फॉलोअर

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

ग्रेट भेट-उर्जानिर्मिती क्षेत्रातील पल्लवी यादव यांच्याशी संवाद..- किरण चव्हाण.




ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

           ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सध्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या समुद्रातील खनिज तेल,नैसर्गिक वायू अशा ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एक महिला म्हणून यशस्वी कार्य केले. १२० वर्ष जुन्या असलेल्या व ऑइल क्षेत्रात मोठं नाव असलेल्या जागतिक नामांकन 'बेकर ह्युजेस' या कंपनीत २००६ पासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.समुद्रात राहून समुद्रतळाच्या खाली तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रीलिंग करून समुद्राच्या पोटातील कच्चे तेल उपसले जाते अशा ठिकाणी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे अचुकरित्या शोधणे हे अशा महत्वाच्या कामाची जबाबदारी पल्लवी यांच्याकडे होती.हे काम सलग करावे लागते अशावेळी अनेक अडचणी व आव्हानांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. आजपर्यंत त्यांनी इराक,कतार, युनायटेड अरब अमराती अशा आखाती देशामध्ये काम केले आहे.इराकमध्ये असताना ऑइल रिगवर एकटीच महिला इंजिनिअर म्हणून त्या काम करीत होत्या त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने एक महिला उर्जानिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.या उत्सुकतेपोटी त्यांना बघायला खास चीनवरून मान्यवर लोक बघायला आले होते.


त्याचबरोबर त्यांना वाचनाची आणि विशेषतः मोटाररेसिंगची अतिशय आवड आहे.चंदीगड येथे पुरुष स्पर्धकांना हरवून कार रेसच्या अमॅच्युर कॅटेगरीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता त्यावेळी तेथील कॅबिनेट मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी त्यांचा गौरव केला होता.



अशा कोल्हापूरच्या रांगड्या मातीत जन्मलेल्या आणि कर्तृत्वाची उत्तुंग झेप घेतलेल्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याचा योग आला. त्यांनी आमच्या माध्यमिक विद्यालय कळंबा पाचगांव ता-करवीर,जि-कोल्हापूर शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खास मुंबईवरून त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.

 इयत्ता सातवीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकात नैसर्गिक साधनसंपत्ती या पाठामध्ये खनिजतेल,दगडी कोळसा,नैसर्गिक वायू याविषयीचा अभ्यासघटक अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या खनिजसंपत्ती यावर आधारित विद्यार्थ्यांना आणखीन सखोल व वस्तुनिष्ठ माहिती मिळावी यासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक किरण चव्हाण यांनी ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या पल्लवी यादव यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. यावेळी पल्लवी दीदीने विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत  ओघवत्या वाणीने दीड तास मार्गदर्शन केले. ऊर्जानिर्मिती प्रक्रिया,खनिजतेल उपसा प्रक्रिया तेथील कामाची पद्धत, आव्हाने,खनिजतेलाचे महत्व व ते भविष्यातील वापर.आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खनिज संपत्तीचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व आणि हे खनिज साठे संपुष्टात आले तर आपले मानवी जीवन कसे संपुष्टात येऊ शकते याविषयी सखोल माहिती सांगितली विशेषतः या ऊर्जानिर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागणारी पात्रता व संधी याविषयी त्यांनी प्रेरणादायी माहिती दिली. 


विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील प्रश्न पल्लवी दीदीला विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. अशा मनमोकळ्या संवादामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पल्लवी दीदीला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्याला दीदीने अवश्य भेटण्याचे आश्वासन दिले. एकंदरीत विज्ञान विषयासाठीचा हा उपक्रम यशस्वी झाला.हा ऑनलाईन संवाद घडवून आणण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानस्नेही शिक्षक श्री. आर.पी.सुतार सर तसेच सौ.दिपाली चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले.तर या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक व्ही.बी. ठाकूर सर यांची प्रेरणा मिळाली.

---------------------------------------------------------

Dear chavan sir...

           ...आज सोनेरी क्षण होता माझ्यासाठी. आजपर्यंत कॉलेज लेव्हलच्या अडल्ट स्टुडन्टना मी मार्गदर्शन केल आहे.पण आज एवढ्या छोट्या स्टुडन्टनी या विषयांमध्ये एवढा इंटरेस्ट घेऊन माझ्याशी संवाद साधला आहे त्यावरून.

 I am very impressed and very grateful.

आभार तर मी मानतेय की, शाळेचे छोटे-छोटे विद्यार्थीसुद्धा एवढे जागृकतेने करिअरचा विचार करतायेत.तुम्ही एक शिक्षक म्हणून खूप छान काम करता आहात. 

Thank you very much

मला तुमच्या शाळेला एकदा व्हिजिट करायला आवडेल अगदी सहज म्हणून कधीतरी.

Permit me to visit..

Thank you very much.


Best regards,

Pallavi Yadav.

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

गांव विकताना पाहिला - किरण चव्हाण.

 


                       गांव विकताना पाहिला


दिवसाढवळ्या  लोकशाहीचा उदो उदो पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.?

अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला.


तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.?

हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल.

मी काय कमी वाटलो का काय..?


मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत.

हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत..


दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती.

खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती.


दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा.

सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला.


आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी जान कुर्बान करायचीत इथं माणसं.

आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी आज स्वतःलाच विकायला तयार झालीत माणसं.


भंडारा उचलायचे इथे एकेकाळी हर हर महादेवाच्या घोषात मातीच्या इमानासाठी आमचे जिगरबाज मावळे

आणि आज स्वार्थासाठी देवालाचं गहाण टाकून चोरी छुपे उचलतायत भंडारा बेईमान कावळे.


आयुष्य वेचलं की रे घरादारावर तुळशीपत्र ठेऊन त्या महान लोकांनी या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

आणि आपल्याचं स्वार्थासाठी निष्ठा विकून तुम्हीं स्वतःला एवढं कवडीमोल होऊ दिलं.


अरे तरुणांनो,तुमच्या वयाचे असताना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेलेत या देशासाठी.

का सळसळत नाही असं तुमचं ताजं रक्त निदान गावासाठी तरी?

जिवंतपणीच बांधलं की रे कफन डोक्याला त्यांनी या मातीसाठी.

आणि तुम्हीं कुणाच्या पैशाची बाटली ओठाला लावून तरुण रक्ताला बाटवताय कुणासाठी..?


सत्ताच पाहिजे आहे,गावचा विकास-प्रगती करायची आहे

मग त्यासाठी का तुम्हाला पैशाचा एवढा खेळ करावा लागला..?

आणि पाच वर्षांसाठी लोकांचा विश्वास तुम्हांला विकत घ्यावा लागला ?

घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनीही बघा कसा सत्तेसाठी घोडेबाजार मांडला.


आणि रात्रीच माझा गांव मी विकताना पाहिला.


दिवसाढवळ्या लोकशाहीचा उदो उदो...

लोकशाही.. लोकशाही.. लोकशाही...

कुठली लोकशाही....?


रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटताना पाहिला

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


 - किरण सुभाष चव्हाण.

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

'असावे सुंदर असे माझे गांव.'-किरण चव्हाण.

 


(देवा तुझे किती सुंदर आकाश या गीताच्या चालीवर)


'असावे सुंदर असे माझे गांव.'


असावे सुंदर असे माझे गाव

गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं


नको कुणी दुःखी असो सर्व सुखी 

गोड वाचा असो सर्वांमुखी


गरीब श्रीमंत नको भेदभाव

सर्वांभूती असो समभाव


आपणची ठेऊ गावची स्वच्छता 

दिसावी सर्वांना सुंदरता


गावाचा विकास मिळुनी करूया 

आम्हीं प्रगतीची कास धरूया


लहानांची कदर मोठ्यांचा आदर

एकत्र कुटूंब तेचि सुखी घर


गुणी सज्जनांचा असो अधिवास

करावा उपदेश सकळ जनास


अवघाची गांव एकीने नांदावं

समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.

रविवार, ३ जानेवारी, २०२१

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.



'जलतरणामध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी भारताची जलतरणपटू जलकन्या कांचनमाला पांडे- देशमुख.'


                                       ती एक लाट बेधुंदपणे पाण्यावर स्वार होऊन यशाचा किनारा गाठणारी. तिचं नी पाण्याचं जिव्हाळ्याचं अतूट घट्ट नातं.तिनं आत्मविश्वासाने  झेपावं आणि कवेत घ्यावं पाण्याने तिलाही.पाण्याच्या पाठकुळीवर स्वार होऊन पादाक्रांत केलीत तिने यशाची अनेक शिखरे... रचलाय एक नवा इतिहास.साकारलाय अद्वितीय विजय.स्वतःच्या दृष्टीहीनतेवर मात करत देशाच्या जलतरणाला जागतिक स्तरावर जिने एक नवी दृष्टी दिलीय.मनातल्या स्वप्नांना सत्यात उतरवताना त्या प्रत्येक स्वप्नांना लाभलाय प्रत्येक वेळी यशाचा किनारा...प्रखर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने पार केलाय भवसिंधु...स्वप्नांच्या मागे पोहताना ती आता पोहोचलीय सातासमुद्रापार. तिला माहितीचं नाहीं कधी थांबणं. आणि तिला कोणी थांबवूही शकत नाही..तिनं गाठलाय आता आयुष्यातला सुवर्णमयीक्षण.येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना झुगारून देत तिने अखेर सिद्ध केलंय स्वतःला.अशा या लाटेने आज गाठलाय सर्वोच्च यशाचा किनारा. जलतरणमध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी जलपरी जलपरी भारताची जलतरणपटू सागरकन्या अर्थात कांचनमाला पांडे-देशमुख.       

                                      भारताची सागरकन्या म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं,अशा कांचनमालाचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे ३१ डिसेंबर १९९० रोजी झाला.वडील श्री. ज्ञानेश्वर पांडे व आई सौ.हिरुताई पांडे .कांचनमालासह एकूण पाच भावंडे.चौघी बहिणी व एक भाऊ.एकत्र कुटुंबात तिचे लहानपण गेले.नियतीने घोर अन्याय करूनच कांचनमाला व तिच्या आणखीन एका बहिणीला जन्माला घातलं. ते म्हणजे कांचनमालासह एक बहीण जन्मतः अंध आहे.पण या घटनेने तिचे आईवडील जराही डगमगले नाहीत.६ वर्षांची असताना कांचनमालाला अंधमुलांच्या शाळेत घातलं गेलं.सर्वसाधारण मुलांप्रमाणे तिला मैदानात खेळता येणार नव्हते पण म्हणतात ना,' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.' लहानपणापासून कांचनमालाला पाण्याशी अटॅचमेंट(जवळीकता) होती..हे ओळखूनचं  वडिलांनी सुरुवातीला तिच्या शारीरिक व्यायामासाठी वयाच्या १० व्या वर्षी  ५ वीत असताना  स्विमिंग शिकायला घातले.पण तेंव्हा आजूबाजूच्या लोकांनी कांचनमालाच्या वडिलांना अक्षरशः वेड्यात काढलं. लोक म्हणायचे.."काय मूर्ख आहे हिचा बाप..आंधळ्या मुलगीला स्विमिंग शिकवतोय..आहे केवढीशी ही पोर..? कुठे बुडून मेली तर..?" असतात असे लोक 'ना घेणं ना देणं.:.तिच्या घरच्यांपेक्षा यांनाच तिची जास्त काळजी म्हणायची.पण बाबांनी ते बोलणं मनावर घेतलं नाही.लोक काय म्हणतात यांकडे साफ दुर्लक्ष केलं.आणि जिथे स्विमिंग शिकायला इतरांना महिना लागतो आश्चर्य म्हणजे तिथे फक्त आठच दिवसात कांचनमाला स्विमिंग शिकली.

                                                    ..मग पुढे माहिती कळत गेली की,स्विमिंग कॉम्पिटेशन असतात.त्यामध्ये सहभागी व्हायचे ठरवले. वयाच्या १० व्या वर्षांपासून तिने स्विमिंग स्पर्धेला सुरुवात केली. प्रथम जिल्हा पातळीवर नॉर्मल (डोळस) मुलांबरोबर स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात कांचनमालाने पहिला क्रमांक पटकावला.इथून जी यशाला सुरुवात झाली त्यानंतर तिने कधीच मागे पाहिलं नाही.त्यानंतर स्टेट लेव्हल ( राज्य पातळीवर) स्विमिंगमध्ये सहभाग घ्यायचे ठरले मात्र तिथे गेल्यानंतर DSO (district sport officer) यांनी या स्पर्धेत कांचनमालाला सहभागी होण्यास नकार दिला.कारण ही अंध मुलगी नॉर्मल मुलांच्यासोबत कशी सहभागी होणार..? एखाद्यावेळी पाण्यात बुडाली म्हणजे..? ही त्यांना भीती.पण बाबांनी त्यांना बऱ्याच विनवण्या केल्या. त्यांना विश्वास दिला की, एकदा तिचा इव्हेंट पहा मग निर्णय घ्या...असे म्हटल्यावर आदल्या दिवशी त्यांनी कांचनमालाचा इव्हेंट पाहिला आणि मगच परवानगी दिली.. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत कांचनमालाने नॉर्मल मुलांबरोबर तिसरा क्रमांक प्राप्त केला.आणि मग खऱ्या अर्थाने इथून स्विमिंग करिअर मधील मोठी स्वप्नं तिला खुणावू लागली..मिळालेल्या यशाने स्वप्नांच्याकडे भरारी घेण्यासाठी आत्मविश्वासाचे बळ दिले.

                                           एका बाजूला अभ्यास तर दुसऱ्या बाजूला स्विमिंग खेळात करिअरची करण्याची ,जिद्द.सकाळी २ तास स्विमिंगचा सराव , त्यानंतर दिवसभर शाळा, शाळेतून घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळी दोन तासाचा स्विमिंग सराव,शाळेचा अभ्यास आणि मग झोपणे असा दिनक्रम.म्हणजे एकीकडे स्विमिंगचा सराव सुरू असताना  दुसरीकडे अभ्यासाकडेही ती तेवढेच लक्ष द्यायची.एकीकडे आपला खेळ तर दुसऱ्या बाजूला आपला अभ्यास या दोन्हीं गोष्टींना कांचनमाला न्याय देत होती.स्विमिंगचा सराव जोरदारपणे सुरू होता.प्रत्येक स्पर्धा ही कांचनमालासाठी घवघवीत यश मिळवून देत होती. जिल्हा..राज्य पातळीवरून आता राष्ट्रीय पातळीवर यशाच्या घौडदौडीने मजल मारलेली.वयाच्या ११ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील स्विमिंग स्पर्धेत भाग घेऊन तिने पहिलं नॅशनल मेडल घेतलं.राष्ट्रीय पातळीवर हा तिने पहिलाच विजय साकारला होता.त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या यशाने मनातील आत्मविश्वास वाढला होता..म्हणून आणखीन एक आव्हान पेलण्याचा, एक भव्य-दिव्य स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला.तो म्हणजे  समुद्र जलतरण 'सी स्विमिंग' अरबी समुद्रात पोहायचं.

                                          समुद्रात पोहणं ही खरीच सोपी गोष्ट नव्हती.११ वर्षांचं कोवळं वय.समुद्रात पोहोण्याचा हा पहिलावहिला अनुभव असणार होता.पण मनात प्रखर जिद्द,प्रचंड आत्मविश्वास ठासून भरलेला. मूळचा अंधपणाही कुठे आड येणार नव्हता आणि ठरलं या यशाला गवसणी घालायची. सुरू झाली मेहनत त्या दिशेने.सरावासाठी पहिल्यांदा समुद्रात उतरल्यानंतर खुप भीती वाटायची.कारण या आगोदर तिला कधीच समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा अनुभव नव्हता.त्यामुळे पहिल्यांदाच  कांचनमाला समुद्राच्या पाण्यात उतरली तेंव्हा अक्षरशः ती जोरजोरात ओरडली होती.. कारण समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा हा पहिलाच अनुभव होता...डोळ्यांनी काही दिसत नसल्यामुळे काहीच कळायचं नाही.पाण्यातील छोटे छोटे मासे.. कचरा अंगाला लागल्यानंतर आणखीनचं भीती वाढायची.. पण स्विमिंग प्रशिक्षक (कोच) आणि बाबां तिला धीर द्यायचे..कोचनी आपल्या  हाताने समुद्रातील त्या वस्तू दाखवून तिच्या मनातील भीती कमी करायचा प्रयत्न केला.अशाप्रकारे  सराव सुरू झाला.पहिल्यांदा दोन तासांचा सराव त्यानंतर पाच तासांवर आला.नॉनस्टॉप स्विमिंग करायचे होते.जिद्दीने प्रॅक्टिस सुरू होती.रात्री ८ वाजता पाण्यात उतरल्यावर बाहेर येण्यासाठी १२-१ वाजायचे..समुद्रात  प्रॅक्टिस करताना पाण्यात मध्येच थांबून पाणी प्यायचा सराव करायचा.त्याचबरोबर सोबत असणारे बाबा आणि कोच लांबून कॅटबरी टाकायचे ती झेलून ते चॉकलेट खायचे..अर्धेअधिक खाली पडायचे. ही प्रॅक्टिस एवढ्यासाठी असायची की,समुद्रात पोहताना तोंड खारे होते.तसेच शरीरातील शुगरचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची गरज भरून काढण्यासाठी चॉकलेट खावे लागायचे.

                                          १ मार्च २००२ ची अरबी समुद्रातील ती समुद्र जलतरण (सी-स्विमिंगची) ती स्पर्धा.वयाच्या ११ व्या वर्षी या स्पर्धेत कांचनमालाने सहभाग घेतला..एवढीशी चिमुकली पोर जिंकण्याच्या प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर हे कडवे आव्हान घेऊन त्या अवाढव्य सागरावर स्वार झाली.त्या समुद्राच्या पाण्यावर.उसळत्या उमद्या लाटेसारखी पाण्याशी दोन हात करून ती सरसावू लागली पुढे पुढे.पाण्याची एकेक लाट आव्हान बनून तिच्यासमोर येत होती आणि तिला मागे सारून कांचनमाला पुढे जात होती..आणि अशावेळी संकटं समोर न येतील तरच नवल..अचानक एक संकट शेवटी उभं ठाकलंच..तिची कठोर परीक्षा घेण्यासाठीच एक लाट तिच्या दिशेनं आली. त्या लाटेत कांचनमाला पूर्णपणे अडकली...भिरभिरत्या भोवऱ्यात एखादी नाव अडकावी तस झालं..तिला पुढेही जाता येईना आणि मागेही जात येईना...कितीही हात पाय मारले तरी ती तिथेच तरंगायची आणि हात पाय मारायचे बंद केले की,मागे सरकायची...नाका तोंडात पाणी जात होतं..पाण्यात अंतराळी पाय..त्यामुळे बुडण्याची शक्यता अधिक होती..आता आपण बुडणार.. अशीच सगळी अवस्था.. चारी बाजूने लाटा संकट बनून आलेल्या..धीर खचला..काय करावं..? पाण्यावर तग धरून राहण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू झाला.जीव घुटमळला.ती आता रडायला लागली..आता नाही.. मला हे आव्हान पेलण शक्य नाही..मनात विचार आला की, सोडून द्यावं.. तसे तर काही अडचण आल्यास हात वर करण्यास सांगितले होते म्हणजे आपत्कालीन बोट सोबत होतीच..लगेच त्यांनी बोटेत घेतलं असतं...पण खरंच का आपण आता हार मानायची..? पण दुसरा एक सकारात्मक विचार मनात आला की, इथपर्यंत येण्यासाठी आपण किती मेहनत घेतलीय..माझ्या आईवडिलांनी माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी किती मेहनत घेतलीय..आपण ज्यावेळी स्विमिंगला सुरुवात केली होती तेंव्हा लोक काय म्हणायचे..'एका अंध मुलीला स्विमिंगला घातल्याबद्दल लोकांनी आईवडिलांना मूर्खात काढलं होतं..लोकांची ती नकारात्मक प्रतिक्रिया तिला त्यावेळी आठवली..आणि मनानं पक्कं केलं की काही नाही आपण जर हरलो तर या सर्वांच्यावर पाणी फिरणार आहे पण आपण जर हे अंतर पूर्ण केलं तर असा एक विक्रम होईल की, जो आजपर्यंत कोणीच केला नाही.समुद्रात पोहुन एवढे अंतर पार करणारी आपण भारतातील पहिली महिला ठरू.आणि या विचारगतीने मनाला ऊर्जा मिळाली.सगळी शक्ती पणाला लावून ती पुन्हा नव्या तडफेने त्या उसळत्या सागरावर स्वार झाली.आणि जलदगतीने स्विमिंग करत ५ किलोमीटरचे अंतर १ तास १४ मिनिटांत तिने पूर्ण केले.अवघ्या ११ व्या वर्षी कांचनमलाने एक नवा इतिहास रचला.समुद्रात पोहून सात किलोमीटर अंतर पार करणारी भारतातील ती पहिली महिला ठरली.अवघ्या देशवासियांची हृदये या तिच्या पराक्रमाने भारावून गेली..या विजयाने एक नवी ओळख कांचनमालाला मिळाली..'भारताची जलकन्या.' कांचनमालाने केलेल्या या विक्रमाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

                                           इथून जी कांचनमालाने भरारी घेतली ती भव्यदिव्य अशी गरुड झेपच होती.त्याच्यानंतर कांचनमाला स्विमिंगच्या प्रत्येक कॉम्पिटेशनमध्ये सातत्याने जिंकत गेली.जे लोक सुरुवातीला 'ही आंधळी मुलगी स्विमिंग कशी शिकणार..?' असं म्हणणारे आणि आईवडिलांना मूर्खात काढणारे होते आता तेच तिला डोक्यावर घेत होते.म्हणजे बघा ना..! समाजात लोक कसे असतात,सुरुवातीला नुसत्या  उणीवा शोधत राहायचं,आपल्यातल्या कमीपणाला सतत अधोरेखित करायचं पण कांचनमाला आणि तिच्या परिवाराने या लोकांकडे कधीच लक्ष दिले नाही..लक्ष दिलं असतं तर कदाचित त्या लोकांच्या मनासारखं झालं असतं..अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नसतं.. आपलं लक्ष फक्त एकच स्वतःला सिद्ध करून दाखवणं... आपलं जे ध्येय ठरले आहे त्याचा पाठलाग करत राहणं.. आणि तेच कांचनमालाने केलं..स्वतःला सिद्ध करून दाखवलं. म्हणून तर काल तिला हिनवणारे लोक आज तिला डोक्यावर घेऊन मिरवायला लागले.तिचा जयजयकार करू लागले...म्हणतात ना.'कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती'...या ओळींचा आता खऱ्या अर्थाने  अनुभव येत होता.स्वतःला हरु न देता शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणं त्यातच यशाचं गम्य दडलेलं असतं.आणि हे गम्य तिला सापडलं होतं..एवढ्यावरतीच तिला थांबायचं नव्हतं..आता तिला आणखीन यशाची उंच उंच शिखरे खुणावत होती. त्याला गवसणी घालण्यासाठी  प्रथमच कांचनमालाने देशाबाहेर पहिले पाऊल टाकले.

                             २००६ साली दहावीत असताना ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेमसाठी तिची निवड झाली.आणि झालं असं की १० वी ची परीक्षा सुरू होणार त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला जाण्याची फ्लाईट होती.पण परीक्षा नंतर देता येईल असा विचार करून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला.प्रथमच देशाबाहेर जाणार असल्याने आणि वय लहान व अंध असल्याने घरच्या एका व्यक्तीला सोबत जाण्यासाठी परवानगी मागितली पण ती नाकारण्यात आली त्याऐवजी.भारत सरकातर्फे ऑस्ट्रेलियाला जाताना कांचनमालाला लेडी एस्कॉर्ट म्हणजे  केअर टेकर  देण्यात आली..जी २४ तास तिच्यासोबत राहणार होती.ही पहिली आणि शेवटची लेडी एस्कॉर्ट यानंतर भारताबाहेर जाताना तिला एकटीलाच जावं लागलं.. पण हे तिच्यासाठी वरदान ठरलं.याचा तिला एक असा फायदा झाला की, कुठेही वावरण्याचा एक आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. पहिल्यांदाचं कांचनमालाने यशाला गवसणी घालण्यासाठी भारताबाहेर झेप घेतली..ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारतातून कांचनमाला ही एकमेव अंध मुलगी म्हणून सहभागी झाली होती.७१ देशांतील स्पर्धकांनी स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये सहभाग घेतला होता. सगळे स्पर्धक डोळस होते..फक्त आपल्या भारताची कांचनमाला ही एकटीच अंध मुलगी त्यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणार होती.अर्थात अंध असूनही एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवर स्पर्धेत सहभागी होते आहे याचे तिच्या इतर स्पर्धकांबरोबर अनेकांना अप्रुप वाटत होतं..७१ स्पर्धकांसोबत कांचनमाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार झाली पूर्ण जोमाने स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली. आणि जागतिक क्रमवारीत (world ranking)  ६ व्या स्थानी आली.आतापर्यंत यशाची चव चाखली होती पण इथे मात्र अपयशाचा कडवटपणा वाट्याला आला होता..जिंकण्याची एक सवय लागली होती पण पहिल्यांदाच पराभवाने धक्का दिला होता.हे अपयश तिच्या मनाला चांगलेच जिव्हारी लागले. दुःखवेगाने अश्रूही कोसळले..पण  अपयशाने खचून न जाता कांचनमालाने या अपयशाला गुरुस्थानी मानले..जीवनात काहीवेळा अपयशही यावं लागतं तेंव्हाच यशाची खरी किंमत कळते..पण या  अपयशाने पुढच्या यशासाठी एक नवी ऊर्जा दिली..स्वतःमधील चुका,उणिवा शोधण्याची संधी दिली.आणि कांचनमाला पुन्हा नव्याने उभा राहिली.आणि त्याचवर्षी नोव्हेंबर २००६ साली मलेशियाला पॅराएशियन गेम होत्या त्यामध्ये तिला पुन्हा संधी मिळाली.कॉम्पिटेशनमध्ये कांचनमाला सहभागी झाली तिच्यासोबत चायनीज स्पर्धक होते.या इव्हेंटमध्ये शेवटपर्यंत भारताला एकही पदक मिळाले नव्हते..त्यामुळे साहजिकच तिच्याबद्दल संपूर्ण देशाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.देशवासीयांच्या अपेक्षांचं तिने टेन्शन  कधीच घेतलं नाही उलट या अपेक्षा तिच्या कामगिरीसाठी तिला सकारात्मक ऊर्जा द्यायच्या...या कॉम्पिटेशनमध्ये भाग घेताना मनात एक विचार पक्का केला होता की, कोणत्याही परिस्थितीत भारताला गोल्ड मेडल जिंकून द्यायचं.. त्यासाठी 'करो या मरो' ची मनात जिद्द ठेवली होती..आदल्या रात्री एका मिनिटासाठीही ती झोपली नव्हती..मनात फक्त एकच ध्यास ही स्पर्धा आपणच जिंकायची...आणि कांचनमालाचा इव्हेंट सुरू झाला.  तो इव्हेंट तिने इतका फास्ट मारला की, ज्यावेळी ते अंतर पूर्ण करून कांचनमाला थांबली त्यावेळी तिच्या तळपायातून आग आग होत होती..तिचे शरीर अक्षरशः एवढे थकले होते की,तिथून बाहेर यायचीसुद्धा ताकद तिच्यात राहिली नव्हती..दोन व्यक्तींनी तिला उचलून बाहेर घेतलं...शेवटी याचा परिणाम...? कांचनमालाने आपल्या भारताला स्विमिंगमधलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.अभूतपूर्व यशाचा आणखीन एक इतिहास तिने रचला. 

                                देशाचं प्रतिनिधित्व करताना एक अनुभव असा राहिला की,२००८ ला जर्मनी बर्लिनला ऑलम्पिकसाठी बिल्डप टोनामेंट होत्या.तिथल्या  स्विमिंग इव्हेंटमध्ये एका ब्राझीलीयन कोचने कांचनमालाचा परफॉर्मन्स पाहिला आणि ते प्रभावित झाले.त्यांनी कांचनमालाला ऑफर दिली की, "तू आमच्या देशाकडून या खेळाचं प्रतिनिधित्व करशील का..? आम्हीं तुला आमच्या देशाचं नागरिकत्व देऊ..सर्व सोयीसुविधा देऊ.एवढंच नव्हे भारतातून येण्याचा विमानप्रवासाचा खर्चही आम्हीं देऊ.." पण कांचनमालाने ती ऑफर तिथेच नाकारली. काहीही असो पण मी माझ्या देशाकडून खेळणार आहे..मी फक्त माझ्याच देशाचं प्रतिनिधित्व करणार.आहे.म्हणजे एका खेळाडूच्या मनात आपल्या देशाविषयी किती मोठा स्वाभिमान असतो हे कांचनमालाच्या या उदाहरणातून कळते. 

                                  २००८ साली डिसेबल लोकांसाठी असणाऱ्या बिझिंग पॅराऑलम्पिकसाठी कांचनमालाची निवड झाली होती.कॉम्पिटेशनमध्ये कॉलीफायही झाली..इथेही या कॉम्पिटेशनमध्ये निवड होणारी ती पहिलीच भारतीय होती.म्हणजे एका अर्थानं कांचनमाला जिथे जिथे यश मिळवत होती तिथे पहिल्यावहिल्या विक्रमाची नोंद होत होती...पॅराऑलम्पिकसाठी निवड झाली इथपर्यंत सर्व ठीक असताना अचानक एका अडथळ्याने आशेची निराशा झाली.ती म्हणजे काही तांत्रिक बाबींमुळे या स्पर्धेत भारताला स्वीमरसाठी कोटाच मिळाला नाही. त्यामुळे भारतातून जलतरणपटू (स्वीमर) या..पॅराऑलम्पिकसाठी  जाऊ शकणार नव्हते...अर्थात त्यामुळे कांचनमालाही या टोनामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हती... ऑलम्पिक म्हणजे खेळाडूंची पंढरी समजली जाते.एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने  खेळात हार पत्करावी लागली तरी एवढं वाईट वाटत नाही पण आपली पात्रता असताना आपण खेळायला जाण्यासाठी सज्ज झालो असताना आपल्याला तिथे सिद्ध करण्याची संधी मिळू नये याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं..? आणि अशाप्रकारामुळे कांचनमाला मुळातून हादरली. आता पुढे काय करायचं तिला सुचेना..मनाचा समतोल ढासळला..विचारचं खुंटले. आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.कांचनमालाच्या जीवनातला हा सर्वात वाईट काळ होता.. पॅराऑलम्पिकमध्ये आपण जाऊ शकत नाही..आता संपलं सगळं असंच सतत मनाला वाटू लागलं. ती गर्भगळीत झाली.आणि मनानं एक अविचारी निर्णय घेतला..तो म्हणजे आत्महत्येचा.जीवनच संपवण्याचा.

                      त्या रात्री आपल्या स्वतंत्र बेडरूममध्ये ती याच विचारात मश्गुल होती..मरायचं आहे तर मग मरण्याचा सोपा मार्ग म्हणून हाताची नस कापून मरायचं अस ठरवलं.त्यासाठी ब्लेडही जवळ घेतलं..ब्रेललिपीमध्ये एक सुसाईड नोट लिहिली.डोळ्यांतल्या कळीकाळाच्या अंधारात तिने कोवळेपणात आपली स्वप्नं रुजवली होती..ती साकारली, आकारालाही आणली होती.. पण कुठल्या एका अपयशाने ती स्वप्नं झाकोळून गेल्यासारखे झाले होते. सबंध जीवनाला काळाच्या पडद्याआड झाकण्याची मनाने  तयारी केली होती.स्वयंप्रकाशित काजव्याने विझण्याचे ठरवले होते..? रात्रीचा एक वाजला होता.जीवन संपवून टाकायचं या विचारांच्या घोळात आतून एक सकारात्मक विचार अलगद मनात डोकावला.."अरे आपलं वय काय तर नुसतं १८ वर्षं... आणि आपण मरतोय...? माझ्यासमोर तर माझं अख्खं आयुष्य पडलंय... या ऑलम्पिकमध्ये जाता आलं नाही म्हणून का आपण एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा..? आणखीन चार वर्षाने ऑलम्पिक येणार आहेचं की....का मग आपण असा निर्णय घ्यावा..? .इथपर्यंत येण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आपण किती कष्ट घेतले आहे ते एका क्षणात वाया जाऊ द्यायचं का..?" आणि या अशा सकरात्मक विचाराने ती स्वतःला मालवू पाहणारी ती स्वयंप्रकाशित वात पुन्हा नव्या ऊर्जेने प्रकाशित झाली..मनातला काळोख दूर सारला.. निर्णय बदलला..आणि अखेर ती मरणाच्या दारातून वळून मागे आली.जवळची सुसाईड नोट फाडून टाकली..आणि एक ध्यास तिचा एक नवा श्वास बनला. खरं तर कांचनमाला सांगते की या वाईट काळात माझा खेळ माझ्यासोबत होता म्हणून मी वाचले..मी जे ही आहे ते माझ्या खेळामुळेच.. यावरून कळते की खेळाचं स्थान एका खेळाडूच्या आयुष्यात काय असतं.

                                 २००१४ -१६ या काळात कांचनमाला आपल्या स्विमिंग करिअर पासून  थोडी दूर राहिली दरम्यान.२०१६ ती विनोद देशमुख यांच्याशी विवाहबद्ध झाली.पण लग्नानंतरही स्वीमिंग प्रॅक्टिस सुरूच ठेवली होती. आणि मग पुन्हा तिने २०१६ ला कमबॅक केलं.२०१७ ला मेक्सिको येथे पॅराऑलम्पिक होणार होती.त्यासाठी ती कॉलिफायही झाली..आणि मग ती सज्ज झाली आणखीन एक नवा इतिहास रचण्यासाठी.. मेक्सिको येथे गेल्यानंतर तिथे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.तिथे पहिली अडचण आहे ती म्हणजे आपल्याकडील आणि तिकडील वेळेत जवळजवळ १२ तासांचा असणारा फरक . इकडे ज्यावेळी रात्र असते त्यावेळी तिकडे दिवस असतो..अशावेळी शरीरधर्माच्या  सवयीप्रमाणे इकडच्यावेळेनुसार ठरलेल्या वेळी तिकडे झोप येत असे.त्यावेळी तिकडे तर दिवस सुरू असायचा...त्यामुळे सुरुवातीला शरीराची ही सवय मोडणे आवश्यक होते.. त्यासाठी कांचनमाला (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २ वाजता ) मेक्सिकोमधील वेळेनुसार दुपारी २ ला स्विमिंगच्या प्रॅक्टिससाठी पाण्यात उतरायची. फायनल इव्हेंटच्या आहे  चार दिवस अगोदर  तिने अशी प्रॅक्टिस केली.उद्या फायनल इव्हेंट आहे म्हटल्यावर ती आदल्या रात्री एका मिनिटांसाठीसुद्धा झोपली नाही..संपूर्ण अवधान फक्त नी फक्त आपल्या खेळावर..कारण संपूर्ण देशाच्या अपेक्षा तिच्यावर असायच्या..देशाच्या अपेक्षांचे कधी ओझे वाटले नाही..अपेक्षांचं कधी टेन्शन घेतलं नाही तर तर ते नेहमी सकारात्मक घेत गेली. उलट या देशवासियांच्या अपेक्षा तिला एक नेहमी सकारात्मक ऊर्जा देत राहिल्या...माझ्या देशाकडून जर माझ्याविषयी एवढ्या अपेक्षा असतील तर मला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे हा आत्मविश्वास त्या अपेक्षांमुळेच दुणावायचा. 

                                            ६ तारखेला सकाळी तो इव्हेंट होता..कोणत्याही परिस्थितीत गोल्ड मेडल भारताला मिळवून द्यायचं त्यासाठी 'करो या मरो' हा निर्धार. हा निर्धार करूनच ती या स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली.सोबतीचे सगळे डोळस स्पर्धक होते. आणि झाली सुरुवात स्पर्धेला..कांचनमालाने प्रखर जिद्दीने सर्व शक्ती पणाला लावून तो इव्हेंट  इतक्या ताकदीने मारला की,ज्यावेळी तिने इव्हेंट फिनिश केला.तिला धड श्वास घेता येत नव्हता..शरीरातील.ऑक्सिजन कमी झाला होता..तिला ओमीटिंग होत होत्या..चेहरा पांढरा पडला होता.तिच्या जवळ लगेच तिचे प्रशिक्षक आले..एवढा त्रास होऊनही कांचनमालाने त्यांना विचारले.."सर काय झालं..?" तेव्हा प्रशिक्षक म्हणाले .."तू पहिली नॉर्मल तर हो.." मग नॉर्मल झाल्यानंतर 

प्रशिक्षकांनी तिला छातीशी कवटाळलं आणि सांगितलं.

"बेटा तू आपल्या देशाला गोल्ड मेडल दिलंयस.!"

बस..!!. 'याच साठी केला होता अटाहास.' ज्या साठी ही सगळी धडपड चालू होती... .कांचनमालाने भारताला ते पॅराऑलम्पिक जलतरणमधलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

हे यश झालेला आनंद तिच्यासाठी  सर्वकाही होता...पण त्या क्षणाची आणखीन आठवण कांचनमाला सांगते की, इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर तिच्या अवस्थेकडे पाहून तिचे प्रशिक्षक खूपच भावनिक झाले होते,ते तिला म्हणाले  "कांचन तुझा चेहरा पांढरा पडलाय..तुला अगोदरपासूनचं श्वास घेण्यास त्रास होत होता.ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तू सतत ओमेटिंग करत होतीस...या त्रासाची तुला अगोदर कल्पना होती..?"

"होय सर मला याची कल्पना होती पण मी या त्रासाकडे  दुर्लक्ष केलं कारण मी माझ्या देशासाठी खेळते आहे अशावेळी या त्रासापेक्षा मी माझ्या खेळावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केले..." 

 स्वतःला होणाऱ्या त्रासापेक्षा आपल्या देशासाठी समर्पित भावेनेनं झोकून देऊन खेळणं हेच खेळाडूंचं पहिलं कर्तव्य असतं. देशाला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर जो आपल्या देशाचा तिरंगा तिथे उंचावतो..आपल्या राष्ट्रगीताची धून वाजते आणि त्या क्षणाला सर्वजण उभे राहतात तो सुवर्णमयी क्षणच आमच्या खेळाडूंच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो असे कांचनमाला सांगते.

                    वयाच्या १० व्या वर्षांपासून स्विमिंग करिअरला सुरुवात आणि आज हा भव्य दिव्य  २० वर्षांचा यशस्वी कार्यकिर्दीचा विपुल असा प्रवास..डीस्ट्रिक लेव्हलपासून इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत कॉमनवेल्थ, ऑलम्पिक, पॅराएशियन,पॅराऑलम्पिक अशा जागतिक पातळीवर स्पर्धामध्ये सहभागी होऊन १०० मीटर फ्री स्टाईल,१०० मीटर बॅक स्ट्रोक,१०० मीटर ब्रेक स्ट्रोक,२०० मीटर इंडिव्हिज्युअल असे परफॉर्मन्स देऊन वर्ल्ड चॅम्पियनचा बहूमान कांचलमानाने मिळविला..आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, ब्राझील,चायना,जर्कि, डेन्मार्क, मलेशिया, मेक्सिको.अशा एकंदरीत १२ देशामध्ये तिने आपल्या खेळाचं प्रतिनिधित्व करून जळतर स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.आतापर्यंत तब्बल १२४ नॅशनल सुवर्णपदक आणि ११ इंटरनॅशनल सुवर्णपदक आणि ३ रजतपदक असा सुवर्णमयी बहुमान तिने प्राप्त केला आहे.ज्याची गणती करणे अशक्य आहे अशा अनेक पुरस्कारांनी कांचनमालाला सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकलव्य पुरस्कार तर भारत सरकारच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले आहे.

                                   हे सर्व करत असताना स्विमिंगच्या करिअर सोबत तिने अभ्यासाकडेही तेवढेच लक्ष दिले.१० व १२ ती पहिल्या वर्गाने  पास झाली.पदवी शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि इथेही प्रखर जिद्द,सचोटी आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर (खेळातील कामगिरीमुळे नव्हे) तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आज ती नागपूर येथील रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.सकाळी पाच वाजता कांचनमालाचा दिवस सुरू होतो. सकाळी व्यायाम,रोज सकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस..त्यानंतर ऑफिस काम पुन्हा संध्याकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस असा रोजचा तिचा पूर्ण व्यस्त दिनक्रम असतो आणि यामध्ये पती विनोद देशमुख यांची मोलाची साथ तिला लाभते आहे.

                                  जन्मतः अंधत्व..पण त्या अंधत्वावर मात करून केवढं मोठं उदात्त कर्तृत्व सिद्ध करता येतं हे कांचनमालाने सिद्ध करून दाखवलं.दृष्टी तर सगळ्यांनाच आहे पण आभाळाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा आणि सातासमुद्रापार झेप घेण्याची भरारी घेण्याचा दृष्टिकोन नाही कुणालाही साधता येत.डोळ्यातल्या काळोखाने कधीच तिच्या यशाची वाट रोखली नाही..पण उभारत्या काळात एक अंध मुलगी म्हणून ज्या लोकांनी तिला हिणवलं तिला भक्कम साथ देणाऱ्या बापाला मूर्खात काढलं त्याच लोकांच्या डोळ्यांत तिने आपल्या लखलखत्या यशाने झणझणीत अंजन घातलंय.कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते शेवटी तेच खरं...खरं तर कांचनमालाच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांचा-कुटुंबाचा प्रशिक्षक डॉ.प्रविण लामखेडे यांचा खूप मोठा वाटा आहेच पण खासकरून तिच्या बाबांचा सिहांचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.बाबा अगदी समर्थपणे तिच्या पाठीशी उभा राहीले...यशापयशाच्यावेळी जवळचा मित्र होऊन तिला धीर देत राहिले.प्रेरणेच बळ देत राहिले.

                 घरात पाच भावंडांमध्ये कांचनमाला व तिची अजून एक बहीण जन्मतः अंध निपजली पण कधीच कुणाकडून त्यांना वेगळी वागणूक मिळाली नाही.   सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांची जपणूक केली.लहानपणी कांचनमाला खूप खेळकर,खोडकर होती..कधी कधी अशा खोडकरपणामुळे तिने घरच्यांचा मारही खाल्लेला आहे. म्हणजेच काय तर दृष्टिविनाही तिचं लहानपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे गेलं आहे.त्यामुळे अंधत्वाचा न्यूनगंड कधीच तिच्या मनात निर्माण झाला नाही.. पण समाजाची एक रीतच असते..कुठे तरी कमीपणा शोधायची.. आणि म्हणूनच सुरुवातीला ज्यावेळी कांचनमाला स्विमिंग शिकत होती त्यावेळी तिचं कौतुक करायचं सोडून लोक टीका करू लागले.. आज अंध अपंग लोकांच्यात इतकं टॅलेंट भरलेलं असतानाही समाजाचा अजूनही त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलत नाही.. पण इथे मान्य करावं लागेल की,दृष्टी नसतानाही कांचनमालाने अशा लोकांचा हा दृष्टिकोन बदलायला भाग पाडलं.पण समाजाने अशा डिसेबल लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे तरच अशा व्यक्ती पुढे येऊ शकतात.चांगल्या माणसांच्या तुलनेत अंध अपंग लोकांना १०% जास्त मेहनत करावी लागते तेंव्हा कुठे अशा यशापर्यंत पोहोचता येते त्यासाठी डिसेबल लोकांना उभं करण्यासाठी समाजाचं पाठबळ मिळणं जरुरीचे आहे असं कांचनमालाचे मत आहे.

                                    एखादी गोष्ट करताना ती अगदी मनापासून केली पाहिजे कांचनमाला म्हणते,ज्या वेळी मी शरीराने पाण्यात असते त्यावेळी मनानेही पाण्यातच असते..म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाशी आपण मनाने एकरूप असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही..त्यासाठी अपार मेहनत.. मनामध्ये प्रखर जिद्द ठेवून वाटचाल करावी लागते.एक अशी महत्वाकांक्षा उराशी बाळगावी लागते की, आपल्याकडून काही अभूतपूर्व घडवून आणू शकते.. आणि त्यातूनच मग घडतं एक असं उदंड कर्तृत्व..ज्याची कीर्ती जगभर पसरते...अखंड देशवासियांच्या हृदयात भरला जातो अभिमान..कोरलं जातं इतिहासाचं एक पान ..सुवर्णपदकांनी केला जातो बहुमान...मिळालेल्या आयुष्याचं सार्थक होतं...प्रत्येक क्षणांचं सोनं होतं...जसं आज आपल्या कर्तृत्वाने कांचनमालाने आयुष्याचं सोनं केलं. कांचनमालाचं हे नेत्रदीपक उदात्त उदंड असं कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी तर आहेच.पण तिच्याकडून प्रामुख्याने हे शिकायला मिळतं 

"हमारी हालतें, हमारी कमियां कोई मायने नहीं रखती ना कुछ कहीए|

कुछ पाना हैं कुछ कर दिखाना हैं तो हमारें हौसले बुलंद होने चाहिए |" 

अंधत्वावर मात करत जागतिक पातळीवर गाजवलेल्या कर्तृत्वानं भारतमाताही आज कृत कृतार्थ झाली असेल.अशाच कर्तृत्ववान मुली घराघरांत जन्माला याव्यात. भारतमातेच्या या लाडक्या जलकन्येला मनापासून सलाम..आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..


जय हो मंगल हो...

 - किरण चव्हाण (कोल्हापूर)

८८०६७३७५२८.






जन्म लेकीचा- किरण चव्हाण.


 जन्म लेकीचा...


माय माझी विनवणी मी आता करू कोणापाशी,

तू ही असा कसा गं घाव घालतेस माझ्या मुळाशी.

सांग तुझ्याशिवाय मी कोणाच्या गर्भात वाढायची ...?

तू पण जर अशी वागत असशील तर..

 मी आई कोणाला म्हणायची...?


खरंच का गं तुला वाटतं..?

मी जन्मालाच येऊ नये

जन्मानंतर एकमेकींनी तोंड कधीच पाहू नये.

बाबांनाही माझ्या काहीसं असंच वाटत का गं..?

मग त्यांना तू हवी,आई हवी, बहीण हवी पण पोटची मुलगी नको का गं..?


नशीबवान आहात आईबाबा तुम्ही 

तुम्हाला तुमच्या आईबाबाने जन्म दिला,

मीच दुर्दैवी  जन्माला येण्याअगोदर तुम्ही माझा जन्म नाकारला.

तुमच्या पोटी येण्याचा असा मी हो कोणता गुन्हा केला?

गर्भातच खुडून टाकता का हो एवढी मोठी शिक्षा मला..?


तुम्हांला दिवा हवा वंशाला , तर गर्भपात करून पैसा हवा कुणाला,

स्वार्थ साधताय तुमचा तुम्ही पण माझ्या जीवाचा कोण घेणार हवाला..?

निर्लज्ज आहेत नराधम ते त्यांना लाज जनाची ना मनाची,

पण तुम्हालाही आईबाबा कस कळू नये मुलाच्या हव्यासापोटी हत्या करताय पोटच्या मुलीची.


या नराध्यमांच्या नादी आई तू ही कशी लागलीस गं..?

नदी नाल्यांच्या काठाने पुरताना मला तुला काहीच कस नाही वाटलं गं...?

खरंच आईपणाच्या नात्याचा तू आता लिलाव केलास आहेस का...?

गर्भातील तुझ्या या वासराला 

कसाबांच्या हाती तूच दिलस का?


शेवटी आई एवढंच मला तुला सांगावस वाटतं,

मलाही जन्माला येऊन हे जग पहावंस वाटत.

तूच ठरव मला जन्माला घालायचं कि नाही शेवटी तुझा अधिकार आहे ,

स्वार्थासाठी लोक काहीही करतील तुझ्या उदरात नाळ माझी तुझ्याशी जोडली आहे .


मी करेन ते स्वप्न पूर्ण मी होईन तुमच्या वंशाची पणती,

करीन घरादाराला समृद्ध लावीन संस्कृतीच्या नव्या ज्योती.

थकलेल्या तुमच्या आयुष्यात मी होईन जीवाचा आसरा तुमचा,

विश्वास ठेवा माझ्यावर अभिमान वाटेल तुम्हाला असा सार्थ करीन हा जन्म लेकीचा.

      (समर्पित... प्रत्येक लेकीला)

              

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

समाजभान उपक्रम - किरण चव्हाण.

'अंधारातल्या प्रगतीला प्रकाश देण्याचा समाजभानचा छोटासा प्रयत्न.'


इवल्याशा झोपडीला 

कुडामेडाचं दार गं.

साचलाय अंधार 

कुठून येईल उजेड गं.


                        दोन वेळच्या भुकेला आवर घालण्यासाठी जिथं आटापिटा करावा लागतो तिथं अंधारल्या झोपडीत कुठून येणार प्रकाशाचा किरण...कशी उजळणार ती.अंधारातल्या दोन जिवांची ही कहाणी आहे मिणचे खुर्द ता भुदरगड येथील मायलेकींची. प्रगती परीट सध्या नववीत शिकते.वडिलांचं छत्र कधीचं हरवलेलं.आई आहे तिलाही अधूनमधून फिट येते.त्यातूनही ती माय रोजच्या भुकेची तडजोड करण्यासाठी उन्हातान्हात दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जाते.घरात दिवाबत्तीची सोय नाही त्यामुळे दिवसा दारातून येणारा आणि रात्रीचा दिव्याच्या मिणमिणता उजेड एवढीच उजेडाची सोबत.आज दिव्याच्या मिणमिणत्या उजेडातच प्रगतीला आपला अभ्यास उरकून घ्यावा लागतो..

                      आज एक सावित्रीची लेक अंधारात आपलं जीवन घडवू पाहतेय..'ज्ञानदीप लावू जगी' असं फक्त म्हणायचं आपण. पण शेजारच्या एका ज्ञानज्योतीच्या अंधारल्या झोपडीत आज एक दिवा देता येत नाही...दिवाळीला तर घरादारावरून लखलखत्या प्रकाशाचा झोत ओसंडुन वाहत असतो. पण अंधारानं मुजलेल्या घरात एक प्रकाशाचा झोत झळकावा असं कुणाला वाटत नाही..?

                  पण गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजींची) विचारधारा हीच आमची जीवनधारा या विचारांची कास धरून वाटचाल करणाऱ्या समाजभान उपक्रमांतर्गत आज प्रगतीदिदीला सोलर लँप तसेच धान्यस्वरूपात मदत देण्यात आली.सोलर लँपसाठी उमेद फाउंडेशनचे भरीव योगदान लाभले.यावेळी समाजभानचे शिवम साधक श्री. सागर गुरव,आकाश पाटील व किरण चव्हाण,आशा सेविका सौ.वैशाली गुरव,श्री.बाबुराव गुरव उपस्थित होते.

 एकंदरीतच मायलेकींच्या अधांतरी जगण्याला आधारच  बळ देण्यासाठी आज समाजाच्या दातृत्वाची गरज आहे..

...धन्यवाद.!!




संपर्क : समाजभानचे शिवम साधक श्री सागर गुरव (कोळवण)

मोबा - 9146148904

-----------------------------------------------


गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

अभंगवाणी - पांडुरंगा...- किरण चव्हाण.

 

'पांडुरंगा...'


तूच पांडुरंगा निवारी हा काळ । 

राहिले न बळ अंगी आता  ।। 


चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी। 

काय माझी स्थिती सांगू तुज  ।। 


मुक्यापरी मन सोसतची जाय । 

 किती हे सायास सहावे मी  ।। 


सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।

 नाही उपभोग मज घ्यावयाचा ।। 


    सोसवेना आता दे गा तू आधार ।   

टाकीतो मी भार तुजवरी ।। 


नको ऐसें जिणे देऊ मज देवा । 

नाही आता हेवा जीवनाचा  ।। 


पुरे झाली आस नको आता वास । 

तुच माझा श्वास पांडुरंगा  ।। 


काय उरे आता इथे माझेपण । 

देई मज ठाव तुजपाशी  ।।


 

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

बलुतेदार परीट समाजाविषयी..- किरण चव्हाण.

 

'एक वेध परीट समाजाचा : भूतकाळापासून वर्तमानकाळपर्यंतचा.'

                                           गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी परीट हा एक महत्वाचा आणि प्रामाणिक असणारा मेहनती समाज.महाराष्ट्रात तो परीट तर इतर राज्यांत 'धोबी' या नावाने ओळखला जातो.२०११ च्या जनगणनेनुसार देशात परीट समाजाची लोकसंख्या ८,२२,००,००० इतकी आहे.संपूर्ण राज्यात तो कमी अधिक प्रमाणात विखुरला गेला आहे.या परीट समाजात मादीवाला,अगसार, पारित, रजक, एकली,चकली, राजाकुला,वेलूतदार,सेठी,मरेठीए अशा जाती-प्रजाती आहेत.संत गाडगेबाबांशी या समाजाचं जिव्हाळ्याचं नातं.आपल्या परंपरागत व्यवसायातून कित्येक वर्षे हा  समाज आपल्या गावच्या सेवेत रुजू आहे.अशा या परीट समाजाचा भूतकाळापासून आज वर्तमानकाळपर्यंत घेतलेला हा वेध..

                                       आमच्या गावाच्या वरल्या आळीला एका कडन वसल्याली सताट घरं हाइत..काही जुनीपाणी साध्या खापरीची तर काही अलीकडं बांधल्याली कौलारू छपराची.. काही दगडा मातीची, विटांची..साधी सुधी पण निटनेटकी तर सगळ्यात कडला एक चांगला नजरत भरल असा बंगलाटाईप. असा एका रांगत परटांच्या घरांचा हा गोतावळा...याच रांगतल सरमधलं घर.वरती हिरवा आणि खाली गुलाबी रंगांचा पट्टा.. बाहेर शेड्यावर जाडजूड आखीव रेखीव दगडांची कट्टी.त्या कट्टीच्या खालच्या कचात लोखंडी सळीच्या..दोन तीन ठिकाणी आडी कल्याला गोल रिंगा,आत खाली लग आणि दोन पायऱ्या वर चढून मग सोपा...सोप्यावर आडवी बांधल्याली मेसकाटीची आडवी दांडी..तिच्यावर एका वळीन लादल्याली धडूती..मधल्या भीतीला बडोद्याच्या खायनं एका रांगत देवाधर्माचं फोटो..त्यात सगळ्यात कडला एक फोटू आपसूकच लक्ष वेधून घित होता...तसं त्यो कुणाचाबी घेईल...कुणाचा होता तो..? त्यो होता स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा महाराजांचा.अणुकीचीदार नक्षीकाम केलेल्या चौकटी...तसाच खालचा हुंबरा..गरीबाचा वाडाच म्हणायचा त्यो हे घर म्हणजे सातू परटाचं.आणि याच मधल्या सोप्याला एका बगलला घोंगड्यावर सातू परटाची बैठक..सातूआज्जा म्हणजे सगळ्यांचा तात्यामा. सानथोर सारी मंडळी 'तात्यामा' म्हणूनच हाक मारत्यात.. रंगानं काळासावता,लांबसडक टोकदार नाक..वठावर पिकलेल्या पांढऱ्या मिशांचा खंगोल...गालाच्या दोन्ही पाकळ्यास्नी सुरकुत्या पडल्याल्या. 

                                           तरीबी ऐंशीपतोर वयाची गाठ पडायला आल्याली. परटांच्या सगळ्या भाऊबंदकीत जुनाजाणता माणूस..तात्यामाचं एक वेगळेपण सांगायचं म्हणजे तात्यामा पयल्याकाळी सगळीकडं फिरल्याला...बारा गावचं बारा घरचं पाणी पिल्याला माणूस..आपल्या पावण्यारावळ्यात पार मुंबई-पुण्यापतोर जाऊन आल्याला.इकदा कुठल्या नातलगाकडं पुण्याला गेलता...पुण्याला म्हणं नदीच्या काठाला घाट बांधल्यात तिथं परिट धुणं धुत्यात त्येंच्याकडन वरसाला तीन रुपया कर घेत्यात. ही तर गोष्ट तात्यामा कुणासंग बोलताना हमखास सांगायचा म्हणजे सांगायचाचं.जिथं जाईल तिथला हालहवाला आपल्या माणस्नी सांगायची सवय..बारा गावच्या बारा भानगडी...आणि सतरा घडामोडी ऐकाव्या तर त्ये तात्यामाकडनं.गावच्या परटाच्या समाजात थोराड माणूस ह्यो एवढाच.परटाचीच नव्ह गावात कुणाचंबी लगीनसराई असू दे नाही तर कंचाबी कार्यक्रम... तात्यामा जातीनं हजर असणार...भाऊबंदातबी मिळूनमिसळून काय करायचं,कुठं जायाचं असू दे तात्यामाला इचारूनचं सगळं करायचं...कुणाचा भांडणतंटा-तिड्याचा वाद त्यो सोडवायला तात्यामाकडंच.दुखणंपाखणं असू दे गल्लीत कुणाच्या घरात महीत व्हवू दे तात्यामाचा लई आधार वाटायचा लोकास्नी... आन तशी तात्यामालासुद्धा माणसांची दांडगी मया..साधं. वाटन जाणारं वाटसरू असू दे,तात्यामा मुद्दाम हाळी मारणार..ख्यालीखुशाली इचारणार...तात्यामाचं एक वाक्य तोंड पाठ केल्यासारं त्याच्या तोंडात ठरल्यालं असायचं..."चांगलं बोलून चालून-ऱ्हायाचं बघ..जातानं काय घिऊन जायचं हाय व्हय" तात्यामाचं बोल खरंच व्हतं... त्या साध्या साध्या शब्दात मोठं जीवनाचं तत्वज्ञान व्हतं.. त्याला ते उमगलं व्हतं... नुसता बोलत नव्हता तर तसा वागतबी व्हता..कारण गावातली लोकं त्याला मान द्यायची..वर म्हणायची..तात्यामाचं वागणंचं निराळं...जसं बोलणं गॉड तसं वागणंबी गॉड... 

                                                        एखादा माणूस तात्यामासंग तासघटका बोलत बसायचा त्यो तिथंच मंतरल्यासारखा बसून ऱ्हायाचा..त्याच्या नेहमीच्या गराड्यात गावातली जुनी जाणती म्हातारी माणसं....तात्यामाला आपल्या परटाचा धंदा आपला समाज याविषयी लई अभिमान.. सगळं कसं समोरच्याला पयल्यापासून हारखून सांगायचा..पोपटाच्या चोचीगत सदा लालेलाल रंगीत जीभ...आधीमधी हिरव्याकंच खाऊच्या पानांची उळी दाढत धरून चगळायचा. बसल्या जाग्यास्न उठून दाराम्होर जाऊन लालभडक पिंक मारून पुन्हा आपला जागा धरायचा.तात्यामाच्या पोटाला तीन ल्याक आणि दोन लेकी...एक मास्तर म्हणून शहरात नोकरीला आणि दोघ गावाकडं शेतीधंदा करत्यात...लेकी दिल्या घरी चांगल्या हाइत्या.नातरुंडं-पितरूंडं तात्यामाच्या अंगाखांद्यावर खेळात्यात,पुढ्यात दणाणा उड्या मारात्यात,अंगाशी झोंबत्यात.तात्यामाचं घर म्हणजे भरलं गोकुळ..आणि तात्यामा म्हणजे सुखासमाधानानं पावन झालेला माणूस... 

                                                     अशा या तात्यामानं माझ्या मनावरती कधीच भुरळ घातली होती...आणि एकदा मनानं पक्कं केलंच.. आपण आता तात्यामाला भेटायचं..आणि म्हणून  एका सांजवक्ताला निवांतपणे मी तात्यामाजवळ जाऊन बसलो...माझ्यासमोरच तात्यामानं घोंगड्यावर बैठक मारलेली.सुरुवातीलाचं मला माझ्या आज्जा-पंज्यांच्या नावांची उजळणी करावी लागली तवा कुठं तात्यामाला माझी वळख गावली.. मधल्या चौकटीला गुणाआज्जी कौतुकानं माझ्याकडं बघत होती.तिच्या सुरकुत्या पडलेल्या कपाळावर चांगलं बंदा रुपायाएवढं ठसठशीत कुंकू उठून दिसत होतं...हिरव्या काठाचा डुईवरचा पदर.. मांडीवर तान्ह्या नातवाला ती घेऊन बसल्याली..लगश्यान तिनं सूनला चुलीवर चहा ठेवायला सांगितलं.

"मुला काय करतुस कुठं आसतूस..?" असं गुणाआज्जी मायेनं सारं मला विचारलं...

"अलीकडंची पोरं तुम्हीं कशी वळखशीला... आरं बाबा तुझी आज्जी आमच्याकडंचं द्यायची धडूती धुवायला.."

चहाचं कप पुढ्यात आलं.आज्जा- आज्जी एकेक करून मला प्रश्न विचारू लागले.तसा मी चहाचा एकेक घोट घेत त्यांना उत्तरे देऊ लागलो.आज्जा-आज्जी बोलत होते तसं जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.आमच्या गप्पाला रंगत आली..आणि मात्र मला जे जाणून घ्यायचं होतं.. तात्यामा..त्यांचा परीट व्यवसाय.. त्यांचा समाज त्या अनुषंगाने विचारू लागलो तसं तात्यामानं आपलं एकाबाजूनचं पट्टा सुरू केला पयल्यापासनं बयाजवार सगळं सांगू लागला...त्यो बोलत होता पण त्याचं मन भूतकाळात शिरलं होतं.

                                          "गरिबा घरी गरीबाच्या पोटी उपजल्याली आम्हीं लेकरं...आम्ही एकूण सात भावंडं... चार भाव आणि तीन भणी...आई - बा बिचारी गरीब,दिनवानी...काय सांगायची हालत तवाची....काय सांगू नि कस सांगू..आम्हीं सांगू ने नि कुणी ऐकू ने.ऱ्हायाला एक नकाडं खोपाट व्हतं...नारळाच्या  ढाळ्याचं.. आणि उसाच्या पाल्याचं खोपाट.त्यात आम्हीं एवढी माणसं ऱ्हाईताव..वाडवडलापासून चालत आल्याला आमचा परटाचा धंदा...हातावरचं पॉट..चार हात राबणारी आणि धा तोंडं खाणारी...कुणाला म्हणून पुरायचं...कोंड्याचा मांडा करून खाल्ला बाबा आम्हीं... आई नदीला धुवायला गेली की रानातली कुर्डुची,घोळ्याची भाजी आणायची...तवा भाजीला 'त्याल' बी मिळायचं न्हाई...मिठाचा खडा टाकायचा आणि तशीच तव्यात परतायची.. पोटाच्या आगीला भाकरीच्या तुकड्यासंग आत ढकलायचं..पोटाची भूक लई वंगाळ...काय खाऊ नि काय गिळू व्हायचं...आई- बा तरी जीवाचं रान करायचीत.. पर पोटाला पोटभर आन मिळायचं न्हाई.आई सकाळी लवकर उठली की,हुडदाच माडगं करायची...ताटलीत वतून दिलं की,सरसरून प्यायचं..काय सांगू त्येची चव.निराळीच म्हणायची.आसं कित्येकदा घडलया..नुसत्या पाण्यावर आम्हीं झोपलूया... दाताच पाणी गिळून गप बसायची येळ यायची..अंगावर साधा कपडा चांगला मिळाला न्हाई..आई-बा मुलखाची कापडं-चोपडं धुवायची खरं स्वतःच्या लेकरास्नी धडूता घ्यायला मिळत नव्हता.. तवा पैसा कुठला..रूपाया म्हंजी बैलगाडीच्या चकराएवढा वाटायचा..नुसतं पोटासाठी राबायचं की गां...कुणी तरी मोठ्या घरातलं बाईमाणूस  जुनं-पानं झाल्यालं धडूत आईला द्यायचीत ती आई आम्हांस्नी घेऊन यायची.आसं परक्याचं धडूत कधी आणलं तर आम्हीं हारखून ढया व्हायचो.दुसऱ्याचं कापडं घालून मिरवायचो...

                                                         एका माळचं सात मणी म्हणत्यात तसं आम्हीं सात भावंडं...आई कुणाकुणाचं म्हणून बघणार त्यात माझ्या पाठवरची धाकली भन तानी.तिला तर सारखं बरं नसायचं...आई कुठलं कुठलं दयाव- धराम करायची...लेकीच्या नुसत्या उशाला बसून ती रात रातभर जागायची.माझ्या आयचं तर कुत्रंहाल व्हयाचं... पाटचं येरवाळी उटायचं..घरातली निरवानीरव करायची ती लगोलग गावात पळायचं... समद्या गावांत फिरून धडूती-बिडूती जमा करायची... एक बोचकं डुईवर एक काकत मारून..कुठल्यातरी आयबायांनी भाकरतुकडा दिल्याला असायचा त्यो तसाच वट्यात घालून आम्हां लेकरासाठणी आणायची...घरात आली की आमास्नी पयल्यांदा जेऊ खाऊ घालायची... कुठं खाल्ल कुठं नाही त्ये लगीच धडूती धुवायला नदीला पळायची.संग बा सुद्धा असायचा..दोघ मिळून समद्या गावाची धडूती धुवायची...उन्हाचा कडाका व्हायला म्हणजे आटपून व्हायला पायजे इकडं ध्यान असायचं पण कधी कधी दिस लागायचा...न्हान असताना मी-माझी भावंडं कधी मधी आई-बा संग जायाचो..नदीच्या काठाला नकाड्या पाण्यात मग आमच्या उड्या.. एकमेकांच्या अंगावर पाणी मारायचो...नुसती पाण्यासंग मस्ती करायची...आई मग तितनच वरडायची...

                                                     धुणं धुवून झालं की,बा भरल्या नदीत आत आत जाऊन पवून यायचा..तवा आम्हांला बा चं केवढं कवतिक वाटायचं...आम्हींबी 'बा' कडं आम्हांस्नीबी पवायला शिकीव म्हणून सारखा लकडा लावायचो..मग बा बी एकेकाला नदीत आत घेऊन पोटाखाली हात घालून पाय मारायला सांगून पवायला शिकवायचा.बा न तवा आम्हांस्नी पवायला शिकवलं...म्हणून तर आता कुणीबी सांगावं भरल्या तर  भरल्या नदीत आणि कंच्याबी हिरीत आम्हीं पवायला तयार. शाळा जायाचं वय झालं कशी तरी पयलीपतोर शिकलो बघ शाळा...आमच्यावर तवा योकच गुरुजी व्हता. काळे आडनावाचा गुरुजी..गांधी टोपी.. काळा कोट..पांढर धोतार...आणि हातात जाडशीर लांब काटी...वठावर दोन्हीं बाजूला मिशांचा खंगोल.सदा पानाचा तोबरा भरल्याला.टेबलावर नुसती काटी आपटली की,पोरं निम्मीअर्धी गार व्हायची...लई मारकूटा मास्तर व्हता...शाळला गेलं न्हाई की,लवण्यात झमाझम काट्या मारायचा...पेंढरी बेडकावाणी फुगायची.. सुजायची... कोण जाईल असल्या शाळत.अशा मास्तराच्या माराला भिऊन शाळा दिली सोडून...मग काय गल्लीतला हाणम्या,नामा,दगडू हे आमचं गुराढोरकडलं बालमैतर.. आई-बा कामाला  गेली की आम्हास्नी रान मोकळं..ऊन माहिती न्हाई का तान्ह माहिती न्हाई आम्हीं पोरं पोरं नदी वताडातन(लहान ओढे) मासं,खेकडी पकडायला जायाचं.रानाशिवारातनं कुठं आंबं, जांभळं,करवंदासाठनी दावं नसल्याल्या जनावरांसारखं उंडगं फिरायचं.

                                          आईनं गावातल्या जनाई पाटलीनीकडन आरदलीन शेळी घेतली व्हती..तिचा आता चार पाच करडांचा खांड झालता...पुढं पुढला बा नबी येजाच्या पैशावर दुभती म्हस आणली...कारण आता आम्ही भावंडंबी जरा जाणतं झाल्याल्याव जराकमी कळतं झाल्यालाव... घरातली कामं करत व्हतो...मी शेरडांचा खांड घेऊन डागला (डोंगराला) जायाचो..आता घरात शेरडां- करडांचा,म्हशींचा खटाला झाल्याला.हळूहळू घराला बरकत आली. आई-बा न परटाच्या धंद्यावर..आणि शेरडाकरडांच्या जीवावरघर नवं घर बांधायचं ठरवल्यालं.. आणि मग एकदा कामाला सुरुवातबी केली. त्या येळला आम्हीं भणीभावंडं आई-बा रातंदिन उरापोटी राबलो.. आणि एकदासं चांगलं दगडा-मातीचं नकाड घर उभा राहीलं.आई-बा गावतन धडूती जमा करायची आणि मग आम्हीं सगळीच नदीला धडूती धुवायला जायाचो...आता काम करणार हात वाढल्याल त्यामुळं आई-बालासुधा आधार झाल्याला...पुढं पुढं जशी वयं झाली तशी आमची लग्नं झाली..भणी जिकडं तिकडं दिवून टाकल्या...माझं लगीन त्यायेळला स्वस्ताइत सात रुपयात झालं..आता बघताईसा नवं कशी म्हागाई वाढलीया...आता सात रुपयात कात बी यायचा न्हाई.

                                                   आई-बा नं लग्नं करून दिली जो तो आपापल्या संसाराला लागला.आता आईबाचं वय झाल्यालं. बिचारी खूप राबली आमच्यासाठनी.. खूप कष्ट उपासल.पर आम्हीं भावा भावांनीबी त्येंची जाण राखली..म्हाताऱ्या वयात त्यास्नी चांगलं जपलं..आमच्या चुली येगळ्या पण एकी चांगली..कुठल्याबी भावानं आई-बाला अंतर दिलं न्हाय..शेवटपतोर वाळ्या खारकगत... कसला आजार न्हाई..कसला दवापाणी न्हाई..वय झालं, शरीर थकलं तसं हातरून धरलं..पयला बा मरून गेला आणि मागाहून चार वरसान आई गेली. 

                                                 तसं आम्हीं भावा-भावांनी मिळून ह्यो परटाचा धंदा चालू ठेवला.   गावातल्या लोकांच्याकडनं कापडं-चोपडं जमा करून घ्यायची.बोचकं बांधून घ्यायचं.बोचकी जास्त आसली की,घरातली सगळी जाणती माणसं असायची....बोचकी डुईवर घ्यायची ती सरळ नदी गाठायची. धडूत्यांचा मोठा ढीग सपय खडकावर वाळ्या जाग्यावर ठेवायचा.आणि मग सकाळच्यापारी आमचं काम सुरू.काठावरच्या सरळसोट धोंड्यावर एकेक कापडं धुवायला घ्यायची.आताच्यासारखं त्यायेळला साबणसुबन कुठला..? नदी-वताडाच्या काठानं पांढरी माती असायची जितनी शाडवागत..ती माती घ्यायची तिचा मुटका करायचा.आणि कपड्याला घासायचा...चिवट तेलकट डाग आसू दे न्हाई तर कसली भी मळ असू दे की,मळकी कापडं माती लावली आणि पाण्यात खुदबळून जरा बाहीर काढली की,कशी लख्ख निघायची...एकेक धडुत हातात आलं की कसा चेव चढायचा म्हणतूस...धडुत कशी लख्ख व्हतील इकडं सगळं ध्यान.पर हां... लई घासाघीस करून चालायची न्हाई..कापडं धुताना इकडं कपड्याचा मळबी गेला पाहिजे आणि पहिल्यासारा त्याचा रंगबी राहिला पाहिजे यासाठी जपून धुवाया लागतं. बड्या घरची...परलोकांची कापडं..कुठं फाटलं-उस्तारलं बटाण बिटान तुटलं तर बदमाल नको म्हणून जिकिर असायची.

                                                  मोठ मोठ्या लोकांची कापडं आमच्याकडं धुवायला आसत.गावातल्या बामनं,पाटलाच्या घरची कापडं सर्रास धुवायला आमच्याकडच.ही आमची हक्काची गिऱ्हाईकं म्हणायची.एकेक कापडं धुऊन- पिळून नदीकाठाच्या वाळ्याखड दगडावर ठेवायची आणि सारं धुऊन झाली की, उघड्या पडीवर..कुठं वाळ्या जागी वाळत घालायची.. माणसं जास्त असली की,एकानं धुवायची, एकानं पिळायची आणि एकानं ते सपय जाग्याला वाळत घालायची.चांगली सोकली- वाळली की,मग एकेक करून त्याच्या घड्या घालायच्या.ते एकावर एक येवस्तीर मांडायचं नी फडक्यात बांधून ते बोचकं घेऊन घरला परतायचं.आख्खा दिस याच व्यापात जायाचा.सांच्यापारी ज्येची त्येची कापडं परत द्यायची.जशी घेतली तशी कापडं त्येंच्या सोध्यान करायची.पर कधीमधी कापाडाची हेंच त्येला आन त्येज हेला अशी गफलत व्हायची...पण लोकं कायबी बोलायची न्हाईत...परीटमा हे जरा बदलून आलंय बघ कुणाचं.हे कायआमचं नव्ह बा... तवा मग वळख पटवून ज्येचं त्येला द्यायचं...आता एवढी गावमुलखाची कापडं  म्हटल्यावर कापडांच्या धबडग्यात अशी चूक कंदीतरी व्हायची...चालायचंच. जास्त मळकी डागाबिगाची कापडं लख्ख निघाल्याली बघून एखादी मालकीणबाई खुश व्हायची..."परीटमामा...कापडं चांगली धुतल्याती." आस आनंदाचं दोन शबुद म्हंजी ती आमची  शाबासकी म्हणायची नवं का.? आमच्या कष्टाचं ते चीजच म्हणायचं...तेवढ्यान मन भरायचं आमचं.नाही तरी पयल्या काळी आमच्या या कामाला दाम मिळत नव्हतं.. पोटाला पॉट भरून दोन येळला जेवाण मिळायचं...दोन वक्ताच्या जेवणासाठी गावची कापडं आम्हीं धुवायचो...

                    काळ माग पडला फकस्त पोटच्या भूकंसाठी राबनं परवडना..माझ्या पोटाला पाच लेकरं झाल्याली.घरात एकाची दोन दोनाची चार...खाणारी तोंडं वाढली...गरजा वाढल्या..गरीबीनं म्हणा वा आमच्या नशिबानं म्हणा आम्हांला एक शाळा शिकता आली न्हाई.. पण एक ठाणलं व्हतं काय बी व्हवू दे जमलं तसं पोरास्नी शाळा शिकवायची..आणि मग पोरांस्नी बजावूनच ठिवलं व्हतं पयली शाळा मग बाकीचं काम.या काळात कापडं धुण्याच्या मोबदल्यात लोकांच्याकडणं बैतं (धान्यस्वरूपात मोबदला)घ्यायला सुरुवात झाली.गावातली आयगारी (सुतार,लोहार,चांभार,कुंभार) लोकं जशी कामाच्या मोबदल्यात वर्षाची बिदागी घेत्यात तसं आमच्या समाजातही सुरू झालं.एखाद्या कुटूमांकडं बैतं ठरायचं. मग भात, शेंगा,दाणदुनं असू दे जे चांगलं पिकल ते धान पदरात पडायचं. त्याबदल्यात वरीसभर त्या घराची कापडं चोपडं धुवून द्यायची...एखादी कुळविन (शेतकरीन) आपल्या लेकराचं धडूत चांगलं धुवून देण्याच्या बदल्यात हौसनं घरातल्या बापयमाणसांच्या माघारी सूपभरून धान वाढायची.कुणी आपल्या घरातली जुनीपानी कापडं, जुन्यारं घालायला म्हणून द्यायची.ती आम्हाला, आमच्या  लेकरांच्या उपेगाला पडायची.

                            गावच्या म्हाईला (जत्रेला) आणि दसऱ्याकडं ,कवा आदनमधन वाकळाबी धुवायला घ्यायचो.म्हाताऱ्या माणसाचं पटकं रंगवायला घ्यायचं. गावात  रंगवायची सोय नसायची त्यायेळला तवा कुठं ठिकठिकाणी हे काम करून दित असायचीत तितनं रंगवून आणून गिऱ्हाईकाला पोच करायचं.लगीन घराची कापडं धुवायला आमच्याकडं असायची.आनंदाघरची कापडं असली की बिदागीबी चांगली मिळायची..लगीन मंडपात चांगला मान मिळायचा...तसं तर लगीन कार्यात पाट पुजायचा..तळी मांडायचा मान आमच्याकडंच आसतोय म्हणायचा..उलट आणि नवरा नवरीच्या डोक्यावर चांदवा (चादरी) धरायचा तो आम्हींच..बाळंतीण बाईची-बाळाची धडूतीबी आमच्याकडं धुवायला असायची..अगदी घरच्यावाणी आम्हीं करायचो.कशाची आशा नसायची पण बाळाच्या बारशात आमच्या घरच्या कारभारनीला लोकं हौसनं झंपरपीस- पातळ नेसवायची,चांगला मान दिला जायाचा.

                                    दिवाळीत गवळण्या घालत्यात आणि शेवटाला त्या गवळण्याचा वाडा घातला जातोय...तो वाडा पुजायचा मान आम्हांला मिळतोय.लोकं आम्हांला त्यो वाडा पुजायसाठी घरी बलवत्यात. "दिन दिन दिवाळी गाई म्हैशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या.."असं म्हणत त्या वाड्याची पूजा करून आरती म्हणायची...पयल आम्हीं बा संग आस दरवरसी वाडा पुजायला कुरवाड्याच्यात जायाचो..आता आमची लेकरं आमच्यासंग येत्याती.दुःखासुखाला आमचा परीट समाज कधीबी उभा ऱ्हातोय...गावात कंच्याबी घरी कोण वारलं की..त्या सुतकात आकंड घरातली कापडं आमच्याकडं धुवायला...बाराव्याच्या कार्यक्रमापतोर ती कापडं धुवायची... त्येचा मोबदला कधी मिळल...किती मिळल असलं ध्यानीमनी पण नसायचं...आवं आपलं कामच त्ये...केलंच पायजे. कसली आशा नाही पण लोकं लई प्रामाणिक...त्यांचं उग्र-निग्र काढल्यालं.. त्येंच्या ध्यानात असायचं बरं...न चुकता आपुलकीनं बिदागी...मानपान द्यायचीत...याआमचा परीट समाज दांडगा मेहनती..वरीसभर त्याच्या हाताला काम.पर आमच्या काळी जुनी माणसं सांगायची परटाची लोकं कुस्तीतबी भारी हुशार...समोरच्या पैलवानाला कुशालीन चितपट करणार.म्हणूनच म्हण 'धोबीपछाड' ह्यो डाव परटानींच शोधला असं पयली लोकं सांगत व्हती.

                                         भैरोबा आमचं कुळदैवत..तरीबी जोतिबा,खंडोबा,मरीआई,येडाबाई, भवानीदेवी या देवांचीबी पूजा आमच्या समाजात करत्यात.आमच्या इतनं जोतिबा जवळ हाय वरसातनं जोतिबाच्या दर्शनाला जाताव.तसाच आमच्या समाजात एक जिताजागता देव व्हवून गेला..लई थोर माणूस..माणसातला देव..आमचा परमेश्वर संत गाडगेबाबा महाराज...माणसानं कसं ऱ्हावं.. कसं वागावं..बोलावं..आमचं महाराज गाव गाव फिरून किर्तनातन सांगायचं..हातात झाडू घिऊन गांव साफ करायचं...आवं गाडगेबाबा माणसांच्या मनातला मळ घालवायचं तसा आमचा परीट समाज माणसांच्या कपड्यांची मळ घालवतोया...बाबांचं इचार आम्हीं आमच्या मनात जपतोया बघा.बाबांची जयंतीबी आमच्या समाजात साजरी व्हती.कुठं कुठं चांगला कारेकरम करत्यात.

                                           गावच्या देवाची मातूर वस्तरं.. काय आसल त्ये कापडं-चोपडं... आमच्याकडं धुवायला असत्यात... ज्या गावात परीट न्हाई त्या गावच्या देवाची वस्तरं आम्हीं धुऊन देतो...म्हाई... दिवाळी, दसऱ्याला ददेवाच्या दरबारात दिवटी धरायचा मान आम्हाला मान मिळतोय..तर कुठं दुसऱ्या भागात आमच्या समाजाला आबदारी धरायचा मान मिळतोया.पण ही फकस्त सेवा म्हणून करायची...अजून ही तरी चालरीत चालू हाय म्हणायची...पयल्या काळी देवाचा कायबी कारेकरम आसला की तवा भांड्यात भात शिजवायचा आणि तो खाली फडकं हातरून त्यावर वतायचा त्ये फडकं आमच्याकडलं असायचं. त्या फ़डक्याला 'पडद' म्हणायचं. ही पडद आमच्या भाऊबंदकीत दर वरसाला आलटून पालटून यायची. आमच्या काळापतोर तरी सगळं चालू व्हतं पर खरं सांगायचं तर आताच्या काळात ह्या साऱ्या चालीरीती मागं पडत आल्या  म्हणायच्या..आणि तसं तर पयल्यासारं कोण करतंय ह्यो परटाचा धंदा.आता माझंच बघा की माझी दोन पोरं लई काय न्हाई थोडीफार शिकली..धाकटं तरी चांगलंचं शिकलं आणि शहरातल्या शाळत मास्तर म्हणून डसलं. पोरं करती धरती झाली..आमचा परटाचाचं नव्ह हरेक नमुन्याचा उद्योग करत्यात..पोरांनी आता शेतीबी घेतलीया.चार एकर शेती हाय..ऊस करत्याती... बक्कळ पैसा कमवत्यात... आता पयल्यासारं न्हाई ऱ्हायलं.जे बापानं केलं ते लेकानंबी करावं..आता ही आमची म्होरची पिढी  शिकली सवरल्याली हाय...लाथ मारील तिथं पाणी काढणारी हाय ती.आता कुठं कुठं तरीच म्हणायचं आमचा परटाचा धंदा,तर कुठं आपला परटाचा कामधंदा बघत शेती-उद्योगबी करत्यात म्हणायचं.

                                           आता हे काय आमच्या परटाच्या समाजातच बदल झालाय आसं न्हाय. सगळीकडंच ह्यो बदल झालाय..दुनियाच बदललीया म्हणायची.लांबच कशाला जवळचंच बघा की, आमच्या गावांत चांभाराची धा घरं हाइत.पण जुनी माणसं सोडली तर अलीकडच्या एकाबी पोराला चप्पल लावायला इत न्हाई...चांगली शिकून सवरून मोठ्या हुद्द्यावर काम करत्यात.शिक्षणानं सगळीकडं सुधारणा झाली बघा आमचा तर समाज बऱ्यापैकी सुधारलाय.अलीकडची पोरं चांगली शिकूनसवरुन कुठं सरकारी खात्यात...कुठं खाजगीत मोठया हुद्द्यावर काम करत्यात...एकेकाळी फक्त पोटासाठी काम करणारा आमचा समाज आता.कोण शेती,व्यवसाय,नोकरी करून आपापली प्रगती करतोया...पण आपला परटाचा धंदा मागं पडला म्हणायचा...शहरठिकाणी तेवढा जेमतेम सुरू हाय पण इकडं खेडंगावात कुठं कुठं तरी न्हाई तर बंदच पडल्यातच जमा म्हणायचा..

                                             आता ही इस्त्रीची दुकानं थाटल्यात ती बऱ्यापैकी आमच्या समाजातल्या लोकांनी...इस्त्री करत्याती ती डराय किलनिंग का काय ती बी करत्यात..आणि कोण आणखीन कसला कामधंदा करत्यात..बऱ्याचजणांनी रोजीरोटी,नोकरी-व्यवसायाच्या निमित्तान शहरं गाठली...तिथंच स्थायिक झाली.पयलं माणसांकडं कायबी नव्हतं पण एकमेकासाठी येळ व्हता..आज घड्याळाच्या काट्याची गुलाम झालीत ही माणसं..कुणाकडं हाय का कुणासाठी तासघटका येळ...नुसती गरा-गरा घिरट्या घालीत असत्यात पैशाभवती...एकेक काळी नुसती पोटासाठी राबणारी आम्हीं माणसं कुणाला सांगून पटल.. आता पैशाला किती म्हतवं आलं,जो तो पैशाच्या मागनं.आपल्या गावात आता आमची आठ घरं हाइत आता कोण किती आपला धंदा करत्यात..? जेमतेम तेवढं आपलं सुरू हाय..जे इथं ते जगात.आता लोकं कुणावर इसमून नाहीत ऱ्हायली.हल्ली बघताईसा नव्ह माणसांची जागा आता यंत्रातंत्रानं घेतलीया..माणसांची कामं आता मिशीन करत्याती...जशी पीठ दळणारी मिशीन घरात आली तशी कापडं धुणारी मिशीनबी घरात आलीया.शहरातनी मोठं मोठ्या लोकांच्याकडं कापडं धुणारी मिशीन सर्रास असतीया.इकडं कापडं घालायची... तिकडं वाळूनच कापडं बाहीर...सगळं कसं झट की पट.कुठं जायाचं न्हाई...कसला त्रास न्हाई..

माणसाकडं आता सगळं हाय पण एकंच न्हाय... येळ...आवं आता परटाच्या घरात जरी कापडं धुवायची मशीन आली तरी नवल वाटायला नगो."

....तात्यामा बोलत व्हता...बोलतच व्हता...भूतकाळातून आता त्यो वर्तमानात आला व्हता.


               - किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)

                ता - भुदरगड, जि-कोल्हापूर.                

                मोबा- ८८०६७३७५२८.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे.

 


'बहिरेवाडी गावच्या योगदानाचा, शहीद वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बलिदानाचा देशाला सार्थ अभिमान आहे'.

                                     भारतीय सीमेवर  पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खडे ठाकलेले वीर जवान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे वीर सुपुत्र ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना वीरमरण प्राप्त झाले.शेतकरी कुटुंबातला ऋषिकेश (जन्म ४ जून २०००) .वडील रामचंद्र जोंधळे आणि आई कविता रामचंद्र जोंधळे...बहीण कल्याणी असं हसतखेळत छोटसं सुखी कुटूंब.ऋषिकेशचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावच्या भैरवनाथ हायस्कूल शाळेत झालं.तर पुढील शिक्षण शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे झालं.उपजतच हुशार आणि विशेषतः अंगात खिळाडूवृत्ती. डॉजबॉल या खेळप्रकारात विशेष कौशल्य होते.अनेक क्रीडा स्पर्धेत त्याने आपली निपुनता दाखवून दिली, पदके पटकावली.तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.अंगी खिळाडूवृत्ती होती तसेच मनात एक जिद्द होती की,भारतीय सैन्यदलात भरती होऊन प्राणपणाने आपल्या देशाची सेवा करायची. वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय असल्याने हा व्यवसाय ऋषिकेशने सांभाळावा अशी वडिलांची अपेक्षा होती.त्यातच एकुलता एक मुलगा म्हटल्यावर कुठल्या बापाचा धीर होईल आपल्या लेकराने एवढी मोठी जोखीम पत्करावी म्हणून.पण देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या पोराला कोणी थांबवू शकलं नाही आणि अखेर २०१८ ला ऋषिकेश सैन्यात भरती झाला.

मराठा लाईफ बटालियन इन्फट्रीमधून देशसेवेच्या कार्यात रुजू झाला.उरातल एक दिव्या स्वप्न साकार झालं होतं.आईवडिलांनाही एकीकडे आनंद आणि अभिमान वाटत होता.या आनंदाप्रित्यर्थ जोंधळे परिराने आपल्या गावाला स्नेहभोजन घातले होते.सगळं कसं सुरळीत चालू होतं.

                                       कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे ऋषिकेश गावाकडेचं अडकून पडला होता. पण आपल्या कर्तव्याची जाणीव त्याला स्वस्त बसू देत नव्हती.आणि म्हणून मग जून महिन्यातच ऋषिकेश पुन्हां आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी नव्या जोमाने उभा ठाकला.पण आपल्या समोरचा शत्रू जो कधी सुधारत नाही आणि कधी सुधारणारही नाही..ज्याची खुल्या रणांगणात आमच्याशी बरोबरी करण्याची कधी हिंमतचं होत नाही.म्हणून वारंवार पाठीवर वार करणारा भ्याड शत्रू. ज्याला शत्रू म्हणवून घेण्याचीही लाज वाटते असा पाकिस्तान. या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरजवळील सीमेवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला पण आमच्या हिंमतबाज भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे ११ सैनिक अनेक चौक्या,बंकर उध्वस्त केले.आजवरचे सर्वात मोठे नुकसान केले.इकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना तिकडे आमचे हे वीर जवान शत्रूवर  गोळीबारांचा धुमधडाका करीत होते.प्राणाची बाजी लावून होळी खेळत होते.पण दुर्दैवाने आमचे चार सैनिक या चकमकीत शहीद झाले.महाराष्ट्रातील काटोलचे सुपुत्र नायक भूषण रमेश सतई व कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावचा आमचा थोर सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले.जिथे चकमक झाली तो  इलाका पहाडी व किर्रर्र  जंगलाचा होता.दोन अडीच तास चाललेल्या या चकमकीत शुक्रवारी दुपारी १:१५ दरम्यान ऋषिकेशला विरणमरण प्राप्त झाले.

                                                      दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच अवघा बहिरेवाडी गाव शोकसागरात बुडाला..दिवाळीचा एवढा भरला सण...पण गावात एकाही दारात पणत्यांची आरास सजली नाही..आकाशकंदील पेटला नाही की दारात रांगोळीचा सडा घातला गेला नाही.

'पणत्या मुक्या झाल्या

आकाशकंदील विझले

कशी करावी साजरी दिवाळी

आमच्यासाठी लेकरू प्राणाला मुकले.:

 आज तीन दिवस झाले बहिरेवाडी गाव आणि आख्खी पंचक्रोशी आपल्या या लाडक्या वीर सुपुत्राच्या पार्थिव देहाची शोकमग्न अवस्थेत डोळ्यांत प्राण आणून वाट पहात होता.आणि अखेर आज पहाटेला तिरंग्यात लपेटलेला पार्थिव देह फुलांच्या माळांनी सजलेल्या बंद पेटीतून आपल्या मायेच्या गोतावळ्यात दाखल झाला. देशापायी कामी आलेल्या आपल्या एकुलत्या एक लेकराचा पेटीबंद असलेला निपचित देह पाहून त्या आईवडीलांनी ,पाठच्या बहिणीने फोडलेला हंबरडा.जिवाच्या आकांताने केलेला आक्रोश..उपस्थितांचे मन पिळवटून टाकत होता.आपल्या लाडक्या वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी बहिरेवाडी गावी आज अवघा जनसागर लोटला होता.माणसांच्या दर्याला जणू भरतीच आली होती.जागोजागी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करणारे किती तरी मोठं मोठे होर्डिंग्ज दिसत होते.ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव देह असलेली पेटी ठेवलेली.फुलांच्या माळांनी सजली होती.. फुलांची आरास थाटली होती.ज्या गल्लीतून ज्या गावातून ऋषिकेश लहानपणापासून बागडला...दौडलेला होता..त्या वाटेवरून शहीद ऋषिकेशची अंतिम मिरवणूक काढण्यात येत होती.गल्लीतून लोक दाटीवाटीन डचमळत पार्थिवाचे दर्शन घेत पुढे सरकत होते.घरादारासमोर आयाबाया भरल्या डोळ्याने अखेरचे दर्शन घेत होत्या.इवलासा जीव सुद्धा ती अंत्ययात्रा पाहून हुंदके देत होता. तरुण वर्गाची उपस्थित लक्षणीय होती..आजूबाजूच्या पंचक्रोशीतून  तरुण वर्ग या अंत्ययात्रेत सामील झाला होता...अवघे वातावरण ऋषीमय झाले होते.

'अमर रहे अमर रहे ऋषिकेश जोंधळे अमर रहे.'

'जब तक सूरज चांद रहेगा ऋषिकेश तेरा नाम रहेगा.'

'भारत माता की जय'

अशा घोषणांनी अवघा परिसर निनादत होता.अवघे आबालवृद्ध आपल्या लाडक्या वीर जवानाला निरोप देण्यासाठी आले होते.एखादी माऊली कडेवर नकळतं लेकरू घेऊन या अंत्ययात्रेत सामील झाली होती.

                                  भैरवनाथ हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणात शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.अवघी अलोट गर्दी पटांगणात सामावली.जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवर आणि आजी माजी सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.ज्या पटांगणात  ऋषिकेश खेळला त्याच्यातला खेळाडू घडला.आपल्या दौडत्या पायाने जी माती चौखूर उधळली तिच्या उरावरचं ऋषिकेशच्या अंत्यसंस्कारासाठी चबुतरा बांधलेला होता.त्या चबुतऱ्यावर रचलेल्या सरणावर तो निपचित देह ठेवला.आणि मग ऋषिकेशचा परिवार अंतिम मुखदर्शन घेऊ लागला पोटच्या गोळ्याला डोळ्यांत मनात किती किती भरून घ्यावं...आता केवळ ते गोजिरवाण निपचित रुपडं मनात साठवून ठेवावं...आता माझा ऋषिकेश पुन्हां कधी डोळेभरून दिसायचा नाही.आता ही शेवटचीचं छबी हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी आयुष्याच्या हयातभर तिला रोज मनात आठवावी.आईबापानं लेकराकडं घेतलेली ती झेप..दुःखान घायाळ झालेली बहीण सर्वांचा आक्रोश. साऱ्यांच्या नेत्रकडा ओल्या करीत होती...अवघी माणसांची गर्दी सदगदीत होत होती.

                                            आज भाऊबीज आणि या शुभदिवशी असा दुर्दैवी क्षण एका बहिणीच्या वाट्याला यावा...सरणावरती निपचित पडलेल्या आपल्या भावाच्या पार्थिव देहाला अश्रूंचा अभिषेक घालून दुखऱ्या घायाळ अंतकरणाने बहिणीने हातात निरांजनेचं ताट घेऊन ओवाळणी करावी...

ओवाळणी म्हणून काय मागावं तिनं आपल्या लाडक्या भावाकडं..?.आजच्या भाऊबीजेला आपल्या जिवाभावाच्या लाडक्या दादुचा जीव कोणी परत आणून देईल का तिलाओवाळणी म्हणून..?.आजच्या दिवशीचा तो कठोर कटू प्रसंग म्हणजे बहीण भावाच्या ताटातूटीचा न बघवणारा सर्वात मोठा दुःखी प्रसंग...बघणारे डोळे पाणावून गेले.. अवघी हृदये दुखवेगाने डचमळून गेली.दाटलेल्या कित्येक हुडक्यांना कंठ फुटले...आपल्या लाडक्या दीदीचं लग्न ठरलं होतं.. साखरपुडा झाला होता..थाटामाटात लग्नं पार पडायचं होतं.घरादाराला खुप आनंद झाला होता. पण ऋषिकेशच्या अशा जाण्यानं साऱ्या आनंदावर विरजण पडलं...आता आपल्या लाडक्या दिदीच्या लग्नात भाऊ म्हणून कोण मिरवेल.. पुढं होऊन सगळं कोण लगबगीनं पार पाडेल...? माहेरपणाचा भरभक्कम आधार म्हणून तिनं कोणकडं बघावं..? मनात येणाऱ्या अशा विचारांनी मन तीळ तीळ तुटतं तिथं त्या बहिणीच्या मनाची अवस्था काय होत असेल.? 

                    पोलीस दल व भारतीय सैन्य दलातर्फे हवेत फैरी झाडून आपल्या देशवासियांच्या तर्फे अखेरची मानवंदना ऋषिकेशला देण्यात आली.


       आणि अखेर लालबुंद ज्वाळानी आमच्या लाडक्या जवानाला कवेत घेतले...गर्दीच्या डोळ्याला पान्हा फुटला..जे लेकरू जिच्या छायेत मायेत वाढलं जिच्या अंगणी खेळलं बागडलं शिकलं सवरलं.. आणि आज देशाच्या कामी आलं ती ऋषिकेशची शाळा मूकपणे आपल्या लेकराचा अंतिम दर्शन घेत ते अंत्यसंस्कार भरल्या अंतःकरणाने पाहत होती...तिचाही उर आज अभिमानाने भरून आलं असेल..पण मूकपणे ती ही आतल्या आत रडत होती..

                                कुठून येते एवढी जिगर.अवघ वीस वर्षांचं कोवळं वय..ज्या वयात जीवनाची मजा लुटायची..eat,drink and be happy 'ये दिल मांगे मोर खाओ पीओ मजा करो...' अशा दळभद्री जगण्याला ठोकर देऊन आपल्या देशासाठी अवघ जीवन वाहणारी अशी लेकरं जन्माला येणं..हे खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांचं आणि त्या देशाचं खुप मोठं भाग्य आहे...धन्य धन्य ते मातापिता असा जिगरबाज कर्तृत्ववान पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला...'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा'

बहिरेवाडी सारख्या मातीत जन्मलेला हा शूर वीर  सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करता करता धारातीर्थी पडला. भारतमातेला आपला रक्ताभिषेक करून आपल्या मातीची..गावची आईवडिलांची..देशाची आण बाण शान राखून जीव बहाल करून गेला...मरणार तर आपण सगळेच आहोत..पण डोक्याला कफन बांधून निधड्या छातीने देशासाठी लढणारे आणि लढता लढता असं मरण वाट्याला येणारे खरे भाग्यवान तेच असतात..आणि त्यांच्याच वाट्याला असा मरणाचा देखणा सोहळा लाभतो.ज्याला देशासाठी मरण आलं पण ते  कधीच मरत नसतात..ते तर त्या दिवसापासून अमर होतात.

                          मायबापा आपला लेक कुठंही गेला नाही तो आज अवघ्या देशवासियांच्या हृदयी विराजित झाला आहे...तो कळीकाळालाही पुरून उरणारा आहे..

सरणावरती जळती जरी आज आमुचे प्रेते

या राखेतून जन्म घेतील उद्याचे भावी  नेते 

आपल्या ऋषीकेशच्या पराक्रमाची  गाथा इथे प्रत्येक माणूस गाईल..त्याच्या विंरमरणाची.प्रेरणा घेऊन इथल्या प्रत्येक घरांत घरात असा ऋषिकेश जन्माला येईल जो देशसेवेच्या कार्याला वाहून घेईल..आणि कल्याणीदीदी तुझा भाऊ कुठेही गेला नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे..तू कधीही दादा म्हणून हाक मार...अवघा महाराष्ट्र भाऊ या नात्याने तुला प्रतिसाद देईल..भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.आमच्या शूर वीर ऋषिकेशचे बलिदान वाया जाणार नाही..सीमेवर असणारा माझा प्रत्येक सैनिक त्या कडेकपारीत ओघळलेल्या ऋषिकेशच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेईल...

सरफरोशी की तमन्ना 

अब हमारे दिल में है !

देखना है जोर कितना,

बाजु ए कातिल में है ?

                               या देशाच्या उभारणीत बहिरेवाडी गावाने खुप मोठे योगदान दिले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक सारखे  रत्न देशाला दिले..तसेच वीर जवान प्रवीण जानबा येलकर आणि आता शहीद ऋषिकेश जोंधळे यांसारखे वीर सुपुत्र या गावाने देशाला सुपूर्द केले. देशकार्यात बहिरेवाडी गावचे असलेलं हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही..बहिरेवाडी गावचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो.


शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण आदरांजली...

वीर जवान तुझे सलाम

जय हिंद जय भारत..


माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...