फॉलोअर

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..? - किरण चव्हाण.

 

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..?

                               कुणी घर देता का रे घर ? भिंती वाचून, छपरा वाचून माणसांच्या मायेपासून ,देवाच्या दयेपासून वंचित आहे.कुणी घर देता का रे घर..?  महाराष्ट्रातल्या आमदारांची आज अशी अवस्था झाली आहे का..? आमदार इतके बेघर झालेत का.? म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत मोफत घरं बांधून देण्याची घोषणा करावी लागते. आता आमदार सुद्धा बेघरांच्या यादीत आले म्हणायचे ? मग दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाना व बेघरांना मोफत घर हवे असेल तर त्यात आणखीन एक अट घालावी लागेल की आपण आमदार असायला हवे. म्हणजे हा विरोधाभासचं काही कळत नाही की आपला महाराष्ट्र इतका दयनीय झाला आहे की इतका समृद्ध,संपन्नशाली झाला आहे.की जो लोकप्रतिनिधीनाचं आता मोफत घरे बांधून देऊ शकतो.

                                 किती संतापजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. ज्या लोकांना आपण विकासाच्या मुद्यावर आपण  निवडून देतो ते लोक आपल्याच विकासाला प्राधान्य देत आहेत.तळे राखील तो पाणी चाखील याचा प्रत्यय जनतेला दाखवून देत आहेत.निवडणूकीच्या अगोदर स्वतःला सेवक म्हणवून घेणारे निवडून आल्यानंतर मात्र मालक कसे होतात याचे हे उदाहरण आहे. ज्या आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा करण्यात आली त्यांची सद्यस्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया.सध्याच्या विधानसभेत २८८ पैकी २६४ आमदार (९३ टक्के) कोट्यधीश असून, गेल्या विधानसभेत २५३ आमदारांची (८८ टक्के) संपत्ती कोटींच्या घरात होती. विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांपैकी भाजपचे ९५ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ९३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८९ टक्के आणि काँग्रेसच्या तब्बल ९६ टक्के आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत. २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांच्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आमदारांच्या संपत्तीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, यंदाच्या विधानसभेत तब्बल १८० आमदारांची संपत्ती ५ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असून, ६५ आमदारांची संपत्ती २ कोटी ते ५ कोटी रुपये, ३४ आमदारांची संपत्ती ५० लाख ते २ कोटी रुपये आहे. पक्षनिहाय विश्लेषणानुसार, भाजपच्या १०५ आमदारांपैकी १०० आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ५५ पैकी ५१, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४७ आणि काँग्रेसच्या ४४ पैकी ४२ आमदारांकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. (संदर्भ दै महाराष्ट्र टाईम्स २७ ऑक्टोबर २०१९)

                                   एका महिन्याला आमदारांच्या पेन्शनवर सरकारला सहा कोटी रुपये खर्च करावे लागतात. सरकार आमदारांचे एवढे लाड का पूरवतेय कळत नाही.म्हणजे समाजाच्या विकासामध्ये त्यांचेच योगदान मोठे आहे का..? पाच वर्षांसाठी एकदा आमदार झालं की मग आयुष्यभर पेन्शन सुरू..दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ नंतर जुनी पेन्शन बंदचा निर्णय घेतला जातो.म्हणजे एकाबाजूला ३०-३५ वर्षें नोकरी करणाऱ्याची पेन्शन बंद आणि पाच वर्षे आमदार झालं की आयुष्यभराच्या पेन्शनची तरतूद करून ठेवली जाते.बरं आमदारांच्या पगार वाढीची विधयके चर्चेविना मंजूर होतात..आणि दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी असेल,एस.टी.कर्मचाऱ्याचे पगार, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान,बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावरची लढाई लढावी लागते.या लोकांना मात्र यांना न्याय देता येत नाही.

                                अगोदरचं आमदारांचे पगार व पेन्शन या मुद्द्यांवर जनतेत तीव्र नाराजी आहे.आणि आता कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना  घर बांधून देण्याची केलेली ही घोषणा..दिल्लीचे मुख्यमंत्री सभागृहात जनतेच्या प्रश्नांना हात घालतात. सामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न आरोग्य, शिक्षण,वीज या प्रश्नांवर बोलतात.आणि आमचे मुख्यमंत्री सभागृहात आमदारांना स्वतःचे घर बांधून देण्याची घोषणा करून सर्वपक्षीय आमदारांना खूश करण्याच्या नादात एकप्रकारे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. म्हणजे किती हा विरोधाभास. तुम्हांला तीन वरून चार,चार वरून पाच कोटी आमदार निधी वाढवता येतो, त्यांना वाहन घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देता येते, आमदारांच्या पी.ए चा पगार वाढवायला पैसे आहेत आणि एका बाजूला राज्यात शिक्षण घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. तरुणांना रोजगार नाही बेरोजगारांची संख्या वाढतेचं आहे.सुशिक्षित तरुणांच्या पिढ्यान पिढ्याची बरबादी होत आहे.शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव नाही तो गळफास घेऊन मरतोय,एस. टी. कर्मचारी संपावर जातोय,आत्महत्या करतोय,..विनाअनुदानित शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून विनापगार काम करतोय,उपाशी पोटी टाचा घासतोय त्याला अनुदान देत नाहीत,सरकारी कर्मचाऱ्यांची पेंशन बंद केली जातेय, गरीब निराधार लोकांना पेंशन वाढ करण्यासाठी या लोकांच्याकडे पैसे नाहीत...

                                 मंध्यतरी तरी अजबच निर्णय घेतला गेला बेघर लोकांना घर मंजूर करायचे असेल तर अशी अट घातली गेली की त्यांच्या घरामध्ये टी.व्ही,फ्रीज,गाडी या गोष्टी नसाव्यात.म्हणजे घर हवे असेल तर तुम्हीं आणखीन किती गरिब आहात सिद्ध करावे लागेल.पण कालच्या निर्णयानुसार त्यामध्ये ही पण अट लागू करावी लागेल की,आपल्याला सरकारकडून घर हवे असल्यास आपल्याला महाराष्ट्रातला आमदार व्हावे लागेल. हे आमदार सुद्धा न बोलून शहाणे आहेत.यांना कुठं बोलायचं आणि कुठं नाही हे चांगलं कळतं. एकमेकांचे घोटाळे,वाभाडे काढणारे,आक्रमक होणारे मात्र अशा निर्णयाच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत.विरोधी पक्षपण शांत. 'तेरी बी चूप मेरी बी चूप' असा एकही आमदार नाही..?(दुर्मिळ अपवाद वगळता) की,ज्यावेळी आमदारांच्या पगारात घसघशीत पगारवाढ केली जातेय..पेंशन वाढ केली जातेय त्यावेळी याचा विरोध करण्यासाठी हे आमदार पुढे येत नाहीत. आताच्या देखील निर्णयावर पुढे येऊन बोलण्याची धमक कोणताही आमदार दाखवणार नाही. माझ्या राज्यातली जनता अजूनही बेघर आहे,फुटपाथवर दिवस काढतेय त्यांना घर नाही. पहिल्यांदा त्यांना घर द्या आम्हांला नको.असं यांना का म्हणता येत नाही.

                         माझ्या देशातल्या गरीब जनतेला पुरेसे अंगभर वस्त्र नाही मिळत म्हणून महात्मा गांधीजी स्वतः खादी वापरत पुरेसे वस्त्र घालत नसत. देशाला नाही अवघ्या जगाला संवेदनशीलतेचा आदर्श देणाऱ्या या महामानवापासून आपल्या राज्यकर्त्यांनी काय आदर्श घेतला.? आपल्या राज्यात जनता बेघर असताना आपल्या घरांची सोय करणं हा  आदर्श आपण निर्माण करताय का.? दिवंगत आमदार श्री.गणपतराव देशमुख सारखे जनतेची खरी नस ओळखणारे आमदार होऊन गेले अशा आमदारांचा आदर्श आताचे आमदार का घेत नसावेत.

                     जो उपाशी त्याला खायला भाकर नाही आणि तुपाशी आहे,ज्याचं पोट भटलरलेलं त्याला मात्र पंचपक्वांनाचं ताट वाढून ठेवलं जातेय.रोजगार,विकास, शिक्षण,आरोग्य अशा मुद्यावर यांना निवडून द्यायचं आणि यांनी मात्र आपली सोय लावून घ्यायची.मुख्यमंत्री म्हणतात आता लोकांचं झालं लोकप्रतिनिधीचं काय..? तर त्यांच्यासाठी मुंबईत कायमची घरं बांधून देणार आहोत.आणि या निर्णयांवर सभागृहात टाळ्या वाजवून स्वागत केलं जातं.कोणीच याला विरोध करीत नाही. का कारण सगळ्यांच हित त्यात आहे.मग विरोधकांचा विरोध जिंकण्यासाठी मुख्यमंत्री यांना अशी घोषणा करावी लागते का..? असा प्रश्न उपस्थित होतो.हे आमदार म्हणे लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडतात,कल्याणासाठी धडपडतात, रात्रंदिवस समाजाच्या विकासाठी झटतात.पूर्णवेळ समाजाच्या राबतात. हे काम ते करतात म्हणून त्यांना आमदार निधी,भत्ते ,सोयी सवलती पेन्शन एवढं सगळं दिलं जातं. मग हे कमी पडतंय का म्हणून त्यांच्यासाठी आता मोफत घरं बांधून देण्याचा निर्णय घेतला जातो. ग्रामीण भागातील किंवा बेघरांना घर बांधून देण्यासाठी जास्तीत जास्त दीड लाख अनुदान मिळते ते ही वेळेवर नाही आणि दिले तर हप्त्याने देतात.आणि या आमदारांना मात्र मुंबईसारख्खा ठिकाणी घरं बांधून द्यायची म्हणजे एका घराचा खर्च किती असणार याची कल्पनाचं केलेली बरी. या सगळ्याचा भार शेवटी कोणावर..? जनतेवरचं ना.म्हणजे एवढा उपद्व्याप करायला जनतेनं यांना आमदार होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं का..? उलट .तुम्हीं पैसे घेऊन काम करता त्यामुळे जनतेला तुम्हांला बोलण्याचा आणि  विचारण्याचा हक्क आहे.तुम्हीं जनतेला जबाबदार आहात. तुमच्याएवढेच किंबहुना तुमच्याहून जास्त सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमचे तरुण युवक,कार्यकर्ते सामाजिक संस्था देखील समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करीत आहेत.ते ही टक्केवारी न घेता. स्वार्थ न साधता.तुमच्यापेक्षा देखील सरस आणि निस्वार्थपणे काम करणारी तरुणांची फौज समाजामध्ये आहे.त्यांचीही क्षमता आहे आमदार होण्याची देताय संधी त्यांना आमदार होण्याची..? नकोय त्यांना एवढी पेन्शन नको आहेत अशी घरं. शेवटी काय चूक तुमची नाही चूक आमची आहे की,आम्ही तुम्हाला निवडून दिलं.

                  समाजातल्या विचारवंत,साहित्यिक,पत्रकार अशा जागरूक लोकांनी सरकारच्या अशा निर्णयांवर सडकून टीका केली पाहिजे.जनतेला जागृत केलं पाहिजे, तरुणांना हे समजून सांगितलं पाहिजे.की काहीतरी चुकीचं घडतंय. आणि या चुकीला जबाबदार कोण आहेत. आणि मग कुठून ही चूक दुरुस्त केली पाहिजे.याचा विचार झाला पाहिजे.जनतेनं ही ठरवलं पाहिजे. की आपण निवडून दिलेलं सरकार हे कोणत्या दिशेनं काम करीत आहे. कुणासाठी काम करीत आहे. त्यात त्यांचं स्वहित आहे की जनहित आहे.त्यामुळे आता तरी सावध होऊया आपल्या धडावर आपले डोके असायला हवे.कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा आपल्याला कळायला हवे की आता कोणाला निवडून द्यायचे..? आणि कोणाला घरी बसवायचे..? 

                            जनतेचा पैसा आहे,जनतेच्या कल्याणासाठी तो तुमच्या हाती सोपवला आहे. भूकलेल्याला भाकरी द्या,बेरोजगाराला रोजगार द्या,बेघरांना घर द्या अशा नीतीने काम करीत असाल तरचं तुम्हांला या पदावर राहण्याचा हक्क आहे.नाही तर कुंपणानं शेत खाल्ल तर विचारायचं कुणाला..? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण करून देऊ नका.. सभागृहात आमदारांना स्वतःची घरे बांधून देण्याची घोषणा करणाऱ्या आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा दिल्लीच्या सभागृहात वीज,शिक्षण आरोग्य अशा सामान्य जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्री मला जास्त जवळचे वाटतात. आणि जवळचे वाटतात याचं कारण त्यांनी जनतेची खरी नस ओळखली आहे. याचा अर्थ आम्हांला आप जवळचा वाटतो असा अर्थ घेऊ नका. पक्ष कोणता ही असो त्याला जनतेचा बाप होता आलं पाहिजे. 

                   जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आपण किती यशस्वी आहात याचे चिंतन करा.आणि मग आमदारांचे लाड किती पुरवायचे ते ठरवा.आमदारांना स्वतःची घरे बांधून देण्याचे निर्णय घेण्याअगोदर शंभर वेळा विचार करा. नाही तर या महाराष्ट्रातल्या असंख्य बेघरांचा आणि तुमच्या कामावर असमाधानी असलेल्या जनतेचा शाप तुमच्या घरांना लागल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जर जनहित बाजूला ठेऊन स्वहित साधायला गेलाच तर त्याच घरात कायम बसवण्याची ताकद जनतेत आहे हे लक्षात ठेवा.


- किरण सुभाष चव्हाण.

मोबा - ८८०६७३७५२८.

सोमवार, १४ मार्च, २०२२

पुस्तक वाचन - डॉ.सुनिलकुमार लवटे संपादित डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर.


डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे मनात विवेकशीलता निर्माण करणारे पुस्तक.

                                 एका बैठकीत वाचून होण्याएवढं हे पुस्तक आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे सरांनी संपादित केलेले डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे पुस्तक वाचलं.हे पुस्तक म्हणजे दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे अज्ञात मारेकऱ्यांकडून डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. त्यानंतर काहीच महिन्यात मासिक स्मृती जागर व्याखान उपक्रम राबविण्यात येऊ लागला, त्या उपक्रमातील पाच व्याख्यानांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे.यामध्ये सुरेश द्वादशीवार,डॉ.सुनीलकुमार लवटे,लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.सदानंद मोरे, संजय जोशी अशा डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचार कृतीशी व चळवळीशी प्रत्यक्ष जोडलेल्या व त्यांच्या सोबत कार्य केलेल्या महनीय व्यक्तींच्या विचारांचा सार आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो. डॉ.दाभोलकर यांच्या कार्याचे योगदान, वैचारिकता, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडताना दाभोलकर एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे.आणि त्यांच्या विचारांचा प्रवाह नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही सर्व मंडळी वैचारिक दूत म्हणून सामाजिक स्तरावर काम करीत आहेत हे प्रकर्षाने जाणवते.

                        डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्य त्या कार्यापुढील आव्हाने,आठवणीत राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व, साहित्य प्रातांत ही आपल्या कार्याने लिलया यश संपादन करतात. सुरेश भट,कुसुमाग्रज अशा दिग्गज कवींच्या कविता मुखोद्गत असणारे दाभोलकर म्हणजे संघटन,चळवळीत सक्रिय राहून देखील साहित्याचे ज्ञान व भान जपणारे चोखंदळ रसिक व संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते हे कळते, साधना मासिकाच्या उतरत्या काळात त्यांनी संपादकाची भूमिका घेतली त्यावेळी अखेरचा मारलेला खिळा अशी त्यांच्यावर टीका होऊ लागली पण त्यांनी खऱ्या अर्थाने साधना मासिकाला उर्जितावस्था प्राप्त करून प्रचंड खपाचे एकमेव मासिक अशी ओळख निर्माण करून दिली. कोणत्याही क्षेत्रात आपल्या चिकाटी सचोटीच्या बळावर आपण कशी उंची गाठू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

                       देशातील मार्क्सवादी, गांधीवादी,हिंदुत्ववादी,आंबेडकरवादी अशा विचारधारेचे मतप्रवाह आहेत.काळाच्या प्रवाहात ते कसे प्रभावीपणे प्रवाहित होतायत.याची सखोल चिकित्सा याठिकाणी वाचायला मिळते.धर्म,धर्माचा इतिहास याचा लेखाजोखा मांडताना युरोपियन,सिंगापूर इथली संस्कृती आणि आपल्या देशातील संस्कृती यांतील कालपरत्वे झालेले बदल,परदेशात श्रद्धेची स्थान असणारी चर्च आता सांस्कृतिक केंद्रे बनत आहेत आणि हा बदल आजपासून ३० वर्षामागे सुरू झाला. आणि आपल्याकडे आजही  समाजपरिवर्तनांची केंद्र असलेल्या शाळा वाढण्याऐवजी अलीकडील काळात वाढलेली देवळांची संख्या हा आपल्या चिंतनाचा विषय का होऊ शकत नाही हा प्रश्न वाचताना उपस्थित होतो.

                       मानवी जीवनातील श्रद्धा,अंधश्रद्धा ,प्रथा, परंपरा याला छेद देऊन विवेकवादी जीवनाचा,विज्ञानाचा स्वीकार करून सत्याच्या कसोटीवर जीवनमूल्यांचा स्वीकार करणे,समाजविघातक अंधश्रद्धा टाळून त्यांचे निर्मूलन करून विवेकशील, वैचारिक आणि विज्ञाननिष्ठ समाजरचना तयार झाली पाहिजे त्यासाठी समाजाला जागरूक करून येणाऱ्या नव्या पिढीच्या मनात नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकशील वैचारिकतेच्या जाणीवा व नेणिवा रुजविण्याचे कार्य आता त्यांच्या मागे राहिलेल्या जुन्या जाणत्या सुजाण विचारशील माणसांच्या हाती आहे. आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकातील महनीय व्यक्तींनी मांडलेले विचार  डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी आत्मीयतेने विचारांचा जागर मांडत आहेत.

                       एकंदरीतच डॉ.नरेंद्र दाभोलकर आठव आणि जागर हे पुस्तक वाचताना जगण्याची मूल्ये काय असावीत,ध्येय काय असावं, तत्व काय असावीत या अनुषंगाने विचार करायला भाग पाडतं. आणि सुप्त अवस्थेतील विवेकशीलता मनात निर्माण करतं.

                                                                     - किरण चव्हाण.                                                    ८८०६७३७५२८.

बुधवार, २ मार्च, २०२२

'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.

 


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.' - ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे.

                  

                                       किरण चव्हाण लिखित विनाअनुदानितची संघर्षगाथा हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विनाअनुदानित हा विषय ग्रंथरूपाने समोर आला आहे प्रथम मला हे आवडलं. पण आता त्याच्यापुढे अजून कशाप्रकारे या प्रश्नाकडे पाहता येईल याचादेखील विचार करायला पाहिजे. कारण आता हा न संपणारा प्रश्न तयार झाला आहे. खूप लोक या प्रश्नाशी जोडले गेलेले आहेत.मग याच्यापुढे काय करायचं ? नवीन आर्थिक व्यवस्था, नवीन खाजगीकरण आणि त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त समाज जोडला गेलेला आहे.आणखीन दहा वर्षाने सगळा समाजच जोडला जाईल.खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये असे लोक दिसतील.कॉन्ट्रॅक्ट, प्रायव्हेट, नॉनग्रँट हे आता परवलीचे शब्द होणार आहेत. म्हणून याचा मूलभूत विचार करण्याची वेळ आलेली आहे.काय झाल्यानंतर हे दूर होणार आहे,कोणी काय करायला पाहिजे,कोणता नवा विचार मांडायला पाहिजे.अशाप्रकारे या अंगाने आता जावे लागणार आहे. 

                             मी पहिलं पुस्तक लिहिलं. 'जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न', दूसरं लिहिलं सामाजिक न्यायावर 'जागतिकी झोत'. हा सगळा  नवीन ट्रेंड आलेला तो मी कव्हर करत होतो. मग 'श्रमिकांचे जग काल,आज आणि उद्या' याच्यावरही चारशे पानांचं पुस्तक आहे.जो राबणारा वर्ग आहे संघटीत,असंघटीत,सरकारी, बिनसरकारी,अनुदानित, विनाअनुदानित, शेतकरी, मजूर,स्त्रिया हा जो सगळा श्रम करणारा वर्ग आहे, यांचं पुढे काय होणार आहे याच्यावर पुस्तक लिहिलं आहे. जागतिकीकरणात संस्कृतीचं काय होणार आहे ? धर्माचं काय होणार आहे ? आणि जागतिकीकरणाने कोणती आव्हाने आपल्यासमोर उभी केलेली आहेत.या विषयावर अशी ही पुस्तकं लिहिलेली आहेत.माझी अशी इच्छा होती की, याला बळी पडलेले लोक तरी ते वाचतील,समजून घेतील, विचार करतील.पण आपल्याकडे एकूणच वाचन कमी झालंय. त्यामुळे न वाचता, न विचार करता लोक काही करायला जातात आणि त्याला यश येत नाही.हे का तयार होतं ? कारण शिक्षणक्षेत्रातल्या विनाअनुदानित संस्था या व्यवस्थेमधला एक खूप छोटा भाग आहेत. आता जगामध्ये तुरुंगाचं खाजगीकरण होतंय, रस्त्याचं ,शिक्षणाचं,आरोग्याचं, जहाजांचं,रेल्वेचं होतय असं कोणतं अंग राहिलंय.की जिथं विनाअनुदानित धोरण आलं नाही.मग त्या व्यवस्थेत आपण कुठे आहोत..? आपलं काय होणार आहे ? आपण आपल्या सर्वांचे यातून कोणते मार्ग काढायला पाहिजेत ? म्हणजे रोज उठून कुणाला तरी शिव्या देऊन हा प्रश्न सुटणार आहेत का ? तर या नव्या व्यवस्थेने जगण्याची लढाई सर्वांच्यावर लादलेली आहे. आणि ही नवीन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे.  विनाअनुदानितकडे आपण गेलो की नाही नोकरीला.. मग का गेलो आपण ? तर नोकरी नव्हती, जगण्याचे साधन नव्हते,एवढं शिकून घरी बसून काय करायचं ?  पुढे काय तरी होईल.. अशा सगळ्या गोष्टीतून आपण ती व्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि आपण ती स्वीकारली म्हणूनच ती व्यवस्था तयार झाली.विनाअनुदानितकडे नोकरीला लोक येणार आहेत, विद्यार्थी तिथे येणार आहेत याची खात्री जेंव्हा व्यवस्थेला झाली. तेंव्हाच विनाअनुदानित हा प्रकार चालू झाला..गिऱ्हाईक असल्याशिवाय कोणतंही उत्पादन बाजारात येत नाही.आगोदर गिऱ्हाईकाचा अभ्यास करतात मग उत्पादन काढतात.

                                        अनेक आंदोलनांची तुमच्यासमोर उदाहरण आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले. शेतकरी एक वर्षे आंदोलनाला बसतात.गिरणी कामगारांचा संप अडीच वर्षे चालला. आदिवासी लोक नाशिकवरून मुंबईला पाचशे किलोमीटरचा प्रवास करून चालत गेले,टाचा फुटल्या. ते सगळे कॅमेरासमोर आले.आणि मग खाडकन सरकार जागं झालं. आणि मग सरकारनेही ठरवलं की वनजमिनीचे पट्टे यांच्या नावावर करावेत. अशी लढाई आपल्या हातून होणार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे.  

                      विनाअनुदानितवरचा स्टाफ,क्लेरिकल स्टाफ,विद्यार्थी यांनी  एक दिवस जरी ठरवलं की आम्हीं एक महिना संपावर जाणार आहोत. पण आमचं असं का होत नाही.आमच्या शिक्षकांच्याबरोबर विद्यार्थी का नाही उभा रहात.आमच्या गुरुजींना पगार नसेल तर तिथे आम्हीं येणार नाही. असं विद्यार्थ्यांनी एक आठ दिवस बंड केलं तर..? माझ्या काळामध्ये साधारण १९८० च्या अगोदर. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं  एक दृढ नातं होतं. मला आठवतं कोल्हापूरच्या गोखले कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप.हा देशातला सगळ्यात लांब काळ चाललेला म्हणजे दीड वर्षे चाललेला संप होता.शिक्षकांना पगारच नव्हता  मग त्यांनी ठरवलं की,आपण संपावर जाऊ. संपावर गेले शिक्षक.मग आमची विद्यार्थ्यांची जबाबदारी काय..? या संपाला समाजातून पाठिंबा कसा मिळवायचा ? ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी बिंदू चौकात येऊन एक दिवस उपोषण करायचं. प्राध्यापकांच्या संपाला पाठिंबा असा बोर्ड लावायचा. मग आम्हीं कुणा कुणाचा पाठिंबा मिळवला.? कॉ.गोविंद पानसरे यांना भेटून रिक्षावाल्यांचा पाठिंबा मिळवला. रिक्षावाल्यांनी एक दिवस उपोषण केलं. स्टॅन्ड समोरच्या हातगाडीवाल्यांचा मिळवला त्यांनी एक दिवस उपोषण केले.या सर्वांनी उपोषणाला यायचं आणि संपाला आपल्याकडे जे काय असेल ते आर्थिक मदत करायची. कारण हे प्राध्यापक जगणार कसे ? जर शंभर रुपये जमले तर यांनी दहा-दहा रुपये वाटून घ्यायचे आणि चूल पेटवायची.बँक कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळवला त्यानंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळवला , स्त्रियांचा मिळवला. विद्यार्थी तर आम्ही संपातच होतो आणि शेवटचा पाठिंबा मिळवला तो आम्ही डोंबारवाड्यातल्या वेश्यांचा. त्यांनी शंभर दीडशे रुपये संपाला मदत म्हणून जमवून दिले. शेतकरी आले आमची पोरं आहे तिकडे आहेत म्हणून. कलेक्टर कचेरीतल्या लोकांनी येऊन पाठिंबा दिला. आणि मग शिक्षण खात्यावर असा एक दबाव आला की, त्यांनी गोखले कॉलेजचं ते मंडळ बरखास्त केलं आणि तिथे नवा प्रशासक नेमला आणि मग त्या प्रशासकांनी त्यांचे पगार सुरू करून दिले. 

                             आपल्याकडे लढायला कोणी नाही.आपण सुटे सुटे लढायला लागलो आहोत. १९७५ पर्यंत प्राध्यापकांची एकच स्वतंत्र संघटना असायची. ती कम्युनिस्ट पक्षाशी ,काँगेसशी जोडलेली असायची.असंच प्राथमिक शिक्षकांचं होतं. सरकारला जेंव्हा कळालं यांची एकजूट खूप आहे.हे कधी पण सरकारवर दबाव आणून आपल्याला पाहिजे ते मागण्या मान्य करून घेतात. मग हे मिटवायचं असेल तर काय करायला पाहिजे तर यांच्या संघटना वाढल्या पाहिजेत. मग संघटना वाढवायच्या असतील तर कायद्यात बदल केला पाहिजे.पूर्वी एका क्षेत्रात एकच संघटना होती त्यानंतर कायद्यात बदल केला अनेक संघटनांना मान्यता दिली. परिणाम काय झाला..? तर राज्य पातळीवर ज्या संघटना तयार झाल्या. त्यात प्रदेश,जात,धर्म ,आपला वीरपुरुष, आपली डिग्री अशा जवळपास चाळीस संघटना आहेत.शेवटी संघटनामध्ये आपण विभागलो गेलोच ना. आपल्या एकीमध्ये फूट पडली.मग आपण प्रयत्न करतच नाही ना एकीसाठी. या क्षणाला सगळ्यांचे प्रश्न समान आहेत,सगळ्यांची दुःख समान असतील, सगळ्यांच रक्त लाल असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला..?  

                             आता काय करतात ही लोकं की, प्रत्येकजण आपापल्या दुःखाचं वर्णन करायला लागला आहे. कोण पोवाडा लिहितो, कोण कविता लिहितो, कोण पुस्तक लिहितो.हे सगळं आवश्यकचं आहे वर्णन करणं .कारण तुम्ही कोण आहात हे कळतं. पण याच्या पुढे मुद्दा काय तयार होतो केवळ वर्णन करून जगातला कोणताही प्रश्न सुटत नाही.  मी असा आहे,मला आज पगार नाही,उद्या पण मिळणार नाही,कर्ज झालं,पत्नी सोडून गेली,पोरं सोडून गेली हे वर्णन आहे.पण हे करण्याबरोबरच मार्क्स काय म्हणतो, तर हे जग वर्तन करून बदलतं, वर्णन करून बदलत नाही.वर्णन करून ते कळतं.पण  बदलायचं असेल तर वर्तन करावं लागतं.त्यामुळे आपल्याला आता वर्तन करायला हवे.

                           शिक्षकाकडे सगळ्यात मोठी ताकद असते ते म्हणजे त्याचं चारित्र्य. चारित्र्यवान शिक्षकाला समाज आदर देत असतो, त्यालाचं समाज घाबरत असतो.तुमची लढाई तुमच्या चारित्र्यावर असते. मग प्रश्न असा आहे की, हे चारित्र्य शिक्षकांनी का गमावलं ?  त्यांनी स्वतःहून गमावलं का..? की तशी परिस्थिती निर्माण झाली. की कुणी तयार केली.याचं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेलं आहे. की पहिल्यांदा शिक्षक हा मिशनरी होता.नंतर त्याचा कामगार झाला. शिक्षक मिशनरी असताना शिकवण्यासाठीच फक्त त्याचा जन्म झाला होता.तो २४ तास शिकवायचा,स्वतःला घडवायचा. त्याच्या काही मागण्या नव्हत्या.त्याची मागणी काय..? तर पोटापाण्याला मिळालं.कुटूंब चालेल एवढं मिळालं की तो खुश व्हायचा.त्याला गांव धान्य द्यायचं, मंदिरात जागा द्यायची, त्याला गावंच घर द्यायचं.जिथे नोकरी असेल तर तिथेच तो शिक्षक रहायचा.पण नंतरच्या काळात शिक्षकाला कामगार कायदा लागू झाला. आता सगळ्या शिक्षकांना कामगार कायदा लागू आहे. त्यामुळे व्यवस्थेमध्ये शिक्षक हा असा एक घटक होता ज्याचा कामगार झाला. म्हणून त्याचे कामगारासारखे प्रश्न आहेत. मग ते सोडवायचे कुणी..? 

                                      तर असं कुणी तरी लिहिलं पाहिजे. कुणी आत्मचरित्र लिहितं, कुणी अनुभव लिहितं की,शिक्षक मजूर झाले,शिक्षक वेटर झाले, शिक्षक भिक मागायला लागले ही जी दृश्य तयार झाली आहेत त्याच्यात आपण नुसते रंग भरतोय.त्याची फोटोग्राफी करतोय . शहाणा माणूस काय करेल? हे दृश्य कसे आहे ते सांगणार नाही तर हे दृश्य का तयार झालं ते सांगेल.विनाअनुदानितची माणसं जन्माला घालणाऱ्या गर्भाशयात सुधारणा केली पाहिजे की, जन्माला आलेल्या माणसांच्यात केली पाहिजे. तेंव्हा आपण शांतपणे याचा विचार केला पाहिजे. याचं मुळ शोधणं गरजेचं आहे. फांद्यांचं, फुलांचं वर्णन करून आता उपयोग नाही तर ज्या मुळापासून हे तयार होतं त्या मुळांचा अभ्यास केला पाहिजे.


                                                                     -  उत्तम कांबळे.

 ◾ऐकू शकता ;

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल संवाद

https://youtu.be/Y9x6guTdN1o


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.






विनाअनुदानितची संघर्षगाथा 

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार)




देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार) 

                                     आपल्या कामाची पावती एका पुस्तकाच्या पानावर जेव्हा छापून येते त्यापेक्षा अजून कुठला आनंद हवा.. तर असो मुद्दा हा आहे. लेखक किरण जी चव्हाण लिखित" विनाअनुदानितची संघर्षगाथा"  हे पुस्तक नुकतेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे हस्ते प्रकाशित झाले. जे देशाचे भावी आधारस्तंभ घडवितात अशा शिक्षकांची विनाअनुदानितचे लेबल चिकटवून होत असलेली दैना या पुस्तक रुपाने जगासमोर आली. कारण असेच एक विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील सर यांचा जीवनपट लेखक किरणजींनी आपल्या संघर्ष गाथेत सविस्तर मांडलाही आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या त्यांची एक विद्यार्थिनी म्हणून पैशा अभावी त्यांच्या मरण यातना मी "ह्याची देही ह्याची डोळा" पाहिल्या आहेत ,अनुभवल्या आहेत.माझ्या जीवाची घालमेल तर तेव्हा झाली जेव्हा विनाअनुदानितच्या नावाखाली दहा वर्ष विनावेतन सेवा देऊन केवळ पैशा अभावी किडनी प्रत्यारोपण होत नसल्याने त्यांच्या पत्नी आपल्या बिनपगारी शिक्षक पतीला व सात वर्षाचा मुलगा पारस  आपल्या बापाला क्षणाक्षणाला मरतांना बघत होते. मी मात्र अवाक झाले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार वारंवार येत होता की,आपल्या गुरूला वाचवण्यासाठी आपण काही करू शकतो का ? माझे मन मला स्वस्थ बसू देत नव्हते. कारण आव्हान खूप मोठे होते. एकीकडे  माझी केविलवाणी धडपड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी माझ्या महाविद्यालयातील माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना यासाठी तयार केले आणि दारोदारी, गल्लोगल्ली फिरून आम्ही एक-एक रुपयाची अक्षरशः भीक मागितली. महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात  देशाचे भावी आधारस्तंभ घडविणाऱ्या शिक्षकांना उपचाराअभावी मरणाची वेळ येते आणि त्याला वाचविण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना हातात झोळी घेऊन अक्षरशः दारोदारी भिक्षा मागावी लागते यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते.

                                 विनाअनुदानितच्या नावाखाली शासनाने या शिक्षकांना वर्षानुवर्ष वेठबिगारी सारखे राबवून घेतले.त्यांना व त्यांच्या परिवाराला हाल-अपेष्टा व मरण यातना सह वार्‍यावर सोडले आहे . लेखक किरण जींनी समाजासमोर या पुस्तक रुपाने एक धगधगतं दाहक वास्तव समाजासमोर मांडले आहे. त्यातून विनाअनुदानितच्या नावाखाली वर्षानुवर्ष विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य  करत आपल्या परिवारासह खितपत पडलेल्या शिक्षकाची खरी बाजू दाखवली आहे. या आभासी दुनियेत याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. मी आभारी आहे, कारण आपल्या कामाची पावती जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या पानावर  छापून येते. आमच्या सरांना वाचवण्यासाठी आम्ही जी धडपड केली त्याचे फलश्रुती म्हणून लेखक किरणजींनी माझा उल्लेख या संघर्षगाथेत केलेला आहे. तर असो, निदान आतातरी शासनाला जाग यावी यावी. किशोर पाटील सर यांची नियुक्ती त्यानंतर अॅप्रोवल या साऱ्या गोष्टी सुव्यवस्थित असून केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे फक्त वेतन निघत नाही.

                              त्यांनी या बाबतीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब  यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पण काही उपयोग आज पर्यंत झाला नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला नेहमी वाटे की, आपण शिक्षक व्हावं, परंतु मी स्वतः हा सारा थरार अनुभवला असल्यामुळे शिक्षक व्हावे हे डोक्यातून काढून टाकले आहे. आमचे शिक्षक किशोर पाटील सर यांची आज खूप मोठी दुर्दशा झाली आहे. महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आणि दुसरीकडे तेरा वर्षापासून विनावेतन अध्यापन. जे बोलायला आणि ऐकायलाही अवघड वाटते त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विनाअनुदानितच्या  नावाखाली राबणारे हे शिक्षक क्षणाक्षणाला घेत आहे.

                          शेवटी मला शासनाला हेच सांगावेसे वाटते की, अजूनही वेळ गेलेली नाही जर देश खऱ्या अर्थाने बळकट करायचा असेल तर शिक्षकांची व त्यांच्या परिवाराची अवहेलना थांबवा.मी या संघर्षगाथेचे निर्माते किरणजींना धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी शिक्षकांच्या या व्यथा, वेदनांना शब्दबद्ध करून शिक्षकी पेशातल्या हे दाहक वास्तव जगासमोर आणले.

        धन्यवाद…!


      कु. रुचिता चौधरी

    अमळनेर, जि. जळगांव.



           कु.रुचिता चौधरी ही प्राध्यापक किशोर पाटील अमळनेर येथील विनाअनुदानित शिक्षकाची विद्यार्थिनी असून किशोर पाटील यांच्या  दोन्हीं किडन्या ज्यावेळी निकामी झाल्या. त्यावेळी या विद्यार्थिनींने आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने समाजातून निधी गोळा करून आपल्या गुरूंच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभा केली. विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या वाटचालीमध्ये ही त्यांचे योगदान लाभले आहे) 


विनाअनुदानितची संघर्षगाथा

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.


गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक प्रवास

---------------------------------------------------------------------------

प्रति,

प्रिय सहृदयी वचक...

             महोदय, मी किरण चव्हाण. लेखक विनाअनुदानितची संघर्षगाथा. आपल्या शिक्षणक्षेत्रातील एक विदारक सत्य व विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित असलेले 'विनाअनुदानित' या विषयावरील महाराष्ट्रातील हे पहिलेच पुस्तक आहे...मी स्वतः एक विनाअनुदानित शिक्षक असून चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारलेले आहे. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच की, मी स्वतः विनाअनुदानित शिक्षक असल्याने तो संघर्ष, वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे.आणि या वेदनेला समाजाच्या संवेदनांची जोड मिळावी. तसेच हा संघर्ष समाजातील सर्व घटकापर्यंत जावा अर्थात आपल्यासारख्या संवेदनशील माणसांच्यापर्यंत पोहोचून आपल्या सारख्या सहृदयींचे बळ मिळावे हा हेतू आहे. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही खूपच प्रेरणादायी बाब आहे. आपणांसही विनंती आहे की आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक आवर्जून घ्यावे..नक्कीचं आपला सकारात्मक प्रतिसाद असेलच....धन्यवाद...!

आपलाच नम्र,

किरण चव्हाण.





---------------------------------------------------------------------------




                               " किरण चव्हाण हा कोल्हापूरचा विनाअनुदानित शाळेवर काम करणारा एक प्रतिभावंत शिक्षक त्याने विनाअनुदानित शाळेचा प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी अतिशय गांभीर्याने एक पुस्तक लिहिले. त्यात मंत्री,आमदार,शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना विनाअनुदानीतशी संबंधित अनेकांच्या मुलाखती आहेत. प्रत्यक्ष ही कुटुंबे कशी जगतात त्याची दर्दभरी कहाणी पानापानावर आहे.त्यांची आकडेवारी आत्तापर्यंत झालेले संघर्ष असे अत्यंत बारीकसारीक तपशील या पुस्तकात असल्याने त्याला संदर्भ मूल्य प्राप्त झाले आहे. नुकतेच हे पुस्तक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रसिद्ध झाले या  पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, ती लिहिता येऊन या बांधवांशी यानिमित्ताने जोडता आले. या विनाअनुदानित शिक्षकांशी बोलताना खूप पोटात तूटते याचे कारण यांनी कोणताच संघर्ष करायचे बाकी ठेवले नाही  पण आपण त्यांच्यासाठी या प्रश्नावर संवेदना गमावलेल्या सरकार कडून काहीच मिळवून देऊ शकत नाही पण किमान हा प्रश्न समजावून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. किरण चव्हाण विनाअनुदानित शिक्षक असून स्वतःच्या खर्चाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विकत घेऊन आपण सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे. "


- हेरंब कुलकर्णी

       


 किरण चव्हाण यांचा मोबाईल नं / फोन पे/ गुगल पे - ८८०६७३७५२८.


---------------------------------------------------------------------------


विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.







महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विनाअनुदानितची संघर्ष गाथा पुस्तक सुपूर्द करून त्यांच्याशी चर्चा करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे सर






---------------------------------------------------------------------------



बाबा

"जगण्यातून जगण्याचा धडा शिकवणारा बाप नावाचा शिक्षक."

---------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रातील साहित्यिक मान्यवर.



ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे 



संत साहित्याचे गाढे अभ्यासक व नामवंत व्याख्याते इंद्रजीत देशमुख


ज्येष्ठ साहित्यिक लेखक दत्तात्रय पवार गुरुजी


ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर


ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे.





ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीकांत नाईक सर




ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे

                  ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे



ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य जी.पी.माळी



साहित्यिक व कवी गोविंद पाटील


ज्येष्ठ साहित्यिक व कवी राजन कोनवडेकर



लोकमत कोल्हापूर आवृत्ती संपादक वसंत भोसले



लेखक बी.एम.हिर्डेकर सर





प्रसिद्ध कवी व  साहित्यक मा.श्री.प्रविण दवणे सर




ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ



ज्येष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे


                 ग्रामीण लेखक व व्याख्याते संजय खोचारे



जंगल अभ्यासक व लेखक दत्ता मोरसे

लेखल अनिरुद्ध गुरव

युवा व्याख्याते व लेखक प्रा. युवराज पाटील

ग्रामीण लेखक संतोष पाटील

      
कथाकथनकार जयवंत आवटे कुंडल

---------------------------------------------------------------------------


         शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर

भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील




आंतरभारती संस्थेचे संस्थापक सचिव मा. अनंत आजगावकर




शिवराज संकुल गडहिंग्लज अध्यक्ष किसनराव कुराडे




कागल तालुका सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था अध्यक्ष व पत्रकार अतुल जोशी

---------------------------------------------------------------------------

                           राजकिय क्षेत्रातील मान्यवर


पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर.



                     खासदार श्री. बाळु भाऊ धानोरकर 
                    आमदार सौ. प्रतिभाताई बाळू धानोरकर


जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील



जि.प. जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य उमेश आपटे

---------------------------------------------------------------------------

                             शिक्षण क्षेत्रातील मान्यवर



  माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर (जि.प.कोल्हापूर )


             प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.आशा उबाळे           मॅडम (जि.प.कोल्हापूर )

          शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी.शिर्के सर


उपशिक्षणाधिकारी मा.डी.एस.पोवार (जि.प.कोल्हापूर )


माजी शिक्षण उपसंचालक अधिकारी संपत गायकवाड सर


विस्तार अधिकारी मा.विश्वास सुतार 

औरंगाबाद जिल्हा वेतन अधीक्षक मा.बाळासाहेब पवार


  मा.सुरेश संकपाळ सर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ कोल्हापूर

---------------------------------------------------------------------------

इतर क्षेत्रातील मान्यवर

वकील


वकिली क्षेत्रातील कायदेअभ्यासक व नामवंत वकील ऍड.प्रशांत भावके 

डॉक्टर

डॉ. संभाजी जगताप.

पत्रकार

श्री. शालबिद्रे अवघडी

---------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुस्तकाचा केलेला सन्मान





विनाअनुदानितची संघरगाथा पुस्तकाच्या निमित्ताने सत्कार कार्यक्रम.



---------------------------------------------------------------------------

प्रसिद्ध साधना मासिकात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकावर आलेला लेख.





बातमी

Tv9 वर आलेली बातमी 











---------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पोहोचलेली विनाअनुदानितची संघर्षगाथा




---------------------------------------------------------------------------

           विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तक वाचत प्रतिक्रिया

कृपया खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचा


'वर्णन करून प्रश्न बदलणार नाही वर्तन करायला हवं.'- उत्तम कांबळे.             


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.


दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल : नंदू साळोखे.

'हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही.' असा आशावाद निर्माण करणारे पुस्तक. - राजेंद्र बामणे.

गुलामाला गुलामीची जाणीव  करून देणारे पुस्तक  - दिवाकर दुर्गे 

---------------------------------------------------------------------------

         फोनवरून आलेल्या संवादात्मक प्रतिक्रिया 

          कृपया खालील लिंक वर क्लिक करून ऐका

विनाअनुदानितची संघर्षगाथा अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्याशी साधलेला सखोल व विश्लेषणात्मक संवाद 



शासनाने केलेल्या अन्यायाचा हा दस्ताऐवज - लेखक दत्तात्रय पवार (गुरुजी) 

ज्वलंत प्रश्नाला वाचनीय बनवणं सोपं नाही - प्रसिद्ध कथाकथानकार जयवंत आवटे (कुंडल) 

https://youtu.be/8S-a_d1amPE 


प्रश्न समाजासमोर जाणं गरजेचं होतं|धडपडणं म्हणजेचं आयुष्य - ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख.

https://youtu.be/OfgBeFFCMyE

---------------------------------------------------------------------------


      


                                   लेखक मनोगत


          विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८



विनाअनुदानितची संघर्षगाथा : पुस्तक मूल्य २५०/- 

पुस्तकासाठी संपर्क :

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.




माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...