फॉलोअर

रविवार, २६ एप्रिल, २०२०

कोरोना गीत- कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...किरण चव्हाण.(पांगिरे)


(आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं...या चालीवर)
----------------------------------------------
                कोरोना गीत...
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...

आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...(कोरस)...!!धृ!!

समजून घे तू या कोरोनाचा धोका
कुठं कसा पसरलं नाही तो भरोसा
गाफील तुम्हीं राहू नका,सावध असा रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...!!१!!

साऱ्या जगामधी त्यानं थैमान घातलया,
माणसाच्या जीवासंग खेळ खेळतुया
मरण झालंय स्वस्त इथं भान असू द्या रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!२!!

तरी तुला कसं....कळना माणसा..?
फिरतोस जिथं तिथं वाचशील कसा..?
नको येड्या फिरू कुठं घरी थांबूया रं..
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!३!!

देव आपुला रं आता देवळात नाही
डॉक्टर,नर्स,पोलिस तोच, काळजी आमुची वाही
नको होऊ कृतघ्न तू त्यांचे जाण उपकार
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!४!!

नको घाबरू तू नको सोडू आशा
दूर होईल संकट मिळल जीवाला दिलासा..
कोरोनावर मात करूया  पुढं जाऊया रं
कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!५!!
----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.
मोबा-८८०६७३७५२८.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

'गावकुसातील कथा' -'इस्वासघात' - किरण चव्हाण. (पांगिरे)

           

'इस्वासघात'

                                सात वरसाची आसल तवा गळ्यात माळ पडली.एक सवतर भण आदीच या घरात दिली व्हती.आणि आता दोघी सख्खा भणी सख्या जावा म्हणून अशा मिळून तिघी भणी एकाच घरात नांदणार व्हत्या.आडमुठ्या तिघी एकाच घरात कशा द्यायच्या...? पानोठ्यावरनं तिघीनी पाणी कसं आणायचं..? म्हणून.. दोघा पाहुण्यांस्नी कोडं पडलं.मग काय नवरीच्या बापानं मंडपात गायच आणली आणि एक आगुदरच दिल्याली लेक, आता दोघी सख्या भणी आणि चवथी गाय अशी तडजोड करून घर भरणी करून दिली. सखू आणि शारु सख्या भणी आणि मालू सवतर भण सख्या जावा म्हणून नांदायला लागल्या...सखु रंगानं काळी आणि शारु तिच्यापरास उजवी व्हती,रंगानं पण गोरी.साताप्पा मुंबईत कामाला.. त्यामुळं राहणीमान जरा शहरी..थोरला भाऊ गावाकडं शेतीभाती बघायचा. धाकटा साताप्पा नवरा म्हणून एकटाच नवऱ्या बघायला आला..थोरला आलाच नाही त्यानं सांगूनच टाकल्यालं "आप्पा तू एकटाच जा पोरगी बघायला..मी आदीच एकदा बघितल्यात ती काळी हाय ती थोरली मी करून घेतो..नी धाकटी गोरी हाय ती तू करून घे.." अशी सगळी गंमत आणि मग सख्या बहिणीला बघायला एकच नवरदेव आला...
                          शारु कवळी पोर सात वरसाची.साताप्पा कवळ्या मिसरूटाचा सतरा आठरा वरसाचा.संसार सुरू झाला.नव्याच नऊ दिस सरलं आणि नव्याकोऱ्या कवळ्या नवरीला मागं ठेऊन साताप्पा पोटासाठी मुंबईला आला.पिल्यास्टीकच्या पिशव्या तयार करण्याऱ्या कारखान्यात काम करत व्हता.खेळकर पोरसवदा वयाची शारू.गळ्यात काळ्यामण्याचं दोरलं आलं. कपाळाला कुकू ल्याचं.अंगणात परसात खेळायचं बागडायचं,जेवणापाण्यानं खेळायचं वय पर चुलीम्होरं बसून जेवाण करायचं.. थोरल्या माणसानी वाढायचं.. आणि मग शेवटाला नकाड्या पोटाच्या मोठ्या भुकंला चार घास पोटात ढकलायचं.चिमुरड्या हातात लुगडी मावायची नाहीत खरं ती चोळायची धुवायची.अगदी धाकल्या वयात ही प्रपंचाची जबाबदारी तिच्यावर आली.तरी थोरली जाऊ म्हणून सवतर भण नी तिच्या पाठीवरची सखी भण व्हती म्हणून जरा त्या दोघीजणी सांभाळून घ्यायच्या...पर एकीन नांदनं जास्त काळ टिकलं न्हाई.
                        पुढं पुढं भावाभावांनी येगळं घेतलं..आणि आता तिच्या एकटीवर सगळी जबाबदारी  पडली.त्यात नवरा जवळ न्हाई..मुंबईला घेऊन जायाचं जायाचं म्हणता खरं किती दिस झालं. म्हणं तिथं त्येजाचं मेळ लागत नव्हता..तवा बायको आणल्यावर खोलीभाडं.. भांडीकुंडी.. प्रपंचाला काय एक लागतंय मुंबईसारख्या नगरीत आता नवीन संसार उभा करायचा एवढं सोपं हाय का..?...त्यात पगार तुटपुंजा. म्हणून त्यो टाळत व्हता...पर इकडं शारूचा जीव लई तळमळायचा.. आपल्या माणसासंग असल्यालं कसं..? इथं कितीबी केलं तरी सख्या भणी असल्या म्हणून काय झालं..?  त्येंच्या त्यासनी प्रपंचा हायच की,किती म्हणून त्या ध्यान देणार तरीबी अडीनडीला त्येंचाच आधार.जवा कवा नवरा यायचा तवा तिला डोंगराएवढा आधार वाटायचा.
                              अशीच वरसं मागं सरली.नेणती शालू आता जाणती झाली.डुईवर पदर आला.आता साऱ्याचा अंदाज गावला हुता,प्रपंचात सराईत झाली व्हती.नवरा यायचा मुंबईसनं धा-पंधरा दिस ऱ्हायचा.येताना पेटीतनं कायबाय आणायचा...नवी जुनी कापडं चोपडं एखादं अंगरखा-पॅन्ट गल्लीतल्या सातुमाला...भैरूमाला हौसनं द्याचा..या घडीला आला ते काय येगळच घिवून. हेच्या पेटीत दारूचं मोठं दोन-तीन तुंबं.शारूनं ते बघितलंबी,म्हंजी आता नवऱ्याला दारूची लत लागली म्हणायची..थोरल्या भावांच्या माघारी चोरूमारून प्यायचा..हे बघून शारू थिजून जायची.काय बोलावं नी कुणाला सांगावं आपलंच दात नी आपलंच व्हट.. मुकाट्यानं ती सगळं बघत व्हती.बहिणी जिच्या तिच्या संसारात चांगल्या गुतल्या व्हत्या..त्येंच्या पोटाला दोन तीन लेकरं व्हती...शारूलाबी दिस गेल्यालं पहिल्यानं गरवार व्हती.पर देवाच्या मनात काय व्हतं कुणास ठाऊक..? तोंडाचा घास मुखापतोर यावा आणि तो काढून घ्यावा तसं झालं.नुकताच जलामल्याला बाळराजा देवानं काढून घेतला.बाळंतपणात मुल दगावलं.नऊ महिनं पोटात जीवापाड जपल्याला गोळा मातीआड करताना तिज तिला काय झालं आसल इचारच न केल्याला बरा.नशिबाचा भोग म्हणायचा पहिल्यानं एवढं साजरं पॉर पोटाला  जलामलं खरं व्हट्यातन काढून घेतलं.जमोलभर काळजाला डाग पडला.
                               काळजाचा तुकडा गेला जखम तशीच वली व्हती एक वरीस झालं नी दुसऱ्या डाव ऱ्हायलं. या येळला तिनं लई नवासपाणी केलं.जिथं तिथं मागून घेतलं.लेकरू सहीसलामत जलमू दे.. जगू दे.आणि तसंच झालं...साजरी लेक जलामली...बाळ तरी ठणठणीत निपाजलं.तरी त्याला लई काळीजमाया करून तळहाताच्या फोडागत जीवापाड जपलं.जवा दुसरं मुलं जलामल तवा कुठं पयल्या वल्या जखमवर खपली धरली...या बाळाच्या उसाभरीत त्ये दुःख इसरून गेली...आता तिच्या जीवाला आनंद झाला..पर त्या आनंदाला विरझान लागावं ,भरल्या दुधात मिठाचा खडा पडावा जितनी तसं...आता कुठं सगळं जितल्या तिथं सगळं बेस चालल्यालं.पर तिच्या आदीची भन सखु..तिला कसला आजार झाला त्यो मागं हटायचं नावच न्हाई.आजार लईच बळावत गेला.जगती का ऱ्हाती अशी तिची गत झाली.म्हणं डाक्टर म्हणत व्हतं..'कॅन्सर का काय तसला आजार तिला झालाय आता ती यातन टिकणार न्हाय.' आणि खरंचबी धाकलं पॉर आम्याला व्हतं आणि बापडीन पलांग मारली.तीन नकानकाडी पोरं मागं ठेऊन बिचारी गेली.शारूचाबी आधार गेला.धाकली भन म्हणून तिनं लई सांभाळ करून घेतला.जाऊ असून कधी कुठल्या गोष्टीवरनं भांडलीझडली न्हाई..थोरली सवतर भन व्हती..किती केलं तरी सवतरच ती सवतीसारखीच वागायची पण या आक्काची गोष्टचं न्यारी व्हती...आईइना पोरं पोरकी झाली.खरं म्हणत्यात नवं 'माय मरो नी मावशी उरो.' भणीची लेकरं ती आपलीच समजून सांभाळ करू लागली.भणीला पहिली लेक व्हती तरीबी धा वरसाची  जरा जाणतीच व्हती शारुन तिला चुलीम्होरं बसताना जवळ घेऊन बसायची जेवणातली एकेक गोष्ट शिकवायची .पोरभी चुणचुणीत लागलीच मावशीच्या हाताखाली सारं तिनं शिकून घेतलं..आता ती सवत्या चुलीवर जेवाणबी करू लागली. घरातली भांड्यांची मांडामांड करू लागली.तरी मावशीची सारखी नदार असायचीच.कमीजादाला ती जातीनं ध्यान द्यायची. पोरबी हुशार घरातली पडल ती काम हौसनं करायची...तसं तिला मावशीनं मडवलंच व्हतं.माय माघारी पोरीनं सगळी जबाबदारी शिरावर घेतली. शारुचा टांगणीला लागल्याला जीव जरा हलका झाला.
                              निदान दोन चार महिन्यातन साताप्पाची एकादंरी फेरी गावाकडं व्हायची.पर अलीकडं गडी वरसातनं इकदाचं यायचा.एकुलती एक पोर खरं आपरुबाईनं मिठाईचा पुडा कपडालत्ता आणील म्हटलं तर ह्येच्या पेटीत आता नुसतं दारूचं तुंबं. गडी एकदम बिघडल्यासाराच झालता...बायकोसंग सळ बोलायचं न्हाई..का कुणासंग बोलायचं न्हाई..आपल्याचं नादात.पोरीलाबी गोडीन जवळ घिऊन आपरुवाई करायचा न्हाई...आता ह्येच्या वागण्याला कुणी काय बोलावं नी कुणी समजून सांगावं..मुंबईसारख्या शरसिटीला ऱ्हाणारा माणूस..चांगल्याचुंगल्या माणसात वावरणारा..आता इकडच्या अडाणी माणसांनी काय सांगावं.?..शारुन तरी डोक्याला हातच लावला.बाई आतल्या आत खचून गेली.आता कुठं संसाराला खरी सुरुवात झाल्याली खरं ह्यो माणूस काय धड वागत नव्हता.कसं व्हायचं म्होरं..? आता साताप्पा गावाकडं इल त्या येळला अशीच गत...आता बायकोवर हातबी उगरायचा,मारझोड करायचा..गावाकडं आल्यावर ह्येला पैसं दे त्येला पैसं दे आसं करत पैसं उधळून परत जातावक्ती ह्येज्या खिशात एक रुपयबी ऱ्हायाचा न्हाई.. शेवटाला बायकोनं लोकाच्यात मजुरीला जाऊन शेपाचशे घेऊन ह्येच्या हातात ठेवायचं आणि मग त्या पैशांवर त्यानं मुंबई गाठायची...बोलण्या चालण्याला चांगला वागणारा शांत गडी असा कसा काय एकाएकी उधाळला.. वाकडं वागाय लागला याचं कोडं सगळ्यास्नी पडलं व्हतं.. आता ते कसं उमजायचं..?
                             साताप्पा ज्या पिशव्यांच्या कारखान्यात कामाला व्हता.तिथंच एक बाई कामाला व्हती.दोघजण एकाच ठिकाणी कामाला..बोलता बोलता वळखीन वळख वाढत गेली...हळूहळू जोडी जुळत गेली..एकमेकांसंग खाणं-फिरणं वाढतच गेलं.. त्या बाईबरोबर साताप्पाचं सुत जुळालं.. आणि एकदिस गोष्टी लग्नापतोर येऊन ठेपल्या...एक दिस बाईनं ईचारलंच..."तुमचं लगीन झालं न्हाई नवं तर आपुन लगीन करूया."  गड्यानं काय उत्तर द्यावं..? लग्नाची एक बाई घरात असताना एवढंच नवं पोटाला एक पोरगीबी असताना गडी एकदम साफ खोटं बोलला..."न्हाई.. न्हाई..माझं लगीन झालं न्हाई.." तशी बाईन चांगली दमदाटीत सांगितलं "बघा हं नंतर खोटं ठरशीला मी घरात सांगून सवरून तुमच्याशी लगीन करणार हाय...खोटंबिटं ठरलं तर माझं भाऊ लई वांड हायती." पर रुपाला भाळल्याला गडी...वाघाला सावज आणि बापयाला बाईचा ऐवज बघून मन आवरतंय व्हय..ते तयारीतच आसतय हेरायला..साताप्पानं बिलकुल मागचा म्होरचा इचार केला न्हाई..आणि लगीन झालंच न्हाई म्हणून सपशेल थाप मारली.एकदासं लगीन करून घेतलं. लगीन केलं त्ये गड्याचं गावाकडं यायचं नांव न्हाई.बायको मुलाची याद न्हाई..की मागच्या गोतावळ्याचं भान न्हाई.का कसला निरोप मागारी न्हाई.इकडं शारूचा जीव मातूर नवऱ्यासाठी खाली वर व्हयाचा,जीवाला बोचणी लागून ऱ्हायल्याली...कुणाकुणाकडणं किती येळला निरोप धाडलं.. पर मागं उत्तर काय न्हाई...पर पाण्यात हागल्यालं कधी ना कधी वर येतंयच...आणि एकदिस मागं कळालं साताप्पानं दुसरं लगीन करून घेतलं.शारूच्या काळजालाच घरं पडली..ध्यायीदिशा रडली...नशिबाचा भोग म्हणून मागं सारून पुढं चालली..जवापासून तिला नवऱ्याचं ह्यो कारनामा समजला तवापासून मग तिनं त्येची आशा सोडून दिली.
                                गडी बाईच्या शहरी रुपाला भाळला तिच्याबरोबर संसार थाटला  नी गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या भाबड्या बाईच्या संसाराचा डाव अर्ध्यावर सोडला.साताप्पा आता आपल्या संसारात रंगला..खर इकडं शारूच्या संसाराचा बेरंग झाला.ती मातूर पोरीकडं बघून ती दिस काढू लागली..एक शेळी व्हती दुसऱ्याच्या बांधला जाऊन मोलमजुरी करून खावू लागली..कुठली अवदसा सुचली आणि सोन्यासारख्या संसाराची या बापयानं वाट लावली..सोन्याची सूरी चांगली दिसती म्हणून पोटात खवुन घ्यायची काय..? मांडवावरचा चढता येल आपल्याच हातानं मोडायची काय गरज व्हती..? अशीच काही वरसं मागं सरली आणि एक दिस साताप्पा गावाकडं आला.या येळला गडी आला खरं त्याचा रंग न्याराच व्हता.वागण्यात लई मऊपणा व्हता.जेवढ्याला तेवढंच कुणासंगबी बोलायचं.नाही तरी संबंध दिसभर आपल्याच नादात..दारू तेवढी हु म्हणून ढोसायचा…कधी घरात एकटाच असला की,डोळ्यांतन टीपं गाळायचा... काय झालं हुतं त्याज त्याला माहित...बायकोच्या नजरला नजर द्यायलाबी लाजायचा...रातीच्याला दारू पिला की,सारखा नुसता रडत असायचा..बायकोनबी राचं झोपतावक्ती खूपदा ताडलं...
"काय झालं वं.. का डोळ्यात पाणी आणताईसा सारखं." पर एका शब्दानं त्याला उत्तर देता आलं न्हाई..
महिना झालं उद्या जायचं करत करत म्होरं चार दिस ढकललं..जायाला मनच हुईना आता उद्या मुबंईला जायचं तरी जाऊ वाटना... तरी जड अंतःकरणानं आणि भरल्या डोळ्यानं गडी बाहेर पडला...
                            हातचं सोडून पळत्याच्या मागं लागलं की आसच हुयाचं.रूपावर भाळला..लगीन केला.. पोटाला तीन पोरं झाली..आता संसारालाबी कित्येक वरसं झाली.खोटं जास्त दिस न्हाई लपून ऱ्हाईत.दुसऱ्या लग्नाचा खोटेपणा त्या साध्याभोळ्या बायकोपाशी पचला खरा म्हणून का या बायकोपाशी पचतोय..जवापासून बायकोला त्याच्या मागच्या बायकोमुलाचा सुगावा लागला व्हता तवापासून ही सोन्याची सुरी पोटात रुतत व्हती..प्रपंचात सन्यादान नव्हतं. हरेक येळला खटका उडायचा.सारखी घालून पाडून बोलायची.. आपल्या भावांची धमकी द्यायची.आता बोलायची सोय नव्हती...गावाकडंची बायको मुंबईला येताशेवटी गाडीउताऱ्याला कामाची मजुरी हातात द्यायची आणि हिथ राबराब राबून महिन्याशेवटी या बाईच्या हातात मजुरी द्यायची पाळी यायची..जिथं किंमत व्हती तिथं किंमत दिली न्हाई,आणि जिथं किंमत द्यायला गेला तिथं किंमत ऱ्हायली न्हाई..आता समदं खरं खोटं त्येला कळाल्यालं...पण उपेग नव्हता...
                            गावची माती...माणसं.. बायको-लेकीची वढ मनाला लागायची पर इथल्या बायकोम्होर काय चालायचं न्हाई..गावाकडचं नाव जरी काढलं तरी बायको जळायची... गडी बैलासारखा खाल मान घालून गप बसायचा...गावाकडं जायाला मन उचल खायाचं बायकोपुढं इलाज चालायचा न्हाई..फार कुचंबना व्हायची...आता त्येला आठवत व्हतं तसं डोळ्याला गळती लागायची..कवळ्या कपाळावर कुकू लिवून शारु बायको म्हणून आली..आणि प्रपंचाला सुरुवात झाली..नवरा मुंबईला हाय म्हणून कसली आशा दावली न्हाई का कसला जिगरहाट केला न्हाई..चारचौघ्या पोरीतनी खेळायचं वय पर कवळ्यापणात चुल फुकायची.नी..प्रपंचाची जबाबदारी शिरावर आली.मागं हटली न्हाई..नवऱ्यामागारी जिद्दीनं संसार केला...पर नवऱ्याला ही आसली आवदसा सुचली.बाईनं पतीव्रता म्हणून ऱ्हायाचं आणि बापयानं मुलखात शेण खायचं ही कसली रित म्हणायची...बायकोपोरीला आस उघड्यावर टाकून नवीन संसार थाटला...त्यांचा काय गुन्हा व्हता..? पण खोट्यानं वागणं न्हाई जास्त दिस टिगत..या जन्मात पाप करायचं आणि पुढच्या जन्मी फेडायचं आता आसं ऱ्हायलं न्हाई.. इथंच पाप करायचं आणि इथंच फेडायचं.
                                        साताप्पाला कळून चुकलं त्यानं गावाकडच्या सोन्यासारख्या सध्याभोळ्या बायकोचा इस्वासघात केला तिचा कसलाच इचार न करता दुसरं लगीन केलं...त्या निष्पाप मायलेकीच्या भवितव्याचं काय..?आता त्याचं डोळं उघडल्याल.पण येळ निघून गेल्याली.मातूर अशा इचारांनी त्यानं कच खाली...जीवाला लावून घेतलं.दारूच्या बाटलीत सगळं दुःख बुडीवलं.निवळ दारून दारू अंगात भिनली.एक दिसबी नशेला आराम न्हाई..आणि शेवटी चालता बोलता गडी हातरुणाला आडवा झाला...अंगाचा लोळागोळा व्हवून पडला...खाणंपिणं कमी झालं...तरवणी पाण्यावर जीवाचा हवाला...आकिरला वाचा गेली...तीन महिनं झालं...अजिबात बोलता ईत नव्हतं जे काय बोलायचं ते कागदावर ल्यायचं नी दावायचं...त्या दिशी एक कागुद बायकोच्या हातावर ठेवला..त्यात लिल्याली शेवटची ईच्छा व्हती..गावाकडच्या गोतावळ्याला बलवून घ्या पर त्यात गावाकडच्या बायकोचा उल्लेख नव्हता...आता कुठल्या तोंडानं तिला बलवायची...मनाला लाज वाटून ऱ्हायली व्हती...पश्चातापानं डोळं भरून उलटत व्हतं...आता जे केलं ते नजरला दिसत व्हतं.गुन्हा केला आता त्याचं फळ मिळालं व्हतं. .'इस्वासघात केला' ऱ्हा ऱ्हावून आतल्या आत मनाला खाईत व्हतं...पर मनातलं वठावर इल कुठलं..?आकिरला अपराधीपणानं त्यानं डोळं मिटलं.

----------------------------------------------
- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा-८८०६७३७५२८.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

आत्मकथा - 'एक होती आज्जी'- किरण सुभाष चव्हाण.

                     

                                       'एक होती आज्जी'.
                                       
                        एक छोटंसं गाव.गावच्या पोटात शिरणाऱ्या हमरस्त्याच्या वेशीलगत एका बगलेवर आटोपत्या फांद्यांचं वडाच जुनाट झाड.त्याच्यापुढं उत्तरेला पुढा करून भैरवनाथाचं मंदीर. या मंदिरांच्या मागच्या खोलीत मराठी शाळा भरायची.तिथून जरा मावळत्या अंगाला दोन घरांच्या मधी दोन गुंठे होईल एवढी मोकळी जागा आणि जागेच्या एका कोपऱ्यात उत्तरेला दार असलेलं दगडा मातीचं साधारण पुरुषभर उंचीचं झोपडीवजा नकाड घर.शेणामातीन सारवलेलं कांबटाचं दार.शेणानं सारवलेला मातीचा गुळगुळीत ओटा.वरती साधी कौलं. घर असं म्हणता येणार नाही अशा त्या झोपडीत माझी आज्जी एकटीच रहायची.उभ्या नाकाची,मातकट रंगाची ,अंगाला सुरूकत्या पडलेल्या.कंबरेत वाकून चालायची.सदा न कदा दाराम्होरं  दोन्हीं हात गुडघ्यावर टेकून हातांची बोटं एकमेकांत अडकून बसलेली.जाता येता माणसं म्हणायची,
    "म्हातारे काय जाग्याची राखण करीत बसलीस व्हय." तसच वाटायचं. हमचौक मोकळा जागा सगळा आजीच्या नावावर.त्यामुळं या जाग्याबद्दल तिच्या मनात लई लगाव होता.ती घर-जागा धरून असायची.दोन्हीं टोकाच्या दोन्हीं घरासंग आजीचं सन्यादान नव्हतं.जाग्यावरनं बऱ्याचदा भांडणं व्हायची.कधी तिच्या जागेत शेळी बांधली,पालापाचोळा पडला,केरकचरा टाकला अशी काही कारणं त्यामागं होती.
                         आज्जी एकटीच रहायची याच्यामागे तिची पूर्व कहाणी ही खूप रहस्यमय आहे.कुठल्यातरी परमुलखातून लेकीला(माझ्या आईला) काखेत मारून ती इथं आली.गावच्या वळचणीला राहू लागली.कसलाच आसरा नाही.गावच्या आयबायाकडन भाकरी तुकडा मागून पॉट भरू लागली.रेणुका मातेची परडी हातात घेऊन जोगवा मागून खाऊ लागली,लेकीला पोसू लागली.एकटीदुकटी बाई संग तान्हं लेकरू.उघड्या भुईवर कशी राहायची.पण गांव भल्या विचाराचा.गावांन एका बगलला नकाडी जागा दिली.मग आज्जीने मोलमजुरीच्या पैशांतून दगडामातीचं नकाड घर उभा केलं... तसं तर हे कोडं मला आजही सुटलं नाही की,आज्जीला म्हणे पाच मुले होती आणि शेवटची माझी आई..पण नवऱ्याला आणि  त्या पाच मुलांना सोडून आज्जी या गावात येऊन राहिली.आज्जीचा शेवटचा मुलगा म्हणजे  माझा मामा म्हणे शिक्षक आहे..तो कधी मधी सायकलवरून भेटायला यायचा तो ही रात्रीचा आणि पहाटेलाचं बाहेर पडून जायचा...आणि ही खात्रीशीर माहिती मला माझ्या थोरल्या बहिणीकडूनही ऐकायला मिळाली होती.लहान असताना ती ज्यावेळी आज्जीकडे गेली होती अगदी त्याच  रात्री तो मामा आला होता...ही फुलाची मुलगी का..? असं आज्जीला तो म्हणाला होता आणि पहाटेला तो निघून गेला.हे आजही आक्काला ओझरतं आठवतं..
एवढा मोठा कुटूंबकबीला सोडून आज्जी एवढ्या दूरच्या मुलखाला येऊन का राहिली..? पोटच्या पाच मुलांना तिच्यातल्या आईपणाला कसं सोडावसं वाटलं...? नकळत्या लहानग्या लेकीला संग घेऊन एकटी दुकटी बाई कशी या पारगावात अनोळखी माणसांत राहिली...? फक्त तो शिक्षक असणारा मामाच का तिला असं रात्रीअपरात्री भेटायला यायचा..? आईला भेटाताना त्याला कसली भीती वाटायची..? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही माझ्या मनात अनुत्तरितच आहेत.मी कधी कधी आईला विचारतो पण तिच्याकडेही ती नाहीत.ती ही खुद्द कधी या भावांना भेटली नाही.असा एकंदरीत आज्जीचा रहस्यमय भूतकाळ.
                          आईच्या या म्हायारगावाला जायचं म्हटलं की,मला खूप आनंद व्हायचा.आई म्हायारला जाताना मलाच संग न्यायची.माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी कधी आईसोबत तिच्या गावाला गेल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.खाली बसून बराच वेळ केसांवर फणी फिरवायची,दरपणात बघून कपाळावर  बंदा रुपायाच्याआकाराचा कुंकवाचा मळवट भरून हिरवं लुगडं नेसून तयार व्हायची.आणि चापूचोपून माझ्याबी डोक्याला तेल लावायची. तेलाचं बॉट तोंडावर फिरवून,हाता-पायाला पुसायची.एका पिशवीत कायबाय भरून घ्यायची.आणि मग आम्हीं मायलेकरं आजीच्या गावाला जायला बाहेर पडायचो.आई  पिशवी डोक्यावर घ्यायची मी आईचा एक हात धरून तर कधी मागून चालायचो.उगावता पुढा करून असलेल्या दत्त मंदिराच्या पुढणं जाताना पायातलं चप्पल काढायची आणि डोक्यावर पिशवी तशीच हात जोडून रस्त्यावरनच पाया पडायची.मग मीबी पडायचो.नदीपलीकडच्या कापड्याच्या हाटीलात बसून बराच उशीर गाडीची वाट बघायला लागायची.ठरल्या वेळलाच गाडी.कधी कधी खूपच उशीर व्हायचा.मी तिथं इकडं तिकडं रेंगाळायचो... भिंतीला लागून बसायला एक कट्टी...त्या कट्टीवर आईलगत बसून ताटकळत गाडीची वाट बघायला लागायची.बऱ्यास वेळानं कुई कुई..आवाज करत गाडी थांबायची नी मग आमचा प्रवास सुरू. सीटवर उभा राहून खिडकीतनं मी मोठ्या आगतिकीन माग सरणारी झाडं-घरं न्याहाळायचो.
                           

                       आज्जीच्या त्या झोपडीवजा घराला कांबटाचं दार.समोर दर्शनी भीतीतल्या दिवाळीत रेणुका मातेचा फोटो, पडळी असा तो दिवळीतला देव्हारा.धाटांचा शेणानं सारवल्याला कुड मधन घातलेला.उगवत्या बाजूला आज्जीने जळाण काटुक रचलेलं. सगळी त्यात गालवेरची वाळीखड काटकच असायची. एका कोपऱ्यात मातीची चूल तिथंच जवळ दिवा ठेवायला इतभर उंचीची मातीची मिनार होती, तिचा माथा पसरट होता पांढऱ्या शाडून सारवलेलं असायचा अगदी गुळगुळीत. तिच्यावर चिमणी (दिवा) ठेवायचा..आणखीन एका खोपड्यात गाडग्यांची उतरण.त्यातनी कायबाय ठेवल्यालं असायचं.एका बगलला दोरीवर आज्जीची जुन्यारं.अशा चारी खोपड्यात तिनं तिचा प्रपंच थाटलेला,दिवसाही आत अंधारगुडूप असायचं. रात्रीला चिमणीचा तांबूस उजेड.. त्या मिणमिणत्या मंद तांबूस उजेडात तो गाभारा उजळायचा.
                                             आम्हाला दारात बघून आज्जीला खूप आनंद व्हायचा.मला जवळ घिऊन आज्जी आंजरायची-गोंजारायची.

तिच्या जुन्या थोरल्या कुशीतली ती माया माझ्यावर ओसंडून वहायची. खूप आनंदून जायची.या भेटीन पावन व्हायची ती.नेहमी लेक-नातवाच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या आज्जीला सर्वस्व मिळाल्याचा तो आनंद.मग तिच्या पुढ्यात आम्हीं माय लेक बसायचो..आज्जी नी आई बराच वेळ कायबाय बोलत असायच्या.मी थोडावेळ बसलो की मग उठून चुलीच्या वरच्या त्या खोपड्यात शिरून काहीतरी शोधत असायचो.कोण जाणे माझ्या बालमनाला ती एक सवयच होती की मी कधीही आज्जीकडे आलो की असेच काही तरी शोधायची. त्या तिथे मला आज्जीने साठवून ठेवलेल्या कितीतरी मोकळ्या काड्यापेट्या मिळायच्या किंवा खेळण्यायोग्य अशी कुठली तरी छोटीशी वस्तू.मला खूप आनंद व्हायचा..मला आठवतंय एकदा फुटक्या दर्पणाचा चौकोनी लाकडी साचा होता त्याची गाडी करून मी बाहेर ओट्यावर खेळत होतो...आज्जीने साठवलेल्या भरपूर काड्यापेट्या मला मिळायच्या (कारण आज्जीच्या घरात लाईट नव्हती म्हणून चिमणी पेटवण्यासाठी आणणाऱ्या काड्यापेट्या ती जमा करून ठेवायची) त्याचा एक वेगळा आनंद असायचा..या कड्यापेट्या घरी आणून दिवाळीत किल्ले बनवताना पायऱ्या करण्यासाठी त्यांना उपयोगात आणायचो..आई नी मी शेजारच्या घरात बसायला जायचो..तिथे एक आज्जी आजोबा होते, त्यांचे माझ्या आईवर लेकीसारखे प्रेम. जणू ती आपली लेकच मानतात.अगदी जिव्हाळ्याचा घरोबा.. पण आज्जीचे त्यांच्यासोबत पटत नव्हते..खरं तर आज्जीच पटवून घेत नव्हती.या घराचा आईला खूप मोठा आधार.
रात्रीचे जेवण आज्जीच बनवायची.

आज्जीच्या हाताला चव होती.चवदार जेवण बनवायची.आमटीला ती कोरड्यास म्हणायची विशेषतः ते कोरड्यास तर मला लई आवडायचं.अप्रुवाईने मला खायला घालायची.जेवणं आटोपली की,आज्जी चुलीवर मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवायची.आणि झोपण्याच्या वक्ताला आई दाराम्होरं चिमणीच्या उजेडात अंघोळ उरकून घ्यायची...हे ठरल्यालच असायचं..कधीही आई इकडे आली की या वक्तालाच अंघोळ करायची...याचं कारण म्हणजे आज्जीच्या त्या नकाड्या झोपड्यात न्हाणी नव्हती...मधल्या कुडाच्या आतल्या अंगाला दोघी मायलेकींच्या मधी मी झोपी जायचो...
                          घराच्या अंगणात उजव्या अंगाला एक सपय गोलाकार दगड होता त्यावर आई मला अंघोळ घालायची. समोर उगवत्या बाजूला मंदिराच्या मागे शाळेची मुलं एका रांगेत उभा राहून प्रार्थना चालू असायची.अंघोळ करत असताना ते पाहणं माझ्यासाठी मोठी गंमत असायची.या शाळेतील मुले दुपारच्या सुट्टीत आज्जीकडे पाणी प्यायला यायचीत.आज्जीही त्यांना कधी नाही म्हणायची नाही.
दुसऱ्यादिवशी आई नी मी माघारी वळायच्या आधी हुंबऱ्यालगत मायलेकी बसायच्या आई आज्जीच्या डोक्यातील ऊवा-लिका बघायची.मग तिथंच बसून आई कपाळाला कुंकू लिवायची,पुन्हा एकदा तेलाचं बॉट माझ्या केसाला पुसायची. आणि कायबाय भरलेली पिशवी घेऊन आज्जीचा निरोप घेऊन मग आम्हीं मायलेकरं वाटला लागायचो.
                                     लहान असताना आज्जीकडे मी एकटाच राहिलो होतो ते दोन प्रसंग आठवतात.पावसाळ्याचे दिवस होते.पाऊस पडण्याअगोदर आज्जी मला घेऊन शेजारच्या लुगड्याच्या घरात घेऊन बसली होती.मी आज्जीला बिलगून बसलो होतो..बाहेर बेफाम पाऊस कोसळत होता...हुंबऱ्याच्या बाहेरून लाल पाण्याचा मुसंडा वाहत होता.आणि एकदा शाळेला सुट्टी पडल्यानंतर मी आज्जीकडे राहिलो होतो.कसे तरी दोन दिवस राहिलो असेन कारण मला खूपच एकटं वाटत होतं..अजिबात रमतगमत नव्हतं.
माझ्यासोबत खेळायला माझ्या बरोबरीची तिथं मुलं आजूबाजूला नव्हती.खूप एकटं वाटायला लागलं..करमेनासे झाले...दुपारचं झोपून उठलो..की आईबाबांची आठवण व्हायची नी मला रडू कोसळायचं.. मग मी आज्जीचा पदर धरून रडायचोच..आज्जी जवळ घेऊन उगी उगी करायची..समजूत काढायची.आणि मग दुसऱ्याच दिवशी आज्जी मला घेऊन माझ्या गावी आली.
                               आज्जी आमच्या गावी कधी आली की आठ- पंधरा दिवस ऱ्हायची.एकदा ती अशीच तिच्या गावावरून आली नी स्टँडवरून सरळ माझ्या शाळेसमोर येऊन बसली.मला बोलवायला आत निरोप धाडला.तसा मी वर्गातून बाहेर आलो तर आज्जी समोरच बसली होती.तिला बघून मला खूप आनंद झाला आणि ती ही सुखावली.मला जवळ घेतलं.कुरवाळलं. गालाचं मुक्कं घेतलं नी मगच घरकडं वळाली.आज्जी आमच्याकडं असायची त्यावेळी बरं वाटायचं.आईलाही तेवढीच मदत करायची,विशेष म्हणजे दुपारच्या वेळेत  बाहेरच्या सोप्यात आज्जी वाकाळ शिवायची.
त्या वाकळत आम्हा मुलांची धुमडी चालायची.ती वाकाळ अंगावर घेऊन दडून बसायची हौस वाटायची.एवढा आम्हीं गोंधळ घालायचो पण कधीच आज्जी आमच्यावर रागवायची न्हाई.एकदा घरात शेळीच भरपूर दूध काढून ठेवलं होतं.आज्जी नी मी दोघचं घरी होतो.तर आज्जीने ते तापवून त्याच्यावरील साय मला खायला दिली आणि नंतर दूधही प्यायला दिलं. माझ्या खाण्यापिण्याची काळजी करायची.आज्जी नी माझ्या बाबांचं कधीच पटत नव्हतं दोघेजण एकमेकांशी जास्त बोलत नसत..एकदा अशीच कशावरून तरी त्या दोघांचं भांडण झालं झालं ते अगदीच कडाक्याचं.कधी आमच्या डोळ्यामाघारी निघून गेली काहीच माहिती पडलं नाही...नंतर मग सगळीकडे शोधाशोध... मी आणि आक्का(थोरली बहीण) गावात जाऊन शोधून आलो पण कुठेच पत्ता लागला नाही.. शेवटी कळालं की,आज्जी तिच्या घरला गेली.
                                                     आज्जी कधी आजारी पडली-झडली तर कुणाकडून तरी सांगावा धाडायची. आईच्या माहेरची गावात असणारी कांबळ्याची द्रौपदा मावशी नाही तर घराच्या माग रहायला असणाऱ्या मोरबाळ्या च्या मावशीकडन काय ना काय सांगावा असायचा.नाही तरी आईच्या माहेरचे एक शिक्षक आमच्या घरासमोरून वरच्या गावात शिकवायला जायचे त्यांच्याकडूनतरी असायचा.आई एकेकदा त्यांच्याकडून आजीला रॉकेल द्यायची.आमच्या आनंदाचा दिवस होता तो शनिवारचा.कारण  माझ्या थोरल्या बहिणीला म्हणजे आक्काला मुलगा झाला होता. घरी आनंदाचं वातावरण होतं.. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी आज्जीच्या गावावरून खुद्द एक माणूस निरोप घेऊन आला..खूप घाईगडबडीत होता...कुणाचा होता तो निरोप आज्जीचा..? सांगत होता म्हातारीला लई बरं न्हाई आताच्या आता चला.काय तरी विपरीत नक्कीच होतं. मी त्यावेळी आठवीला होतो.दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली म्हणून घरला येत असताना आई-बाबा दोघेजण गडबडीत जाताना दिसली.मी विचारलं तर आज्जीकडे जातोय असे बोलले..मला आश्चर्य वाटलं ते या गोष्टीचं की,कधी न जाणारे बाबा आईबरोबर कसे काय चालले.पण घरात आल्यानंतर सगळी परिस्थिती समजली.
आई-बाबा पोचले आणि सायंकाळी तिथून त्यांनी उलट इकडे एका घरात फोन केला.(त्यावेळी मोबाईलचा वापर जास्त नव्हता) भावकीतल्या जाणत्या माणसांना बोलावून घेतले.थोरला बाबा, बाजीराव आण्णा, संभाजी आण्णा अशी माणसे गेली..नक्कीच काहीतरी वाईट घडले होते पण आम्हांला काही कळायला मार्ग नव्हता..कुणीच काही सांगत नव्हते.आम्हीं घाबरून गेलो होतो घरात बाळंतीण असणारी आक्का,त्यांनतरची बहीण आणि मी असे एकटे पडलो होतो. आक्का आम्हाला धीर देत होती.ती रात्री आम्हीं भीतीच्या छायेखाली झोपी गेलो.अपरात्रीच कधी ही सगळी मंडळी आईच्या माहेरवरून पंधरा-वीस किलोमीटरचे अंतर चालत घरी आले होते..
उठलो तर घरात रडारडीनेच सकाळची सुरवात झाली होती..आई आज्जीच्या नावाने रडत होती गल्लीतल्या आयबाया जमल्या होत्या..आणि मग समजलं की,आजीने आमचा निरोप घेतला होता.माझंही रडू त्यांच्या रडण्यात मिसळलं.
आज्जीच्या तीनविला मी ही गेलो होतो,आई त्या पोरक्या घरात एकटीच रडत होती बाकी आयबाया तिची समजूत घालत होत्या..... "आईनं मला व्हट्यातन मागून आणून जतान केली" आई रडताना सांगत होती ते हे वाक्य माझ्या मनावर त्यावेळी कायमचं कोरलं गेलं.आज्जी गेली..आईचा मागचा उरला सुरला आधार गेला.. तिचं माहेर तुटलं.. ती आईविना पोरकी झाली.
                               

                  आज्जी गेली पण अनेक प्रश्न मागे ठेऊन गेली.आज्जीचा रस्त्यालगत असणारा दीड-दोन गुंठे जागा,छोटंसं असे ना का ते घर..वारसाहक्काने तिच्या लेकीचं झालं  पाहिजे होतं पण तसं काहीच झालं नाही. तो जागा आज्जी हयात असताना आमच्या माघारी गावातील एका इसमाने बळकावला.त्याने आज्जीला आमिषे दाखवली.मी तुला शेवटपर्यंत पोसतो,सांभाळ करतो..एक-दोन वेळेला खर्चाला पैसे दिले काय..एकदा नवं लुगडं घेऊन दिलं आणि एकदिवस तालुक्याच्या ठिकाणी आज्जीला सोबत नेलं..असे उद्योग त्या माणसाने केले.. माझ्या आईला किंवा बाबांना कोणतीही कल्पना न देता आज्जीला फसवून तो जागा आपल्या नावावर करून घेतला...जागेचा व्यवहार कसा झाला..? आज्जीकडून किती रुपयांना तो जागा घेतला..? .त्याने आज्जीला किती पैसे दिले...यातलं माझ्या आईला नव्हे तर कोणालाच त्याने काहीच कळू दिलं नाही...तो जागा घ्यायचाचं होता तर आज्जीच्या मागे तिची लेक-जावई होता त्यांना याची कल्पना का दिली नाही..? त्यांना घेऊन का हा जागेचा व्यवहार का केला नाही..? हे सारंच गुलदस्त्यात..याहून कहर म्हणजे आज्जी आम्हांला सोडून गेली ती सहजासहजी नव्हतं...आम्हांला हे नंतर समजलं...
त्या दिवशी आज्जीने बाहेरून दिलेला कसलातरी भात खाल्ला होता...लगेच तिला उलट्या सुरू झाल्या...जीवाची कायली व्हायला लागली...पानंदिला परसाकडं गेली आणि तिथंच चक्कर येऊन पडली.कुणीतरी तिला उचलून घरात आणून झोपवलं तशी ती तिथंच कायमची झोपली...
आज्जीचे सोपस्कार पार पाडले..एव्हाना  आता बाबांना आज्जीच्या जागेविषयी समजलं होतं त्या वेळी  त्यांनी याचा जाब  त्या इसमाला विचारला तेंव्हा त्याने बळजबरी करत उलट बाबांनाच धमकावले...काय करणार आता इलाज नव्हता..कोर्टकचेऱ्यांची पायरी चढण्याची आमची तरी ऐपत नव्हती...खरं-खोटं करण्यासाठी पैशाची चवडी आमच्याकडे नव्हती.. शेवटी आम्हांलाच नमतं घ्यावं लागलं..आजही मला आज्जी आठवते ती या सर्व प्रश्नांसह.माझ्यावर अमाप माया करणारी माझ्या आज्जीच्या आठवणींना त्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची किनार आहे...तिने एकटीने सोसलेल्या-भोगलेल्या जगण्याचंय अंतसमयाला छेडलेल्या अन्यायीपणाचा इतिहास आहे.माझ्या मनातल्या  तिच्या हळव्या गोड आठवणींसोबत त्या कटू कठोर क्षणांचा भरलेला उद्रेक आहे.तिच्या असंतुष्टपणाचा  मुखडा सतत माझ्या डोळ्यासमोर तरळतोय.माझ्या मनात जशी ती एकबाजूला आठवणींच्या तशीच दुसऱ्याबाजूला अस्वस्थतेच्या रूपातून जिवंत आहे.माझ्या एका डोळ्यातून तिच्या आठवणी तर दुसऱ्या डोळ्यातून अस्वस्थता ढळतेय.ती अस्वस्थता मला त्या प्रश्नांच्या मुळाशी शिरून उत्तरं शोधण्यास भाग पाडते आहे.

------------------------------------------------------
किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा- ८८०६७३७५२८.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

गावकुसातली कथा: 'डोरलं' - किरण चव्हाण (पांगिरे)

             
                         
     
          
                  'डोरलं'

                    एका नीजंवर या कुशीवरनं त्या कुशीवर आंगाची नुसती तळमळ सुरू झाली. जीवाची आतल्या आत तगमग.आंगात फणफणून ताप नी उरात धाप.जरा हातरुणात आडवं पडलं तर वरची वर आणि खालची खाल हवा व्हायची.छाती नुसती भात्यासारखी धापत व्हती.आत किती भरून घिवू नी बाहेर किती सोडू.दम घोटायचा.पाण्यावाचून माशाची तळमळ व्हावी तशी जीवाची गत.. गडी घोटमाळून गेलता. रखमाला तर ती कळकळ बघवत नव्हती...जीवात जीव नव्हताच तिच्या.कुठं छातीत चोळ... पाठीत चोळ..पदरानं आंग पूस.फडक्यानं वारा घाल.अशी ती करत व्हती.आता या वक्ताला राचं गावात कुठला डाक्टर..? आता कुठं घिऊन जाऊं नी कुठं ठेऊ असं तिला झालतं... जरा तांबडं फुटलं आसतं म्हंजी कशीबी वाट धरली आसती... जरा सलोम पडायचा आणि परत धाप सुरू व्हायची... जीवाचा ह्यो खेळ बघण्यापलीकडं कायच करता इत नव्हतं.
ती बया तरी काय बिचारीची भाबडी आशा. जरा कोरा 'चा' करून द्यावा जीवाला बर वाटल आस तिला वाटत व्हतं...



"आवं करतो की नकाडा... वाईच घोटभर घ्या..जरा बरं वाटल जीवाला."

" आगं इथं हवा घोटना...आणि तुजा 'चा' कसा घोटल..."

तात्याबा इवळतच मधी बरळायचा.."माझं काय खरं न्हाई बघ...आरं ईठ्ठला मला वर तरी घे की रं बाबा आता पंधरा दिस झालं ..कायबी कमी न्हाय...कशाला परीक्षा बघतोस गरिबाची.."

त्याला सोसवत नव्हतं त्येजा एकेका शब्दांनं रखमाच्या डोळ्याला धार लागायची.पदराचा बोळा तोंडाला लावत ती बोलायची.

"आवं गप बसा की,कशाला आसं वंगाळ नगो ते बोलताईसा..तुम्हीं आस ढळलासा तर म्या बाईमाणसानं काय करायचं..कुणाच्या तोंडाकडं बघायचं...जरा कड काढा...भागाटलं की कुठलाबी दवाखाना गाठूया..मी तुम्हाला काय बी व्हवू देणार न्हाई...जरासा धीर धरा"

                                    पण तात्याबा तरी काय करील... परान कंठाला आल्यासारं त्याच त्याला झालतं.. जरा रात ढळली आणि डाव्या कुशीवर मुरगाळून पडल्याजागी, जराशी पापणीला पापणी डिकली... रखमाला जरा हायसं वाटलं.उशाला बसून तिच्या हाताचा पंखा चालूच व्हता...आणि डोक्यात आता येगळीचं चकरं फिरत व्हती...पुढ्यात एक काळजी आणि वरती त्या दुसऱ्या काळजीनं मनाची पुरती कोंडी झाल्याली...काय करायचं..?  काय सुचत नव्हतं...आता बाहेरच्या दवाखान्याला जायचं म्हंजी हातात जादाकमी पैसं पायजेत... पैसं..? आता या प्रश्नानं तिच्या काळजाला खरा पीळ पडल्याला...सभागती नजर त्या फळीवरच्या जरबंदी डब्याकडं गेली...उठून तिनं डबा जवळ घेऊन उघडला..दोन हिरव्या शंभर रुपयच्या नोटा आणि वरती थोडं सुटं पैसं व्हतं...
                       पंधरा दिस झालं..कमी जादाला इथल्या डाक्टरला दाखवून बघितलं पण...'आमच्याकडनं काय इलाज व्हणार न्हाई...शहरातल्या डाक्टरला दाखवाव लागल...जमलं तर दोनाला चार दिस ठिवूनबी घेतील..' हे डाक्टरचं बोलणं आठीवलं.. तिच्या डोळ्यासमोर अंधारच दाटला..हातातल्या नोटा कधी गळून खाली पडल्या तिलाच कळालं नाही...भानावर आली..पडल्यालं पैसं उचलून घेतलं..तसंच डब्यात ठेवताना ती इचार करायला लागली...हे पैसं दोघांच्या गाडीउताऱ्यालाबी पुरणार न्हाईत...इचार करता करता तिला काय सुचलं कुणास ठावं..? तिनं एकवार धन्याकडं नजर टाकली...जरा गडद झोप लागली व्हती...उशाला ढणढणीत चिमणी पेटत व्हती...पुढं व्हवून ती जरा मिणमिणती केली.भोवतीभोरच्या तांबूस उजेडानं माघार घेतली.रखमा हातरुणापाशी आली. पायाची चादर आबदार अंगावर वढली. आणि आपल्या हातरुणात लवाडंली.पर डोळा कुठं लागतोय.मनात इचार घोळतच व्हतं.यातनं कसं बाहीर पडायचं पण जराशी सांदर गावल्यावाणी झालतीं. आता ती भगटायचीच वाट बघत व्हती.
                       आतास कावळं करकरायला लागल्यालं.तशी वर उठुन चुलीजवळ आली.चुलीत तुरकाट्या लाकडं कोंबून जाळ केला. पाण्याचं भुगुण चुलीवर ठेवायला...इकडं खोकल्याच्या उबाळीन तात्याबाला जाग आली.तशी पुन्हा धाप सुरू झाली.तसच गडबडीन भुगुण ठेऊन ती हातरुणाजवळ आली.

"आता कुठं झोप लागल्याली, पेटली ती धाप जरा बंद झालती आणि सुरू झाली..दमा घोटभर 'चा'करती जरा बरं वाटल.." तिनं लागलीच 'चा'चं भुगुण चुलीवर चढीवलं.. बाहीर गेली चार तुळशीची पानं घेऊन आली..उकळी आलेल्या 'चा' त टाकली..'चा' बशीत वतून जरासा फुकरून हातात दिला..तात्याबानं थरथरत्या हातान बशी तोंडाला लावली.

"मी जरा येतू जाऊन..तूमी पिऊन घ्या तवर..आशी गेलो नी आलो.."

"आगं तू आणि कुठं जातीस ."

"तुमी आणि कुठू नगसा...आठला पहिली गाडी हाय आवरायला हूवं पयला दवाखाना गाठायचा आता थांबून न्हाई चालायचं.."
                  कसल्या तरी इराद्यान ती बाहीर पडली..दणाणा पाय टाकीत पांदीच्या वाटणं गावातला रस्ता धरला..ईठुबाचा कळस नजरला आला तसं तिथनच तिनं हात जोडलं. डोळ्यांतनं टीप गाळीत वठातल्या वठात कायतरी पुटपुटली..आणि पुन्हा पुढचा रस्ता कातरु लागली..गोठ्यातन गाई-म्हशीचं हांबरनं.. गळ्यातल्या घाठीचा किणकिणत्याला आवाज कानावर इत व्हता.एव्हाना धारा काढायला गोठ्यात बसल्याली.. गोठ्यात शिरणारी माणसं नजरला दिसत व्हती..रखमा चटाटा पाय उचलीत म्होरं सरकत व्हती..आली आली दिसाचा गोंडा फुटायच्या आत ....सुदंराबाई पाटलीनीच्या घरापाशी आली..आबा पाटील म्हंजी गावातलं दांडगं कुळ. धान्यांचा व्यापार व्हता...पैसा मिळू लागला..धंदा त्यानं  नी बायकोनं पैशाचा कारभार बघायचा..बायको मात्र चापटर तशी चलाखबी व्हती...येजान पैसा फिरवायची...अडला नडला हरी...गावकरी मोठ्या आशेनं हुंबरा चढायचा...आताबी रखमा मोठ्या आशेनं आली व्हती....सुंदरा पाटीलीनीला बघताच तिचा ढळ फुटला...आणि सरळ तिनं पाय धरलं...

"बाईसाब मला गरिबाला एवढं या संकटातनं वाचवा..लई उपकार व्हतील तुमचं."

"आगं हो..हो..रामाधरमाच्या पारी आसं रडायला गं काय झालं..नीट सांग तरी."

"बाईसाब काय सांगू तुमास्नी... आता गेलं पंधरा दिस झालं त्येंच्या जीवाला बरं न्हाई..पल्याड गावच्या डाक्टरला दावलं पर काय उपेग न्हाई...आता म्हंत्यात शहरातल्या मोठ्या दवाखान्यात दावायला हुवं..आता तुम्हींच सांगा त्या डाक्टरला द्याया आमच्यासारख्या गरिबाकडं कुठला आलाय एवढा पैसा..."

"आगं व्हय...बरोबर हाय सगळं पर आम्हीं इथं पैसा काय वाटत बसलोय कागं बाई.सकाळी सकाळी आमचंच घर गाठायला"

"आसं बोलू नगसा..एवढी 'धा' हजाराची नड काढा..."

"धा.. हजार.??" आंगला कुसाळ बोचावं तसं पाटलीनीन केलं.एखादा इंगोळ पुढ्यात पडावा नी आंग माग घ्यावं तसं ते बोलणं मागं सारत बोलली.

"आगं आता एवढा पैसा काय जवळच घिवून बसलीया व्हय मी.."

 " मी पाया पडतु तुमच्या .मी एकटी बाई काय करणार.?..कुकवाचा आधारच असा संकटात सापडलाय...तुम्ही देव माणसं हायसा..या येळप्रसंगाला या गरिबाला तुमचाच आधार बघा...माझं कुकू तेवढं यातन घट्ट व्हवू दे रातध्याड राबून तुमचं पैसं परत करतो...खरं या जिवावरच्या परसंगातनं बाहेर काढा.."

रखमा पायाशी गयावया करालती...खरं दगडाच्या काळजाची बाई म्हंत्यात तिला.तिला कुठला पाझर फुटतोय...

"आगं तू एवढं पैसं मागालीस खरं कुठल्या भरवश्यावर द्यायचं गं बाई तुला...तुझ्या कडं जमीन नाजुमला..ऱ्हातं नकाड घर..कसा इस्वास धरायचा.?."

"बाईसाब...आम्हीं तुमचं पैसं बुडवणार न्हाई...फकस्त एक डाव इस्वास ठेवा माझ्यावर शब्दाला बांधील हाय म्या. दिस रात एक करीन पर तुमचं पै न पै फेडीन...माझ्या धन्याला यातन बरा व्हवू द्या.."

"आगं आसं पैसं न्हेताना लई काय बाय मोठं बोलत्यात..शबूद देत्यात... आणि गरज सरली की,मग इसरत्यात.."

"न्हाई...न्हाई बाईसाब....आसं न्हाई व्हणार एक डाव इस्वास ठेवा या गरीबावर... हावं तर तुमच्या शेता मळ्यात आम्हीं नवरा बायको..राबून तुमचं पैसं फेडतो...पर मागं एक रुपया ठेवणार न्हाई."

"व्हय हे बोलाय लई सोपं हाय...बस थोडा येळ आलो म्यां.."

.तशी सुदंराबाई आत गेली..

रखमानं डोळ्याचं पाणी पदरानं निचरून घेतलं...पैसं मिळालं तर बरं....न्हाई तर..??

न्हाई...हा इचारच मनाला अजिबात सोसवत नव्हता ती लगीच झटकून  टाकत व्हती... देवालाच हात जोडायची त्येजाच धावा करायची..

काय बी व्हवू दे पैसं घेतल्याबिगार माघारी वळायचं न्हाई..ती आता ठाम झाली व्हती..तवर मधल्या हुंबऱ्यास्न सुंदराबाई बाहेर आली.

येऊन आपल्या जाग्यावर बसली..काय तरी येवजूनच बाहेर आली व्हती..

"रखमा आता तू एवढी काकुळतीलाच आलीस म्हटल्यावर तुला पैसं दिन..पण एका अटीवर.."

'पैसं दिन' हे ऐकूनच रखमाला आभाळ खुज्ज वाटायला लागलं...मनाला लई आनंद झाला..बाई साब लई उपकार व्हतील तुमचं. तुमी कायबी सांगा मला मंजूर हाय.."

"रखमा...बघ नंतर न्हाई म्हणशील."

"आवं बोला तुमी मी न्हाई म्हणणार न्हाई."

"तुझ्या गळ्यातलं डोरलं घानवट ठेवायला लागल..."
                  एखादी इज अंगावर कोसळावी तशी गत झाली,वल्या जखमवरच घाव बसल्यागत झालं...ज्याच्यासाठी मगाधरनं आटापिटा केला..त्यालाच हिसडा दिल्यागत झालं...काय बोलावं तिला सुदरना...तिचा घसा कोरडा पडला...बाईसाब...आवं माजा जीव मागितला असतासा तरी मी मागं घेतलं नसतं पर... डोरलं..?" तिला दाटून आलं.

"आवं ते तर गळ्यात शाबूत ऱ्हावं म्हणूनच तुमच्या दाराला आलो नवं.."

"हे बघ जास्त लांबड लावू नगस.काय ते ठरीव कबूल आसल तर बोल न्हाई तर दुसऱ्या कुणाकडंबी जाऊन घे जा पैसंं.माझ्याकडं मिळणार न्हाईत.."
                        रखमाला आता चांगलंच कोडं पडल्यालं.. काय करावं.. एक तर येळ टळत व्हती...आता लई इचार करून उपेग नव्हता...आठची गाडी गावायला हुवी... माग घराकडं आणि कसं झालंय कुणास ठावं..?
मन बधिर झाल्यालं...ज्याच्यासाठनी आटापिटा करायचा त्येला हात घालायचा...पर काळजावर दगड ठेऊन निर्णय घेतला आणि गळ्यात हात घातला तिथंच आत गळ्यात हुंदका दाटल्याला..डोळं मिटून ती दोरल्याची मुठ त्यांच्या हवाली केली....नवरा तिकडं  जिता हाय आणि इकडं बाईचा गळा रिकामा झाला.. देव कसली परीक्षा बघत व्हता ही..?

'सा महिन्याच्या परतीवर देतोय बघ तुला...'धा'हजाराचं 'धा'टक्क्यानं  'सा' हजार याज व्हतय..एकूणला सोळा हजार दिलं पायजेस.ते बी येळवर..."

नाईलाज व्हता त्येनी  बोलायचं आणि बिचारीन कबूल करायचं..इलाज नव्हता..दगडाखाली हात व्हतं...येळ वाईट आल्याली...मान हलवून होकार भरला...डुईवरचा पदर सळा केला...हातात पैसं घितलं..

पदराच्या एका धडीत पैसं घेतलं त्योच पदर गळ्याभोवती घेतला.. मोकळा गळा झाकला.पदरात नवऱ्याचं नशीब बांधून गळक्या डोळ्यानं बाहीर पडली.
                           लगबगीन घर गाठलं..तवर गल्लीतल्या आयाबाया घरात जमल्याल्या... तात्याबा जरा कलंडला व्हता पर उरातली धाप सुरूच व्हती...आत पाय ठेवता तवर....पाराक्का पुढं व्हवून बोलू लागली.

"आगं पोरी आसं  ह्येला एकटं टाकून कुठं गेलतीस..थार पडना त्येला..कणत्याला आवाज ऐकून आत आलो तर ह्यो आपला धापा टाकालाय...काय कमी न्हाई व्हयगं.."

तिला भडभडून आलं ती पाराक्काच्या गळ्यालाच पडली.

 "पारूमावशी मी आता काय करू..."

"गप लेकी गप...काय करुया दुखण्याच्या पुढं कुणाचं चालतय..." पाराक्कानं तिला गप केलं...नी एकाकी नजर तिच्या मोकळ्या गळ्याला गेली तशी चपापली...पोरी.. गळ्यातलं डोरलं गं काय केलीस..?

आता काय सांगायचं नी कसं सांगायचं..  रखमा येडबाडली...नवरा तर पुढ्यातच..खाली मान घालून हुंदकं दीत सांगू लागली..

"सुंदराबाईकडं 'धा' हजाराला घानवट ठेवलं..."

"तिला रोग आला.. मोळा मोडला तिजा. कडू ब्याची रांड... जगाला बुडवून इमला रचालीया पैशाचा.." पाराक्का एकदम संतापली.

"आता काय करायचं कुठंन आणायचं एवढं पैसं दुसरी वाटच न्हाई. बाई तर जुमानायला तयार न्हाई...हातात पैसं तर पायजेत." रखमा.

"एक डाव दाल्ला बरा त्येला जरा तरी दयामया इल खरं ही बया लई पैशाला हापापल्याली...नवऱ्याला आपल्या अंकितच करून घेतलाय आणि पैशाचा कारभार बघती... येजाचा पैसा खोऱ्यान वडतीया..असू दे लेकी येळला मिळालं म्हणायचं पर तू तुज आवरून घे मी आलूच.." तशी पराक्का आपल्या घराकडं गेली..

रखमा आपल्या तयारीला लागली.. खिनभरातच पराक्का माघारी परतली.एका दोऱ्यात काळं मणी टवून आणल्याला दोरा तीन रखमाच्या हातात दिला..

"घाल लेकी तसा मोकळा गळा ठिवू ने पदरात एवढा भरभक्कम नवरा असताना भुंडा गळा सोबत न्हाई..."

तसं त्यो काळ्या मण्यांचा धागा तिनं गळ्यात घातला...गाडीची येळ व्हईत आलती...घाईगडबडीत आटीपलं आणि रखमा तात्याबाला घिऊन बाहीर पडली..
                           आठच्या गाडीनं शहरातला दवाखाना गाठला.डाक्टरनं तपासून बघितलं नी निदान गावलं..तात्याबाला 'न्यूमोनिया' झालता. तरी येळवर इलाज सुरू झाला म्हणून बरं न्हाई तर जीव धोक्यात व्हता.डाक्टरनं चांगलं पंधरा दिस दवाखान्यात ऍडमिट करून घेतलं...तब्येतीत सुधारणा व्हवू लागली,त्याच्या नशिबाची दोरी घट म्हणून निभावलं तात्याबा यातन वाचला.खरं तर रखमान आखीरला त्येला बरं करून घरला आणला.येळच्या येळ गोळ्यावशीधं,पथ्यपाणी नीट केलं आणि गडी महिन्याभरात झाला की ठणठणीत. आता कुठं रखमाचा जीव भांड्यात पडला. कपाळाचं कुकू तरी घट्ट झालं म्हणायचं.आता घोर व्हता गळ्यातल्या दागिन्याचा..आता त्याची कशी उसाभर करायची..? दोघा नवराबायकोच्या जीवाला मोठा घोर लागून राहिल्याला...पर कच खाऊन चालणार नव्हतं...दोघबी इरला पेटली.रातध्याड नुसतं जीवापाड राबनं सुरू झालं.इस्वाटा असा न्हाईचं.पोटाला जरा चिमटा काढून पै पै गाठीला मारून ठिवला...
                           पावसाळा मागं पडला तरीबी चार महिनं झालं असतील..एका सांच्यापारी सुदंराबाईनं रखमाला बलवून घेतलं तवा ती भीतभीतच गेली आणि माघारी वळली.तवाधरनं तिनं दोन दिस हातरुनच धरलं.खाण्यापिण्याची सूद न्हाई का कसल्या कामाधंद्यांची.नुसती चिनभिन झाल्याली...तात्याबानं तिच्या मनाची खूप रुजवात घातली खरं.. तिचं मन ऐकून घ्यायलाच तयार न्हाई..गल्लीतल्या आयाबाया मनधरणी करीत व्हत्या...आकिरला पाराक्कानचं तिला कसंबसं समजावलं.." आगं रखमा एवढी शानी पोर तू आशी खुळ्यावाणी काय करालीस..अगं सावित्रीनं जसा नवऱ्याचा जीव परत आणला तसा गळ्यातला दागिना ठेऊन तू दाल्याचा जीव वाचवून घेतलीस.. एवढं जीवावरचं संकट मागं सारलस आणि या एका दागिन्यांचं काय..घेऊन बसलीस..? ती म्हणती न्हवं दोरलं घाळ झालं तर व्हवू दे नशीबातल तरी काय घेऊन गेली न्हाई नव्ह..हे बघ तुझं केवढं मोठं नशीब तुझ्यासमोर भरभक्कम हाय...आगं तरुण हायसा माप राबशीला आगं डोरलंच काय माप सोन्यानं मडशील बघ पोरी..आग लबाडीचं ढोंग कुठपातोर..? बघशीलच तू चालत न्हाई ते...गरीबाचा तळतळाट लई वाईट आसतोय पोरी.. न्हाई लाभत हे आसलं." तशी पाराक्काच्या गळ्याला पडून रखमानं आपलं मन रीतं केलं.आणि झालं गेलं सारं मागं सोडलं.
                          सुदंराबाईला वाटत हुतं आता कुठलं रखमाकडनं पैसं मिळत्यात. म्हणून तिचं डोरलं घाळ झाल्याचं खोटनाटं सांगून डोरलं मोडून तिनं आपल्या लाडक्या नातीला नवा दागिना केला व्हता.दिस माग सरत व्हतं..पण वरीसपन व्हाय नसल ...मळ्याकडं जाताना वाटला छातीत कळ मारून जोराचा झटका आला आणि वाटतच आबा पाटील सपला...सुंदराबाईच्या  कपाळाचं कुकू असं अवचित पुसलं गेलं. ढिगान पैसा व्हता खरं दवाखानाबी गाठू दिला न्हाई..तिला आपलं कुकू शाबूत ठेवता आलं न्हाई..
काळयेळ कुणाला सांगून येत न्हाई.
कुणाला लुबाडून आणि फसवून जन्माला पुरत न्हाई.. खोटं जादा दिस टिगत न्हाई..कधी रावचा रंक नी रंकाचा राव व्हईल सांगता येत न्हाई..
                        सुंदराबाईनं लबाडीन रखमाचं डोरलं वरबाडून घेतलं खरं, कष्टाच्या जीवावर दिसरात एक करून आकिरला रखमाच्या गळ्यात नवं डोरलं आलं..पण सुदरांबाईच्या गळ्यातलं डोरलं काळानं हिसडा मारून घेतलं ते तिला परत मिळल...?

------------------------------------------------------

- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)
मोबा- ८८०६७३७५२८.              

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

'जोडी... पांडू आणि हौसाची.'



                'जोडी... पांडू आणि हौसाची.'
                                             
                          गल्लीच्या वयल्या अंगाला पांडू नी हौसाच्या जोडीचं छोटसं घरटं. तरीबी 'धा' वरसापूर्वी दुसऱ्या डाव बेघर म्हणून बांधल्यालं. दारालगत आत आर्ध्या भीतीच्या आडोश्याला चूल. चुलीच्या बानोश्यावर अर्ध्यापतोर रकॅल भरल्याली संत्रा बाटलीची तयार केल्याली चिमणी. नावाला मोजकी जरबंदी भांडीकुंडी, बुडाला काळ्या ठिपक्यांची जरबंदी भुगुणी.सतरा ठिकाणी चेप खाल्याला स्टीलचा तांब्या.पाणी साटपाला दोन तीन लबरी घागऱ्या,एक मोठं जरबंदी भुगुण.तिथंच मागं जळणाच्या लाकडांचा ढीग.त्येला तिरपा करून ठेवल्याला तुरकाटीचा भारा.चार इटावर ठेवल्याली लाकडी पेटी.खोपड्याला लागून कंबरंएवढ्या मापाची न्हानगी कनींग.त्येजावर धडूतं-बिडूत कायबाय ठिवल्यालं.एका खुट्टीला दोन चार नव्यापाण्या दोरीच्या जोड्यांची गुंडाळी आडीकल्याली.कुणी दोऱ्या करायला दिलेली जुनी लुगडी.तर एका बगलला त्याच्या काठपदराच्या काढल्याला धडपा.साळोतं आवळायासाठी मारलेला खुट्टा.साळोतं किसायची किसनी खोपड्याच्या संदरित कोंबून ठिवल्याली.असा गरिबा घरचा संसार...
                      पांडू नी हौसा या नवराबायकोची जोडी तशी मुलखायेगळी.पोटाला पॉर नाही.पांडू...डोक्यावर पांढरी टोपी,अंगात ढगळा शर्ट...गुडघ्यापतोर काळीसावती चड्डी.तसाच रंगानंबी.खिडखिडीत अंगाचा गडी.पांढऱ्या मिशा,दोनी बाजूची गालफाट रुतल्यावाणी...डोळ्यांत सदा नशेची धुंदी.असा त्याचा येबाव.रातध्याड नुसत्या दारूच्या लहरीत असणारा... पांडू सुद्धीवर असलेला असा एकबी दिस नसल.बघल तवा दारू पिवून तर्रर्र. लडबडत चालायचा...रस्त्यानं साधं घर गाठताना स्वारी कित्येक येळला कलंडायची.एक दिस कधी शिवीशिवाय पाणी प्यायला न्हाई..बायकोला रांड-उंडगी म्हणून शिव्या द्यायचा...आई भन काढायचा..नजरंसमोर बायको लागायची..जरा कुठं हौसाई बाहीर चालली की,नकाड्या पोरागत पांडू तिच्या माग माग जायाचा..तिच्या पदराचं आपल्या हाताला पिळोकच घालायचा..हौसाईला कुठं जायची सोय न्हाई.गडी आलाच मागणं.. तरीबी डोळा चुकवून कुठं गेली.की मगं धडगत नसायची.स्वारी रागानं घरात कुठं भांडी आपट.. एखादी वस्तू बाहीर दारात फेकून दे,तोंडात आशील शिवी घेऊन घरातन गल्लीत...गल्लीतन घरात नुसत्या येरझाऱ्या मारायचा...तोल जायचा.. "येऊ दे रांडला मग बघतो."..दारूच्या लहरीत वेडावाकडा शब्द फुटायचा...पांडूची अशी फजिती बघून बघणाऱ्याला चांगलीच गंमत वाटायची.एकेकदा दारुसाठनी बायकोमाघारी घरातलं धान्यदुणं कवा बिनपत्त्या बाहेर इकायचा.
                           एक बायको आणि दुसरी दारू याशिवाय पांडू एक दिस नव्ह एक तासबी कधी इसमून ऱ्हायचा नाही.सकाळी उठल्या उठल्या 'चा' नको खरं दारू पायजे..उठायचा ते पहिलं दारूच्या गुत्ता गाठायचा.ती बया एकदा अंगात भिनली की,दिसभर पांडू आपल्याच नशेत.असल्या खुळ्याकावऱ्या दारुड्या नवऱ्याबरोबर हौसाईचा संसार. असंच निम्मं आयुष्य मागं सरलं.हौसाई..जुन्यापाण्या नऊवारी साडीतली बाई.गोल चेहऱ्याची,अंगानं तशी भरभक्कम व्हती.मक्याच्या कणसागत तिचं दात दिसायचं.बोलताना तोंडावर उजाळा असायचा.नवरा इतका तरास दिवूनबी कधी जोराच्यानं तिनं त्येजासंग भांडाण-तुंडाण केलं नाही...ना कधी रुसून-फुगून त्याला सोडून गेली..जसा तो म्हणलं तशी वागत आली.नवरा शिवीशिवाय पाणी प्यायचा न्हाई तरीबी त्याच तिला काही वाटत नसायचं.तिला ते रोजचचं झाल्याल.सगळ्या आयबायासंग बोलून सवरून गॉड वागायची. कधी कुणाच्या कामाला न्हाई म्हणायची न्हाई.कुठल्या बी बाईला हाळी मारताना "आवं बाईसाब" आणि 'येवा-जावा' शिवाय बलवायची नाही.नवं लगीन व्हवून आल्याली बया असू दे तिला बी आदबिन बोलवायची.दुसऱ्याला लई मोठेपणा द्यायची..लहान थोर कुणासंगबी आदबिन वागायची.बोलताना सदा तिच्या चेहऱ्यावर एक हासरेपणाची छटा असायची.
                             गावचा मांग म्हणून पांडू देवाच्या पालखीला दिवाळी दसऱ्याला गावच्या वाजत्र्यांच्या वाजपात सामील होऊन हालगी वाजवायचा.तवा बी त्यो सुद्धीत नसायचा.तर हौसाईला मांगीन म्हणून गावच्या आयबाया यल्लमाच्या यातरला जाताना तिचा खर्च घालून न्यायच्या. तिच्याकडन लिंब नेसयच्या.मग थोडीफार बिदागी मिळायची. चोळी पाताळ.. तांदूळ नाराळ मिळायचं.गावकी हौसाईकडं  असायची तवा गावात कुणाचीबी कथा आसली की,त्या घरची माणसासनी लिंब नेसवायचं..सुवासिनी डुईवर पाण्याचा कळस घेऊन मांगाच्या कुंडाला येत..त्यावेळी हौसाई जावंच्या दारातल्या तुळसकट्ट्याची जागा झाडून लख्ख करायची एखादी चटई हातरायची..लई हौसेनं सगळं करायची.. त्या दिशीचा तिचा दिस त्या घरात याच उसाभरीत जायाचा..कुठणं लांबन शिंदीचा बिंडा आणायचा त्यो किसून घरात त्येजं साळोतं तयार करायचं.ते बाजारात इकायचं,पावसाळा सपायला दसरा दिवाळीला नदीत बंडू मांगाच्या मागणं साट लावायचा,त्या साटावर गावल्याल मासं बुट्टी घेऊन गावागावांत बुट्टी डुईवर घेऊन इकायचं. राचंईळाच साटावर जायाय लागायचं. कधी नवरा असायचा कवा दारू पिऊन ल्हास असला की बंडूमासोबत जायाय लागायचं...
                                                      गावातन जुनी लुगडी-पातळं मागून आणून त्याच्या लांब धडपा काढून दोऱ्या इनायच्या..दाराम्होर ऱ्हाटं व्हता..त्येजावर लांबलचक दोऱ्या बनवायच्या..पोटाची खळगी भरण्यासाठी कुठलाबी उद्योग करणं भाग असायचं,वैशाखाच्या वणव्यात उन्हातान्हात नदीवताडातनं करंज्या गोळा करायच्या, घरला आणायच्या, त्या फोडून करंज्याच्या बिया कापशीच्या बाजारात इकायला न्यायच्या.कोंबड्या पाळायची.संसाराला लागणाऱ्या हरेक गोष्टीसाठी हौसाई असं नानातऱ्हेचा खिडुकमिडुक उद्योग करायची.शिंदी किसून साळोतं तयार करायला आणि लुगड्याच्या पदराच्या दोऱ्या करायच्या या कामाला तेवढाच काय त्यो पांडूचा हातभार लागायचा.ते बी तेजाकडून करून घेताना हांजी हांजी करायला लागायचं. नाही तरी हौसा एकहाती एकटीच संसाराचा गाडा हाकत व्हती.खरं कुणाकडं आशा ठेवत नव्हती.इल तसं दिस कटत व्हती.मिळल त्या कमाईतलं निम्यापेक्षा जादा नवऱ्याच्या दारूवर खर्च व्हायचं.घरात तेलामिठाला कमी खरं नवऱ्याच्या दारूला जादा खर्च व्हयाचा.एक दिस जेवाण नसलं तरी चालल पण दारू पायजे..त्येज आयुष्य दारुतच गेलं..अशा दारू.. दारूनं गडी पार आत आला...अंगाला नुसता कापरा भरायचा. कायबी करताना हात थरथर कापायचं.चालताना लडबडायचा.तरीबी दारू प्यायची कमी न्हाई.रोज सकाळ संध्याकाळ लागायचीचं.
                                आता दारूच्या गुत्त्यापतोरबी चलवना.जेवान जाईना,बसला जागा उठवना..पांडूची खरंच आता रया बदल्याली.आता त्येला चार पावलं चालायचं सुदरत नव्हतं.दारूनं सगळं शरीर खगुंन गेलंतं.बसल्या जाग्यासन घस्टत पुढं सरकायचा..खरं अजूनबी जीव तळमळायचा नुसता दारूसाठी.एवढं घडूनबी दारू काय सुटत नव्हती.एक दिस दारू नसून भागायचं नाही.दारू दिली नाही तर अंगाला कापरी सुटायची.कायली करून घ्यायचा.तसं आता दारू आणून देण्याचं आणखीन एक हौसाचं काम वाढलं.ती सोता दारूच्या गुत्त्यावर जाऊन तांब्यातनं दारू घेऊन यायची.एकेकदा रात्रीचं तर रात्रीचं नदी पल्याड  दारू आणायला जावं लागायचं.. नाही तर गडी थार खाऊ द्यायचा नाही. आणि मग दररोज असंच सुरू झालं...माणसं तिला म्हणायची 'तुच त्येज लाड करतीस बघ कशाला आणून देतीस दारू..?' पर काय बोलायचं ज्याचं दुखणं त्यालाच ठावं... बोलून उपेग नव्हता.आता तरी रोजचचं झाल्यालं. रात्री जाऊन दारू आणून देणं...हळूहळू पांडू पाकच खराब झाला..नव्ह दारूनच त्येला बाद केला..दवाखाना केला पण कुठलं काय..आतली आतडी काळीनिळी पडल्याली.. आतला दागिना दारूनं बाद झाल्याला..डाक्टराचा आता कायबी इलाज चालत नव्हता...पांडूनं हातरुन धरलं, खाणं-पिणं सोडलं,पोटाचा नगारा तेवढा वर खाली व्हईत होता.हौसा नवऱ्याची सेवा बजावत व्हतीच.. आणि...एका पाटला त्यानं प्राण सोडला... गेला हौसाचा पांडू गेला..दारूपायी संसाराचा खयोळ करून गेला... बायकोची नुसती झडती घेतली.      गेला हौसाचा पांडू गेला..ती कासावीस झाली..कसाबी आसना का कपाळाच्या कुकवाला आधार व्हता...                 
                  तिनविला त्येजा गोरीवर काकनं फुटली..गळ्यातलं दोरलं काढलं तवा ती म्हणत व्हती..."माझा राजा कसाबी असना व्हता.. खरं माझ्या कुकवाला आधार व्हता की गं बया.... आता मी कुणाकडं बघून दिस काढू गं बया..." हौसाचं रडगाणं तिच्या दुःखाला सजवत व्हतं..पांडू गेला...हौसाई एकटी पडली.. तसा मागं भावाचा आधार व्हता खरं तिनं आपलं घर सोडलं न्हाई.तेवढीच चार दिस माहेरात ऱ्हावून मागं परतायची...पांडूबिगार तिला आता सोभा नव्हती.कितीबी झालं तरी दोघ एकमेकाला इसमून ऱ्हायाची नाहीत..लई जीव दोघांचा एकमेकांवर.गल्लीच्या वरच्या बाजूला दोघा नवराबायकोची रोज काहींना काही बात कानावर पडायची. आता पहिल्यासारी रया तिच्या तोंडावर नव्हती..त्यो तजेला आता दिसत नव्हता..नवरा गेल्याचं दुःख तिला आतल्या आत खाईत असावं.नवरा एवढा छळायचा खरं त्याची तिला लई काळजी..नकाड्या पोराला जपावं तसं नवऱ्याला जपत व्हती.ते घरं कसंबी आसना का पांडू हौसाच्या जोडीनं घराला सोबा व्हती..तीच निघून गेली.  रातीला त्या घरात एकटीला झोप लागायची न्हाई.कसली कसली वाईट सपनं पडायची म्हणून शेजारच्या घरात अंगाची वुळकुटी करून पडायची...त्या दिशी म्हण कुणाच्यात बांध वडायला गेली... इळभर काम करून आली.रातीला गल्लीतल्या डापळ्याच्या घरात बसली अंड्यांचं सांबार व्हतं तिथंच नकाडं जेवली.आणि दाराला येऊन रांकुंडी लावत बसली..तवर का छातीत कुठंन कळ मारली..तशी किचळतच आत मधल्या सोप्याला आली.."बाईसाब.. माझ्या छातीत दुखालय...चोळा...जोरानं चोळा..आवं मला आस काय व्हायलय...छातीत..पाटीत दुःखालय की वो बाईसाब..".हौसाई कायली करून घ्याय लागली कडची शावाक्का तिच्या छातीवर चोळाय लागली..घरात धांदल उडल्याली..तवर आजूबाजूच्या आयबाया जमल्या व्हत्या..कुणी गावातल्या डाक्टरला बलीवलं.गल्ली जेवून निवांत झाल्याली पर डापळ्याच्या घरातला गलका ऐकून जो तो तिकडं पळायला लागला..बघतोय तर हौसाई त्या घराच्या सोप्यात कायली करून घ्यालती.. आयबाया सगळ्या तिच्या भवतीनं.. कुणी तिला पाणी पाजत व्हत्या.. कुणी तिच्या डोक्यावर थापटत व्हत्या...डाक्टर आला तपासलं..हौसाई "माझ्या छातीत लई दुःखालंय" एवढंच बोलत व्हती..तिचं अवसांनच गळाल्याल..तिची तगमग व्हयालती.प्रकरण हाताबाहेर हाय डाक्टरनं जाणलं..बाहेर येऊन अंबुलन्सला फोन लावला.. अगदी पंधरा मिनिटांत गाडी दारात आली..लोकांनी हौसाला उचलून आंबलूनस मधी ठेवलं.. तशी ती बोलली "आता मी काय यातन जगत न्हाई..परतून माघारी येत न्हाई.."असंच बडबडायला लागली..तशी तिला सगळ्यांनी गप केली..'गप काय व्हईत न्हाई तुला कायबी बोलू नगस..भिऊ नगस" आयाबाया समजून सांगत व्हत्या..गाडी गेली...चांगल्या धडधाकट बाईला असं अचानक काय झालं..? माग चर्चेला उधाण आलं.
                                तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात घेतलं न्हाई म्हणून जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं तिथं इलाज सुरू झाला.तरीबी आठ दिस झालं असतील आणि एका सांच्यापारी गल्लीच्या कानावर बातमी धडकली.... हौसाई गेली...बिचारीला मराण कळलं व्हत का कुणास ठाऊक.. जाताना बोलली ते खरंच झालं.तिच्या दारबंद घरासमोर गल्लीतली लोकं जोडणी घालू लागली.एकेक पावना जमू लागला..नातंगोत जमा व्हायला लागलं.तरीबी मड्याची गाडी यायला रात्र झाली.खूप माणसं गोळा झाल्याली.दाराम्होरं खाटंवर पांढऱ्या कापडात गुंडाळल्याला हौसाईचा मुडदा. एक जुनी चादर त्येजावर टाकल्याली. बघता बघता हौसाईच्या घराम्होर माणसांची गर्दी फुलल्याली.कुठल्या कुठल्या गल्लीतल्या आयाबाया फुटून साऱ्या हौसाईला बघायला.तिला बघायच्या आणि डोळ्याला पदर लावत मागं सरायच्या...वल्या डोळ्यांनी चूकचुकत व्हत्या....तेल्याचा बाळूआण्णा तर किती येळला तिच्या पायाला हात लावून डोळं मिटून रडत व्हता.माणसांच्या गर्दीतनं मड नजरला पडणं मुश्किल झालतं..हौसाई माणसांच्या गर्दीत मुजली व्हती.खरं तर या येळला तिचं खरं सत्व कळत व्हतं...बिचारी गरीब गाय पण जिवाभावाची नातीगोती नुसत्या शब्दांवर जोडली व्हती...ही म्हणायची तिची खरी श्रीमंती... तिच्या मड्याला माणसं मावनात.
                                हौसाई गेली खरं तिचा गुणवाण कुणाला जमणार नाही. तिच्यासारखी तिचं.नवरा दारुडा..पोटाला पॉर ना घराला ढ्वार.ना नवऱ्याचं सुख ना पोराचं...आयुष्यात कसली हौस नाही...कसली आशा ठेवली नाही..पदराची चिंधी इणली...वताडाच्या करंज्या फोडल्या...दुसऱ्याच्या मातीत राबली नी संसार केला..खरं माघार घेतली न्हाई...कधी या कर्माला कावून म्हायरला गेली न्हाई...काडी काडी जमवून संसार केला..इल ती कमाई नवऱ्याच्या दारूवर खर्च व्हायची...पण कधी कुणाकडं रुजवात घातली नाही...माशासाठणी राचंइळाचं नदीवर साटावर जायाय लागायचं..संग कधी नवरा असायचा नसायचा...परक्या माणसाबरोबर जायाचं..पण कधी आपल्या बाईपणाला बट्टा लागू दिला नाही...साधीभोळी कुणाच्या कामाला नाही म्हणायची नाही...माणसाला लई चांगली..अजूनबी गल्लीगावातल्या आयाबाया हौसाचं नाव काढून चुकचुकत्यात..तिच्या कान्या एकमेकीला सांगत्यात..खरी जातिवंत बाई म्हणायची...वागण्यात प्रामाणिक...सात्विक..पतीव्रता...सोशिक नी गुणी होती.हौसाई गेली खरं अजूनबी मागं आयाबाया तिचं गुणगान गात्यात...पांडू आणि हौसाची जोडी फुटली...पांडूमागोमाग हौसाईबी गेली आणि गल्लीची सोभा गेली..आता ते ओकबोकं कुलूपबंद घर बघितलं की,त्यांच्या गजबजलेल्या आठवणी मनात आपसूकच घर करतात.

- किरण सुभाष चव्हाण(पांगिरे)
  मोबा- ८८०६७३७५२८.

सोमवार, २ मार्च, २०२०

चिक्केवाडी या दुर्गम वस्तीची जाणून घेतलेली दुर्दशा..






'चिक्केवाडीला विकासाची वाट कधी मिळणार..?'
                                               
                      भुदरगड तालुक्यातील गारगोटी या मुख्य ठिकाणापासून पाटगाव हे ३५ किलोमीटर अंतरावरचे गांव.१६ व्या शतकात मौनी महाराजांचे या गावी वास्तव्य होते.छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर जात असताना मौनी महाराजांची या ठिकाणी राजांनी भेट घेतली होती असे हे ऐतिहासिक ठिकाण. दोन महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी...अजूनही मौनी महारांचा मठ त्या पुण्यभेटीची साक्ष देतो.मावळत्या अंगाला विस्तीर्ण असे पाटगाव धरण...संपूर्ण परिसर जलमय दिसतो.या धरणाच्या पाण्याने चहूबाजूंचा परिसर अगदी सुजलाम सुफलाम झालेलाय.हिरवाईने नटलेला शिवार..सुखासमाधानं नांदणारी देखणीपान घरं. घरासमोर अंगण.असं कोकणरूप ल्यालेलं पाटगाव.या गावापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर  घनदाट झाडीझुडपांच्या जंगलात वसलेला प्राचीन असा रांगणा  किल्ला आहे आणि या किल्ल्याचा पायथ्याशी चिक्केवाडी ही छोटीशी लोकवस्ती.
चिक्केवाडीला जाताना खडकाळ चढसखल टपोऱ्या बुरमाने भरलेला खाचखळग्यांचा रस्ता.कुठून वाट काढावी असा प्रश्न घेऊन चालावे लागते.आजूबाजूला निबिड घनदाट जंगल...दोन्हीं बाजूला थाटामाटात उभा असलेली ती उंचच उंच झाडांची गर्दी..त्यात झुडपांची मांदियाळी... जंगलात  हिंस्र प्राण्यांचा वावर.. खासकरुन गवा प्राणी या जंगलात जास्त आढळतात..


                      प्राचीन रांगडा रांगणा किल्ला... या किल्ल्याच्या पायथ्याशी चिक्केवाडी ही अतिशय दुर्गम अशी वस्ती..सभोवार लाकडी दांड्याचे कुंपण.उतरत्या बंगलोर कौलारु छपराची आणि पावळणीला केंबळाची हातभर रुंदीची आडवी पट्टी बांधलेली.जाडजूड मातीच्या भिंती बऱ्यापैकी चांगली घरे. घराला समोर ओटा..बसायला सोपा अशी रचना. एकूण या वस्तीत सात घरे आहेत.



                            पंधरा माणसं इथं राहतात.दोन पुरुष आणि दोन महिला तेवढ्या सोडल्या तरी सर्वजण म्हातारेकोतारेच.काही वृद्ध वयाने सत्तरी ऐंशी पार केलेली. पुरुष शिडशिडीत वाळलेल्या खारकेगत खीडखीडीत अंगाचे.काही म्हाताऱ्या माणसांच्या अंगावर कपडेच नव्हते.जीर्ण झालेल्या नऊवारी लुगड्यातल्या,गोल साडीतल्या आयाबाया.
     
                     
 आपण इथं राहता कसे..?आपल्या काय अडचणी येतात.? आमचा पहीला प्रश्न "काय करायचं तसंच ऱ्हायाचं.."त्यांनी लागोपाठ आपले गाऱ्हाणं आमच्यापुढे मांडायला सुरुवात केली. "काय बी इथं सोय नाय..." "कस आसल तर दिस काढायचा.." ".दवाखाना नाय...माणूस आजारी पडला तर त्याकां घोंगड्यात घालून न्यावा लागता...रस्त्याची सोय नाय." ."मधी पाण्याचं वढा लागता लै अडचणी येता...इथं सगळी म्हातारी माणसंच" एका तरुणाकडे पाहत ती माऊली बोलली..' ह्यो मुलगा हाय तरुण,त्यो बी पोटासाठी खाली(कोकणात) असतो कसं न्याचं...आजारी माणूस एकेकदा इथंच सपता." मुलां का शाळेची सोय नाय...आमची मुलं शाळा शिकली नाय...आता कोलापूरात हाटीलात काम करत्यात..आताची लहान पोरं शिकायला पाव्हण्याघरी आहेती". .एक तरुण भाऊ बोलत होते" पावसापाण्याची कुठं जाण्याची सोय नाय...इथंच थांबावं लागता..आता माया बापच आजारी हाय..लकवा मारला..दवाखान्याला कसं न्याचा ह्यो प्रश्न हाय..."

                          मग आपण काय काम करता उत्पन्नांच कसं..? आमचा पुढचा प्रश्न.." काय उत्पान.. रोपं करताव भाताची शेती कराची..आता तुमी येताना बघितल्यानं तेवढीच बगा शेती." एक आजोबा बोलले " ती शेतीबी आमच्या नावावर नाय...गवं रेडा.. रानडुकरं पिकाची नासधूस करत्यात..तेज्यातन काय उरलं ते पदरात पडतं... या जंगलामधी वाघ..हत्ती..अस्वल प्राणी हाय..तेंच्यापासून धोका आसतो.."
मग आपली जनावरे किती...दूध वैगेरे काय करता..?
"कसली जनावरां औतावाट दोन जनावरे हायत...गायी म्हस लै न्हायत."
"मग घरात काय साहित्य लागतं साखर चहापूड वैगरे असा किराणामाल कोठून आणता..बाजार कुठे करता..?"
 एक माऊली बोलली "इथून बगा भटवाडीला चालत जावं लागता..चालत यावं लागता दिस मोडतो .पंधरा दिसातन एकदा जातो.".मी निरखत होतो..मनातलं दुःख ओठांवर मांडताना एक ताई हे सगळं सांगताना बाकीच्या त्या माऊलींना गलबलून गेल्या होत्या. मी त्यांचे डोळे निरखले त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं...जास्तीजण वृद्ध दिसत होते म्हणून मी प्रश्न केला तुम्हांला पेन्शन मिळते का..? "हो मिळते ना महिन्याका साशे रुपय भेटता.पण तेबी आणाया वीस पंचवीस मैल लांब तांबळ्याला बँकत जावं लागता"....

                       "तुम्हाला रेशनकार्ड आहे..दोन रूपयांचे धान्य मिळते..?"  " हो आमका दोन रूपायाचे कार्ड हाय..तांदूळ गहू भेटता"...माझी नजर समोरच्या एका ठिकाणी विजेचा डांब होता तिकडे गेली आणि मी प्रश्न केला..तुमच्या वस्तीत वीज कधी आली...? "गेल्यावर्षी ही लाईट आली नाय तर आतापतोर आमी अंधारातच होतो".
.".शासनाने जर ठरवलं आपलं पुनर्वसन करायचं.. तर आपली तयारी आहे का..?यावर एक आजोबा बोलले..."मग काय आमच्या देवाचा कौल घेऊन करू इचार पुढचा"..बरं याहून आणखीन तुमची सरकारकडं काय मागणी .? त्यावर मागच्या खांबाला टेकलेले खिडमीडीत आजोबा बोलले..."आवो सरकार आमच्या वरच्या आंगच्या रांगणा किल्याला म्हणं आता कोट रुपय खर्च करालय...आमच्या किती पिढ्या या जंगलात हालवनवसात खपल्या..जित्या माणसांकडं कधी बघणार हाय.? एक माऊली बोलू लागली..".पयल भाऊ आमच्यासाठी रस्ता झाला पायजे...शाळा नाही मुलां का शाळा झाली पाहिजे... दवाखान्याची सोया नाय...ती सोय झाली पायजे...खरं तर त्या सगळ्या  माऊलींचे डोळे उचंबळून आले होते..डोळ्यांत पाणी साठलं होतं... आतापर्यंत जे भोगलं जे सोसलं.त्या ठसठसणाऱ्या वेदनांचं प्रतीक त्यांच्या डोळ्यांत चमकत होतं.आम्हीही गलबलून गेलो होतो.आम्हीं त्यांच्या दुःखाशी एकरूप झालो होतो.
 तिथून मग आम्हीं जे आजोबा लकव्याने आजारी होते त्या घरी गेलो..सोप्यावर एका आराम खुर्चीत आजोबांना बसवलं होतं.



(प्रत्यक्ष पहा आजोबांची स्थिती खालील लिंकवर)
     https://youtu.be/jfQJ-lNWwmw

                          वय साधारण साठीच्या आसपास.त्यांच्या मुलग्याने सारी माहिती सांगितली..पंधरा दिवसांपूर्वी लकवा मारला आणि शरीर लुळे पडले..बोलता येत नाही ना काही खाता येतं.. टाळा पगळलेला आवासून दिनवाणी झालेला चेहरा..पापण्यांची मंद उघडझाप..तशीच मंद हालचाल... किती दिवसांपासून अन्नाचा कण पोटात गेलेला नाही..काही खावं म्हटलं तरी ठचका लागतो अन्न गिळत नाही..साधी भाताची प्याज करून जरी पाजली तरी ठचका लागतो..गळ्याखाली पाण्याशिवाय काहीच उतरत नाही...मग काय अवस्था होणार..हाडांचा सांगाडा शिल्लक आहे. उपचारासाठी दवाखान्यात न्यावे म्हटले तरी कसे नेणार कसे..?.रस्ता नीट नाही ..म्हणून एका आयुर्वेदिक वैद्याचा झाडपाल्याचे औषधोपचार सुरू केलेत काही फरक नाही..जीवाची नुसती तगमग होते...रात्रीला जराही झोप लागत नाही..वेदनेने अंग ठसठसत... कुणाला दुखणं खुपण सांगायचं म्हटलं तरी तोंड नाही आतल्या आत सहन करायचं..रात्रभर नुसती कणकण विव्हळण सुरू असत. ते सगळं चित्र पाहून आणि ती व्यथा ऐकून थक्क झालो आम्हीं...काय बोलावं..? आतून सगळं भरून येत होतं..डोळ्यातून फक्त गळायचं बाकी राहिलेलं...त्या दुःखाने बधिर झालेल्या मनाने आम्हीं सर्व बाहेर पडलो..

                         कोल्हापूरसारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यातील ही शेवटच्या टोकाची लोकवस्ती. वाळीत टाकलेल्या अवस्थेत असणारी.ज्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत...एकीकडे भरभराटीला आलेली स्वच्छ सुदंर अशी विकास पावलेली गावं. आणि दुसरीकडे चिक्केवाडीसारख्या दुर्गम वस्त्या ज्या विकासापासून कोसो दूर असलेल्या.असा आपल्या राज्यात विकासाचा विरोधाभास दिसून येतो.  छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन विकासाची स्वप्नं दाखवणाऱ्या महाराष्ट्र शासनाला आम्हांला हे प्रश्न विचारायचे आहेत..या महाराष्ट्राच्या नकाशावर सात घरांची चिक्केवाडी नावाची अर्थात माणसांची वस्ती आहे हे ठाऊक आहे का..?.आणि माहीत असेल तर ती याच राज्यात अशी अजून का वाळीत पडली?जी लोकवस्ती स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही आपल्या मूलभूत गरजापासून वंचित आहे...आपलं सरकार वर्षावर्षांला राज्याचं आर्थिक बजेट सादर करतं त्यात चिक्केवाडीसारख्या गावाच्या वाट्याला काय जात..? हजारो-लाखों कोटी रुपये खर्च करून विकासाचे जाळे विणणारे आपले गुळगुळीत हायवे तयार होतायेत..गावोगावी गल्लीबोळातील रस्त्यांचे नुतनीकरण होते... कोटींची मंदिरे गावोगावी उभारली जातायत..
                           पण ज्यांचं जगणं-मरणं ज्या रस्त्यावाचून अडून राहिलं अशा चिक्केवाडीसारख्या दुर्गम भागातील गावांना जोडणारा रस्ता म्हणजे त्यांची जीवनवाहिनी का नाही होऊ शकत..? अशा २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी का नाही निधी देता येत..? राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविले जाते शिक्षण सर्वांच्या हक्काचे असे म्हणतात.मग या वस्तीवरच्या मुलांना शाळेची सोय का नाही.? आतापर्यंत ती मुले निरक्षर राहून सध्या हॉटेलमध्ये कपडा मारायचे काम करतात...मग सर्व शिक्षा अभियानाचा फायदा त्यांना काय झाला नी नेमके हे अभियान कुठपर्यंत पोहोचले..? आज तिथल्या लोकांना आपली मुले पाहुण्यांच्या ठिकाणी शिकण्यासाठी ठेवावी लागतात...दुसऱ्यांच्या आधारावर ती मुले कितपत शिक्षणाची उंची गाठणार आणि आपली परिस्थिती कशी बदलणार..? आजही चिक्केवाडीसारखी गावे आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहेत..एकीकडे राज्यात जलद आणि आरामदायी प्रवासाच्या उद्देशाने मेट्रोसारखे प्रगत प्रयोग अंमलात आणताना इकडे आमच्या चिक्केवाडीसारख्या वाडीवस्त्यावरचा एखादा माणूस आजारी पडला तरी १०८ नंबरची अम्ब्युलन्स तिथे जाऊ नाही शकत.कारण रस्ताच नाही...पाच ते सहा पाण्याने भरून वाहणारे ओढे लागतात.पावसाळ्यात तर त्या ओढ्यांच्यामुळे रस्ता पूर्णपणे बंदच..आजही आजारी माणूस घोंगड्यातुन चार माणसांच्या खांद्यावरून दवाखान्याला आणावा लागतो..पावसापाण्यात रस्ताच बंद अशावेळी तिथेच आजारी माणसाला तळमळून तळमळून जीव सोडावा लागतो..असे कित्येक जीव मातीआड झाले असतील त्यांच्या पापाचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे.? त्या लोकांना तुमच्या आरोग्य सेवेचा फायदा काय..?आज चिक्केवाडीतील त्या लकवा मारलेल्या आजोबांना रस्ता नसल्याने दवाखान्याला घेऊन जाता येत नाही..आज त्यांना आय.सी.यू. ची गरज असताना एका प्लास्टिकच्या खुर्चीत जीव जात नाही म्हणून तळमळत पडावं लागतं पंधरा दिवसापासूअन्नाचा कण पोटात नाही...घरच्या मालकाला आणि जन्मदात्या बापाला उपाशी ठेऊन त्या मायलेकरांना रोजचा घास गळ्याखाली कसा उतरत असेल..? विकासाची जबाबदारी घेणाऱ्या या शासनकर्त्यांना आम्हाला विचारायचंय.ही पण आपल्यासारखीच एक माणसं आहेत ना.
                                 व्यवस्था ही माणसांची अवस्था बदलण्यासाठी उपयोगात आणावी लागते. पण  इथे खरंच आपण  मान्य करा की,आपली ही व्यवस्था या लोकांची अवस्था बदवण्यासाठी अपयशी ठरली आहे..तुम्हीं म्हणताय ना..विकासाच्या बाबतीत आपले राज्य आता सगळ्या राज्यात  पुढे पण मागे राहिलेल्या मागास अशा या एक दुर्गम चिक्केवाडीं आणि अशासारख्या वाडीवस्त्यांचं काय..?.महाराष्ट्राचा विकास झाला असं म्हणताना इथं आल्यानंतर तो आपला विकास खरंच मृगजळासारखा भासतो.इथं आल्यावर कळतं की, आपल्या राज्याचा कितपत विकास झाला आहे..मी तर म्हणतो...जोपर्यंत आपल्या चिक्केवाडीसारख्या रानावनातल्या दुर्गम वस्तीवरच्या माणसांच्यापर्यंत  विकास पोहोचणार नाही तोपर्यंत तुमच्या विकास या शब्दावर आमचा विश्वास कदापिही बसणार नाही...देश महासत्ता होण्याची स्वप्नं बघताना चिक्केवाडीसारखी गांव बघितली आणि अजूनही घोंगड्यात घालून लोकांना दवाखान्याला आणावं लागतं हे चित्र डोळ्यासमोर आणलं तर ते स्वप्नंच भंगून जातं.विकासाला अजून किती मुळापासून हात घालावा लागेल व त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची जाणीव होते.
                           आज शेजारी असणाऱ्या रांगणा किल्याच्या दुरुस्तीसाठी आपण कोटी रुपयांचा निधी खर्च करता..हरकत नाही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारे हे किल्ले जरूर साजिवंत करा.पण त्याच्या पायथ्याला राहणारी जिवंत प्रजाही महाराजांना तेवढीच प्यारी होती...त्या रयतेच्या कल्याणाचेही बघा...तुम्हीं जसा किल्ल्यासाठी निधी मंजूर केला तसा चिक्केवाडीच्या विकासासाठी निधी मंजूर कधी करणार..?त्यांनाही त्यांच्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधा कधी मिळणार ..? ज्या रस्त्यासाठी त्या मायमाऊलींनी डोळ्यात पाणी भरलं तो त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवणारा रस्ता कधी होणार..? अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे चिक्केवाडीतील त्या गोरगरीब लोकांना या शासनाच्या कृतीतून मिळाली तर बरे होईल.एक तर चिक्केवाडीला विकासाकडे नेणारी नवी वाट तयार करा नाही तर चिक्केवाडीला तरी विकासाच्या वाटेवर आणा.


(आपण संवाद साधू शकता.)
श्री.राजाराम शिंदे.(स्थानिक चिक्केवाडीकर)
- 9420878752
------------------------------------------------------

               - किरण सुभाष चव्हाण(पांगिरे)
                मोबा- ८८०६७३७५२८.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी हु||) यांचा जीवन व लेखनप्रवास.




       '...आणि जगण्याला शब्दांचं बळ मिळालं.'

                  आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला
जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.
                 ते साल होतं १ जानेवारी १९९८. अंगात तारुण्याची रग होती.त्या दिवशी नंदूजींनी उत्साहाच्या भरात,एक मण भाताचं पोतं डोक्यावर घेतलं नी तसेच घराच्या दिशेनं चालू लागले. आणि काही कळायच्या आत डोक्यावरच्या पोत्यासह नंदूजी खाली कोसळले.पोत्याखाली दबले गेले.मोठा अनर्थ घडला.नियतीने आपला डाव साधला.दुर्देवी वेळेनं मोठा घात केला,पाठीच्या कण्याला जबर मार लागला,गंभीर दुखापत झाली.त्यानंतर उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नंदूजींचे अर्धे शरीर गारद झाले होते. त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.तीन महिने उपचार सुरू होते पण इलाज चालला नाही. मेंदूपासून खाली पायापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या संवेदनशील नसा दबल्या गेल्याने कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाला. शेवटी डॉक्टरांनी घोषित केले की,नंदूजी आता इथून पुढे कधी स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत.

किती मोठा धक्का नंदूजीसह साऱ्या कुटुंबाला होता.हसत्या खेळत्या उमलत्या आयुष्यालाच त्या घटनेने सुरुंग लावला.जिवलगांच्या काळजाला भेगा पडल्या. नंदूजींच्या मनावर तर नकारात्मक विचारांनी कब्जाच केला. टोकाचे विचार सतत  मनाला टोकरू लागले. तिथून पुढे नवी मुंबई वाशी येथील 'शरण अपंग पुनर्वसन केंद्र' येथे भरती केलं गेलं.आता आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं.
                     शालेय जीवनापासून वाचनाची थोडी गोडी होती,ती कामाला आली. हळू हळू पुस्तकांची जवळीक वाटू लागली. या घटनेनंतर वाचनाची गती वाढू लागली.

पायांनी तर आता चौफेर उधळता येणार नव्हतं. पण मनाचा मात्र वारू शब्दांच्या सहवासात चौखूर उधळत होता. आणि जगण्याचं एक तत्व गवसलं.'शरीरानं अपंग झालो तरी, आपण मनानं कधीच अपंग नसतो.' शब्दांच्या पाठीवर स्वार होऊन आपण चहूमुलखाची सफर करू शकतो.आणि मग मनाला शब्दांची साथसंगत मिळत गेली. शब्द इतके घनिष्ट झाले की, या अपंग पुनर्वसन केंद्रात असताना शांत समयी शब्दांना अर्थाच्या धाग्यात ओवून  कवितेच्या एकेक  माळा बनवण्याचा मनाला छंद जडत गेला.
                         तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप संत साहित्याचे वाचन केले.वाचनाच्या विस्तीर्ण प्रदेशात धुंडाळताना विविधांगी वाचनाची आवड जोपासली. कथा,कविता,कादंबऱ्या मनाला भुरळ पाडत गेल्या. किती वाचू नि किती नको.आता फक्त बेभान होऊन वाचत राहणं.आधाश्यासारं मन पुस्तकांच्या पानापानावर रुंजी घालत होतं.आणि खरंतर उद्ध्वस्त जगण्याला दुरुस्त करण्याचं, मोडून पडलेल्या आयुष्याला पुन्हा उभा राहण्याचं,मरण्यासाठी विष मागणाऱ्या मनाला जगण्याचं बळ देण्याचं काम या शब्दांनी केलं,पुस्तकांनी केलं.
                              आता ''शब्दची आमुच्या जीवाचे जीवन" हे शब्द नंदूजींच्या जीवाचे जीवन झाले. हळूहळू विविधांगी वाचनातून लिखाणाची गोडी लागली. आणि नंदूजी म्हणतात तसं 'संत महंतांच्या पंक्तीतल्या उष्ट्यावर आमच्या शब्दांच्या पंक्ती झडतात.'वाचनाने प्रगल्भता लाभली आणि त्या ओघात त्यांची लेखणी प्रसवली. पानांवरचे शब्द वाचायची सवय होती आता  पानांवर शब्द उमटवायची सवय जडली.सुरुवातीला लेखणीस प्रारंभ झाला.सुरुवातीला कविता त्यानंतर कथा,कादंबऱ्या,लेख असे विविधांगी लेखन स्फुरत गेले.धामणे गावचे ज्येष्ठ साहित्यिक शि. गो.पाटील या गुरूंचे बोट धरून या शिष्याने लेखनप्रवासातले पहिले पुस्तक साकारले. यासाठी डॉ. संभाजी जगताप साहेबांची प्रेरणा मिळाली.आणि पहिल्यांदा २०१५ साली ग्रामीण ढंगातलाहा पहिला वहिला 'लुगडं'कथासंग्रह नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

कोहिनूर फाउंडेशन मुंबईचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य वाङमयीन पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.त्यानंतर ग्रामीण समकालीन जीवन कवेत घेणारा 'जांभळीखालचा झरा'  हा दुसरा कथासंग्रह श्री. पावले सर यांच्या सहकार्याने २०१६ साली प्रकाशित झाला.दक्षिण महाराष्ट्र साहित्य  सभेचा उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. तसेच साने गुरुजी वाचनालय झुलपेवाडी यांचे समारंभपूर्वक गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.या दोन कथासंग्रह नंतर २०१८ साली 'केतकी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. 


अशा साहित्य क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक कोल्हापूर व लोकशाहीर द. ना. गव्हाणकर साहित्यभूषण पुरस्कार २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकांची सुंदर प्रस्तावना लाभलेली 'इपळाप' ही 'कादंबरी आता लवकरच प्रकाशित होत आहे. 

तर 'आठवणीतील साठवण' व 'काळोखाला सूर्य बिलगला'(दोन्हीं आत्मचरित्रात्मक पुस्तके) या कादंबऱ्या तर 'बिवाळा' व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक आगामी प्रकाशाच्या वाटेवर आहेत.अनेक मासिक,दिवाळी अंक ,वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन चालूच असते.
                      जीवन प्रवासात एका क्षणी नियतीने दगा दिला अर्ध शरीर जायबंदी केलं.आज २२ वर्षे झालीत हे अपंगत्व येऊन. शरीर अंथरुणाला खिळलं आहे,मातीत धडपडणारे पाय आज गादीवर निर्जीव होऊन निपचित पडलेले असतात. खूप त्रास होतो,वेदना अव्याहतपणे साथ देत असतात. कधी पाठीला जखमा होतात ,पचनक्रिया बिघडते, मूत्राशयाचा संसर्ग हा तर ठरलेलाच. कधी तापानं अंग फणणतं. कधी अवघ्या अंगाला कापरा भरतो.शत्रूसारखे एकेक आजार या शरीरावर विजय मिळवण्यासाठी टपून बसलेले असतात. काही लिहायचे म्हटले तरी हात कापतात.नीट बसता येत नाही,एका कुशीवर होऊन लेखन करावे लागते.  पण हार मानणारे ते नंदूजी कसले..? त्यांनी सर्वांवर  कधीच मात केलीय. अशा आजारपणात धावून येतो,तो एक माणसातला देव तो देव म्हणजे डॉक्टर संभाजी जगताप. नंदूजींच्या कसल्याही आजारपणात ते एकेकदा घरी येऊन उपचार करतात. सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असतात.नंदूजींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात त्यांचा खूप मोठा आधार आहे. शारीरिक पातळीवरचा हा संघर्ष खूपदा मानसिक स्वास्थ्याला आव्हान देत असतो.सुरुवातीला चिडचिडेपणा व्हायचा, राग अनावर व्हायचा. सगळ्यांचा त्रागा वाटायचा. पण वेदनांच्या या नानाकळांची अनुभूती आता सर्वांगाला झाली होती.आणि म्हणून या अनुभूतीला मनाच्या सहानुभूतीची जोड मिळत गेली.आजतागायत असहाय वेदना शरीरानं झेलल्या अन मनानं सोसल्या पण आता अशा सहनशीलतेतून मनाला शांती नी संयमाची स्थिती प्राप्त झाली. आता मनाच्या शांतीत सारं काही विरून जातं.
                                    आई-वडिल या पोटच्या गोळ्याला आजही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताहेत. लेकराचं उभं आयुष्य असं अपंगत्वाच्या तावडीत सापडलं हा त्यांच्या काळजावर पडलेला घाव कधी न भरून येण्यासारखा आहे. तो घाव इतका वर्मी होता की, उभ्या आयुष्यभराचं दुःख पदरात घातलं.आजही या कष्टाळू आई-बापाचे हिरमुसलेले चेहरे हृदयातल्या त्या ओल्या जखमांची साक्ष देतात.
१४ वर्षे वनवास भोगणाऱ्या  रामाला जशी लक्ष्मणाची अखंड साथ लाभली. तशी आज २२ वर्षे हा अपंगत्वाचा वनवास भोगणाऱ्या भावाला लक्ष्मणागत साथ मिळते आहे ती आपल्या पाठच्या भावाची म्हणजेच सागरजी यांची.नावाप्रमाणेच मायेचा हा सागर आहे.आजच्या कलियुगामध्ये दुर्मिळ अशी ही  राम लक्ष्मणागत भावांची जोडी आहे.

आपल्या थोरल्या बंधूची सेवा अखंडपणे हा भाऊ करत आला आणि आजही करतो आहे.घरातील ऊठ-बस किंवा बाहेरचा प्रवास असू दे ,चाकाच्या खुर्ची मधून दोन हातावरती अंतराळी घेऊन एखाद्या ठिकाणी बसवायचं नी पुन्हा चाकाच्या खुर्चीत ठेवायचं अशी सगळी मायेची उठाठेव  बंधू सागरजी करतात. अतिशय प्रेमळ,जिव्हाळा असणाऱ्या भावाची आणि त्यांच्या पत्नीची साथ नंदूजींना मिळते आहे.
                         सागरजींच्या संसाररुपी वेलीवर फुललेली दोन फुले केतकी आणि स्वरा. यांचा तर नदूजींना विशेष लळा.या फुलांच्या सहवासात त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध आला आहे. शब्दांनी जगण्याची हिंमत दिली, पुस्तकांच्या सहवासात जगणे साध्य झाले,वाचनातून समृद्धता आली.समृद्ध व प्रगल्भ ज्ञानातून लेखणीचा उगम होत राहिला आणि या शब्दांच्या प्रवाहामध्ये अनेक संवेदनशील मनांची नाती जुळत गेली. जीवंत हृदयाची माणसे भेटत गेली. आज सभोवार संत सज्जनांचा जीवलगांचा गोतावळा निर्माण झाला आहे. संतरुपी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी सारख्या गुरुभेटीने तर नंदूजींचे अवघे जीवन धन्य धन्य झाले आहे.

                            आज काय गमावलं नी काय कमावलं..? याचा हिशोब मांडताना...काय गमावलं. तर नियतीने दोन पायच हिरावून घेतले ना..? पण याच्या उलट आज नदूजींच्या एका हाकेवर धावून येणारे असंख्य पाय हे त्यांचे झालेत.शरीर जरी एका ठिकाणी स्तब्ध असलं तरी मनानं मात्र उंच भरारी घेतलीय,शब्दांच्या जगात भटकंती करताना स्वतःमधला एक उत्तम संवेदनशील लेखक गवसला.त्यांच्या शब्द सामर्थ्यामधून वाचकांची नाळ त्यांच्या लेखणीला जोडली गेली.माणसातला एक वेगळा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली.समाजातील मान,सन्मान,प्रतिष्ठा चालत त्यांच्याकडे आली.

जगण्याच्या वाटेवर अडखळलेल्या पावलांना आज नदुजींच्याकडे पाहून पुढे चालण्याची प्रेरणा मिळते... आज हे नदुजींनी कमावलं.नंदूजी आपली पाऊले कधीही थांबली नाहीत तर तर धडपडले आजपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या पावलांच्या रूपातून,आज धडपडताहेत भाऊ सागरजींच्या रूपातून आणि इथून पुढे सदैव धडपडत राहतील तुमच्या लाडक्या लेकी केतकी आणि स्वरा यांच्या पावलांच्या रूपातून.

               'जय हो...मंगल हो..!!'

               
                  - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)
                    मोबा - ८८०६७३७५२८.

ग्रामीण लेखक नंदू साळोखे यांची क्षणचित्रे अवश्य पहा खालील लिंकवर.

https://youtu.be/ztOP6VYdiXY

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...