचा.. आपल्या माणसासंग असल्यालं कसं..? इथं कितीबी केलं तरी सख्या भणी असल्या म्हणून काय झालं..?  त्येंच्या त्यासनी प्रपंचा हायच की,किती म्हणून त्या ध्यान देणार तरीबी अडीनडीला त्येंचाच आधार.जवा कवा नवरा यायचा तवा तिला डोंगराएवढा आधार वाटायचा.
                              अशीच वरसं मागं सरली.नेणती शालू आता जाणती झाली.डुईवर पदर आला.आता साऱ्याचा अंदाज गावला हुता,प्रपंचात सराईत झाली व्हती.नवरा यायचा मुंबईसनं धा-पंधरा दिस ऱ्हायचा.येताना पेटीतनं कायबाय आणायचा...नवी जुनी कापडं चोपडं एखादं अंगरखा-पॅन्ट गल्लीतल्या सातुमाला...भैरूमाला हौसनं द्याचा..या घडीला आला ते काय येगळच घिवून. हेच्या पेटीत दारूचं मोठं दोन-तीन तुंबं.शारूनं ते बघितलंबी,म्हंजी आता नवऱ्याला दारूची लत लागली म्हणायची..थोरल्या भावांच्या माघारी चोरूमारून प्यायचा..हे बघून शारू थिजून जायची.काय बोलावं नी कुणाला सांगावं आपलंच दात नी आपलंच व्हट.. मुकाट्यानं ती सगळं बघत व्हती.बहिणी जिच्या तिच्या संसारात चांगल्या गुतल्या व्हत्या..त्येंच्या पोटाला दोन तीन लेकरं व्हती...शारूलाबी दिस गेल्यालं पहिल्यानं गरवार व्हती.पर देवाच्या मनात काय व्हतं कुणास ठाऊक..? तोंडाचा घास मुखापतोर यावा आणि तो काढून घ्यावा तसं झालं.नुकताच जलामल्याला बाळराजा देवानं काढून घेतला.बाळंतपणात मुल दगावलं.नऊ महिनं पोटात जीवापाड जपल्याला गोळा मातीआड करताना तिज तिला काय झालं आसल इचारच न केल्याला बरा.नशिबाचा भोग म्हणायचा पहिल्यानं एवढं साजरं पॉर पोटाला  जलामलं खरं व्हट्यातन काढून घेतलं.जमोलभर काळजाला डाग पडला.
                               काळजाचा तुकडा गेला जखम तशीच वली व्हती एक वरीस झालं नी दुसऱ्या डाव ऱ्हायलं. या येळला तिनं लई नवासपाणी केलं.जिथं तिथं मागून घेतलं.लेकरू सहीसलामत जलमू दे.. जगू दे.आणि तसंच झालं...साजरी लेक जलामली...बाळ तरी ठणठणीत निपाजलं.तरी त्याला लई काळीजमाया करून तळहाताच्या फोडागत जीवापाड जपलं.जवा दुसरं मुलं जलामल तवा कुठं पयल्या वल्या जखमवर खपली धरली...या बाळाच्या उसाभरीत त्ये दुःख इसरून गेली...आता तिच्या जीवाला आनंद झाला..पर त्या आनंदाला विरझान लागावं ,भरल्या दुधात मिठाचा खडा पडावा जितनी तसं...आता कुठं सगळं जितल्या तिथं सगळं बेस चालल्यालं.पर तिच्या आदीची भन सखु..तिला कसला आजार झाला त्यो मागं हटायचं नावच न्हाई.आजार लईच बळावत गेला.जगती का ऱ्हाती अशी तिची गत झाली.म्हणं डाक्टर म्हणत व्हतं..'कॅन्सर का काय तसला आजार तिला झालाय आता ती यातन टिकणार न्हाय.' आणि खरंचबी धाकलं पॉर आम्याला व्हतं आणि बापडीन पलांग मारली.तीन नकानकाडी पोरं मागं ठेऊन बिचारी गेली.शारूचाबी आधार गेला.धाकली भन म्हणून तिनं लई सांभाळ करून घेतला.जाऊ असून कधी कुठल्या गोष्टीवरनं भांडलीझडली न्हाई..थोरली सवतर भन व्हती..किती केलं तरी सवतरच ती सवतीसारखीच वागायची पण या आक्काची गोष्टचं न्यारी व्हती...आईइना पोरं पोरकी झाली.खरं म्हणत्यात नवं 'माय मरो नी मावशी उरो.' भणीची लेकरं ती आपलीच समजून सांभाळ करू लागली.भणीला पहिली लेक व्हती तरीबी धा वरसाची  जरा जाणतीच व्हती शारुन तिला चुलीम्होरं बसताना जवळ घेऊन बसायची जेवणातली एकेक गोष्ट शिकवायची .पोरभी चुणचुणीत लागलीच मावशीच्या हाताखाली सारं तिनं शिकून घेतलं..आता ती सवत्या चुलीवर जेवाणबी करू लागली. घरातली भांड्यांची मांडामांड करू लागली.तरी मावशीची सारखी नदार असायचीच.कमीजादाला ती जातीनं ध्यान द्यायची. पोरबी हुशार घरातली पडल ती काम हौसनं करायची...तसं तिला मावशीनं मडवलंच व्हतं.माय माघारी पोरीनं सगळी जबाबदारी शिरावर घेतली. शारुचा टांगणीला लागल्याला जीव जरा हलका झाला.
                              निदान दोन चार महिन्यातन साताप्पाची एकादंरी फेरी गावाकडं व्हायची.पर अलीकडं गडी वरसातनं इकदाचं यायचा.एकुलती एक पोर खरं आपरुबाईनं मिठाईचा पुडा कपडालत्ता आणील म्हटलं तर ह्येच्या पेटीत आता नुसतं दारूचं तुंबं. गडी एकदम बिघडल्यासाराच झालता...बायकोसंग सळ बोलायचं न्हाई..का कुणासंग बोलायचं न्हाई..आपल्याचं नादात.पोरीलाबी गोडीन जवळ घिऊन आपरुवाई करायचा न्हाई...आता ह्येच्या वागण्याला कुणी काय बोलावं नी कुणी समजून सांगावं..मुंबईसारख्या शरसिटीला ऱ्हाणारा माणूस..चांगल्याचुंगल्या माणसात वावरणारा..आता इकडच्या अडाणी माणसांनी काय सांगावं.?..शारुन तरी डोक्याला हातच लावला.बाई आतल्या आत खचून गेली.आता कुठं संसाराला खरी सुरुवात झाल्याली खरं ह्यो माणूस काय धड वागत नव्हता.कसं व्हायचं म्होरं..? आता साताप्पा गावाकडं इल त्या येळला अशीच गत...आता बायकोवर हातबी उगरायचा,मारझोड करायचा..गावाकडं आल्यावर ह्येला पैसं दे त्येला पैसं दे आसं करत पैसं उधळून परत जातावक्ती ह्येज्या खिशात एक रुपयबी ऱ्हायाचा न्हाई.. शेवटाला बायकोनं लोकाच्यात मजुरीला जाऊन शेपाचशे घेऊन ह्येच्या हातात ठेवायचं आणि मग त्या पैशांवर त्यानं मुंबई गाठायची...बोलण्या चालण्याला चांगला वागणारा शांत गडी असा कसा काय एकाएकी उधाळला.. वाकडं वागाय लागला याचं कोडं सगळ्यास्नी पडलं व्हतं.. आता ते कसं उमजायचं..?
                             साताप्पा ज्या पिशव्यांच्या कारखान्यात कामाला व्हता.तिथंच एक बाई कामाला व्हती.दोघजण एकाच ठिकाणी कामाला..बोलता बोलता वळखीन वळख वाढत गेली...हळूहळू जोडी जुळत गेली..एकमेकांसंग खाणं-फिरणं वाढतच गेलं.. त्या बाईबरोबर साताप्पाचं सुत जुळालं.. आणि एकदिस गोष्टी लग्नापतोर येऊन ठेपल्या...एक दिस बाईनं ईचारलंच..."तुमचं लगीन झालं न्हाई नवं तर आपुन लगीन करूया."  गड्यानं काय उत्तर द्यावं..? लग्नाची एक बाई घरात असताना एवढंच नवं पोटाला एक पोरगीबी असताना गडी एकदम साफ खोटं बोलला..."न्हाई.. न्हाई..माझं लगीन झालं न्हाई.." तशी बाईन चांगली दमदाटीत सांगितलं "बघा हं नंतर खोटं ठरशीला मी घरात सांगून सवरून तुमच्याशी लगीन करणार हाय...खोटंबिटं ठरलं तर माझं भाऊ लई वांड हायती." पर रुपाला भाळल्याला गडी...वाघाला सावज आणि बापयाला बाईचा ऐवज बघून मन आवरतंय व्हय..ते तयारीतच आसतय हेरायला..साताप्पानं बिलकुल मागचा म्होरचा इचार केला न्हाई..आणि लगीन झालंच न्हाई म्हणून सपशेल थाप मारली.एकदासं लगीन करून घेतलं. लगीन केलं त्ये गड्याचं गावाकडं यायचं नांव न्हाई.बायको मुलाची याद न्हाई..की मागच्या गोतावळ्याचं भान न्हाई.का कसला निरोप मागारी न्हाई.इकडं शारूचा जीव मातूर नवऱ्यासाठी खाली वर व्हयाचा,जीवाला बोचणी लागून ऱ्हायल्याली...कुणाकुणाकडणं किती येळला निरोप धाडलं.. पर मागं उत्तर काय न्हाई...पर पाण्यात हागल्यालं कधी ना कधी वर येतंयच...आणि एकदिस मागं कळालं साताप्पानं दुसरं लगीन करून घेतलं.शारूच्या काळजालाच घरं पडली..ध्यायीदिशा रडली...नशिबाचा भोग म्हणून मागं सारून पुढं चालली..जवापासून तिला नवऱ्याचं ह्यो कारनामा समजला तवापासून मग तिनं त्येची आशा सोडून दिली.
                                गडी बाईच्या शहरी रुपाला भाळला तिच्याबरोबर संसार थाटला  नी गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या भाबड्या बाईच्या संसाराचा डाव अर्ध्यावर सोडला.साताप्पा आता आपल्या संसारात रंगला..खर इकडं शारूच्या संसाराचा बेरंग झाला.ती मातूर पोरीकडं बघून ती दिस काढू लागली..एक शेळी व्हती दुसऱ्याच्या बांधला जाऊन मोलमजुरी करून खावू लागली..कुठली अवदसा सुचली आणि सोन्यासारख्या संसाराची या बापयानं वाट लावली..सोन्याची सूरी चांगली दिसती म्हणून पोटात खवुन घ्यायची काय..? मांडवावरचा चढता येल आपल्याच हातानं मोडायची काय गरज व्हती..? अशीच काही वरसं मागं सरली आणि एक दिस साताप्पा गावाकडं आला.या येळला गडी आला खरं त्याचा रंग न्याराच व्हता.वागण्यात लई मऊपणा व्हता.जेवढ्याला तेवढंच कुणासंगबी बोलायचं.नाही तरी संबंध दिसभर आपल्याच नादात..दारू तेवढी हु म्हणून ढोसायचा…कधी घरात एकटाच असला की,डोळ्यांतन टीपं गाळायचा... काय झालं हुतं त्याज त्याला माहित...बायकोच्या नजरला नजर द्यायलाबी लाजायचा...रातीच्याला दारू पिला की,सारखा नुसता रडत असायचा..बायकोनबी राचं झोपतावक्ती खूपदा ताडलं...
"काय झालं वं.. का डोळ्यात पाणी आणताईसा सारखं." पर एका शब्दानं त्याला उत्तर देता आलं न्हाई..
महिना झालं उद्या जायचं करत करत म्होरं चार दिस ढकललं..जायाला मनच हुईना आता उद्या मुबंईला जायचं तरी जाऊ वाटना... तरी जड अंतःकरणानं आणि भरल्या डोळ्यानं गडी बाहेर पडला...
                            हातचं सोडून पळत्याच्या मागं लागलं की आसच हुयाचं.रूपावर भाळला..लगीन केला.. पोटाला तीन पोरं झाली..आता संसारालाबी कित्येक वरसं झाली.खोटं जास्त दिस न्हाई लपून ऱ्हाईत.दुसऱ्या लग्नाचा खोटेपणा त्या साध्याभोळ्या बायकोपाशी पचला खरा म्हणून का या बायकोपाशी पचतोय..जवापासून बायकोला त्याच्या मागच्या बायकोमुलाचा सुगावा लागला व्हता तवापासून ही सोन्याची सुरी पोटात रुतत व्हती..प्रपंचात सन्यादान नव्हतं. हरेक येळला खटका उडायचा.सारखी घालून पाडून बोलायची.. आपल्या भावांची धमकी द्यायची.आता बोलायची सोय नव्हती...गावाकडंची बायको मुंबईला येताशेवटी गाडीउताऱ्याला कामाची मजुरी हातात द्यायची आणि हिथ राबराब राबून महिन्याशेवटी या बाईच्या हातात मजुरी द्यायची पाळी यायची..जिथं किंमत व्हती तिथं किंमत दिली न्हाई,आणि जिथं किंमत द्यायला गेला तिथं किंमत ऱ्हायली न्हाई..आता समदं खरं खोटं त्येला कळाल्यालं...पण उपेग नव्हता...
                            गावची माती...माणसं.. बायको-लेकीची वढ मनाला लागायची पर इथल्या बायकोम्होर काय चालायचं न्हाई..गावाकडचं नाव जरी काढलं तरी बायको जळायची... गडी बैलासारखा खाल मान घालून गप बसायचा...गावाकडं जायाला मन उचल खायाचं बायकोपुढं इलाज चालायचा न्हाई..फार कुचंबना व्हायची...आता त्येला आठवत व्हतं तसं डोळ्याला गळती लागायची..कवळ्या कपाळावर कुकू लिवून शारु बायको म्हणून आली..आणि प्रपंचाला सुरुवात झाली..नवरा मुंबईला हाय म्हणून कसली आशा दावली न्हाई का कसला जिगरहाट केला न्हाई..चारचौघ्या पोरीतनी खेळायचं वय पर कवळ्यापणात चुल फुकायची.नी..प्रपंचाची जबाबदारी शिरावर आली.मागं हटली न्हाई..नवऱ्यामागारी जिद्दीनं संसार केला...पर नवऱ्याला ही आसली आवदसा सुचली.बाईनं पतीव्रता म्हणून ऱ्हायाचं आणि बापयानं मुलखात शेण खायचं ही कसली रित म्हणायची...बायकोपोरीला आस उघड्यावर टाकून नवीन संसार थाटला...त्यांचा काय गुन्हा व्हता..? पण खोट्यानं वागणं न्हाई जास्त दिस टिगत..या जन्मात पाप करायचं आणि पुढच्या जन्मी फेडायचं आता आसं ऱ्हायलं न्हाई.. इथंच पाप करायचं आणि इथंच फेडायचं.
                                        साताप्पाला कळून चुकलं त्यानं गावाकडच्या सोन्यासारख्या सध्याभोळ्या बायकोचा इस्वासघात केला तिचा कसलाच इचार न करता दुसरं लगीन केलं...त्या निष्पाप मायलेकीच्या भवितव्याचं काय..?आता त्याचं डोळं उघडल्याल.पण येळ निघून गेल्याली.मातूर अशा इचारांनी त्यानं कच खाली...जीवाला लावून घेतलं.दारूच्या बाटलीत सगळं दुःख बुडीवलं.निवळ दारून दारू अंगात भिनली.एक दिसबी नशेला आराम न्हाई..आणि शेवटी चालता बोलता गडी हातरुणाला आडवा झाला...अंगाचा लोळागोळा व्हवून पडला...खाणंपिणं कमी झालं...तरवणी पाण्यावर जीवाचा हवाला...आकिरला वाचा गेली...तीन महिनं झालं...अजिबात बोलता ईत नव्हतं जे काय बोलायचं ते कागदावर ल्यायचं नी दावायचं...त्या दिशी एक कागुद बायकोच्या हातावर ठेवला..त्यात लिल्याली शेवटची ईच्छा व्हती..गावाकडच्या गोतावळ्याला बलवून घ्या पर त्यात गावाकडच्या बायकोचा उल्लेख नव्हता...आता कुठल्या तोंडानं तिला बलवायची...मनाला लाज वाटून ऱ्हायली व्हती...पश्चातापानं डोळं भरून उलटत व्हतं...आता जे केलं ते नजरला दिसत व्हतं.गुन्हा केला आता त्याचं फळ मिळालं व्हतं. .'इस्वासघात केला' ऱ्हा ऱ्हावून आतल्या आत मनाला खाईत व्हतं...पर मनातलं वठावर इल कुठलं..?आकिरला अपराधीपणानं त्यानं डोळं मिटलं.

----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा-८८०६७३७५२८.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

आत्मकथा - 'एक होती आज्जी'- किरण सुभाष चव्हाण.

                     

                                       'एक होती आज्जी'.
                                       
                        एक छोटंसं गाव.गावच्या पोटात शिरणाऱ्या हमरस्त्याच्या वेशीलगत एका बगलेवर आटोपत्या फांद्यांचं वडाच जुनाट झाड.त्याच्यापुढं उत्तरेला पुढा करून भैरवनाथाचं मंदीर. या मंदिरांच्या मागच्या खोलीत मराठी शाळा भरायची.तिथून जरा मावळत्या अंगाला दोन घरांच्या मधी दोन गुंठे होईल एवढी मोकळी जागा आणि जागेच्या एका कोपऱ्यात उत्तरेला दार असलेलं दगडा मातीचं साधारण पुरुषभर उंचीचं झोपडीवजा नकाड घर.शेणामातीन सारवलेलं कांबटाचं दार.शेणानं सारवलेला मातीचा गुळगुळीत ओटा.वरती साधी कौलं. घर असं म्हणता येणार नाही अशा त्या झोपडीत माझी आज्जी एकटीच रहायची.उभ्या नाकाची,मातकट रंगाची ,अंगाला सुरूकत्या पडलेल्या.कंबरेत वाकून चालायची.सदा न कदा दाराम्होरं  दोन्हीं हात गुडघ्यावर टेकून हातांची बोटं एकमेकांत अडकून बसलेली.जाता येता माणसं म्हणायची,
    "म्हातारे काय जाग्याची राखण करीत बसलीस व्हय." तसच वाटायचं. हमचौक मोकळा जागा सगळा आजीच्या नावावर.त्यामुळं या जाग्याबद्दल तिच्या मनात लई लगाव होता.ती घर-जागा धरून असायची.दोन्हीं टोकाच्या दोन्हीं घरासंग आजीचं सन्यादान नव्हतं.जाग्यावरनं बऱ्याचदा भांडणं व्हायची.कधी तिच्या जागेत शेळी बांधली,पालापाचोळा पडला,केरकचरा टाकला अशी काही कारणं त्यामागं होती.
                         आज्जी एकटीच रहायची याच्यामागे तिची पूर्व कहाणी ही खूप रहस्यमय आहे.कुठल्यातरी परमुलखातून लेकीला(माझ्या आईला) काखेत मारून ती इथं आली.गावच्या वळचणीला राहू लागली.कसलाच आसरा नाही.गावच्या आयबायाकडन भाकरी तुकडा मागून पॉट भरू लागली.रेणुका मातेची परडी हातात घेऊन जोगवा मागून खाऊ लागली,लेकीला पोसू लागली.एकटीदुकटी बाई संग तान्हं लेकरू.उघड्या भुईवर कशी राहायची.पण गांव भल्या विचाराचा.गावांन एका बगलला नकाडी जागा दिली.मग आज्जीने मोलमजुरीच्या पैशांतून दगडामातीचं नकाड घर उभा केलं... तसं तर हे कोडं मला आजही सुटलं नाही की,आज्जीला म्हणे पाच मुले होती आणि शेवटची माझी आई..पण नवऱ्याला आणि  त्या पाच मुलांना सोडून आज्जी या गावात येऊन राहिली.आज्जीचा शेवटचा मुलगा म्हणजे  माझा मामा म्हणे शिक्षक आहे..तो कधी मधी सायकलवरून भेटायला यायचा तो ही रात्रीचा आणि पहाटेलाचं बाहेर पडून जायचा...आणि ही खात्रीशीर माहिती मला माझ्या थोरल्या बहिणीकडूनही ऐकायला मिळाली होती.लहान असताना ती ज्यावेळी आज्जीकडे गेली होती अगदी त्याच  रात्री तो मामा आला होता...ही फुलाची मुलगी का..? असं आज्जीला तो म्हणाला होता आणि पहाटेला तो निघून गेला.हे आजही आक्काला ओझरतं आठवतं..
एवढा मोठा कुटूंबकबीला सोडून आज्जी एवढ्या दूरच्या मुलखाला येऊन का राहिली..? पोटच्या पाच मुलांना तिच्यातल्या आईपणाला कसं सोडावसं वाटलं...? नकळत्या लहानग्या लेकीला संग घेऊन एकटी दुकटी बाई कशी या पारगावात अनोळखी माणसांत राहिली...? फक्त तो शिक्षक असणारा मामाच का तिला असं रात्रीअपरात्री भेटायला यायचा..? आईला भेटाताना त्याला कसली भीती वाटायची..? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही माझ्या मनात अनुत्तरितच आहेत.मी कधी कधी आईला विचारतो पण तिच्याकडेही ती नाहीत.ती ही खुद्द कधी या भावांना भेटली नाही.असा एकंदरीत आज्जीचा रहस्यमय भूतकाळ.
                          आईच्या या म्हायारगावाला जायचं म्हटलं की,मला खूप आनंद व्हायचा.आई म्हायारला जाताना मलाच संग न्यायची.माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी कधी आईसोबत तिच्या गावाला गेल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.खाली बसून बराच वेळ केसांवर फणी फिरवायची,दरपणात बघून कपाळावर  बंदा रुपायाच्याआकाराचा कुंकवाचा मळवट भरून हिरवं लुगडं नेसून तयार व्हायची.आणि चापूचोपून माझ्याबी डोक्याला तेल लावायची. तेलाचं बॉट तोंडावर फिरवून,हाता-पायाला पुसायची.एका पिशवीत कायबाय भरून घ्यायची.आणि मग आम्हीं मायलेकरं आजीच्या गावाला जायला बाहेर पडायचो.आई  पिशवी डोक्यावर घ्यायची मी आईचा एक हात धरून तर कधी मागून चालायचो.उगावता पुढा करून असलेल्या दत्त मंदिराच्या पुढणं जाताना पायातलं चप्पल काढायची आणि डोक्यावर पिशवी तशीच हात जोडून रस्त्यावरनच पाया पडायची.मग मीबी पडायचो.नदीपलीकडच्या कापड्याच्या हाटीलात बसून बराच उशीर गाडीची वाट बघायला लागायची.ठरल्या वेळलाच गाडी.कधी कधी खूपच उशीर व्हायचा.मी तिथं इकडं तिकडं रेंगाळायचो... भिंतीला लागून बसायला एक कट्टी...त्या कट्टीवर आईलगत बसून ताटकळत गाडीची वाट बघायला लागायची.बऱ्यास वेळानं कुई कुई..आवाज करत गाडी थांबायची नी मग आमचा प्रवास सुरू. सीटवर उभा राहून खिडकीतनं मी मोठ्या आगतिकीन माग सरणारी झाडं-घरं न्याहाळायचो.
                           

                       आज्जीच्या त्या झोपडीवजा घराला कांबटाचं दार.समोर दर्शनी भीतीतल्या दिवाळीत रेणुका मातेचा फोटो, पडळी असा तो दिवळीतला देव्हारा.धाटांचा शेणानं सारवल्याला कुड मधन घातलेला.उगवत्या बाजूला आज्जीने जळाण काटुक रचलेलं. सगळी त्यात गालवेरची वाळीखड काटकच असायची. एका कोपऱ्यात मातीची चूल तिथंच जवळ दिवा ठेवायला इतभर उंचीची मातीची मिनार होती, तिचा माथा पसरट होता पांढऱ्या शाडून सारवलेलं असायचा अगदी गुळगुळीत. तिच्यावर चिमणी (दिवा) ठेवायचा..आणखीन एका खोपड्यात गाडग्यांची उतरण.त्यातनी कायबाय ठेवल्यालं असायचं.एका बगलला दोरीवर आज्जीची जुन्यारं.अशा चारी खोपड्यात तिनं तिचा प्रपंच थाटलेला,दिवसाही आत अंधारगुडूप असायचं. रात्रीला चिमणीचा तांबूस उजेड.. त्या मिणमिणत्या मंद तांबूस उजेडात तो गाभारा उजळायचा.
                                             आम्हाला दारात बघून आज्जीला खूप आनंद व्हायचा.मला जवळ घिऊन आज्जी आंजरायची-गोंजारायची.

तिच्या जुन्या थोरल्या कुशीतली ती माया माझ्यावर ओसंडून वहायची. खूप आनंदून जायची.या भेटीन पावन व्हायची ती.नेहमी लेक-नातवाच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या आज्जीला सर्वस्व मिळाल्याचा तो आनंद.मग तिच्या पुढ्यात आम्हीं माय लेक बसायचो..आज्जी नी आई बराच वेळ कायबाय बोलत असायच्या.मी थोडावेळ बसलो की मग उठून चुलीच्या वरच्या त्या खोपड्यात शिरून काहीतरी शोधत असायचो.कोण जाणे माझ्या बालमनाला ती एक सवयच होती की मी कधीही आज्जीकडे आलो की असेच काही तरी शोधायची. त्या तिथे मला आज्जीने साठवून ठेवलेल्या कितीतरी मोकळ्या काड्यापेट्या मिळायच्या किंवा खेळण्यायोग्य अशी कुठली तरी छोटीशी वस्तू.मला खूप आनंद व्हायचा..मला आठवतंय एकदा फुटक्या दर्पणाचा चौकोनी लाकडी साचा होता त्याची गाडी करून मी बाहेर ओट्यावर खेळत होतो...आज्जीने साठवलेल्या भरपूर काड्यापेट्या मला मिळायच्या (कारण आज्जीच्या घरात लाईट नव्हती म्हणून चिमणी पेटवण्यासाठी आणणाऱ्या काड्यापेट्या ती जमा करून ठेवायची) त्याचा एक वेगळा आनंद असायचा..या कड्यापेट्या घरी आणून दिवाळीत किल्ले बनवताना पायऱ्या करण्यासाठी त्यांना उपयोगात आणायचो..आई नी मी शेजारच्या घरात बसायला जायचो..तिथे एक आज्जी आजोबा होते, त्यांचे माझ्या आईवर लेकीसारखे प्रेम. जणू ती आपली लेकच मानतात.अगदी जिव्हाळ्याचा घरोबा.. पण आज्जीचे त्यांच्यासोबत पटत नव्हते..खरं तर आज्जीच पटवून घेत नव्हती.या घराचा आईला खूप मोठा आधार.
रात्रीचे जेवण आज्जीच बनवायची.

आज्जीच्या हाताला चव होती.चवदार जेवण बनवायची.आमटीला ती कोरड्यास म्हणायची विशेषतः ते कोरड्यास तर मला लई आवडायचं.अप्रुवाईने मला खायला घालायची.जेवणं आटोपली की,आज्जी चुलीवर मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवायची.आणि झोपण्याच्या वक्ताला आई दाराम्होरं चिमणीच्या उजेडात अंघोळ उरकून घ्यायची...हे ठरल्यालच असायचं..कधीही आई इकडे आली की या वक्तालाच अंघोळ करायची...याचं कारण म्हणजे आज्जीच्या त्या नकाड्या झोपड्यात न्हाणी नव्हती...मधल्या कुडाच्या आतल्या अंगाला दोघी मायलेकींच्या मधी मी झोपी जायचो...
                          घराच्या अंगणात उजव्या अंगाला एक सपय गोलाकार दगड होता त्यावर आई मला अंघोळ घालायची. समोर उगवत्या बाजूला मंदिराच्या मागे शाळेची मुलं एका रांगेत उभा राहून प्रार्थना चालू असायची.अंघोळ करत असताना ते पाहणं माझ्यासाठी मोठी गंमत असायची.या शाळेतील मुले दुपारच्या सुट्टीत आज्जीकडे पाणी प्यायला यायचीत.आज्जीही त्यांना कधी नाही म्हणायची नाही.
दुसऱ्यादिवशी आई नी मी माघारी वळायच्या आधी हुंबऱ्यालगत मायलेकी बसायच्या आई आज्जीच्या डोक्यातील ऊवा-लिका बघायची.मग तिथंच बसून आई कपाळाला कुंकू लिवायची,पुन्हा एकदा तेलाचं बॉट माझ्या केसाला पुसायची. आणि कायबाय भरलेली पिशवी घेऊन आज्जीचा निरोप घेऊन मग आम्हीं मायलेकरं वाटला लागायचो.
                                     लहान असताना आज्जीकडे मी एकटाच राहिलो होतो ते दोन प्रसंग आठवतात.पावसाळ्याचे दिवस होते.पाऊस पडण्याअगोदर आज्जी मला घेऊन शेजारच्या लुगड्याच्या घरात घेऊन बसली होती.मी आज्जीला बिलगून बसलो होतो..बाहेर बेफाम पाऊस कोसळत होता...हुंबऱ्याच्या बाहेरून लाल पाण्याचा मुसंडा वाहत होता.आणि एकदा शाळेला सुट्टी पडल्यानंतर मी आज्जीकडे राहिलो होतो.कसे तरी दोन दिवस राहिलो असेन कारण मला खूपच एकटं वाटत होतं..अजिबात रमतगमत नव्हतं.
माझ्यासोबत खेळायला माझ्या बरोबरीची तिथं मुलं आजूबाजूला नव्हती.खूप एकटं वाटायला लागलं..करमेनासे झाले...दुपारचं झोपून उठलो..की आईबाबांची आठवण व्हायची नी मला रडू कोसळायचं.. मग मी आज्जीचा पदर धरून रडायचोच..आज्जी जवळ घेऊन उगी उगी करायची..समजूत काढायची.आणि मग दुसऱ्याच दिवशी आज्जी मला घेऊन माझ्या गावी आली.
                               आज्जी आमच्या गावी कधी आली की आठ- पंधरा दिवस ऱ्हायची.एकदा ती अशीच तिच्या गावावरून आली नी स्टँडवरून सरळ माझ्या शाळेसमोर येऊन बसली.मला बोलवायला आत निरोप धाडला.तसा मी वर्गातून बाहेर आलो तर आज्जी समोरच बसली होती.तिला बघून मला खूप आनंद झाला आणि ती ही सुखावली.मला जवळ घेतलं.कुरवाळलं. गालाचं मुक्कं घेतलं नी मगच घरकडं वळाली.आज्जी आमच्याकडं असायची त्यावेळी बरं वाटायचं.आईलाही तेवढीच मदत करायची,विशेष म्हणजे दुपारच्या वेळेत  बाहेरच्या सोप्यात आज्जी वाकाळ शिवायची.
त्या वाकळत आम्हा मुलांची धुमडी चालायची.ती वाकाळ अंगावर घेऊन दडून बसायची हौस वाटायची.एवढा आम्हीं गोंधळ घालायचो पण कधीच आज्जी आमच्यावर रागवायची न्हाई.एकदा घरात शेळीच भरपूर दूध काढून ठेवलं होतं.आज्जी नी मी दोघचं घरी होतो.तर आज्जीने ते तापवून त्याच्यावरील साय मला खायला दिली आणि नंतर दूधही प्यायला दिलं. माझ्या खाण्यापिण्याची काळजी करायची.आज्जी नी माझ्या बाबांचं कधीच पटत नव्हतं दोघेजण एकमेकांशी जास्त बोलत नसत..एकदा अशीच कशावरून तरी त्या दोघांचं भांडण झालं झालं ते अगदीच कडाक्याचं.कधी आमच्या डोळ्यामाघारी निघून गेली काहीच माहिती पडलं नाही...नंतर मग सगळीकडे शोधाशोध... मी आणि आक्का(थोरली बहीण) गावात जाऊन शोधून आलो पण कुठेच पत्ता लागला नाही.. शेवटी कळालं की,आज्जी तिच्या घरला गेली.
                                                     आज्जी कधी आजारी पडली-झडली तर कुणाकडून तरी सांगावा धाडायची. आईच्या माहेरची गावात असणारी कांबळ्याची द्रौपदा मावशी नाही तर घराच्या माग रहायला असणाऱ्या मोरबाळ्या च्या मावशीकडन काय ना काय सांगावा असायचा.नाही तरी आईच्या माहेरचे एक शिक्षक आमच्या घरासमोरून वरच्या गावात शिकवायला जायचे त्यांच्याकडूनतरी असायचा.आई एकेकदा त्यांच्याकडून आजीला रॉकेल द्यायची.आमच्या आनंदाचा दिवस होता तो शनिवारचा.कारण  माझ्या थोरल्या बहिणीला म्हणजे आक्काला मुलगा झाला होता. घरी आनंदाचं वातावरण होतं.. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी आज्जीच्या गावावरून खुद्द एक माणूस निरोप घेऊन आला..खूप घाईगडबडीत होता...कुणाचा होता तो निरोप आज्जीचा..? सांगत होता म्हातारीला लई बरं न्हाई आताच्या आता चला.काय तरी विपरीत नक्कीच होतं. मी त्यावेळी आठवीला होतो.दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली म्हणून घरला येत असताना आई-बाबा दोघेजण गडबडीत जाताना दिसली.मी विचारलं तर आज्जीकडे जातोय असे बोलले..मला आश्चर्य वाटलं ते या गोष्टीचं की,कधी न जाणारे बाबा आईबरोबर कसे काय चालले.पण घरात आल्यानंतर सगळी परिस्थिती समजली.
आई-बाबा पोचले आणि सायंकाळी तिथून त्यांनी उलट इकडे एका घरात फोन केला.(त्यावेळी मोबाईलचा वापर जास्त नव्हता) भावकीतल्या जाणत्या माणसांना बोलावून घेतले.थोरला बाबा, बाजीराव आण्णा, संभाजी आण्णा अशी माणसे गेली..नक्कीच काहीतरी वाईट घडले होते पण आम्हांला काही कळायला मार्ग नव्हता..कुणीच काही सांगत नव्हते.आम्हीं घाबरून गेलो होतो घरात बाळंतीण असणारी आक्का,त्यांनतरची बहीण आणि मी असे एकटे पडलो होतो. आक्का आम्हाला धीर देत होती.ती रात्री आम्हीं भीतीच्या छायेखाली झोपी गेलो.अपरात्रीच कधी ही सगळी मंडळी आईच्या माहेरवरून पंधरा-वीस किलोमीटरचे अंतर चालत घरी आले होते..
उठलो तर घरात रडारडीनेच सकाळची सुरवात झाली होती..आई आज्जीच्या नावाने रडत होती गल्लीतल्या आयबाया जमल्या होत्या..आणि मग समजलं की,आजीने आमचा निरोप घेतला होता.माझंही रडू त्यांच्या रडण्यात मिसळलं.
आज्जीच्या तीनविला मी ही गेलो होतो,आई त्या पोरक्या घरात एकटीच रडत होती बाकी आयबाया तिची समजूत घालत होत्या..... "आईनं मला व्हट्यातन मागून आणून जतान केली" आई रडताना सांगत होती ते हे वाक्य माझ्या मनावर त्यावेळी कायमचं कोरलं गेलं.आज्जी गेली..आईचा मागचा उरला सुरला आधार गेला.. तिचं माहेर तुटलं.. ती आईविना पोरकी झाली.
                               

                  आज्जी गेली पण अनेक प्रश्न मागे ठेऊन गेली.आज्जीचा रस्त्यालगत असणारा दीड-दोन गुंठे जागा,छोटंसं असे ना का ते घर..वारसाहक्काने तिच्या लेकीचं झालं  पाहिजे होतं पण तसं काहीच झालं नाही. तो जागा आज्जी हयात असताना आमच्या माघारी गावातील एका इसमाने बळकावला.त्याने आज्जीला आमिषे दाखवली.मी तुला शेवटपर्यंत पोसतो,सांभाळ करतो..एक-दोन वेळेला खर्चाला पैसे दिले काय..एकदा नवं लुगडं घेऊन दिलं आणि एकदिवस तालुक्याच्या ठिकाणी आज्जीला सोबत नेलं..असे उद्योग त्या माणसाने केले.. माझ्या आईला किंवा बाबांना कोणतीही कल्पना न देता आज्जीला फसवून तो जागा आपल्या नावावर करून घेतला...जागेचा व्यवहार कसा झाला..? आज्जीकडून किती रुपयांना तो जागा घेतला..? .त्याने आज्जीला किती पैसे दिले...यातलं माझ्या आईला नव्हे तर कोणालाच त्याने काहीच कळू दिलं नाही...तो जागा घ्यायचाचं होता तर आज्जीच्या मागे तिची लेक-जावई होता त्यांना याची कल्पना का दिली नाही..? त्यांना घेऊन का हा जागेचा व्यवहार का केला नाही..? हे सारंच गुलदस्त्यात..याहून कहर म्हणजे आज्जी आम्हांला सोडून गेली ती सहजासहजी नव्हतं...आम्हांला हे नंतर समजलं...
त्या दिवशी आज्जीने बाहेरून दिलेला कसलातरी भात खाल्ला होता...लगेच तिला उलट्या सुरू झाल्या...जीवाची कायली व्हायला लागली...पानंदिला परसाकडं गेली आणि तिथंच चक्कर येऊन पडली.कुणीतरी तिला उचलून घरात आणून झोपवलं तशी ती तिथंच कायमची झोपली...
आज्जीचे सोपस्कार पार पाडले..एव्हाना  आता बाबांना आज्जीच्या जागेविषयी समजलं होतं त्या वेळी  त्यांनी याचा जाब  त्या इसमाला विचारला तेंव्हा त्याने बळजबरी करत उलट बाबांनाच धमकावले...काय करणार आता इलाज नव्हता..कोर्टकचेऱ्यांची पायरी चढण्याची आमची तरी ऐपत नव्हती...खरं-खोटं करण्यासाठी पैशाची चवडी आमच्याकडे नव्हती.. शेवटी आम्हांलाच नमतं घ्यावं लागलं..आजही मला आज्जी आठवते ती या सर्व प्रश्नांसह.माझ्यावर अमाप माया करणारी माझ्या आज्जीच्या आठवणींना त्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची किनार आहे...तिने एकटीने सोसलेल्या-भोगलेल्या जगण्याचंय अंतसमयाला छेडलेल्या अन्यायीपणाचा इतिहास आहे.माझ्या मनातल्या  तिच्या हळव्या गोड आठवणींसोबत त्या कटू कठोर क्षणांचा भरलेला उद्रेक आहे.तिच्या असंतुष्टपणाचा  मुखडा सतत माझ्या डोळ्यासमोर तरळतोय.माझ्या मनात जशी ती एकबाजूला आठवणींच्या तशीच दुसऱ्याबाजूला अस्वस्थतेच्या रूपातून जिवंत आहे.माझ्या एका डोळ्यातून तिच्या आठवणी तर दुसऱ्या डोळ्यातून अस्वस्थता ढळतेय.ती अस्वस्थता मला त्या प्रश्नांच्या मुळाशी शिरून उत्तरं शोधण्यास भाग पाडते आहे.

------------------------------------------------------
किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा- ८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...