फॉलोअर

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

गावकुसातील कथा - 'तानी' - किरण चव्हाण.





 'तानी...'

                            

                                  वरल्या आंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत व्हता.रानाशिवारात नुसता हैदोस घातल्याला.जमिनीला जरासुदीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम व्हता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातन पाण्याचा मुसोंडा खाली उतरीता..बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत,जवळच्या वड्या वताडाला मिळत व्हतं...वड्या वताडातलं गदुळ पाणी उर भरून खायल्या आंगाला सपाट्यानं धावतं.हिरव्या लुसलुशीत रान कुरणाच्या उरावर वरनं रापराप थेंबका आदळालता...आंगचा पाझर फुटावा तसं एकेक दगुडधोंडा वरनं खाल पाझरत व्हता.आंघोळीचं पाणी आंगवळण घित खालपतोर नितळावं तसं झाडीझुडीच्या उभ्या आंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घीतं.

                                       धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलधारेचा अभिषेक व्हावा, तशी मुसळधारनं नितळत व्हती. दिसामासानं  शेतीभाती हिरव्या अंगानं पोसवालती.जिकडं तिकडं बघून नजर हिरवीदाट व्हायची..कवळ्या पोरीगत वाढत्या आंगची रोपलावण हिरवेपणाचा साज चढवून थाटात उभी व्हती.आंगावाटं आडोसा धरणारी मोठ्या खोळाची इरली खाली रोपच्या वावरात वळाबंल्याली.        

"बघ बाई...रातध्याड दम न्हाई की गं या पावसाला.." 

"....तर गं तरण्याला न्हाय आणि या म्हाताऱ्यालाचं कुठनं एवढा जोर आलाय कुणास ठाऊक..?"

"नुसता मोग्यान वतालाय बग.. जरा सुदीक ठेमका बंद न्हाई की गं."

गुडघाभर पाण्यात वाकून आया बाया बोलचालत दोनी हातांनी रोपा वरबडत व्हत्या.

                                       आतासा गावंदरीच्या मळीस्न कंच्यातरी म्हशीच्या गळ्यातल्या घाटीचा किणकिण आवाज कानावर इत व्हता..

        "आगं ये बायानों उठा,आता भाकरीचा वकुत झाला...ती बघा तानीची सुंदरी यायलीया इकडं."

" व्हय तर,बापडा जरा थांबलाया तोपतूर भाकरीतुकडा खाऊन घेऊया तिकडं." पिकल्या केसाची जनाक्का मागनं बोलली.

गदुळ पाण्यात हात खदबळूनं बाया पाण्यातनं पाय वडीत काठाला आल्या...

पावसानं जरा ईस्वाटा घेतला व्हता, तीचं येळ साधली.पदरानं हाताची वल पुसत आयाबाया रानमाळावर पईसपरभारी पगळून बसल्या...जनाक्काच्या सूननं फडक्यात बांधल्यालं भाकरीचं कडाप सोडलं....जरबंदी डब्यातली मटकीची उसळ डावंनं रग्गड भाकरीवर घातली. एका बगलला भुईमुगाचं दाण घालून केल्याला हिरव्या मिरचीचा हिरवादाट ठेचा घालून परतिकीच्या हातावर भाकरी  ठेवली.बोलबोलत बाया तुकडा मोडू लागल्या..

                           हिरव्यागार पडीवरचं लुसलुशीत कवळ्या गवताचा मुडापा करून तानीची सुंदरी चरत व्हती...तरीबी आज वीसेक दिस झालं आसतील ,तिला असं बेमालूम काय चरताच आलं नव्हतं...दाव्याला बांधूनचं व्हती...किती दिसानं आस तिला मनमुराद चरायला मिळत व्हतं.अंगावर कागदाची खोळ घेतल्याली तानी करवंदाच्या जाळीखाली बसून,आपल्या लाडक्या सुंदरीला एकसारखी न्ह्याळत व्हती..तशातंच अवचित खायल्या आंगास्न हाळी कानांवर आली.

           "ताने आगं ये ताने...ये इकडं.."  जनाक्कानं मोठ्या सादान हाळी मारली.

        "ये गं संग संग नकाडी भाकर खा ये.."

तसं तानी दमशीर पावलं टाकीत बायकांच्या घोळक्याकडं चालली..

बायकांच्या कडला जनाक्काच्या बगलला येऊन तानी बसली..

"...बस बाई बस..."

" सगुणे...त्यातली एक भाकरी, त्यावर चांगली रग्गड भाजी घालून दे गं माझ्या बाईला.." जनाक्कान सुनला सांगितलं.

बोलतचं तानीच्या डुईवरनं हात फिरवायला लागली..

तानीच्या आवताराकडं बघत आयाबाया एकेक तुकडा मोडायला लागल्या.

जनाक्काच्या सुननं तानीच्या हातावर भाकरी ठेवली..तानीनं जरा लाजत चोरट्या अंगानं कशीतरी ती व्हट्यात घेतली.

"घे घे लेकी आन खा सरळ बसून.." 

तशी त्या वलीत... बारक्या पोरागत मांडी घालून व्हट्यातली भाकरी तानी  खायायला लागली.

तोंडातला घास घोळवत बाया तानीला निरखत व्हत्या.

"बाईसाब... तानीचं एक जीवाला लय वाईट वाटतंया बघा..." लुगड्याची तुळसा खाईत खाईत बोलली.

"...तर गं बाई...आदीच खुळीकावरी पोर..एकीला दोघी मायलेकी ऱ्हाईत व्हत्या."

"मायजाळ तुटला म्हणायचा पोरीचा, आईला पारखी झाली बग पोर.." जनाक्का चुकचुकत बोलली.

"वयबी झालतं म्हणायचं.. त्यात ह्या भोळ्याभाबड्या खुळ्या लेकीची झुरणी जीवाला व्हतीच तिज्या..."

"काय करायचं मरान कुणाला चुकलंया दिवाणसाब.. तरी पंधरा दिस झालं आसल नव्ह म्हातारीला मरुन...?"

" ते गं का आणिक आठादिसानं उद्याच्या पुनवला म्हयना व्हतोया..."

"तानीवर लई जीव व्हता तिजा...जरा कुठं वकुत झाला म्हंजी दाराम्होरं बसून वाट बघायची लेकीची."

"आता कोण बघल गं वाट.. माय ती मायच तिची मया कुणाला इल व्हय... लई वंगाळ वाटतंया बग तानीचं..."

"गिरीजा आज्जीचा..ल्योक हायसं वाटतया आजून..?" जनाक्का प्रश्नार्थक बोलली.

"हाय नवं आजून बायकापोरंबी हाईत... जाणार हाईत वाटतं आता चार दिसात."

"जनाक्का...ऐकायला आलंय का तुझ्या कानावर..?"

"न्हाई बा. का गं..काय झालं..?" जनाक्का एकसारखी लुगड्याच्या तुळसीकडं बघायला लागली.

तशी तुळशी सांगायला लागली.

"तानीचा भाव..म्हण तानीला संग मम्बयला न्यायचं म्हंतोया.."

"खरंच काय गं..?"

"तानीची सुंदरा  म्हसबी इकणार हाय आण तानीला तिकडच नेणार हाय.."

" काय म्हणतीस..मला ह्ये आताच कळतंय बघ तुज्याकडनं." 

"तेज बी खरंच हाय म्हणा...आता आई गेली ही खुळी भन.. एकटी कशी ऱ्हायाची मागं... पर ही रानावनात फिरल्याली पोर कशी ऱ्हायाची तेवढ्या लांब शेरसिटीला.." जनाक्का तानीकडं मायेनं बघत बोलली.

तसं वठाला लावल्याला पाण्याचा तांब्या भुईला ठेवत दाटून आल्याला गळ्यातला हुंदका सोडवत एकाकी तानी जनाक्काच्या गळ्यातचं पडली..हुंदक्यावर हुंदक दित ढसासा रडायला लागली...

पोरं अशी अवचित गळ्याला पडल्याली बघून जनाक्काबी भाबांवली...हातातल्या भाकरीचा चतकोर तुकडा खाली ठिवून जनाक्कानं तानीला सावरलं.

"आंग ये माजे लेकी...काय झालं गं..? गप रडू नग गप..मी हाय नवं."

जनाक्का तिला गप करायला लागली पण तिज्याबी डोळ्याची आकनं पाण्यानं भरली. पोरीचं आंगावर पडल्यालं धावाण बघून आकीरला डोळ्याला धार लागली. 

"आंग लेकी आमी कोण परकी हाय व्हय तुला...मी हाय नवं रडू नगस..माजी शानी गं ती.." जनाक्का आय हुन तिला समजी घालालती.

बघणाऱ्या प्ररंत्येकीचं हुर्द भरून आलं हुतं.

 छातीला बिलगल्याल्या तानीला

जनाक्कानं आंजारलं गोंजारलं आणि शेवटी कसतरी तिला गप केलं..

"पोरीच्या मनात न्हाई बायांनो...भावासंग जायाचं." जनाक्का.

"पण त्यो बी काय करल.....आता आई गेली ही खुळी भन, एकटी कशी ऱ्हायाची मागं... सगळं कॉडचं हाय."

पावसाचा चिटका सुरू झाला.. घटकाभर असाच गेला..

"आय मी जातो गं.." तानी वर उठत बोलली..

"व्हय ...जा लेकी आणि मनाला वाईट वाटून घिवू नगस हूं.जा दमान जा.."

जनाक्कानं पुन्ह्यांदा धीर दिला.

तानी आपल्या सुंदरीच्या दिशेनं वाटला लागली...सुंदरी आपली चरायच्या नादात लागल्याली. बायकांनीबी बसल्याला जागा सोडला..पण मनात तानीनं जागा धरल्याला..

"माधूचं बी खरंच हाय... आई व्हती तवा एक ठीक व्हतं...एकटी पोर कशी ऱ्हाणार इथं..कितीबी केलं तरी बाईमाणसाची जात...नात्याचं नात्याजवळचं आसल पायजे."

" देव बी असा कसा म्हणायचा...रूप दिलं गुण दिलं पण नको व्हतं ते पोरीला खुळपणबी दिलं. आज दोन लेकरांची आय झाली आसती." जनाक्का पाण्याचा घोट घित वर उठली.

बोलत चालत बाया वावरात शिरल्या...

                       गिरीजाआजीला वारून आज बक्कळ म्हयना व्हइत आला .गिरीजा आजी आणि तानी दुगी मायलेकी. एकमेकीला दुगीजनी ऱ्हाईत व्हत्या..गिरीजाआज्जीचा थोरला ल्योक माधू बायका पोरं घिवून कामानिमतांनं मम्बयला ऱ्हायचा...मधन आदन गावाकडं फेरी मारून जायचा.तानी दिसायला गोरीगुमटी.एखाद्या माडासारखी वाढल्याली पोर..बरुबरीच्या पोरींची लग्न व्हवून दोन तीन पोरंबी झाली पण  खुळ्याकावऱ्या पोरीला कोण करून नेणार.? पर तानी सगळं कामबीम जिथल्या तिथं करायची...माणसाला चांगली बोलायची...हासायची खिदळायची... वागणं आजूनबी नकाड्या पोरीसारखं..म्हातारीच्या जीवाला नुसता या खुळ्या पोरीचा घोर...लई जीव तिजा पोरीवर...माझ्या माघारी या पोरीचं कसं व्हयाचं..? नुसतं याचचं तिच्या जीवाला कोडं पडल्यालं...वय झाल्यालं पण या काळजी आजारानं तीन आकीरला प्राण सोडला..थकल्या काळजाच्या आईनं पदरातल्या एका खुळ्याकावऱ्या जीवाला मागं ठेवून कायमची पलांग मारली.आणि तानी आईइना पोरकी झाली.

                                  सांजवकुत झाला पोटाचा नगारा भरून आता सुंदरी घराच्या वाटला लागल्याली.मागनं तानी चालत व्हती. वरनं पावसाची एकसारखी रिपरिप चालूच.पांदीची वाट माग पडली.कोपऱ्यावरचं पांडू केसरकराचं घर लागलं.. घराचा कोनाडा वसड्याच्या वलीन उकलून पडल्याला.गल्लीन सुंदरीच्या गळ्यातल्या घाटीचा आवाज घुमत जाईत व्हता..घराच्या उजव्या आंगच्या गोठ्यात सुंदरी शिरली...आपल्या दाव्याला जाऊन शांतपणी उभारली..गोरणीत पडल्यालं दावं उचलून तानीनं सुंदरीच्या गळ्यात आडकीवलं.बाहेर आली हुंबरा वलंडायला आईची आठवण मनात दाटली.सोप्याला येऊन आय म्हणायची.."लेकी किती वकुत केलास..कवाधरनं वाट बघत इथंच बसलूया." 

पण आता आसं इचारणारी आय नव्हती...आसं काळजीनं कोण बोलल आता...? तानीच्या डोळ्यांत टचकन पाणी उभारलं..

दादा सोप्याला कंच्यातरी माणसांसंग बोलत व्हता..तितनं चटाटा पाय उचलत ती मधल्या चौकटीतनं आत शिरली.

         "...चला पावणं...या माझ्या मागणं  ...एकदा बघून घ्या जनावार मग बघू येवाराचं .." माधू बोलत पुढं झाला.

तसं उठून...ढगळ्या इजरीतलं गडी बिडी फुकत गोठ्याकडं गेलं.

वयनंखायन निरखून चांगलं तपासून खात्री करून ती माणसं पुन्हा बाहीर आली.सोप्याला बराच उशीर बोलणी सुरू व्हती..आकीरला घासाघीस करून एक हिरवी नोट त्यांनी सस्कार म्हणून माधूच्या  हातावर ठेवली...

      "दोन दिस जाऊ दे मग चांगला दिस बगून येतू न्यायला आमी." जाताशेवटी आसं बोलून ती माणसं बाहेर पडली...

चला एक चिंता मिटली..या समाधानात माधू घरात आला आणि बायकोम्होरं सभागती बोलला.

"शेवटी झाला येवार दोन दिसात येतील माणसं म्हस न्यायला" कानांत उकाळत्या त्येलाचा थेंबका शिरावा तसं झालं..त्ये ऐकूनचं तानीच्या काळजात कसलीतरी कळ दाटली..नुकताच व्हटाला कप लावल्याला.त्यो गुळमाटं 'चा' चा घोट कडूकडूजार लागला...डोळ्याला आपोआप पानगळती लागली..आता काय बोलू नि कशी बोलू...? गपगुमान ती भरल्या डोळ्यांनं परड्याआंगाला गेली.

                                         एक माय व्हती तीबी गेली निघून आणि आता जिला लाडीगोडीन वाढीवलं... घासातला घास दिला..माया केली ती जिवाभावाची सुंदरीबी आता मला जाणार सोडून या इचारानं तानीला त्या रातीला कसली ती झोप लागली न्हाई...रातभर नुसती या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत व्हती...मध्यान रातीला उठून तानी सुंदरीजवळ जाऊन रडत बसली. कुणासमुर उरातल दुःख मांडायचं.? कोण ऐकून घेणार माझ्या खुळ्याकावऱ्या जीवाचं..? त्या दिशी तानीन सुंदरीला  चरायला सोडली..धुळणीच्या माळावर चरत्याल्या सुंदरीच्या पाठीला बिलगून तानी रडली. सुंदरी खाली बघून गपगुमान चरत व्हती.. तिच्याकडं एकसारखं बघत तानी डोळ्यांतून टीप गाळीत व्हती...आज समोर चरत्याली माझी सुंदरी उद्या मला दिसणार नाय या दुःखानं ती ठार खुळी झाल्याली...रानात आली की तानी तिच्यासंग बोलायची. मनातलं सगळं तिलाच सांगायची...आता कुणासमोर मन मोकळं करायचं..? कोण व्हतं एवढं जिवाभावाचं... सुंदरी  मुकी व्हती..तिला काय कळणार उद्या त्या दोघींची ताटातुटी व्हणार व्हती.त्या मुक्या जीवाला जर हे समजलं आसतं तर ती बी तानीच्या गळ्याला पडून रडली आसती...तानीचा जीव नुसता तीळ तीळ तुटत व्हता.सांज झाली तरी घरला जाऊ वाटत नव्हतं.

                                     सगळा  नाईलाज व्हता..  जड पावलांनं तानी सुंदरीला घिवून घरला परतली. ठरल्याप्रमाण दुसऱ्या दिशी ती माणसं आली..कुणीतरी वैरी चालून आल्यासारखं तानीला वाटत हुतं..त्येंच्याकडं बघून ती दातवठ खाईत व्हती..सुंदरीच्या गळ्याला त्यांनी हात घातला...आणि तानीन एकंच हंबरडा फोडला.."दादा..नको गा माझ्या सुंदरीला दिवू.." पुढं जाऊन तानी सुंदरीच्या गळ्याला पडली..गळा काढून रडायला लागली...माधु आन तिची बायको म्होरं झाली आणि त्यांनी तानीला आवरलं....माधु तिला गप करायला बघत हुता, पण तानी ऐकायलाचं तयार नव्हती..

सुंदरीच्या गळ्यातली दोरी  ताणली ..सुंदरीला वडत ती माणसं नेऊ लागली.

"नगा वो माज्या सुंदरीला नेऊ नगा..".मागणं कळवळून तानी  रडत व्हती....आई गेली तवाबी तानी आशीच रडालती.. आईला ज्या वाटनं नेली व्हती त्या वाटनं सुंदरी आता जाईत व्हती.जाताना मागं बघत हुती...मागं मागं वड खाईत .ती बी आता तानीसाठी हांबरत हुती..   

                        आज चाराला आठ दिस झालं.. .माधू .तानीला सांगून दमला व्हता..ती काय केल्या जुमानतचं नव्हती..."मी येणारच न्हाय बग मम्बयला" तानी आपल्या मतावर ठाम. शेवटी तिच्यामुळ सगळी रुंदी लागत व्हती नाही तर आता पतोर मुंबई गाठली असती. गल्लीतली चांगुणाक्का तेवढी एकच तानीच्या मर्जीतली..आता तेवढीच काय ती ऱ्हायल्याली समजूत घालायची.

 "काकू बघ तुला तरी वठतीया का तानी..?" माधू कळवळून चांगुणाक्काला बोलला.

"...लेकी आसं खुळ्यागत करू नगस.तानी आमची शानी हाय नव्ह" चांगुणा आपल्यापरीनं तानीची समजूत घालत व्हती.

"...आंग आई व्हती तवा तुला कुणी चल म्हटलं का कुठं...आता आय गेली तू एकटीदुकटी कशी ऱ्हाशील इथं..? तुझा भावचं नेतोय नवं तुला..लेकी पाटचं तरी असावं न्हाई तरी पोटचं तरी असावं... ज्येची त्येलाचं मया येणार...लेकी तुला मागं ठिवून त्येचा पाय उचलल काय सांग बगू.?'

"दांडग्या मयेचा हाय भाव तुजा...कोण लेकी कुणासाठनी एवढं करतय... स्वतःच पॉर ज्येचं त्येला जड झालंय.."

"माधबा येतीया रं तुझ्या संग माझी पोरं..पण माझ्या वासराला महिन्याला हिकडं घेऊन यायचं बग.." जुन्याराचा शेव डोळ्याला लावत चांगुणाक्कानं तानीला छातीला धरलं..डोळ्याची धार तुटून तानीच्या मस्तकावर पडायला लागली.चांगुणाक्काच्या कुशीत शिरल्याल्या तानीच्या डोळ्याचं पाणी चांगुणाक्काच्या चोळीत मुरायला लागलं...

"काकू तू म्हणतीस तसं करतु बग.तिला जवाकवा गावाकडं यावस वाटल त्या येळला आणीन बग इकडं मग तर झालं." 

"व्हय...व्हय..हे मातूर कबूल..व्हय कणी माझ्या वासरा.." चांगुणाक्कानं आपल्या पदरानं तानीचं  वलकीच डोळं दांडग्या मायेनं पुसलं...

चांगुणाक्कानं एवढी मायेची पाखरण केली म्हटल्यावर तानीला न्हाई म्हणताच आल न्हाई..शेवटाला कसतरी ती कबूल झाली आणि माधूसकट सगळ्यांचा जीव भांड्यात पडला....

                        दुसऱ्यादिशीच माधूनं सगळा काजावाजा गुंडाळला आणि बायकापोरासह माधू बाहीर पडला..आईच्या फोटुला हात जोडून तानीनं घराचा हुंबरा वलाडंला..न ऱ्हावून उजव्या आंगच्या गोठयात तिनं पाय ठेवला..समुर नदार टाकली गोरणी रिकामी व्हती..सुंदरीच दावं निपचित पडल्यालं...फक्त सुंदरीचं तिथं नव्हती...पण तरीबी सुंदरी नजरत भरत व्हती.. तशी डोळ्यांत आसवं दाटली..डोळं गाळीत ती तितनं बाहीर पडली.गल्लीतल्या सगळ्यां आया बायांस्नी भेटून गळ्यात पडून रडली..चांगुणामावशीच्या गळ्याला पडून रडताना तर तिनं सगळयांच्या डोळ्यांत पाणी आणलं.अखेर साऱ्यांचा निरोप घेतला आणि भावाच्या कुटुंबकबिल्यासंग तानी शहराच्या वाटला लागली.

                               आयुष्यात आज पहिल्यांदाच तानी मुंबईला येत व्हती..जिकडं तिकडं मुंगीच्या रिवनागत माणसं दिसत व्हती.गुळगुळीत रस्त्यांवरनं  वार वार धावणाऱ्या गाड्या..त्येंच्या रॉय रॉय आवाज एकसारखा कानात शिरत व्हता.चवूबाजूला हरतऱ्हची नाना नमुन्याची दुकानं...टापला नजर पोचत नव्हती एवढ्या उच्याल्या इमारती...गावाकडं जत्रयंत्राला गर्दी फुलावी तशी चहुकडं माणसांची गर्दी...जे कवा बघितलं नव्हतं ते ते नजरला दिसत व्हतं..गावच्या स्टँडवर परगावाला जातावक्ती नव्या कापडातली माणसं दिसायची आता तर इथं बघिल तिकडं झ्याकपाक कपड्यातली माणसं...हे नवलच म्हणायचं इथं बायकाबी शर्ट पॅन्टत दिसत व्हत्या..ही कुठली न्यारीचं दुनिया व्हती.एखादं चुकार जनावारं जंगलात चुकाव आणि भांबावून जावं तशी तानीची गत झाली व्हती...लाल मातीतल्या झाडाझुडपांच्या जंगलातली पोरं आता सिमेंटच्या जंगलात आली व्हती..

                                       तानीला आता या वेगळ्या दुनियेत ऱ्हाण्याची सवय करून घ्यावी लागणार व्हती.दिवस माग सरकत व्हते...पण गावाघरात.. रानावनांत हुंदडणारा जीव या चार भिंतीच्या घरात कसा राहील..तिच्यासाठी ते घर नव्हतं जीवाचा कोंडमारा करणारी ती कोठडी व्हती..जिकडं तिकडं सैरावैरा पळणाऱ्या पावलांना खीळ बसली व्हती...उडत्या पक्षाला पिंजऱ्यात डांबावं अशी तानीची गत झाली हुती...होईल सगळं हळूहळू सुरळीत. आज ना उद्या तानीला गमायला लागंल,या इचारात माधू आपल्या कामाला लागला हुता.. पण तानीचा जीव काय इथं रमत नव्हता..दिस उजडायचा मावळायचा पण कशातच तिज चित्त थरत नव्हतं.. सगळं इसरून जाऊ दे तानीच्या जीवाला गम पडू दे म्हणून माधूनं तिला मुंबई फिरवून दावली..बिचारा माधू आपल्या भोळ्याभाबड्या भणीसाठी जमलं तस करतच व्हता...पण तानीचा काही केल्या इथं जीव गमायलाच तयार नव्हता.सारखा जीव मागं वड खायाचा.माधूची बायकोबी मनानं चांगली.तानीची ती चांगली काळजी घ्यायची... तिला समजून उमजून सांगत व्हती..कधी मुलंबी तानीसंग खेळायची  तेवढ्यावाट तानी रमायची आणि मग कशात तरी हरवल्यासारखी बसायची.

                                   ..उघड्या डबीतला कापूर हवेत उडून जावा तसं दिस जात व्हते..दोन महिन्याला गाठ पडायला आली.

"दादा मला माझ्या गावाकडं सोड..." अशी माधूच्या मागणं नकाड्या पोरीगत तानीन एकच रट लावल्याली...त्येला तर पार भंडावून सोडल्याला... आज जाऊ,उद्या जाऊ असं करत करत माधू येळ मारून नित व्हता..खरं जीवाला नुसता घोर लागून राहिला हुता. रानावनातली हरणी ' तानी' चांगलीचं कचाट्यात सापडली व्हती. आता तिची सुटनुका नव्हती हे तीनही जाणलं...रोज डोळ्यांम्होरं गाव उभा ऱ्हायाचा..सुंदरीला चारत्याला धुळणीचा माळ..धुळणीच्या टेकडीवरची पसरट धोंड जिथं बसून ती सुंदरीवर नजर ठेवायची..

त्याच धुळणीच्या माळावर एका बगलला असल्यालं सुगरणीच्या लोंबत्या खोप्यांच बाभळीचं झाड. कंबरपट्यासारखं गावाला विळखा घातल्याली शेतवडी...बंधावरची झाडंझुडपं...गावालगतच्या पांदीपासून रानाशिवारातला सांदीखोपडा एकूण एक नजरंम्होरं जसंच्या तसं उभा राहीतं..मनाला कोण बांधून घालणार ते आपलं एकटंच हिंडूफिरून यायचं..आईची... सुंदरीची...गल्लीतल्या चांगुणामावशीची मनात लई सय दाटून यायची...डोळ्यांच्या कडा उतरून पाण्याची धार उलटायची...कुणासंग बोलत नव्हती...मनातलं कुणाला काय सांगत नव्हती..तानी आपली एकटीच असा ह्यो आठवणींचा सगळा पसारा मनात  मांडून बसत व्हती.

तिच्या देहाच्या घरट्यातन मनपाखरू उडून कधीच गावयेशीवर पोचलं व्हतं..आता तिलाही तिकडं धाव घ्यायची व्हती.

                                   आणि त्या दिशी तानीन मनाशी एकदम पक्कंचं केलं. रोजच्यासारखं माधू  आपला उठून आपल्या कामाला निघून गेला...पोरं शाळला गेली घरात भावज आणि तांनी दोघीचं... जेवणाखाण्याचं आटपल्यावर  भावज आपली भांडीकुंडी घासण्यात गुतली..बाहेरच्या बैठ्या  खोलीत कसल्या तरी तंद्रीत तानी मगाठावन बसून व्हती...डोळं खोलवर कुठं हरवलं व्हतं...आज तरी वादळवाऱ्याच्या गतीन मागच्या आठवणींचं वादळ मनात भिरभिरत व्हतं... वादळाच्या एका ताडक्यानं माळावरची पिंजराची व्हळी अल्लादी उचलावी आणि विस्कटून जावी तशी ताडकन तानी उठली...भिरभिरत वादळ कुठं जाईल सांगता यायचं न्हाई...तानी आता वादळ झाली व्हती..वादळासारखी बेभान झाली हुती..त्या कुठल्या आवेशात तिनं घराचा हुंबरा वलंडला. कवा तानी बिनपत्या आपलं घरं सोडून निघून गेली इकडं भावजच्या जरासुदीक ध्यानीमनी आलं न्हाई...

                                           तानी आता रस्त्याला लागली...रांना शिवारात सैरावैरा पळणारी तिची पावलं या गुळगुळीत रस्त्यावरनं हरणाच्या गतीनं  धावतपळत व्हती...ती कुठं जाईत व्हती..? जिकडं मनानं धाव घेतली व्हती तिकडं तिला जायाचं व्हतं...गावची माती...मायेची नाती...आई...सुंदरी...चांगुणामावशी तिला साद घालत व्हती...आणि  म्हणूनच तानी जिवाच्या आंकातान धावत सुटली..तानी नावाचं हे वादळ आता पुरतं बेभान झालं व्हतं..हमरस्त्यावरनं बेफामपणे उधळत व्हतं..रस्त्यावरची माणसं मोठ्या कुतूहलानं तानीकडं बघत हुती....आणि.... आणि एका वळणावर  या वादळाची जणू काळाशीचं टक्कर झाली..तिकडून वेगाने एक बस येत होती..आडवी तिडवी पळणारी तानी काही कळायच्या आत नेमकी या बसच्या आडवी आली...आणि एका क्षणात तानीच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवत ती बस पुढे जाऊन थांबली..तानी जागीच गतप्राण झाली.

ती कैदासीन बस एकदासा तिचा जीव घेऊन मोकळी झाली.गावमातीसाठी आसुसलेला खुळाकावरा जीव कुडीतनं बाहेर पडून एकदासा मुक्त झाला...हाडामासात रुतलेली चाकं ताज्या रक्तानं निथळत व्हती...डोक्याचा पार चेंदामेंदा झालता..हाडांमांसाचा नुसता लगदा सगळीकडं विखुरला व्हता. तानीच्या देहाची पार दैना उडाली हुती....रक्ताचा नुसता सडा रस्त्यावर शिंपला व्हता...एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं हुतं.एक बेभान वादळ पार इस्कटून शमलं हुतं. गाड्यांची वर्दळ जिथल्या तिथं थांबल्याली..माणसांचा आरडाओरडा सुरू व्हता..बघ्यांची झुंडी भोवतीभोर जमल्याली. जशी तानी मगाशी वाट मिळल तिकडं धावत हुती. तसं आता तानीच्या आंगाबुडनं लालभडक रक्ताचा हुणहुणीत पाट, वाट मिळल तिकडं धावत हुता...

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

कविता - 'आयुष्याचे कोडे..' - किरण चव्हाण.



 'आयुष्याचे कोडे..'


भंगू दे आयुष्य माझे

जाऊ दे जीवनाला तडे

या जगण्याचे का आता

थोडेच माझ्यावाचूनी अडे..?

माझ्याच आयुष्याचे मजला

सुटे ना कोडे...


कसे जगावयाचे आणि 

कुठे जावयाचे अजुनी..? 

मला काही ना कळे.. 

जळो...जळो हे जिणे लाजिरवाणे..

माझ्यावाचूनी का इथे काय उणे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


चुकून का आलो असेन 

या माणसांच्या झुंडीत.

माणूस म्हणून जगताना 

का मीच सापडलो खिंडीत..

जगण्याची का एखादी  

मला वाट ना सापडे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


पोट भरल्या दुनियेचे 

नुसते ऐकावे मी ढेकर..

भूक भागल्या पोटाचे 

मीे सोंग घ्यावे कुठंवर.

भरले पोट दावितो

 पण आतून आतडे कोरडे...


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


खरे आसू लपवितो 

आणि खोटे हासू दावितो.

दुःखं भरल्या चेहऱ्यावर मी 

आनंदी मुखवटा चढवितो.

प्रसन्न वाटतसे माझे मन 

पण आतून किती कितींदा रडे...


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


 जगण्यासाठी मला का

 इथे कशाची गरज पडे..?

 आशेवरती जगणे आता

 जराही ना परवडे 

म्हणे जगा आणि जगू द्या 

गातात माणूसपणाचे पोवाडे

माणूस म्हणून जगण्यासाठी 

मग माझेच का वावडे..?


माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...


भंगू दे आयुष्य माझे

जाऊ दे जीवनाला तडे...

 माझ्याच आयुष्याचे मजला 

सुटले ना कोडे...

उरलो देहानेच नुसता 

माझे काय मागे ना पुढे..


जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...

      जाऊ दे आता सरणावरती माझे हे मडे...           

                              

          - किरण चव्हाण.


खालील लिंकवर क्लिक करून कविता ऐका माझ्या यू ट्यूब चॅनेलवर.

https://youtu.be/lm6DrELOJEo

----------------------------------------------------------

'आयुष्याचे कोडे ' या माझ्या कवितेच्या अनुषंगाने...

          या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...किंवा असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर...आयुष्य किती सुंदर आणि देखणं आहे हे  सांगणाऱ्या या कविता...असं आयुष्य जगायला कोणाला नाही आवडणार...पण जगणे जेव्हा वारंवार छळू लागते...केवळ जगण्यासाठी जगणे शिल्लक राहते...आणि खरे जगायचे राहूनच जाते...तेंव्हा मात्र कडेलोट होतो.

 आम्हांलाही जगावस वाटतं म्हणून का जगण्याला असं छळावसं वाटत.तेव्हा जगणं किती सूंदर आहे हे सांगणारी कविता..जगण्यालाही ठणकावून सांगते...'जगण्यानेही छळले होते मरणाने सुटका केली'.

 जगण्याचे गोडवे गाणारी कविता..मग निर्वाणीचेही गोडवे गाते...मरणाचे गोडवे गाण्याची तिला भीती नाही वाटत...तिच्या आहे ते सामर्थ्य मृत्यूलाही सुंदर करण्याचं....

कविता नसते कुणालाही बांधील...उगीच नाही कुणाचे गोडवे गात...तिने नाही केवळ 'सूंदर आहे जगणे' सांगण्याचा ठेका घेतलेला...म्हणून तर ती जगण्याच्या विरोधातही बंड करते.. 

.मनातील व्याकुळ झालेल्या असह्य वेदना...यातना...भावना यांचा उद्रेक ती थंड करते...शब्दांच्या सामर्थ्यावर मनातील अव्यक्त भावनांना बाहेर काढतें ती कविता...निर्वाणीचे रूप घेते आणि ती देते समर्पण...ती जाते पुढे पहिल्यांदा सरणावर..

तेंव्हा कुठे जगास कळते...

नेमके माझ्या मनात काय सुरू होते...जगाला काय वाटेल याचा विचार नसतो कधीच मनात असतो तिचा तो त्याग  फक्त नि फक्त मागे मी जिवंत राहण्यासाठी...

मला न सुटलेले आयुष्याचे कोडे अखेर माझी कविताचं सोडवते... ते कोडे अखेर ती सरणावर घालून मोकळी होते.. 

जगणे किती सूंदर आहे हे सांगणारी जशी कविता असते. 

तसेचं खचलेले दुभंगलेले मन मोकळे करून जगायला भाग पडणारी कविता असते जी त्या जगण्यापेक्षाही किती सुंदर वाटते...अशी ही माझी कविता.

            - किरण चव्हाण.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

किरण चव्हाण वाढदिवस विशेष- यशवंत गुरव.

 'वाढदिवस विशेष...किरण चव्हाण यांच्या लेखन कलेचा थोडक्यात घेतलेला एक आढावा...'

                       

   

"किरण सर आज तुमचा वाढदिवस... वाढदिवसाच्या लेखनातून शुभेच्छा... तुम जिओ हजारो साल...साल के दिन हो पच्चास हजार..."

                                     गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब काकाजींच्या हस्ते आपल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्यानंतर 'नदीकाठचा संसार व लढा दोन कर्तृत्ववान मुलींचा या दोन पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती शासनमान्य यादीत समावेश झाला हे किती मोठे भाग्य आपले आणि आपल्या गावचे.  पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपल्या डोळ्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. हातात घेतलेला एवढा मोठा कार्यक्रम पार पडेल का..?आमच्या कार्यक्रमाला इंद्रजीत देशमुखसाहेब काकाजी  का.? येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था होईल का..? जेवणाचा कार्यक्रम पार पडेल का.? स्टेज मिळेल का मंडप मिळेल का ? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून बसले होते. पण न डगमगता मनात जिद्द ठेवली की कार्यक्रम करणारच आणि करायचा. कार्यक्रमाला सुरुवात झाली ती म्हणजे ज्यांना आम्ही गुरु मानतो ते म्हणजे गुरुवर्य आर के पाटील सर (बेलेवाडी काळम्मा) त्यांच्या पदस्पर्शाने.त्यांनी आणलेले  विद्यार्थी आणि विद्यार्थींनीपासून नागनाथ मंदिर पासून ग्रंथदिंडीचे सुरुवात झाली.

                                             ज्या देवाची कार्यक्रमाला आतुरतेने वाट पाहत होतो. त्यांचे आपल्या पांगिरे नगरीत आगमन होताच एक नवीन ऊर्जा मिळत होती. नवा उत्साह मिळत होता आणि एकदमच एक ना अनेक वाढलेल्या समस्यांचा चक्काचूर झाला. एक नवीन आनंदमय वातावरण सगळीकडे पसरले जणू संतच अवतरले होते सर्व वातावरण भक्तिमय झाले. आणि मनाचा जो उद्रेक झाला होता तो आता देशमुख साहेबांच्या वाणीने पूर्ण शांत झाला होता.कार्यक्रमाला सुरुवात झाली अनेक लेखक होते,कवी होते,सामान्य माणसं होती. समाजसेवक होते,महिलावर्ग मोठ्याने उपस्थित होता असं सारं गर्दीने फुलून गेले होते.त्यातच किरण सर तुमच्या भाषणाला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाची उंची वाढत गेली. भाषणात तुम्ही म्हणत होता "मी देवाकडे प्रार्थना केली देवाच्या पाया पडून काकाजी यांच्याकडे गेलो पण देवाने तुमच्या हाकेला साद दिली आणि प्रत्यक्ष देवालाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पाठवले तेच थोर आदरणीय देशमुख साहेब (काकाजी)


         

                        काकाजींनी सुरुवातीलाच भाषणात सांगितले की किरण देवापुढे प्रार्थना करण्याची गरज कधीही भासणार नाही मी कधीही कुठेही तुमच्या पाठीशी उभा असणार. काकाजी असे म्हणताचं तुमच्या चेहऱ्यावरील भाव,आनंदाश्रू दिसत होते.तुमच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की, अनेक गोष्टींचा उलगडा चालला होता या सर्व गोष्टी मी बारकाईने न्याहाळत होतो. काकाजींनी अशी काही उदाहरणे दिली की, चांगलं काय आणि वाईट काय काय घ्यावे आणि काय घेऊ नये हे सगळ्यांच्या मनाला घासून जात होतं. परिसाचा एखाद्या लोखंडाला स्पर्श व्हावा आणि लोखंडाचं सोनं व्हावं तसं काकाजींच्या भाषणामुळे अनेक लोखंडाचे मने सोन्यासारखी होत होती. त्यातच एका लोखंडाला परिसस्पर्श झाला आणि त्या लोखंडाचं सोन्यात रूपांतर झालं ते म्हणजे किरण चव्हाण सर. सर तुमची वाणी सोन्यासारखी झाली,तुमचे संवाद तुमचे शब्द सोन्यासारखे झाले,तुमचे संवाद सोन्यासारखे झाले,भावना सोन्यासारख्या झाल्या, लेखणी सोन्यासारखी झाली.खरोखरच...."संगत करावी साधुसंतांची सार्थक होईल नरदेहाची."

                                                  आज तुमच्या लेखनामुळे कित्येक लोकांच्या जीवनात सोन्याचा प्रकाश पडला आहे.राधिका गुरव सारख्या मुलीचे जीवन अंधारमय होतं तुमच्या लेखणीमुळे प्रकाशमय झालं. तसेच जसं श्रीकृष्णा सोबत सुदामा असावा तसं तुम्हाला सागरजी गुरव यांची साथ मिळाल. सागरजी गुरुवांचा मी मनापासून आभारी आहे.सागरजी गुरुवांसारखे समाजसेवक क्वचितच पाहायला मिळतील.त्यांच्या कार्याला व समाजसेवेला मनापासून सलाम.गेल्या वर्षी सर तुम्ही व शिवम साधक परिवाराने पूरग्रस्त भागात भेट दिली. चंदूर गावातील छायाचित्रण मी पाहिले.स्वतः आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख साहेब ट्रॉलीत कचऱ्याच्या बुट्ट्या टाकीत होते. घाणीचे एवढे साम्राज्य होते की दुर्गंधी येत होती. पण माणसांनी माणसांसाठी केलेली ही समाजसेवा शब्दात मांडणे शक्य नाही. काय उपमा द्यावी या सेवेला तेही कळत नाही,पण छाती माझी गर्वाने फुगून गेली की आपल्या रांगड्या मातीतील, ज्या मातीत कलेचा गंध आहे ,ज्या मातीत समाजसेवेचा गंध आहे त्याच मातीतील माणूस किरण चव्हाण सर तुम्ही त्यामध्ये होता. आपल्या गावचा अभिमान राखला तुमच्या माणूसपणाच्या सेवेला माझा मनापासून सलाम.

                     



     


                     तुम्ही आपल्या गावच्या पूरग्रस्त माहेरवाशिण उर्मिला पाटील यांच्यासाठी केलेले लिखाण त्यांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी तुम्ही केलेलं आवाहन एक मदतीचा हात त्या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि उर्मिला ताईंची अंधारमय जीवनातून प्रगतीची वाटचाल सुरू झाली. दैनिक महासत्ता पेपरला तुमचा आलेला लेख 'त्याग' नावाचा लेख बरच काही सांगून जातो.त्याग म्हणजे काय?त्यागकाय असतो,त्याग नुसता शब्द आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या त्याग नावाच्या कथेतच मिळतील.आपण कोणासाठी त्याग केला काय ही मनात  सल कायमची राहून जाते. त्याग कथा भरपूर काही शिकवून जाते.                      

                              समाजसेवा किंवा लिखाण करते वेळी बऱ्याच अडचणी येतात पण अडचणींना कधी दाद द्यायची नाही. खरोखरच 'निंदकाचे घर शेजारी असावे'  कारण त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. लोकांनी तुकाराम महाराजांची गाथा नदीत फेकली म्हणजे गाथा संपली, विचार संपले असे  वाईट विचारांचे लोक म्हणतात.पण विचार,अभंग,वाणी कोणीही बुडवू शकत नाही. कारण त्यात असतं सामर्थ्य उलट ते तरंगले.तसेच किरण सर तुमचे विचार,तुमची वाणी सदोदित तरंगत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!








लेखक/दिग्दर्शक-  शिवम साधक श्री.यशवंत परशुराम गुरव

   पांगिरे ता - भुदरगड, जि - कोल्हापूर.

मोबा - +919764755754

----------------------------------------------------------

वाढदिवसाच्या शुभेच्छा...

Ji jay ho mangal ho dada khub mangal ho dada prakatdinachya hardik shubhecchha 💐💐💐

                                    -  गुरुवर्य काकाजी.

मोत्याच्या रूपातून आपले विचार मांडणाऱ्या, समाजातील दुःख आपल्या लेखनातून मांडणाऱ्या, लेखन असे कि डोळ्या समोर चित्र उभा होते. सहवास असा कि प्रेमात पडावे असे वाटते. बोलणे असे कि ऐकत बसावे वाटते, संयम आसा कि आपण पण जरा घ्यावा असे वाटते, असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाला, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक रुपी हिऱ्या ला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्या. 💐💐

     - शिवम साधक श्री.अमर पोवार सर (मुरगुड)


आमचे मित्र आदरणीय समाजप्रबोधन लेखक श्री किरण  सुभाष चव्हाण यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उंदण्ड आयुष्य लाभो हीच नागनाथ/केदारलींग चरणी प्रार्थना💐💐💐💐💐

                      - शिवम साधक पांडुरंग इंगळे.


आमचे आदरणीय मित्र शिक्षक, उत्तम लेखक, संयोजक, कुशल मार्गदर्शक, शिवम परिवाराचे पांगिरे गावातील सर्वेसर्वा माननीय किरण चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...💐🥳💐 

उदंड आयुष्याच्या अनंत सदिच्छा...💐💐

जय हो.. मंगल हो..🙏

                             - श्री.अमर घोटणे


नवीन पिढीतील एक हाडाचे शिक्षक....एक हुशार लेखक...भविष्यातील 

एक मोठे साहित्यिक म्हणून आम्ही ज्यांना पाहतो...किरण आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

                        - शिवम साधक संदीप आळवे.


Kiran sir, congratulation 💐you are doing something new.Your work in society is very valuable, go ahead, God bless you.Our best complements are always with you. In society there is very less people like you. Salute to your hard work, parcivrance, determination, faith, and helpfulness. 

  Best of luck.  🌹🌹🌹🌹

                            - Dear solankure sir


युवा साहित्यिक किरण चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा

किरणदादा आज तुझ्या वाढदिवशी

माझे काही शब्द तुझ्यासाठीच

आहेस आमच्यासाठी तु अर्थपूर्ण

तुझ्या लिखाणात दिसतो जीवनार्थ..

सुख दुःखाचे पेलून वादळ 

आत्मविश्वासाने जिंकतोस जग,

अभिमान तुझा नेहमीच आम्हाला 

जिद्द चिकाटी गुणांनी धरतोस तग...

फुलेल तुझ्या आयुष्यात स्वप्नांची वाट

सुख समृद्धीची ही होईल भरभराट..

मनापासून आज लिहितोय,

किरणदादा तुला गोड गोड शुभेच्छा देतोय..

वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा...

              - शिवम साधक प्रवीण आराध्ये.


“On your birthday we wish for you that whatever you want most in life it comes to you just the way you imagined it or better. Happy birthday!”🎂🎂🎂🥳🥳🥳🥳🍰🍰🍰🍰🎊🎊🎊🎊

          - Miss.Nilam nangare madam


...हाकेला हो,   सामान्यातिल  असामान्य माणुस  एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व, एक अभ्यासु लेखक , आदर्श शिक्षक  ,शब्दांचे उत्तम रित्या उपयोग करणारे, सेवाभावी वृत्ती जोपासणारे सामाजिक कार्यात सहभागी होणारे , कधीही-- कुठे हि--  केव्हापण-- चांगल्या कामासाठी कायपण🙏🏻🙏🏻आमचे दैवत गुरुवर्य श्री इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या  विचारांचा  वारसा घेऊन काम करणारे आमचे बंधुतुल्य गुरुवर्य मित्र  शिवम् साधक किरण चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हो मंगल हो    सरजी         🙏🙏🙏🙏.         शुभेच्छुक ,.      आपला शिवम् परीवार

                        -शिवम साधक श्री.सागरजी गुरव व शिवम परिवार.


आमचे दैवत गुरुवर्य श्री इंद्रजीत देशमुख साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारे आमचे बंधुतुल्य गुरुवर्य मित्र शिवम साधक आदरणीय किरण चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे आयुष्य सुखी समाधानाचे व निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏

      - शिवम साधक श्री.सुनिल लाड.


आपल्या गावातील एक भावनिक लेखक ,संवेदनशील मनाचा कवी,माध्यमिक शिक्षक *श्री किरण चव्हाण सर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺

     -शिवम साधक श्री. अनिल सुतार सर


तुमच्या कर्तुत्वाचा वेल गगणाला भिडु देत आणी तुमच्या लेखनिच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळु देत हिच तुमच्या वाढदिवसा निमित्य नागनाथा चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा भाऊ 🎂🎂💐💐

                   - श्री. महादेव पाटील.

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...... सर

🥳🎂🤩💐💐"🎊

आपणास उत्तम आरोग्य लाभो,व आपल्या यशाची कीर्ती अशीच जगभर चमकत राहो,आमच्या गावचे भाग्य चांगले की आपणासारखे व्यक्तिमत्त्व या गावास लाभले,अजून काय बोलावे सर आपणाबद्दल शब्द ही अपुरे पडतील.

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देव पूर्ण करो हीच सदिच्छा या वाढदिवसानिमत्त.

💐💐💐💐💐💐💐

     - माझा प्रिय विद्यार्थी सुर्याजी.


....चिरंतन सौंदर्याचा रियाज करण्याचा हाच तो सुदैवी काळ.तारुण्यातल्या या क्षणाची जिद्द जन्मभर पुरते.कुठल्या तरी ध्येयात झपाटलेल्या मनांना ही ऊर्जा नियतीही आपल्या अनंत करांनी देत असते.त्यातूनच निर्माण होतात लतादिदी,बाबा आमटे,सिंधुताई सकपाळ, मदर टेरेसा,सचीन तेंडुलकर,सुनील गावस्कर,मेधा पाटकर,कर्मवीर भाऊराव पाटील आणि... असे अनेक..अशाचं सौंदर्य काय आपण केवळ चेहर्‍याच्या रंगरुपातून बघत असतो? त्यांच्या कार्याचं वलय नकळत त्यांच्या चेहर्‍यावर विलसतं आणि तो चेहरा सुंदर दिसू लागतो.त्यांच्या सौंदर्याचं ब्युटी पार्लर कुठलं?ह्रदयातला प्रगाढ ध्यास......ध्येयाच्या शिखराकडं आगेकूच करण्याची वेडी धुंदी ! ह्या खर्‍या छटा सौंदर्याच्या...आपल्या  आजच्या वाढदिवसाला मनपूर्वक शुभेच्छा..यातूनच मनाच्या सौंदर्याच्या जाणीवा दृढ होतात...जय हो.मंगल हो.

                - गुरुमाऊली श्री.शिरीष काटकर.

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

'मारुतीच्या संसाराला मिळालं पाठबळ.' - किरण चव्हाण.

 


       'मारुतीच्या संसाराला मिळालं पाठबळ.'

   

 "एक रिकामी ओंजळ कष्टाच्या फुलांनी भरली.

    रित्या हातांची अखेर संकटे दूर सरली."

                            आमच्या गावातील मारुती ज्ञानदेव वांजत्री एक भोळाभाबडं साधंसुधं व्यक्तिमत्त्व.परिस्थिती अगदीच गरिबीची तसाच गरीब स्वभावही. पंढरीचा माळकरी. पंढरीचा वारकरी, पांडुरंगाचा भक्त.अलीकडेचं आमच्या शिवम परिवारात ही माऊली सामील झाली आहे.लग्नसमारंभात उत्तम सनई वादक..भजनात उत्तम हार्मोनियम वादक..आणि कीर्तनात उत्तम पखवाज वादक असा एक हरहुन्नरी कलाकार.. व्यवसायाने वांजत्री असल्याने उपजतच अंगात असणारी संगीतकला..लग्नसराईत  वाजवण्याचा परंपरागत व्यवसाय..लग्नाच्या सिजनमध्ये आजूबाजूच्या परिसरातून..खेड्यापाड्यातून वाजवण्याचे विडे मिळायचे त्यातून उदरनिर्वाह चालायचा... पण सध्या ही कोरोनाची महाभयंकर परिस्थिती... लॉकडाऊन त्यामुळे लग्नसराई जवळजवळ बंदच यामुळे रोजगारचं खुंटला..

                         घरात वृद्ध बाप..बायको आणि तीन कच्चीबच्ची लेकरं असा मारूतीचा संसार... एकूणच हातावरचे पोट..काय करावे..? रोजच्या संसाराला का एक गोष्टी लागतात..? लहान मुलं,दुखणं खुपणं...एकूण सहा खाणारी तोंडे कशी जुळवाजुळव करायची..पण ठरलेलंच मिळेल ते काम करायचं. कुठल्या तरी कामाधंदयात जुटलेली अशी ही मारुतीची जोडी.शेतात मजुरीला जाण्याशिवाय पर्याय नाही..कधी भातात तर कधी ऊसात भांगलणी करायला जायचं.मिळेल तो रोजगार पदरात पाडून घ्यायचा.कधी उदार उसनवारी करायची असे काहीतरी करून रोजची गुजराण सुरू होती..पण तरीही अडचणींची कमतरता काही कमी  होत नव्हती..परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत होती..आणि शेवटी अगदीच नड पडली तेंव्हा मात्र मारुतीने आमच्या शिवम परिवारातील शिवम साधक श्री.विनायक इंगळे (दादा) यांच्याकडे काहीं पैशांची मागणी केली..तेंव्हा आदरणीय विनायक दादा स्वतः मारुतीच्या घरी गेले. आपुलकीने विचारपूस केली... सर्व परिस्थिती त्यांच्या ध्यानात आली.आणि मग संवेदनशील मनाच्या विनायक दादांनी मारुतीला लागलीच पैशांची मदत तर केली.पण पैसे देताना त्यांच्या मनात असाही विचार होता की, आपण केलेली ही मदत कुठेपर्यंत पुरणार..? आज हे पैसे संपून गेले की उद्या काय करणार..? म्हणून सध्याच्या काळात चार पैसे मिळण्याकरिता मारुतीला काय करता येईल का..?म्हणून त्यांनी स्वस्तात मस्त असा एक पर्याय सुचवला..गावातील लोकांची कपडे ईस्त्री करून देणे म्हणजे लॉंड्रीचा छोटासा व्यवसाय मारुतीने सुरू करावा..मारुतीलाही ते पटले आणि तो राजी झाला.मग काय झाले पुढचे प्रयत्न सुरू..आता चांगल्या कामासाठी वेळ कशाला..? विनायकदादांनीच पुढाकार घेऊन त्यासाठी लागणारे साहित्य ईस्त्री, मोठा बॉक्स टेबल अशी जुळवाजुळव केली..जागेचा प्रश्न होता दादांनी आपल्या प्रशस्त बंगल्यासमोर एका बाजूला हा व्यवसाय सुरू करायला सांगितले.. आणि मग थाटला टेबल.त्यावर ईस्त्री. 


अशाप्रकारे 'विठूमाऊली' असे दुकानाचे नामकरण करून उपस्थित लोकांच्या साक्षीने अत्यंत साध्यापध्दतीने नारळ वाढवून उदघाटन केले.



                        एवढे होत असताना मात्र मारुतीची बायको तिथे उपस्थित नव्हती.ती तर कधीच गेली होती पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला. पण विनायक दादांच्या कुटुंबाने आरतीसह सर्व तयारी केली होती.उपस्थित लोकांचे तोंड गोड करणारी बर्फी सुद्धा विनायक दादांनी मागवून घ्यावी..? दादांच्या पत्नीं सुरेखाताईंनी मारुतीचे औक्षण केले..


ते देखणं क्षण चित्रं कोणत्याही मानवी मनाला सुखावणारं होतं.झाली एकदाशी सुरवात कामाला... ईस्त्री करण्यासाठी पहिला ड्रेस विनायक दादांचाचं.

"मारुती बिनधास्त कामाला सुरुवात कर..ईस्त्री करताना सुरुवातीला काय नुकसान झालं तर माझ्या कपड्याचं होऊ दे..काही हरकत नाही.पण काम करायचं ते मनापासून कर" वरून दादांचा हा प्रेमळ सल्ला. केवढी उदात्त विचारांची प्रेरणेने ओतप्रोत भरलेली ही माणसं म्हणायची...

"जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.|

तोचि साधु ओळखावा देव तेथेचि मानावा.||"

 या ओळींचा अर्थ विनायकदादांच्याकडे बघितल्यावर कळतो.कुठे आहे देव..? देव नाही म्हणता ना ..? तो तर इथेच आहे माणसांत...त्याला मात्र आपण शोधायला चुकतो..त्याचा वास आहे अशा माणसांच्या रुपात..अहो त्या पंढरीच्या विठ्ठलाला काळजी नसेल का आपल्या या भाबड्या भक्ताची. विनायक दादांच्या रूपातूनचं आला ना तो आपल्या भोळाभाबड्या भक्तासाठी धावून..आणि विनायक दादांच्या अर्धांगिनी सुरेखाताई साक्षात रुक्मिणीमाताच या भक्ताचं औक्षण करुन उदंड आशीर्वाद देत होती..खूप मोठ्या हृदयाची देवगुणी माणसं ही, आज मारुतीसारख्या एखाद्या गरीबाचा संसार सावरण्यासाठी पुढे आली.

आपल्यासोबत दुसऱ्याचा संसार सुखाचा करण्यासाठी धडपडणारी.

ही माणसं म्हणजे...

"अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोकं.."

माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचा विचार आचारणात आणून भरभरून जगणारी ही माणसं.विनायक दादा आणि सुरेखाताई आपल्या कुटूंबाच्या अशा उदात्त सत्पात्री कार्याला आमचा सलाम.

                  त्यांच्यापुढे पसरलेल्या हातांना आज कष्टात गुंतवलेत या माणसांनी. 'विठूमाऊली' या नावाने आता साकारलाय जगण्याचा एक नवा पर्याय.आता तिथे मिळेल मारूतीला आपल्या हक्काच्या कष्टाचं फळ. आता कुणावर विसंबून नको रहायला..ना कुणापुढे हात पसरायला...आता चाखायचं स्वतःच्या कष्टाचं फळ.आता गोडी वाढेल ना  संसारात.गोडधोड शिजेल ना घरात.का नाही होणार आता संसार सुखाचा...हा होईल होईल.

लोकहो...

या आपण ही या जमेल तशी मारूतीच्या ह्या नव्याकोऱ्या व्यवसायाला बळ द्या.प्रेरणा द्या.अहो पाच दहा रुपये असे तसे कुठेही कसेही खर्च करतो आपण. पण त्याच पैशांत एखाद्याचा संसार चालणार आहे.आपली कपडे ईस्त्री करून घेण्यासाठी मारुतीकडे या,अगदी रास्त दरात अगदी प्रेमाने आपल्या कपड्यावर ईस्त्रीचा हात फिरवून तो आपल्याला देईल.

मग बघा ईस्त्रीची कपडे घातल्यानंतर जसा वरून रुबाब वाढतो तसा एखाद्या सत्कर्माच्या समाधानाने आपल्या आतल्या  चांगुलपणाचाही कसा  रुबाब वाढतो.

                        जय हो मंगल हो..!!



आजच्या सकाळ वर्तमानपत्रातील बातमी
'वांजत्री समाजाची कोरोना महामारीमुळे झालेली परवड.'



सुज्ञ मंडळी आपण अशा विधायक कार्याचे सकौतुक म्हणून आपल्या प्रेरणादायी शुभेच्छा व्यक्त करू शकता...

दूरध्वनी क्रमांक :-
शिवम साधक श्री विनायक इंगळे - +91 97640 16487
शिवम साधक श्री. मारुती वांजत्री - 8412959397

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

कविता तिन्हींसांजेच्या - तिन्हींसांजेचे सुख...किरण चव्हाण.

     

                      'तिन्हींसांजेचे सुख...'



लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात.

आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात..

काय निरखतेयस अशी एकसारखी.

बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय.

तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा.

तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर.

नको पापण्यांची उसंत काढून घेऊ.

नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस.

नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही...

कसा तेवतोय बघ हळुवार 

तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत.

कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय.

ती वात तान्ह्या अंगाने  कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत.

कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप.

जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच.


दोन नयनपात्रांच्या काठांवर  विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती.

त्या मोतीयांच्या नितळकाचेतून  सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे..

हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी.

माजघरातील सांदकोपऱ्यात

घुटमळणारी अवघी शांतता विसावलीय तुझ्या डोळ्यांच्या कानाकोपऱ्यात.

त्या घनदाट काळोखाची चाहूल लागलीसे वाटते  तुझ्या डोळ्यातील उपजल्या नजरेला.

तरीच सावरलीय ती भिडल्या कटाक्षातून.

झाली का पापण्यांच्या पाखरांची लगबग सुरू..

एवढी का कुठे परतीची सांज सरलीय अजून..     

नको ना इतक्यात सुरू करू पापण्यांची पाखडणी.

नाही तर उगीच मनाला लागून राहते ती रुखरुख..

मला अगदी डोळे भरून पाहू दे...डोळेभरुन...

तुझ्या नयनगाभाऱ्यातील माझे तिन्हींसांजेचे सुख.




                                    - किरण चव्हाण.

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

'स्वप्नंही मरतात...' - किरण चव्हाण.

 


                        'स्वप्नंही मरतात...'


                     माणसं मरतातच....
                     पण माहिती आहे 
                     स्वप्नंही मरतात.
                     ..नाही माहिती
                     स्वतःचा गळा घोटून 
                     स्वप्नं आत्महत्याही करतात.
                     हे तर खूपच मामुली..

                    स्वप्नांच्यावर अन्याय,अत्याचार                           होतो.

                   स्वप्नांच्या पाठीतही निर्दयपणे
                   खंजीर खुपसला जातो..
                  .... स्वप्नांचाही खून केला जातो.
                  त्यांचीही खांडोळी केली जाते.
                     स्वप्नं...
                     तुडवली जातात..
                     कुस्करली जातात..
                     भरडली जातात..
                     चिरडली जातात...
                     गाडली जातात...
                     जाळली जातात..
                     मनाच्या स्मशानात 

                       स्वप्नांचीही राख होते...
                     आणि मग शेवटी 

                    मागे उरतात फक्त..
                      मेलेल्या स्वप्नांचे स्मारक

                  म्हणून माणसांचे जिवंत सांगाडे.






बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

शाळेतील प्रसंगानुभव...चित्र पुसलं आणि-किरण चव्हाण.

शाळेतील प्रसंगानुभव...



                                  चित्र पुसलं आणि...


                      चारची लहान सुट्टी संपली मुलं वर्गात येण्याची घंटा वाजली.मैदानावरची सैरावैरा पावलं वर्गाकडे वळाली.घामेजून गेलेली मुलं दम खात एकदाशी आपल्या जागेवर स्थिरावली.पाचवी वर्गावर माझा चित्रकलेचा तास.वर्गप्रवेश करताच हातवारे करून सगळ्या मुलांचा  एकच गिल्ला...

"सर सर..आता चित्रकलेचा तास.." ही अशी मला आठवण करून देणं आणि दुसऱ्याचं क्षणी ..."चित्रं... चित्रं.... चित्रं." अशी एकच 'री' ओढली.

"अरे हो हो...विचित्र मुलांनो तुम्हांला काही दमधीर आहे का नाही...अरे वर्गात तरी नीट येऊ द्याल काय लागलाय ओरडायला नुसतं चित्रं चित्रं..." असं बोलून त्यांच्या सुराला लगाम घालायचा प्रयत्न केला.

 काय सांगायचं या मुलांना इतर विषयांच्या वेळी यांची दमछाक होते आणि या विषयाला मात्र  हे आमची दमछाक करतात..विचार केला कोणतं चित्रं काढावं बरं.?.आणि लक्षात आलं एक चित्रं पाहिलं होतं पाहताच क्षणी आवडलं होतं चला तेच चित्रं फळ्यावर रेखाटूया..ते चित्र होतं एका सुंदरशा बाहुलीचं... काळ्याभोर केसांचे टोपडे मधून माळलेला फुलांचा गजरा..डोक्यावर छानसा तुरा, गोबऱ्या गालाची मिटल्या डोळ्याची निरागस बाहुलीराणी.फळ्यावर मधोमध चित्र रेखाटायला सुरुवात केली...इथे एक मुलं आमचं वाक्य वाचवतात ते म्हणजे मुलांना सांगावं लागत नाही की,वही पेन्सिल काढा म्हणून.न सांगताच त्यांनी वरती काढून ठेवलेले असतात. इकडं फळ्यावर जसं चित्रं रेखाटायचा तशी तिकडं मुलांची ते चित्र उतरून काढायची आपली धडपड सुरू झालेली.चिमुकल्या बोटांतली पेन्सिल फळ्यावरची रेघनं रेघ टिपून घेत होती. अगदी सुटसुटीत असणारा बाहुलीचा फक्त तोंडावळा फळ्यावर रेखाटला रंगीत खडूनीं ओझरत्या काही जागा रंगवल्या...आणि आश्चर्य अगदी कमी वेळात सहजगत्या सुंदर कलाकृती फळ्यावर साकारली गेली...याची जाणीव मला मागून मुलांच्या आलेल्या प्रतिक्रियेतून झाली..."सर लई भारी चित्र आलंय बघा..आवडलं आम्हास्नी.." जगाच्या पाठीवर अशी उस्फुर्त निखळ प्रतिक्रिया ऐकावी तरी कोणाकडून..? मुलांच्या त्या प्रतिक्रियेचं जे काय सुख ते माझ्या मनालाच ठावं.

                                                          मुलं म्हणतायेत चांगलं आलंय चित्रं म्हटल्यावर शेवटचाचं हात फिरवला आणि थोडं लांबून चित्र निरखलं.मुलं म्हणतात तस छान आलं होतं चित्रं..चित्रातली बाहुली अगदी हुबेहूब देखणी वाटत होती.आता या चित्राचं प्रतिबिंब मी मुलांच्या वहीत पाहू लागलो... फळ्यावरचं चित्र पाहून मुलं जीव ओतून आपल्या वहीत चित्र रेखाटत होती..आपल्या चिमुकल्या कुंचल्यातून चित्र साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती...कुणाचे अर्धे,कुणाचे पूर्ण चित्र मोठ्या कौतुकाने एकेक करून मुलं चित्र दाखवायची..जे त्यांनी काढलं होतं ते त्यांच्यापरीनं चांगलंच होतं. मी थोडाफार बदल सांगून त्याच्या पाठीवर भरपूर शाबासकी देत होतो...सारी मुलं अशी चित्रं काढण्यात दंगून गेली असताना.अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली.ज्यांचे चित्र अर्धवट होते त्यांचा ओझरता हिरमुसलेपणा माझ्या लक्षात आला आणि मग मी म्हटलं "काही हरकत नाही मुलांनो ज्यांचं चित्रं अर्धवट राहिलय त्यांनी उद्या पूर्ण करा, चला आता आवरा पाहू.." वंदे मातरमने आजच्या दिवसाची सांगता झाली आणि वर्गातून बाहेर पडताना काही मुली म्हणाल्या..." सर चित्रं छान आलंय हं, तुमच्या मोबाईलमध्ये  त्याचा फोटो काढून ठेवा सर.." अरे हे मला सुचलच नाही की, "हो हो.."म्हणत मी जाता जाता माझ्या मोबाइलमध्ये त्या चित्राची छबी टिपली. 

                                      दुसऱ्या दिवशी पहिल्याच तासाला आमचे सुतार सर पाचवीच्या वर्गावर गेले आणि हातात डस्टर घेताचं मुलांनी एकच गोंधळ सुरू केला. "सर आमचं चित्र पुसायचं नाही अजून आम्हीं चित्र वहीत काढायचं पण आहे." सर्वचं मुलांनी काहीशा अधिकारवाणीने केलेला तो निरागस हट्ट सरांनाही मोडवेना. नाईलाजाने फळ्याच्या मधोमध असलेलं ते चित्र तसेच ठेवून उरलेल्या बाजूच्या जागेत सरांनी गणिताची मांडणी केली.असाच पहिला, दुसरा,तिसरा तास झाला तरी काही मुलांनी येणाऱ्या सरांना चित्र पुसू दिले नाही.दुपारी जेवणाची मोठी सुट्टी झाली..तरी फळ्यावर अजून चित्र तसेच.मी व्हरांड्यातून एक फेरफटका मारला आणि माझ्या पाचवीच्या वर्गात शेवटच्या बेंच वर जाऊन बसलो.बाजूलाचं काही मुलं जेवण्यात गुंग होती.काही फळ्यासमोर उभा राहून त्या चित्राच्या बगलेला त्याची प्रतिकृती चिमुकल्या हाताने मनसोक्तपणे रेखाटत होती. बाकीच्या वर्गातीलही मुलं कुतूहलाने या वर्गात येऊन ते चित्र पाहून जात होती.

                                काल रेखाटलेलं चित्र आता माझ्या डोळ्यासमोर होतं..आणि असच त्याच्याकडे एकटक पहात असताना विचारांच्या तंद्रीत हरवलो..मनात एक विचारांचं चित्र हळूहळू स्पष्ट होत होतं.किती साधं चित्र अगदी सहजपणे रेखाटलेलं पण का कुणास ठाऊक मुलांना आणि मलाही त्याची इतकी ओढ लागावी..? आता हे चित्र पुसलं जाईल कुंचल्यातून निर्मिलेली एक न एक रेघ क्षणभरात लुप्त होईल ती पुन्ह्यांदा कधी न दिसण्यासाठी. जशी माणसं काळाच्या पडद्याआड निघून जातात कायमची ती पुन्हा कधीच दिसत नाहीत.तसच याही चित्राचं होईलह. याच्यापेक्षाही सुंदर चित्र रेखाटता येतील ना..? मग काय हरकत आहे ते पुसलं तर ?  पण प्रत्येक कलाकृतीची एक वेगळी ओळख असते...ती कलाकृती निर्माण करताना त्यात भाव ओतलेला असतो..त्या प्रत्येक कलाकृतीशी कलाकाराचं अजोड नातं जोडलं गेलेलं असतं... म्हणून दुसरी कोणतीही कलाकृती कितीही सरस असली तरी तीची जागा नाही घेऊ शकत...प्रत्येकाचं स्थान वेगळं जसं माणसांचं असतं तसंच या चित्राचंसुद्धा...त्याचं स्थान मुलांच्याच काय माझ्याही हृदयात स्थिरावलंय म्हणूनच जे मुलांना वाटतं ते मलाही की, हे चित्र कधीच पुसू नये. एकाएकी घंटेचे टोल कानांवर पडले आणि माझी ही विचारशृंखला मध्येच खाळकन तुटली..एकदाशी माझी ती विचारमग्न समाधी भंगली.

                                                          मोठ्या सुट्टीनंतर इ सहावी व सातवीवर माझी तासिका झाल्या.आणि पुन्हा चारच्या सुट्टीनंतर मी माझ्या पाचवीच्या वर्गावर आलो.आपसूकच नजर फळ्यावर गेली. आता फळ्यावर ते चित्र नव्हतं.पुसलं गेलेलं.सहाजिकच पुसलं तर जाणारच.मी असो किंवा कोणीही त्याला पुसावं लागणारच होतं. मी त्या चित्राच्या बाजूला लिहिलेलं होतं 'मी बाहुली राणी झाले उदासवाणी म्हणजे ती पुसली जाणार होती म्हणून की काय उदास होती...असो. मी माझ्या शिकवणीला सुरवात करणार पण आता समोरचे गंभीर वातावरण लक्षात यायला मला वेळ लागला नाही. काल तर हीच मुलं किती आनंदाने चित्र काढा म्हणत होती...मग आता काय झालं..? त्यातल्या त्यात काही मुली तर मला फार उदासवाण्या दिसत होत्या.पण मुलांनी शेवटी तोंड उघडले..."सर मुली सरांना चित्र पुसुच देत नव्हत्या...आणि सरांनी चित्र पुसल्यानंतर म्हणून त्या रडकुंडीला आल्यात.." अस आहे तर आता खरी परिस्थिती ध्यानात आली.

                                                           चित्र काढल्यापासून मुलं त्या चित्रात गुंतलीचं होती इतकी की,त्यांना वाईट वाटणारचं हे मी समजून गेलो होतो. समोरच्या बाकावरील तर दोन मुली अगदीच काकुळतीलाचं आलेल्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या.आता काय करावे बरं.?.चला काही शिकवण्या अगोदर  त्यांची नाराजगी दूर करूया..साऱ्यांना हसते करूया म्हणून मी माझ्या ठेवणीतलं पान काढलं...म्हणजे आमचा 'श्री'.आमचा श्री म्हणजे कलंदर विद्यार्थी... त्याची एक गाणं  म्हणायची पद्धत काही औरंच. म्हणजे अशी की मुळ गाण्यात आपलेच शब्द घुसडून चांगल्या गाण्याची अशी वाट लावायचा ,हसून हसून पोटात दुखेल ऐकणाऱ्याच्या. मग काय श्री ने आपली केली सरळ सुरुवात आणि शिरला एकदासा वाकड्यात..सगळा वर्ग लागला ना खो खो हसायला...लढवली शक्कल कामी आली पण दोन मुली सोडून...सगळा वर्ग हसला पण या बया हसायलाच तयार नाही...रुसून फुगून टम्म....बरं श्री चं गाणं सगळ्या वर्गाला लागू पडलं आता प्रश्न या दोघींचा होता..हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं तशातली गत आता दोघींना कसं हसवायचं...चला शेवटचं पान मीच हाती घेतलं... सलील कुलकर्णी यांनी गायलेलं 'चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे' हे गाणं मुलांना सांगून गाऊन घेतलं...आणि शेवटी गणपती स्रोताने शेवट केला माझ्या एकूण प्रयासातून मृणाल नावाची मुलगी शेवटी गाण्यात रमली कारण तिला मुळात गाण्याची आवड असल्याने शेवटी ती रुळली पण श्रावणी नावाची मुलगी काही आपला हेका सोडायला तयारच नाही..'.यानें की हमे सिर्फ एक कामियाबी हासील हुई.' अखेर शाळा सुटण्याची घंटा वाजली..वंदे मातरमनंतर मुले वर्गातून बाहेर पडू लागली.जाता जाता पुन्हां एकदा श्रावणीला समजावण्याचा प्रयत्न केला तो ही वाया गेला. आता बाकीच्या मुली मला म्हणायला लागल्या. "सर आता ती तुमच्याशी बोलणारच नाही..रुसलीच आहे तुमच्यावर.."

                                                               आता माझ्यावर रुसून काय करणार बिचारी. चला एकदाका घरी गेली की,विसरून जाईल सर्व म्हणून मी काढता पाय घेतला आणि वर्गातून  सरळ ऑफिसच्या दिशेने जाऊ लागलो...व्हरांड्याच्या दगडी पायऱ्या उतरून पुढे दहा पाऊलेही टाकली नसतील तोच मुली मागून ओरडून सांगू लागल्या..."सर...सर...मागे या..मागे..या..श्रावणी काही घरी जात नाही इथंच थांबून राहिलीय" झाली का पंचायत. काय करणार वळलो माघारी.तिच्या जवळ गेलो तर आदीच तिच्याभोवती तिच्या मैत्रिणींचा गराडा पडला होता "आता ती हुंदक्याने दाटून आली होती... अश्रू अनावर झाले होते...डोळ्यांना मुठी लावत अक्षरशः ती अश्रू ढाळत होती.कसं समजवावं या पोरीला.. मी आणि माझ्याबरोबर आमचे गुरव सर दोघेजण तिची समजूत घालू लागलो होतो तिच्या काही मैत्रिणीही जाणतेपणाने तिला समजावीत होत्या आणि मलाही सांगत होत्या "सर आता उद्या या बाहेरच्या फळ्यावर चित्र काढा आणि त्याच्या खाली लिहा सुद्धा हे चित्र कोणी पुसू नये म्हणजे कोणी पुसणार नाही." किती एकीकडे  हा मुलींचा सामंजस्यपणा आणि  दुसरीकडे श्रावणीचा हा हट्टीपणा..मुली खरंच समजूतदार होत्या त्यांच्या त्या जाणतेपणाची केवढी ही समज म्हणायची आम्हाला जे सुचत नव्हतं ते त्या बोलून अगदी शिताफीने तिची समजूत काढत होत्या आणि मग कुणास ठाऊक कसं माझ्या लक्षात आलं तसं मी तिला म्हणालो..." श्रावणी चित्र कुठंही गेलेलं नाही मी त्या चित्राचे फोटो मोबाईल मध्ये काढले आहेत बघ हवे तर..तुला हवे तेंव्हा पहा मग तर झालं." आणि मग काय सांगायचं,अखेर ही शेवटची मात्रा मात्र लागू पडली.हुश$$.शेवटी काही का असेना नकळत हास्याची एक ओझरती लहर तिच्या चेहऱ्यावर दाटली...आणि मैत्रिणीच्या गरड्यातून ती घराच्या वाटेला लागली आणि मी ऑफिसच्या...

                                        आता पुन्हा मनात मगाची ती दुभंगलेली माझी विचारशृंखला सांधली जाऊ लागली मी त्या विचारशृंखलेत विचारांचे एकेक मणी ओवू लागलो...एक साधसंच चित्र रेखाटलं आणि काय प्रसंग उभा राहिला...उगाच वाटून राहिलं त्याच वेळी पुसलं असतं तर बरं झालं असतं या मुलांना त्या चित्राचा लळा तरी लागला नसता....पण शेवटी मुलंचं ती निर्जिवत्वमध्ये जिवंतपणा शोधणारी.पण लळा लागावा तो कशाचा एका चित्राचा. जे काही क्षणांनंतर पुसलं जाणार आहे.मला ही ते चित्र पुसलं जाण्याची कुठे तरी मनात हूरहूर लागलीच होती की...माझ्या त्या अव्यक्त विचारशृंखलेचं व्यक्त रूप मुलांच्या त्या डोळ्यांत दिसलं होतं..एकीकडे माझ्या मनातील ते विचार आणि दुसरीकडे त्या बाल मनातील भावना यांच्याशृंखलेतील सुवर्णमध्य विचारमोती अंती गवसला तो हाच की, बाळांनो इथं काहीच चिरंतन नाही जे आकाराला आलं ते कधी ना कधी निराकार होणारच...फळ्यावरच्या त्या एका चित्राचं काय घेऊन बसलात जगाच्या पाटीवरील माणसं पुसली जातात बाळांनो, मग त्यांच्यासाठी कोणी थांबतं का..? नाही ना..पुन्हा नवी माणसं.. नवी नाती...जशी पाने गळल्या फांदीला नवीन पालवी फुटते...तस आपण नव्याच्या शोधत असलं पाहिजे... एकाच गोष्टीत गुंतून नको पडायला.. नवनिर्मिती करीत राहिलं पाहिजे...जुनेपणाला मागे सारून नव्याचा आंनद घेता आला पाहिजे..  या एका चित्राचं काय..?.चला मुलांनो पुन्हा नव्याने अशी नवी चित्रं काढुया...पुन्हा पुसुया...पुन्हा काढुया...काढत राहूया...



नाळ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकातील सहभागी लेखक सन्मान सोहळ्यात माझ्या 'चित्र पुसलं आणि...' कथेबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्याहस्ते सन्मान स्वीकारताना, व्यासपीठावर  प्रा.जी.पी.माळी सर,किसनराव कुऱ्हाडे सर,आप्पासाहेब खोत, विस्तार अधिकारी श्री.विश्वास सुतार साहेब उपस्थित साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर.


                                      साहित्यिकांची मांदियाळी



मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

आठवणींचा सांदीखोपडा#१ - 'गणक्यांची बैलगाडी'- किरण चव्हाण.

आठवणींचा सांदीखोपडा#१

आज बैलपोळा त्यानिमित्त...


                       'गणक्यांची बैलगाडी.'

                                   कुडाण्यातनं पिंजार उपसून आणलं की त्या पिंजराच्या भाऱ्यात लांबसडक कडब्याच्या पेंडीचा बिंडा असायचा.गोठयात न्हाय तर शेड्यावर भारा टाकला की, भलत्याच आनंदात माझी पावलं त्या भाऱ्याकडं झेपावायची...त्या भाऱ्यात घबाड असल्यागत मन हारखून जायाचं. पिंजाराच्या भाऱ्यात तुरा खवल्यागत कडब्याच्या धाटांचं बाहेर आल्याल शेंडं दिसायचं...त्या सरळसोट धाटांच्या वरती दोन इत लांब पांढुर पिवळ्या रंगाचं  गणकं असायचं.ते वरचं गुळगुळीत गणकं कटाकदिश्यान मोडून घ्यायचं...या गणक्यांचं माझ्या बालमनाला किती अप्रूप..? दहा बारा गणक्यांचा मेळ करून घ्यायचा.दोन मुठीतला तो जुडगा एक करून रवी घुसळावा तसं घुसळत घराकडं पळायचं..ते गुळगुळीत गणकं एकमेकांवर घस्टून सळकून निस्टांयचं आणि कातर कातर आवाज यायचा...लई मज्जा वाटायची... घरात आलं की, गणकं घेऊन बाबांकडं जायचं..त्यांच्या हातात ते दित  मग एकच रट लावायची.

" बाबा मला गणक्यांची बैलगाडी करून पायजे."

"आता न्हाय मगश्यानं करू ." बाबा हातात गणकं घ्यायचे पण उलट मला परत करत बोलायचे.

.."नाही आताच्या आता पायजे.." हा माझा त्यावेळचा हट्टच असायचा.

                                       पण बाबा कुठल्या तरी कामाच्या धबडक्यात अडकून असायचे..त्यामुळे माझा नाईलाज व्हायचा..पण सारखा लकडा सुरूच हं.  हातातली कामं निपटून बाबांनी हे काम हातात घ्यायला तिन्हीसांज व्हायला आल्याली असायची.मग मी ते दिवसभर हातातनं घेऊन फिरलेलो गणकं शेवटी बाबांच्या हवाली करायचो. एखाद्या शेतकऱ्यानं बैलगाडी करण्यासाठी लागणारा लाकूडफाटा सुताराकडं जमा करावा तसं. बाहेरच्या सोप्यात आमच्या बापलेकाची बैठक बसायची...आता माझे बाबा सुतारमामा होऊन गणक्यांची बैलगाडी करण्याच्या कारागीरीला सुरुवात करायचे. मी बाबांच्या पुढ्यात बसून सगळं ध्यान देऊन बघत असायचो.

गणका

                               बारीक मोठ्या मापाचं गणकं हातात घेऊन बाबा.त्याच्यातलं चांगलचं पाच-सहा  गणकं निवडून घ्यायचे...बाकीचं राहिल्यालं  मी माझ्याजवळ ठेवून घायचो..कणसं छाटल्यालं तिरप्या धारेचं शेंडं... त्यो टोकदार गोचका..चरचरीत धारेचा.दिसतोय साधाच पण कधी कसा घात करील कळायचंही नाही..अंगाला नुसता वरनं छाटून जरी गेला तरी रक्ताची रेषा उमटेल..बाबा तो गणका उभा धरून वरच्या गोचक्याच्या काठास्न केळाची साल सोलतात तसं चिमटीनं लांबसडक धडपेची एकेक चिमकी सोलून काढत.भोवतीभोरनं अशा चिमक्या काढायच्या.मग शेवटाला उरायचा तो मधला  पांढऱ्या बळूसारखा गन्ना (मधला गाभा).. 

अंगावरचं वस्त्रहरण झाल्यासारखी त्याची अवस्था...अंग सोलटलेला सरळसोट लांब मऊ गुबगुबीत तो गन्ना..त्याच्यासारखीचं अजून दोन तीन गणक्यांची तऱ्हा व्हायची...आणि मग बैलगाडी करायला खरी सुरवात व्हायची...सुतार जशी खरीखुरी बैलगाडी करतो तशी आमचे बाबा गणक्यांची बैलगाडी करायचे..लेकरासाठी बापाला काय काय करावं लागतं...हे बाप झाल्यावरच समजू शकतं नाही.. मी मन लावून ते बघत असे....

                                 एका बाजूला पायाजवळ काढलेल्या त्या लांबड्या चिमकाट्या.त्यातली एकेक चिमकी उचलून त्या,कमी जास्त मापाच्या मोडून गण्यात टवायच्या...दोन्हीं बाजूला खाली वर गन्ना त्याच्या मधोमध  चिमक्या टवून दोन्हीं बाजूची शिडी बनवायची..त्याला पुन्हा आडवा गन्ना जोडून एकसारख्या चिमक्या त्यात टवून मग बसाययचा हौदा तयार व्हायचा...मधला आडवा कणा.तसंच चिमक्या वाकवून केलेली गाडीवान बसायची जागा कातरी..आणि मागून सरळ पुढं एक ढोबळा गणका जोडून शेंड्याला खाली नकाडा गणक्याचा तुकडा जोडून  पुढची बाजू टेकवायचा तयार केलेला  घोडा .....त्याला आडवा जु...आता हे सगळं झाल्यावर या बैलगाडीला खाली चाकं जोडायची...मग ती कशाची..? तर लांबलचक दोन चिमक्या घेऊन त्या वाकवून अर्धगोल करायच्या...त्याचं एक टोक पुढं आणि दुसरं टोक मागं टवायचं असंच दुसऱ्या बाजूला...म्हणजे फिरणारी चाकं नसायची तर त्या अर्धगोल वाकलेल्या चिमक्या हीच बैलगाडीची इंटरनॅशनल चाकं.जमिनीला घस्टत पुढं पुढं सरकणारी.. ..झाली एकदाशी नाजूक साजूक,हलकी फुलकी इवलीशी गणक्यांची बैलगाडी तयार..आणि मग उरलेल्या गणक्यांतून बाकीची अवजारं नांगर,कुळव,फाटं इ.



 ती गणक्यांची बैलगाडी हातात घेऊन आनंदानं नुसता मिरवायचोचं..आता बैलगाडी तर तयार झाली..पण बैलं कुठं हाईत गाडीला..?  मग मी वळायचो आईकडं.. आईला विचारायचो."आई...माझी  बैलं कुठायत..? मला माझी बैलं पायजेत." म्हणजे बैलगाडी बाबांच्याकडूनं आणि बैलं आईकडून घ्यायची असा माझा आगळावेगळा सौदा असायचा.

          
बेंदराला देव्हाऱ्यात चिकलाची बैलं पुजायची.आणि पुजून झाल्यावर मग ती शेवटी माझ्याच सोध्यानं.मीच त्यांचा मालक. पण त्यावेळेस आई म्हणायची "दोन दिवस तरी ऱ्हावू द्यात देवाऱ्यात.. मग घे म्हणस...एकदा खेळाय घेतलास म्हंजी मोडूनचं टाकतोस" मला कधी एकदा ते दोन दिवस पूर्ण होतील याची घाई असायची...तस तर बेंदूर सणाची मी वाटचं बघत असायचो,चिकलाची बैलं खेळायला मिळायची म्हणून.एक वर्षी तर बेंदूर सण झाल्यानंतर देवाऱ्यातली बैलं मी देवऱ्यातच एका देवाच्या फोटोमागं किती दिवस लपवून ठेवली होती..त्यांच्यासंग खेळण्यापेक्षा त्यास्नी जपून ठेवण्यातचं मला कसला आनंद मिळत होता कुणास ठाऊक..? दररोज त्या फोटोच्या माग हात घालून बाहेर काढून बघायचो आणि पुन्हा त्या जाग्याला ठेवायचो...

                  

                      बऱ्याचवर्षी असं व्हायचं बैलं नवीन नवीन असताना घरातील लोक बैलांच्या गळ्यात पदराकाठाची नाडी नाही तर सुतळीचा तोडा बांधून मला खेळायला द्यायचे आणि मग मी त्या बैलांस्नी माझ्या मागणं नुसतं टरारा वडत खेळायचो..कधी हातानच धरून भुईला घासत फिरवायचो... मग काय एका बैलाचा कान मोडायचा तर दुसऱ्याचा पाय मोडायचा. वरचं शिंग तर मोडायचं नाही तर मागची डीकवल्याली शेपूटचं गायब झाल्याली असायची...कधी कधी एखादा डोळा तरी निकळून पडायचा तर कधी बगलेचा कानच तुटायचा हमखास.अशी काही ना काही दुखापत त्या बैलांना झालेली असायचीच...तेवढा रगडाच करायचोचं ना मी त्यांचा..तसं मी कष्टच करून घ्यायचो  त्यांच्याकडून त्यामुळं...

                                   हा खेळ नंतर नंतर विसरलो की माझ्या माघारी आई कुठल्या तरी दिवळीत ती बैलं ठेवून द्यायची..असो तर आईकडं बैलं मागितल्यावर...आई आपलं काम माग ठेवून वळखीच्या ठिकाणी ठेवलेल्या दिवळीत हात घालून ती बैलं काढून माझ्या हातात ठेवायची... आता दोन्हीं हातात दोन बैलं पकडून मी धावायचोचं.

                            शेतकरी वेसण घालून सापत्या हातात धरून बैलास्नी नेतो पण इथं मी त्यांच्या बकोटीला पकडून उचलून मी पुन्हा बाबांच्याकडे यायचो..मग बाबा त्या बैलांच्या मानंवर त्यो हलका फुलका जु ठेवून तो कुठं निसटू नये म्हणून नकाड्या चिंधुकीनं  बैलांच्या गळ्याला बांधायचे आणि मग शेवटी ती बैलगाडी माझ्या हवाली करायचे..


                            आता माझा खेळ सुरू...मी ते राहिल्यालं गणकं, गणक्यांचा नांगर, कुळव,फाटं त्या बैलगाडीत भरायचो आणि...मग माझी गणक्यांची बैलगाडी दौडायची खोट्या खोट्या शेताकडं ...मी छोटासा गाडीवानदादा... माझी चिकलाची बैलं आणि गणक्यांची बैलगाडी..


                                          - किरण चव्हाण.



(प्रिय वाचकहो....

              सदर लेखासाठी  'गणक्यांच्या गाडीचे 'चित्रं हवे होते...गुगलवर खुप शोध घेतला पण नाही सापडले..पण जे गुगलला जमलं नाही ते यांनी केलं..

श्री. यशवंत गुरव.

हरहुन्नरी कलाकार आणि माझे गुरुबंधू श्री. यशवंत गुरव,बंधूप्रिय प्रविण आराध्येआणि दयानंद लोहार यांनी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून ही दुर्मिळ झालेली गणक्यांची बैलगाडी पुन्हां प्रत्यक्षात साकारली...केवळ आपल्या प्रिय वाचकांच्यासाठी..तरी त्यांचे मनःपूर्वक आभार..)

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...