फॉलोअर

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

---------------------------------------------------------------------------

प्रति,

प्रिय सहृदयी वचक...

             महोदय, मी किरण चव्हाण. लेखक विनाअनुदानितची संघर्षगाथा. आपल्या शिक्षणक्षेत्रातील एक विदारक सत्य व विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित असलेले 'विनाअनुदानित' या विषयावरील महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे...मी स्वतः एक विनाअनुदानित शिक्षक असून चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारलेले आहे. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच की, मी स्वतः विनाअनुदानित शिक्षक असल्याने तो संघर्ष, वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे.आणि या वेदनेला समाजाच्या संवेदनांची जोड मिळावी. तसेच हा संघर्ष समाजातील सर्व घटकापर्यंत जावा अर्थात आपल्यासारख्या संवेदनशील माणसांच्यापर्यंत पोहोचून आपल्या सारख्या सहृदयींचे बळ मिळावे हा हेतू आहे. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही खूपच प्रेरणादायी बाब आहे. आपणांसही विनंती आहे की आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक आवर्जून घ्यावे..नक्कीचं आपला सकारात्मक प्रतिसाद असेलच....धन्यवाद...!

आपलाच नम्र,

किरण चव्हाण.





---------------------------------------------------------------------------




                               " किरण चव्हाण हा कोल्हापूरचा विनाअनुदानित शाळेवर काम करणारा एक प्रतिभावंत शिक्षक त्याने विनाअनुदानित शाळेचा प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी अतिशय गांभीर्याने एक पुस्तक लिहिले. त्यात मंत्री,आमदार,शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना विनाअनुदानीतशी संबंधित अनेकांच्या मुलाखती आहेत. प्रत्यक्ष ही कुटुंबे कशी जगतात त्याची दर्दभरी कहाणी पानापानावर आहे.त्यांची आकडेवारी आत्तापर्यंत झालेले संघर्ष असे अत्यंत बारीकसारीक तपशील या पुस्तकात असल्याने त्याला संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे. नुकतेच हे पुस्तक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्ध झाले या  पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, ती लिहिता येऊन या बांधवांशी यानिमित्ताने जोडता आले. या विनाअनुदानित शिक्षकांशी बोलताना खूप पोटात तूटते याचे कारण यांनी कोणताच संघर्ष करायचे बाकी ठेवले नाही  पण आपण त्यांच्यासाठी या प्रश्नावर संवेदना गमावलेल्या सरकार कडून काहीच मिळवून देऊ शकत नाही पण किमान हा प्रश्न समजावून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. किरण चव्हाण विनाअनुदानित शिक्षक असून स्वतःच्या खर्चाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विकत घेऊन आपण सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे. "


- हेरंब कुलकर्णी

       


 किरण चव्हाण यांचा मोबाईल नं / फोन पे/ गुगल पे - ८८०६७३७५२८.


---------------------------------------------------------------------------


विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.







महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विनाअनुदानितची संघर्ष गाथा पुस्तक सुपूर्द करून त्यांच्याशी चर्चा करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे सर






---------------------------------------------------------------------------



बाबा

"जगण्यातून जगण्याचा धडा शिकवणारा बाप नावाचा शिक्षक."

---------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मान्यवर.



ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे 



संत साहित्याचे गाढे अभ्यासक व नामवंत व्याख्याते इंद्रजीत देशमुख


ज्येष्ठ साहित्यिक लेखक दत्तात्रय पवार गुरुजी


ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर


ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे.





ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीकांत नाईक सर




ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे

                  ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे



ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य जी.पी.माळी



साहित्यिक व कवी गोविंद पाटील


ज्येष्ठ साहित्यिक व कवी राजन कोनवडेकर



लोकमत कोल्हापूर आवृत्ती संपादक वसंत भोसले



लेखक बी.एम.हिर्डेकर सर





प्रसिद्ध कवी व  साहित्यक मा.श्री.प्रविण दवणे सर




ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ



ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे


                 ग्रामीण लेखक व व्याख्याते संजय खोचारे



जंगल अभ्यासक व लेखक दत्ता मोरसे

लेखल अनिरुद्ध गुरव

युवा व्याख्याते व लेखक प्रा. युवराज पाटील

ग्रामीण लेखक संतोष पाटील

      
कथाकथनकार जयवंत आवटे कुंडल

---------------------------------------------------------------------------


         शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर

भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील




आंतरभारती संस्थेचे संस्थापक सचिव मा. अनंत आजगावकर




शिवराज संकुल गडहिंग्लज अध्यक्ष किसनराव कुराडे




कागल तालुका सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष व पत्रकार अतुल जोशी

---------------------------------------------------------------------------

                           राजकिय क्षेत्रातील मान्यवर


पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर.



                     खासदार श्री. बाळु भाऊ धानोरकर 
                    आमदार सौ. प्रतिभाताई बाळू धानोरकर


जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील



जि.प. जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य उमेश आपटे

---------------------------------------------------------------------------

                             शिक्षण क्षेत्रातील मान्यवर



  माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर (जि.प.कोल्हापूर )


             प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.आशा उबाळे           मॅडम (जि.प.कोल्हापूर )

          शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी.शिर्के सर


उपशिक्षणाधिकारी मा.डी.एस.पोवार (जि.प.कोल्हापूर )


माजी शिक्षण उपसंचालक अधिकारी संपत गायकवाड सर


विस्तार अधिकारी मा.विश्वास सुतार 

औरंगाबाद जिल्हा वेतन अधीक्षक मा.बाळासाहेब पवार


  मा.सुरेश संकपाळ सर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ कोल्हापूर

---------------------------------------------------------------------------

इतर क्षेत्रातील मान्यवर

वकील


वकिली क्षेत्रातील कायदेअभ्यासक व नामवंत वकील ऍड.प्रशांत भावके 

डॉक्टर

डॉ. संभाजी जगताप.

पत्रकार

श्री. शालबिद्रे अवघडी

---------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुस्तकाचा केलेला सन्मान





विनाअनुदानितची संघरगाथा पुस्तकाच्या निमित्ताने सत्कार कार्यक्रम.



---------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध साधना मासिकात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकावर आलेला लेख.





बातमी

Tv9 वर आलेली बातमी 











---------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोहोचलेली विनाअनुदानितची संघर्षगाथा




---------------------------------------------------------------------------

           विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचत प्रतिक्रिया

कृपया खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचा


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- उत्तम कांबळे.             


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.


दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे.

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.

गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

---------------------------------------------------------------------------

         फोनवरून आलेल्या संवादात्मक प्रतिक्रिया 

          कृपया खालील लिंक वर क्लिक करून ऐका

विनाअनुदानितची संघर्षगाथा अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल व विश्लेषणात्मक संवाद 



शासनाने केलेल्या अन्यायाचा हा दस्ताऐवज - लेखक दत्तात्रय पवार (गुरुजी) 

ज्वलंत प्रश्नाला वाचनीय बनवणं सोपं नाही - प्रसिद्ध कथाकथानकार जयवंत आवटे (कुंडल) 

https://youtu.be/8S-a_d1amPE 


प्रश्न समाजासमोर जाणं गरजेचं होतं|धडपडणं म्हणजेचं आयुष्य - ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख.

https://youtu.be/OfgBeFFCMyE

---------------------------------------------------------------------------


      


                                   लेखक मनोगत


          विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८



विनाअनुदानितची संघर्षगाथा : पुस्तक मूल्य २५०/- 

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.




सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे पुस्तक - दिवाकर दुर्गे




गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

   

                                  मी श्री .दिवाकर दुर्गे,गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम,नक्षलग्रस्त , आदिवासीबहुल ,विकासापासून ,आधुनिक झगमगाटापासून कोसोदूर अशा भागात सहायक शिक्षक म्हणून मागील 17 वर्षापासून सेवा देत आहे .

मी मागील काही दिवसापासून कायम विनाअनुदानित , विनाअनुदानित ,अंशत : अनुदानित अशा शाळांमधील शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. विशेषकरून गडचिरोली  जिल्हयातील विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या . कारण  हा माझ्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. मी अशा पुस्तकाच्या शोधातच होतो .व योगयोगाने यू -ट्यूबवर मा. किरण चव्हाण सर यांच्या ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री महोदय वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्याचा व्हिडीओ बघितला व लगेच श्री.किरण चव्हाण सरांशी संपर्क साधून पुस्तकाची मागणी केली .

मी ज्या शाळेत काम करतो त्या लोकमान्य टिळक विद्यालय ,गणपूर  रै. तालुका –चामोरशी ,जिल्हा- गडचिरोली येथील शिक्षकांनी राम वनवासाप्रमाणे 14 वर्ष विनाअनुदानित सेवा केलेली आहे. त्यामुळे  विनाअनूदानितांचा संघर्ष अगदी जवळून पाहीला आहे. मा.किरण चव्हाण सर यांचे पुस्तक हातात पडताच तेच चित्र पुनः जीवंत झाल्यासारखं वाटलं , जुने दिवस आठवले  व सहजच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या .वाटत होतं  हे भोग आपल्याच नशिबी का आले आहेत, पण जस–जस एक एक पान वाचत गेलो, तस –तस यांच्यापुढे आपला संघर्ष काहीच नाही अस वाटलं .पण समाधान होत आपणही या संघर्षाचे भागीदार आहोत. 

खरोखरच चव्हाण सरांनी जी मांडणी ,क्रमबधता ,भाषाशैली , सहजता यांचा सुरेख संगम साधून विनाअनुदानितांचा संघर्ष म्हणजे   ‘ व्यक्ति जिवंत पेटत आहे ,स्वतःच्या सरणावर स्वतःची चिता जळत आहे.' असच चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होतं .वेदना विरहित समाज सुद्धा किती निष्ठुर पद्धतीने चेस्टा करतो, तसेच काही समाजहितेशी सुद्धा अगदी संकटात कशी मदत करतात, हे वाचताना मन हेलावून जात होत . 

संघर्षाच एक- एक पान वाचताना ते कित्येकदा परत परत वाचावसं वाटत होत . हा संघर्ष प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध , निष्ठुर प्रशासनाविरुद्ध ,अमानवतेविरुद्ध पुकारलेल बंड आहे, याची जागोजागी प्रचिती येत होती . जगाच्या इतिहासात 20-20 वर्ष सेवा देणे, काम करणे पण त्या मो बदल्यात काहीही न मिळता उलट आपलं सर्वस्व गमावून बसने जसे -आई,वडील,भाऊ ,बहीण,मुलगा ,मुलगी आणि स्वत : सुद्धा !  चव्हाण सरांनी जी संघर्षगाथा पुस्तक रूपाने सांगितलेली आहे ,मला वाटत हा  दुर्मिळातील दुर्मिळ संघर्ष आहे . परंतु या संघर्षाला पुस्तक रूपाने वाचकांसमोर आणून शासन, प्रशासन, व्यवस्था यांना नकीच विचार करायला भाग पाडणारी ताकद यामध्ये आहे , असे मला वाटते,देशाचे भविष्य घडविण्याऱ्या शिल्पकारांवर आलेली ही वेळ देश हितासाठी  चिंतनाचा विषय आहे. तसेच स्वत:  शिक्षकांसाठी सुद्धा चिंतनाचा विषय आहे.

“गुलामाला गुलामीची जाणीव करूण द्या ,म्हणजे तो बंड करूण उठेल ” हे  बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्रिवार सत्य आहेत. मा. चव्हाण सरांनी या संघर्षगाथेतून शिक्षकांना गुलामीची जाणीव करून दिलेली आहे. वेळ आहे ती पेटून उठण्याची ,व्यवस्था परिवर्तनाची,समतेची, न्याय हकांची , पूर्ण स्वातंत्र्याची ,बंधुतेची !

मा. चव्हाण सर .यापुढे ही आपल्या लेखणीची धार अशीच चमकत राहावी यासाठी खूप- खूप शुभेच्छा !!!

पुढील वाटचालीसाठी मंगल कामना ...........!!!





                                                                  




                               वाचक -

               श्री. दिवाकर ऋषि दुर्गे,सहा.शिक्षक 

मोबा -97635 82234                                                        लोकमान्य टिळक विद्यालय , गणपूर रै . ता- चामोरशी,जि –गडचिरोली - 442707

------------------------------------------------ 

विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


शनिवार, २९ जानेवारी, २०२२

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.


 'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक.


                      आदरणीय किरण चव्हाण सरांचे  विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचले आणि ...        

                       एखाद्या बसस्थानकावरती प्रवासी गावाला जाण्यासाठी सुरुवातीला बसची वाट एकटक नजरेने पहात उभी असतात. इतक्यात काही क्षणात बस फलाटवरती येऊन थांबते. बसच्या दरवाज्याजवळ गर्दी करून प्रवासी आत जाण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना आतही जातात काही बसतात,काही उभे राहतात. बस एकदम प्रवाशांनी भरते आणि सर्व प्रवाशांच्या तोंडून एकच वाक्य निघत असते.'ड्रायव्हरसाहेब' अर्थात या बसचा चालक कधी येऊन बस सुरु करतो आणि बस कधी एकदा मार्गस्थ होते.थोडक्यात बसचा चालक सुव्यवस्थित असेल त्याचसोबत सर्व काही सुरळीत आणि योग्य प्रमाणात असेल तर तो निश्चितच बस मार्गस्थ करतो. प्रवाशांना योग्य त्या ठिकाणी पोहोवतो आणि मोकळीक घेतो. आमच्या शिक्षण क्षेत्रांमध्येसुद्धा असेच आहे. विविध शाळांमध्ये अनेक विद्यार्थी उद्याच्या आकांक्षावरती चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. पण चालकाची भूमिका निभावणाऱ्या या शिक्षकांची व्यथा मात्र वेगळीच आहे.

                    आज अनेक ठिकाणी अनेक प्रश्नासाठी आंदोलने होतात, मोर्चे निघतात परंतु या सर्व गोष्टींचे रूपांतर आश्वासनांच्यामध्ये होते. परिणामी निष्कर्ष थोड्या अवधीनंतर निघतात. आज 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक केवळ पुस्तक नसून संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा संग्रहित करून संघर्षाच्या लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न हा आहे. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण काहींची उभी हयात या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तयार करण्यात गेली तो शिक्षक आजही पोटभर जेवू शकत नाही, तो उपाशी आहे हे पाहिल्यानंतर कळते.

                         विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचन,लेखन,श्रवण,भाषण कौशल्य या चौफेर कौशल्यांचा विकास झाला की सर्वांगीण विकास झाला असे संबोधले जाते. पण याच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या या विनाअनुदानित शिक्षकांचा मात्र केव्हा विकास होणार..?  हा प्रश्न निरुत्तरितचं आहे. आज अनेक डीएड, बीएड धारक उराशी अनेक स्वप्नं बाळगून ऐन तारुण्यात या पदव्या घेतात. आज ना उद्या आपल्याला नवी आशा दिसेल, आणि आपण उभारी घेऊ या समजुती पोटी कार्याला सुरुवात करतात. परंतु आजतागायत निराशा शिवाय काहीचं मिळालं नाही.

                      हे पुस्तक वाचताना बरेच प्रसंग वेदनामय आहेत हे जाणवून येते.शाळा सुटल्यानंतर इतरत्र अन्य कामे करणारे प्रसंग जर वाचले तर निश्चितच डोळ्यात पाणी येते. आणि यावरून निश्चितच सुदृढ पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षकांची काय व्यथा म्हणायची. फक्त एक आशा..? 'हेही दिवस जातील' या उक्तीवर भरवसा ठेवून हे सर्व शिक्षक कार्यरत आहेत. 

               पुस्तकरूपाने ज्या करुणामय वेदना एकत्रित करून लढा देण्याचा आपला जो मानस आहे, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण अनेक ठिकाणी विनाअनुदानितांची आंदोलने होतात, मोर्चे निघतात,निवेदने देतात परंतु हे संग्रहित वेदनामय दुःखच आपल्याला अनुदान मिळण्यासाठी एक मोठे भांडवल ठरणार आहे.त्याचसोबत भविष्यात अनुदान मिळाल्यानंतर ते कसे मिळाले  सांगण्यासाठी हे कृतियुक्त पुस्तकाची आपल्याकडून निर्मिती झालेली आहे. त्याबद्दल सर्व विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रशासकीय कर्मचारी यांचे वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो. कारण बऱ्याच गोष्टी माणूस बोलून जातो व समोरच्या ऐकणाऱ्या माणसांच्या सर्वच काही लक्षात राहते असे नाही, कारण विस्मरण हे निश्चितच असते. परंतु एखाद्याची व्यथा सांगण्यासाठी,त्यांच्या भावना इतरत्र पोहोचवण्यासाठी आपण पुस्तक रुपाने  लेखनाची गाथा तयार करून जे सहअध्यायी यांचे प्रसंग मांडलेला आहात यावरून निश्चित या संघर्षातूनच अनुदान मिळण्यासाठी फारसा कालावधी लागणार नाही याची खात्री वाटते. कारण यामध्ये प्रसंग काय..? हे फक्त तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,काही राज्याबाहेरील सुद्धा प्रसंग आहेत. त्यामुळे आदर्शवत विचार घेऊन या विनाअनुदानित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे झालेला आहे. 

                       या पुस्तकातील अनेक लोकांनी सांगितलेले अनुभव, आई-वडिलांच्या आशा-अपेक्षा या सर्व गोष्टींचा विचार, ओवाळणीसाठी बहिणीकडे जाणारा भाऊ या सर्व कौटुंबिक नात्यांचा विचार केला तर इतर लोक कोठे आहेत आपण कोठे आहोत. वर्षानुवर्षे कार्यरत राहणाऱ्या लोकांना धडे पुढे जाता येत नाही आणि धड मागेही जाता येत नाही. दुसरा मार्गही निवडता येत नाही अशी सारी अवस्था आहे. शेवटी काय करावे..? हा प्रश्न निरुत्तरचं आहे पण सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे...'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' म्हणजे आज जरी आपली वाईट परिस्थिती असली तरी भविष्यात असे असणार नाही काव्यपंक्तीचा असा अर्थ आपल्या जगण्यात उतरेल हा आशावाद निर्माण करणारे हे पुस्तक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याचा सूर्य आपल्यासाठीचं उगवेल ही खात्री बाळगूया. या लेखक किरण चव्हाण यांच्या या पुस्तकाच्यारूपाने निश्चितच वेळ बदलेल,नवीन आशा निर्माण होईल व चांगले दिवस येतील हा आशावाद मनाशी बाळगून सर्वजण कार्यरत राहूया. लवकरच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार होते आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आज अनेक सुधारित तंत्रज्ञानामध्ये वाचन संस्कृती जोपासून ही संघर्षगाथा पुन्हा दुसऱ्या आवृत्तीसाठी छपाई करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाचकांचे, सर्वांचे मनस्वी आभार मानून मी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो.

धन्यवाद...!


अध्यापक - श्री राजेंद्र पुंडलिक बामणे.मु.पो.अकोळ. ता.निपाणी. जि.बेळगांव. पिन कोड - ५९१२११ मोबा -०९७४१९४९५९२



विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.



बुधवार, २६ जानेवारी, २०२२

दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे | विनाअनुदानितची संघर्षगाथा- वाचक प्रतिक्रिया.

 



'दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल.'

                               लेखक मा.श्री किरण चव्हाण सर लिखीत  'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे पुस्तक वाचले आणि शासकीय धोरणांचे,निष्काळजीपणाचे काळेकुट्ट आभाळ भेदणारी दुःखाची किंकाळी कानात शिरून मेंदूला,हृदयाला छेद देवून गेली.इतकी विदारकता या पुस्तकाच्या पानापानांवर अश्रू गाळतांना दिसली. पुस्तकाचे प्रत्येक पान फडफडून आपल्या न्याय हक्कासाठी आक्रोश करत होते. आत्म्याच्या तळातून आलेला हा आक्रोश संबधित प्रशासकिय व्यवस्थेच्या काळजात कधीच शिरणार नाही, कारण विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या बाबतीत ही व्यवस्था नेहमीच सावत्र आईची भूमिका बजावत आलेली आहे.,तिला पान्हा फुटावा ही अपेक्षा तरी कशी बाळगावी...? एक वाक्य वाचनात आलं होत ," आपण अशा देशात राहतो जिथे दारूची दुकाने सरकारमान्य आहेत आणि शाळा विनाअनुदानित..." हे वाक्य शंभर टक्के खरं आहे...आपल्याला पुन्हा एकदा चिंतन करावे लागेल की देशाला, राष्ट्राला खरी गरज कशाची आहे. व्यसनाधीन तरूणाईची की उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढीची. याचे उत्तर जर 'उच्चशिक्षित संस्कारक्षम पिढी ' असे असेल तर आपल्याला ती पिढी घडवणारा ' शिक्षक ' नावाचा घटक उपवाशी ठेवून चालणार नाही. आणि हे जेव्हा माय बाप सरकारच्या लक्षात येईल ( ? )तो सुदिन म्हणावा लागेल...!

            पुस्तक वाचतांना असे जाणवले की, गेली वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विनाअनुदानितच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले,लोटांगणं घातली पण सारे अयशस्वी झाले. याचे कारण माझे शिक्षक बांधव कुठे कमी पडले असे नाही तर, सत्तेवर असलेल्या कुठल्याच सरकारने आश्वासनापलिकडे त्यांच्या पदरी कांहीच टाकले नाही. फक्त आणि फक्त वेळकाढूपणा केल्याने ते यशस्वी होवू शकले नाहीत इतकचं...!

            'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' हा मुलमंत्र विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. संविधानाच्या माध्यमातून समता व बंधूता प्रस्थापित करून या महामानवाने लोकशाहीचं, लोकहिताचं, सर्वधर्म समभावाचं गणराज्य आपल्या हाती सुपूर्त केलं... शिक्षक बांधव शिकले, संघटीत झाले, टोकाचा संघर्षही केला. सत्याग्रहाने, संविधानिक मार्गाने आपल्या हक्कासाठी पदरही पसरला.,पण निर्ढावलेल्या सत्येपुढे सारे व्यर्थ गेले...बाबासाहेब, खरंच आज तुम्ही देहाने आमच्यात नाही हे बरेच झाले, असता तर इथली प्रशासकिय अवस्था पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावले असते..!

            या पुस्तकाचे लेखक किरण चव्हाण सर हे स्वतः गेल्या अनेक वर्षापासून एक विनाअनुदानित शिक्षक आहेत.त्यांनी गेली सहा वर्ष विनाअनुदानितच्या प्रश्नावर दिवस रात्र चिंतन मनन केले.अनेक समदुःखी शिक्षक बांधवांशी सखोल चर्चा केली. प्रत्येकाचीच आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती फारच वेदनादायक आणि विदारक होती.किरण चव्हाण सरांसारखा हळवा तितकाच संवेदनशील माणूस अंतर्बाह्य हेलावून व्याकुळ झाला. त्यांना पक्कं ठाऊक होतं, गेंड्डयाची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला संविधानिक पण वेगळ्या मार्गाने जागं केलं पाहीजे., कारण आतापर्यंत व्यवस्थेशी लढण्याची सर्व हत्यारे वापरून झाली होती.आता वेळ आली होती लेखणीची ताकद दाखविण्याची...

           दोन -तीन वर्षाच्या आर्थिक भुर्दंडासह अथक कष्टानंतर दुःखाची किंकाळी 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तक रूपाने बाहेर पडली. चव्हाण सरांनी या पुस्तकात शिक्षण मंत्र्यांपासून ते शिक्षण क्षेत्राशी निघडीत अशा सर्व घटकांची मते मांडली आहेत.विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या,भगिनींच्या वेदना प्रत्येक पानावर अश्रू गाळतांना दिसतात...या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर सविस्तर लिहायचं झाल्यास दुसरं एक पुस्तक तयार होईल. इतकी मुद्देसुद मांडणी,क्रमबधता, सनावळ्या, ओघवती भाषाशैली, सहजता आणि मुख्य म्हणजे विचार करण्यास परावृत्त करणारे ज्वलंत प्रश्न घेवून हे पुस्तक व्यवस्थेविरूध्द बंड करून न्याय हक्कासाठी लढण्यास सज्ज झाले आहे...

            माझे जिवलग मित्रबंधू मा.किरण चव्हाण सर माझ्यापेक्षा वयाने लहान व ज्ञानाने, प्रतिभेने मोठे. असं असूनही पुस्तक बांधणीवेळी ते माझ्याशी वेळोवेळी चर्चा करायचे. आपल्यासारख्याच समदुःखी शिक्षक बांधवांच्या, भगिनींच्या व्यथा, पगाराविना होणारी फरफट, उध्वस्त झालेले संसार, नैराश्यग्रस्त बांधवांनी केलेल्या आत्महत्या,त्यांच्यासह कुटुंबातील आजारपणांना तोंड देणे... अशा एक ना अनेक हृदय हेलावून टाकणाऱ्या विदारक घटना ते माझ्याशी मोठा भाऊ समजून सांगायचे. हक्काने आपले मन मोकळे करायचे...याच कालावधीत नोकरीत अस्थिर  असलेल्या मुलग्याचं दुःख काळजात साठवून  किरण सरांचे वडील देवाघरी निघून गेले. काय वेदना झाल्या असतील त्यांच्या आत्म्याला याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्या एकूलत्या मुलाला मोलमजुरी करून उच्चशिक्षित केलं, त्याला शिक्षक झालेलं स्वप्न पाहीलं, कष्टाचे चिज होवून आपला मुलगा आपले पांग फेडील, नशिबातील अठराविश्व दारिद्रयाच्या दलदलीतून बाहेर काढून म्हातारपणी सुखाचे चार दिवस दाखवील अशी अशा बाळगणं एक वडील म्हणून चुक होतं का..?

           जन्मदाता दारिद्रयातच देवाघरी गेला. ही खंत किरण सरांना काळजात सुईसारखी बोचू लागली. कांही कालावधीसाठी मुळातून खचूनही गेले, निराशेच्या गर्तेत बुडाले आणि स्वतःच सावरलेही, कारण आपल्या दुःखापेक्षाही इतर शिक्षक बांधवांची दुःखं मोठी आहेत याची त्यांना पुरेपुर जाणीव  होती. या प्रगल्भ जाणिवेतूनच स्क्रिन फुटक्या जुन्या मोबाईलमध्ये 'विनाअनुधानितची संघर्षगाथा ' या नावाची चळवळ जन्म घेत होती....

            मित्रहो, ही चळवळ किरण चव्हाण  या नावाच्या एका व्यक्तीची नसुन ती संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित बंधू-भगिनींची आहे...तिला अधिक व्यापक करणं ही आपली जबाबदारी आहे... किरण सरांनी दिशा दिली आहेच,आता एकीचे बळही दिसू द्या,कारण विनाअनुदानित शिक्षक वगळून जगाच्या पाठीवर असं कोणतही क्षेत्र नाही जिथं प्रामाणिकपणे काम केल्यास मोबदला मिळत नाही...

          'विनाअनुदानितची संघर्षगाथा ' हे केवळ पुस्तक नसून विनाअनुदानितची गेल्या वीस वर्षापासूनची भळभळती जखम आहे... शासनानं केलेल्या पापाचा हिशोब आहे...वाचकांनी हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून किरण चव्हाण सरांनी उभ्या केलेल्या चळवळीला अधिक बळ देवून व्यापक स्वरूप द्यावं.आशा करतो शासन दरबारी या पुस्तकाचा गांभिर्याने विचार होवून उपाशी शिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या हक्काची भाकरी मिळेल...

धन्यवाद !


                - नंदू साळोखे

९५४५६९१५४१


ग्रामीण लेखक नंदू साळोखे

                         माझे गुरुबंधू आणि लेखक आदरणीय नंदू साळोखे .अकाली आलेल्या अपंगत्वामुळे गेली २४ वर्षे अंथरूणाला खिळून आहेत. शारीरिक वेदना असतानाही त्या सहन करत पुस्तक वाचून विनाअनुदानितच्या वेदनेवर आपल्या लेखणीतून फुंकर घालून मला व समस्त विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनींना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. त्यांनी पुस्तकावर दिलेल्या अनमोल अशा प्रतिक्रियेबद्दल मी हृदयपूर्वक त्यांचा आभारी आहे.


.


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


 खालील लिंकवर क्लिक करून लेखक नंदू साळोखे यांच्याविषयी अधिक माहिती वाचा.


मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

पुस्तक परिचय - आठवणीतली माणसं.


'आठवणीतली माणसं' ही समृद्ध माणसांच्या आठवणींची शिदोरी.'

                          आदरणीय गुरुवर्य प्रा.श्रीकांत नाईक सरांचे आठवणीतील माणसं हे पुस्तक वाचताना दाटीवाटीनं भरलेली साठवणीतल्या माणसांच्या आठवणी वाचून मनात अनेक भावनांची दाटीवाटी झाली. मनात काठोकाठ भरून पावलेल्या माणसांचा सारीपाट कागदावर मांडल्याशिवाय राहवेनाचं..! सरांच्या आयुष्यात अवतरलेला माणूस पानांवर उतरवताना तो प्रत्येक माणूस भावनांच्या ओलाव्यातील मायेचं प्रतीकचं जणू असं वाचताना वाटत होतं. स्वतःभोवतीच्या वलयातील आईवडील,गुरू,विद्यार्थी, सखा-सोबती,सहकारी अशा आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेकविध माणसांनी समृद्ध झालेला हा गोतावळा. गोतावळ्यातील  प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आणि जगण्याचा मागोवा आदरणीय नाईक सरांनी घेतलेला आहे.प्रत्येक माणूस आदर्श जीवन जगण्याचे एक उदाहरण आहे..नाईक सरांच्या बालपणीचा तो जुना काळ,ती मायेची माणसं. एकत्र कुटुंबातील प्रेम, सहवास आणि संस्कारयुक्त झालेली जडणघडण आणि या जडणघडणीत नात्याच्या प्रत्येक माणसांचं असणारं योगदान यावरून सरांच्या आजच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती येते तेंव्हा त्यामागे त्यांच्यावर बालपणापासून रुजलेल्या संस्कारांची ओळख वाचनातून होते. 

                    आईवरील प्रकरण वाचताना तर मनात अनेक भावनातरंग उठतात. मन मायेच्या ओलाव्यानं दाटून येतं. सुखावून जातं. एकत्र कुटुंबातील आईला कसं सगळ्या लेकरांना मायेनं वाढवावं ,जपावं  लागतं.घरातील सर्व माणसांचं जेऊन झाल्यानंतर आईला जेवायला १२ वाजायचे. या उदाहरणावरून एकत्र कुटुंबातील स्त्रीला संसाराच्या रहाट गाडग्यात झोकून द्यावं लागतं. हे यातून कळून येतं.

                         जवळपास ३२ माणसांचा लेखाजोगा  पुस्तकातून मांडला आहे.शाळेतील शिपाई कर्मचारी पासून संस्थापक,शिक्षक,विद्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील माणसांचा पसारा मांडताना सरांच्या आयुष्यात जी कोणी माणसं आली त्यांचे स्थान किती खोलवर रुजले आहे याची प्रचिती प्रत्त्येक पानांपानांवर येते.प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा लाभलेला सहवास ,सहकार्य प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा या सर्वांगाने आपलं जगणं समृद्ध करत असते. जीवनातल्या वाटेवरती सहप्रवासी असणारी ती व्यक्ती जगण्याची प्रेरणा बनून जाते. आपल्या आठवणीतील माणसं ही अशीच काहीशी आहेत.आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांच्याच जगण्याची प्रेरणा झालेल्या आहेत. पुस्तकात प्रत्येक व्यक्तीचे फक्त वर्णनात्मक लेखन नसून त्या व्यक्तीबद्दल अपार भावनात्मक,आत्मीयतापूर्वक लिहिलेले हे चांगुलपणाच्या गुणांचा समुच्चय असणारे आणि प्रत्येक आठवणींना भावनेची किनार असणारे हे भावनाप्रधान पुस्तक आहे.

                      प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दडलेलं असतं. ते अव्यक्त स्वरूपातील दिव्यत्व ,भव्यत्व आणि कर्तृत्व  शब्दरूपाने सरांनी सुबकपणे व्यक्त केलेलं आहे. लेखणीच्या माध्यमातून त्यांचे विविधांगी पैलू वाचकांच्या समोर आणलेलं आहे. पुस्तकात शिक्षण,समाजकार्याला वाहून घेतलेल्या अनेक माणसांचा धांडोळा घेतलेला आहे. आपले जीवननच आपल्या कार्याला समर्पित केलेली ही माणसं त्याग, समर्पण,आचार-विचार आणि संवेदनशीलता यांचा मोठा संदेश देऊन जातात. आदरणीय अनंत आजगावकर सरांच्या सारखी ऋषितुल्य माणसांचे कार्यकर्तृत्व समाजाप्रती असणारी तळमळ धडपड आणि आपल्या साधेपणातून ही माणसं किती मोठं कार्य करत राहिली. शाळा स्थापन करून परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे, घडवण्याचे, अनेक नवीन संसार उभा करण्याचे काम अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या हातून झालेले आहे. खरं तर त्यांचे शिष्य असलेल्या नाईक सरांनी अगदी सुक्ष्म प्रसंगातून त्यांच्याविषयी लिहून त्यांचा मोठेपणा ठळक केला आहे. 

                        नाईक सरांच्या मनात खोलवर रुजलेली आठवणीतील एकेक माणसं वाचताना ती माणसं कधी आपलीशी होऊन जातात कळत नाही.इतकी सहज ,सुलभ, सोपी भाषाशैली,भावनांचा ओलावा,सूक्ष्म प्रसंगवर्णन यावरून सरांच्या अफाट स्मरणशक्तीची आणि संवेदनशिलतेची जाणीव पानांपानांवर होते.मायेच्या, जिव्हाळ्याच्या नात्यांनी जोडलेलं,अतूट भावबंधनांनी सजलेलं धजलेलं समृद्ध आणि संपन्न माणसांचं गणगोत मांडणारं हे पुस्तक म्हणजे सरांच्या मनातील व्यक्त झालेलं व्यापक कुटूंबचं आहे. या पुस्तकातील एकेक माणूस म्हणजे जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा जिताजागता धडा आहे हे निश्चित. कारण माणसं कशी जगली, कशी जगतात त्यांचे आचार ,विचार कार्य,कर्तृत्व यांचा मेळ त्यांच्या जगण्यासोबत घालून दिला आहे. त्यावरून आपणही कसे जगावे ? हे शिकवणारे माणसांचे धडे असणारे हे पुस्तक आहे.आपण पुस्तक वाचतो पण माणसं वाचणं कशाला  म्हणतात ते हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं. आदरणीय नाईक सरांनी नुकतेच  अमृतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत तरीदेखील आज त्यांच्या या वयातील व्यक्तिनिरीक्षण,उत्साह,ऊर्जा आणि लिखाणामागची तळमळ अफाट आहे. 'आठवणीतील माणसं' हे पुस्तक म्हणजे पुरून उरणारी उरून पुरणारी समृद्ध माणसांच्या आठवणींची शिदोरी आहे...गुरुवर्य श्रीकांत नाईक सरांना निरोगी समृद्ध संपन्न दीर्घायुष्य लाभावे यां मनोकामनेसह पुस्तकाच्या पुढील वाटचालीस हृदयपूर्वक शुभेच्छा देतो...!

- किरण सुभाष चव्हाण.(पांगिरे)

मोबा - ८८०६७३७५२८



आठवणीतील माणसं पुस्तकाचे लेखक : प्रा.श्रीकांत नाईक सर.








.

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...