फॉलोअर

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

'जाता पंढरीशी...' इंद्रजीत देशमुख काकाजी पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.


'जाता पंढरीशी...' पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.


                  परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या लेखणीतून साकार झालेले 'जाता पंढरीशी' हे पुस्तक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाचले.परमपूज्य गुरुवर्य डॉ.श्रीकृष्ण देशमुख काकाजींचे प्रासादिक आशीर्वचन, ह.भ.प बाळकृष्ण चौगले महाराज यांची समृद्ध प्रस्तावना आणि मग गुरुवर्य काकाजींच्या सिध्दहस्तलेखणीतून प्रसवलेली शब्दवारी सुरू होते. अखंड आठरा-एकोणीस दिवसांच्या पंढरीच्या वारीचा सुखसोहळा अनुभवण्याचे भाग्य वाचावयास मिळते. एखाद्या गावी जाताना जसे आपण नटून थटून जातो तसे 'जाता पंढरीशी' या ग्रंथातील संत वचनाचे दाखले देत पुढे पुढे सरकणारी अर्थपूर्ण शब्दवारी,देखणी छायाचित्रं,माझ्या वारकऱ्यांच्या प्रसन्न भावमुद्रा,अर्थसुलभ ओघवती भाषा,भावनेने रसरसलेली-ओथंबलेली शब्दरचना असा एकंदरीत जाता पंढरीशी हा ग्रंथ नटून थटून जणू विठ्ठलाच्या भेटीला आपल्यासवे वाचकाला घेऊन जातो आहे असे वाटते. पंढरीची वाट मनाचा ठाव घेते.शब्दांच्या वारीत सकळ वैष्णवजन ,लहानथोर,विठ्ठलनामाचा गजर करत अंगावर पावसाच्या सरी घेत भक्तीरसात चिंब भिजत पंढरीकडे धाव घेणारे वारकरी भेटतात. प्रत्येक क्षणांचा मनांचा वेध घेत प्रत्येक शब्द साक्षात वारीची अनुभूती घडवून आणतो. वारीच्या प्रत्येक दिवसांचा उत्सव जागर मांडतो.  _'ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस.'_ असा जो संतांचा प्रवास आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांपासून,सोपानकाका,संत मुक्ताबाई,संत नामदेव,संत एकनाथ, संत तुकाराम अशा संतांच्या ज्ञान,भक्ती भावार्थाचे निरूपण करत  शब्दांच्या पंक्ती वारीचे गोडवे गातात.  अवघ्या वैष्णवांची मांदियाळी भेटत जाते.आपणही त्यांच्यात एकरूप होतो ,समरसून जातो.

शब्दे वाचता मी अद्वैतची झालो.

शब्दांच्या संगे मी शब्दची झालो.

हा ग्रंथ वाचताना जणू मी ही त्यातला एक शब्द बनून शब्दांच्या संगे  वारीत मिसळून जातो.अखंड वारीचा अनुभव घेत वारकऱ्यांच्या सवे  चालतो,अभंग गातो,नाचतो-फेर धरतो. असे शब्दांच्या गोतावळ्यात दंग होऊन जायला होते.

'संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रिंगण सोहळा यांचे अमोघ वर्णन वाचताना मन भुलून जाते. माझ्या वैष्णवांचा तो थवा,तुकोबांच्या वाटेवरचा धावा,गावोगावीचा विसावा असा वारीचा जिथला तिथला अणुरेणूचा कानोसा घेत चंद्रभागेसारखी ही ओघवती शब्दगंगा अखंड प्रवाहित होत होत अखेर पंढरीशी येऊन मिळते.

लेकरुवाळ्या विठुरायाच्या ओढीने धाव घेणारी वारकरी लेकरं जेंव्हा पंढरपूरात आपल्या लाडक्या मायबाप विठूमाऊलीची भेट घेतात.माय बाप लेकरांच्या भेटीचा तो अपूर्व सोहळा शब्दांशब्दांतूनी असा रंगतो की भागवत धर्माची पताका जशी वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने फडफडते. तसा प्रत्येक शब्द या संपूर्ण सोहळ्याची अर्थपूर्ण संपन्नता आपल्या खांद्यावर पेलून नाचतो. 

जाता पंढरीशी ही निखळ आनंददायी शब्दवारी अखेर पांडुरंगचरणी विसावते.

जाता पंढरीशी जाऊनिया आलो.

सावळ्या हरीला पाहुनिया आलो.

माझ्या गुरूंच्या एकेक शब्दांनी माझे बोट धरून अवघी पंढरीची वारी घडवून आणली. 

 याची देही याची डोळा पाहिला मी अनुपम्य सोहळा_ अशी प्रचिती देणारा हा ग्रंथ म्हणजे वारीच्या समृद्ध संपन्न अनुभवतेचा अनुपम्य ठेवा आहे.


                !!राम कृष्ण हरी!!


            शिवम साधक   - किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)८८०६७३७५२८.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

माझिया जातीचे मज भेटो कोणी...जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..




 आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांचा आज जन्मदिन त्यानिमित्त...


माझिया जातीचे मज भेटो कोणी...

            

              शाळा म्हणजे दुसरं कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असतात ते म्हणजे मुख्याध्यापक. खरं तर मुख्याध्यापक हे वडीलकीची भूमिका निभावत असतो. त्यांच्यावर शाळा-विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांची जबाबदारी असते. अर्थात या सर्वांच्या बाप हृदयाची जागा त्याला घ्यावी लागते. त्यांची काळजी वहावी लागते. खरं तर अशा सर्वांच्या बापपणाचं दुसऱ्यांदा भाग्य मिळणारा मुख्याध्यापक हा जसा भाग्यवान माणूस असतो.तसा बाप मायेच्या हृदयाचा मुख्याध्यापक लाभणंहे त्या शाळेचं भाग्य असतं. आणि असाच आमच्या शाळेचे बाप हृदयाचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक म्हणजे आमचे श्री. शरद पाटील सर.

                अगदी जून महिन्यात मी बदली होऊन या शाळेत दाखल झालो. तसा सुरुवातीपासूनचं सरांचा आणि माझा परिचय होता अनेकदा संवाद व्हायचा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यावेळी माझिया 'जातीचे' मज भेटो कोणी ही माझ्या मनाची आस पूर्ण झाली. इथे आल्यानंतर काही कालावधीतचं सरांनी मला आपल्या कुटुंबात  मिळून मिसळून घेत आपलंसं केलं. 

                प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि मनासारखं काम करण्याचा आनंद मिळू लागला. दडपणविरहित मनमोकळेपणाने काम करण्याचे समाधान मिळते आहे. सरांचे सूक्ष्म निरीक्षण असते. ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली. शाळेच्या लिहिलेल्या एखाद्या बातमीतील शब्दापासून, टाचणवहितील नोंदी आणि हजेरीपटावरील सरासरी पर्यंत सर सुधारणा लक्षात आणून देतात. आजपर्यंत आम्हीं जे काही उपक्रम राबवित आहोत कार्यक्रम घेत आहोत याच्या मागे मुख्याध्यापक सरांची आम्हांला प्रेरणा मिळत असते. कोणताही कार्यक्रम,उपक्रम घेण्याला सरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. किंबहुना स्वतःहुन शालेय उपक्रम घेण्यास प्रेरणा देत असतात. एक आठवण अशी की, फलकलेखन करताना बाजूला उभा राहून ते पहात होते. आणि आपल्या जुन्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले "सर लोहार सर, आम्हीं पडेल ते काम केलं विद्यार्थ्यांसंगे विद्यार्थी झालो, कोणत्याही कामाला मागे सरलो नाही." यातून त्यांना हेच सांगायचे होते की कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही.

                   एकदा मी एका शाळेत व्याख्यानाला गेलो होतो त्या सायंकाळी सरांचा फोन आला सरांनी फोनवरून विचारले " सर व्याख्यान कसे झाले.?" म्हणजे एवढी आपली दखल घेतली जाणं  ही त्या कार्याला दिलेली प्रेरणा असते. कालचाच एक प्रसंग असा एका छोट्या व्हिडीओबद्दल सरांनी प्रतिक्रिया नोंदवली ' सर खूप छान झालाय व्हिडीओ' . असे कौतुकाचे ते दोन शब्द. पण त्याचा अर्थ असा होता की अशा छोट्या छोट्या कृतीतून प्रेरणा देणं पुरेसं असतं जेणेकरून त्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.मोठ्या व्यक्तीकडून आपलं कौतुक होणं तो आनंद निराळाच असतो. आणि असा उत्साह भरण्याचे काम जाणीवपूर्वक सर करतात. 

                   नवीन प्रार्थना,गाणी, शालेय उपक्रम विद्यार्थ्यांकरिता ज्या काही ऍक्टिवीटी आहेत ते घेण्यास सर नेहमी आग्रही असतात. त्यामुळे आपल्याही मनातील संकल्पना त्यांच्यासमोर मनमोकळेपणाने मांडता येतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन,अभ्यास,शिक्षकांचे अध्यापन आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कामाकडे सरांचे काटेकोर लक्ष असते. सरांचा स्वभाव हा फणसासारखा आहे. वरून काटेरी पण आतून रसाळ तसे क्वचित कठोर व्हावे लागते पण त्याचा उद्देश हा गोड असतो. सर्वांशी संवाद साधणं,आपुलकीनं विचारपूस करणं,एखाद्या निर्णयामध्ये सर्वांचे विचार, मत जाणून घेणं सर्वांना मार्गदर्शन करणं, योग्य निर्णय घेणं, कोणी चुकलं माकलं तर संभाळून घेणं शाळेत एक सकारात्मक आणि मनमोकळं वातावरण ठेवणं. आणि सर्वांची प्रगती साधणारे पोषक वातावरण ठेवणं अशी सरांची कार्यपद्धती आहे.

                        अशा प्रेमळ, सहृदयी, संवेदनशील कुटुंबप्रमुख्याच्या मायेत आमच्या शाळेचं कुटूंब गुण्यागोविंदाने नांदत आहे.  प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आणि सरांच्या प्रेरणा, मार्गदर्शनाच्या बळावर शाळा- विद्यार्थी यांचे भविष्य उज्वल होईलच..! त्यासाठी काम करण्याची प्रेरणाही आम्हाला अखंड मिळत राहील असा विश्वास आहे. मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सरांना..जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा... उदंड निरोगी, निरामय दीर्घायुरारोग्य लाभो हीच शाळा विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने प्रार्थना...!!


जय हो मंगल हो..!!

           

       - किरण सुभाष चव्हाण.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.









 आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.


                                आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले. 


तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण."  आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली वडाची झाडे आणि त्यांच्या लोंबकळत्या जाडजूड पारंब्या. उजव्या काठाने वाहणारी हिरण्यकेशी नदी.काठाने उभा असलेला गर्द झाडाझुडपांचा गोतावळा.  आत  शिरताना तनाला आणि मनालाही गारवा जाणवत होता. एखाद्या वळवणावर विसाव्याचे ठिकाण लागावे तसे ते ठिकाण नजरेत भरू लागले. नुकत्याच जन्मलेल्या बाळानं पहिलं वहिलं पाऊल ठेवावं आणि कुतूहलाने भवताल न्याहाळावा तशी  झालेली ती माझी अवस्था. त्या पवित्र पावन भूमीत माझ्या जीवनातलं पहिलं वहिलं पाऊल मी ठेवत होतो आणि तोंडून पहिलीच प्रतिक्रिया उमटली "जीवनातल्या सुखद, अविस्मरणीय क्षणांच्या आठवणीत भर घालणारं हे ठिकाण आहे. "

                              सुरुवातीला महादेव मंदिर लागले. मंदिरात आम्हीं प्रवेश केला.आतील प्राचीन रचना डोळ्यात भरू लागली. सभामंडपातल्या जुन्या पुराण्या मूर्तींचे दर्शन घेऊन पुढच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. पाय दुमडून बसलेल्या अवस्थेतला कातळ पाषाणाचा ऐटीत बसलेला महादेवाचा भला मोठा नंदी पाहिला.जीव ओतून केलेल्या त्या कोरीवकलाकुसरीने पाषाणातल्या नंदीला  जिवंतपणा आणला होता. अंगकांतीवर कोरलेली गोंड्याची माळ आणि गळ्यातली गोलाकार घडीव घंटा. ती निश्चल स्थितप्रज्ञ अवस्था मन वेधून घेत होती. त्याच्या सामोरी गाभाऱ्यातील पवित्र पावन महादेवाची पिंडी. कलशातून घडोघडी पिंडीवर होणारा जलाभिषेक..सभोवती ठेवलेली साजूक फुलं... ओम नमः शिवाय असा कर्णमधुर मंगल ध्वनी गाभाऱ्यात घुमत होता. त्या पवित्र मनोहारी रूपाचे मनोभावे दर्शन घेतले. त्या पवित्र स्थळाचा सहवास मनाला किती हवाहवासा वाटत होता. नुकतीच मावळतीला कललेल्या सोनेरी किरणांत त्या गाभाऱ्याकडे पाहताना ते दृश्य मनाच्या कोंदणात सुखाचे गडद रंग भरत होते. महादेव मंदिरातून बाहेर पडून पुढे गेलो. 

                      कोसळणाऱ्या धबधब्याचा कानांवर आवाज आदळत होता. मनात रंगवलेल्या धबधब्याचे चित्र वास्तवात आता पाहणार होतो. पुढे जाताच कातळ काळ्या दगडांवरून  वाहणाऱ्या नितळगार पाण्याचे पुढे खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे शुभ्र कांती रूप साक्षात पाहताना मन अगदी सुखावले. दुपारच्या ढळलेल्या कोमल किरणांच्या सानिध्यात तो मनमोहक परिसर न्याहाळताना मन हरखून गेले. नदीच्या दोन्हीं काठानी घनघोर दाटलेली झाडी. नदीच्या त्या पल्याड झाडीझुडपांचं गोकुळचं नांदत होतं.  काठावरच्या झुकलेल्या झावळ्यांच्या दाट सावलीत विसावलेली दगडांची दाटीवाटी. काळ्या कातळांची ती आडवी मांडणी दगडांचे कप्पे पाषाणाचे एक अनोखे रूप नजरेत भरत होते. तसेच माघारी वळून पुन्हा आम्ही पूर्वेस तोंड असलेल्या काठावरच्या राम मंदिरात गेलो. वनवासात असताना श्री राम विसाव्यासाठी येथे थांबले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथल्या भूमीला विशेष महत्त्व आहे.श्री रामांच्या चरणस्पर्शाने पुणीत झालेली अशी ही भूमी. आणि पवित्र पावन असे मंदिर. गाभाऱ्यातील राम सीता आणि त्यांच्या सामोरी असलेला पवनपुत्र गदाधारी हनुमान अशा पवित्र रूपाचे दर्शन घेताना मन धन्य धन्य झाले. 

                     मंदिराच्या डाव्या बाजूला असलेलं छोटेखानी मारुतीचं मंदिर. त्याच्या वरील बाजूस आणखीन एक पुरातन मंदिर त्या मंदिरातील गाभाऱ्यात कासवमूर्ती होती. त्यानंतर मंदिराच्या पुढे आल्यानंतर निळ्यासावळ्या रूपाची ध्यानस्थ बसलेली शंकराची भली मोठी मूर्ती. त्या शंकरांच्या मुर्तीच्या पुढ्यात पाण्याच्या छोटेखानी कुंडात कमळपर्णाची दाटीवाटी. बाजूला चौकोनी समाधीस्थळ. असा सारा देखावा डोळ्यांत साठवत पुन्हा नदीच्या पात्रातील दगडावरून पाण्याच्या निकट आम्हीं जाऊ लागलो. नदीच्या मावळतीच्या काठाला एक वटलेलं चाफ्याचं झाड होतं. त्याच्या समोरील दगडाची जागा किती स्वच्छ सुंदर केली होती.जणू ती पर्यटकांच्या बसकणीची जागा होती. त्या सपय निर्मळ जागेवर निवांत ऐसपैस बसावं असं वाटतं होतं.. जिकडे तिकडे नदीतले ते कातळ काळे पाषाण, नदीच्या पाण्याने त्यांना आकार,उकार दिलेला होता. कुठे जागोजागी गोलाकार खोबण्या तयार झाल्या होत्या.  आतून कठीण कठोर असलेले कातळ वरून किती गुळगुळीत मुलायम दिसत होते. एकावर एक रचावेत एकाला एक बिलगून बसावेत अशी त्या नदीपात्रात आसनस्थ असंलेल्या कातळांची मांदियाळी. ओळीत कप्याकप्यानी विसावलेली तर कुठे आपला माथा वर काढून एका जागी स्थिरावलेली त्यांची ती अवस्था. कुठल्याही एका दगडावर आसनस्थ होऊन निवांत बसावं. संध्यासमयीच्या ऊबदार सोनेरी किरणांची मऊ शाल पाठीवर लेऊन समोरच्या निळ्याशार पाण्याकडं एकसारखं निरखत ते निवांतपण अनुभवावं. खरंच त्या काठावरची ती बैठक आत्मिक समाधानातून मनाच्या समाधी अवस्थेकडे नेते. त्या पाषाणाची स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यालाही प्राप्त होते.सुख म्हणजे काय असतं हो..? कुठं भेटतं ते..? या प्रश्नांची उत्तरं किती सहजपणे सापडत होती त्या काठावर.खऱ्या शाश्वत सुखाची अनुभूती आणखीन कुठे मिळणार..?. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे तन आणि अनेक विषयांत गुंतलेले मन विसावा घेईल ती हीच जागा. एक दीर्घ मोकळा श्वास घ्यावा तो या तीर्थावरचं.

                        आम्हीं बसलो होतो त्या समोरचं एक प्रौढ जोडपे काठाने फिरत होते.तो प्रौढ माणूस हातात दगडांच्या जीबल्या घेऊन त्या पाण्यावर फेकत होता. त्या पाण्यावरुन अलगद या काठावरून त्या काठावरून जात होत्या. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तो बालपणीचा आनंद पुन्हा नव्याने फुलून येत होता. आपलं बालपण पुन्हा नव्याने मिरवावं ते या काठावरच. त्या काठावर बसून भूतकाळाच्या पोटात शिरून बालपण आठवावं. स्वतःमध्ये हरवून जावावं. मी आणि आमचे लोहार सर एका दगडावर निवांत बसलो होतो. मनातील भाव प्रकट करण्याला तसाच एक शांत मनाचा सोबती मला मिळाला होता. त्यामुळे मोकळेपणाने मनातील भावना प्रकट होत होत्या. काही क्षण का असेना ते निवांतपणीचे क्षण कणाकणाने आम्हीं पदरात पाडून घेतले. ती आत्मिक ऊर्जा घेऊन आम्हीं एकदासे उठलो. खळखळत्या पाण्याची कोसळती उतरण पाहत त्याच्या काठावरून पश्चिमेच्या राम मंदिरांचे पुन्हा एकदा डोळे भरून दर्शन घेतले. मंदिरांच्या कळसावर भगवी पताका डौलाने फडकत होती. तो भोवताल पुन्हा एकदा नजरेत साठवत आम्हीं माघारी वळण्यासाठी निघालो. सूर्यनारायणही आता कललेला. झाडाझुडपांच्या आच्छालेल्या फांद्यातून निसटलेली मावळतीची किरणं महादेव राऊळाच्या कळसाला भेटून अस्ताला जात होती. त्या सायंकाळच्या वेळेस शांत,निर्मळ, निवलेल्या मनाने आम्हीं बाहेर पडलो. सायंकाळ धरून रामतीर्थ स्थळाला सहजच दिलेल्या त्या भेटीने जीवनातल्या रम्य आठवणींच्या शिदोरीत अविस्मरणीय क्षणांची ओंजळ भरून घातली. खूप समाधान वाटत होते.खरंच रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे असे एक तीर्थ आहे जिथे मनाला आराम आणि जगण्यातला राम भेटतो.


               - किरण सुभाष चव्हाण.

              मोबा - ८८०६७३७५२८.































गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

पाठीमागचा बेंच,ती दुपार आणि केंगार सरांचे बोल...किरण चव्हाण.


 पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि  केंगार सरांचे ते बोल...


                  २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर  बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि  मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा  वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले ,  "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं. १० वी नंतर ११ वी १२ करायची एवढचं माहिती. शिक्षक होण्याचं ध्येय वगैरे असलं काहीच माझ्या ध्यानात ना मनात. पण मला एक प्रश्न पडला, सरांनी मलाच का उठवावं आणि मलाच असं का सांगावं बरं..? या प्रश्नांच्या शोधात मी माझ्यातच हरवत गेलो.सर मला असं बोलले याचा अर्थ नक्कीच माझ्यात काही तरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी गरिब परिस्थिती, वडिलांचा संघर्ष सरांना जवळून माहिती होता. सरांचं ते बोलणं मी मनावर घेतलं  आणि दुसऱ्याच दिवसापासून पुढच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बेंचवर बसायला लागलो. ते शेवटी १२ वी पूर्ण होईपर्यंत. 

                     बाबांनी माझ्याविषयी बघितलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने  केंगार सरांनी माझ्या हृदयात घट्ट रुजवलं. अधिक मजबूत केलं. तेव्हापासून केंगार सरांच्या विषयी माझ्या मनात एकप्रकारचा जिव्हाळा निर्माण होत गेला. त्या दिवसापासून मी ठरवलं की, जे शिकायचं ते मनापासून शिकायचं. वर्गात शिक्षक जे काही शिकवतील ते मन लावून शिकू लागलो. गांभीर्याने अभ्यास करू लागलो. केंगार सरांच्या त्या वाक्याने मी पूर्णतः बदलून गेलो होतो. बारावीला तर सरांनी न सांगता माझा मीच विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून तपासायला सरांच्याकडे द्यायचो. काही वेळा भर वर्गात केंगार सर माझी उदाहरणे सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यावेळी आतून खूपच प्रेरणा मिळायची.  काही दिवसांत मी एक अभ्यासू शांत विद्यार्थी म्हणून शिक्षकांच्यासह माझ्या मित्रपरिवारात परिचयाचा झालो. केंगार सर मराठी विषय इतक्या आंतरिक तळमळीने शिकवायचे की संपुर्ण वर्ग चिडीचूप शांतता असायची. त्यांनी शिकवलेला शंकर पाटील यांचा 'छलांग' हा पाठ अजूनही माझ्या मनात रेंगाळतोय. दहावीला असताना देखील केंगार सरांनी असाच एक पाठ शिकवला होता 'लाल चिखल' नावाचा. आज ही टोमॅटो पाहिले की ती लालेलाल घटना डोळ्यासमोर तरळत राहते. इतकी जादू त्यांच्या शिकवण्यात होती. मराठी कथा,कविता शिकवण्यात सरांचा हातखंडाचं होता. कविता शिकवायला लागले की अनेक कवितांचा संदर्भ द्यायचे. कवी नारायण सुर्वे यांची 'दोन दिवस..' ही कविता तर अंगात रोमांच फुलवायची. त्या कवितांचे सरांनी केलेले रसभरीत वर्णन थेट हृदयाला भिडायचे. 

                          सर एखादा पाठ शिकवताना अनेक लेखक, कवी यांच्या पुस्तकांचा परिचय करून देत असायचे.  त्यावेळी दया पवार यांचं बलुतं, किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर, आनंद यादव यांची झोंबी,उचल्या,उपरा या कादंबऱ्या वारंवार वाचण्यास सांगायचे म्हणून तर पुढील काळात या साऱ्या  कादंबऱ्या मी वाचून काढल्या. सरांच्या अशा साहित्यिकविषयक अध्यापनाचा माझ्यावर असा परिणाम झाला की,   मी ही कॉलेजला असताना लिहायला लागलो. मोडक्या तोडक्या कविता रचू लागलो. या वयात लेखनीचं बाळकडू सरांच्याकडून मिळालं म्हणायला हरकत नाही. पुढे बारावी झाल्यानंतर मी जी पहिली कादंबरी लिहली 'नवसाचं पॉर' ही कादंबरी मी पहिल्या प्रथम केंगार सरांना वाचावयास दिली होती. सरांनीही ती आत्मीयतेने वाचून माझं कौतुक करत त्याबाबतीत काही सूचना मार्गदर्शन  केले. त्यानंतर जिथं तिथं माझा विद्यार्थी किरण याने कादंबरी लिहिली आहे असं अभिमानाने सर्वांना सर सांगायचे.सरांच्या अशा प्रेरणेने पुढे लिहू लागलो. बारावी झाल्यानंतर निपाणीला  डी. एड ला प्रवेश घेतला. निपाणीला येण्या जाण्याच्या  नेहमीच्या वाटेवर माझे ज्युनिअर कॉलेज लागायचे. त्यावेळी न चुकता माझ्या कॉलेजला मी वंदन करायचो. आणि त्यावेळी केंगार सरांची आवर्जून आठवण व्हायची.  एखाद्या माहेरवाशीणीला सासरी गेल्यानंतर क्षणाक्षणाला माहेराची आठवण व्हावी तशी पुढच्या शिक्षणाची वाट धरल्यानंतर मला माझ्या मागच्या ज्युनिअर कॉलेजची आठवण होत रहायची आणि जशी माहेरातली माय तसे कॉलेजमधील माझे केंगार सर यांच्या आठवणीने मी अस्वस्थ व्हायचो. आमचं नातंच असं मायलेकरांच्यासारखं झालं होतं. सरांना ही माझी उणीव भासत असत, कॉलेज सोडून गेल्यानंतरही सर माझी वरचेवर आठवण काढायचे हे माझ्या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून मला समजायचे. मला ते विद्यार्थी म्हणायचे की, "किरणदादा आज वर्गात केंगार सरांनी आम्हांला तुझं उदाहरण सांगितले."  ते ऐकूनच माझं मन भरून यायचं.

                  आणखीन एक गुपित एवढ्या वर्षानंतर मी उघड करतोय. कारण हीचं ती वेळ आहे असं मला आज मनोमनी वाटतंय. ज्यावेळी मी ११- १२ वी ला होतो त्यावेळी कॉलेज सुटल्यानंतर दुपारच्या वेळेत रानात शेळ्या चारायला घेऊन जायचो. त्यावेळी  सोबत पुस्तक,वही, पेन आखीव ताव असं काही असायचंच.ती दुपार मला आज जशीच्या तशी आठवतेय. त्या काटेरी बाभळीच्या झाडाखाली का कुणास ठाऊक त्या दुपारी उगाचंच मी पानांवर काही तरी मांडण्याचा प्रयत्न करत होतो...

हीच ती बाभळ आज ही त्या ठिकाणी उभी आहे.

             कुणाबद्दल..? तर केंगार सरांच्याबद्दल...मी का लिहीत होतो..? मला कुणी लिहायला सांगितलं होतं..?  बरं जे लिहिणार ते सर वाचणार होते का..? काही काहीही माहिती नाही. फक्त लिहायचं एवढं खरं ते फक्त आपल्या केंगार सरांच्याबद्दल... कारण नसताना एखाद्या प्रियकराने हृदयाच्या देठापासून ओल्या अंतकरणाने आपल्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहावं.तसा तो भाव त्यावेळी त्या पत्रात होता का..? होय तोच शुद्ध, निर्मळ निरागस मनाचा भाव होता.म्हणजे ऐन तारुण्यात पोरं पोरींना प्रेमपत्र लिहितात. पण मी मात्र आमच्या सरांना प्रेमपत्र लिहीत होतो. पण त्या मुक्या भावनेला नेमक्या शब्दांची गाठ पडत नव्हती. तरीसुद्धा कशी तरी अक्षरं त्या पानांवर उमटत होती. पण त्यावेळच्या हृदयाच्या गाभऱ्यातून  मुक्या भावनांचं  वेडंवाकडं पत्र सरांच्यापर्यंत कधीच पोहोचलं नाही. सरांना आज हे वाचताना आश्चर्य वाटेल. 'ये हृदयीचे ते हृदयी' या हृदयातून उमटलेल्या  निरागस भावना सर आपल्या हृदयापर्यंत पोहोचायला आज एक तप उलटून गेलं आणि तो क्षण साक्षात आज आला आहे. 

                      त्या वेळचा आणखीन एक प्रसंग मला आठवतो. रात्रीची वेळ होती. लाईट गेली होती आणि त्या अंधारात माझी आई घरातचं शेळीचं दावं पायात आडवं आल्यानं पडली आणि आईचा हात दुखावला. त्या रात्री त्या हाताला खूप सूज आली आणि वेदना ही फार होत होत्या. तिला दुसऱ्या दिवशी गडहिंग्लजला खाजगी दवाखान्यात दाखल केलं. तेंव्हा डॉक्टरांनी सांगितले की, हाताचं ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळी तेवढे पैसे भरण्याची आमची परिस्थिती नव्हती. काय करायचे मला सुचत नव्हते. या कठीण प्रसंगात मला एकाच व्यक्तीची  आठवण होत होती ते म्हणजे माझे केंगार सर. लागलीचं मी गावाकडे आलो. सर कॉलेजमध्ये भेटतील म्हणून त्यांच्या आधाराच्या ओढीने मी माझ्या पांगिरे गावापासून धावतच माझं कॉलेज गाठलं आणि सरांना सर्व हकीकत सांगितली. मी हतबल होतो,पुढे काय करायचं काहीच सुचत नव्हतं. पण सरांनी माझ्या पाठीवर हात ठेवत मला धीर दिला आणि त्यावेळस पैशाचीही मदत केली.

                 शिक्षणाच्या निमित्ताने जरी मी बाहेर पडलो तरी सरांशी असलेला घट्ट ऋणानुबंध नेहमी दृढ होत राहिला. डी.एड नंतर खऱ्या अर्थाने नोकरीसाठीचा माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी सरांनी वर्गात सांगितलेल्या नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेची मला तीव्रतेने आठवण व्हायची. मध्यंतरीची वर्षे पालापाचोळ्यासारखी उडून गेली. नोकरी लागेपर्यंत खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या काळात केंगार सर मला वेळोवेळी कठीण प्रसंगात आर्थिक मदत करत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर मी एका विनाअनुदानित शाळेत नोकरीला लागलो.  विनाअनुदानितच्या काळात ते आजपर्यंत सर मला वडीलकीच्या नात्याने मला धीर,आधार देत आले. मी जिथे शाळेत नोकरी करत होतो त्या ठिकाणीही सरांनी वेळ काढून एकदा माझ्या शाळेला भेट दिली होती.

                        गुरुचे आशीर्वाद गुरुचे बोल किती खरे ठरतात. याचा एक साक्षात्कार मी सांगेन. ज्या वेळी मी नोकरीमध्ये नव्हतो, त्यावेळी सर एकदा मॅडमांच्यासह माझ्या घरी अचानकच आले. त्यावेळी माझ्या घरची,माझी अवस्था बघून मॅडम हळहळल्या. अजून नोकरी नाही,ही अशी गरिबी परिस्थिती पुढे लग्न वगैरे कसं व्हायचं..? मॅडम माझ्याविषयी फारच चिंतीत झाल्या होत्या. त्यावेळी सर मला एक वाक्य बोलले, " किरण...तुझं चांगलंचं होणार काळजी करू नकोस, तू मुलगी बघायला कुठंही जायचं नाहीस, उलट एक दिवस मुलगीवाले तुझ्या घराकडं येतील." सर असे बोलून गेले आणि आज सरांचे हे बोल खरे ठरताना मी अनुभवतोय. आज आईवडिलांच्या,गुरूंच्या आशीर्वादाने माझी  विनाअनुदानितवरून  १००% अनुदानित शाळेवर बदली झाली. आणि आता...

बदल गयी है दशा बदल गयी है दिशा 

अब हवा का मोड भी बदल जाएगा | 

               कोणती नवीन पुस्तकं वाचायची, कोणत्या विषयावर लिहायचं, साहित्य कथा कविता यावर आजही सरांची आणि माझ्यात चर्चा होत असते.सरांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत असते. वर्गातले ज्ञान आज वर्गाबाहेरही मला मिळते त्यामुळे माझ्यासारखा मीच भाग्यवान..!  सरांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि माझ्याही हृदयस्थानी केंगार सरांचे स्थान हे आईवडिलांच्यासमान आहे. सरांच्या कुटुंबाशी ही माझे तितकेच घरोब्याचे संबंध आहेत. माझ्या वाटचालीत सरांचे नेहमीच मार्गदर्शन होत आले आणि याही पुढे होत राहील हा माझा विश्वास आहे. एका पाठीमागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला पुढं आणून आपल्या प्रेरणेतून शिक्षक होण्याचं स्वप्न दाखवून दारिद्र्यरेषेच्या वर आणणारा असा शिक्षक लाभण हे त्या विद्यार्थ्याचं भाग्य म्हणायचं. नाही तर पाठीमागचा विद्यार्थी पाठीमागेचं राहिला असता अशा शिक्षकांच्यामुळे तर आज मी हे सन्मानाचे दिवस पाहतोय...

                     केंगार सर आज २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख अशा संमिश्र भावना मनात दाटलेल्या आहेत.आनंद यासाठी की, सर आता निवृत्तीनंतरचे जीवन मुक्तपणे स्वतःसाठी जगू शकतील आणि दुःख यासाठी की एक हाडाचा शिक्षक चार भिंतीच्या वर्गात शिकवण्यासाठी इथून पुढच्या विद्यार्थ्यांना दररोज लाभणार नाही. पण केंगार सरांच्या सारखे शिक्षक हे वर्गापुरते सीमित नाहीत तर  बाहेरच्या दुनियेच्या शाळेत पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदैव पुढं आणण्याचं काम ते अखंडीत करत राहतील. हे मी माझ्या अनुभवारून ठामपणे सांगतो...आणि मी विराम घेतो...शेवटी एवढेच सांगेन..

सर तुम्ही शिकवलेत धडे जीवनाचे 

त्या धड्यातून जीवन घडवत राहू...

सर तुम्ही शिकवल्यात कविता अनेक

त्या कवितांचा अर्थ जगण्याला देत राहू...

सरांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखा,समाधानाचे आनंदाचे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

जय हो..!  मंगल हो..!!


 किरण सुभाष चव्हाण

८८०६७३७५२८.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता. - किरण चव्हाण.



 

माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता.

                                  आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.?  ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. सद्सविवेक बुद्धीची हरपलेली शुद्ध. वरून जरी निर्मळ शांतता दिसली तरी अविचारीपणाचे असंख्य विखारी डंख मूकपणे सोसत असलेलं आतून कमालीचं अशांत मन. अशी एक प्रकारची मनाची वादळी अवस्था. मानवी मन म्हणजे चित्रविचित्र भावनांचा आणि विचार,अतिविचारांचा माजलेला कल्लोळचं असतो म्हणा. 

                              आज विजयादशमीची शाळेला सुट्टी असल्यामुळे संपूर्ण दिवस घरीच होतो. चांगला सणाचा भरला दिवस. याचा आनंद घ्यायचा राहू द्या बाजूलाच. माझं मन एका वेगळ्याच वादळाच्या कचाट्यात सापडल्यासारखं आपल्याच भोवतीने फिरत होतं. आजूबाजूच्या परिस्थितीपासून अनभिज्ञ असलेलं मन. एखादं चांगलं पुस्तक वाचावं, नाही तरी कुठे फिरायला जावं काहीच करू वाटेना. बरं मोबाइलवर काही चांगलं बघावं तरी तिथेही मन कुठंच रमत नव्हतं, नुसत्या विचारांच्या तंद्रीत धुदंपणे सगळा दिवस झोपून काढला झोप तरी कुठली लागतेय म्हणा लोळूनचं काढला..

                           अशी सगळी आदल्या दिवशीची पार्श्वभूमी. रोजच्या सवयीप्रमाणे आज भल्या पहाटे उठून सव्वा पाचला फिरावयास बाहेर पडलो. पहाटेच्या अगोदरचा काळाकुट्ट गडद अंधार आजूबाजूला पसरलेला,एकप्रकारची निरव शांतता, वातावरणातील बोचरा गारवा आणि मी रस्त्याने एकटाचं चालत असलेलो. मनात विचारांचा हल्लकल्लोळ माजलेला आणि मग या घालमेलीतून सुटका करण्यासाठी सवयीप्रमाणे स्वसंवाद साधत म्हणजे स्वतःशी संवाद करत पुढे चालणे सुरू होते. जगण्याच्या या वळणावर अति जटिल झालेले प्रश्न सोडवताना खरंच माझी दमछाक होत होती. याच चिंतनात डुबलो असताना बापाच्या जगण्याची तीव्रतेने आठवण झाली.  बापाच्या अस्तित्वाची किंमत मला जाणवत होती.

                          बाप..!  बाप असताना नाही तर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने अधिक कळतो. बाप असताना मला कळायचाच राहून गेला. आणि आता कळत असताना बाप जवळ नाही. बापाविना पोरका असलेला आजचा मी. डोळ्यांत, मनात आठवणीतला बाप घेऊन वास्तवात बापाविना जगतोय खरा पण क्षणाक्षणाला बाप आठवत राहतो, मनातल्या आठवणींच्या दाटीन गळ्यात हुंदका दाटत राहतो. 'बाप' या दोन अक्षरांच्या नावानं टचकन पाणी येतं याच्यापलिकडे आज माझ्या हातात बाप उरला नाही.  मूकपणे अश्रूं गाळण्याइतपत कशानेही बाप व्यक्त करता येत नाही.पण एक खरंय मेलेली माणसं जगासाठी दूर गेलेली असतात. पण जिवाभावाच्या माणसांच्या अधिक ती जवळ आलेली असतात. फरक एवढाच असतो. फक्त ती देहानं जरी नसली तरी त्यांच्या आठवणींच्या अस्तित्वाचा सुगंध मनाच्या कुपीत दरवळत असतो.प्रत्येक श्वासात,ध्यासात भरलेला असतो.

                        हे गुपित सहसा उघड करायला नको हवं होतं. तरीही ते का करतोय कुणास ठाऊक ? बापाला भेटण्याची, त्याच्याशी हितगुज करण्याची एक चांगली जागा मला सापडलीय. ती म्हणजे एकांत. बापाची आणि माझी भेट घालून देतो तो म्हणजे हा एकांत आणि सोबतचा हा काळामिट्ट अंधार. मी बेभान होऊन बोलत राहतो बापाशी. त्याच्यावाचून एकटेपणाच्या जाणिवेने आकांत मांडतो. त्या काळ्याकुट्ट अंधाराच्या पोटात बापाच्या ओढीनं रडत राहतो अंदाधुंद ओक्साबोक्शी. आणि शेवटी माझे अश्रू माझे मीच पुसून मनाची समजूत घालून त्या अंधारातून बाहेर पडतो आणि पुन्हा सामील होतो या झगमगीत दुनियेतील माणसांच्या गर्दीत. पुन्हा बापावीना ओसाड जीणं सुरू होतं. या अगोदर पुढे जाताना मागे बाप नावाचा आधार होता.जग जरी फिरून आलो तरी बापाजवळ मुक्काम होता. जगण्याच्या वाटेवर चालताना मागे बापपणाच्या ऊर्जेचा स्रोत होता. आता मागे वळून पाहिलं की बाप नाही. या जगण्याच्या प्रवाहात पुढे वाहवत जाताना मागे बाप नावाचे उगमस्थान नाही. 

                    बाळ पावलं टाकत असताना आई हळुवार हात सोडवून घेते कारण बाळांन स्वतःहून चालावं.  आता बापानं मला स्वतःच्या हिंमतीवर जगण्यासाठी सोडून दिलंय असं वाटतं. आणि मग जगण्याच्या या संघर्षात ती हिंमत सिद्ध करताना माझा कस लागतोय. मला भेटलेली चांगली, वाईट माणसं. मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी तर कधी  मनाला नकारात्मकतेच्या खाईत लोटणारी माणसं. आपला वापर करून घेणारी, गैरसमज पसरवून देणारी, सहनशिलतेचा अंत पाहणारी, अनादर करणारी, अशी कितीतरी माणसं. कधी दूरची  तर कधी जवळची माणसं देखील याला अपवाद ठरू शकत नाहीत. जीवापाड जपलेल्या,जीव लावलेल्या आपल्या प्रेमाच्या माणसांच्याकडूनही मनांवर आघात होत राहतात. खरं तर माणसाच्या उभारणीला आणि ढासळण्याला भोवतालच्या परिघातली माणसचं कारणीभूत असतात. जणू ही माणसं पचवण्यासाठीच जीवनातील शक्ती खर्च होतेय. पण या सर्वांना पुरून उरण्याची शक्ती देणारा बाप ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी अशी माणसं क्षुल्लक वाटतात. पण बापचं नसेल तर स्वतःलाचं क्षुल्लकपणाची तीव्र जाणीव होते. नुसत्या 'बाप' नावाच्या दोन अक्षरांचं पाठबळ काय असतं ना ? ते असं माणसांनी भरलेल्या जगात बापाविना एकटं पडल्यावर कळतं.

                    माणसांच्या गर्दीत अक्षरशः जीव गुदमरून जातो. जगण्याच्या या वास्तवतेला भिडताना मी कुठेतरी कमी पडण्याची सत्यता मला नाकारता येणार नाही. संपूर्ण शक्ती एकवटून जगण्याची ही लढाई पूर्णपणे ताकदीने लढावी असं वाटत नाही. मग मी खरंच दुबळा आहे का ? साध्या, सरळपणाने इथे जगताचं येणार नाही का.?  आणि खरंच जगण्याची ही लढाई शेवटपर्यंत मला लढता येईल का  ? जगण्याची हिंमत शेवटपर्यंत टिकवून ठेवता येईल का..? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना आतल्याआत घुसमट होत राहते.

                    अशावेळी शेवटी बापच आठवत राहतो.  जो बाप ज्याला डोळ्याने धड दिसत नव्हतं. चालताना धडपडत जायचा,चाचपडत काम करायचा आणि कुटुंब चालवायचा तो माझा बाप पण कुठल्याही संकटाला झुकला नाही, वाकला नाही शेवटपर्यंत जगण्याचा हा संघर्ष चिवटपणे नी चिकाटीने पेलत राहिला. जो बाप ज्याला दृष्टी नव्हती पण ज्याने जगण्याला एक दृष्टिकोन दिला होता. कुठल्याही बाक्या कठीण प्रसंगात बापाचा असणारा करारी बाणा. जवळ काही नसताना जगण्याची ही लढाई न कुरकुरता स्वाभिमानाने लढत राहिला.ज्या बापाने स्वतःच्या जगण्यातून जगण्याचा असा धडा मला घालून दिला होता.

                       आणि आज माझ्याकडे सर्व काही असून जगण्याच्या या लढाईत माझी एवढी हतबलता का व्हावी ? कशासाठी ?  आताच्या वेळेला बापाचं जगणं स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... बापाच्या नजरेतून स्वतःला पारखु लागलो. जणू बाप आज मला या अवस्थेत पाहतोय. माझ्या बापाला माझी अशी हतबल झालेली अवस्था पाहवेल ? नाही कदापि नाही.  असा लेक माझ्या बापाला पसंत नाही. संघर्ष,वादळं येणारचं आहेत पण त्याला हिंमतीने सामोरे जाण्याची तयारी ठेवणारा लेक या बापाला हवा आहे. .स्वतःच्या बदलाची कुठे तरी आतून तीव्र जाणीव होऊ लागली.

                         आता एक बाप नावाची अव्यक्त शक्ती माझ्या भोवतीने पिंगा घालत होती. बाप शरीराने माझ्याजवळ नाही पण त्याचे विचार,संस्कार आजही मला काहीतरी शिकवण देत होते. या गुरफटलेल्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मनातून उचंबळून बाहेर येत होते. बापाची मनातली प्रतिमा,त्याचे विचार आठवून फक्त एका वाक्याच्या प्रेरणेंने नुकतंच जीवन बदलून टाकणारं एक यशस्वी वळण मी घेतलं होतं. तेच वाक्य मला पुन्हा पुन्हा आठवण करून देत होतं ते वाक्य होतं, "लेका रडायचं नाही आता लढायचं." 

                       आणि कालपर्यंत नकारात्मकतेच्या वादळात सापडलेलं माझं मन पुन्हा लढण्यासाठी सज्ज होऊ लागलं. मनातलं भिरभिरणार वादळ आता कुठे शांत होत होतं. शेवटी हेच खरं मनातल्या नकारात्मकतेला मनातून उलथून टाकण्याची तयारी मनातच करावी लागते. बाहेरून केलेल्या उपचारांचा परिणाम हा तत्काळ असू शकतो. आता अंधार नाहीसा होऊन नुकताच पहाटेचा उगम झालेला, चारी दिशा उजळलेल्या होत्या. अंधाऱ्यारात्रीनंतरचा उष:काल हा नकारात्मक अंधारानंतर निपजणारा सकारात्मक प्रकाश या बदलाच्या सत्याला दुजोरा देत होता. ज्या अशांत मनाने घराबाहेर पडलो त्याचं शांत प्रसन्न मनाने आता मी घराकडे परतत होतो.

                 आज शाळेत  दिवसभर करावयाच्या अध्यापनाची तयारी  म्हणून अभ्यासाला बसलो. प्रथम दहावीचंच पुस्तक हातात घेतलं. नियोजनाप्रमाणे आज युनिट 3.1 मधील If ही कविता मुलांना शिकवायची होती. आणि ती अभ्यासताना हा काय दुर्मिळ योगायोग म्हणायचा ?  अभ्यास करताना लक्षात आले की, युनायटेड किंगमडमधील नोबेल परिषोतिक विजेता महान लेखक,तत्वज्ञ रुडीयार्ड किपलिंग यांची If ही कविता म्हणजे एका बापाने आपल्या मुलाला कसं जगावं यासाठी केलेला बोध आहे. मी अगदी भारावून ती कविता अभ्यासत होतो. पहाटेचा प्रसंग आणि आताची ही कविता. ह्या विलक्षण योगायोगाने अक्षरशः मी थक्क झालो. या कवितेचा थोडक्यात संदर्भ असा. या कवितेच्या माध्यमातून बाप आपल्या मुलाला सांगतो आहे....

                      'जेव्हा तुझ्यावर सर्वजण रागावतील, तुला दोष देतील तेंव्हा तू तुझे डोके शांत ठेव. सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवतील त्यावेळी तुझा तुझ्यावर विश्वास असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वाट पहा. आणि वाट पाहताना थकून जाऊ नकोस.संयम राखून ठेव,तुझ्याविषयी कोणी असत्य बोललं,तुझ्याविषयी गैरसमज पसरवले  तरी तू शांत रहा. कुणी तुझा तिरस्कार करतील,अपमान करतील त्याचा तुझ्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नकोस, आनंदाने हुरळून जाऊ नको अथवा दुःखाने खचून जाऊ नको. स्थितप्रज्ञ रहा, तू कष्टाने मेहनतीने मिळालेली एखादी गोष्ट नष्ट झाली तरी तुझ्या क्षमतेनुसार तू त्याला नवीन आकार दे, ती गोष्ट नव्याने निर्माण कर. शत्रू असो अथवा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक कुणीही तुला दुखावले तर त्यांना समान वागणूक दे.वेळेचं मूल्य लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा तू जर सदुउपयोग केलास तर आणि तरंच हे जग तुझे असेल आणि इथली प्रत्येक वस्तू तुझी असेल. शेवटी तुला एक उत्तम आणि परिपूर्ण माणूस बनायचं आहे लक्षात असू दे. असा एका बापाकडून आपल्या मुलाला सकारात्मक महान संदेश देणारी ही कविता.'

            

                 पहाटेच्या अंधारात बापाच्या आठवणीतील सखोल चिंतनात मिळालेला सार जणू या कवितेतून प्रकट होत होता. खरंच मी आतून भारावून गेलो होतो.  ही कविता वर्गात मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवली. एका बापाचा संदेश मुलांपर्यंत पोहोचवणारा मी दुवा झालो. चार भिंतीच्या आत रुडीयार्ड किपलिंग यांची कविता मुलांना मी शिकवताना जीवनाचा आणि शिक्षणाचा कसा मेळ घातला गेला आहे हे माझ्याच अनुभवातून सिद्ध झाले होते. शिक्षण म्हणजे जीवनाचे प्रतिबिंब असते ते खरेच. शाळेबाहेरच्या जगात एक माणूस म्हणून मी जे काही अनुभवतोय,मी ज्या समस्यांना तोंड देत आहे.त्या समस्येचं निराकरण मला करून पुढे जावं लागतं. पण भविष्यात अशाच प्रसंगांना आपल्या विद्यार्थ्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे त्यावेळी तो आपली समस्या सोडवण्यासाठी समर्थ असला पाहिजे त्याची पूर्वतयारी म्हणून आपले शिक्षण हे आपल्या जीवनाच्या पैलूंना जोडले आहे याचे समाधान वाटले. किपलिंग जे ज्ञान कवितेच्या माध्यमातून मुलांना सांगू पाहतात अगदी याच ज्ञानाचा साक्षात्कार  भल्या पहाटे माझ्या बापाच्या प्रत्यक्ष जगण्याच्या स्मरणातून मला झालेला होता. यातला योगायोगाचा भाग सोडला तर आपले जीवन,समस्या,प्रश्न आणि त्याला मिळणारं उत्तर हे सारखंच असतं हे कळून येतं.

                           एकीकडे मला सोडून गेलेला शिक्षणाचा कसलाही गंध नसलेला माझा बाप. आणि दुसरीकडे नोबेल पारितोषिक प्राप्त महान लेखक रुडीयार्ड किपलिंग यांची if ही कविता. जेव्हा एका लेकाच्या भूमिकेतून मी ज्यावेळी या दोन्ही गोष्टींच्याकडे पाहतो त्यावेळी माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची ही कविता मला एकाच ठायी दिसते. दोघांच्यातील जगण्याचं तत्वज्ञान सारखंच होतं. फक्त फरक एवढाच की, किपलिंगने बापाचं सांगणं कवितेतून मांडलं आणि माझ्या बापानं ते स्वतःच्या जगण्यातून सांगितलं होतं. म्हणजे बापाच्या प्रत्यक्ष जगण्यातून मला ते कळालं होतं. शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय.?  जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी अशी विद्या की जी, कुठल्या ग्रंथातून, कवितेतून व्यक्त होते तर कुणाच्या जगण्याच्या अनुभवातून. अशी जीवन जगण्याची विद्या आपल्या मुलाला सांगणारा प्रत्येक बाप हा आपल्या मुलांसाठी जितेजागते विद्यापीठ असतो शेवटी हेच खरं..!


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८







'आपल्याला या लेखाविषयी काय वाटते खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर लिहा.'

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.



आर्दाळ शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.


                       माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक दशरथ अस्वले यांनी शिक्षक-पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....किरण चव्हाण


 वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट....


                       रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु  रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलला,


 "सर आता तुम्हीं एवढ्या लांबुन आलाय घ्या की,अजून दोन तास ज्यादा. बघुया या मुली थांबत्यात का..? " दत्तराज आणि मुलींचं मुळातच पटत नव्हतं. एकमेकांच्या कळी काढण्यात दोघेही माहीर. आता मुलीही चिरडीला पडल्या आणि म्हणाल्या, 

"सर अजून दोन तास घ्यायचेच. पण आम्हांला आता घरी सोडा आम्हांला भुका लागल्यात. आम्हीं जेवून येतो. मग पुढचं शिकवा."

मला ही कौतुक वाटलं. एरव्ही मुलांना रविवारीची सुट्टी म्हणजे आपल्या हक्काचा आणि मुक्तपणे बागडण्याचा दिवस. असं असतानाही ही मुलं अभ्यासाला प्राधान्य देत होती.मुलींना जेवायला घरी सोडले. पण जाता जाता त्या प्रश्न करीत होत्या. 

"सर तुम्हीं कुठे जेवणार..?" 

तुम्हीं या जेवून माझं मी बघतो. असं म्हंटल्यावर सगळ्याजणी घरी गेल्या. मधल्या वेळेत पुढच्या घटकाची मी तयारी करू लागलो. तासभर असाच गेला. पुन्हा मुलींचा गलका बोलत चालत वर्गात हजर झाला. मात्र आल्या आल्या सगळ्याजणींचा एकच प्रश्न,

" सर तुम्हीं जेवलात का..? आणि कुठे जेवलात..? मी म्हणालो "माझा विचार तुम्हीं करू नका. चला पुढे आपण उदाहरणे सोडवायला सुरू करू " पण त्यावर मुलींचे काही समाधान झाले नाही. त्यात दत्तराजने अधिकच भर टाकली.

"सर तुम्हांला इथेच ठेऊन ह्या जेवून आल्यात . सर आता  तुम्हीं चला माझ्या घरी जेवायला." 

दत्तराज तर त्यांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हता. आता तर त्याने वर्मावर बोट ठेवले होते. 

ये तू गप्प बस तिथे ते आमचं आम्हीं बघून घेतो " सगळ्या मुलीं दत्तराजवर तुटुन पडत होत्या. मला त्यांची गंमत वाटत होती.

"सर तुम्हीं जेवला की नाही आम्हांला अगोदर सांगा..." मुलींचा एकच प्रश्न. आता काय बोलायचे पण मी ही गंमत करायची म्हणून सहजपणे बोलून गेलो. "अरे तुम्हीं जेवलात म्हणजे माझं पोट भरलं...आणि हो मला आता भूक नाही. मी घरी जाऊन जेवेण चला आपण पुढच्या घटकाला सुरवात करूया."

                  आणि फळ्यावर घटकाचे नाव लिहिले. पण मुली जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या. शिकण्यात त्यांचे मन नव्हते. मी त्यांना खुप समजावून सांगितले पण ऐकतील त्या मुली कुठल्या. त्याची अस्वस्थता अधिकच वाढत होती. त्यात शेवटीला बसलेली प्रीती तर अधिकचं अस्वस्थ आणि हिरमुसलेली दिसत होती. मुली नाईलाजाने शेवटी म्हणाल्या "निदान  सर आम्हीं दुकानातून तरी काही  आणतो." असा त्यांचा हट्ट. पण मी नाकारले. हा विषय बाजूला ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या हा माझा आग्रह पण त्या अस्वस्थतेतून मुलींचा शेवटी एक निग्रह ठरलाचं. काहीं तरी ठरवून अचानक प्रीती आणि कस्तुरी उठल्या आणि म्हणाल्या "सर आम्हीं काही मिनिटातचं बाहेर जाऊन येतो." 

मला माहिती होते मी अंदाज केला की, दुकानातून काही तरी आणण्याच्या उद्देशाने त्या म्हणत असाव्यात म्हणून मी सुरुवातीला नाहीचं म्हणालो. पण शेवटी मला त्यांचा हट्ट मोडवेना.  परवानगी देताच त्या बाहेर गेल्या. मी पुन्हा पुढच्या उदाहरणाकडे वळलो. किमान अर्धा पाऊनतास उलटला तरी यांचा पत्ता नाही. त्यांच्या अनुपस्थित पुढची उदाहरणे घ्यावी लागली.शेवटी दोघीही एकदम आल्या ते हातात एक पिशवी घेऊनचं. पिशवीत काय होते..? तर डबा. मी पुढे काय बोलणार..? सर आधी जेवून घ्या आणि मग शिकवा.


शेवटी मुलींनी आपले म्हणणे खरे केलेच. आता मला त्यांचं ऐकणंचं भाग होतं. शेवटी तिथेच बसलो. पिशवीत दोन डबे होते.डबे काढून टेबलवर ठेवले. डबा उघडला. एका डब्यात भाकरी व दुसऱ्यात भाजी. डब्यातली भाकरी तर अगदी गरमागरम. जणू नुकतीच तव्यातून काढली असावी अशी. भाकरीचा तुकडा मोडता मोडताचं मी प्रीतीला विचारलं. 

"प्रीती भाकरी गरम आहे. आता नुकतीच केलीय का.?" तिने हो म्हटले... 

मी न राहवून विचारलं "छान मऊसूत भाकरी आहे. कुणी बनवलीय भाकरी. ?" 

" सर मीच बनवली भाकरी." तिने उच्चारलेले हे वाक्य ऐकून मी निशब्दचं झालो. एवढी मऊसूत भाकरी एवढ्या लहान मुलीने बनवावी. एवढ्या लहान वयात मुलींना भाकरी करता येते याचं एकीकडे कौतुक होतं तर दुसरीकडे त्यांच्या निरागस संवेदनशीलपणाबद्दल समाधानही वाटत होते.

आम्हीं जेवलोय पण आमचे सर उपाशी आहेत म्हटल्यांवर माझ्या विद्यार्थींनीचं ते कासावीस होणं.  माझ्या लहानग्या विद्यार्थीनीनं घरी जाऊन, घाईगडबडीने चिमुकल्या हातांनी भाकरी थापून गरमागरम भाकरी माझ्यासाठी घेऊन येणं.माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. किती निर्मळ निरागस प्रेम म्हणायचं हे. काय बोलावे मी भारावून गेलो.खरंच त्यावेळी  त्या चिमुकल्यांच्यासमोर जे उरात दाटलं ते शब्दांत व्यक्त करता नाही आलं. 

किती काळजी,प्रेम वाहतात  ना मुलं..? हे भाग्य एका शिक्षकाच्याचं नशिबी असू शकतं. खरंच मला आतून वाटलं यालाच म्हणायचं भाग्य. ज्याचा मी वाटेकरी होतो. एक रुचकर चवीच्या भाकरीचा ढेकर देऊन मी तृप्त तर झालोच. पण माझ्या विद्यार्थ्यांची काळजी,प्रेम पाहून मी अंतःकरणातूनही तृप्त झालो. आता त्या अवीट गोडीच्या गरमागरम भाकरीची गोष्ट चिरंतन माझ्या समरणात राहील.


- किरण सुभाष चव्हाण.

८८०६७३७५२८.

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.

 

er 15, 2022

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.


A novel that explores the life of Sugaran Paksha and looks into the world of birds: Calvin


                         A short novel 'Kalvin' written by Ramakrishna Magdoom based on bird life, which can be read while sitting, but the exact description of bird life is captivating. Sometimes people who shoot birds with a gun, today their lives are written in novels. This means that the novel testifies to how kind, sensitive and understanding human beings are to the world beyond their own existence. The struggle in the world of Bayaji and Baya, the son-in-law and Sugarni couple and the parties living with them, is presented in a flowing style. So far, novels related to human life have been read, but while reading this novel about bird life, there were many questions in the mind that how should the author have combined the nature of the novel with imagination and reality? But while reading at the beginning, we don't even know how we go from the isolated human world to the bird world in close proximity to nature. That is, the human mind is so extraordinary that just as water assumes the shape of a vessel, our mind can harmonize with any living being i.e. animal parts. While reading, we get in tune with that Sugaran Party, its ongoing struggle. The author takes Bayaji as the main character and presents his life and his surroundings very minutely. While reading the novel, every word had to become one with the nature and bird life. That nature, bushes, vines, grass becomes our surroundings. Even the eyes become green while reading. The bird of our mind also sits separately in the hanging skull of that Sugarni on the well. How is the inside of the shell, how is the nest inside, those sparrow chicks, the mind is immersed in that world of imagination. And it's the plot that forces those beliefs to be rejoicing. A mysterious mystery of bird life is more or less in everyone's mind. The solution to that enigmatic mystery lies in reading this novel. Every living thing on earth has a world. Reading such a novel gives an extraordinary experience of living, growing and growing. 

                      What is the human or the bird, how much he has to suffer while building his nest. Sugarni's head in particular is a subject of curiosity and admiration for us. Khopa is the focal point for Sugaran and Sugarani to come together as a couple. Then the sugar bird weaves the nest without any interruption to make its mate like its head. Sometimes due to natural calamities and sometimes due to human intervention, the nest is broken again and again but the bird weaves again and again without giving up. Sometimes on a tree, sometimes on an island, sometimes on the edge of a well, it changes its place in many places. And one day Sugarni comes to see that beautiful nest and if she likes it, she accepts it with the skull and then their life begins. The author has given an in-depth description of the daily life of hatching the eggs, protecting them and feeding them. The struggle in the daily life of the parties can be read here. We think how spontaneous the life of parties is. While enjoying the world of imagination, we easily think, If I was born, I would like to be a bird. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words. But we have never experienced their life closely. How much struggle they have to face in their life too. Then apparently we can't get much closer to it beyond birdwatching. But after reading this novel, we realize how much we are separated from bird life. How close a person gets to the bird life and understands their world. Not only this, but with the power of our intellect, we can base our entire life on the power of our words.

                           The author's study of birdwatching is vast. The author has a close relationship with nature and its trees, leaves, flowers, fruits, vines, bushes and soil. Therefore, just as the sugar bird weaves its head with great effort by bringing each mate, he has shaped this beautiful novel with deep intimacy from each word. If you want to understand the bird world closely, you must read this novel. Let them tread the lofty heights of success in the same field of writing. May new writings be inspired by them and readers get to read them. All the best for his future writing endeavors with his novel Kalvin...!!


Jai Ho...! Good luck!!


Kiran Subhash Chavan.

8806737528

Contact for book:



Book - Calvin.

Author- Ramakrishna Magdoom

Publisher- Rava Publications, Kolhapur.

Pages-80

Contact Moba : +919420778963 

पुस्तक परिचय - कलविण लेखक - रामकृष्ण मगदूम.


सुगरण पक्षाच्या जीवनाचा वेध घेत पक्षी विश्वात डोकावणारी कादंबरी : कलविण


                         पक्षी जीवनावर आधारित रामकृष्ण मगदूम लिखित 'कलविण' ही छोटेखानी कादंबरी बसल्या बैठकीत वाचून होणारी मात्र चक्क पक्षी जीवनाचा टिपलेला अचूक वेध मनाला  खिळवून ठेवतो. कधी काळी बंदुकीने पाखरं टिपणारे लोकं ते आज त्यांच्या जीवनावर कादंबरी टिपली जाते. याचा अर्थ मानव किती सहृदयी,संवेदनशील आणि स्वतःच्या जगण्यापलीकडचे विश्व समजून घेणारा आहे याची साक्ष ही कादंबरी देते. बयाजी आणि बया या सुगरण आणि सुगरणी जोडप्याचा आणि त्यांच्यासह राहणाऱ्या पक्षांच्या संसारातील संघर्ष ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. आत्तापर्यंत मानवी जीवनाशी संबंधित कादंबऱ्या वाचनात आल्या परंतु पक्षी जीवनातील ही कादंबरी वाचताना मनात अनेक प्रश्न होते की, कादंबरीचे स्वरूप कल्पकता आणि वास्तवता याचा मेळ लेखकाने कसा घातला असावा ?. पण सुरुवातीला वाचताना आपण अलगद पणे मानवी विश्वातून निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वात कसे जातो हे कळतही नाही. म्हणजे मानवी मन हे एवढे विलक्षण आहे की जसे पाणी एखाद्या भांड्याचा आकार  धारण करते तसे आपले मन हे कोणत्याही जीवाशी म्हणजे प्राणी पक्षांशी समरस होऊ शकते. वाचताना आपण त्या सुगरण पक्षाशी, त्याच्या चाललेल्या संघर्षाशी समरस होऊन जातो.                                      लेखक बयाजी हे मुख्य पात्र घेऊन त्याच्या जीवनाचा आणि त्यांच्या जगण्याचा भोवताल अत्यंत सूक्ष्मपणे मांडत जातो. कादंबरी वाचताना  प्रत्येक शब्दगणिक त्या निसर्गाशी आणि पक्षी जीवनाशी एकरूप व्हायला होते. तो निसर्ग ,झाडी झुडपे, वेली बेट ,गवत हाच आपला भोवताल बनून जातो. वाचताना अगदी डोळ्यांत हिरवाई दाटते. विहिरीवरच्या त्या सुगरणींच्या टांगलेल्या खोप्यात आपल्याही मनाचं पाखरू अलगद जाऊन बसतं. कसं असेल आतून खोपा, कसं बागडत असेल आतून ते घरटं, ती चिमणी पिल्लं मन अगदी त्या कल्पनाविश्वात रमून जातं. आणि त्या विश्वास रममाण होण्यास भाग पाडणारे असे कथानक आहे. पक्षी जीवनाचं एक रहस्यमय गूढ कमी अधिक प्रमाणात का असेना साऱ्यांच्याच मनात असतं. त्या गुढमय रहस्याची उकल ही कादंबरी वाचताना होते. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचा एक संसार असतो. त्यांचं राहणं, जगणं ,वाढण आणि वाढवणं याचा विलक्षण अनुभव येतो तो अशा कादंबरी वाचनातून. 

                      माणूस काय किंवा पक्षी काय त्याला आपलं घरटं उभा करताना किती कष्ट उपसावे लागतात. विशेषतः सुगरणीचा खोपा हा आपल्यासाठी कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय आहे. सुगरण आणि सुगरणी हे जोडपं एकत्र येण्यासाठी खोपा हे त्यांच्या जवळ येण्याचा केंद्रबिंदू आहे. मग आपल्या जोडीदाराणीला आपला खोपा आवडावा म्हणून सुगरण पक्षी अपार कष्टातून अव्याहतपणे ते घरटं विणत असतो. कधी नैसर्गिक संकट तर कधी मानवी हस्तक्षेत यातून ते घरटं पुन्हा पुन्हा मोडतं पण तो पक्षी हार न मानता पुन्हा पुन्हा विणतो. कधी झाडावर कधी बेटावर तर कधी विहिरीच्या काठावर अनेक ठिकाणी जागा बदलतो. आणि एक दिवस ते सुंदर घरटं पहायला सुगरणी येतात तिला आवडलं तर ती त्या खोप्यासह त्याला ही स्वीकारते आणि मग त्यांचा संसार सुरू होतो. अंडी उबवण, त्यातून पिल्लांचा जन्म त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना खाऊ पिऊ घालणं या त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांचं चित्रण लेखकाने सखोलपणे मांडले आहे. पक्षांच्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचा वेध या ठिकाणी वाचावयास मिळतो. आपल्याला वाटतं की, पक्षांचं जीवन किती स्वछदी आहे. कल्पना विश्वात रमताना आपण सहज म्हणून जातो की, मला जन्म मिळाला तर मला पक्षी व्हायला आवडेल. पण आपण कधीच त्यांचं जीवन जवळून अनुभवलेलं नसतं. त्यांच्याही जीवनात त्यांना किती संघर्ष करावा लागतो. एव्हाना वरवर आपण पक्षीनिरीक्षणा पलीकडे जास्त त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. पण ही कादंबरी वाचल्यानंतर जाणवतं की, आपण पक्षी जीवनापासून किती नामानिराळे आहोत. एखादी व्यक्ती पक्षी जीवनाच्या किती जवळ जाऊन त्यांचं विश्व समजावून घेते. इतकंच नाही तर आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांचं संपूर्ण जगणं आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर मांडू शकते.

                           लेखकाचा पक्षीनिरीक्षणाचा अभ्यास अफाट आहे. निसर्गाच्या सानिध्यातला वावर आणि तिथल्या झाडा, पाना, फुला, फळाशी,वेली,झुडुपाशी, मातीशी लेखकाचे एक घट्ट नाते आहे.  म्हणून तर सुगरण पक्षी जशी एकेक वीण आणून आपला खोपा मोठ्या कष्टातून विणतो तसेच एकेका शब्दांतून सखोल आत्मीयतेने त्यांनी ही सुंदर कादंबरी आकाराला आणली आहे.कादंबरी वाचल्यानंतर कळतं यामागे अनेक वर्षांची ही तपश्चर्या आहे. पक्षी विश्व जर आपल्याला जवळून समजावून घ्यायचं असेल तर अवश्य ही कादंबरी वाचली पाहिजे. अशीच लेखन प्रांतातील त्यांची भरारी उंच उंच यशशिखरे पादाक्रांत करो. त्यांच्या हातून नवनवे लेखन स्फुरत जावो आणि वाचकांना वाचायला मिळो. त्यांच्या कलविण या कादंबरीसह भावी लेखन वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...!!


जय हो...! मंगल हो..!!


किरण सुभाष चव्हाण.

८८०६७३७५२८

पुस्तकासाठी संपर्क :



पुस्तक - कलविण.

लेखक- रामकृष्ण मगदूम

प्रकाशक- रावा प्रकाशन,  कोल्हापूर.

पृष्ठे-८०

संपर्क मोबा :+919420778963 



माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...