फॉलोअर

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

समाजभान उपक्रम - किरण चव्हाण.

'अंधारातल्या प्रगतीला प्रकाश देण्याचा समाजभानचा छोटासा प्रयत्न.'


इवल्याशा झोपडीला 

कुडामेडाचं दार गं.

साचलाय अंधार 

कुठून येईल उजेड गं.


                        दोन वेळच्या भुकेला आवर घालण्यासाठी जिथं आटापिटा करावा लागतो तिथं अंधारल्या झोपडीत कुठून येणार प्रकाशाचा किरण...कशी उजळणार ती.अंधारातल्या दोन जिवांची ही कहाणी आहे मिणचे खुर्द ता भुदरगड येथील मायलेकींची. प्रगती परीट सध्या नववीत शिकते.वडिलांचं छत्र कधीचं हरवलेलं.आई आहे तिलाही अधूनमधून फिट येते.त्यातूनही ती माय रोजच्या भुकेची तडजोड करण्यासाठी उन्हातान्हात दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जाते.घरात दिवाबत्तीची सोय नाही त्यामुळे दिवसा दारातून येणारा आणि रात्रीचा दिव्याच्या मिणमिणता उजेड एवढीच उजेडाची सोबत.आज दिव्याच्या मिणमिणत्या उजेडातच प्रगतीला आपला अभ्यास उरकून घ्यावा लागतो..

                      आज एक सावित्रीची लेक अंधारात आपलं जीवन घडवू पाहतेय..'ज्ञानदीप लावू जगी' असं फक्त म्हणायचं आपण. पण शेजारच्या एका ज्ञानज्योतीच्या अंधारल्या झोपडीत आज एक दिवा देता येत नाही...दिवाळीला तर घरादारावरून लखलखत्या प्रकाशाचा झोत ओसंडुन वाहत असतो. पण अंधारानं मुजलेल्या घरात एक प्रकाशाचा झोत झळकावा असं कुणाला वाटत नाही..?

                  पण गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजींची) विचारधारा हीच आमची जीवनधारा या विचारांची कास धरून वाटचाल करणाऱ्या समाजभान उपक्रमांतर्गत आज प्रगतीदिदीला सोलर लँप तसेच धान्यस्वरूपात मदत देण्यात आली.सोलर लँपसाठी उमेद फाउंडेशनचे भरीव योगदान लाभले.यावेळी समाजभानचे शिवम साधक श्री. सागर गुरव,आकाश पाटील व किरण चव्हाण,आशा सेविका सौ.वैशाली गुरव,श्री.बाबुराव गुरव उपस्थित होते.

 एकंदरीतच मायलेकींच्या अधांतरी जगण्याला आधारच  बळ देण्यासाठी आज समाजाच्या दातृत्वाची गरज आहे..

...धन्यवाद.!!




संपर्क : समाजभानचे शिवम साधक श्री सागर गुरव (कोळवण)

मोबा - 9146148904

-----------------------------------------------


गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

अभंगवाणी - पांडुरंगा...- किरण चव्हाण.

 

'पांडुरंगा...'


तूच पांडुरंगा निवारी हा काळ । 

राहिले न बळ अंगी आता  ।। 


चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी। 

काय माझी स्थिती सांगू तुज  ।। 


मुक्यापरी मन सोसतची जाय । 

 किती हे सायास सहावे मी  ।। 


सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।

 नाही उपभोग मज घ्यावयाचा ।। 


    सोसवेना आता दे गा तू आधार ।   

टाकीतो मी भार तुजवरी ।। 


नको ऐसें जिणे देऊ मज देवा । 

नाही आता हेवा जीवनाचा  ।। 


पुरे झाली आस नको आता वास । 

तुच माझा श्वास पांडुरंगा  ।। 


काय उरे आता इथे माझेपण । 

देई मज ठाव तुजपाशी  ।।


 

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

बलुतेदार परीट समाजाविषयी..- किरण चव्हाण.

 

'एक वेध परीट समाजाचा : भूतकाळापासून वर्तमानकाळपर्यंतचा.'

                                           गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी परीट हा एक महत्वाचा आणि प्रामाणिक असणारा मेहनती समाज.महाराष्ट्रात तो परीट तर इतर राज्यांत 'धोबी' या नावाने ओळखला जातो.२०११ च्या जनगणनेनुसार देशात परीट समाजाची लोकसंख्या ८,२२,००,००० इतकी आहे.संपूर्ण राज्यात तो कमी अधिक प्रमाणात विखुरला गेला आहे.या परीट समाजात मादीवाला,अगसार, पारित, रजक, एकली,चकली, राजाकुला,वेलूतदार,सेठी,मरेठीए अशा जाती-प्रजाती आहेत.संत गाडगेबाबांशी या समाजाचं जिव्हाळ्याचं नातं.आपल्या परंपरागत व्यवसायातून कित्येक वर्षे हा  समाज आपल्या गावच्या सेवेत रुजू आहे.अशा या परीट समाजाचा भूतकाळापासून आज वर्तमानकाळपर्यंत घेतलेला हा वेध..

                                       आमच्या गावाच्या वरल्या आळीला एका कडन वसल्याली सताट घरं हाइत..काही जुनीपाणी साध्या खापरीची तर काही अलीकडं बांधल्याली कौलारू छपराची.. काही दगडा मातीची, विटांची..साधी सुधी पण निटनेटकी तर सगळ्यात कडला एक चांगला नजरत भरल असा बंगलाटाईप. असा एका रांगत परटांच्या घरांचा हा गोतावळा...याच रांगतल सरमधलं घर.वरती हिरवा आणि खाली गुलाबी रंगांचा पट्टा.. बाहेर शेड्यावर जाडजूड आखीव रेखीव दगडांची कट्टी.त्या कट्टीच्या खालच्या कचात लोखंडी सळीच्या..दोन तीन ठिकाणी आडी कल्याला गोल रिंगा,आत खाली लग आणि दोन पायऱ्या वर चढून मग सोपा...सोप्यावर आडवी बांधल्याली मेसकाटीची आडवी दांडी..तिच्यावर एका वळीन लादल्याली धडूती..मधल्या भीतीला बडोद्याच्या खायनं एका रांगत देवाधर्माचं फोटो..त्यात सगळ्यात कडला एक फोटू आपसूकच लक्ष वेधून घित होता...तसं त्यो कुणाचाबी घेईल...कुणाचा होता तो..? त्यो होता स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा महाराजांचा.अणुकीचीदार नक्षीकाम केलेल्या चौकटी...तसाच खालचा हुंबरा..गरीबाचा वाडाच म्हणायचा त्यो हे घर म्हणजे सातू परटाचं.आणि याच मधल्या सोप्याला एका बगलला घोंगड्यावर सातू परटाची बैठक..सातूआज्जा म्हणजे सगळ्यांचा तात्यामा. सानथोर सारी मंडळी 'तात्यामा' म्हणूनच हाक मारत्यात.. रंगानं काळासावता,लांबसडक टोकदार नाक..वठावर पिकलेल्या पांढऱ्या मिशांचा खंगोल...गालाच्या दोन्ही पाकळ्यास्नी सुरकुत्या पडल्याल्या. 

                                           तरीबी ऐंशीपतोर वयाची गाठ पडायला आल्याली. परटांच्या सगळ्या भाऊबंदकीत जुनाजाणता माणूस..तात्यामाचं एक वेगळेपण सांगायचं म्हणजे तात्यामा पयल्याकाळी सगळीकडं फिरल्याला...बारा गावचं बारा घरचं पाणी पिल्याला माणूस..आपल्या पावण्यारावळ्यात पार मुंबई-पुण्यापतोर जाऊन आल्याला.इकदा कुठल्या नातलगाकडं पुण्याला गेलता...पुण्याला म्हणं नदीच्या काठाला घाट बांधल्यात तिथं परिट धुणं धुत्यात त्येंच्याकडन वरसाला तीन रुपया कर घेत्यात. ही तर गोष्ट तात्यामा कुणासंग बोलताना हमखास सांगायचा म्हणजे सांगायचाचं.जिथं जाईल तिथला हालहवाला आपल्या माणस्नी सांगायची सवय..बारा गावच्या बारा भानगडी...आणि सतरा घडामोडी ऐकाव्या तर त्ये तात्यामाकडनं.गावच्या परटाच्या समाजात थोराड माणूस ह्यो एवढाच.परटाचीच नव्ह गावात कुणाचंबी लगीनसराई असू दे नाही तर कंचाबी कार्यक्रम... तात्यामा जातीनं हजर असणार...भाऊबंदातबी मिळूनमिसळून काय करायचं,कुठं जायाचं असू दे तात्यामाला इचारूनचं सगळं करायचं...कुणाचा भांडणतंटा-तिड्याचा वाद त्यो सोडवायला तात्यामाकडंच.दुखणंपाखणं असू दे गल्लीत कुणाच्या घरात महीत व्हवू दे तात्यामाचा लई आधार वाटायचा लोकास्नी... आन तशी तात्यामालासुद्धा माणसांची दांडगी मया..साधं. वाटन जाणारं वाटसरू असू दे,तात्यामा मुद्दाम हाळी मारणार..ख्यालीखुशाली इचारणार...तात्यामाचं एक वाक्य तोंड पाठ केल्यासारं त्याच्या तोंडात ठरल्यालं असायचं..."चांगलं बोलून चालून-ऱ्हायाचं बघ..जातानं काय घिऊन जायचं हाय व्हय" तात्यामाचं बोल खरंच व्हतं... त्या साध्या साध्या शब्दात मोठं जीवनाचं तत्वज्ञान व्हतं.. त्याला ते उमगलं व्हतं... नुसता बोलत नव्हता तर तसा वागतबी व्हता..कारण गावातली लोकं त्याला मान द्यायची..वर म्हणायची..तात्यामाचं वागणंचं निराळं...जसं बोलणं गॉड तसं वागणंबी गॉड... 

                                                        एखादा माणूस तात्यामासंग तासघटका बोलत बसायचा त्यो तिथंच मंतरल्यासारखा बसून ऱ्हायाचा..त्याच्या नेहमीच्या गराड्यात गावातली जुनी जाणती म्हातारी माणसं....तात्यामाला आपल्या परटाचा धंदा आपला समाज याविषयी लई अभिमान.. सगळं कसं समोरच्याला पयल्यापासून हारखून सांगायचा..पोपटाच्या चोचीगत सदा लालेलाल रंगीत जीभ...आधीमधी हिरव्याकंच खाऊच्या पानांची उळी दाढत धरून चगळायचा. बसल्या जाग्यास्न उठून दाराम्होर जाऊन लालभडक पिंक मारून पुन्हा आपला जागा धरायचा.तात्यामाच्या पोटाला तीन ल्याक आणि दोन लेकी...एक मास्तर म्हणून शहरात नोकरीला आणि दोघ गावाकडं शेतीधंदा करत्यात...लेकी दिल्या घरी चांगल्या हाइत्या.नातरुंडं-पितरूंडं तात्यामाच्या अंगाखांद्यावर खेळात्यात,पुढ्यात दणाणा उड्या मारात्यात,अंगाशी झोंबत्यात.तात्यामाचं घर म्हणजे भरलं गोकुळ..आणि तात्यामा म्हणजे सुखासमाधानानं पावन झालेला माणूस... 

                                                     अशा या तात्यामानं माझ्या मनावरती कधीच भुरळ घातली होती...आणि एकदा मनानं पक्कं केलंच.. आपण आता तात्यामाला भेटायचं..आणि म्हणून  एका सांजवक्ताला निवांतपणे मी तात्यामाजवळ जाऊन बसलो...माझ्यासमोरच तात्यामानं घोंगड्यावर बैठक मारलेली.सुरुवातीलाचं मला माझ्या आज्जा-पंज्यांच्या नावांची उजळणी करावी लागली तवा कुठं तात्यामाला माझी वळख गावली.. मधल्या चौकटीला गुणाआज्जी कौतुकानं माझ्याकडं बघत होती.तिच्या सुरकुत्या पडलेल्या कपाळावर चांगलं बंदा रुपायाएवढं ठसठशीत कुंकू उठून दिसत होतं...हिरव्या काठाचा डुईवरचा पदर.. मांडीवर तान्ह्या नातवाला ती घेऊन बसल्याली..लगश्यान तिनं सूनला चुलीवर चहा ठेवायला सांगितलं.

"मुला काय करतुस कुठं आसतूस..?" असं गुणाआज्जी मायेनं सारं मला विचारलं...

"अलीकडंची पोरं तुम्हीं कशी वळखशीला... आरं बाबा तुझी आज्जी आमच्याकडंचं द्यायची धडूती धुवायला.."

चहाचं कप पुढ्यात आलं.आज्जा- आज्जी एकेक करून मला प्रश्न विचारू लागले.तसा मी चहाचा एकेक घोट घेत त्यांना उत्तरे देऊ लागलो.आज्जा-आज्जी बोलत होते तसं जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.आमच्या गप्पाला रंगत आली..आणि मात्र मला जे जाणून घ्यायचं होतं.. तात्यामा..त्यांचा परीट व्यवसाय.. त्यांचा समाज त्या अनुषंगाने विचारू लागलो तसं तात्यामानं आपलं एकाबाजूनचं पट्टा सुरू केला पयल्यापासनं बयाजवार सगळं सांगू लागला...त्यो बोलत होता पण त्याचं मन भूतकाळात शिरलं होतं.

                                          "गरिबा घरी गरीबाच्या पोटी उपजल्याली आम्हीं लेकरं...आम्ही एकूण सात भावंडं... चार भाव आणि तीन भणी...आई - बा बिचारी गरीब,दिनवानी...काय सांगायची हालत तवाची....काय सांगू नि कस सांगू..आम्हीं सांगू ने नि कुणी ऐकू ने.ऱ्हायाला एक नकाडं खोपाट व्हतं...नारळाच्या  ढाळ्याचं.. आणि उसाच्या पाल्याचं खोपाट.त्यात आम्हीं एवढी माणसं ऱ्हाईताव..वाडवडलापासून चालत आल्याला आमचा परटाचा धंदा...हातावरचं पॉट..चार हात राबणारी आणि धा तोंडं खाणारी...कुणाला म्हणून पुरायचं...कोंड्याचा मांडा करून खाल्ला बाबा आम्हीं... आई नदीला धुवायला गेली की रानातली कुर्डुची,घोळ्याची भाजी आणायची...तवा भाजीला 'त्याल' बी मिळायचं न्हाई...मिठाचा खडा टाकायचा आणि तशीच तव्यात परतायची.. पोटाच्या आगीला भाकरीच्या तुकड्यासंग आत ढकलायचं..पोटाची भूक लई वंगाळ...काय खाऊ नि काय गिळू व्हायचं...आई- बा तरी जीवाचं रान करायचीत.. पर पोटाला पोटभर आन मिळायचं न्हाई.आई सकाळी लवकर उठली की,हुडदाच माडगं करायची...ताटलीत वतून दिलं की,सरसरून प्यायचं..काय सांगू त्येची चव.निराळीच म्हणायची.आसं कित्येकदा घडलया..नुसत्या पाण्यावर आम्हीं झोपलूया... दाताच पाणी गिळून गप बसायची येळ यायची..अंगावर साधा कपडा चांगला मिळाला न्हाई..आई-बा मुलखाची कापडं-चोपडं धुवायची खरं स्वतःच्या लेकरास्नी धडूता घ्यायला मिळत नव्हता.. तवा पैसा कुठला..रूपाया म्हंजी बैलगाडीच्या चकराएवढा वाटायचा..नुसतं पोटासाठी राबायचं की गां...कुणी तरी मोठ्या घरातलं बाईमाणूस  जुनं-पानं झाल्यालं धडूत आईला द्यायचीत ती आई आम्हांस्नी घेऊन यायची.आसं परक्याचं धडूत कधी आणलं तर आम्हीं हारखून ढया व्हायचो.दुसऱ्याचं कापडं घालून मिरवायचो...

                                                         एका माळचं सात मणी म्हणत्यात तसं आम्हीं सात भावंडं...आई कुणाकुणाचं म्हणून बघणार त्यात माझ्या पाठवरची धाकली भन तानी.तिला तर सारखं बरं नसायचं...आई कुठलं कुठलं दयाव- धराम करायची...लेकीच्या नुसत्या उशाला बसून ती रात रातभर जागायची.माझ्या आयचं तर कुत्रंहाल व्हयाचं... पाटचं येरवाळी उटायचं..घरातली निरवानीरव करायची ती लगोलग गावात पळायचं... समद्या गावांत फिरून धडूती-बिडूती जमा करायची... एक बोचकं डुईवर एक काकत मारून..कुठल्यातरी आयबायांनी भाकरतुकडा दिल्याला असायचा त्यो तसाच वट्यात घालून आम्हां लेकरासाठणी आणायची...घरात आली की आमास्नी पयल्यांदा जेऊ खाऊ घालायची... कुठं खाल्ल कुठं नाही त्ये लगीच धडूती धुवायला नदीला पळायची.संग बा सुद्धा असायचा..दोघ मिळून समद्या गावाची धडूती धुवायची...उन्हाचा कडाका व्हायला म्हणजे आटपून व्हायला पायजे इकडं ध्यान असायचं पण कधी कधी दिस लागायचा...न्हान असताना मी-माझी भावंडं कधी मधी आई-बा संग जायाचो..नदीच्या काठाला नकाड्या पाण्यात मग आमच्या उड्या.. एकमेकांच्या अंगावर पाणी मारायचो...नुसती पाण्यासंग मस्ती करायची...आई मग तितनच वरडायची...

                                                     धुणं धुवून झालं की,बा भरल्या नदीत आत आत जाऊन पवून यायचा..तवा आम्हांला बा चं केवढं कवतिक वाटायचं...आम्हींबी 'बा' कडं आम्हांस्नीबी पवायला शिकीव म्हणून सारखा लकडा लावायचो..मग बा बी एकेकाला नदीत आत घेऊन पोटाखाली हात घालून पाय मारायला सांगून पवायला शिकवायचा.बा न तवा आम्हांस्नी पवायला शिकवलं...म्हणून तर आता कुणीबी सांगावं भरल्या तर  भरल्या नदीत आणि कंच्याबी हिरीत आम्हीं पवायला तयार. शाळा जायाचं वय झालं कशी तरी पयलीपतोर शिकलो बघ शाळा...आमच्यावर तवा योकच गुरुजी व्हता. काळे आडनावाचा गुरुजी..गांधी टोपी.. काळा कोट..पांढर धोतार...आणि हातात जाडशीर लांब काटी...वठावर दोन्हीं बाजूला मिशांचा खंगोल.सदा पानाचा तोबरा भरल्याला.टेबलावर नुसती काटी आपटली की,पोरं निम्मीअर्धी गार व्हायची...लई मारकूटा मास्तर व्हता...शाळला गेलं न्हाई की,लवण्यात झमाझम काट्या मारायचा...पेंढरी बेडकावाणी फुगायची.. सुजायची... कोण जाईल असल्या शाळत.अशा मास्तराच्या माराला भिऊन शाळा दिली सोडून...मग काय गल्लीतला हाणम्या,नामा,दगडू हे आमचं गुराढोरकडलं बालमैतर.. आई-बा कामाला  गेली की आम्हास्नी रान मोकळं..ऊन माहिती न्हाई का तान्ह माहिती न्हाई आम्हीं पोरं पोरं नदी वताडातन(लहान ओढे) मासं,खेकडी पकडायला जायाचं.रानाशिवारातनं कुठं आंबं, जांभळं,करवंदासाठनी दावं नसल्याल्या जनावरांसारखं उंडगं फिरायचं.

                                          आईनं गावातल्या जनाई पाटलीनीकडन आरदलीन शेळी घेतली व्हती..तिचा आता चार पाच करडांचा खांड झालता...पुढं पुढला बा नबी येजाच्या पैशावर दुभती म्हस आणली...कारण आता आम्ही भावंडंबी जरा जाणतं झाल्याल्याव जराकमी कळतं झाल्यालाव... घरातली कामं करत व्हतो...मी शेरडांचा खांड घेऊन डागला (डोंगराला) जायाचो..आता घरात शेरडां- करडांचा,म्हशींचा खटाला झाल्याला.हळूहळू घराला बरकत आली. आई-बा न परटाच्या धंद्यावर..आणि शेरडाकरडांच्या जीवावरघर नवं घर बांधायचं ठरवल्यालं.. आणि मग एकदा कामाला सुरुवातबी केली. त्या येळला आम्हीं भणीभावंडं आई-बा रातंदिन उरापोटी राबलो.. आणि एकदासं चांगलं दगडा-मातीचं नकाड घर उभा राहीलं.आई-बा गावतन धडूती जमा करायची आणि मग आम्हीं सगळीच नदीला धडूती धुवायला जायाचो...आता काम करणार हात वाढल्याल त्यामुळं आई-बालासुधा आधार झाल्याला...पुढं पुढं जशी वयं झाली तशी आमची लग्नं झाली..भणी जिकडं तिकडं दिवून टाकल्या...माझं लगीन त्यायेळला स्वस्ताइत सात रुपयात झालं..आता बघताईसा नवं कशी म्हागाई वाढलीया...आता सात रुपयात कात बी यायचा न्हाई.

                                                   आई-बा नं लग्नं करून दिली जो तो आपापल्या संसाराला लागला.आता आईबाचं वय झाल्यालं. बिचारी खूप राबली आमच्यासाठनी.. खूप कष्ट उपासल.पर आम्हीं भावा भावांनीबी त्येंची जाण राखली..म्हाताऱ्या वयात त्यास्नी चांगलं जपलं..आमच्या चुली येगळ्या पण एकी चांगली..कुठल्याबी भावानं आई-बाला अंतर दिलं न्हाय..शेवटपतोर वाळ्या खारकगत... कसला आजार न्हाई..कसला दवापाणी न्हाई..वय झालं, शरीर थकलं तसं हातरून धरलं..पयला बा मरून गेला आणि मागाहून चार वरसान आई गेली. 

                                                 तसं आम्हीं भावा-भावांनी मिळून ह्यो परटाचा धंदा चालू ठेवला.   गावातल्या लोकांच्याकडनं कापडं-चोपडं जमा करून घ्यायची.बोचकं बांधून घ्यायचं.बोचकी जास्त आसली की,घरातली सगळी जाणती माणसं असायची....बोचकी डुईवर घ्यायची ती सरळ नदी गाठायची. धडूत्यांचा मोठा ढीग सपय खडकावर वाळ्या जाग्यावर ठेवायचा.आणि मग सकाळच्यापारी आमचं काम सुरू.काठावरच्या सरळसोट धोंड्यावर एकेक कापडं धुवायला घ्यायची.आताच्यासारखं त्यायेळला साबणसुबन कुठला..? नदी-वताडाच्या काठानं पांढरी माती असायची जितनी शाडवागत..ती माती घ्यायची तिचा मुटका करायचा.आणि कपड्याला घासायचा...चिवट तेलकट डाग आसू दे न्हाई तर कसली भी मळ असू दे की,मळकी कापडं माती लावली आणि पाण्यात खुदबळून जरा बाहीर काढली की,कशी लख्ख निघायची...एकेक धडुत हातात आलं की कसा चेव चढायचा म्हणतूस...धडुत कशी लख्ख व्हतील इकडं सगळं ध्यान.पर हां... लई घासाघीस करून चालायची न्हाई..कापडं धुताना इकडं कपड्याचा मळबी गेला पाहिजे आणि पहिल्यासारा त्याचा रंगबी राहिला पाहिजे यासाठी जपून धुवाया लागतं. बड्या घरची...परलोकांची कापडं..कुठं फाटलं-उस्तारलं बटाण बिटान तुटलं तर बदमाल नको म्हणून जिकिर असायची.

                                                  मोठ मोठ्या लोकांची कापडं आमच्याकडं धुवायला आसत.गावातल्या बामनं,पाटलाच्या घरची कापडं सर्रास धुवायला आमच्याकडच.ही आमची हक्काची गिऱ्हाईकं म्हणायची.एकेक कापडं धुऊन- पिळून नदीकाठाच्या वाळ्याखड दगडावर ठेवायची आणि सारं धुऊन झाली की, उघड्या पडीवर..कुठं वाळ्या जागी वाळत घालायची.. माणसं जास्त असली की,एकानं धुवायची, एकानं पिळायची आणि एकानं ते सपय जाग्याला वाळत घालायची.चांगली सोकली- वाळली की,मग एकेक करून त्याच्या घड्या घालायच्या.ते एकावर एक येवस्तीर मांडायचं नी फडक्यात बांधून ते बोचकं घेऊन घरला परतायचं.आख्खा दिस याच व्यापात जायाचा.सांच्यापारी ज्येची त्येची कापडं परत द्यायची.जशी घेतली तशी कापडं त्येंच्या सोध्यान करायची.पर कधीमधी कापाडाची हेंच त्येला आन त्येज हेला अशी गफलत व्हायची...पण लोकं कायबी बोलायची न्हाईत...परीटमा हे जरा बदलून आलंय बघ कुणाचं.हे कायआमचं नव्ह बा... तवा मग वळख पटवून ज्येचं त्येला द्यायचं...आता एवढी गावमुलखाची कापडं  म्हटल्यावर कापडांच्या धबडग्यात अशी चूक कंदीतरी व्हायची...चालायचंच. जास्त मळकी डागाबिगाची कापडं लख्ख निघाल्याली बघून एखादी मालकीणबाई खुश व्हायची..."परीटमामा...कापडं चांगली धुतल्याती." आस आनंदाचं दोन शबुद म्हंजी ती आमची  शाबासकी म्हणायची नवं का.? आमच्या कष्टाचं ते चीजच म्हणायचं...तेवढ्यान मन भरायचं आमचं.नाही तरी पयल्या काळी आमच्या या कामाला दाम मिळत नव्हतं.. पोटाला पॉट भरून दोन येळला जेवाण मिळायचं...दोन वक्ताच्या जेवणासाठी गावची कापडं आम्हीं धुवायचो...

                    काळ माग पडला फकस्त पोटच्या भूकंसाठी राबनं परवडना..माझ्या पोटाला पाच लेकरं झाल्याली.घरात एकाची दोन दोनाची चार...खाणारी तोंडं वाढली...गरजा वाढल्या..गरीबीनं म्हणा वा आमच्या नशिबानं म्हणा आम्हांला एक शाळा शिकता आली न्हाई.. पण एक ठाणलं व्हतं काय बी व्हवू दे जमलं तसं पोरास्नी शाळा शिकवायची..आणि मग पोरांस्नी बजावूनच ठिवलं व्हतं पयली शाळा मग बाकीचं काम.या काळात कापडं धुण्याच्या मोबदल्यात लोकांच्याकडणं बैतं (धान्यस्वरूपात मोबदला)घ्यायला सुरुवात झाली.गावातली आयगारी (सुतार,लोहार,चांभार,कुंभार) लोकं जशी कामाच्या मोबदल्यात वर्षाची बिदागी घेत्यात तसं आमच्या समाजातही सुरू झालं.एखाद्या कुटूमांकडं बैतं ठरायचं. मग भात, शेंगा,दाणदुनं असू दे जे चांगलं पिकल ते धान पदरात पडायचं. त्याबदल्यात वरीसभर त्या घराची कापडं चोपडं धुवून द्यायची...एखादी कुळविन (शेतकरीन) आपल्या लेकराचं धडूत चांगलं धुवून देण्याच्या बदल्यात हौसनं घरातल्या बापयमाणसांच्या माघारी सूपभरून धान वाढायची.कुणी आपल्या घरातली जुनीपानी कापडं, जुन्यारं घालायला म्हणून द्यायची.ती आम्हाला, आमच्या  लेकरांच्या उपेगाला पडायची.

                            गावच्या म्हाईला (जत्रेला) आणि दसऱ्याकडं ,कवा आदनमधन वाकळाबी धुवायला घ्यायचो.म्हाताऱ्या माणसाचं पटकं रंगवायला घ्यायचं. गावात  रंगवायची सोय नसायची त्यायेळला तवा कुठं ठिकठिकाणी हे काम करून दित असायचीत तितनं रंगवून आणून गिऱ्हाईकाला पोच करायचं.लगीन घराची कापडं धुवायला आमच्याकडं असायची.आनंदाघरची कापडं असली की बिदागीबी चांगली मिळायची..लगीन मंडपात चांगला मान मिळायचा...तसं तर लगीन कार्यात पाट पुजायचा..तळी मांडायचा मान आमच्याकडंच आसतोय म्हणायचा..उलट आणि नवरा नवरीच्या डोक्यावर चांदवा (चादरी) धरायचा तो आम्हींच..बाळंतीण बाईची-बाळाची धडूतीबी आमच्याकडं धुवायला असायची..अगदी घरच्यावाणी आम्हीं करायचो.कशाची आशा नसायची पण बाळाच्या बारशात आमच्या घरच्या कारभारनीला लोकं हौसनं झंपरपीस- पातळ नेसवायची,चांगला मान दिला जायाचा.

                                    दिवाळीत गवळण्या घालत्यात आणि शेवटाला त्या गवळण्याचा वाडा घातला जातोय...तो वाडा पुजायचा मान आम्हांला मिळतोय.लोकं आम्हांला त्यो वाडा पुजायसाठी घरी बलवत्यात. "दिन दिन दिवाळी गाई म्हैशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या.."असं म्हणत त्या वाड्याची पूजा करून आरती म्हणायची...पयल आम्हीं बा संग आस दरवरसी वाडा पुजायला कुरवाड्याच्यात जायाचो..आता आमची लेकरं आमच्यासंग येत्याती.दुःखासुखाला आमचा परीट समाज कधीबी उभा ऱ्हातोय...गावात कंच्याबी घरी कोण वारलं की..त्या सुतकात आकंड घरातली कापडं आमच्याकडं धुवायला...बाराव्याच्या कार्यक्रमापतोर ती कापडं धुवायची... त्येचा मोबदला कधी मिळल...किती मिळल असलं ध्यानीमनी पण नसायचं...आवं आपलं कामच त्ये...केलंच पायजे. कसली आशा नाही पण लोकं लई प्रामाणिक...त्यांचं उग्र-निग्र काढल्यालं.. त्येंच्या ध्यानात असायचं बरं...न चुकता आपुलकीनं बिदागी...मानपान द्यायचीत...याआमचा परीट समाज दांडगा मेहनती..वरीसभर त्याच्या हाताला काम.पर आमच्या काळी जुनी माणसं सांगायची परटाची लोकं कुस्तीतबी भारी हुशार...समोरच्या पैलवानाला कुशालीन चितपट करणार.म्हणूनच म्हण 'धोबीपछाड' ह्यो डाव परटानींच शोधला असं पयली लोकं सांगत व्हती.

                                         भैरोबा आमचं कुळदैवत..तरीबी जोतिबा,खंडोबा,मरीआई,येडाबाई, भवानीदेवी या देवांचीबी पूजा आमच्या समाजात करत्यात.आमच्या इतनं जोतिबा जवळ हाय वरसातनं जोतिबाच्या दर्शनाला जाताव.तसाच आमच्या समाजात एक जिताजागता देव व्हवून गेला..लई थोर माणूस..माणसातला देव..आमचा परमेश्वर संत गाडगेबाबा महाराज...माणसानं कसं ऱ्हावं.. कसं वागावं..बोलावं..आमचं महाराज गाव गाव फिरून किर्तनातन सांगायचं..हातात झाडू घिऊन गांव साफ करायचं...आवं गाडगेबाबा माणसांच्या मनातला मळ घालवायचं तसा आमचा परीट समाज माणसांच्या कपड्यांची मळ घालवतोया...बाबांचं इचार आम्हीं आमच्या मनात जपतोया बघा.बाबांची जयंतीबी आमच्या समाजात साजरी व्हती.कुठं कुठं चांगला कारेकरम करत्यात.

                                           गावच्या देवाची मातूर वस्तरं.. काय आसल त्ये कापडं-चोपडं... आमच्याकडं धुवायला असत्यात... ज्या गावात परीट न्हाई त्या गावच्या देवाची वस्तरं आम्हीं धुऊन देतो...म्हाई... दिवाळी, दसऱ्याला ददेवाच्या दरबारात दिवटी धरायचा मान आम्हाला मान मिळतोय..तर कुठं दुसऱ्या भागात आमच्या समाजाला आबदारी धरायचा मान मिळतोया.पण ही फकस्त सेवा म्हणून करायची...अजून ही तरी चालरीत चालू हाय म्हणायची...पयल्या काळी देवाचा कायबी कारेकरम आसला की तवा भांड्यात भात शिजवायचा आणि तो खाली फडकं हातरून त्यावर वतायचा त्ये फडकं आमच्याकडलं असायचं. त्या फ़डक्याला 'पडद' म्हणायचं. ही पडद आमच्या भाऊबंदकीत दर वरसाला आलटून पालटून यायची. आमच्या काळापतोर तरी सगळं चालू व्हतं पर खरं सांगायचं तर आताच्या काळात ह्या साऱ्या चालीरीती मागं पडत आल्या  म्हणायच्या..आणि तसं तर पयल्यासारं कोण करतंय ह्यो परटाचा धंदा.आता माझंच बघा की माझी दोन पोरं लई काय न्हाई थोडीफार शिकली..धाकटं तरी चांगलंचं शिकलं आणि शहरातल्या शाळत मास्तर म्हणून डसलं. पोरं करती धरती झाली..आमचा परटाचाचं नव्ह हरेक नमुन्याचा उद्योग करत्यात..पोरांनी आता शेतीबी घेतलीया.चार एकर शेती हाय..ऊस करत्याती... बक्कळ पैसा कमवत्यात... आता पयल्यासारं न्हाई ऱ्हायलं.जे बापानं केलं ते लेकानंबी करावं..आता ही आमची म्होरची पिढी  शिकली सवरल्याली हाय...लाथ मारील तिथं पाणी काढणारी हाय ती.आता कुठं कुठं तरीच म्हणायचं आमचा परटाचा धंदा,तर कुठं आपला परटाचा कामधंदा बघत शेती-उद्योगबी करत्यात म्हणायचं.

                                           आता हे काय आमच्या परटाच्या समाजातच बदल झालाय आसं न्हाय. सगळीकडंच ह्यो बदल झालाय..दुनियाच बदललीया म्हणायची.लांबच कशाला जवळचंच बघा की, आमच्या गावांत चांभाराची धा घरं हाइत.पण जुनी माणसं सोडली तर अलीकडच्या एकाबी पोराला चप्पल लावायला इत न्हाई...चांगली शिकून सवरून मोठ्या हुद्द्यावर काम करत्यात.शिक्षणानं सगळीकडं सुधारणा झाली बघा आमचा तर समाज बऱ्यापैकी सुधारलाय.अलीकडची पोरं चांगली शिकूनसवरुन कुठं सरकारी खात्यात...कुठं खाजगीत मोठया हुद्द्यावर काम करत्यात...एकेकाळी फक्त पोटासाठी काम करणारा आमचा समाज आता.कोण शेती,व्यवसाय,नोकरी करून आपापली प्रगती करतोया...पण आपला परटाचा धंदा मागं पडला म्हणायचा...शहरठिकाणी तेवढा जेमतेम सुरू हाय पण इकडं खेडंगावात कुठं कुठं तरी न्हाई तर बंदच पडल्यातच जमा म्हणायचा..

                                             आता ही इस्त्रीची दुकानं थाटल्यात ती बऱ्यापैकी आमच्या समाजातल्या लोकांनी...इस्त्री करत्याती ती डराय किलनिंग का काय ती बी करत्यात..आणि कोण आणखीन कसला कामधंदा करत्यात..बऱ्याचजणांनी रोजीरोटी,नोकरी-व्यवसायाच्या निमित्तान शहरं गाठली...तिथंच स्थायिक झाली.पयलं माणसांकडं कायबी नव्हतं पण एकमेकासाठी येळ व्हता..आज घड्याळाच्या काट्याची गुलाम झालीत ही माणसं..कुणाकडं हाय का कुणासाठी तासघटका येळ...नुसती गरा-गरा घिरट्या घालीत असत्यात पैशाभवती...एकेक काळी नुसती पोटासाठी राबणारी आम्हीं माणसं कुणाला सांगून पटल.. आता पैशाला किती म्हतवं आलं,जो तो पैशाच्या मागनं.आपल्या गावात आता आमची आठ घरं हाइत आता कोण किती आपला धंदा करत्यात..? जेमतेम तेवढं आपलं सुरू हाय..जे इथं ते जगात.आता लोकं कुणावर इसमून नाहीत ऱ्हायली.हल्ली बघताईसा नव्ह माणसांची जागा आता यंत्रातंत्रानं घेतलीया..माणसांची कामं आता मिशीन करत्याती...जशी पीठ दळणारी मिशीन घरात आली तशी कापडं धुणारी मिशीनबी घरात आलीया.शहरातनी मोठं मोठ्या लोकांच्याकडं कापडं धुणारी मिशीन सर्रास असतीया.इकडं कापडं घालायची... तिकडं वाळूनच कापडं बाहीर...सगळं कसं झट की पट.कुठं जायाचं न्हाई...कसला त्रास न्हाई..

माणसाकडं आता सगळं हाय पण एकंच न्हाय... येळ...आवं आता परटाच्या घरात जरी कापडं धुवायची मशीन आली तरी नवल वाटायला नगो."

....तात्यामा बोलत व्हता...बोलतच व्हता...भूतकाळातून आता त्यो वर्तमानात आला व्हता.


               - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)

                ता - भुदरगड, जि-कोल्हापूर.                

                मोबा- ८८०६७३७५२८.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे.

 


'बहिरेवाडी गावच्या योगदानाचा, शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बलिदानाचा देशाला सार्थ अभिमान आहे'.

                                     भारतीय सीमेवर  पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खडे ठाकलेले वीर जवान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे वीर सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना वीरमरण प्राप्त झाले.शेतकरी कुटुंबातला ऋषिकेश (जन्म ४ जून २०००) .वडील रामचंद्र जोंधळे आणि आई कविता रामचंद्र जोंधळे...बहीण कल्याणी असं हसतखेळत छोटसं सुखी कुटूंब.ऋषिकेशचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावच्या भैरवनाथ हायस्कूल शाळेत झालं.तर पुढील शिक्षण शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे झालं.उपजतच हुशार आणि विशेषतः अंगात खिळाडूवृत्ती. डॉजबॉल या खेळप्रकारात विशेष कौशल्य होते.अनेक क्रीडा स्पर्धेत त्याने आपली निपुनता दाखवून दिली, पदके पटकावली.तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.अंगी खिळाडूवृत्ती होती तसेच मनात एक जिद्द होती की,भारतीय सैन्यदलात भरती होऊन प्राणपणाने आपल्या देशाची सेवा करायची. वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय असल्याने हा व्यवसाय ऋषिकेशने सांभाळावा अशी वडिलांची अपेक्षा होती.त्यातच एकुलता एक मुलगा म्हटल्यावर कुठल्या बापाचा धीर होईल आपल्या लेकराने एवढी मोठी जोखीम पत्करावी म्हणून.पण देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या पोराला कोणी थांबवू शकलं नाही आणि अखेर २०१८ ला ऋषिकेश सैन्यात भरती झाला.

मराठा लाईफ बटालियन इन्फट्रीमधून देशसेवेच्या कार्यात रुजू झाला.उरातल एक दिव्या स्वप्न साकार झालं होतं.आईवडिलांनाही एकीकडे आनंद आणि अभिमान वाटत होता.या आनंदाप्रित्यर्थ जोंधळे परिराने आपल्या गावाला स्नेहभोजन घातले होते.सगळं कसं सुरळीत चालू होतं.

                                       कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे ऋषिकेश गावाकडेचं अडकून पडला होता. पण आपल्या कर्तव्याची जाणीव त्याला स्वस्त बसू देत नव्हती.आणि म्हणून मग जून महिन्यातच ऋषिकेश पुन्हां आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी नव्या जोमाने उभा ठाकला.पण आपल्या समोरचा शत्रू जो कधी सुधारत नाही आणि कधी सुधारणारही नाही..ज्याची खुल्या रणांगणात आमच्याशी बरोबरी करण्याची कधी हिंमतचं होत नाही.म्हणून वारंवार पाठीवर वार करणारा भ्याड शत्रू. ज्याला शत्रू म्हणवून घेण्याचीही लाज वाटते असा पाकिस्तान. या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरजवळील सीमेवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला पण आमच्या हिंमतबाज भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे ११ सैनिक अनेक चौक्या,बंकर उध्वस्त केले.आजवरचे सर्वात मोठे नुकसान केले.इकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना तिकडे आमचे हे वीर जवान शत्रूवर  गोळीबारांचा धुमधडाका करीत होते.प्राणाची बाजी लावून होळी खेळत होते.पण दुर्दैवाने आमचे चार सैनिक या चकमकीत शहीद झाले.महाराष्ट्रातील काटोलचे सुपुत्र नायक भूषण रमेश सतई व कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावचा आमचा थोर सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले.जिथे चकमक झाली तो  इलाका पहाडी व किर्रर्र  जंगलाचा होता.दोन अडीच तास चाललेल्या या चकमकीत शुक्रवारी दुपारी १:१५ दरम्यान ऋषिकेशला विरणमरण प्राप्त झाले.

                                                      दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच अवघा बहिरेवाडी गाव शोकसागरात बुडाला..दिवाळीचा एवढा भरला सण...पण गावात एकाही दारात पणत्यांची आरास सजली नाही..आकाशकंदील पेटला नाही की दारात रांगोळीचा सडा घातला गेला नाही.

'पणत्या मुक्या झाल्या

आकाशकंदील विझले

कशी करावी साजरी दिवाळी

आमच्यासाठी लेकरू प्राणाला मुकले.:

 आज तीन दिवस झाले बहिरेवाडी गाव आणि आख्खी पंचक्रोशी आपल्या या लाडक्या वीर सुपुत्राच्या पार्थिव देहाची शोकमग्न अवस्थेत डोळ्यांत प्राण आणून वाट पहात होता.आणि अखेर आज पहाटेला तिरंग्यात लपेटलेला पार्थिव देह फुलांच्या माळांनी सजलेल्या बंद पेटीतून आपल्या मायेच्या गोतावळ्यात दाखल झाला. देशापायी कामी आलेल्या आपल्या एकुलत्या एक लेकराचा पेटीबंद असलेला निपचित देह पाहून त्या आईवडीलांनी ,पाठच्या बहिणीने फोडलेला हंबरडा.जिवाच्या आकांताने केलेला आक्रोश..उपस्थितांचे मन पिळवटून टाकत होता.आपल्या लाडक्या वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी बहिरेवाडी गावी आज अवघा जनसागर लोटला होता.माणसांच्या दर्याला जणू भरतीच आली होती.जागोजागी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करणारे किती तरी मोठं मोठे होर्डिंग्ज दिसत होते.ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव देह असलेली पेटी ठेवलेली.फुलांच्या माळांनी सजली होती.. फुलांची आरास थाटली होती.ज्या गल्लीतून ज्या गावातून ऋषिकेश लहानपणापासून बागडला...दौडलेला होता..त्या वाटेवरून शहीद ऋषिकेशची अंतिम मिरवणूक काढण्यात येत होती.गल्लीतून लोक दाटीवाटीन डचमळत पार्थिवाचे दर्शन घेत पुढे सरकत होते.घरादारासमोर आयाबाया भरल्या डोळ्याने अखेरचे दर्शन घेत होत्या.इवलासा जीव सुद्धा ती अंत्ययात्रा पाहून हुंदके देत होता. तरुण वर्गाची उपस्थित लक्षणीय होती..आजूबाजूच्या पंचक्रोशीतून  तरुण वर्ग या अंत्ययात्रेत सामील झाला होता...अवघे वातावरण ऋषीमय झाले होते.

'अमर रहे अमर रहे ऋषिकेश जोंधळे अमर रहे.'

'जब तक सूरज चांद रहेगा ऋषिकेश तेरा नाम रहेगा.'

'भारत माता की जय'

अशा घोषणांनी अवघा परिसर निनादत होता.अवघे आबालवृद्ध आपल्या लाडक्या वीर जवानाला निरोप देण्यासाठी आले होते.एखादी माऊली कडेवर नकळतं लेकरू घेऊन या अंत्ययात्रेत सामील झाली होती.

                                  भैरवनाथ हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणात शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.अवघी अलोट गर्दी पटांगणात सामावली.जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवर आणि आजी माजी सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.ज्या पटांगणात  ऋषिकेश खेळला त्याच्यातला खेळाडू घडला.आपल्या दौडत्या पायाने जी माती चौखूर उधळली तिच्या उरावरचं ऋषिकेशच्या अंत्यसंस्कारासाठी चबुतरा बांधलेला होता.त्या चबुतऱ्यावर रचलेल्या सरणावर तो निपचित देह ठेवला.आणि मग ऋषिकेशचा परिवार अंतिम मुखदर्शन घेऊ लागला पोटच्या गोळ्याला डोळ्यांत मनात किती किती भरून घ्यावं...आता केवळ ते गोजिरवाण निपचित रुपडं मनात साठवून ठेवावं...आता माझा ऋषिकेश पुन्हां कधी डोळेभरून दिसायचा नाही.आता ही शेवटचीचं छबी हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी आयुष्याच्या हयातभर तिला रोज मनात आठवावी.आईबापानं लेकराकडं घेतलेली ती झेप..दुःखान घायाळ झालेली बहीण सर्वांचा आक्रोश. साऱ्यांच्या नेत्रकडा ओल्या करीत होती...अवघी माणसांची गर्दी सदगदीत होत होती.

                                            आज भाऊबीज आणि या शुभदिवशी असा दुर्दैवी क्षण एका बहिणीच्या वाट्याला यावा...सरणावरती निपचित पडलेल्या आपल्या भावाच्या पार्थिव देहाला अश्रूंचा अभिषेक घालून दुखऱ्या घायाळ अंतकरणाने बहिणीने हातात निरांजनेचं ताट घेऊन ओवाळणी करावी...

ओवाळणी म्हणून काय मागावं तिनं आपल्या लाडक्या भावाकडं..?.आजच्या भाऊबीजेला आपल्या जिवाभावाच्या लाडक्या दादुचा जीव कोणी परत आणून देईल का तिलाओवाळणी म्हणून..?.आजच्या दिवशीचा तो कठोर कटू प्रसंग म्हणजे बहीण भावाच्या ताटातूटीचा न बघवणारा सर्वात मोठा दुःखी प्रसंग...बघणारे डोळे पाणावून गेले.. अवघी हृदये दुखवेगाने डचमळून गेली.दाटलेल्या कित्येक हुडक्यांना कंठ फुटले...आपल्या लाडक्या दीदीचं लग्न ठरलं होतं.. साखरपुडा झाला होता..थाटामाटात लग्नं पार पडायचं होतं.घरादाराला खुप आनंद झाला होता. पण ऋषिकेशच्या अशा जाण्यानं साऱ्या आनंदावर विरजण पडलं...आता आपल्या लाडक्या दिदीच्या लग्नात भाऊ म्हणून कोण मिरवेल.. पुढं होऊन सगळं कोण लगबगीनं पार पाडेल...? माहेरपणाचा भरभक्कम आधार म्हणून तिनं कोणकडं बघावं..? मनात येणाऱ्या अशा विचारांनी मन तीळ तीळ तुटतं तिथं त्या बहिणीच्या मनाची अवस्था काय होत असेल.? 

                    पोलीस दल व भारतीय सैन्य दलातर्फे हवेत फैरी झाडून आपल्या देशवासियांच्या तर्फे अखेरची मानवंदना ऋषिकेशला देण्यात आली.


       आणि अखेर लालबुंद ज्वाळानी आमच्या लाडक्या जवानाला कवेत घेतले...गर्दीच्या डोळ्याला पान्हा फुटला..जे लेकरू जिच्या छायेत मायेत वाढलं जिच्या अंगणी खेळलं बागडलं शिकलं सवरलं.. आणि आज देशाच्या कामी आलं ती ऋषिकेशची शाळा मूकपणे आपल्या लेकराचा अंतिम दर्शन घेत ते अंत्यसंस्कार भरल्या अंतःकरणाने पाहत होती...तिचाही उर आज अभिमानाने भरून आलं असेल..पण मूकपणे ती ही आतल्या आत रडत होती..

                                कुठून येते एवढी जिगर.अवघ वीस वर्षांचं कोवळं वय..ज्या वयात जीवनाची मजा लुटायची..eat,drink and be happy 'ये दिल मांगे मोर खाओ पीओ मजा करो...' अशा दळभद्री जगण्याला ठोकर देऊन आपल्या देशासाठी अवघ जीवन वाहणारी अशी लेकरं जन्माला येणं..हे खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांचं आणि त्या देशाचं खुप मोठं भाग्य आहे...धन्य धन्य ते मातापिता असा जिगरबाज कर्तृत्ववान पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला...'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा'

बहिरेवाडी सारख्या मातीत जन्मलेला हा शूर वीर  सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करता करता धारातीर्थी पडला. भारतमातेला आपला रक्ताभिषेक करून आपल्या मातीची..गावची आईवडिलांची..देशाची आण बाण शान राखून जीव बहाल करून गेला...मरणार तर आपण सगळेच आहोत..पण डोक्याला कफन बांधून निधड्या छातीने देशासाठी लढणारे आणि लढता लढता असं मरण वाट्याला येणारे खरे भाग्यवान तेच असतात..आणि त्यांच्याच वाट्याला असा मरणाचा देखणा सोहळा लाभतो.ज्याला देशासाठी मरण आलं पण ते  कधीच मरत नसतात..ते तर त्या दिवसापासून अमर होतात.

                          मायबापा आपला लेक कुठंही गेला नाही तो आज अवघ्या देशवासियांच्या हृदयी विराजित झाला आहे...तो कळीकाळालाही पुरून उरणारा आहे..

सरणावरती जळती जरी आज आमुचे प्रेते

या राखेतून जन्म घेतील उद्याचे भावी  नेते 

आपल्या ऋषीकेशच्या पराक्रमाची  गाथा इथे प्रत्येक माणूस गाईल..त्याच्या विंरमरणाची.प्रेरणा घेऊन इथल्या प्रत्येक घरांत घरात असा ऋषिकेश जन्माला येईल जो देशसेवेच्या कार्याला वाहून घेईल..आणि कल्याणीदीदी तुझा भाऊ कुठेही गेला नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे..तू कधीही दादा म्हणून हाक मार...अवघा महाराष्ट्र भाऊ या नात्याने तुला प्रतिसाद देईल..भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.आमच्या शूर वीर ऋषिकेशचे बलिदान वाया जाणार नाही..सीमेवर असणारा माझा प्रत्येक सैनिक त्या कडेकपारीत ओघळलेल्या ऋषिकेशच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेईल...

सरफरोशी की तमन्ना 

अब हमारे दिल में है !

देखना है जोर कितना,

बाजु ए कातिल में है ?

                               या देशाच्या उभारणीत बहिरेवाडी गावाने खुप मोठे योगदान दिले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक सारखे  रत्न देशाला दिले..तसेच वीर जवान प्रवीण जानबा येलकर आणि आता शहीद ऋषिकेश जोंधळे यांसारखे वीर सुपुत्र या गावाने देशाला सुपूर्द केले. देशकार्यात बहिरेवाडी गावचे असलेलं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही..बहिरेवाडी गावचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो.


शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण आदरांजली...

वीर जवान तुझे सलाम

जय हिंद जय भारत..


शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

बालकविता - चांदोमामा चांदोमामा - किरण चव्हाण.


 

"चांदोमामा चांदोमामा..."


चांदोमामा चांदोमामा

या ना एकदा घरी

रोज वाट पाहतो मी

उभे राहून दारी.


चांदण्यांना घेऊन या हं

तुमच्या बरोबरी

गप्पा मारू मिळून सारे

मज्जा येईल भारी


छान छान गोष्टी सांगा

ऐकू आम्हीं सारी

जराशीही चुळबूळ 

करणार नाही.


नाचू गाऊ मिळून आपण

धमाल मस्ती करू

तुम्हींच किती फिराल

आम्हीं तुमच्या भोवती फिरू.


खुप खेळून दमून भागून

थोडी विश्रांती घेऊ

हवं तर मग पुन्हां

 आपण शिवपाट्या खेळू


तुमच्यासाठी आई बनवेल 

तुप रोटी मऊ

अंगणात बसून आपण 

सारे पोटभर खाऊ.


मग शेवटी सांगा तुम्हीं

कशा बदलता हो कला

हळूहळू छोटे कधी मोठे 

होता कळत नाही मला


आकाशातले घर तुमचे

आहे तरी कोठे..?

फिरायाला अंगणही असेल

किती मोठे..


खूप काही बोलायचंय 

एवढं मनावरती घ्या ना.

नका आता उशीर करू

तुम्हीं भेटायाला या ना..

 

 चांदोमामा बघा हं 

मी तुमची वाट पाहेन

नाही आला तर तुमच्याशी

'गट्टी फू' चं करेन


याल ना हो चांदोमामा 

तुम्हीं माझ्या घरी.

सोडेन ना हो तुम्हाला 

मी नक्की वेळेवरी.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

आजी सोनियाचा दिनु - काकाजींचा जन्मदिन विषेश.

             

             🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकांजीचा जन्मदिन...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

"अद्वैताचं लेणं करू शब्दसुमानांनी लिंबलोण"

🌸🌸🌺🌺🌼🌼🌹🌹🌼🌼🌷🌷🌸🌺🌻🌺


इं - द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी..

ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी


द्र - वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने

धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी प्रत्येक तने-मने.


जी - वा सवे जीव जडण्या मायेचा धागा गुंफती आपुली वचने.

चांगुलपणाच्या सुवासाने दरवळतात इथे सुमने..


त - याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी

अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.


                     बापा...कंचे शब्द आपल्या चरणावरी घालावे...कंच्या शब्दांचा सेतू बांधावा आपुल्या पवित्र हृदयी भेटीसाठी... पण इथे का म्हणोनि शब्दांवरी भार घालावा...की जे...

'आपणची ठावें आपणासी' आपला ठाव आमच्या हृदयी विराजितआहे.. शब्देविन संवादीजे... बापा आपल्याशी संवाद सांधण्यास शब्दांची गरज नाही... आमच्या भावना आपुल्या हृदयी रुखातंळी निजभावें विसावण्यासाठी शब्दांविना ओढ घेत असतात...बापा आपण अद्वैत...अखंड...रूपे अनके जरी आपण एकरूप...आपुला एकची जिवात्मा...जैसे देह अखंड.. करंगळीस दुखावे आणि डोळीयाने पाणी भरावे... तैसें बापा आपुले नाते...अखंड भरलेले...

                  बापा आपुली भेट म्हणजे भुकेलिया चिमुकल्या बाळा माय गवसावी.आणि ..आणि वाणी..? ती वाणी म्हणजे दुधाअमृताच्या धारेने तान्ह्या लेकुराची तृप्तता व्हावी...आमच्या ज्ञानामृतांची धार.आसवल्या तृष्णमनानी ती घोटावी...आणि तृप्तीच्या आनंदाचा लाभ भर भरोनी घ्यावा...आपुल्या सहवासी मायेची अनुभती येते...जसे माहेरी आलेल्या लेकीचा मायेच्या भेटीत सारा सोस गळून पडावा ती बंधनातून मुक्त व्हावी.मायेच्या पुढ्यात लहानगी होऊन ती पुन्हा आनंदावी..सुखाने हारपुन जावी..तैसे बापा आपुल्या भेटीत आम्हां जीवनाचा सोस गळून पडतो...आनंदांचा आवारू आम्हांस गवसतो...बापा दुःखाचा भार हलका होतो.नी आपल्या सहवासाच्या अंगणी आम्हीं सुखाने हारपुन बागडतो...

               बापा तूच आमचा पंढरीचा विठोबा...आमचा ..निवृत्ती....ज्ञाना... सोपाना...मुक्ताई,एकनाथ,नामदेव,तुकोबा..सर्व काहीं...अवघ्या संतांच्या मांदियाळीशी भेट घालून देते आपली वाणी...वाटते की तिच्या वर्षावी चिंब चिंब भिजोनी...शिरावरी नाचावे घेवोनी...काय सांगू बापा आपली ओघवती वाणी म्हणजे विचारांची चंद्रभागा आणि संस्कारांची इंद्रायणी.जिच्या काठावरी बैसोनि "ब्रम्हांनंदी सदा डुलतू.." अशा स्वानंदात तल्लीन होण्याची प्रचिती येते.

             एक तरी ओवी अनुभवावी..तैसे "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक" हा माऊलींचा संस्कार जनीमनी पेरून अवघ्या मानवांच्या हृदयी  चांगुलपणाचा मळा फुलवण्यासाठी रातंदिस कष्टत असता...अवघ्यांना एकोपी आणून आनंदाचे आवारू जगी मांडत असता...

                  ऐसें आमुचे माय-बाप हृदयाचे काकांजी...

धन्य ते माता-पिता...ज्यांचे पोटी आज दिनी असे रत्न जन्मासी आले...शुद्धबिजापोटीचे हे रसाळ, गोमटे फळ...ज्याचे गोडवे गावे किती..?.वर्णावे किती...?चाखावे किती..?.आज सोनियाचा,पुण्याचा दिन अशा दिनी आमचे अद्वैत जन्मले.इंद्रजीत देशमुख काकांजी.

आमच्या या अद्वैत गुरूंचे आज कशाने लिंबलोण करू...?

 अखेर घालूनिया शब्दांवरीच भार करितो शब्दसुमनांची उधळण ...

पंचप्राणांच्या ज्योती लावूनी.. 

हृदयाचे निरांजन करोनी करितो बापा तुझी ओवाळणी.

अंतःकरणपूर्वक वाढदिनीच्या शुभेच्छा अपूर्ण करितो आपुल्या चरणी...

परमेश्वरा एकचि मागणे तुझ्या ठायी...

 निरोगी,उदंड आयुष्य लाभू दे या माया बापास....

सर्व इच्छा..आशा-आकांक्षा जावो पूर्णत्वास...


बापा...काकाजी आपणासी अनेकवार वाढदिवसाच्या अंतःकरणपूर्वक अनंत शुभेच्छा....


         🙏राम कृष्ण हरी.🙏


       "जय हो..!मंगल हो.".!!


'आपलीच लेकरं...शिवम साधक... शिवम परिवार.'


सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

'मृत्युंजया कोमलदीदी...' - किरण चव्हाण.

 


                  'मृत्युंजया कोमलदीदी...'

काल तर आमच्यात होतीस आणि आज अशी अचानक आम्हांला सोडून गेलीस.?
नाही अजूनही विश्वास बसत..
वादळवाऱ्याशी झुंजणारी पणती अखेर विझली..?
कालपर्यंत तर तेवत होती ना...उजळवत होती आपला भोवताल...
किती निखळ, निरागस, स्वछंदीपणे लखाखत होती...
मृत्यूच्या काळ्या छायेत दडलेल्या..
चाचपडणाऱ्या जीवाला जगण्याचा प्रकाश दाखवत होती...
असहाय्य वेदनेने विव्हळणाऱ्या जीवांच्या जखमेवर फुंकर घालत होती.
नियतीने किती छळलं ना तुला..? 
किती यातना.. वेदना दिल्या..
तरी सगळं सहन करीत राहिलीस.
कधी हार मानली नाहीस,डगमगली नाहीस.. 
लढत राहिलीस धीरोदात्तपणे.
जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने अखेर मृत्यूवर मात केलीस आणि तू झालीस मृत्युंजया..
जगता जगता अनेकांना  जगण्याची प्रेरणा देत राहिलीस..
जीवनप्रेरणा बनून गेलीस.
किती भरभरून जीवन जगत होतीस.
प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत होतीस.
ज्याने तुला अवयवदान केले...
ज्यांच्यामुळे तुला जीवदान मिळाले.
त्यांना क्षणाक्षणाला धन्यवाद देत राहिलीस..
अवयवदानाचे कार्य हे तर तुझ्या जीवनाचे ध्येय बनून गेले.
झपाटून कार्य करत दुर्धरांना मुक्त करणे हेच जीवितकार्य ठरले.
पण माहीती होतं तुला...?
मृत्यू मागून तुझा पाठलाग करतोय..?
मग काय म्हणावं तुला...?
जगापासून मात्र हे दुःख लपवून तु हसत खेळत आनंदाने जगत होतीस.
कीती उरलंय आयुष्य याचा विचार कधी केलाच नाहीस..
उरलेल्या इतुक्या आयुष्यात कितुके करून गेलीस.
अखेर  गाठलेच ना त्याने तुला..
किती निर्दयी तो..
तुलाच नाही तर अनेकांच्या जगण्याची प्रेरणा घेऊन गेला.
आमच्यापासून मृत्यूने दिदी तुला हिरावून घेतलय..पण...पण देहाने.
पण कसे हिरावून घेईल तो आमच्यापासून..
दिदी तुझे विचार...कार्य...प्रेरणा...ऊर्जा...
 तु कुठेही गेली नाहीस
तु सदैव आमच्या हृदयात जिवंत आहेस आणि पुढेही  राहिशील...चिरंतन.
अवयवदानाचे बीज सर्वांच्या हृदयात तू पेरून गेलीस...तो अंकुरेल.. फुलेल बहरेल...त्याचा वटवृक्ष होईल..जिथे जिथे अवयवदान असेल तिथे तुझी प्रेरणा असेल...
तुझे अवयवदानाचे व्रत आम्हीं कायम सुरू ठेऊ.
आणि पुढे पुढे घेऊन जाऊ...
दीदी...



'अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान.'
           


खालील लिंकवर क्लिक करून कोमलदीदीची जीवनसंघर्षकहाणी वाचा.



------------------------------------------------------------------------        
"मी माझा अवयवदानाचा संकल्प केला आहे कोमलदिदीने स्वतः हे अवयवदानाचे प्रमाणपत्र मला सुपूर्द केले आहे...आपणही अवयवदानाचा संकल्प करा."





बालकविता- :'चंपू आणि ससोबा.' - किरण चव्हाण.


 'चंपू आणि ससोबा.'


एक होता चंपू त्याचा मित्र गंपू

मारत होते गप्पा चंपू आणि गंपू


चंपू बोलत होता आणि गंपू ऐकत होता

काय बरे चंपू गंपूला सांगत होता..?


रात्री म्हणे एक पडले होते स्वप्न

चंपूच्या स्वप्नामध्ये आले बरे कोण..?


दिसत होते मला हिरवे हिरवे रान

रानावरती आले सशाचे पिल्लू छान


गुबगुबीत त्याचे इवलेसे अंग

अंगावरच्या केसांना पांढुरका रंग


येऊन माझ्या जवळी म्हणतो कसा मला

चंपूदादा तुम्हीं माझ्या घरी चला


मग गेलो ना हो मीही मागून त्याच्या घरी

गाजरांची बाग होती परसात भारी.


ससोबाने मला खायाला दिले गाजर

तेवढ्यात त्याचे आईबाबा झाले हजर.


ससोबाच्या संगे मी खुप खेळलो भारी.

फिरायला गेलो आम्हीं जंगलात दुपारी


कुठून कशी ऐकू आली वाघाची डरकाळी

माझी तर पार बोबडी वळाली.


ससोबा गेले पळून मला रडू आले

तेवढ्यात मला आईने जागे केले.

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

'कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.' - किरण चव्हाण.



कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.'✊

                                                                                                कोरोना...कोरोना...कोरोना... ऐकावं...पहावं...बोलावं असं सर्वकाही व्यापून ठेवलं आहे कोरोनानं...आज संपूर्ण जगभरात या विषाणूनं थैमान घातलय... अखंड मानवजातीला हैराण करून सोडलंय..एखाद्या दुरदेशात ज्याची उत्पत्ती व्हावी आणि बघता बघता आपला देश.. राज्य...शहर..गाव आणि घरापर्यंत मजल मारावी..याचाचं अर्थ आज त्यानं कोणत्याच सीमा मागे ठेवलेल्या नाहीत.. मानवी शरीर हे त्याचं आश्रयस्थान.. माणूस हा त्याचा वाहक.. माणसाकडून माणसाकडे संक्रमण करीत सुरू असलेला त्याचा सर्वव्यापी प्रवास...माणसामाणसांची शृंखला जोडून त्याने आज जगभर आपलं जाळं विणलय.संपूर्ण जग  व्यापलंय. आणि कोरोना नावाच्या या अदृश्य विषाणूने जणू माणसांविरुद्ध युद्ध छेडलंय..दिवसेंदिवस अधिकच तो आपल्या जाळ्यात माणसाला ओढत चाललाय.

                                    कोरोनापासून सुटका करून घेण्यासाठी जेवढे काही करता येईल तेवढे प्रयत्न युद्धपातळीवर सुरूच आहे.संपूर्ण जग आज या कोरोनाशी सामना करीत आहे.आपले शासन प्रशासन डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार,आशा अंगणवाडी सेविका,शिक्षक कोरोना योद्धा म्हणून या अदृश्य शत्रूशी प्राणाची बाजी लावून लढत आहेत.तसे तर आपण सगळेजणचं त्याच्याशी सामना करतोय..पण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर विज्ञानाच्या बळावर अपूर्व प्रगती साधलेल्या मानवाला,आज हा कोरोना आव्हान देतो आहे.नेमकेपणाने त्याच्यावर कशी पूर्णपणाने मात करावी याचे उत्तर सध्या तरी मानवाकडे नाही..एका बाजूला कोरोना आपले साम्राज्य विस्तारत चालला आहे तर दुसरीकडे मानव आपल्या अस्तित्वासाठी  निकराची झुंज देतो आहे.आपल्या हातात जेवढं आहे तेवढा जोरकसपणे त्याच्या विरोधात लढा सुरूच आहे. पण परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही.आजतागायत देशभरासह जगभरात लाखो करोडो मानवी जीवांचा बळी या कोरोनाने घेतला आहे..आणि दिवसेंदिवस आपल्यावरील कोरोना महामारीच्या संकटाचे सावट घनदाट होत आहे.

                             त्यातच आणखीन एक चिंतेचा विषय म्हणजे कोरोना फक्त शरीरावरचं नाही तर मनावर देखील आक्रमण करू लागलाय.कोरोना महामारीमुळे आज कित्येक जीव धास्तावलेत,चिंतेच्या गर्तेत सापडलेत...कोरोना फोबिया आजाराचे बळी ठरलेत..मानसिक समतोल ढासळून नैराश्यग्रस्त झालेत..कोरोनामुळे जगण्याची व जीवनाची घडी विस्कटून गेलेले जीव कुठे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतायेत.तर कुठे कोण  टोकाला जाऊन जीवनाचा शेवट करून घेतो आहे...त्यात भरीस भर म्हणजे 'आजची धक्कादायक बातमी' असं म्हणून गेली आठ महिने धक्क्यावर धक्के देणाऱ्या बातम्या रोज आपल्या कानांमनावर आदळतायेत..आधीच कोरोनाच्या चिंतेने ग्रासलेल्या मनाला  माध्यमातून येणाऱ्या रोजच्या कोरोनाच्या ब्रेकींग बातम्या..अधिकच चिंतेत टाकत आहेत..

                                  सुरुवातीला ज्याला आपण लांबून ऐकलं होतं तो आता आपल्याला अनुभवायला मिळेल की काय याची कुठे तरी प्रत्येक मनांत दाट शंका आहे..कोरोना अजून आपल्या शरीरावर आक्रमण करायचा बाकी आहे तोपर्यंत अगोदरच तो आपल्या मनावर आक्रमण करीत आहे.. वरून जरी सगळं सुरळीत आहे असं वाटलं तरी मनात कुठेतरी कोरोना विषाणूने प्रचंड दहशत माजवली आहे..नेहमीसारखा साधा सर्दी,खोकला, ताप आला तरी मला कोरोनाचं झाला..आता संपलं सगळं  म्हणून लोक गर्भगळीत होतायेत..त्यांच्या मनाचा समतोल ढासळतोय. वास्तविक कोरोना झाला नसेल तरी मला कोरोना झाला आहे असे लोक स्वतःला समजताहेत म्हणजेच कोरोना फोबियासारख्या आजाराला बळी पडताहेत..कोणी कोरोनाच्या धास्तीने या जगाला हाकनाक पारखे होतायेत. तर काही कोरोनाच्या भीतीमुळे किंवा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे वा झालेल्या नुकसानीमुळे आपल्या जीवनाचा शेवट करून घेतायेत..आणि हे वास्तव कोरोनापेक्षाही भयंकर आहे....पण आपल्या हे कसं ध्यानात येत नाही की कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करून बरे होण्याची संख्या किती तरी पटीने अधिक आहे..

म्हणजे कोरोनाची मुळात धास्ती घ्यायची ती केवढी..? आपण त्या पळणाऱ्या हरणाचे उदाहरण वाचले असेल ताशी ८० कि. मी वेग असूनही ताशी ६० कि.मी वेग असणाऱ्या वाघाच्या कचाट्यात ते सापडते का तर आपण सापडणार या भीतीने..आपलेही असेच होतेय का..?आपणही असे कोरोनाच्या भीतीने ग्रासले जाऊ..गर्भगळीत होऊ, आत्महत्या करीत असू तर मला म्हणायचं आहे...आपण त्या हरणापेक्षादेखील कचदिल निघालो.. कारण शत्रू मागे असताना ते हरीण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न तरी करते पण इथे केवळ कोरोनाच्या धास्तीने आपण कोणताही प्रतिकार न करता जीवाला मुकतो आहोत...

                          लक्षात घ्या कोणतंही युद्ध असो त्याचा मुकाबला करायच्या  अगोदर आपण शरीराने आणि महत्वाचे म्हणजे मनाने सज्ज असलो पाहीजे...मला अखेरच्या श्वासापर्यंत लढायचं आहे हा मनाचा खंबीर निर्धार आताच्या काळात आपल्याला तारू शकतो.पण होतंय काय इथेच आपली फार मोठी फसगत होतेय...आपण स्वतःला एकदा प्रश्न विचारा की या कोरोनाच्या शत्रूविरोधात लढण्यासाठी आपण मनाने खरंच सज्ज आहोत का..? आणि वेळ पडलीच तर कोरोनाशी प्रत्यक्ष लढताना आपल्या शरीराला मनाची खंबीर साथ मिळणार आहे का..? नाही तर आपल्या मनाची तयारीचं नसायची मग एकट्या शरीराचा शत्रूविरोधात कसा निभाव लागेल..? साधं उदाहरण आहे कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिची पूर्वतयारी म्हणून अभ्यास करणे हा अपरिहार्य आहे.. मग ही कोरोनाची लढाई आपण आपल्या  तयारीविना कशी जिंकू आणि ती जर जिंकायची असेल तर त्याला परिपूर्ण तयारीनिशी आपल्याला सामोरे जावे लागेल.आज आपण बाह्य सज्जता घेतोय म्हणजे मास्क वापरणे,सानिटायजरचा वापर डिस्टनसिंगचे पालन करणे हे नियम आपण पाळत असू तशी जनजागृतीही केली जातेय पण आपल्या आंतरिक सज्जतेचं काय..? उद्या आपल्याला कोरोनाशी प्रत्यक्ष सामना करताना काही काळ एकांतवास स्वीकारायची.काही काळ आपल्या कुटुंबापासून ,आपल्या माणसांपासून दूर राहण्याची वेळ आलीचं तर आपण आपल्या मनाची मानसिकता तयार केली आहे काय..?आणि म्हणून बाह्यसज्जतेबरोबरचं आंतरिक सज्जताही खूप महत्वाची आहे.. आणि ती आपली आपल्याचं करावी लागेल. 

                         आणि त्यासाठी आपले विचार व कृती यांचा मेळ आपल्याला घालावा लागेल. आणि त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करू शकतो..? पहिल्यांदा मनातून नकारात्मक विचार बाजूला सारा.नेहमी सकारात्मक रहा..सकारात्मक विचार करा..खाण्यापिण्याकडे लक्ष द्या..उत्तम आहार घ्या.शरीराला आणि मनाला समतोल साधायचा असेल तर नित्यनेमाने योगासने करा ...ध्यानधारणा करा.मनाची एकाग्रता वाढवा.जे जे मनाला उर्जादायी ठरेल ते ते करा..आपले छद जोपासा..कोणाला वाचनाची आवड असेल तर मनाला बळकटी देणारी पुस्तके वाचा..लिखाणाची आवड असेल तर एखादं छानसं पुस्तक लिहून पूर्ण करा..कुणाला चित्रकलेची कुणाला संगीताची आवड असेल किंबहुना ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे त्यामध्ये मन गुंतवा..संतसाहित्यांचा अभ्यास करा..अध्यात्माशी नातं जोडा...आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.. त्यांच्या आवडीनिवडी जोपासा,आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तींशी मनमुराद सुखसंवाद साधा..ज्या व्यक्तींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्याशी संवाद साधत रहा..प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात रहा.मनात कोणत्याही प्रकारचे साचलेपण ठेऊ नका...आपले मन नेहमी प्रवाही ठेवा..निखळ बोलत रहा आपल्याकडे हक्काचे मुक्तव्यासपीठ आहे व्हाट्सएप,फेसबुक अशा समाजमाध्यमावर व्यक्त होत रहा.कोणी जर या आजाराची मुकाबला करीत असेल तर त्याला शब्दांचा आधार द्या...आपल्यावर जर ही वेळ आली आले तर शब्दांचा आधार घ्या...एकमेकांना आधार देत आपण पुढे जायचे आहे.लक्षात घ्या माणसांमाणसातलं अंतर वाढलंय पण आपल्याला माणुसकीतलं अंतर कमी करून ते नातं अधिक घट्ट करायचंय.कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनातील भीती,चिंता,नैराश्य, 'हे आपले शत्रू कोरोनाला साथ देणार नाहीत याची काळजी घ्या.त्यांना मनात जराही थारा देऊ नका उलट संयम,धाडस आणि शांतता याच्या जोरावर आपल्याला हे आक्रमण परतवून लावायचे आहे.आज आपणच नाही सारं जग किंबहुना आपला देश या कोरोनाशी लढतो आहे.युद्धपातळीवर डॉक्टर, परिचारिका, पोलीस हरेकजण आपला जीव धोक्यात घालून लढतो आहे.जगभरातले संशोधक कोरोनवरची लस शोधण्यासाठी अहोरात्र जुटले आहेत..मग आपल्यालाही संयम ठेवावाच लागेल कोरोनाशी धैर्याने मुकाबला करावाचं लागेल..नक्कीच आजचा काळ सर्वांसाठी खूप कठीण काळ आहे पण विश्वास ठेवा हे पण दिवस जातील.'..आजच्या काळरात्रीनंतर उद्याचा उषःकाल ठरलेला आहे...गरज आहे ती शांततापूर्ण धैर्य ठेऊन वाट पाहण्याची.

                            मृत्यूला कदापीही घाबरू नका...मरणाला घाबरण्याची इथं परंपरा नाही.. तर मरणाला तळहातावर घेऊन लढण्याची झुंजण्याची इथं परंपरा आहे...हे आपल्याला सांगायला लागू नये...आपल्या जगण्याची प्रेरणा आहेत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज.आजच्या कठीण काळात त्यांचे अखंड स्मरण करीत रहा.एकदा शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ग्रंथ वाचा. वाचलं असेल तरी पुन्हा वाचा.आपल्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाचं याहून मोठं उदाहरण मानवी इतिहासात नाही.आणि हीच प्रेरणा आजच्या काळात आपल्या जगण्याला पुरेशी आहे.ज्यांनी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला...आपल्या मावळ्यांनी स्वराज्याकरीता मरणाला पाठीवर बांधून निधड्या छातीने निकराची झुंज दिली...ते स्वराज्यासाठी लढले आपल्याला आज स्वतःसाठी लढायचं आहे...प्रसंगी एकवेळ कोरोनाशी झुंजताना मरण आलं तर बेहत्तर पण  गर्भगळीत होऊन हे रणांगण सोडून परागंदा होत असाल, प्राणाला मुकत असाल तर खबरदार...! इथे शत्रूला घाबरण्याचा नाही शत्रूशी दोन हात करून लढण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून या मातीच्या कुशीत आणि मुशीत जन्मलेली आम्हीं लेकरं आहोत..त्या मावळमनाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याची ही वेळ आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रबळ इच्छाशक्तीने ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे.

'जगावे तर असे जगावे की आपल्या जगण्याकडे पाहून इतरांनाही जगण्याचे बळ मिळावे'...असे जगुया.आपण प्रत्येकाने कोरोनाच्या विरोधातली ही लढाई  दृढ आत्मविश्वासाने लढूया कोरोनाला हरवुया...आपण जिंकूया आणि येणाऱ्या काळात इतिहासाचं एक पान आपल्या नावाने राखून ठेवूया..


                     जय हो मंगल हो..!!


हे वाचा...









                                           

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....- किरण चव्हाण.


कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....


"मामा...मावशी...दादा...ताई कोण आहे का घरात.?."

"या बाहेर...या..."

"चला हात पुढं करा...थोडे लांब उभे रहा..."

"मावशी...ऑक्सिजन चांगला दाखवतोय तुमचा ..टेम्प्रेचरही चांगलं आहे.."

"आज्जीबाई तुमचं ऑक्सिजन कमी दाखवतोय..".

"काय त्रास होतोय..?"

"कुणाला काही.. बी.पी..शुगरचा त्रास..?

"घरात कोणाला थंडी- ताप, सर्दी-खोकला..."

"कुणाला काही त्रास..असेल तर सांगा...दवाखान्यात दाखवून स्वॅब तपासून घ्या."

"घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करायचा.."

"वरचेवर साबणाने हात धुवायचे किंवा सॅनिटायजर वापरायचे... कारण नसताना घराबाहेर पडायचं नाही....अशक्तपणा वाटत असेल तर लिंबूपाणी प्यायचे.."

"आणि हो कोरोनाला घाबरायचं नाही पण काळजी घ्यायची आपली व आपल्या माणसांची...कळलं का...?"


हे काळजीवाहू बोल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतील...प्रत्येक गाव,शहर गल्लीबोळ, अगदी सांदीखोपड्यातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन कोविड सर्वेक्षण करणाऱ्या या आहेत आपल्या आशा व अंगणवाडी सेविका..महाराष्ट्र शासनाने नुकतेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम सुरू आहे त्यामुळे यां उपक्रमांतर्गत आशा व अंगणवाडी सेविकेंच्यासोबत शिक्षकवृंदही सहभागी झाले आहेत..त्यामुळे मलाही या मोहिमेत सहभागी होता आले..अगदी जोरदारपणे सगळीकडे  ही मोहीम राबवली जाते आहे.. आमच्या टीममध्ये शिक्षक म्हणून मी,आमच्या भगिनींवंद्य आशा सौ.ज्योती मॅडम,सुनीता मॅडम ,भाग्यश्री मॅडम आणि अंगणवाडी सेविका छाया मॅडम असे आम्हीं पाचजण आहोत.. 

कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम (दादा) आणि आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक मॅडम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली आमची ही कोविड सर्वेक्षणाची टीम कात्यायनी गाव व परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहे...दररोज किमान ५० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे...सकाळी ९:३० वाजता सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होते.प्रत्येक घरासमोर जाऊन घरातील प्रत्येक माणसांची माहिती नोंद करून घ्यायची..बोटाला ऑक्सीमीटर लावून ऑक्सिजन तर कपाळासमोर थर्मल धरून टेम्प्रेचर तपासायचे..


कुणाला बी.पी,शुगर आणखीन काही आजार...ताप थंडी,खोकला,सर्दी अशी काही लक्षणे आहेत का.? याची विचारणा करायची...लक्षणे असलीच तर स्वॅब तपासायला सांगायचे...मास्क वापरा,वरचेवर हात धुवा,सॅनिरायझरचा वापर करा शक्यतो गर्दीत जाणे टाळा असे एकंदरीत कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन पुन्हा पुढील घर गाठायचे...ग्रामीण भागात विरळ लोकवस्ती तर एक घर या टोकाला तर दुसरे त्या टोकाला...तर काही घरे रानात वसलेली... तर कुठे अगदीच आडरानात एखादे घर अशावेळी पायी चालत जावे लागते.कच्चा खाचखळग्यांचा रस्ता,कुठे राडीचिखलातून तर कुठे गवतातून असलेल्या पायवाटेने जावे लागते.....घर.. मंदिर...शेतात..बांधावर जाऊन तर कुठे रस्त्याच्या काठाला जिथे कुठे माणसे भेटतील तिथे लोकांची तपासणी करीत पुढे सरकायचे...हा सर्व्हे करताना एकंदरीत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे...त्याचबरोबर

काही अपवाद वगळता खुप सुखद अनुभव अनुभवायला मिळत आहेत.  

                         दोन अनुभव मात्र मनाला अत्यंत वेदना देऊन गेले. ते असे की, त्या दिवशी कडकडीत  उन्हांत आम्हीं एका घरासमोर गेलो...घरातील लहान मुलांनी तपासणी करून घेतली..मोठ्या लोकांना बोलावण्यास सांगितलं मुलं म्हणाली बाबा झोपलेत...उठवायला सांगितलं...मुलं आत गेली थोड्याच वेळात मुलांचे वडील आतून चडफड करीतच बाहेर आले.आणि अशोभनीय भाषेत आम्हांला बोलू लागले..

 "चला चला इथून... आम्हांला काही तपासणी करून घ्यायची न्हाई..."

 "अहो काका,शासनाचं काम आहे आपल्यासाठीचं आह हे सगळं."  थोडं समजावण्याच्या प्रयत्नात सांगू लागलो

 तर उलट आम्हांलाचं ते  शिकवू लागले..

"काय सांगतंय ते शासन कसली तपासणी करता..चार महिने झालं लोकडाऊन केलं..कोरोना कमी न्हाई त्यो न्हाईचं नआणि आता म्हण तपासणी करत्यात." आम्हीं जाणलं होतं त्यांची  झोपमोड झाल्याचा हा सगळा त्रागा आहे त्यांनी आमचा चांगलाच अपमान करून तो आमच्यावर खपवला होता.

वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं की, उन्हातान्हात उपातपाशी पायपीट करत आम्हीं या लोकांच्यासाठी फिरतो आणि ही लोकं दारी आलेल्या आम्हां लोकांचा वाटेल तसा अपमान करतात..

या गोष्टीवरून सिद्ध होते की,या कोरोनाच्या काळात सर्व्हे करताना या आशा व अंगणवाडी सेविकांना असा त्रास सहन करावा लागतोय  त्यांचा अपमान केला जातोय तर कुठे मारहाण करण्यापर्यंत मजल जातेय समाजातील अशा विकृतीला म्हणावं तरी काय..?

 दुसरा अनुभव असा एका बंगल्यासमोर गेलो  बाहेरुन गेटला कुलूप आतून एक व्यक्ती सांगत होती...आम्हीं आमची काळजी घेतोय...आम्हीं सुरक्षित आहोत...आत येण्यास कोणालाही परवानगी देत नाही...शेवटी त्यांनी काय आम्हांला आत घेतलेचं नाही  तपासणी तर दूरच. अशाचंप्रकारे काही घरांतून आम्हांला नकारात्मक प्रतिसाद मिळाला... म्हणजे हे असं झालं बाहेर आक्रमण सुरू असताना आपण काचेच्या घरांत राहून आम्हीं सुरक्षित असण्याचा कांगावा करायचा.

                                  कळंबा परिसरात सर्व्हे करताना करवीर तालुका तहसीलदारसो आदरणीय सौ. शितल भामरे-मुळे मॅडम,कळंबा गावचे सरपंच श्री सागर भोगम दादा,ग्रामपंचायत सदस्य,आरोग्यसेविका सौ.नयन सरनाईक यांनी आमच्या सर्वेक्षण टीमला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली..एका कुटूंबाशीही त्यांनी संवाद केला..तहसीलदार मॅडमांनी आपुलकीने सर्वांची चौकशी करून अगदी मोलाचे असे अल्पशा मार्गदर्शन केले..ही भेट आमच्या कार्याला खुप ऊर्जा देऊन गेली.




सर्व्हे करताना हळूहळू उन्हाचा कडाका वाढतो. वरून उन्ह आणि आत रिकाम्या पोटात भुकेने व्याकुळ कावळे ओरडायला लागतात...उपातपाशी वणवण फिरत एकन एक घराचा सर्व्हे करत पुर्ण पन्नास  घरांचा सर्व्हे करून घरी परतायला अडीच तीन वाजतात..

                            सर्व्हेच्या अनुषंगाने  प्रत्येक घरासमोरच्या प्रत्येक माणसांचे अनुभव खूप चांगले होते म्हणायला हरकत नाही..काही गोड मनाला सुखावणारे..जिकडे तिकडे नुसती कोरोनाचीचं चर्चा....एखाद्या घरासमोर गेले की माणसं आपुलकीने आपली माहिती देतात..तपासणी करून घेतात.कुणाची तपासणी राहून गेली तर स्वतःहुन पुढे येतात..आमचा आदर करतात....मॅडम या बसा.. चहा करूया हे प्रेमळ वाक्य ठरलेलेचं.म्हणजे अतिथी देवो भव ही संस्कृती या कोरोनाच्या काळातही प्रत्येक घरांत नांदत असलेली दिसून येत होती. .एखादी मावशी आपुलकीने अंगणातील  पेरवीच्या झाडावरच पेरू देते... एखादा मामा हौसेने आपल्या दरातल्या वेलीवरचा दुधी भोपळा देतो...तर आणखीन एक माऊली आपल्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा खायला देते..


तर कोट्याधीश असणारे पाशासाहेब सारखी माणसे आग्रहाने आम्हांला चहा देतात...खरं तर ही माणसं म्हणजे आमच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी जिवंत हृदयाची माणसं .म्हणजे यावरूनचं कळते की समाजात कुठे तरीच वाईट माणसं आहेत पण चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त आहे. जरी कुठे आमचा अपमान झाला असेल तरी त्याहून आमचा सन्मान करणारी माणसं ही कितीतरी पटीने जास्त होती...  

                    खरं तर या सर्व्हेच्या निमित्ताने आशा व अंगणवाडी सेविकां यांचे समाजसेवारूपी कार्य जवळून बघता आले..त्यांना येणारे  बरे वाईट अनुभव याची देही याची डोळा अनुभवता आले.. गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत.. हे काम करताना एकही घर सुटता कामा नये याची काळजी घ्यावी लागते.शहरठिकाणी एक ठीक आहे पण ग्रामीण भागात सर्व्हे करताना अनेक अडचणींचा सामना या सेविकांना करावा लागतोय..प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेचं पाहिजे...त्यामुळे जिथे कुठे घरे वसली असतील तिथे जावेच लागते...मग काही घरे गाव सोडून वाड्यावस्त्यांवर..काही एकदोन शिवारात...तर एखादे घर लांब कुठे निबिड रानात  असते ..या सर्व घरांना भेटी देऊन तेथील लोकांची माहिती गोळा करावी लागते.आज आमच्यासारखे शिक्षक सोबत आहेत म्हणून नाही तर इतर वेळेस या आशा  व अंगणवाडी सेविकांना जीव धोक्यात घालून मोठी जोखीम पत्करून या आडरानातून त्या घरापर्यंत भेटी द्याव्याचं लागतात.


                              आज कोविड महामारीच्या काळात आपले सर्वस्व पणाला लावून या आशा व अंगणवाडी सेविका कोविड योद्धा म्हणून आपले समाजसेवेचे व्रत अगदी चोखपणे बजावत आहेत.खरं तर ही समाजाची दाई आहे जी आई होऊन आज आपल्या घरासमोर येते प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करतें काळजी घेण्यास सांगते..हा समाज म्हणजे तिचा कुटूंब आहे..हा समाजरूपी कुटूंब सुरक्षित रहावा म्हणून ती आज आपल्या दारी येतेय...पण तरीही आपल्या समाजात कुठे तरी वाईट अनुभवांचा सामना या भगिनींना करावा लागतोय..काही अपमानास्पद घडलेल्या वाईट बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचतोयही.आज मी जवळून पाहतोय की, हे काम या समाजसेविका प्रामाणिकपणे करीत आहेत आपल्या जीवनातला सर्वात जास्त वेळ त्या समाजासाठी खर्च करीत आहेत.आज बाहेर फिरणं किती धोक्याचं असताना तो जीवावरचा धोका पत्करून या भगिनी तुमच्या आमच्यासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहे...दुर्दैवाने हे काम करत असताना काही आशा  कोरोना संक्रमणाच्या शिकार झाल्या..काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे एवढं जीवावर उदार होऊन काम करीत असताना  शासनस्तरावरून त्यांना मानधन किती मिळते..? महिन्याकाठी फक्त १००० रु. आणि सर्व्हे करताना कोरोनामुळे काही बरे वाईट घडले तर पन्नास लाखाचे विमा कवच आहे...म्हणजे इथे जिवंत असण्याचे मोल नाही पण मृत्यू पश्चात मात्र लाखोंरुपयांचे मोल आहे..मुळात ७८ प्रकारची कामे या आशा सेविकेंना करावी लागतात...आणि त्यांच्या एकूण कामावर मानधन दिले जाते ते ही तुटपुंजे आहे..खरं तर स्थानिक पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या लेकीकडे शासनाने बापपणाच्या भूमिकेतून दखल घेऊन त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देणे आवश्यक आहे...खरं तर आताच्या सर्वेक्षणाचे मानधन भरभक्कम दिले पाहिजे...म्हणजे माझ्या या भगिनीची गाडी पेट्रोल संपल्यामुले कुठे अर्ध्या रस्त्यात बंद नाही पडणार..?.अहो तुमच्या त्या १००० च्या मानधनात महिन्याचा प्रवास खर्चही भागत नाही..


                                 जसे सीमेवर बाहेच्या शत्रूसंगे आमचे सैनिक लढत आहेत तसे इथे या कोरोनाच्या अदृश्य शत्रूविरोधात डॉक्टर, पोलीस,परिचारिका यांच्या बरोबरीने या आशा व अंगणवाडी सेविका लढत आहेत. आताच्या कोविड महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या  आशा व अंगणवाडी सेविका म्हणजे आमच्या रणरागिणी समाजसेविका आहेत...आता आपली किंबहुना  समाजाची एक जबाबदारी बनते की या कोविड योध्यां रणरागिणीच्या पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणण्याची.... जेंव्हा या रणरागिणी आपल्या दारापुढे येतील जेंव्हा कुठे भेटतील तेंव्हा त्यांचा योग्य आदर करा...त्यांना सन्मान द्या...आणि म्हणा..."ताईनों तुमच्या कार्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो...आपणही काळजी घ्या." शासनाकडून त्यांना भरभक्कम मानधन मिळेल न मिळेल पण मंडळी तुमच्याकडून मिळणाऱ्या  मानाचं धन हे त्यांच्यासाठी लाखमोलाचं आहे..बघा त्यांच्या कार्याला किती पटीने ऊर्जा मिळते...

                     सर्वांनीच काळजी घेऊया माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला उदंड प्रतिसाद देऊया..आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया...आणि कोरोनाला हरवूया....सर्वांनीच घेऊया ही खबरदारी.. माझे कुटूंब माझी जबाबदारी..

पुनश्या कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या या आशा व अंगणवाडी सेविकांच्या कार्याला सलाम...सुरक्षित रहा...काळजी घ्या..


तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो

सकळांचे लक्ष तुजकडे वळो

मानवतेचे तेज झळझळो

विश्वामाजी या योगी


जय हो मंगल हो..!!


आमच्या कोविड सर्वेक्षण टीमचा व्हिडीओ पहा खालील व्हिडीओवर क्लिक करा.






                                   - किरण सुभाष चव्हाण.
                                      ८८०६७३७५२८

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...