फॉलोअर

शनिवार, ३ जून, २०२३

बाप गेला आणि...

 



                                        बाप गेला आणि...          

                             आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.?  अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरिबीला उलथून टाकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही...म्हणून बाप सारखा म्हणायचा "आमचं सगळं पावणपै नोकरदार हाईत..नोकरीच्या जीवावर प्रगती करत्यात."  त्यांनी केलेली प्रगती दाखवण्यासाठी बाप मुद्दामहून लहानपणापासून मला पाहुण्यांच्या घरी घेऊन जायचा...बाप म्हणायचा.."खूप शिकायचं..शिकत राहायचं... नोकरी करायची..

                             शिक्षणाचं महत्व लहानपणापासून माझ्या मनांवर बाबाने बिंबवलं होतं. मला आजही आठवतंय.. मी दुसरी-तिसरीला असताना अंकलपीतली बाराखडी पुढ्यात बसवून बाबा म्हणून घ्यायचा. सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासाला बाबाने मला ओढून नेऊन बसवले होते. बाबा रात्रीच्या वेळी भिंतीला तक्क्या देऊन निवांत बसत व मला जवळ घेऊन म्हणायचे " पुस्तकातला एखादा धडा मला वाचून दाखव बघू " त्यावेळी धडा वाचून दाखवण्यात मला एक प्रकारचा आनंद मिळायचा. त्याकाळात दावं, अडाणी वैगरे बाबांना वाचून दाखवलेले धडे आजही आठवतात. चित्रकला मला आवडायची. त्यामुळे चित्रकलेची वही, स्केचपेन लागेल ते साहित्य मला बाबा आणून देत असे. मला काही हवं आणि ते बाबांनी दिल नाही असं कधी झालं नाही.. खरं तर माझ्या शिकण्याच्या मागे मूळ प्रेरणा ही माझ्या बाबांची होती. त्यांच्यामुळे तर मी मनापासून शिकत गेलो. 

                             माझ्या बाबांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. बाबांना दिसायचं तरी केवढं..? तर मी एकदा बाबाला विचारलं होतं. "बाबा तुला केवढं दिसतं.." त्यावर बाबांचं हे उत्तर होतं. "उगीच धोतरातनं बघितल्यासारं. जवळच तेवढं पांढरं दिसतंय.. लांबच कायच दिसत नाही." म्हणजे माझ्या बाबाला जवळजवळ ९०% दिसतच नव्हतं. वाटेवर टाकलेलं पहिलं व प्रत्येक पाऊल हे अंदाजानं नी अदमासे टाकलेलं असायचं. आरी, रापी, हस्ती, संदन, चप्पलाचा एखादा जुना जोड अशा सामानाची पिशवी खांद्याला अडकून बाबा लवकरच घराबाहेर पडायचा. रस्त्याच्या एका बाजूनं काठ धरून अंदाजानं चालायचा. कधी खड्ड्यात पाय जायचा, कधी ठेचकाळायचा तर कधी गटारात सुद्धा जायचा.पण बाबा कधी थांबला नाही.  कधी कधी लोक सांगत "आज तुझा बाबा इथं पडला बघ...तिथं धडकला बघ.."   बाबा धडपडत पडत झडत आजूबाजूच्या खेड्यावर लोकांच्या पायातली फाटकी तुटकी चप्पल शिवायला जायचा. कुठल्या गावातल्या वेशीवरच्या झाडाच्या पाराला तर कधी कुठल्या घराच्या भिंतीचा आधार घेऊन बाप ऊन्हातान्हात चप्पलं शिवत असायचा. बाबाचा बोलका स्वभाव होता. त्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसांशी बोलून चालून असायचा, चेष्टा मस्करीही करायचा. त्यामुळे गावातली काही माणसं तासघटका बाबाजवळ मुद्दाम बोलायला थांबायची. चप्पलाला ठिगळं लावत बाबा समोरच्याला अभिमानाने सांगायचा, " पोराला डी.एड केलंय, माझं पॉर मास्तर व्हणार हाय..." चार खेड्यातनी बाबा अभिमानाने सांगायचा..'माझं पॉर मास्तर व्हणार.' .. सलगीतली लोकं म्हणायची , "सुभासदाचा नाद खुळा.. आंधळा असून बिचाऱ्यानं पोराला चांगलं शिकवलं." आयाबाया म्हणायच्या..".आंधळाच्या गाई परमेश्वर राखी.." बाप जरूर आंधळा होता. त्याच्या डोळ्यांत भर दिवसाही अंधार साचलेला होता..पण लेकाला शिकवायचं.. मोठं करायचं  हा आशेचा प्रकाश किरण त्याच्या डोळ्यातल्या अंधारावर मात करायचा.

                             " आंधळ्याला कोण पोरगी दिल" अशी भावकीतली एक म्हातारी सुरुवातीला म्हणाली होती..म्हणजे लग्न होण्याची शाश्वती नाही..इथूनच माझ्या बापाच्या संसाराची सुरुवात झाली होती. पण बाबा आंधळा असला तरी हिंमतवान ,करारी आणि जिद्दी होता. बापाचा स्वाभिमानी बाणा होता..आपल्याला पटेल तेच करणार.. आपल्या तत्वाला बांधील राहणार..आपण गरीब, डोळ्यांनी दिसत नाही म्हणून कुणाच्या सहानुभूतीला बळी पडून आपला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यापैकी माझा बाप मुळीच नव्हता...आणि बाबाच्या अशाच गुणांचं बाळकडू त्यांच्यापासूनच माझ्या अंगी आलं आहे. कोणी काही म्हणो पण बापाचं लग्न झालं, संसार सुरू झाला. तीन मुलं झाली.पाण्यात पडलं की हात पाय मारावेचं लागतात. अशाप्रकारे हातात आरी,रापी असं समान घेऊन  खेड्यावर चप्पल शिवायला बाप जाऊ लागला. पुढं पुढं एक शेळी घेतली नंतर त्या शेळीपासून दहा बारा शेरडांचा खांड झाला, घरभर नुसती शेरडं होती. आरी,रापी, वादी आणि शेरडं यांच्या जीवावर संसार सुरू झाला..यातून पुढे दोन पोरींची लग्न आणि माझं शिक्षण बापानं पूर्ण केलं..मला शिक्षक करायचं बाबांचं स्वप्न होतं..

                   

२०१० साली डी.एड होऊन मी बाहेर पडलो आणि दुर्दैव म्हणजे पुढे शिक्षक भरती बंद झाली. आणि मग मी बेकारीपणाच्या जाळ्यात कसा गुरफटत गेलो फरफटत गेलो माझं मलाही कळाल नाही. मग काय..? इथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. शिक्षक होण्याच्या स्वप्नामागे धावताना वाट्याला काय येणार होते माहिती नव्हतं. इथून पुढची वाट कशी असेल याबद्दल अनभिज्ञ होतो. पोरगा आज शिक्षक होईल उद्या होईल या आशेवर बाप पडत झडत खेड्यावर चप्पल शिवायला जायचा. डी. एड करून नोकरी नाही तरी बाबा म्हणायचा आता बी.एड करायचं... मी बाबाला म्हणायचो.." डी. एड करून नोकरी नाही आणि म्हण बी. एड कर...मी अजिबात करणार नाही.." मी असं म्हणताना बाबांनी माझं काही एक ऐकलं नाही.. ते म्हणत.."काही पण होऊ दे शिक्षण थांबवायचं नाही..पुढे शिकत राहायचं...बी. एड करायचंच..." मला बळजबरीने त्यांनी बी.एड ला प्रवेश घ्यायला लावला आणि मग पुढे इंग्रजी विषयातून मी बी. एड पूर्ण केलं.बाबा खेड्यावर ,आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला आणि मी एखादं पुस्तक घेऊन शेरडांच्या मागे डोंगरात जात असे. नाही म्हणायला एखाद्या शाळेत तात्पुरते शिकवायला जायचे व सायंकाळी गावच्या मराठी शाळेच्या वर्गात गावातील मुलांचा क्लास घ्यायचा असे चालले होते. अशीच वर्षे निघून जात होती. मला काही नोकरी लागत नव्हती आणि इकडे आई- बाबांचं राबणं सुरूच होतं..

                बाबांना डोळ्यांनी तर दिसत नव्हतेच पण सततच्या आजारीपणाचा सामना त्यांना दरवेळी करावा लागायचा.  पूर्वीपासून बाबा वरचेवर आजारी पडत..एकदा का आजारी पडले तर त्यातून ते लवकर बरे होत नसत.  मूळचा मूळव्याध्येचा त्रास होता. शुगर होती. पथ्य पाणी काही पाळत नसत. कधी शुगर वाढून आजार बळावायचा तर कधी मूळव्याधाचे दुखणे डोके वर काढायचे. काही ना काही त्रास असायचाचं. दुखणे कमी आले की त्यातून उठून खेड्यावर जायचे..  हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो..हातात कोणतीच नोकरी नव्हती शिक्षक होणे तर दूरच..

                एक वर्षी बाबांना मूळव्याध्येचा त्रास अधिकच उदभवला. बाबांचा हा जुनाट आजार होता. गरिबी आणि  हातावरचं पोट या ओढाताणीत बाबाने पूर्वीपासून या आजाराकडे साफ दुर्लक्ष केले होते. हा आजार इतका भयंकर होता की, रक्ताने एकेकदा चड्डी भिजत असे, जमिनीवर सांडत गेलेली रक्ताची धार किंवा संडासात पडलेले रक्त आम्हीं अनेकदा पाहिले आहे. गुदद्वारातून मुळव्याधेचा गड्डा बाहेर यायचा. त्यावेळी उभ्या उभ्याच मोठ्या मुश्किलीने बाबा तो गड्डा बोटांनी आत सारायचे.. खेड्यावर जाताना बऱ्याच वेळा रस्त्यात थांबून अशाप्रकारे तो गड्डा आत सारून पुढे चालायचे.. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदनेच्या खुणा आजही मला स्पष्टपणे आठवतात. मूळव्याध्येच्या दुखण्याने ते अगदीच त्रस्त झाले होते, कळा असह्य होत होत्या आणि मग बाबांना गारगोटीच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले. आठ दिवस झाले तरी त्या कळा काही थांबत नव्हत्या. बाबांना थारा होत नव्हता..ती अवस्था बघवण्यासारखी नव्हती. कळा थांबायचे नांव नाही. अखेर एके दिवशी गारगोटीतून थोरली बहिण (आक्का) व प्रवीण यांनी बाबाला ऍबुलन्सने कोल्हापूरला सी. पी.आर मध्ये हलवले. मी एका शाळेत काम करत होतो त्या संस्थापकाच्या दारी दवाखान्यासाठी लागणाऱ्या पैशाकरिता. माझ्या कामाचा चार हजार रुपये पगार घेण्यासाठी त्यांच्या दारी कित्येक तास ताटकळत आशेने उभा होतो. आणि मग ते केवळ चार हजार सोबत घेऊन मी कोल्हापूर गाठले. तेंव्हा रात्र झाली होती. 

          बाबांना सी.पी.आर मध्ये आणले त्या रात्री आक्का, मी बाबांना मिणतवाऱ्या केल्या पण एक घास देखील त्यांनी खाल्ला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत बाबांना घेऊन वार्डमध्ये मी फिरत होतो. धड बसता येत नव्हतं ना उभारता येत होतं. उपचार लवकर मिळत नव्हते. डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्या रात्री बाबा उपाशी झोपले. पहाटे चारला जाग आली. मी त्यांना लघवीला नेऊन आणलं व बेडवर बसवलं.. आक्का म्हणाली, "रात्री काहीच खाल्लं नाही निदान नकाडा शिरा तरी खातोय का बघूया" म्हणून बाबाला बोलवलं तरी काहीच प्रतिसाद नाही...नुसते शांतपणे बेडवर बसले होते. आम्हीं किती बोलावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद शून्य.बधिर झाल्यासारखी अवस्था..ऐकायला गेलं नसल्यासारखे करून.काहीच बोलत नव्हते,  आम्हीं घाबरलो.. मी तर डॉक्टरांना बोलवण्यासाठी अक्षरशः पळत सुटलो...शिकाऊ डॉक्टर होते ते आले त्यांनी तपासले व उलट आम्हांलाचं  ते म्हणाले "त्यांचीचं बोलायची ईच्छा नाही..तुम्ही सारखे त्यांना बोलावू नका" पण या उत्तराने आमचे समाधान झाले नाही...अशा अवस्थेत बाबांना इथं जास्त वेळ ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाबांना खाजगी दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला आणि मग सरस्वती ऍपल मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात ऍडमिट केलं. तिथे ऍडमिट केल्यावर निदान कळाले की, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिणीत रक्ताची गुठळी झाली आहे. त्यामुळे त्यांची वाचा गेली आणि अर्धांगवायूचा झटका आला होता.  शरीराचा अर्धा भाग दुबळा झाला होता. आमच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. काय करावे सुचत नव्हते. आय.सी.यु मध्ये असणारी त्यांची अवस्था पाहवत नव्हती. मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना करत होती की, बाबा यातून सुखरूप बाहेर पडोत. 

                              कोल्हापूरातील हा अगदी मोठा दवाखाना या दवाखान्याचा खर्च आमच्याने पेलवणारा नव्हता. त्यावेळी माझ्या खिशात फक्त  चार हजार रुपयेचं होते. पण अशा कठीण वेळी ज्या ज्या लोकांना मी मदतीची हाक दिली ते लोक अगदी देवासारखे धावून आले..माझ्यासाठी ते माणसातलेचं देव होते. हृदयात कोरलेल्या त्या प्रत्येकाचं नांव इथं पानांवर मांडणं शक्य नाही...पण माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात त्यांचं स्थान परमेश्वरासमान आहे.खऱ्या अर्थाने त्यांच्या मदतीवर तर बाबांचा दवाखाना आम्ही करू शकलो. बाबा जगण्या मरण्याच्या मधली झुंज देत होते. सर्वांना वाटत होतं की, बाबा आता यातून वर उठणार नाहीत. उपचारांलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.  मला एवढही सांगण्यात आलं होतं की, "बाबांना आता दवाखान्यातून घरी नेऊयात. घरी जी काही सेवा करता येईल ती करू..". इतकी बाबांची प्रकृती त्यावेळी खालावलेली होती. अशी एक वेळ आली होती की, सर्वांनी माझ्यावरच हा निर्णय सोपवला होता..की "किरण ऐक आमचं, बाबांच्यात आता सुधारणा होणार नाही... आपण घरी घेऊन जाऊयात..." माझ्या आक्काचेही म्हणणे तेच होते...      

                           त्यावेळी मी एकटाच बाजूला जाऊन एका खुर्चीत बसलो होतो.. डोळे उघडले काय आणि बंद केले काय माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार दाटला होता. काय करावे ? घरी न्यावे की नको ? नाही तरी बाबांच्या प्रकृतीत सुधारणा काहीच नव्हती.. काय घ्यावा निर्णय..? पण एका क्षणी मी ठाम निर्णय घेतला...तो क्षण फार महत्वाचा होता.  मी निर्णय घेतला की,काहीही होवो बाबांना घरी न्यायचं नाही...इथंच काय बरे वाईट व्हायचे ते होवो..शेवटी आपल्या हातात काय आहे..? तर फक्त प्रयत्न... शेवटपर्यंत तेच करायचे.आणि मग काही का असेना शेवटी प्रयत्न फळास आले म्हणायचे. बाबांच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होऊ लागली. आणि आमचा जीव भांड्यात पडला. जवळपास पंधरा दिवस दवाखान्यात ठेवून अखेर डिस्चार्ज मिळाला. लागलीच त्यांना कर्नाटकातल्या नागरमनोळीला लकव्यावरचे औषध द्यायला नेले. व तिथून मग घरी आणले.  घरी आणल्यानंतर आई,बहिणी व मी सगळ्यांनीचं बाबांची चांगली  सेवा केली. चार महिने सकाळ - संध्याकाळ मालिश करून बाबांना अंघोळ घालत असू. जेवण भरवायला लागायचं. नारळपाणी, फळं असं खायला देत असू . हळूहळू बाबांना बरं वाटू लागलं. तब्येतीत सुधारणा होऊ लागली. घरात हळूहळू हिंडू फिरू लागले पण बोलायला येत नव्हतं.. काही बोलायला बघायचे पण शब्द फुटत नव्हते. बोलायचा किंवा काही सांगायचा किती प्रयत्न करायचे पण निष्फळ...."बाबा" एवढाचं शब्द स्पष्ट बोलायचे तेवढंच एक नांव त्यांच्या ओठावर उरलं होतं.... आणि प्रयत्न करूनही मनातलं काही सांगता नाही आलं की..उद्विग्नपणे म्हणायचे..."काय करायचं बाबा.."

                     दरम्यान कोल्हापूरतल्या एका विनाअनुदानित शाळेची मुलाखत मी सकाळ पेपरमध्ये वाचली. पण त्या दिवशी कोल्हापूरला जायला माझ्याकडे पैसे नव्हते.. माझे चुलते वारून सहा दिवस झाले होते अशा वाईट प्रसंगात चुलत भाऊ सागरकडून दोनशे रुपये घेण्याची वेळ माझ्यावर आली आणि मुलाखतीला गेलो. तिथे जाऊन एका वडापावच्या गाड्यावर थांबून कसातरी गडबडीत अर्ज लिहिला .आणि शाळेत पोहोचलो. त्यावेळी शेवटची मुलाखत देणारा उमेदवार मीच होतो. मुलखातीमधून शेवटी माझी निवड झाली. संस्थेचे सचिव सदानंद पुंडपाळ सर हा एक देव माणूस भेटला म्हणायचा की, ज्यांनी आपल्या संस्थेत घेऊन माझं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.. पण शाळा होती विनाअनुदानित..अनुदान येईपर्यंत पगार काही मिळणार नव्हता. भविष्यात पगार सुरू होईल या आशेवर काम करावे लागणार होते. तरी संस्था चांगली होती इतर संस्थेसारखे पैसे वैगेरे भरावयाचे नव्हते. शेवटी मी निर्णय घेतला बिनपगारी असेना का नोकरी स्वीकारायची. बघू पुढचे पुढे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी लागल्याचे बाबांनाही तेवढेचं  समाधान. मग एक दिवस आईबाबांचा आशीर्वाद घेऊन मी कोल्हापूर गाठले. शिक्षक म्हणून रुजू  झालो..पण बिनपगारी.  शिक्षक झालो याचा एकीकडे आनंद तर पगार नाही केंव्हा सुरू होईल? याची दुसरीकडे चिंता होती. सुरुवातीला दिवसभर शाळा करत असे आणि रात्री एखाद्या हॉटेल मध्ये काम करायचो म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न मिटायचा. पण सकाळच्या जेवणाची अडचण व्हायची कारण हॉटेलमध्ये फक्त रात्रीचे जेवण मिळायचे. मग सकाळचे जेवण दुपारी शाळेत शालेय पोषण आहारावेळी जेवायचो. 

                पण कुठे तरी परमेश्वर पाठीशी होता म्हणायचा आणि मग कोल्हापूरमध्ये आल्यापासून माझ्या शाळेतील सहकारी रमेश गुरव सर यांना माझी परिस्थिती माहिती झालेली होती. कठीण काळात त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला. त्यांचे माझ्या व माझ्या कुटुंबावर थोर उपकार आहेत. एकदा असेच मी शाळेत असताना चारच्या दरम्यान घरून फोन आला "बाबांना जास्त झालं आहे लवकर घरी ये.".मी अचानक बाहेर पडणार पण खिशात काहीच पैसे नव्हते.. याच विवचंनेत शाळेतून बाहेर पडत असताना गुरव सरांनी विचारले, "सर असे अचानक का चाललात..? मी त्यांना घटना सांगितली तोच त्यांनी मी न मागताच खिशातून दोनशे रुपये काढून माझ्या खिशात कोंबले...मला ती घटना आठवली की आजही अचंबा वाटतो की, या माणसाला माझी अडचण न सांगताही कशी कळाली असावी.? शब्दावाचून भावना,वेदना ओळखणारी ही माणसं माझ्या त्या काळात परमेश्वरासारखी माझ्या पाठीशी होती.. दुसरे कुटूंब म्हणजे सौ.जयश्री अमित पाटील यांचे. पाटील मॅडम सध्या ए. पी. आय. आहेत त्यांचा मुलगा प्रेम याचे मी होम ट्युशन घेत असे. कोल्हापुरात गेल्यापासून शेवटपर्यंत प्रेमचा मी क्लास घेत होतो. या होम ट्युशनमधून महिना मला तीन हजार मिळत.  त्या तीन हजार मध्ये माझी सगळी गुजराण होत असे. काहीं वेळा अडीअडचणीला पैशाची मदत ते करत.  

                   मार्चपासून सकाळच्या शाळा सुरू झाल्या की, मी दुपारी एम. आय.डी. सी. मध्ये ४ ते १२ शिफ्टला कामाला जायचो तेथे हेल्परचे काम करायला लागे. एखाद्या वेळेस ओव्हर टाईम करायचो. माझा  उदरनिर्वाह, बाबांचा दवाखाना आणि औषध गोळ्यांचा खर्च यासाठी या काळात तारेवरची कसरत करावी लागली. मागे आई मजुरीला जायची ते पैसे साठवून माझ्या माघारी बाबांच्या गोळ्या औषध घेत असे. तरी सुद्धा अधेमध्ये बाबांची तब्येत जास्त खालावत व आईची नुसती ओढाताण होई..बोलता येत नसल्याने बाबांची आतल्या आत घुसमट होत होती.त्यामुळे ते सारखी चिडचिड करीत...कधी घरातून बाहेर पडून जात. आईला त्रास देत, एकेक वेळा आई रडकुंडीला येई.हतबल होई. पण या काळात पाठचा भाऊ पण  साथ देणार नाही अशी साथ मला मिळाली ती आमच्या प्रवीणची...हा माणूस म्हणजे जणू माझी सावलीच आहे. माझ्या माघारी बाबांच्या दुखण्याखुपण्याला तोच धावून जाई. 

           दिवस असेच जात होते.. शनिवारी रविवार आणि सणावाराला मी घरी जात असे.. शनिवार जवळ आला की बाबा नुसते माझ्या वाटेकडे डोळे लावून असायचे. कधी एकदा माझा ल्योक घरी येतोय असं त्यांना व्हायचं. फोन वर फोन करायचे.  फोनवर बोलता येत नव्हतं तरी मोठ्या मुश्किलीने "बरा हाईस..."  हे एवढेचं शब्द कसे तरी बोलायचे . पण ते ही उच्चारायला देखील बाबाला मोठे कष्ट पडायचे... घरी आलो की हरखून जायचे... त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जायचा...कोल्हापूरातून गावी गेल्यावर मी बाबांना एकदा घट्ट मिठी मारलेली आज मला आवर्जून आठवते आणि आता खंत वाटते की दर वेळच्या भेटीत बाबांना अशी मिठी का मारू शकलो नाही...मायेच्या स्पर्शाचं सुख बाबाला का देऊ शकलो नाही..? गावी गेलो की बाबांचा एक प्रश्न ठरलेला असायचा. पगार कधी सुरू होणार..? आता दोन वर्षे  म्हणता म्हणता चार वर्षे झाली तरी पगार सुरू झाला नव्हता.. आणि आता नेहमी एकच प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता..तो म्हणजे पगार कधी सुरू होणार.  ? या प्रश्नावर मी निरुत्तर असायचो...काय उत्तर द्यायचे..?. बाबांना रेडिओ ऐकण्याची सवय होती. मनोरंजनाचे काय ते तेवढेच साधन. अधिवेशन काळात शाळेच्या अनुदानाच्या बातम्या रेडिओला लागायच्या... तेव्हा मी कोल्हापूरहुन कधी घरी आलो की, बाबा तोडक्या मोडक्या शब्दात ती बातमी सांगायचे.  मी ओळखून जाई... माझ्या पगाराची बाबांना किती आस लागली होती.. बाबांना आता नुसता ध्यास होता तो माझा पगार आणि दुसरे म्हणजे माझं लग्न.. कारण आता लग्नाचं वय उलटून जात होतं.... लग्नाचं पोर घरात असलं की आईबापाला जी चिंता जाळत असते.. त्याच चिंतेत सतत बाप असायचा..त्यात ही अशी सगळी परिस्थिती..

                             बाबा मला म्हणायचे "आता लग्नं करूया की," त्यावेळी मी कधी कधी चेष्टेने म्हणत असे "मला अण्णा हजारेंच्यासारखं राहायचं आहे..लग्न करणार नाही मी. "  तेंव्हा बाप मनमुराद हसायचा... आणि पुन्हा कधी लग्नाचा विषय काढला की मी म्हणायचो... "आता लग्न करायचं म्हणजे बापानं पुढं होऊन सगळं करावं लागतं.....तुम्हीं बघा की पोरगी मग मी लग्न करतो.." .एकप्रकारे मी असं बोलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचो. यावर बाबा उदास व्हायचा त्याला माहिती होतं.. मी बाप आहे..पण मनात असूनही आज पोरासाठी काही करू शकत नाही ही सल त्यांच्या उरात दाटायची आणि शेवटी बाप म्हणायचा...."काय करायचा बाबा..?"

                         "बाबा.." आणि ..."काय करायचं बाबा.." एवढंच बाप बोलू शकत होता. यापलीकडे काही बोलण्यासाठी त्यांची जिभचं वळत नसे....बोलायचं खूप असे, मनातलं सांगावंसं वाटत असे पण सगळं मनातच राही...आणि मग आतल्या आत बाप घुसमटत राही..

                      माझ्या माघारी बाबा अक्षता टाकण्याची मूठ दाखवून कळवळून तळतळून आक्काला सांगत असे "माझं आता काही खरं नाही पोराला मी हाय तोपर्यंत लगीन करायला सांग.." माझ्या बापाला लग्नाची हौस साजरी करायची होती..तेवढीचं काय ती ईच्छा मागे उरलेली आता तब्येत साथ देत नव्हती. तब्येत वरचेवर खालावत होती..

                   आणखीन एक वर्षी बापाची लघवी तटली.. पुन्हा कोल्हापूरला हलवलं. पुन्हा पहिल्यासारखा प्रवास. पहिल्यासारखीच परिस्थिती...ते दवाखाने ..उपचार. दोन तीन दवाखाने बदलावे लागले.  नाना तऱ्हेचे आजार उद्धवत होते... बाबांचं शरीर म्हणजे रोगाचं माहेरघर झालं होतं जणू...कोल्हापूरहून जवळपास महिनाभराने घरी आणलं आणि पुन्हा जास्त झालं तेंव्हा मग गारगोटीतील एम. डी डॉक्टर गोंजारे यांच्या दवाखान्यात आठ दहा दिवस एडमीट केलं आणि यावेळीही बाबा पुन्हा एकदा मरणाच्या दारातून परत आले. बाबांचा दवाखाना काय आमची पाठ सोडत नव्हता..तो आता नित्याचाच झालेला.

                    एक तर पगार नाही. जवळ पैसे नाहीत त्यात हा दवाखाना. लोकांच्याकडून पैसे घ्यायचे तरी किती..पण या कठीण काळात माझ्या माणसांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. सर्व बाजुंनी संकट यावीत असा हा काळ होता. अशावेळी मला एक संधी खुणावत होती. आणि या संधीमुळे मी या परिस्थितीवर मात करू शकणार होतो.  ती म्हणजे आमच्याच संस्थेतल्या अनुदानित शाळेवर इंग्रजी विषयाची जागा रिक्त झाली होती. आणि विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली या शासन निर्णयानुसार मला त्या जागी जाता येत होते.. माझ्यासाठी हीच खरी सुवर्णसंधी होती..ज्या विनाअनुदानित शाळेवर काम करत होतो. त्या शाळेला अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नव्हती ...एक तर बाबांची तब्येत खालावत जात होती...लग्नाचे वय मागे सरत होते अशावेळी मला जर ही संधी मिळाली तर माझे हे प्रश्न सुटणार होते.म्हणून मी संस्थेकडे मागणी सुरू केली. बदलीसाठी जोरकसपणे प्रयत्न करत होतो...घरात ही आता माहिती झाले होते की, माझी बदली झाली तर सगळं मार्गी लागेल. म्हणून त्यांनाही माझ्या बदलीचे आता वेध लागले होते. घरात बाबांच्या समाधानासाठी मी सांगत असे बदली झाली की, पगार सुरू होईल मग लग्न पण करू. अशी आशा त्यांना दाखवत होतो...पण माझं दुर्दैव की, वर्षामागून वर्षे निघून जात होती पण माझ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते.. आईने तर देवाला साकडेचं घातले होते, तिचे उपास तपास तर सुरूच होते.. माझ्या आक्काने तर एकही देव सोडला नाही..जाईल त्या ठिकाणी नवस बोलायची.. "पोराची बदली होऊ दे आणि पगार सुरू होऊ दे.". मी सुद्धा देवाकडे हेच मागणे मागी. 

                              एकदा गणपतीच्या मंदिरात जाऊन मी आराधना केली होती की, माझी बदली होऊ दे...आणि नमस्कार करून झाल्यावर तिथल्या पुजाऱ्याने आपसूकच मला एक नारळ दिला..मला वाटले खरंच देवाचा आशीर्वाद मिळाला. ते देवाचे फळ म्हणून आजही देव्हाऱ्यात पुजला आहे.. रोज देवाला प्रार्थना असायचीच.तो क्षण आठवला की,आत्मविश्वास वाटायचा.माझ्या प्रयत्नांना एक दिवस नक्की यश मिळेल असे वाटत राहायचे.. पण मला ठाऊक होतं जोपर्यंत माणसातला देव प्रसन्न होणार नाही, तोपर्यंत देवळातला देव ही काही करू शकणार नाही.. कारण माझी बदली करणं एका माणसातल्या देवाच्या हाती होतं... या बदलीच्या कामी गुरुवर्य सुनीलकुमार लवटे सर,इंद्रजित देशमुख काकाजी, डी.एस.पोवार साहेब, विश्वास सुतार साहेब, नामदेव पाटील सर,आर.के.पाटील सर अशी थोर मंडळी ही माझ्यासोबत होती...माझ्यासाठी त्यांनीही त्यांच्यापरीने होईल ते कष्ट उचलले. रात्रंदिवस मी बदलीच्या विचारात असे...कारण त्याशिवाय आता आयुष्य संपूर्ण अंधकारमय आहे असं वाटत होतं. त्यामुळे काहीही करायचे पण बाबांच्या हयातीत बदली करून एकदासा पगार सुरू होईल व लग्नही करता येईल... या अपेक्षेने मी जंग जंग पछाडले होते...जळी स्थळी फक्त बदली....एवढाच विचार माझ्या डोक्यात होता..जणू मला आता वेडंच लागायचे बाकी राहिले होते. या विचाराने दोन वेळा मी डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलो होतो. पण परमेश्वर माझ्या संयमाची, माझ्या सहनशीलतेची प्रयत्नांची कसोटी पहात होता म्हणायचा..

                        दरम्यान कोरोनाचा काळ आला.जिथं जगच थांबलं तिथं.सगळंच थांबलं..तो काळ तसा निघून गेला..दुसऱ्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. या वर्षी तर बाबांचं दुखणं जास्त वाढत गेलं. त्या वर्षीच्या सुरुवातीपासून बाबा सारखे अंथरुणाला खिळून होते. गुढीपाडव्याच्या सणावाराच्या दिवशी देखील बाबा झोपूनचं होते..तशी आता वारंवार तब्येत खालावायची..आणि आता हे नित्याचं झालं होतं. त्यामुळे विशेष काही वाटत नव्हतं. घरीच औषध पाणी सुरू होतं. मे महिना आला. शाळेला सुट्टी होतीच. मी घरी जाण्यासाठी मुख्याध्यापकांना विचारले असता, कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत असे त्यांनी सांगितले. मला पुढे जावे की मागे रहावे तेच कळेना. इकडे तर बाबांची तब्येत जास्त खालावत चालली होती. बाबा झोपूनच होते. अंथरुणातंच लघवी वैगरे व्हायची आई ते अंथरून रोज धुवायची.. जेवण सोडूनच दिलेले. एखाद्या वेळेस पहाटे चार-  पाच वाजता उठायचे  त्यावेळी आई बळेच्याने तरवणी पाजायची...शेवटी मी धाडस करून घरी येण्याचा निर्णय घेतला.  

             त्या दिवशी कोल्हापूरहुन गारगोटीत आलो. कोरोना सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घेतली आणि लागलीच घरी न जाता खबरदारी म्हणून अक्काच्या गावी आडोलीला येऊन राहिलो. दहा बारा दिवसाने मी व आक्का घरी गेलो त्यावेळी फारचं उशीर झाला होता.  बाबा अंथरुणाला खिळलेले होते.. अंगाचा सापळा झाला होता. तरीही आक्काने खायला घातले की खायचे...भिंतीला तक्या देऊन बसवले की बसायचे. पण तब्येत फारच अशक्त झाली होती. घरच्या घरी जे खाईल ते घालत होतो.. आता या वातावरणात बाहेर दवाखान्यात कुठे न्यायचे हा प्रश्न होता...पण घरात तर ती अवस्था बघवत नव्हती शेवटी काय व्हायचे ते होवो.  एकदा डॉक्टरांना दाखवायचे या ठाम निर्णयनाने एका सायंकाळी बाबांना घरातून बाहेर काढले. गारगोटीतल्या गोंजारे दवाखान्यात आणले..जवळ पैसे नव्हते. सांगलीचे प्रमोद पाटील सर यांनी उपचारासाठी पैसे पाठवून दिले.. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, पेशींचे प्रमाण कमी झाले आहे. औषधोपचार केल्यानंतर कमी येईल.. आम्हांला हायसे वाटले... ऍडमिट काही करून घेतले नाही.

               दवाखान्यात पुन्हा दाखवण्यासाठी जवळ अंतर पडेल म्हणून माझी दुसरी बहिण जयश्रीच्या घरी बाबांना घेऊन गेलो. तिथे बाबांना ठेवले.. सकाळ संध्याकाळ आई आणि मी बाबांना जेवण भरवायचो.काही वेळा जबरदस्तीने भरवावे लागे. मी तोंडात बोट घालून दात स्वच्छ करायचो आणि मग आई नी मी अंघोळ घालायचो. असे दोन तीन दिवस गेले. एके सकाळी अंघोळ घालण्यासाठी बाबांना वर उचलले आणि कंबरेतला करदोरा गळून 

खाली पडला. हे कशाचे सूचक होते..?  तसेच उचलून बाहेर नेऊन बाबांना अंघोळ घातली. जेवायला घालून गोळ्या दिल्या. भिंतीला तक्क्या देऊन बसत असायचे.. सर्व काही ठीक चालले होते. म्हणून मी औषध गोळ्या कसे द्यायच्या हे बहिणीला समजून देऊन गावी आलो.. त्या संध्याकाळी बहिणीचा फोन आला बाबांना ताप आला होता.  मी सांगितल्याप्रमाणे तिने गोळ्या दिल्या. यात काही विशेष वाटले नाही कारण वरचेवर असा ताप येई...

            दुसऱ्या दिवशी मला जायचेच होते. तोपर्यंत नऊ साडेनऊ वाजल्यापासून फोन यायला सुरुवात झाली बाबांना जास्त झालंय लवकर ये.. मी गडबडीने बाहेर पडलो. दरम्यान मला आठवतेय या मनःस्थितीतही माझ्या बदलीच्या अनुषंगाने एका सरांशी मी चर्चा करीत होतो. कारण मला एक आशा होती की, यदाकदाचित बदलीचे काय झाले तर बाबांना तेवढेचं समाधान. पण आता पुढे काय वाढून ठेवले आहे तोपर्यंत तरी मला कल्पना नव्हती. लागलीच प्रवीणला घेऊन गारगोटीत पोहोचलो. सारखे फोन येत होते आणि मग मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकली की, काहीतरी अघटित घडलंय.  किंबहुना वाईट घटनेची माणसाला आपोआपच जाणीव होते की काय ..? असा तो क्षण मी त्यावेळी अनुभवला. पण मनाची मी तयारी केली. काहीही घडो आपण ठाम राहायचं... कारण माझ्या डोळ्यासमोर आई, दोन बहिणी दिसत होत्या. मनाला कणखर करूनच मग पुढची वाट धरली. 

बहिणीच्या घराजवळ जायला रडारड ऐकायला आली. सरळच आत गेलो.. बाबांना निजवलेलं वर चादर टाकलेली, बाजूला आई रडत होती, पायाशी बहीण आक्रोश मांडत होती. मी बाबांच्या जवळ गेलो चादर मागे ओढली. अर्धउघडे असलेले डोळे आणि निष्प्राण चेहरा पाहून मी स्तब्ध झालो..पहिल्यांदाचं असा निपचित पडलेला बाप पाहात होतो. बापाचे ते निर्जीव अचेतन मुख पाहताना माझ्या मनाची झालेली अवस्था शब्दांत नाही व्यक्त करता येणार. वेदनेने ठसठसणाऱ्या कुडीतून बापानं सुटका करून घेतली होती. आम्हांला पोरकं करून बापानं कुठल्या कुठं पलांग मारली होती. आई आकांत मांडत बोलत होती.. "देवानं तोंडं काढून घेतलं काही बोलला नाही.. मनातलं सांगता आलं नाही.."

पायस्थ्याशी बहीण .".मला बाबा पाहिजे...मला माझा बाबा आणून दे.." म्हणत टाचा घासत होती. एका बाजूला आई...दुसऱ्या बाजूला बहीण... आणि खाली बाप निपचित पडलेला...माझी अवस्था मी कुणाला सांगायची..? मला अश्रू ढाळण्याचा अधिकार नव्हता...बापपणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवून बाप निघून गेला होता.  एकदा आईला जवळ घेत होतो तर एकदा बहिणीला जवळ घेत होतो... कसा बसा आधार देत होतो.  पुढ्यात आमच्या आधाराचा वड खाली कोसळला होता.

         बाप गेला शेवटपर्यंत..बोलता आलं नाही..मनातलं काही सांगता आलं नाही...मनातलं सगळं मनात राहून गेलं... मनातली घुसमट मनातचं ठेवून बाप गेला...पण बापाच्या मनातल्या दोन अपूर्ण ईच्छा होत्या त्या बाप मागे ठेऊन गेला होता..एक माझा पगार आणि दुसरं लग्न...ज्या लेकासाठी संपूर्ण हयात बापानं कष्टत घालवली.. डोळ्यांनी दिसत नसताना लोकांच्या पायातली चप्पलं शिवून मला शाळा शिकविली..अंधारलेल्या डोळ्यांत बापानं मी शिक्षक होण्याचं  स्वप्न सजवलं..ते डोळ्यांतचं मुजलं.. ती नियती तरी इतकी क्रूर कशी.?.ज्या बापाच्या वाट्याला सुरुवातीपासून आंधळेपणा आला...डोळ्यांनी हे जग नीट धड पाहू शकला नाही..त्या बापाची अखेर वाचाही काढून घेतली.. शेवटपर्यंत माझा बाप बोलू शकला नाही....नीट ऐकू शकला नाही.. एवढा कसला भोग माझ्या बापाच्या वाट्याला नियतीनं दिला....जो बाप पंढरीचा वारकरी होता, धडपडत वारी करायचा..शेवटी त्या पांडुरंगालाही माझ्या बापाची दया आली नाही...मला आजही प्रश्न पडतो जर परमेश्वर असेलच या जगात तर माझ्या भोळ्याभाबड्या ,दीनदुबळ्या गरीब, प्रामाणिक कष्टकरी बापाच्या वाट्याला इतकी घोर विटंबना,यातना,वेदना का दिली असावी..?

                   बाप गेला.... माझा आधारवडचं गेला...बाप गेल्याचं दुःख उरात ठेवून पंधराव्या दिवसापासून बोडक्या डुईनं मी बाहेर पडलो ते एका निर्धारानं. ते म्हणजे बदली. पुन्हा बदलीच्या प्रयत्नांचा प्रयास सुरू झाला. दिवस मागे पडत होते.  बाप गेल्यानंतरचा काळ तर माझ्यासाठी अधिकच कठीणाईचा होता. मागे आई एकटीच गावी असे. मी इकडे असा. शनिवारी कधी गावी निघालो की आपोआपच डोळे भरून येई.. या अगोदर माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला बाप होता.. आता बापसारखी वाट कोण बघेल माझी..? माझ्यासाठी घालमेल कोण करून घेईल..? मी खोलीतच रडून मोकळा होई आणि मग घरी जाण्यास बाहेर पडे. 

या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते माझे गुरुवर्य थोर साहित्यिक सुनीलकुमार लवटे सर. सरांच्या घरी मी वरचेवर जात असे, माझं दुःख मी व्यक्त करीत असे. सरांना माझी सगळी परिस्थिती ठाऊक होती. एकीकडे बाप गेल्याचं दुःख तर दुसरीकडे पोटाच्या भाकरीचा हा संघर्ष. मी पूर्णतः खचून गेलो होतो. आणि या काळात मला सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे लवटे सरांचा.अखेरच्या काळात लवटे सरांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनाही मर्यादा होत्या. एक दिवस याबाबत चर्चा करताना लवटे सर निर्वाणीचे बोलले, "किरण तू आता काही तरी पर्याय बघ...तुझी बदली होईलच ह्या विश्वासावर थांबू नकोस." सर असे म्हणाले आणि माझं अवसानच गळालं. सर बोलले आणि माझा धीरच चेपला. काय करावं कळत नव्हतं. सगळी सैरभैर अवस्था झालेली.मी त्यांच्या बोलण्यावर विचार केला. सरांचे अगदी बरोबर होते.. आता किती दिवस अधांतरी दिवस काढायचे. आणि मग मी कळंबा परिसरात क्लासेस सुरू करण्याचे ठरविले. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. क्लासेसाठी जागा ही बघितली. पण मूळचा बदलीचा विषय काही मनातून जात नव्हता. वाटायचं आता पर्यंत बदलीसाठी एवढी धडपड केली, एवढे प्रयत्न केले ते असेच सोडून द्यायचे का..? प्रयत्न सोडून देणे मला चुकीचे वाटायचे...आपल्या हातात काय आहे...शेवटी प्रयत्न. मग सगळंच सोडून देण्यापेक्षा आपण तेवढे तरी करू शकतो.. आपली हार निश्चितच दिसत होती.  अशावेळी आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं मी ठरवलं होतं. आणि मग दोन पर्याय घेऊन प्रयत्न करू लागलो.. एकबाजूला क्लासेसचा विचार आणि दुसऱ्या बाजूला बदलीचा. 

 मी त्या काळात पहाटे पावणेपाचला व्यायामासाठी बाहेर पडत असे. तेव्हां त्या वेळेपासून बदलीच्या विचारांचे चक्र मनात फिरत असे. रणनीती आखीत असे. एकीकडे आठवणीतला बाप आठवत असे आणि दुसरीकडे बदलीचे  विचार सोबत घेऊनचं चालत असे. कळंबा तलावाच्या भिंतीवरून पळत जाताना त्या पहाटेच्या गर्भात बाप मनात जिवंत होई..बाप मला काहीतरी सांगतोय असे वाटे....बाप मला म्हणतोय.."लेका आता रडायचं नाही..लढायचं." आणि हेच वाक्य माझ्या मनात पक्कं ठसलं.. पुन्हा नव्याने लढण्याची मला ऊर्जा मिळे. आणि आता बाप आठवून रडायचं नाही तर आता लढायचं.. बापच माझ्या लढण्याची आता प्रेरणा झाला होता...भलेही मेलेली माणसं बाहेरच्या जगातून जात असतील पण आतल्या जगात ती जिवंत असतात...माझा बाप माझ्या मनात जिवंत होता.. माझ्याशी बोलत होता. मला आधार देत होता. मला लढ म्हणत होता.

  ....शेवटी हारण्याची शक्यता वाटत असताना मी आणखीन एक पाऊल टाकलं होतं.. आणि अखेर अखेरच्या प्रयत्नांनी माझी यशाची वाट मोकळी केली म्हणायला हरकत नाही...यश मिळो अथवा न मिळो शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे माझ्या हातात होतं.... शेवटी  माझा माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता आणि शेवटपर्यंत चिकाटी न सोडल्यामुळे यशाची पहिली पायरी मी चढलो.  ज्या क्षणांसाठी दिवस आणि रात्र एक झाली होती. त्या क्षणांची मला चाहूल लागली. बदलीचे संकेत दिसू लागले. यश मला खुणावू लागलं. इतक्या वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळाला. बदलीच्या हालचालींना वेग आला आणि ३१ मे २०२१ रोजी बाप गेला..त्याच्या बरोबर एक वर्षाने माझी बदली झाली. आणि १ जून २०२२ रोजी मी अनुदानित शाळेत हजर झालो. बाप जाण्याच्या आणि बदली होण्याच्या या घटना किती जवळच्या होत्या. बाप जाताना मला हा आशीर्वाद देऊन गेला....

         एका बापाकडे कसा दूर दृष्टीकोन असतो त्याचे हे उदाहरण...माझा बाबा अडाणी होता तरी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. डी. एड केल्यानंतर मी बी.एड केल्याचा फायदा म्हणून त्या पदवीच्या आधारावर माझी अनुदानित शाळेत माध्यमिककडे बदली झाली. आज बाप माझा जिवंत नाही पण आज बाप नसताना त्यावेळचा बापाचा तो दृष्टीकोन आज माझ्या जीवनाची दिशा बदलून गेला. मी शिक्षण घेऊनही शिक्षणाचं महत्व ओळखलं नव्हतं. मी बी.एड करायचे नाकारत होतो.. आणि बाप माझा काही शिकलेला नव्हता तरी शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी मला बी एड करायला लावलं...म्हणून तर माझी बदली मला करून घेता आली. याचा अर्थ  बाप नेहमी आपल्या लेकराचा  चार पाऊले पुढे जाऊन विचार करीत असतो. आज माझी बदली झाली माझा पगार सुरू झाला याच्या मुळाशी बापाने त्यावेळी करून ठेवलेला तो विचार होता. 

       माझ्यासाठी मागे सुखाची वाट दाखवून बाप पुढे कष्टत निघून गेला. बाप जिवंत असताना बदलीसाठी खूप धडपड केली पण बाप गेल्यावर ती फळाला आली. माझा पगार बघणं त्याच्या नशिबात नव्हतं माझ्या बदलीच्या अगोदरचं बापाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.. शेवटी हेच प्रारब्ध असावं. 

               बाप धडपडत त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला जायचा. बापाच्या अंतसमयी मी त्या पांडुरंगाला फार बोल लावले...अरे विठ्ठला कसला न्याय दिलास माझ्या बापाला.? तुझी माळ गळ्यात घातली. पंढरीचा वारकरी बाप झाला. पडत झडत तुझी वारी केली..तुझ्या त्या भक्ताचा माझ्या बापाचा असा का शेवट केलास...? हाच सवाल मी त्याला आजही विचारतो....पण एकीकडे आता वाटतं. त्यानं एका बापाची पुण्याई एका लेकाच्या वाट्याला दिली असावी... कुणाच्या रूपातून परमेश्वर आपला साक्षात्कार घडवून आणेल कोण जाणे..? कारण माझ्या बदलीच्या काळात असा एक परमेश्वर मला भेटला. पंढरपूरच्या विठ्ठलाने आपल्या आंधळ्या भक्ताच्या लेकरासाठी संत एकनाथाला पाठवून द्यावा तसा एकनाथ आंबोकर साहेबांसारखा सज्जन माणूस शिक्षणाधिकारी म्हणून मला लाभला. 

" माझिया जातीचे मज भेटो कोणी.." या प्रमाणे माझी चिंता हरणारा, दुःख मागे सारणारा , माझ्या संघर्षाला न्याय देणारा माझा सुखकर्ता दुःख हरता माझा म्हणावा असा माणूस मला भेटला. अगदी जिव्हाळ्याने त्यांनी मला समजून उमजून घेतले. माझी परिस्थिती त्यांना ज्ञात झाली. माझा बदली प्रस्ताव दाखल झाला आणि आंबोकर साहेबांच्या स्वाक्षरीने मला मान्यता मिळाली..पण अजूनही काही विघ्ने पार करावयाची होती. बदली मान्यता मिळूनही शालार्थ आय डी मिळण्यासाठी पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या. संघर्ष काही संपत नव्हता अखेरच्या काळात तर तो माझी सत्वपरिक्षाचं बघत होता. वर्ष सरत आले तरी पगार होत नव्हता. पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता असा एक पाठीराखा. तो पाठीराखा म्हणजे आंबोकर साहेब.

एकेकाळी त्या आयाबाया म्हणत होत्या. ते किती खरं होतं.."आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखी..."हा परमेश्वरचं बापाच्या माघारी एक बाप होऊन पाठराखण करीत होता. शालार्थ आय डी मिळेपर्यंत आंबोकर साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून हे काम करवून घेतले...आणि एके दुपारी डी.एस.पोवार साहेबांचा फोन आला. आणि ती आनंदाची सुवार्ता कानी पडली " किरण तुझे शालार्थ आय डी चे काम झाले." मन आनंदून गेले.घरात बातमी सांगताच साऱ्यांना आनंद झाला. सुटकेचा एक दीर्घ निश्वास टाकला. 

               संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.हरिभाऊ पुंडपळ साहेब, सचिव श्री. सदानंद पुंडपाळ सर,संस्था संचालक श्री. शिवाजीराव पन्हाळकर सर, श्री. दशरथ अस्वले सर तसेच जि. प. कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी आदरणीय एकनाथ आंबोकर साहेब , शिक्षण उपसंचालक महेश चोथे साहेब, डी.एस.पोवार साहेब आणि शिक्षण निरीक्षक आर. जी. चौगले साहेब,मुख्याध्यापक शरद पाटील सर यांच्या योगदानातून अखेर माझ्या संघर्षगाथेचे यशोगाथेत रूपांतर झाले. 

               मी मागे म्हटलं ना..बाबा जाण्याच्या आणि माझी बदली होण्याच्या घटना किती जवळच्या आहेत. आणखीन एक म्हणजे बदली होऊनही पगार सुरू होण्यास  वर्षभर विलंब लागला आणि बाबा गेल्याच्या एका वर्षाने बदली आणि बरोबर दुसऱ्या वर्षी पगार सुरू होत आहे. 



हा पगार म्हणजे आमच्या सर्वांच्या आयुष्यात बारा वर्षांनी आलेला असा एक यशस्वी क्षण आहे..की डी.एड झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप शिक्षक होण्यासाठी झुंज दिली.. माझे बाबा, माझी आई..थोरली बहीण आक्का, जयश्री या सर्वांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला.आपलं कष्टाचं, त्यागाचं, संघर्षाचं समर्पण दिलं त्याचं फळ म्हणजे हा यशाचा क्षण आहे...आई बाबाने तर माझ्यासाठी आयुष्य वेचलंचं पण माझ्या बहिणीनी देखील माझ्यासाठीही खूप मोठा त्याग केला आहे. माझ्यासाठी लहान वयात हातात खुरप घेऊन अखंड राबणं त्यांच्या वाट्याला आलं.  आज त्यांच्या हातात असलेलं खुरपं ही त्या त्यागाची निशाणी आहे. 

           आज मागे वळून पाहताना मी विचार करतो..बारा वर्षांत भलेही मला चार पैसे नाही कमवता आले, पण या काळात मला माझी म्हणणारी अनेक माणसे भेटली.. एकटा जीव मध्ये दादा कोंडके म्हणतात " मला या जन्मी पैसा, प्रसिद्धी, संपत्ती,प्रतिष्ठा खूप मिळाली पण माझी म्हणणारी माणसं मला मिळाली नाहीत पुढील जन्म मिळाला तर मला काही नको पण माझी म्हणणारी मला माणसं हवीत."  म्हणून पैसा किती कमावला यापेक्षा आपली म्हणणारी माणसं किती मिळाली याला मी नेहमी महत्व देत आलो. या माझ्या कठीण काळात मला माझ्या माणसांनी खूप आधार दिला..मला जपलं.. आणि हीच माझ्या या काळातली खरी कमाई आहे.तीच माझी खरी शाश्वत लाखमोलाची संपत्ती आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणाईत राहणेच पसंद करेन.

ज्या क्षणासाठी जगण्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला तो क्षण आज आला...एका तपाच्या प्रतीक्षेनंतर आणि कठोर संघर्षातून त्या क्षणाने आज आमच्या आयुष्यात पदार्पण केले आहे...ही सुवार्ता मला पहिल्यांदा सांगावीशी वाटेल ती माझ्या बाबाला..

 बाप सारखा विचारायचा कधी सुरू होणार पगार..? कधी सुरू होणार..?

आता ऐकायला येशील का रे..?

    "बाबा....पगार सुरू झाला ."

ऐकतोयस ना..? 

बाबा पगार सुरू झाला...

हेच ऐकायसाठी अधीर झालेला असायचास ना.

पण हे ऐकायच्या अगोदरच निघून गेलास...

बाबा पगार सुरू झाला..म्हणून साद घालून कुणाला रे मी आता आनंदून सांगायचं... 

कुणाच्या मिठीत माझा आनंद साजरा करायचा...

तुझ्या अंधारलेल्या डोळ्यांत मला आज दाटलेले दोन आनंदाश्रू बघायचे होते रे..

तुझ्या तोंडातून माझ्यासाठी दोन कौतुकाचे शब्द ऐकायचे होते.

बाबा आज तुला कडकडून मिठी मारायची होती ..

बाबा...

खूप पोरकं वाटतं रे तू गेल्यापासून... 

तू गेल्यापासून नुसता तुझ्या आठवणींनी दीनवाण्यासारखा फिरतो.

बाबा तुझ्या त्या दोन प्रश्नाची उत्तर तेंव्हा माझ्याकडे नव्हती मी निरुत्तर असायचो.

.. ती आज आहेत...

पण ती उत्तरं ऐकायला तू नाहीस.

गरिबीच्या वैराण वाळवंटात आई बाबा तुम्हीं हे रोपटं लागलात पण त्याच्या सावलीत बासायचं ,त्याची गोड फळं चाखायचं बाबा तुझ्यात भाग्यात नव्हतं.

                  आयुष्याच्या रणांगणावर अंधारल्या डोळ्यांनी काळोखाच्या खाईत स्वतःला लोटून देत शेवटपर्यंत बाप शर्थीने लढला .येणाऱ्या प्रत्येक संकटांना हिंमतीने तोंड देत राहिला. जगण्याची फार मोठी ईच्छाशक्ती मनात होती माझ्या बाबांची.. अजून जगायचं होतं..ही ईच्छा बाबांचे शेवटचे मरण मुख पाहताना मला स्पष्टपणे जाणवत होती. अखेर त्या जर्जर रोगांनी शरीरावर विजय मिळवला खरा..पण खंबीर मनाने, हिमतीने,जिद्दीने ,स्वाभिमानाने आणि कष्टाने आयुष्याशी दिलेली निकराची झुंज. त्या झुंजार बापानेच हा यशाचा पाया रचला.  म्हणून आज आमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आजचा क्षण आला...पगार सुरू झाला पण बाप निघून गेला. गड आला पण माझा सिंहचं निघून गेला..

- किरण सुभाष चव्हाण.

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

श्री. विनायक पाटील सर ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत त्यानिमित्त...

 



शांत शिस्तप्रिय,मायाळू  विद्यार्थीप्रिय गुरू श्री. विनायक पाटील सर..


              काही माणसं शांत, संयमी आणि आपल्या नेमून दिलेल्या कार्याकडे प्रामाणिक पणे वाटचाल करणारी असतात. ती बोलकी नसतीलही पण त्यांचे काम मात्र बोलके असते. त्यांच्या मनाची ऊर्जा, एकाग्रता ही त्यांनी सातत्याने आपल्या कामाप्रतिचं व्यतीत केलेली असते. असेच एक शांत, संयमी,मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य विनायक पाटील सर आज ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.


                   अगदी भर उन्हात स्वतःच सेवानिवृत्त समारंभाची पत्रिका घेऊन सर माझ्या घरी आले.पत्रिका हातात देत आग्रहाचं निमंत्रण दिलं तेंव्हा सहजच माझे हात सरांच्या पायाशी गेले. सरांचे चरणस्पर्श केले. सरांना बसण्याची विनंती केली पण घाईगडबडीत उभ्या उभ्याच सर आमंत्रण देऊन घरातून बाहेर पडले. सर निघून गेले आणि हातात निमंत्रण पत्रिका घेत..न्याहाळू लागलो ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.. त्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील विद्या मंदिर पांगिरे शाळेतील सरांचा सेवा काळ नजरे समोरून तरळू लागला. मराठी शाळेच्या त्या भूतकाळात मन डोकावू लागलं.  त्यावेळी आम्हीं मराठी शाळेत शिकत असू. एका शिक्षकाने एकच वर्ग सांभाळायचा असल्याने सरांचा कधी आमच्यावर वर्गावर तसा तास झाला नाही. परंतु सरांचे बोलणे,चालणे, शिकवणे एकंदरीतच त्यांच्या त्या व्यक्तित्वाची छाप तशी लहानपणापासून आमच्या मनांवर पडलेली आहे. स्कॉलरशिप परीक्षेत सरांचा हातखंडा. त्यामुळे परिसरातल्या गावचे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेत यायचे. पूर्वीपासूनच पांगिरे गावची मराठी शाळा स्कॉलरशिप परिक्षेत अव्वल ठरलेली आहे. आणि त्यामध्ये सर्व गुरुजनांच्यासह विनायक पाटील सरांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आहे. मला अजूनही आठवतंय सरांचा मुलगा स्वप्नील  हा देखील त्यावेळी शिकण्यासाठी मांगनूर हुन येत असे. सोबत अभिजित नावाचा सुद्धा एक मुलगा असायचा ही दोन्ही मुले हुशार व संस्कारक्षम होती. शिक्षकांची मुले कशी असतात याचं एक आदर्श उदाहरण आमच्या डोळ्यासमोर असायचं.

सरांना मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे.  शिडशिडीत अंगकाठी मितभाषी साधा सरळ स्वभाव, विद्यार्थ्यांप्रति ओलावा, शिकवण्यातली तळमळ, बोलताना चेहऱ्यावर संयमी स्मितहास्य, अगदी साधा पेहराव जसे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे व्यक्तिमत्त्व. 

सरांचा अगदी साधा गरीब स्वभाव, कुणाच्या अध्यात ना मध्यात आपली शाळा विद्यार्थी आणि अध्यापन. एकंदरीतच त्यांनी आपले जीवन या तीन घटकांना वाहूनच घेतले होते. सरांची आणखीन एक आठवण सांगायची म्हणजे सरांची Hero Honda CD 100 गाडी आजही आठवते गाडीचा मराठीत नंबर होता ८०.  सरांच्या त्यावेळच्या या गाडीने सुद्धा आमच्या आठवणींच्या कप्प्यात आपले घर केले आहे. 

            मी लिहायला सुरुवात केली होती आणि  मी पहिलीच लिहिलेली कादंबरी 'नवसाचं पॉर' सरांना वाचायला द्यावीशी वाटली. कारण मला माहिती होते सर ती आवर्जून वाचून मला काही सूचना सुचवतील.  मी मोडक्या तोडक्या शब्दांत लिहिलेली ती कादंबरी सरांनी मनापासून वाचून पेन्सिलने   काही शब्दांना अधोरेखित करून बदल सुचवले होते. 'जीव भांड्यात पडला' या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ सरांनी त्यावेळी मला समजून दिला होता तो कायमस्वरूपी समरणात राहिला आहे. 

सरांच्या अंगी लिहिण्याची सुप्त आवड आहे पण अजूनही ती सरांनी गुप्तचं ठेवली आहे असं मला वाटतं. सरांच्या काही काव्यरचना आहेत कधी भेटले तर यासंदर्भात आवर्जून बोलतात. आता निवृत्तीनंतर सरांनी मुक्तपणे व्यक्त व्हावं अशी आशा करतो. 

                 क्वचित अलीकडे कधी शाळेत जाणे झाले तर मी पाहिलेलं आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना वर्गात पाठीमागे गोलाकार बसवून सर शिकवत असायचे. अगदी तल्लीन एकरूप होऊन विद्यार्थ्यांत मिळून मिसळून अध्यापन करायचे. मी हे चित्रं जवळून अनुभवले आहे त्यामुळे याचे वर्णन करताना मला आवर्जून साने गुरुजींची आठवण होते. मनात साने गुरुजींची छबी उभा राहते. जणू शांत, गरीब स्वभावाचे साने गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना सहजपणे ज्ञानाचे धडे देत आहेत असेच ते चित्र असायचे. शाळेसाठी केवळ दहा ते पाच या वेळेला बांधील न राहता सकाळ पासून  संध्याकाळी उशिरापर्यंत सरांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले म्हणून तर स्कॉलरशिप परीक्षेत शाळेने उज्ज्वल नाव कमावले. आजही त्यांचे विद्यार्थी, पालक नांव काढतात. सरांनी फक्त अध्यापनच केले नाही तर बाप हृदयाने त्यांची काळजी घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कोणत्या अडचणी आहेत,त्या समजून उमजून घेऊन त्या विद्यार्थ्यांना पालकांना विश्वासात घेऊन सरांनी मार्गदर्शन केले आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या कारणांने अभ्यासात मागे राहिला तर वैयक्तिकरित्या त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याला सर्वांबरोबर घेऊन जाण्याची तळमळ सरांची असायची.

म्हणून तर ते विद्यार्थी आज म्हणतात की, आज आम्हीं जे काही आहोत ते पाटील सरांच्यामुळे आहोत. आमच्या यशाची खरी प्रेरणा म्हणजे आमचे पाटील सर. म्हणून तर एक शिक्षक या नात्याने पलीकडे जाऊन बापाची माया,काळजी या शिक्षकाने वाहिली आणि आजही त्याच अंतकरणाने विचारपूस करतात म्हणून तर त्यांचे विद्यार्थी आणि आईवडील सरांचे आवर्जून नांव काढतात.

     बस याहून एका शिक्षकाने काय कमवायचं असतं..

आज त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचं जीवन यशस्वी झालं त्या पाठीमागे सरांचे प्रामाणिक कष्ट आहेत.

      आजपर्यंत सरांना किती आदर्श पुरस्कार मिळाले आहेत माहिती नाहीत. आणि तो मिळावा अशी अपेक्षाही सरांनी कधी केली नसेल. कारण हयातभर त्यांनी आपल्या ज्ञानातून एक असा आदर्श निर्माण केला आहे की तो कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. सरांनी घडवलेला इथला प्रत्येक विद्यार्थी हा सरांचा पुरस्कार आहे. आणि मी एक सरांचा विद्यार्थी म्हणून या निमित्ताने सांगतो की सर तुम्हीं विद्यार्थ्यांच्या साठी इतक्या प्रामाणिकपणे राबत आला आहात की आम्हीं विद्यार्थ्यांनीचं आमचा एक आदर्श शिक्षक हा पुरस्कार मनातूनच आपल्याला बहाल केला आहे. 

तुम्हीं सर आमच्यासाठी खूप मोठे आदर्श व्यक्तिमत्त्व आहात. 

ज्यांच्या शिकवणीतून, संस्कारांतून जीवनाची वाट चालण्याचे बळ आम्हांला मिळत राहील.

. असो...

आपलीच एक कविता आहे 


आभाळ सारं भेदायचं असतं..


दुबळ बनून पाखरानं घरट्यात कधी राहायचं नसतं.

पंखाच्या बळावरती आभाळ सारं भेदायचं असतं.

आभाळाला भेटलं तरी मागे वळून पाहायचं असतं.

जन्म घेतलेल्या घरट्याला पाखरांनं कधी विसरायचं नसतं.


अशी आभाळाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणाऱ्या आपल्यासारख्या गुरुवर्यांना या सेवानिवृत्त समारंभाच्या निमित्ताने मी आभाळभर शुभेच्छा देतो. आज आपण ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहात.. निवृत्ती हे निमित्त आहे आपल्यासारखे शिक्षक हे अखंडपणे कार्यरत असतील. यात शकांच नाही. आपल्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा..! आपणास उदंड, निरोगी, निरामय ,समृद्ध व संपन्न असे दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरणी प्रार्थना...


जय हो...! मंगल हो...!!


आपलाच...

 एक विद्यार्थी

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

दहावी सदिच्छा समारंभ | आकाशी झेप घे रे पाखरा.


 आकाशी झेप घे रे पाखरा.


              अखेर तो दिवस आलाच. बाळांनो... घालमेल होत असेल ना जीवाची आतल्या आत. होणारच हो सहाजिकच आहे. आई बापाच्या घरात मायेने वाढलेली ,हसरी खेळकर, बागडणारी लेक जशी मोठी झाल्यावर सासरी जाताना, तिचा पाय घराबाहेर निघता निघत नाही. हळव्या क्षणांच्या गोड आठवणीं पायगुंता होऊन पुढे जाऊ देत नाहीत. अगदी तशी तुमच्या मनाची  आज अवस्था झाली आहे समजू शकतो बरं आम्हीं. ज्या उंबरठ्याच्या आत तुम्हीं ज्ञान घेण्यासाठी यायचात. तो उंबरठा ओलांडून ते ज्ञान घेऊन बाहेरच्या जगात तुम्हीं चाललात. आज तुम्हीं देहान इथून बाहेर जाल पण मनानं या वर्गातच रेंगाळणार आहात काही दिवस तरी. ज्या बेंचवर बसायचात, प्रत्येकाचा आपापला बेंच आणि सोबती ठरलेला असायचा. कधी कधी माझा बेंच म्हणून हुज्जत घालायचात एकमेकांच्यासोबत. तो बेंच आज तुम्हांला सोडून जावा लागणार. ज्या बेंचवर एकत्र बसायचात ते मित्र उद्या कुठल्या कुठे असतील, उद्या त्यांच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या असतील..

                      सकाळची नेहमी प्रार्थनेने सुरुवात व्हायची. तालासुरात ढोलाच्या ठेक्यावर सर्वांच्यासोबत प्रार्थना म्हणायाची. रोज एक वेगवेगळी प्रार्थना. कधी वर्गात तर कधी त्या उघड्या माळावर निलगिरी झाडांच्या मस्तपैकी सावलीत. खाली जमीन वर आकाश किती सुंदर वाटायचं ना..? परिपाठ असला तर काय तारांबळ होई. सुविचार, पंचांग, बोधकथा, बातम्या तयारी करावी लागे. प्रश्न विचारल्यावर उत्तरं देण्यासाठी आता मला उठवतील का सर म्हणून मनावर दडपण येई. आता उद्यापासून नेहमीप्रमाणे घडाळ्यात आकरा वाजतील परंतू हात जोडून प्रार्थना म्हणण्यासाठी आम्हीं एकत्र येणार नाही. ना आम्हाला आता कोणी प्रश्न विचारेल. 

             वर्गात बसला की फळ्याच्या एका कोपऱ्यात लिहिलेल्या विषयांच्या वेळापत्रकाकडे लक्ष जायचं. विषयानुसार त्या त्या शिक्षकांचे तास. भरकटणारं मन गोळा करून समोरच्या शिक्षकांचं लक्षपूर्वक ऐकायचं. ज्ञान ग्रहन करायचं. दहावीचं वर्षं काळजीपूर्वक लक्ष द्या अभ्यास करा. हे वरचेवर सांगणं झेलायचंच. म्हणे शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं. 

इथं तर आमचं दररोजचं युद्ध चालू होतं.मनातल्या मनात. घरात गेलं अभ्यास शाळेत गेलं अभ्यास..नुसता अभ्यास नी अभ्यास. कधी सुटका व्हायची या अभ्यासातून. असं कधी कधी वाटायचं.  पण आता  नीट लक्ष द्या रे,अभ्यास करा रे...असं उद्यापासून कोण म्हणेल दटावून आम्हांला. 

            दुपारच्या वेळी दोनची मधली बेल कधी होतें याकडे मन आस लावून बसायचं. दोन वाजताचे दोन टोल झाले की, मनात लडू फुटायचे. आईने दिलेला डबा उघडायचा मित्रमैत्रिणीच्या संगे बसून हसत खिदळत खाताना कधी संपून जायचा कळायचं नाही. मग टीवल्या बावल्या चालायच्या हेची कळ काढ, त्याची टर उडव, उगाचच कुणाच्या पाठीत मारून पळ, मग चालू व्हायचा व्हरांड्यातून पाठशिवणीचा खेळ. कुणाचा कुणाला नसायचा मेळ,दंगा-मस्ती उरिपोटी हसणं खिदळणं कसं सगळं मनासारखं. अशी आमची दुपार एकत्र रंगून जायची. आता उद्याच्या दुपारी आम्हीं असू का हो एकत्र. असंचं पुन्हा घडून येईल का सगळं. नेहमीप्रमाणे दुपार होईल. पण कुणाचा कुणाला पत्ता नसेल. 

           चार वाजल्यानंतर असायचा आमचा एक आवडीचा तास. आमच्या हक्काचा असायचा तो पी.ई चा तास. जर का पी.ई चा तास नाही मिळाला तर आमच्यावर घोर अन्याय केल्यासारखं वाटायचं त्यामुळे शक्यतो असा अन्याय आम्हीं होऊ द्यायचो नाही. आणि मग मुलं कब्बडी खेळायची तर मुली शाळेमागच्या टेकडीवर जाऊन दगडावर बसून छानपैकी मजा करी. पाच वाजता शाळा सुटायची घंटा  वाजली की, सगळे वर्ग एकत्र येऊन आम्हीं वंदे मातरम म्हणायचो आणि दिवसाची सांगता व्हायची, आमच्यातील उद्याच्या परिपाठाची काही मुलं मागे राहून फळ्यावर सुविचार,तासिका लिहून उद्याच काम आजच उकरून घ्यायचे.त्यांना घरला जायची घाई नसायची फलकलेखनात ते गुंतून जायचे. मुलींचा नंबर असेल तर खुप छान फुले,वेलीदार नक्षी काढून फळ्याचा कडकोपरा साजिवंत करायचीत. जशी एखादी मुलगी शेणसडा टाकून रांगोळी काढून आपल्या घराचं अंगण कसं देखणं टापटीप बनवते तशा या मुलींना फळा म्हणजे अंगणचं वाटायचं. आपला फळा रंगीबेरंगी खडू वापरून सजवायच्या,धजवायच्या. सुविचार लिहायच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात कुणाचा वाढदिवस असेल त्याचं सुंदर हस्ताक्षरात नांव कोरायचं. 

आता उद्या नेहमीप्रमाणे पाच वाजतील आणि आम्हांला शाळेची घंटाचं ऐकू येणार नाही. ना फळ्यावर हे सगळं लिहिण्याची धांदल करावी लागणार. कुणाचा वाढदिवस असला तर प्रार्थनेला सर्व विद्यार्थी शुभेच्छा द्यायचे, बर्थ दे गीत म्हणायचे, कितवा वाढदिवस तितक्या टाळया वाजवून शुभेच्छा द्यायचे..इथून पुढे वाढदिवस होत राहतील पण असा अनोखा वाढदिवस साजरा होईल का पुन्हा..?

                      या शाळेतील आणखीन एक आमची आवडती व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरव सर मितभाषी, शांत स्वभाव परंतु सर्वांच्यावरती माया करणारे.जिथं कमी तिथं आम्हीं अशा गुरव सरांच्या शिवाय आमची ही शाळा आम्हाला पूर्णच वाटत नसे.

                           शाळा सुटली की धनाजी काका गाडी घेऊन तयार परगावचे विद्यार्थी गाडीतून यायचे जायचे.. येताना जाताना केलेल्या त्या गंमती जमती सोबतीने केलेला तो रोजचा प्रवास ती वाट ती मागे सरणारी झाडे झुडुपे,गाडीतील वेगळीच मज्जा. आता गाडी रोज दिसेल पण तिच्यात बसून ती छोटीशी सफर करणार कोण..? प्रवास होत राहील पण या प्रवासाची मज्जाच निराळी. 

          शाळेत विविध कार्यक्रम घेतले जायचे घरात एखादा सण साजरा करावा तसं वातावरण असायचं सगळं,नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जायच्या. भाषण व्हायची,पक्षी निरीक्षण, क्षेत्र भेट,सहल असेल किती किती मज्जा केली हो आपण, या तर आठवणीं साठवून मन भरगच्च भरून गेलंय.  स्वर्गातला आनंद पृथ्वीवर मिळावा तसं अगदी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.असं वाटत राहतं. आता फिरणं होईल कुठेही पण या दिवसांची सर येईल का पुन्हा..

                बाळांनो अशाच आठवणींची दाटीवाटी झाली आहे ना मनात..? असा शाळेचा प्रत्येक दिवस डोळ्यासमोर तरळतोय ना तुमच्या..? ही शाळा म्हणजे आपलं कुटूंब. हे गुरुजन आपले आईवडील, इथले कर्मचारी आपले दादा आणि आठवी नववीची ही तुमची छोटी भावंडं. हा नात्याचा आणि मायेचा गोतावळा मागे सोडून तुम्हीं पुढच्या वाटेला निघून जात आहात...काय करूया बाळांनो जावं तर लागणारच. पुढे भविष्याचा वेध आहे आणि मागे अशा आठवणींचा सारीपाट आहे. पण आज तुमची ही आईरूपी शाळा अशा आठवणींची शिदोरी आणि ज्ञानाचं भरलं फळ तुमच्या ओंजळीत भरून पुढच्या वाटचालीसाठी तुमची पाठवणी करीत आहे.  'गुरूने दिला ज्ञानरुपी वसा' याप्रमाणे इथल्या गुरुजनांनी हा ज्ञानाचा वसा तुमच्या पदरी दिला आहे तो ज्ञानाचा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. या शाळेनं तुम्हांला काय दिलं बाळांनो.." ज्ञानाचा ,संस्कारांचा वारसा आणि इथल्या रम्य आठवणींचा ठेवा जो तुम्हांला आयुष्यभर पुरेल."

            आमची ही चमणी पिल्लं आता मोठी झालीत.त्यांना पंख फुटलेत , त्या पंखात बळ आलंय.. उंच उंच उडण्याचं सामर्थ्य त्यात भरलंय. आता ती उंच उंच झेपावणार आहेत. अवघ अवकाश कवेत घेणार आहेत. हा विश्वास आहे आम्हांला. जा रे माझ्या चिमन्यांनो, जा आपल्या आईवडिलांचं,गुरुजनांचं,शाळेचं,गावाचं नाव रोशन करा,उज्ज्वल करा, अगदी उंच उंच भरारी घ्या.

                        आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा.

हा सोन्याचा पिंजरा आता सोडा, या आठवणींच्या आणि मोहमायेच्या पिंजऱ्यात अडकून राहू नका. ते बघा   अवघ अवकाश तुम्हांला खुणावतय त्या दिशेने झेप घ्या..

जाता जाता एक करा बाळांनो,  या घरट्यातून उंच उडावे दिव्य घेऊनि शक्ती नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती.पुढे जाताना मागे वळून पहायला विसरू नका. ही शाळा,हे शिक्षक दादा लोक तुमचेच आहेत.कधीही या भेटा एखादी माहेरवाशीण येते माहेराला तसं तुमचं माहेर घर समजून थोडा विसावा घेण्यासाठी पुन्हा मागे वळून या आणि ऊर्जा घेऊन पुन्हा पुढे जा..आणि हो रागानं कोणी बोललं असेल,कधी शिक्षा केली असेल तर मनात काही ठेवू नका ते सगळं तुमच्या भल्यासाठी होतं बरं का..?

जा.....

यशवंत व्हा..! जयवंत व्हा..! किर्तीवत व्हा..! 

हाच आशीर्वाद असे तुम्हांला...

बाळांनो, तुम्हांला दहावी बोर्ड परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, या परीक्षेत आपणांस उज्ज्वल यश प्राप्त होवो. आपल्या संपूर्ण ईच्छा, आकांक्षा पूर्ण होवो आणि आपली पुढील वाटचाल अशीच समृद्ध होत राहो..


जय हो..! मंगल हो..!

- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८.

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

'जाता पंढरीशी...' इंद्रजीत देशमुख काकाजी पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.


'जाता पंढरीशी...' पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.


                  परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या लेखणीतून साकार झालेले 'जाता पंढरीशी' हे पुस्तक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाचले.परमपूज्य गुरुवर्य डॉ.श्रीकृष्ण देशमुख काकाजींचे प्रासादिक आशीर्वचन, ह.भ.प बाळकृष्ण चौगले महाराज यांची समृद्ध प्रस्तावना आणि मग गुरुवर्य काकाजींच्या सिध्दहस्तलेखणीतून प्रसवलेली शब्दवारी सुरू होते. अखंड आठरा-एकोणीस दिवसांच्या पंढरीच्या वारीचा सुखसोहळा अनुभवण्याचे भाग्य वाचावयास मिळते. एखाद्या गावी जाताना जसे आपण नटून थटून जातो तसे 'जाता पंढरीशी' या ग्रंथातील संत वचनाचे दाखले देत पुढे पुढे सरकणारी अर्थपूर्ण शब्दवारी,देखणी छायाचित्रं,माझ्या वारकऱ्यांच्या प्रसन्न भावमुद्रा,अर्थसुलभ ओघवती भाषा,भावनेने रसरसलेली-ओथंबलेली शब्दरचना असा एकंदरीत जाता पंढरीशी हा ग्रंथ नटून थटून जणू विठ्ठलाच्या भेटीला आपल्यासवे वाचकाला घेऊन जातो आहे असे वाटते. पंढरीची वाट मनाचा ठाव घेते.शब्दांच्या वारीत सकळ वैष्णवजन ,लहानथोर,विठ्ठलनामाचा गजर करत अंगावर पावसाच्या सरी घेत भक्तीरसात चिंब भिजत पंढरीकडे धाव घेणारे वारकरी भेटतात. प्रत्येक क्षणांचा मनांचा वेध घेत प्रत्येक शब्द साक्षात वारीची अनुभूती घडवून आणतो. वारीच्या प्रत्येक दिवसांचा उत्सव जागर मांडतो.  _'ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस.'_ असा जो संतांचा प्रवास आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांपासून,सोपानकाका,संत मुक्ताबाई,संत नामदेव,संत एकनाथ, संत तुकाराम अशा संतांच्या ज्ञान,भक्ती भावार्थाचे निरूपण करत  शब्दांच्या पंक्ती वारीचे गोडवे गातात.  अवघ्या वैष्णवांची मांदियाळी भेटत जाते.आपणही त्यांच्यात एकरूप होतो ,समरसून जातो.

शब्दे वाचता मी अद्वैतची झालो.

शब्दांच्या संगे मी शब्दची झालो.

हा ग्रंथ वाचताना जणू मी ही त्यातला एक शब्द बनून शब्दांच्या संगे  वारीत मिसळून जातो.अखंड वारीचा अनुभव घेत वारकऱ्यांच्या सवे  चालतो,अभंग गातो,नाचतो-फेर धरतो. असे शब्दांच्या गोतावळ्यात दंग होऊन जायला होते.

'संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रिंगण सोहळा यांचे अमोघ वर्णन वाचताना मन भुलून जाते. माझ्या वैष्णवांचा तो थवा,तुकोबांच्या वाटेवरचा धावा,गावोगावीचा विसावा असा वारीचा जिथला तिथला अणुरेणूचा कानोसा घेत चंद्रभागेसारखी ही ओघवती शब्दगंगा अखंड प्रवाहित होत होत अखेर पंढरीशी येऊन मिळते.

लेकरुवाळ्या विठुरायाच्या ओढीने धाव घेणारी वारकरी लेकरं जेंव्हा पंढरपूरात आपल्या लाडक्या मायबाप विठूमाऊलीची भेट घेतात.माय बाप लेकरांच्या भेटीचा तो अपूर्व सोहळा शब्दांशब्दांतूनी असा रंगतो की भागवत धर्माची पताका जशी वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने फडफडते. तसा प्रत्येक शब्द या संपूर्ण सोहळ्याची अर्थपूर्ण संपन्नता आपल्या खांद्यावर पेलून नाचतो. 

जाता पंढरीशी ही निखळ आनंददायी शब्दवारी अखेर पांडुरंगचरणी विसावते.

जाता पंढरीशी जाऊनिया आलो.

सावळ्या हरीला पाहुनिया आलो.

माझ्या गुरूंच्या एकेक शब्दांनी माझे बोट धरून अवघी पंढरीची वारी घडवून आणली. 

 याची देही याची डोळा पाहिला मी अनुपम्य सोहळा_ अशी प्रचिती देणारा हा ग्रंथ म्हणजे वारीच्या समृद्ध संपन्न अनुभवतेचा अनुपम्य ठेवा आहे.


                !!राम कृष्ण हरी!!


            शिवम साधक   - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)८८०६७३७५२८.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

माझिया जातीचे मज भेटो कोणी...जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..




 आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांचा आज जन्मदिन त्यानिमित्त...


माझिया जातीचे मज भेटो कोणी...

            

              शाळा म्हणजे दुसरं कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असतात ते म्हणजे मुख्याध्यापक. खरं तर मुख्याध्यापक हे वडीलकीची भूमिका निभावत असतो. त्यांच्यावर शाळा-विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांची जबाबदारी असते. अर्थात या सर्वांच्या बाप हृदयाची जागा त्याला घ्यावी लागते. त्यांची काळजी वहावी लागते. खरं तर अशा सर्वांच्या बापपणाचं दुसऱ्यांदा भाग्य मिळणारा मुख्याध्यापक हा जसा भाग्यवान माणूस असतो.तसा बाप मायेच्या हृदयाचा मुख्याध्यापक लाभणंहे त्या शाळेचं भाग्य असतं. आणि असाच आमच्या शाळेचे बाप हृदयाचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक म्हणजे आमचे श्री. शरद पाटील सर.

                अगदी जून महिन्यात मी बदली होऊन या शाळेत दाखल झालो. तसा सुरुवातीपासूनचं सरांचा आणि माझा परिचय होता अनेकदा संवाद व्हायचा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यावेळी माझिया 'जातीचे' मज भेटो कोणी ही माझ्या मनाची आस पूर्ण झाली. इथे आल्यानंतर काही कालावधीतचं सरांनी मला आपल्या कुटुंबात  मिळून मिसळून घेत आपलंसं केलं. 

                प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि मनासारखं काम करण्याचा आनंद मिळू लागला. दडपणविरहित मनमोकळेपणाने काम करण्याचे समाधान मिळते आहे. सरांचे सूक्ष्म निरीक्षण असते. ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली. शाळेच्या लिहिलेल्या एखाद्या बातमीतील शब्दापासून, टाचणवहितील नोंदी आणि हजेरीपटावरील सरासरी पर्यंत सर सुधारणा लक्षात आणून देतात. आजपर्यंत आम्हीं जे काही उपक्रम राबवित आहोत कार्यक्रम घेत आहोत याच्या मागे मुख्याध्यापक सरांची आम्हांला प्रेरणा मिळत असते. कोणताही कार्यक्रम,उपक्रम घेण्याला सरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. किंबहुना स्वतःहुन शालेय उपक्रम घेण्यास प्रेरणा देत असतात. एक आठवण अशी की, फलकलेखन करताना बाजूला उभा राहून ते पहात होते. आणि आपल्या जुन्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले "सर लोहार सर, आम्हीं पडेल ते काम केलं विद्यार्थ्यांसंगे विद्यार्थी झालो, कोणत्याही कामाला मागे सरलो नाही." यातून त्यांना हेच सांगायचे होते की कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही.

                   एकदा मी एका शाळेत व्याख्यानाला गेलो होतो त्या सायंकाळी सरांचा फोन आला सरांनी फोनवरून विचारले " सर व्याख्यान कसे झाले.?" म्हणजे एवढी आपली दखल घेतली जाणं  ही त्या कार्याला दिलेली प्रेरणा असते. कालचाच एक प्रसंग असा एका छोट्या व्हिडीओबद्दल सरांनी प्रतिक्रिया नोंदवली ' सर खूप छान झालाय व्हिडीओ' . असे कौतुकाचे ते दोन शब्द. पण त्याचा अर्थ असा होता की अशा छोट्या छोट्या कृतीतून प्रेरणा देणं पुरेसं असतं जेणेकरून त्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.मोठ्या व्यक्तीकडून आपलं कौतुक होणं तो आनंद निराळाच असतो. आणि असा उत्साह भरण्याचे काम जाणीवपूर्वक सर करतात. 

                   नवीन प्रार्थना,गाणी, शालेय उपक्रम विद्यार्थ्यांकरिता ज्या काही ऍक्टिवीटी आहेत ते घेण्यास सर नेहमी आग्रही असतात. त्यामुळे आपल्याही मनातील संकल्पना त्यांच्यासमोर मनमोकळेपणाने मांडता येतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन,अभ्यास,शिक्षकांचे अध्यापन आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कामाकडे सरांचे काटेकोर लक्ष असते. सरांचा स्वभाव हा फणसासारखा आहे. वरून काटेरी पण आतून रसाळ तसे क्वचित कठोर व्हावे लागते पण त्याचा उद्देश हा गोड असतो. सर्वांशी संवाद साधणं,आपुलकीनं विचारपूस करणं,एखाद्या निर्णयामध्ये सर्वांचे विचार, मत जाणून घेणं सर्वांना मार्गदर्शन करणं, योग्य निर्णय घेणं, कोणी चुकलं माकलं तर संभाळून घेणं शाळेत एक सकारात्मक आणि मनमोकळं वातावरण ठेवणं. आणि सर्वांची प्रगती साधणारे पोषक वातावरण ठेवणं अशी सरांची कार्यपद्धती आहे.

                        अशा प्रेमळ, सहृदयी, संवेदनशील कुटुंबप्रमुख्याच्या मायेत आमच्या शाळेचं कुटूंब गुण्यागोविंदाने नांदत आहे.  प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आणि सरांच्या प्रेरणा, मार्गदर्शनाच्या बळावर शाळा- विद्यार्थी यांचे भविष्य उज्वल होईलच..! त्यासाठी काम करण्याची प्रेरणाही आम्हाला अखंड मिळत राहील असा विश्वास आहे. मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सरांना..जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा... उदंड निरोगी, निरामय दीर्घायुरारोग्य लाभो हीच शाळा विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने प्रार्थना...!!


जय हो मंगल हो..!!

           

       - किरण सुभाष चव्हाण.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.









 आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.


                                आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले. 


तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण."  आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली वडाची झाडे आणि त्यांच्या लोंबकळत्या जाडजूड पारंब्या. उजव्या काठाने वाहणारी हिरण्यकेशी नदी.काठाने उभा असलेला गर्द झाडाझुडपांचा गोतावळा.  आत  शिरताना तनाला आणि मनालाही गारवा जाणवत होता. एखाद्या वळवणावर विसाव्याचे ठिकाण लागावे तसे ते ठिकाण नजरेत भरू लागले. नुकत्याच जन्मलेल्या बाळानं पहिलं वहिलं पाऊल ठेवावं आणि कुतूहलाने भवताल न्याहाळावा तशी  झालेली ती माझी अवस्था. त्या पवित्र पावन भूमीत माझ्या जीवनातलं पहिलं वहिलं पाऊल मी ठेवत होतो आणि तोंडून पहिलीच प्रतिक्रिया उमटली "जीवनातल्या सुखद, अविस्मरणीय क्षणांच्या आठवणीत भर घालणारं हे ठिकाण आहे. "

                              सुरुवातीला महादेव मंदिर लागले. मंदिरात आम्हीं प्रवेश केला.आतील प्राचीन रचना डोळ्यात भरू लागली. सभामंडपातल्या जुन्या पुराण्या मूर्तींचे दर्शन घेऊन पुढच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. पाय दुमडून बसलेल्या अवस्थेतला कातळ पाषाणाचा ऐटीत बसलेला महादेवाचा भला मोठा नंदी पाहिला.जीव ओतून केलेल्या त्या कोरीवकलाकुसरीने पाषाणातल्या नंदीला  जिवंतपणा आणला होता. अंगकांतीवर कोरलेली गोंड्याची माळ आणि गळ्यातली गोलाकार घडीव घंटा. ती निश्चल स्थितप्रज्ञ अवस्था मन वेधून घेत होती. त्याच्या सामोरी गाभाऱ्यातील पवित्र पावन महादेवाची पिंडी. कलशातून घडोघडी पिंडीवर होणारा जलाभिषेक..सभोवती ठेवलेली साजूक फुलं... ओम नमः शिवाय असा कर्णमधुर मंगल ध्वनी गाभाऱ्यात घुमत होता. त्या पवित्र मनोहारी रूपाचे मनोभावे दर्शन घेतले. त्या पवित्र स्थळाचा सहवास मनाला किती हवाहवासा वाटत होता. नुकतीच मावळतीला कललेल्या सोनेरी किरणांत त्या गाभाऱ्याकडे पाहताना ते दृश्य मनाच्या कोंदणात सुखाचे गडद रंग भरत होते. महादेव मंदिरातून बाहेर पडून पुढे गेलो. 

                      कोसळणाऱ्या धबधब्याचा कानांवर आवाज आदळत होता. मनात रंगवलेल्या धबधब्याचे चित्र वास्तवात आता पाहणार होतो. पुढे जाताच कातळ काळ्या दगडांवरून  वाहणाऱ्या नितळगार पाण्याचे पुढे खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे शुभ्र कांती रूप साक्षात पाहताना मन अगदी सुखावले. दुपारच्या ढळलेल्या कोमल किरणांच्या सानिध्यात तो मनमोहक परिसर न्याहाळताना मन हरखून गेले. नदीच्या दोन्हीं काठानी घनघोर दाटलेली झाडी. नदीच्या त्या पल्याड झाडीझुडपांचं गोकुळचं नांदत होतं.  काठावरच्या झुकलेल्या झावळ्यांच्या दाट सावलीत विसावलेली दगडांची दाटीवाटी. काळ्या कातळांची ती आडवी मांडणी दगडांचे कप्पे पाषाणाचे एक अनोखे रूप नजरेत भरत होते. तसेच माघारी वळून पुन्हा आम्ही पूर्वेस तोंड असलेल्या काठावरच्या राम मंदिरात गेलो. वनवासात असताना श्री राम विसाव्यासाठी येथे थांबले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथल्या भूमीला विशेष महत्त्व आहे.श्री रामांच्या चरणस्पर्शाने पुणीत झालेली अशी ही भूमी. आणि पवित्र पावन असे मंदिर. गाभाऱ्यातील राम सीता आणि त्यांच्या सामोरी असलेला पवनपुत्र गदाधारी हनुमान अशा पवित्र रूपाचे दर्शन घेताना मन धन्य धन्य झाले. 

                     मंदिराच्या डाव्या बाजूला असलेलं छोटेखानी मारुतीचं मंदिर. त्याच्या वरील बाजूस आणखीन एक पुरातन मंदिर त्या मंदिरातील गाभाऱ्यात कासवमूर्ती होती. त्यानंतर मंदिराच्या पुढे आल्यानंतर निळ्यासावळ्या रूपाची ध्यानस्थ बसलेली शंकराची भली मोठी मूर्ती. त्या शंकरांच्या मुर्तीच्या पुढ्यात पाण्याच्या छोटेखानी कुंडात कमळपर्णाची दाटीवाटी. बाजूला चौकोनी समाधीस्थळ. असा सारा देखावा डोळ्यांत साठवत पुन्हा नदीच्या पात्रातील दगडावरून पाण्याच्या निकट आम्हीं जाऊ लागलो. नदीच्या मावळतीच्या काठाला एक वटलेलं चाफ्याचं झाड होतं. त्याच्या समोरील दगडाची जागा किती स्वच्छ सुंदर केली होती.जणू ती पर्यटकांच्या बसकणीची जागा होती. त्या सपय निर्मळ जागेवर निवांत ऐसपैस बसावं असं वाटतं होतं.. जिकडे तिकडे नदीतले ते कातळ काळे पाषाण, नदीच्या पाण्याने त्यांना आकार,उकार दिलेला होता. कुठे जागोजागी गोलाकार खोबण्या तयार झाल्या होत्या.  आतून कठीण कठोर असलेले कातळ वरून किती गुळगुळीत मुलायम दिसत होते. एकावर एक रचावेत एकाला एक बिलगून बसावेत अशी त्या नदीपात्रात आसनस्थ असंलेल्या कातळांची मांदियाळी. ओळीत कप्याकप्यानी विसावलेली तर कुठे आपला माथा वर काढून एका जागी स्थिरावलेली त्यांची ती अवस्था. कुठल्याही एका दगडावर आसनस्थ होऊन निवांत बसावं. संध्यासमयीच्या ऊबदार सोनेरी किरणांची मऊ शाल पाठीवर लेऊन समोरच्या निळ्याशार पाण्याकडं एकसारखं निरखत ते निवांतपण अनुभवावं. खरंच त्या काठावरची ती बैठक आत्मिक समाधानातून मनाच्या समाधी अवस्थेकडे नेते. त्या पाषाणाची स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यालाही प्राप्त होते.सुख म्हणजे काय असतं हो..? कुठं भेटतं ते..? या प्रश्नांची उत्तरं किती सहजपणे सापडत होती त्या काठावर.खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती आणखीन कुठे मिळणार..?. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे तन आणि अनेक विषयांत गुंतलेले मन विसावा घेईल ती हीच जागा. एक दीर्घ मोकळा श्वास घ्यावा तो या तीर्थावरचं.

                        आम्हीं बसलो होतो त्या समोरचं एक प्रौढ जोडपे काठाने फिरत होते.तो प्रौढ माणूस हातात दगडांच्या जीबल्या घेऊन त्या पाण्यावर फेकत होता. त्या पाण्यावरुन अलगद या काठावरून त्या काठावरून जात होत्या. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तो बालपणीचा आनंद पुन्हा नव्याने फुलून येत होता. आपलं बालपण पुन्हा नव्याने मिरवावं ते या काठावरच. त्या काठावर बसून भूतकाळाच्या पोटात शिरून बालपण आठवावं. स्वतःमध्ये हरवून जावावं. मी आणि आमचे लोहार सर एका दगडावर निवांत बसलो होतो. मनातील भाव प्रकट करण्याला तसाच एक शांत मनाचा सोबती मला मिळाला होता. त्यामुळे मोकळेपणाने मनातील भावना प्रकट होत होत्या. काही क्षण का असेना ते निवांतपणीचे क्षण कणाकणाने आम्हीं पदरात पाडून घेतले. ती आत्मिक ऊर्जा घेऊन आम्हीं एकदासे उठलो. खळखळत्या पाण्याची कोसळती उतरण पाहत त्याच्या काठावरून पश्चिमेच्या राम मंदिरांचे पुन्हा एकदा डोळे भरून दर्शन घेतले. मंदिरांच्या कळसावर भगवी पताका डौलाने फडकत होती. तो भोवताल पुन्हा एकदा नजरेत साठवत आम्हीं माघारी वळण्यासाठी निघालो. सूर्यनारायणही आता कललेला. झाडाझुडपांच्या आच्छालेल्या फांद्यातून निसटलेली मावळतीची किरणं महादेव राऊळाच्या कळसाला भेटून अस्ताला जात होती. त्या सायंकाळच्या वेळेस शांत,निर्मळ, निवलेल्या मनाने आम्हीं बाहेर पडलो. सायंकाळ धरून रामतीर्थ स्थळाला सहजच दिलेल्या त्या भेटीने जीवनातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीत अविस्मरणीय क्षणांची ओंजळ भरून घातली. खूप समाधान वाटत होते.खरंच रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे असे एक तीर्थ आहे जिथे मनाला आराम आणि जगण्यातला राम भेटतो.


               - किरण सुभाष चव्हाण.

              मोबा - ८८०६७३७५२८.































गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

पाठीमागचा बेंच,ती दुपार आणि केंगार सरांचे बोल...किरण चव्हाण.


 पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि  केंगार सरांचे ते बोल...


                  २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर  बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि  मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा  वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले ,  "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं. १० वी नंतर ११ वी १२ करायची एवढचं माहिती. शिक्षक होण्याचं ध्येय वगैरे असलं काहीच माझ्या ध्यानात ना मनात. पण मला एक प्रश्न पडला, सरांनी मलाच का उठवावं आणि मलाच असं का सांगावं बरं..? या प्रश्नांच्या शोधात मी माझ्यातच हरवत गेलो.सर मला असं बोलले याचा अर्थ नक्कीच माझ्यात काही तरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी गरिब परिस्थिती, वडिलांचा संघर्ष सरांना जवळून माहिती होता. सरांचं ते बोलणं मी मनावर घेतलं  आणि दुसऱ्याच दिवसापासून पुढच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बेंचवर बसायला लागलो. ते शेवटी १२ वी पूर्ण होईपर्यंत. 

                     बाबांनी माझ्याविषयी बघितलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने  केंगार सरांनी माझ्या हृदयात घट्ट रुजवलं. अधिक मजबूत केलं. तेव्हापासून केंगार सरांच्या विषयी माझ्या मनात एकप्रकारचा जिव्हाळा निर्माण होत गेला. त्या दिवसापासून मी ठरवलं की, जे शिकायचं ते मनापासून शिकायचं. वर्गात शिक्षक जे काही शिकवतील ते मन लावून शिकू लागलो. गांभीर्याने अभ्यास करू लागलो. केंगार सरांच्या त्या वाक्याने मी पूर्णतः बदलून गेलो होतो. बारावीला तर सरांनी न सांगता माझा मीच विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून तपासायला सरांच्याकडे द्यायचो. काही वेळा भर वर्गात केंगार सर माझी उदाहरणे सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यावेळी आतून खूपच प्रेरणा मिळायची.  काही दिवसांत मी एक अभ्यासू शांत विद्यार्थी म्हणून शिक्षकांच्यासह माझ्या मित्रपरिवारात परिचयाचा झालो. केंगार सर मराठी विषय इतक्या आंतरिक तळमळीने शिकवायचे की संपुर्ण वर्ग चिडीचूप शांतता असायची. त्यांनी शिकवलेला शंकर पाटील यांचा 'छलांग' हा पाठ अजूनही माझ्या मनात रेंगाळतोय. दहावीला असताना देखील केंगार सरांनी असाच एक पाठ शिकवला होता 'लाल चिखल' नावाचा. आज ही टोमॅटो पाहिले की ती लालेलाल घटना डोळ्यासमोर तरळत राहते. इतकी जादू त्यांच्या शिकवण्यात होती. मराठी कथा,कविता शिकवण्यात सरांचा हातखंडाचं होता. कविता शिकवायला लागले की अनेक कवितांचा संदर्भ द्यायचे. कवी नारायण सुर्वे यांची 'दोन दिवस..' ही कविता तर अंगात रोमांच फुलवायची. त्या कवितांचे सरांनी केलेले रसभरीत वर्णन थेट हृदयाला भिडायचे. 

                          सर एखादा पाठ शिकवताना अनेक लेखक, कवी यांच्या पुस्तकांचा परिचय करून देत असायचे.  त्यावेळी दया पवार यांचं बलुतं, किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर, आनंद यादव यांची झोंबी,उचल्या,उपरा या कादंबऱ्या वारंवार वाचण्यास सांगायचे म्हणून तर पुढील काळात या साऱ्या  कादंबऱ्या मी वाचून काढल्या. सरांच्या अशा साहित्यिकविषयक अध्यापनाचा माझ्यावर असा परिणाम झाला की,   मी ही कॉलेजला असताना लिहायला लागलो. मोडक्या तोडक्या कविता रचू लागलो. या वयात लेखनीचं बाळकडू सरांच्याकडून मिळालं म्हणायला हरकत नाही. पुढे बारावी झाल्यानंतर मी जी पहिली कादंबरी लिहली 'नवसाचं पॉर' ही कादंबरी मी पहिल्या प्रथम केंगार सरांना वाचावयास दिली होती. सरांनीही ती आत्मीयतेने वाचून माझं कौतुक करत त्याबाबतीत काही सूचना मार्गदर्शन  केले. त्यानंतर जिथं तिथं माझा विद्यार्थी किरण याने कादंबरी लिहिली आहे असं अभिमानाने सर्वांना सर सांगायचे.सरांच्या अशा प्रेरणेने पुढे लिहू लागलो. बारावी झाल्यानंतर निपाणीला  डी. एड ला प्रवेश घेतला. निपाणीला येण्या जाण्याच्या  नेहमीच्या वाटेवर माझे ज्युनिअर कॉलेज लागायचे. त्यावेळी न चुकता माझ्या कॉलेजला मी वंदन करायचो. आणि त्यावेळी केंगार सरांची आवर्जून आठवण व्हायची.  एखाद्या माहेरवाशीणीला सासरी गेल्यानंतर क्षणाक्षणाला माहेराची आठवण व्हावी तशी पुढच्या शिक्षणाची वाट धरल्यानंतर मला माझ्या मागच्या ज्युनिअर कॉलेजची आठवण होत रहायची आणि जशी माहेरातली माय तसे कॉलेजमधील माझे केंगार सर यांच्या आठवणीने मी अस्वस्थ व्हायचो. आमचं नातंच असं मायलेकरांच्यासारखं झालं होतं. सरांना ही माझी उणीव भासत असत, कॉलेज सोडून गेल्यानंतरही सर माझी वरचेवर आठवण काढायचे हे माझ्या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून मला समजायचे. मला ते विद्यार्थी म्हणायचे की, "किरणदादा आज वर्गात केंगार सरांनी आम्हांला तुझं उदाहरण सांगितले."  ते ऐकूनच माझं मन भरून यायचं.

                  आणखीन एक गुपित एवढ्या वर्षानंतर मी उघड करतोय. कारण हीचं ती वेळ आहे असं मला आज मनोमनी वाटतंय. ज्यावेळी मी ११- १२ वी ला होतो त्यावेळी कॉलेज सुटल्यानंतर दुपारच्या वेळेत रानात शेळ्या चारायला घेऊन जायचो. त्यावेळी  सोबत पुस्तक,वही, पेन आखीव ताव असं काही असायचंच.ती दुपार मला आज जशीच्या तशी आठवतेय. त्या काटेरी बाभळीच्या झाडाखाली का कुणास ठाऊक त्या दुपारी उगाचंच मी पानांवर काही तरी मांडण्याचा प्रयत्न करत होतो...

हीच ती बाभळ आज ही त्या ठिकाणी उभी आहे.

             कुणाबद्दल..? तर केंगार सरांच्याबद्दल...मी का लिहीत होतो..? मला कुणी लिहायला सांगितलं होतं..?  बरं जे लिहिणार ते सर वाचणार होते का..? काही काहीही माहिती नाही. फक्त लिहायचं एवढं खरं ते फक्त आपल्या केंगार सरांच्याबद्दल... कारण नसताना एखाद्या प्रियकराने हृदयाच्या देठापासून ओल्या अंतकरणाने आपल्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहावं.तसा तो भाव त्यावेळी त्या पत्रात होता का..? होय तोच शुद्ध, निर्मळ निरागस मनाचा भाव होता.म्हणजे ऐन तारुण्यात पोरं पोरींना प्रेमपत्र लिहितात. पण मी मात्र आमच्या सरांना प्रेमपत्र लिहीत होतो. पण त्या मुक्या भावनेला नेमक्या शब्दांची गाठ पडत नव्हती. तरीसुद्धा कशी तरी अक्षरं त्या पानांवर उमटत होती. पण त्यावेळच्या हृदयाच्या गाभऱ्यातून  मुक्या भावनांचं  वेडंवाकडं पत्र सरांच्यापर्यंत कधीच पोहोचलं नाही. सरांना आज हे वाचताना आश्चर्य वाटेल. 'ये हृदयीचे ते हृदयी' या हृदयातून उमटलेल्या  निरागस भावना सर आपल्या हृदयापर्यंत पोहोचायला आज एक तप उलटून गेलं आणि तो क्षण साक्षात आज आला आहे. 

                      त्या वेळचा आणखीन एक प्रसंग मला आठवतो. रात्रीची वेळ होती. लाईट गेली होती आणि त्या अंधारात माझी आई घरातचं शेळीचं दावं पायात आडवं आल्यानं पडली आणि आईचा हात दुखावला. त्या रात्री त्या हाताला खूप सूज आली आणि वेदना ही फार होत होत्या. तिला दुसऱ्या दिवशी गडहिंग्लजला खाजगी दवाखान्यात दाखल केलं. तेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की, हाताचं ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळी तेवढे पैसे भरण्याची आमची परिस्थिती नव्हती. काय करायचे मला सुचत नव्हते. या कठीण प्रसंगात मला एकाच व्यक्तीची  आठवण होत होती ते म्हणजे माझे केंगार सर. लागलीचं मी गावाकडे आलो. सर कॉलेजमध्ये भेटतील म्हणून त्यांच्या आधाराच्या ओढीने मी माझ्या पांगिरे गावापासून धावतच माझं कॉलेज गाठलं आणि सरांना सर्व हकीकत सांगितली. मी हतबल होतो,पुढे काय करायचं काहीच सुचत नव्हतं. पण सरांनी माझ्या पाठीवर हात ठेवत मला धीर दिला आणि त्यावेळस पैशाचीही मदत केली.

                 शिक्षणाच्या निमित्ताने जरी मी बाहेर पडलो तरी सरांशी असलेला घट्ट ऋणानुबंध नेहमी दृढ होत राहिला. डी.एड नंतर खऱ्या अर्थाने नोकरीसाठीचा माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी सरांनी वर्गात सांगितलेल्या नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेची मला तीव्रतेने आठवण व्हायची. मध्यंतरीची वर्षे पालापाचोळ्यासारखी उडून गेली. नोकरी लागेपर्यंत खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या काळात केंगार सर मला वेळोवेळी कठीण प्रसंगात आर्थिक मदत करत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर मी एका विनाअनुदानित शाळेत नोकरीला लागलो.  विनाअनुदानितच्या काळात ते आजपर्यंत सर मला वडीलकीच्या नात्याने मला धीर,आधार देत आले. मी जिथे शाळेत नोकरी करत होतो त्या ठिकाणीही सरांनी वेळ काढून एकदा माझ्या शाळेला भेट दिली होती.

                        गुरुचे आशीर्वाद गुरुचे बोल किती खरे ठरतात. याचा एक साक्षात्कार मी सांगेन. ज्या वेळी मी नोकरीमध्ये नव्हतो, त्यावेळी सर एकदा मॅडमांच्यासह माझ्या घरी अचानकच आले. त्यावेळी माझ्या घरची,माझी अवस्था बघून मॅडम हळहळल्या. अजून नोकरी नाही,ही अशी गरिबी परिस्थिती पुढे लग्न वगैरे कसं व्हायचं..? मॅडम माझ्याविषयी फारच चिंतीत झाल्या होत्या. त्यावेळी सर मला एक वाक्य बोलले, " किरण...तुझं चांगलंचं होणार काळजी करू नकोस, तू मुलगी बघायला कुठंही जायचं नाहीस, उलट एक दिवस मुलगीवाले तुझ्या घराकडं येतील." सर असे बोलून गेले आणि आज सरांचे हे बोल खरे ठरताना मी अनुभवतोय. आज आईवडिलांच्या,गुरूंच्या आशीर्वादाने माझी  विनाअनुदानितवरून  १००% अनुदानित शाळेवर बदली झाली. आणि आता...

बदल गयी है दशा बदल गयी है दिशा 

अब हवा का मोड भी बदल जाएगा | 

               कोणती नवीन पुस्तकं वाचायची, कोणत्या विषयावर लिहायचं, साहित्य कथा कविता यावर आजही सरांची आणि माझ्यात चर्चा होत असते.सरांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत असते. वर्गातले ज्ञान आज वर्गाबाहेरही मला मिळते त्यामुळे माझ्यासारखा मीच भाग्यवान..!  सरांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि माझ्याही हृदयस्थानी केंगार सरांचे स्थान हे आईवडिलांच्यासमान आहे. सरांच्या कुटुंबाशी ही माझे तितकेच घरोब्याचे संबंध आहेत. माझ्या वाटचालीत सरांचे नेहमीच मार्गदर्शन होत आले आणि याही पुढे होत राहील हा माझा विश्वास आहे. एका पाठीमागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला पुढं आणून आपल्या प्रेरणेतून शिक्षक होण्याचं स्वप्न दाखवून दारिद्र्यरेषेच्या वर आणणारा असा शिक्षक लाभण हे त्या विद्यार्थ्याचं भाग्य म्हणायचं. नाही तर पाठीमागचा विद्यार्थी पाठीमागेचं राहिला असता अशा शिक्षकांच्यामुळे तर आज मी हे सन्मानाचे दिवस पाहतोय...

                     केंगार सर आज २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख अशा संमिश्र भावना मनात दाटलेल्या आहेत.आनंद यासाठी की, सर आता निवृत्तीनंतरचे जीवन मुक्तपणे स्वतःसाठी जगू शकतील आणि दुःख यासाठी की एक हाडाचा शिक्षक चार भिंतीच्या वर्गात शिकवण्यासाठी इथून पुढच्या विद्यार्थ्यांना दररोज लाभणार नाही. पण केंगार सरांच्या सारखे शिक्षक हे वर्गापुरते सीमित नाहीत तर  बाहेरच्या दुनियेच्या शाळेत पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदैव पुढं आणण्याचं काम ते अखंडीत करत राहतील. हे मी माझ्या अनुभवारून ठामपणे सांगतो...आणि मी विराम घेतो...शेवटी एवढेच सांगेन..

सर तुम्ही शिकवलेत धडे जीवनाचे 

त्या धड्यातून जीवन घडवत राहू...

सर तुम्ही शिकवल्यात कविता अनेक

त्या कवितांचा अर्थ जगण्याला देत राहू...

सरांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा,समाधानाचे आनंदाचे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

जय हो..!  मंगल हो..!!


 किरण सुभाष चव्हाण

८८०६७३७५२८.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...