फॉलोअर

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

नदीवरचा देव - किरण चव्हाण.



 नदीवरचा देव

                                    एखाद्या बाईला कुठला त्रास आसला,लागीर लागलंय,अंगात येतंय असं काही झालं की तिला देवरश्याकडं नेलं जायचं. देवरशी मग त्या बाईला समोर बसवून सगळी चौकशी करायचा, काही प्रश्न विचारायचा. आणि मग अंगात काहीतरी संचारल्यासारखं सांगायचा, "हिच्या म्हायाराकडंनं त्रास हाय बघा.नदीवरचं दाखवतंय.यंदाला नव्या पाण्याला थोरल्या दिवाळीच्या आमावस्याला नदीवरच्या सातीआसरा करायला पायजे.तवा कुठं सरळ लागल." नदीवरच्या सातीआसरा म्हणजे जलदेवता. त्यांना शांत करायचा उपाय देवरशी सांगायचा. 

                                   आमच्या गावांतही असं देवरसपण बघणारा एक देवरशी व्हता.गावाच्या दक्षिणेला हमरस्त्याच्या खालच्या बगलला त्याचं घरं. त्यांची एक स्वतंत्र खोली होती.त्या खोलीत अनेक देवांनी गजबजून गेलेला भव्य गाभारा होता. एका कोपऱ्यात मोराची पिसं. त्या देव्हाऱ्याच्या बाजूला बसून देवरशीबुवा येणाऱ्या भक्ताच्या समस्या जाणून घेऊन निर्वाळा करायचे.एकदा असंच मी आमच्या भावकीतल्या दादाबरोबर त्यांच्या घरी गेलो होतो. आणि देवरशी बुवांच्या या खोलीत आलो.तिथं एका बाईला भूत लागलं म्हणून आणलेली.बराच उशीर ती घुमत होती.आणि अचानक ती बाई एकाएकी अशी काय किचाळली की, मी टाणक्यांन उडालोच.! तितनं त्येंची जेवण खोली कधी गाठली ते माझं मलाचं कळालं नाही.डोळ गच्च मिटलेलं.डोळ्यासमोर काळतांबडं दिसाय लागल्यालं..ज्याम घाबरलेलो..तवापासून  तिथं जायचं धाडस व्हायचं नाही.

                                    नदीवरच्या सातीआसरा करायच्या याला 'नदीवरचं' किंवा 'अंगावरचं' असा म्हणण्याचा प्रघात गावाकडं आहे.नदीवरचा देव करायचा म्हटलं की म्हायाराकडं येताना बाईसोबत तिचा नवरा नाही तर सासरा येत असे. येताना बाजारातून लागणारा सगळा बाजारहाट घेऊनचं यायचं. एक कोंबडा,काळी तलंग,परडी झुटींगचं सामान,नारळ, केळं,लिंबू खारका,हिरवी काकणं, घोंगड्याचा धडपा गुंडाळलेला टोणा,अगरबत्तीचं झाडं असं कायबाय बारीक मोठा बाजार उरकून पावणा माघारणीला घेऊन उन्हाचा रक व्हायला घरात हजर व्हायचा.आणि मग तिथून पुढं सगळी तयारी सुरू. दुपारच्यालाचं चुल पेटली जात असे.ढणढणीत पेटलेल्या चुलीवर घरात बायकांची जेवण करायची धांदल सुरू होत असे.नदीवरच्या देवाला सात मापट्याचा नाही तर सात चिपट्याचा कट ठरलेला असयचा..सात मापट्याचा कट म्हणजे सात मापटी तांदूळ आणि सात चिपट्याचा म्हणजे साडेतीन मापटी तांदूळ शिजवायचं. गव्हाच्या पिठाच्या सात लाटूऱ्या,सात दिव-मुटकं करायचं. आणि मग गल्ली घरातली जेवढी माणसं सांगितलीत तेवढं चपातीचं कडाप.बाजारातनं आणल्याला पायाला नाडी बांधल्याला कोंबडा तलंग एका बुट्टीखाली झापल्याला असायचा. बारकी पोरं ऱ्हा ऱ्हावुन नुसती त्या बुट्टीच्या जवळ जाऊन उघडून बघायचीत. "आरं ये उघडू नकासा गप बाहेर खेळा जावा की ..." अशी मोठी माणसं दटावायची. पण उघडू नको म्हटलं तरी कार्टी ती उघडून बघायचीचं.

                           सगळ्या गल्लीला अगोदर सांगितल्याल असायचंच पण सहजच वाटत गाठ पडल त्येला बोलायचं "रात्री जेवायला गा नदीवर..." किणीट पडायला नदीवर जायाची सगळी जोडणी सुरू व्हायची.आता उजेडाला बॅटऱ्या त्येनं हाईत पण त्यायेळला पयलं कंदील आणि मग नंतर बत्ती आली. बत्तीवाल्याला सगळ्यात आदी सांगितलं जायचं. कारण दुसरा कुणीतरी सांगून जायचा म्हणून खास त्याच्या घरला जाऊन सांगायचं "रात्री नदीवर बत्ती आणि जेवायला तुमीबी यायचं " त्याला गेळाभर रॉकेल न्हेउन द्यायला लागायचं.बत्तीत रॉकेल घालून तो बत्ती द्यायचा.बत्ती आणली की, बारक्या पोराला दुकानला पाठवून मेंटल आणायला लावायचं.त्ये शेंबूड वडतचं पळत पळत जायचं आणि एका हातातनं मेंटल घेऊन यायचं..त्यातला हुशार माणूस मग सोप्याला बसून बत्तीला मेंटल लावायचा. तिला पेटवायलाचं बराच वकोत जायचा. बारकी पोरं बत्तीच्या भोवतीनं घुपळा करून भूत बघितल्यासारख तिला कसं पेटवत्यात ते बघायचीत. उभ्या काचेचा गोलाकार कंडा. त्याच्यातल्या दोनचार काचा निघळून पडलेल्या असायच्या.त्यातनं पाखरं आत जायची, जळून मरून पडायची... मेंटल फुलत नाही तोवर बत्तीला हवा मारायची..एकदा का बत्ती सवन पेटली की, मग बाकीची जोडणी करायची.लाकडाच्या भाऱ्यातनं जेवणाला लागत्यात तेवढी लाकडं उपसून लाकडाचा कवळा तुरकाट्या असा बिंडा बांधून ठेवल्याला असायचा.

                              ज्या बाईच्या अंगावरचं करायचं तिला पूर्वला पुढा करून बसायला लावायची. तिच्या आंगावनं  पायल्यांदा भाताची दुरडी उतरायची त्या दुरडीवर चपत्यांची थप्पी लावल्याली असायची.ती उतरून जबाबदार माणसाच्या हातात द्यायची कारण तिला परत खाली ठेवायची नाही. मग कोंबडा आणि तलंग उतरून घ्यायची..कोंबडा तलंग घ्यायला तर एकावरनं एक पोरं पुढं सरसायची. जेवणाची भांडी,रस्याचं डेचकं एकांन घ्यायचं त्या डेचक्यात डाव,वाट्या बारीक भांडी भरल्याली असायची. पाण्याची घागर एकाकडं,लाकडाचा बिंडा घ्यायला सहसा कुणी तयार व्हायचं नाही. मग कोण सांग काम्या हो नाम्या गरीब मनाचा साधा भोळा त्याच्याकडं ते काम..असा सगळा लवाजमा सामानसुमान घेऊन नदीच्या वाटला लागायचा. रात्र नुकतीच अवतरलेली असायची.

                                       बत्तीच्या उजेडात माणसं नदीच्या दिशेनं जायाची. मधी बत्ती आणि भोवतीनं माणसं.कुठल्या तरी एका पोराच्या हातात कोंबड दुसऱ्या पोराच्या हातात तलंग असायची.त्यावेळी आम्हांला कोंबडं नी तलंग घ्यायची लई हौस वाटायची. जाता जाता त्यासनी पोटाशेजारी दाबून धरायचं, त्यांचं आंग ऊबदार लागायचं. ते बी शांत बिलगून बसायचं..उगाचच त्यांच्या पाठीवरन हात फिरवायच लाड करू वाटायचं. मनात यायचं आता नदीवर गेलं की ह्यासनी कापणार मग त्यास्नी कसं व्हईल ?त्यांचा जीव कुठं जाईल ? अस विचार बालमनात यायचं.आणि नंतर त्यांच्यावर ताव मारताना मात्र हे ध्यानात ना मनात.सगळं विसरून गेलेलं असायचं.जाताना थोरली माणसं म्हणायची."पोरा कोंबडं सळ पक्कड नाही तर घोळ व्हईल." एकदा म्हणं असं झालं.... नदीकडं जाताना पोराच्या हातातन एकाएकी कोंबडं सुटलं पायाला बांधल्याली नाडी कवा अगोदरच ढिली झाली व्हती.कोंबड जसं रस्ताला लागलं तसं ते सरळ पळतच सुटलं तेच्या मागणं पाच सहा जण धरायला. आता गावतय व्हय हाताला ? गडयानी खूप आटापिटा केला खरं कोंबड काय तावडीत गावना..या कुपावरनं त्या कुपावर करत करत कोंबडं पार कुठल्या कुठं. झाली का पंचाईत आकिरला गावातल्या एका कोंबड्या विकणाऱ्या बाईकडनं नवीन कोंबडं विकत आणायची पाळी आली.आसला हा सगळा घोळ.

                                     देव करायला आलेल्या माणसांनी नदीच्या दोन्हीं आंगचा काठ फुलून गेल्याला असायचा.काळ्यामिट अंधारात सगळीकडे तांबड्या भडक पेटत्याल्या चुली.चाटचाट जळत्याला,लाकडं फुरफुरत्याला आवाज.भवतीन माणसांची गर्दी नुसती जत्रा भरल्यासारखी वाटायची. नदीवर आलं की गारठा जास्त जाणवायचा. नदीवर गेल की,चुल कुठं मांडायची या अंगाला काय त्या अंगाला इथनं सुरवात..कोण म्हणायचं, "नाही हीतं सपय जागा हीतच मांडुया." तवर कोण म्हणायचं, "आगा तिथं चला तिथंन पाणी आणलाय बरं पडतय.."

                             सर्वानुमते एकदाशी जागा ठरली की,सगळं सामान सुमान त्या जाग्याला उतरायचं... तीन दगडांची चूल मांडायची आजूबाजूचा पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या चुलीत कोंबून चूल पेटवायची.चुलीवर डेचकं ठेवायचं.तवर एकजण नदीतन पाणी आणून डेचक्यात वततो. इकडं पाणी हळूहळू तापायला सुरुवात होते. काहीजण मग नदीच्या काठाला जातात.काठावरचं गुंड बघून सात दगड घ्यायचं ते पाण्यानं धुवायचं.एका सपय जाग्याला खाऊची सात पानं मांडून त्यावर ते दगड ठेवायचे.या म्हणायच्या सातीआसरा.आणि त्याच्या बाजूला आठवा निराळा दगड त्यो म्हणायचा झुटींग. या झुटींगसमोर संग आणलेला कोंबडा पहिल्यांदा कापायचा आम्हांला त्यावेळी हे बघायचं औत्सुक्य असायचं. त्यामुळें आम्हीं त्या माणसांच्या मागणचं असायचो..पायात दोन्हीं पखं एक करून त्याच्यावर पाय ठेऊन त्याच्या उघड्या चोचीत थोडं पाणी घालतात आणि सारदिश्यान गळ्यावरनं खुरपं वडलं की धडापासून मुंडकं वेगळं. चोच उघडझाप करत्याल मुंडकं समोर ठेवायचं कोंबड्याची  पख फाडफाड व्हईत असायची.मुंडकं नसलेल्या मानंच्या गड्ड्यातनं लालभडक रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायच्या. हळूहळू ते गपगार व्हायचं... नंतर तलंगचीबी तीच तऱ्हा.नदीतलं  गोटं ताज्या रक्तानं रंगून जायाचं.रक्तानं शिपल्याल खुरपं एका हातात आणि पायाला धरून उलटं केल्याली कोंबडा नी तलंग मुंडक्यासहित घेऊन लोक वर यायचे. 

                           चुलीवरचं पाण्याचं डेचकं खाली उतरून आता उघड्या जाळावर त्यास्नी भाजायचं.पख जळताना खरपूस चिरमाट वास नाकाला यायचा. नदीच्या काठाला गारठा जोरात जाणवायचा.त्यामुळं जो तो चुलीला ढुंगाण लावून कुठं कांदा चिर..मटण चिर,कोण बाजूच्या काटक्या मोडून चुलीत घाल अशा निमतानं चूल धरायचा. चुलीत कोंबडयाची मुंडकी भाजायला टाकायची. प्रत्येकाची काय ना काय  काम ठरलेली असायची. रिकामी हाईत ती जायाची, फिरून यायची. कुठं याच्या चुलीला बस कुठं त्याच्या, तवर कोण आड्यावर जाऊन यायचा.कोण पलीकडच्या कापडयाच्या हॉटेलातलं फुटांण आणून रस्त्याकडला थंडीचं उगच दातांन कडूम कुडुंम करीत खायाचा.कुणाला तोपर्यंत परसाकडंचं व्हायचं. तोपर्यंत कुणाला खेकडी पकडायची लहर यायची. कुणाचं काय तर कुणाचं काय..? पण एक.काम करायला मागं आणि खायाला पुढं अशांची संख्या जास्तच.

                                                 परडी भरायचं काम जाणत्या थोरल्या किंवा म्हाताऱ्या माणसांकड असायचं. आमच्या वेळी आमचा किसनुआज्जा सपय जाग्याला बसून साती आसराची परडी भरायचा.परडीत तळाला भात घालून त्येजावर नारळ,नारळावर हिरवी काकणं, हळद कुंकू, भोवतीनं सात गव्हाच्या पिठाच्या लाटूऱ्या,त्यावर दिव-मुटकं,सात केळं,सात लिंबू ,सात खारका हे सगळं घालून झालं की,वाती लावायच्या....एक वर्षी म्हणं अशीचं परडी भरायला पांच जण,पाचीजणांनी दारू पिलेली."आगा नको तुम्ही परडी भरताव आम्हीं." बाकीची लोकं सांगित व्हते हां. पण कुणाचं ऐकतील तर खरं. परडी आम्हींचं भरणार हा त्यांचा हेका.कशीतरी परडी भरून झाली त्यावर दिवमुटक ठेवलं आता वाटी पेटवायच्या. काड्यापेटी घेतली..पण काडी वडली की वाऱ्यानं इजायची.काडी वडली की इजली...मग एकानं म्हणायचं, "आसं पेटवत्यात व्हय आन इकडं." पण त्यानं काडी वडली की इजली...दुसऱ्यानं म्हणायचं, "काय तू शाना काडी पेटवायची कशी आण इकडं दावतो"...त्यानं बी वडली की इजली. मग तिसऱ्यानं म्हणायचं "तुम्हीं दोघबी खूळ हाईसा आणा इकडं." त्यानं वडली की ती पण इजली. असा पाचजणांच्यात ह्यो खेळ सुरू झाला.पाच जणांच्यात फिरून फिरून शेवटी काड्यापेटीचं सपली पण वाती काय पेटल्या नाहीत. शेवटी थंडगार दिव्याची परडी पाच जणांनी उचलली. परडी हालत डुलत चालली नदीकडं.

                                           परडी भरायचं काम किसनुआज्जा बयाजवार करायचा.परडी भरली की,घरच्या मालकानं ती घेऊन नदीत सोडायला जायचं त्यावेळी त्याच्या भवतीन आम्हां पोरांचा घोळका असायचा.परडीतला नारळ कोण घेतंय याच्यासाठी ईर्षा लागायची..थोराड दांडग पोरगं पुढं पुढं करायचं...बारकी चिलीपिली  केळं  गावतील यासाठी धडपडायची. पाण्यात घुसलं की गार गारगीट पाणी ढेंगतनं वर चढायचं.वळवळ करत एखादा साप वर शिरावा तसं गार पाणी ढेंगतनं वर चड्डीत घुसायचं.थंडीनं काकडून जायला व्हायचं.परडी सोडून हात जोडपर्यंत पोरांना दम निघायचा नाही. परडी सोडायला लागलीच पोरं त्या परडीवर झडप घालायची.पेटत्याल दिव पाण्यात बुडवून इझुन जायाचं.परडीचा पोरांच्या धुमडीत कुस्कुरा व्हायचा. कुणा पोराच्या हाताला मग नारळ,कुणाच्या हाताला केळं तर कुणाच्या हाताला लिंबू गावायचं. त्या गार पाण्यातन सगळं घेऊन बाहेर यायचं. अंगावरच्या कपड्यांचा वल्लाचिखोल झाल्याला असायचा. ज्याला नारळ गावलाय त्याला इतका आनंद व्हायचा की जणू कोळ्यांनी सोडलेला सोन्याचा नारळ गावल्यासारा त्याच्या चेहऱ्यावर आविर्भाव असायचा. एकजागी बसून दगडाने नारळ फोडायचा आणि मग खोबरं पोरांच्यात वाटून खायचं. कुणाला केळं गावल्याली असायची केळं खायची.कुणाला लिंबू गावल्याल असायचं ते चड्डीच्या खिशात कोंबायच.जेवणाच्या वक्ती उपयोगाला यायचं.

                     तोपर्यंत इकडं चुलीवर रस्याला उकळी आल्याली असायची.खायच्या दमदार जाळानं रस्सा डेचक्यात  आतल्याआत गदादा हालायचा.उकळीला टाप यायची.तांबडाभडक रस्सा तयार झालेला असायचा. वाटीत एक चुरा, नकाडा रस्सा घेऊन आचारी घुटका घित चटणी मीठ हाय का व्यवस्थित बघायचा.सगळा मेकप झालाय म्हटल्यावर रस्सा खाली उतरला जायचा. रस्सा तयार झाला की कुणीतरी सांगायचं 

"जावा रं निवद दाखवून या जावा.." 

तवा निवदाला म्हणून मुंडक्याची आठवण व्हायची. मघाशी इंगळात मुंडकी भाजायला टाकल्याली असायची.ती शोधताना गावायची नाहीत.तिथंच ढुंगण लावून बसलेला इसम उगाच कटकीन इस्तू हालवून म्हणायचा,"आगा इथंच व्हती गेली कुठं..?"

दुसरा म्हणायचं "आता तूच मगाशी भाजत व्हतास जातील कुठं.."

"नाही गा मी इथं मी काढून इथंच ठेवली व्हती दगडावर."

"आसू दे घे आता."

तळं राखील तो पाणी चाखील दुसरं काय..?

                          घरचा मालक मग कटाची दुरडी घेऊन मगाच्या साती आसरा पूजल्याला जाग्याला येतो आणि मग पुजलेल्या सातीआसऱ्याला शाकाहारी निवद म्हणजे दुरडीचा निवद दाखवायचा.आणि बाजूच्या झुटींगला मांसाहारी निवद म्हणजे मटणाचा निवद.एका इस्तारीवर रस्सा सोडलेला पांढरा भात,बाजूला मटणाच्या ठेवलेल्या दोन चार फोडी,भाजलेली मुंडकी,उकडलेल्यालं अंडं,चिरमुर फुटाणं असा एकंदरीत त्याचा निवद. झुटींगच्यासमोर घोंगड्याचं धडपा जोडलेला खूळ खूळ वाजत्याला टोणा,अगरबत्तीचं झाड ठेवलं जायचं .निवद दावून लोक वर यायची.

                          निवद दाखवून आलं की मांडीला मांडी घासून पंगत बसायची.यात दोन शाकाहारी माणसं ठरलेली असायची. सगळ्या मांसाहार खाणाऱ्या लोकांत ही दोन माणसं पावण्यागत वाटायची.मांसाहार खाणं नाही काय नाही घरात गपगार जेऊन झोपायचं सोडून असल्या मरणाच्या थंडीत मिळमिळीत भात आमटी खायाला नदीवर यायची यास्नी कसली हौस कुणास ठाऊक. आताच्या सारख्या त्यावेळी प्लॅस्टिक वाट्या, कागदी पत्रावळ्या नव्हत्या. जेवायला बसताना रस्याला कुणी वाटका घ्यायचा,कोणी खोगला तर कोण बेल्ट घेऊन बसायचा.जागा तरी सपय नसायचीच. खायन मांडीला बारीक मोठं खडं बोचायचं. मधी बत्ती ठेवली जायची. सगळयापुढं इस्ताऱ्या मांडल्या जायच्या.मग पयल्यांदा दुरडीतल्या भाताच्या थप्पीला हात घातला जायचा.वाढणारा पाची बोटं त्यात रुतवून हातात जेवढा येईल तेवढा भाताचा गटका इस्तारीवर ठेवायचा.सगळ्याचा जीव मात्र रस्याच्या डेचक्यात आडीकल्याला असायचा. कुणीतरी डावंन मटणाचं दोन दोन चुरं, भाताच्या काठाला ठेवायचं.ते फक्त दोन दोनचं वाटणीला यायचं. माप वाटायचं 'धा' यावं.पण कोंबड्या दोन आणि माणसं वीस. कुणाला म्हणून पुरणार. नंतर वाटीत रस्सा वाढला जायचा..वाफाळलेला तांबडा भडक रस्सा बघून मन हारखून जायचं.

                               एक वर्षी म्हण आमच्या गल्लीतला देव व्हता. माणसं जेवायला बसली रस्सा वाढला.पायल्यांदा म्हण माग बघून पयला घास टाकायचा. तस आमचा तात्या मागं वळून घास टाकायला पुढं बेडकीन मारली उडी रस्यात. रस्सा इदाळला बेडकी गेली तळाला.तात्या सरळ झाला तवा त्येला संशय आल्याला,काय तरी भानगड झालीय.

त्यो आण्णाला म्हणाला.  "आगा आण्णा रस्यात काय तरी पडल्यासारख वाटतंय.तळाला काळबी दिसतंय."

आण्णा म्हणाला "आर काय नाही खा गप..मटणाचा तुकडा आसलं.."

पण इकडं तात्यांचा संशय अधिकच बाळावलेला.. त्यो बारीक नजरेनं निरखून बघत होता. तोपर्यंत बाकीच्याचं झुरक ऐकू येत व्हतं.बाकीच्यांची तोंडाला रस्याच्या वाट्या पण माझ्याच वाट्याला काय म्हणायचं ह्ये. असं मनातल्या मनात तात्या कळवळला . वाटीत अजिबात तुकडा बुडवू वाटना.. तोपर्यंत ताटलेली बेडकी फुगून आली की वरती.रस्यावर मस्तपैकी तरंगायला लागली.तात्याचा संशय खरा ठरला.  "रस्सा प्यालो असतो तर..?" यावर तात्या आता विचार करू लागला. बाकीची माणसं रस्यात बुडालेलं दात बाहेर काढून हसत व्हती. असली सगळी गंमत.

                                    रस्सा वाटीत आला की पहिला झुरका मारायचा.आणि मग बाकीची सुरवात..कुणीतरी मधन जेवण बनवणाऱ्याला दाद द्यायचा." एक नंबर..रस्सा लई झ्याक झालाय बघ." दारू पिऊन रस्सा प्यायला बसलेल्यांची तऱ्हा बघण्यासारखी असायची. झिंगत पेंगत रस्सा वढायची. रस्सा पिताना कुणी नाक गाळत..कुणाच्या नाकावर घाम गळत,कुणी टावलानं घाम पुसत..वाटीवर वाटी दणकून रस्सा प्यायचा.रस्याच्या झुरक्याचा फुरफर आवाज कानी पडायचा. रस्सा पिण्यातबी एक ईर्षा असायची. स्वतः कमी प्यायची पण दुसऱ्याला जास्त पिण्यासाठी प्रेरणा द्यायची. जसा सगळीकडं कोल्हापूरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा फेमस तसा आमच्याकडं फेमस नदीवरचा हा रस्सा. काय बी म्हणा या रस्याची चव ती न्यारीच.

                             चपाती खाऊन झाली की,भाताचं आळं करायचं त्यात रस्सा वतायचा. भाताच्या तळातनं रस्सा घसरतीला पळायचा.चुकून कधी कधी शेजाऱ्याच्या मांडीखाली शिरायचा.अगदी यथेच्छ पुरेपूर ताव मारून माणसं एकेक करून उठायची. खरकाट्या हातानं खरकाटी इस्तारी उचलायची आणि शेजारच्या कुपाजवळ नाही तर घुसपाजवळ टाकायची. दोन चार कुत्री त्या इस्ताऱ्यास्नी झटत असायची. एक वर्षी तर आमचा नामुदा त्यावेळी जादाच पिला व्हता.झिंगतचं जेवला पंक्तीतन उठला आणि तसाच खरकाटा हात घेऊन घरला गेला.

                           वाढणारी माणसं शेवटीला बसायची.मग जेवल्याली माणसं त्यासनी वाढायची.बाकीची इकडं उरल्याली लाकडं चुलीत घालून मोठा धग करायचीत. मागणं पुढणं शेकायचं.कुणी दातात काडी घालून उगाचचं डीवचायचं.चेष्टा मस्करी चालायची.. कोण कसा रस्सा प्यायला,पिल्याला कसा बसून जेवला यावर चर्चा व्हायची..तवर कुणाला बिडी प्यायची तलप यायची. कुणाची हातावर तंबाखुची मळणी सुरू असायची..अशातच माग राहिल्याल्याचं एकदासं जेऊन व्हायचं. उरली सुरली भांडी गोळा करायची. रस्याचं डेचकं,खरकाटी भांडी नदीतन नुसती खदबळून आणायची. यांनी जेवायचं आणि भांडी बायकांनी धुवायची म्हणं. दुरडीत भात उरला आसल तर बाजूलाच उलटायचा.चटणी मीठ उरलं आसल तर तिथंच ठेवायचं उरल्याल काहीच घरला न्यायचं नाही अशी रितभात.सगळं आवरून झालं की चुलीत पाणी वतून चुल इझवायची.चुल थंडगार व्हायची.आणि मग भरल्या पोटानं बेतानं माणसं घरला परतायची.सकाळी नदीच्या काठावर जागोजागी काळठिक्कर पडलेल्या तीन दगडाच्या चुली दिसायच्या.रात्री नदीवर देव जेवायला आल्याल्या खाणाखुणा दिसायच्या.बाजूला उरलेल्या चटणी मिठाच्या पिशव्या पडलेल्या असायच्या.आमचा मांगाचा मारुतीमा येरवाळीचं नदीवर फेरफटका मारून त्या चटणी मिठाच्या पिशव्या गोळा करून घरला घेऊन यायचा.


- किरण सुभाष चव्हाण (पांगिरे)

 ८८०६७३७५२८.


काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं.

कतई पटकेवाला आमचा किसनुआज्जा


शनिवार, ८ जानेवारी, २०२२

'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.

 


'विनाअनुदानितची संघर्षगाथा' हे उपाशी शिक्षकांचे पुस्तक. - शांताराम गजे.

                       मला कुणी विचारले की आजची सर्वात वाईट व क्रूर गोष्ट कोणती..? "महाराष्ट्रातील विनाअनुदान शाळेतील शिक्षकांची..?"  मी क्षणात उत्तर देईल. मग ती सत्ता राबवणाऱ्यांना का वाटत नाही..? बांधकामातून निकामी झालेल्या दगडासारखे त्यांना हे शिक्षक वाटतात काय ? पंधरा, अठरा,वीस वर्षे उलटली अनेक एस.एस.सी एच. एस. सी च्या बॅचेस यांनी घडवल्या, खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले ते या शाळामुळेच ना.!  इतकी वर्षे या शिक्षकांना रुपया पाहायला मिळाला नाही. विनामूल्य रक्त ओकताहेत पण याची लाज आहे का शासनाला.

                       याची म्हणजे या शिक्षकांची शोकांतिका किरण चव्हाण या भुदरगड तालुक्यातील शिक्षकाने 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' या पुस्तकातून मांडली आहे. या पुस्तकाला हेरंब कुलकर्णी या संवेदनशील लेखकाची प्रस्तावना आहे. 'अश्रूंनी लिहिलेली वेदनेची बखर' असे ते या पुस्तकाचे वर्णन करतात. हे पुस्तक वाचून कोणाच्या डोळ्यात पाणी (अश्रू) आले नाही तर त्याचे हृदय बिलकुल दगडाचे समजा असे. सत्ताधारी दगडांच्या राजवटी आल्या आणि गेल्या. मात्र त्यांना निदान मानवतेच्या भूमिकेतून सुद्धा बिलकुल दया आली नाही. आज आपण महिन्याला १०० कोटींच्या वसुलीच्या बातम्या वाचतो,मात्र १८ वर्षे बिनपगारी म्हणजे नेमके काय ?

या खोलात कोणी गेले नाही. पुस्तक केवळ भावनेने लिहिले नाही तर त्यात बुद्धीचाही मोठा वापर केला आहे. कसे जगले असतील हे शिक्षक ? कसे जगत आहेत हे शिक्षक !  यांचे तरुणपणीच कोचे गेलेले गाल,ऐन तारुण्यात म्हातारपणाच्या लकेरी, यांची पोकी पोकी झालेली शरीरं. या राज्यकर्त्यांना कशी दिसत नाहीत.  उद्योगपतीना कर्जमाफीसाठी पैसे आहेत मात्र या सरकारला विनाअनुदानित शिक्षकांना पाच-दहा हजार पगार द्यायला पैसे नाहीत. संध्याकाळी कमिशनचा हप्ता आला नाही तर यांना झोप येत नाही. या शिक्षकांनी कशी काढली असेल वर्षामागून वर्षे.!!

                         पुस्तकात रचनेपासून तपशीलापर्यंत लेखकाची प्रतिभा जागोजाग दिसते. मुळात विनाअनुदानित धोरणाची वाटचाल कशी झाली याची लेखक मिमांसा करून शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सावंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रतिनिधी खंडेराव जगदाळे यांच्या मुलाखती घेतात. तर विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना यात सोळा वेदनांचे उमाळे आहेत. वैतागून हे शिक्षक इच्छामरणाची परवानगी मागतात. 'स्वातंत्र्यदिनी एका शिक्षकाची आत्महत्या' हे प्रकरण थेट काळजाला भिडतं. या सोळा प्रकरणात ज्या व्यथा-वेदनांची कथा आपण वाचतो. तेव्हा निर्दयी शासनाच्या अन्यायाबद्दल तोंडात शिव्या येतात. हे शिक्षक असा काय गुन्हा करतात की, त्यांच्या गळ्यात शासनाने नरवेदना बांधाव्यात, असा प्रश्न पडतो.

                    'काळाने हिरावून घेतलेले विनाअनुदानित शिक्षक' व 'विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या' या दोन प्रकरणात या तणावातून मृत्यू झालेल्या ४७ शिक्षकांची यादीचं लेखक देतात, गलबलून जाते. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेल्या हत्याच आहेत, तर कळतील का हो अंतरीच्या भावना?यात लेखकाने फोडलेला आर्त हंबरडा वाचून काळजाचे पाणी पाणी होते. बाप म्हणतो लेकाचा पगार सुरू करा, लहानगा लेक म्हणतोय, 'बाबांचा पगार कधी सुरू होईल ?' लेखक म्हणतो 'आत्तापर्यंत आम्हाला सारे निर्दयी बाप भेटले तुम्ही आई व्हा ना !, आमच्यासाठी अनुदान द्या ना !' केवळ आमच्या कुटुंबाची खळगी भरण्याइतके ! या आर्त हंबरड्यानी दगडालाही पाझर फुटतील असे ते.

              महाराष्ट्रातील काही विचारवंतांचे याबाबत विचार एका प्रकरणात आहेत. डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणतात, 'अनिष्ट विनाअनुदानचे हे अरिष्ट आहे'. तर श्री.संपत गायकवाड शासनाला या बाबत गंभीर विचार करायला सुचवतात. तर शांताराम गजे कायम विनाअनुदान म्हणजे मरेपर्यंत विनाअनुदान काय ?असा खोचक प्रश्न विचारतात.प्रा. किसनराव कुराडे म्हणतात की, विनाअनुदान शिक्षण पद्धती ही एक नादान बाब आहे. अनिल बोरणार म्हणतात की, प्रलंबित म्हणजे कुठंवर प्रलंबित ? पुस्तकात इतरही प्रकरणे आहेत.

                  एकूणच खरं तर एका अनुदान नसलेल्या प्रतिभावंत लेखकाने लिहिलेले हे पुस्तक आहे.  उपाशी शिक्षकांचे उपाशी शिक्षकाने लिहिलेले हे पुस्तक आहे. असे म्हणतात की, कला-साहित्य याची निर्मिती भरल्या पोटातून होते. लेखक याला अपवाद ठरला आहे. शेवटी लेखक परिचयातील माहिती वाचून अचंबित व्हायला होते.जणू उकिरड्यावर पडलेलं रत्न. मी शेवटी अपेक्षा करतो की, शासनाने विनाविलंब या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे व पापाचे वाटेकरी होणे थांबवावे.



 - शांताराम गजे

अकोले जि- अहमदनगर.

मोबा -९९७०७३०२५०


विनाअनुदानितची संघर्षगाथा.

पुस्तकासाठी संपर्क - 

किरण चव्हाण. -८८०६७३७५२८.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

श्री. अशोक चव्हाण यांचा डाक विभागाकडून सन्मान.

               


डाक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री.अशोक राजाराम चव्हाण यांचा डाक विभागाकडून उचित सन्मान.

                   केंद्र सरकारच्या डाक विभागामध्ये 1991 पासून गेली 30 वर्षे कार्यरत असणारे व कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे पोस्ट सेवा बजावणारे शांत,संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व,पांगिरे गावचे सुपुत्र आणि आमचे दादाश्री श्री. अशोक राजाराम चव्हाण यांना डाक विभागातल्या उत्कृष्ठ सेवा कामगिरीबद्दल 'Best Employee Of the year' या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.आपल्या सेवेला वाहून घेऊन एकनिष्ठपणे शांततेने आपले कार्य करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.खरं तर आपल्या कामाशी एकरूप राहून तन्मयतेने काम करण्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अशा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन त्यांचा झालेला सन्मान हा उचित असा आहेच, त्याचसोबत  सर्वांसाठी आदर्शवत असणारा व प्रेरणादायी ठरणारा आहे.आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.पुनश्च त्यांच्या यशस्वी गौरवास्पद कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा...         




बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...


 विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

                         आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.



                          आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१७० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटूंबाला कसं जगवायचं.? या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी आहे.विनाअनुदानितच्या प्रश्नाने भरला संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.त्या दोघा पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज विभक्त राहतात. विनापगार काम करताना आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो असं त्या म्हणतात. स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे बापाने बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत,अहमदनगरच्या प्राध्यापक असलेल्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                        अलीकडच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे..एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगार खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

                      विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय ?.तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळीने हा माणूस अस म्हणतो.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणू देत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या समस्यांवर मात करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक खूपच मोठं दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                विनाअनुदानितच्या ह्या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे.याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली.कारण ह्या वेदनेची सखोलताचं इतकी आहे की,त्याचा अंतच लागत नाही.. विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की त्याच्या शोधात असताना त्याचा काही अंशचं मला शब्दरूपाने पुस्तकात मांडता आला. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो.मी या प्रश्नाकडे पाहताना आणि आज पुस्तकारूपाने मांडूनही आज मनातून अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.

               एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजात चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. विनाअनुदानितचा प्रश्न खरोखरच पूर्णपणे मिटवायचा असेल आणि विनाअनुदानितच्या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि  व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता शेवटी महत्वाची आहे.

                 

             - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८.





पुस्तकासाठी संपर्क 

किरण चव्हाण.

मोबा/गुगल/फोन पे - ८८०६७३७५२८.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

मदतीचा हात मायलेकीच्या निवाऱ्यासाठी


 

'मायलेकीसाठी निवारा उभा करूया संकल्पसिद्धीचे साक्षीदार होऊया.'


                                                   भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक येथे श्रीमती रेखा धोंडीराम परीट व प्रगती धोंडीराम परीट या दोघी मायलेकी राहतात. गल्लीतल्या एका वळणावरच्या कोपऱ्यात विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी मातीचे घर आहे.घराला कांबटाचं दार.आत जाताना वाकून जावं लागतं.हे घर म्हणजे दाटीवाटीचा खोपडाचं म्हणायचा.दोन चार लोकांना बसायलाही पुरेशी जागा नाही.. घरात पूर्ण अंधार प्रकाशाची सोय नाही.रात्रीचा दिवा लावावा म्हटलं तरी त्या दिव्यात रॉकेल कुठून आणणार..? कारण रॉकेल आणायचं तर रेशन कार्ड पाहिजे.एकंदरीत स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही,राहतं घर ते ही नावावर नाही,मूळ कागदपत्रे नसल्याने रेशनकार्ड,आधारकार्ड (आईचे नाही) सारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे गरिबीची वास्तवता कागदोपत्री सिद्ध होत नसल्याने शासनाच्या सोयीसुविधापासून आज वंचित रहावं लागत आहे.. 

                                         प्रगती धोंडीराम परीट सध्या दहावी मध्ये शिकते आहे. प्रगतीच्या आईला ऐन तारुण्यात वैधव्य आलं.प्रगतीच्या वडिलांचे निधन झाल्याने घराचा आधारवड हरपला आहे.एक मोठा भाऊ आहे पण गरिबीमुळं त्याला पाहुण्यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवलेलं आहे.साधी भोळी अशी प्रगतीची आई.परिस्थितीने रंजलेली गांजलेली.पोटाला दोन मुलं पोटाची खळगी भरायची की मुलांचे शिक्षण बघायचं परिस्थितीने पुरती खचून गेली आहे बिचारी.इतकी भीषण गरिबी असून त्यात कमी की काय म्हणून तिला फिट्सचा त्रास आहे.कधीही अचानक तिला फिट्स येते त्यामुळे हतबलतेशीवाय हातात काहीच नाही. यातून रोज दुसऱ्याच्या बांधा जाऊन कशीतरी दोन वेळच्या भुकेची तडजोड करून गुजराण करावीच लागते.शंभर रुपये मजुरीच्या जीवावर रोजच्या जगण्याला लागणाऱ्या गरजांची पूर्तता कशी होणार ? अशा गरिबीमुळे तर पोटचा श्रावणबाळ ह्या माऊलीला  दुसऱ्यांच्या हवाली सोपवावा लागला.जिथे रोजच्या जगण्याची मारामार आहे तिथे मुलांच्या शिक्षणाचा भार तिच्याने सोसवणारा नाही.तरीही आज अनंत अडचणीतून प्रगतीने आपले शिक्षण चालू ठेवले आहे.

                                   आज मायलेकी गरिबीशी लढत झगडत कसेतरी जीवन कंठत आहेत.एकवेळ उपाशी पोटी राहून हा लढा त्या लढतीलही.पण मूळ प्रश्न सध्या त्यांच्या निवाऱ्याचा, राहण्याचा आणि मुख्यत्वेकरून संरक्षणाचा आहे.आज छोटेखानी मातीच्या घराचा आसरा आणि रात्रीला त्या नाजूक कांबटाच्या दाराचा आडोसा.ही असुरक्षितता रात्रंदिवस त्यांच्या मनाला खात आहे.प्रत्येक रात्र तर वैऱ्याची असावी अशी परिस्थिती आहे रात्री लेक झोपते तेव्हा माय जागी असते आणि माय झोपते तेव्हा लेक जागी असते.याहून त्यांच्या असुरक्षिततेचं वेगळं उदाहरण द्यायला नको.

                                  आज दिवसाढवळ्या समाजात घडणाऱ्या महिला अत्याचाराची प्रकरणं आता वेगळी राहिली नाहीत.अशा पार्श्वभूमीवर ह्या मायलेकींचं अशा नाजूक घरात राहणं कितपत योग्य आहे ?घर म्हणजे प्रत्येकासाठी भलेही एक स्वप्न असेल पण त्यांच्यासाठी एक सुरक्षितता म्हणून छोटेखानी असेना का एका पक्क्या घराची अत्यंत आवश्यकता आहे. एक असे घर की त्यांना आसरा देईलचं त्याचसोबत त्यांना एक सुरक्षितता देईल किंबहुना रात्रीच्या वेळी त्या दोघींना एकमेकींच्या काळजीपोटी पहारा करावा लागणार नाही.

                              आणि म्हणून गुरुवर्य इंद्रजित देशमुख काकाजींच्या प्रेरणा आशीर्वादाने शिवम परिवाराने हा संकल्प केला आहे की, ह्या मायलेकींना शक्यतो लवकरात लवकर हक्काचा निवारा उभा करायचा.एक पक्के सुरक्षित असे घर त्यांच्याकरिता सकारायचे आहे. आणि हा संकल्प केवळ समाजातील संवेदनशील दानशूर दातृत्वातूनच सिद्धीस जाणार आहे. आज जसे गावागावांमध्ये देवावरच्या श्रद्धा भक्तीभावापोटी उदार अंतरकरणाने केलेल्या दानातून भव्यदिव्य सुशोभित मंदिरं उभा राहतात.त्याचप्रकारे माणसांवरच्या श्रद्धा, संवेदनशीलतेच्या भावनेतून आज कोलमडलेल्या माणसांची मंदिरं आज आपल्याला उभी करायची आहेत..ह्या उपक्रमाला समाजातील उदार अंतःकरणाच्या दानशूर संवेदनशील माणसांच्या पाठबळाची गरज आहे.खरं तर शिवम परिवाराने मायलेकीसाठी घर उभा करण्याचा संकल्प करून ज्या पवित्र कार्याचा पाया घातला आहे त्याचा कळस आपल्यासारख्या दानशूरवंतांच्या दातृत्वातूनच पूर्ण होणार आहे. तर चला आपापल्यापरीने ह्या उपक्रमास योगदान देऊन या संकल्पसिद्धीचे आपण साक्षीदार होऊया.


मदतीसाठी संपर्क -


सागर गुरव - ९१४६१४८९०४

सोमनाथ येरनाळकर - ९४२१४२३००७

सुहास सोरप - ८३२९९००८६० 

सुनिल पाटील - ९४२१२०१४६० 

दिगंबर किल्लेदार - ९४२१८२७०७०

राजेंद्र मगदूम - ९४२३२७९७२८.

---------------------------------------------------

किरण चव्हाण.

८८०६७३७५२८.

बुधवार, २८ जुलै, २०२१

"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                  "बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."


                     आसमानी सरी बरसतात काळ बनून आणि अंदाधुंद तांडव करून जातोस मेघराजा.तुझ्या जीवावर प्रजा सुखात आनंदात नांदते...त्या प्रजेचं अतोनात हाल करून छळून..लुटून जातोस बिचाऱ्या.बा मेघराजा एवढा कसा काय रे निष्ठुर होतोस..? जो प्रेमानं धरणीमायेवर बरसावा तो असा कोपिष्ट होऊन का खवळवतो.बरसायला लागलास की बरसत राहतोस नुसता वेड्यासारखा.. तुझं तुलाही नाही भान रहात.व्यापून टाकतोस धरणीमायेच्या सर्वांगाला.तिच्या लेकरांनी तिच्या कुठल्या कुशीत लपून बसावं रे? जराही ठाव नाहीस देत. काय बोलावं आणि कुणापाशी बोलावं..? तुला वाईट तरी कसं म्हणावं..? तारणारा तूच आणि मारणाराही तूच.एका हातानं देणारा तूच अन दुसऱ्या हातानं असं काढून घेणाराही तूच.

                         तूच आहेस डोळ्यात प्राण आणून ज्याची आंम्ही वाट पाहतो...तू बरसायला लागलास की,आमच्या आनंदाला उधाण येतं.सुखस्वप्नं पहावी ती तुझ्या जीवावर.तुझ्या चांगुलपणावरच हा साऱ्या जीवांचा सुखाचा संसार.पण आज काय म्हणावं तुला..?.तुझ्याकडं आस लावून बसणाऱ्या लेकरांच्या वाट्याला हे कोणतं दुःख घेऊन आलास..वैऱ्यांन डाव साधावा तसा डाव साधतोस.सुखाची रास घेऊन बरसणारा तू अशी एकदम दुःखाची आरास कशी काय मांडून जातोस.                       महापुर येऊन जातो रे पण उर अजूनही भरून वाहतोय...रात्रंदिवस थैमान घालुन,वैऱ्यासारखा आक्रमण करून आमच्या सुखानं नांदणाऱ्या वस्तीत फक्त तांबडया पाण्याचं साम्राज्य पसरवतोस.एकवेळ अशी की,  देव पाण्यात घालून तुझी वाट बघायची,पण आज तूच देवाला पाण्यात घातलंस. देवळाच्या गाभाऱ्यातला आणि घराच्या देव्हाऱ्यातला देव आपल्या मिठीत घेतलास...आमच्या पेटत्या चुलीवरून पाणी फिरवलंस. राहतं घरटं पाण्यानं भरून गेलं.चार भिंतीच्या आत गंगामाई रहायला आली.

                          ऊनवारा,पाऊस पाणी झेलून आम्हांला जपणारी आमच्या कष्टाची घरं.आकंड पाण्यात बुडून मातीमोल होताना उघड्या डोळ्यांनी नाही रे पहावत..तान्ही बाळं, बाईमाणसं, म्हातारी-कोताऱ्या जीवांची होणारी हेळसांड नी हाल सांग फक्त उघड्या डोळ्यानी कशी पहायची रे....नात्यांच्या होणाऱ्या ताटातूटीची पुन्हा भेट घडेलं की नाही ठाऊक होतं.गोठ्यातल्या लेकुरवाळ्या जनांवारांची दावण रिकामी करताना ध्यायी आतल्या आत कितीदा रडते. 

तूच नाहीस अरे गावचा पाठीराखा डोंगरसुद्धा झडप घालतो आमच्या गावांवर.चिरडून टाकतो आपल्या उराखाली आमची माणसं.कुटूंबच्या कुटूंब गाडली जातात.नात्यांच्या आख्या गोतावळ्यावर माती सारली जाते.नेणत्या जीवापासून जाणत्या जिवांचा साऱ्या साऱ्यांचा चिखल होतो.गडप झालेल्या ढिगाऱ्याखालीचं त्यांना कायमची समाधी मिळते.त्या चिखलातुन तान्ह्या लेकराचा निपचित गोळा वर काढताना सांग तुला कस वाटतं.नात्यांची,कष्टाची सारी सारी धनदौलत पाण्यातून वाहून कुठल्या कुठं जाते.

                               समोरच्या कोसळणाऱ्या संकटाकडं फक्त शून्यातून बघण्यापलीकडं हातात काहीच उरत नाही.गळ्यात हुंदका दाटून कितीवेळा तरी डोळ्यांना महापूर येतो.सगळ्याच वाटा खुंटलेल्या...कुणी कुठं जायचं आणि कुठं रहायचं...काय खायचं..पुन्ह्यांदा कसं उभं रहायचं काही काहीच कळत नाही.डोळ्यादेखत गल्ली,गाव,शहरं महापुरान वेढलेल्या पाण्याच्या पोटात.आभाळातन टिपून बघितल तर दिसेल ती पुराच्या लाल पाण्यात बुडालेली आमची सुखानं गजबजून जाणारी नगरी.नेहमी रहदारीनं गजबजून गेलेल्या लांबरुंद वाटा तुडुंब भरलेल्या पाण्याच्या पोटात शिरलेल्या.

                                 वरनं कोसळणार आभाळ किती झेलायचं आणि खाली गळ्याला आलेल्या पाण्यात जगणं कुठं शोधायचं..?जगण्या मरण्याच्या मधल्या तीरावर सोडून जातोस तू मेघराजा.आता होत्याचं नव्हतं झालं...काही नाही उरलं...कष्टानं उभं केलेलं सारं मातीमोल झालं..शेतातलं उभं पीक जमीनदोस्त झालं...पुराच्या पाण्यात वाहून गेलं... नासुन गेलं...कुजून गेलं.पै न पै साठवून ठेवल्यालं सारं सारं काही वाहून गेलं.प्रपंच सारा उघड्यावर आला...राजाचा रंक झाला...घराच्या चारी भिंती चारी बाजूला झाल्या...डोक्यावरचं छप्पर गळून पडलं..आणि काही  उरल्या सुरल्या मोडक्या तोडक्या घरात नुसता चिखल साचून राहिला..तसाच मनाच्या तळाशीही साऱ्या भावनांचा...स्वप्नांचा झालेला चिखल....निव्वळ आक्रोश जगणं हिरावून घेतलेल्या आमच्या दुर्दैवी माणसांचा...दुःखाच्या आघाताने उरातून फुटलेली अनावर किंकाळी...आता ती कुणी कुणाला ऐकवावी आणि कुणी कुणाची ऐकावी.

        पण मेघराजा आज माणूसचं माणसाला वाचवतोय..दुःखातून सावरण्यासाठी इथे माणुसकीचा हात पुढे सरसावतोय...मोडून पडलेल्याना वर उठवून लढण्याचं बळ देतोय.आता मंदिरात देव नाही तो देवच रोज भेटायला येतोय इथे माणसांच्या रूपातून.माणसामधल्या देवाचं इथं रोज दर्शन होतंय..आता आमचं दुःखण,गाऱ्हाणं त्यांच्यासमोरच मांडतोय आम्हीं..बा मेघराजा.. महापूर येतो आणि पुन्हा ओसरतोही.पण लक्षात ठेव इथे माणसातल्या माणुसकीचा आणि प्रेमाचा जो महापूर आहे ना तो अखंड वाहतोय.तो कधीच ओसरत नाही.आणि ओसरणारही नाही.


            - किरण सुभाष चव्हाण. 

८८०६७३७५२८.

गुरुवार, ६ मे, २०२१

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने.

 


'विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...'


                         गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेली कर्तृत्ववान मंडळी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत.त्या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. मी आपणा सर्वांचे आभार मानतो की,आपण सर्वजण शिक्षणक्षेत्रातील 'विनाअनुदानित' या  विषयावर नजीकच्या काळात येणाऱ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकासाठी सहभागी झाला आहात.या अनुषंगाने हा ग्रुप स्थापित करताना आतापर्यंत ग्रुपवर पुस्तकाची नोंदणी,माहिती व चर्चा होत राहिली..अशा उद्देशासह हा ग्रुप स्थापण्यामागचा मूळ उद्देश प्रामुख्याने आणखीन स्पष्टपणे उघड झाला पाहिजे असं मला वाटतं. गेली दोन महिन्यापासून माझे जिवलग सहकारी बंधू मनापासून पुस्तकाचा उद्देश ,हेतू सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता धडपडत आहेत.दरम्यान ही वाटचाल करताना सध्याच्या कोरोना महामारीचेही गडद सावट आहेचं.याची आम्हांला पूर्णपणे जाणीव आहे.ग्रुपचा प्रतिसाद लक्षात घेऊन शिक्षण, साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक ,प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील आणि समाजातील संवेदनशील मान्यवर समाविष्ट होत आहेत.मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटते की समाजाच्या उदात्त,उन्नत आणि समृद्ध अशा पोषक वातावरणासाठी धडपणारी,चांगुलपणाचा विचार पेरणारी आणि माणूस म्हणून जगताना आपला भोवताल अधिक सुंदर करणाऱ्या माणसांचा गोतावळा यानिमित्ताने एकत्र आला आहे.

              आणि म्हणून वेदनेचा संवेदनांशी मेळ घालून आपल्यात एक संवाद घडावा यासाठी ही सारी धडपड आहे. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक म्हणून असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघर्ष नसून या व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या एका माणसाचा तो संघर्ष आहे.' नेमका काय आहे हा संघर्ष..? काय आहे ही वेदना.? जाणून घेतलं तर निश्चितच इथल्या व्यवस्थेने समाजातील या घटकावर कशाप्रकारे अन्याय केला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अधिक बळकट केला आहे हे कळून येतं.

                            २० वर्षांपासूनचा संघर्ष, ,१६० पेक्षा अधिक आंदोलने,शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या,विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशी पोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक. प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं..? हा प्रश्न अनुत्तरितचं आहे.वर्तमानात कसं जगायचं आणि कसं जगवायचं.या दोन प्रश्नांशी लढत झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.

                   ही वेदना घेऊन जगणारे शिक्षक बंधू भगिनी या ग्रुपमध्ये आहेत.काही उदाहरणं द्यायची झाली तर जळगांवचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षे विनापगार आहेत,मंध्यतरीच्या काळात दोन्हीं किडन्या निकामी झाल्या.जिथे हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल.अशावेळी उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार.? अक्षरशः त्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन समाजात भीक मागून आपल्या गुरुसाठी निधी जमा केला.

                    एक विनाअनुदानित शिक्षक भगिनी भरल्या गळ्याने भावना व्यक्त करताना सांगते.या विनाअनुदानितच्या प्रश्नाने आमच्या पती-पत्नीत घटस्फोट होण्याची वेळ आली.आज विभक्त राहून विनापगार करताना सर आज लेकरांना दुकानातला साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हांला विचार करावा लागतो, स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो तर कुठे एका बापाने तर बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केली,अहमदनगरच्या आमच्या राम सोनवणे सरांचे आईवडील लेकाचा पगार कधी सुरू होईल या आशेवर जगताना झुरून मरून गेले. आजही १८ वर्षे झाली हा शिक्षक मुलगा  बिनपगारीचं.

                            सध्याच्या कोरोनाच्या काळात तर या विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था काय सांगावी...एका कोरोनाने क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालं हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांगते..१४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर कोरोनाने त्यांचे पती गेले.१७ वर्षे विनावेतन काम करून आता कुठे ४०% पगात खात्यावर जमा झाला होता.तो ही या कोरोनाने त्या शिक्षकाला बघू दिला नाही.आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना कोरोनाने अशा  परिवाराला दृष्ट लावली.क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विनाअनुदानितच्या विषयावर ज्यांची अलिखित पी.एचडी झाली म्हणायला हरकत नाही असे सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला पगारासाठी २० वर्षांचा संघर्ष करावा लागतो.अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाचं होत राहिली.प्रमोद पाटलांच्या सारखा एक विनाअनुदानित शिक्षक असणारा माणूस म्हणतो "मी भाग्यवान आहे कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे." किती वेडा माणूस असेल हा..विनाअनुदानित शिक्षकाच्या कुळीत जन्माला आला हे भाग्य मानतोय..पण याचं खरं कारण काय...तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं,त्यांना शाब्दिक,मानसिक आधार देणं...या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशाने वाचली तरी मी धन्य झालो..ही एक आंतरिक तळमळ...हा माणूस अखंड अश्रू ढाळतोय या आपल्या विनाअनुदानित शिक्षक बंधूभगिनींसाठी.

                किती सांगाव्या  एकेक वेदना..सगळीकडे अशा वेदनेची बचबच आहे.जखमेचा तर अंत कुठेच लागत नाही..कुठली वेदना पुढे करायची आणि कुठली मागे ठेवायची.कारण विनाअनुदानित संघर्षाच्या वेदनेची व्याप्ती आणि जखमेची खोली इतकी व्यापक आहे की ती अंशरूपानेचं मला पुस्तकात मांडत आली. अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं हे मला प्रामाणिकपणे कबूल करावे लागेल.मी या प्रश्नाकडे पाहताना आजही मनातून  अपुरेपणाच्या भावनेने अस्वस्थ आणि असमाधानी आहे.रोज अशा नव्या कहाण्या पुढे येतात एकापेक्षा एक कहाणी दर्दभऱ्या.

                          २० वर्षांचा हा अतोनात संघर्ष झेलताना आज या विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल हा संशोधनाचा विषय आहे.कारण या खचलेल्या,दुभंगलेल्या मानसिकतेचा मी स्वतः बळी ठरल्याने मला त्याची जाणीव आहे..एकंदरीतचं नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता,दबलेल्या,खचलेल्या मानसिक स्थितीने ग्रासून गेलेली अवस्था विनाअनुदानित शिक्षकांची आहे.आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड आणून चालत नाही.भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असले तरी आपल्या उणिवांचा त्याग करून आपल्या राष्ट्राची भावी पिढी सकस,पोषक आणि सदृढ बनवायची आहे ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.

                         एकूणच अशा गंभीरतेला गांभीर्याने जाणून घेऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या माणसांनी घेतली नाही हे एक दुर्दैवचं. कारण प्रश्नांशी बांधिलकी जपणारी नेतृत्वशीलता काळाच्या ओघात मागे पडत आहे. ज्या प्रश्नांकरिता आपण निवडून देतो ती माणसे आज प्रश्नांपेक्षा स्वतःला मोठी समजायला लागलीत.त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक न करता  प्रश्न अनुत्तरित ठेवायचा हा राजकीय स्वार्थ ही याला कारणीभूत आहे.पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनी आपली जिद्द न हारता चिकाटीने आजही आपल्या हक्काच्या अनुदानासाठी मैदानावरचा लढा कायम ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाहीच्या मार्गाने जाग आणण्याचं काम सुरूच आहे.

                 हे एकाबाजुला सुरू असताना एकंदरीतचं  २० वर्षांपासूनच्या या धगधगत्या संघर्षाची वाटचाल,त्याचे परिणाम यांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडताना ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पुस्तकरूपाने पोहोचावी.या वेदनेला संवेदनेची जोड मिळावी.दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा.त्यांचा आकांत,आर्जव या समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रातून एक सकारात्मक संवाद घडावा अशी अपेक्षा आहे.कारण माझा विश्वास आहे की,आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध व्हावं.अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी धडपडणारी

दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी समाजात माणसं आहेत.या चांगुलपणापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित संघर्षाच्या, दुःखाच्याप्रती समाजाची सहानुभूती अधिक बळकट होऊन यातून उमटणाऱ्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत.त्या या प्रश्नाला अधिक धारदार बनवतील आणि अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी महत्वाच्या ठरतील. म्हणून मी अधिक आशा ठेवून आहे की समाजातील आपल्यासारख्या चांगुलपणा जपणाऱ्या माणसांची अन्यायाच्या विरोधातली जरब आणि धाक निर्ढावलेल्या व्यवस्थेतील स्वार्थी,असंवेदनशील माणसांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही.

              

                      'गुरुवर्य काकाजी समूहातील सर्वच महनीय,वंदनीय अशा विभूतींच्या ठायी माझी हृदयपूर्वक नम्र विनंती आहे की, २० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षातून तावूनसुलाखून अजूनही या संघर्षात विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनीं आपल्या परिवारासह होरपळत आहेत.आपल्या शब्दांच्या संवादाचं नातं आपोआपचं त्यांच्या भळभळत्या जखमेची ओळख करून देईल.त्यांच्या अंतःकरणातील असहाय्य अव्यक्त वेदना कुणासमोर तरी मोकळ्या होऊ पाहताहेत. त्यामुळे आपल्यासारख्या प्रज्ञावंतांनी ओजस्वी शब्दांची फुंकर त्यांच्या जखमेवर घालून आपल्या प्रेरणादायी,उर्जादायी विचारांचं बळ त्यांना दिलं तर नव्या जोमाने लढण्याची आणि जगण्याची ऊर्मी त्यांना मिळून जाईल.'


            - किरण चव्हाण.

               ८८०६७३७५२८.

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

कविता - भूक. -किरण चव्हाण.

 


                                 भूक.


तिच्या दोनचार पैशांच्या वाटीचा तो खडखडाट प्रत्येकजण ऐकत होता.

पण तिला ना कुणाला त्याच काहीही वाटत नव्हतं.

कोवळ्या हातातील तो भला कितीदा ती न्याहाळायची.

आणि तसाच एकेक रुपया ती झोळीमध्ये टाकून द्यायची.

मुठीमधल्या त्या पैशांची गणितं तिला अजिबात मांडता येत नव्हती.

गोल बंद्या रुपयाशी ती फक्त खेळत असायची.

कोवळे गोबरे गाल,मऊशार ओठ किती सुदंर दिसत होती.

चमकणाऱ्या सोनेरी केसांची वेणी पण पार विस्कटून गेली होती.

सजली धजली असती तर गोडशी परीच शोभली असती

पण कुणाचं ठाऊक ती अशी असूनही ती तशी का दिसत नव्हती.

खेळण्या बागडण्याचं वय पण खांद्याला झोळी अडकलेली

पाणीदार डोळ्यातील तिची नजर सतत कुणाला तरी न्याहाळणारी.

माणसांच्या मागे धावून ती अनेकदा थकून जायची.

पण येणाजाणाऱ्यांच्या पुढे ती पुन्हां पुन्हां हात पसरायची.

वाटीत पडणारा एकेक पैसा पाहून ती खूप आनंदीत व्हायची

आणि आनंदाच्या भरात वाटीमधला पैसा ती हवेत उडवायची.

लोकांनी तिच्या वाटीत टाकलेला एकेक पैसा म्हणजे तिला घातलेली भीक होती.

पण यातलं तिला काहीही कळत नव्हतं ना याच्याशी तिला काहीही देणंघेणं नव्हतं.

कारण कोवळ्या वयाच्या पोटात मात्र एकच भूक होती.


रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

सजा-ए मौत -किरण चव्हाण.

 


'पुलवामा में हमारे वीर जवानों पर उन गद्दारों ने पीठ पीछे हमला किया और बड़ी संख्या में हमारे वीर जवान शहीद हो गए उन शहीद जवानों के भावपूर्ण आदरांजली और उनके प्रति ये रचना समर्पित..'

 'सजा-ए -मौत'


ए दहशतवादी गद्दार साले पीठ पीछे  वार करते है |

अरे हमारे मुल्क में मच्छर भी सामने से काटते है |

 कैसे कहूँ दुर्भाग्य है उस धरती का जिसमे पैदा हुई ऐसी जिंदा लाशें |

हमारे गटर में पैदा हुए किडे-मकोडे भी है तुमसे बेहतर |

तुम जिंदा मुर्दों की बात क्या करें, तुम तो मानव जाती पर कलंक हो |

क्या औकात हैं तुम्हारी ? कभी पूछो अपने जन्म देने वाली माँ को, शरम आती होगी,पछताई होगी अपने आप पर जो पैदा हुआ ऐसा पाप अपनी कोकसें |

किसी कोने में छीपकर हमें धमकाने वाले..नहीं हम कुछ नहीं कहेंगे |

क्योंकी तुम्हे मालूम है,खुद अपने आपको तुम हो डरपोक 

अपनी दुम टांगो में लेकर किसी आडसे भौंकनेवाले...

अरे हमारे घर के पालतू कुत्तेभी ईमानदारीसे जीते हैं और सामनेसे भौंकते हैं |

सामने आने की हिम्मत नही होती इसलिए पीछे से आते हो बार बार, पीठ पर वार करने की आदतें हैं तुम्हारी नामर्दो..

क्योंकी तुम्हें मालूम है,हाथ में बंदूक जरूर होती है पर मन मे वो हिम्मत नहीं |

बम गोलियोंकी ढाल बनाते है पर सीने मे वो धैर्य नहीं |

किसीके टुकडों पर पलनेवाले हरामी टुकड़ो की बाते करते है |

सामने आने की हिम्मत नही डरते है क्योंकि उन्हें मालूम है 

यह अपने टुकडे टुकडे करके जमीन में गाड़ देते है |

इसलिए पीछेसे वार करतें हैं पर तुम क्या मारोगे हमें..

हम तो इस मिट्टी के लिए जीते हैं |

इस देश की मिट्टी के रज-कण में समाया हैं हमारा प्राण.

हम जीते हैं अभिमान से इस मिट्टी के लिए और मरते हैं कहाँ |

बलिदान देते है इस मिट्टी के वास्ते |

 देश कि मिट्टी हमारा प्राण है | हमारें देश के लिए हमारा तन-मन -धन अर्पण है |

 तुम हमें मारते नहीं,हम खुद हमारी धरती माँ के लिये मिटने को तैयार रहते है |

 तुम क्या मारोगे हमें  हमारी शहादत हमें  अमर बना देती हैं |

हमारे बलिदानी खून के एक एक बूंद से तैयार होते हैं नौजवान  हमारे देश की रक्षा के लिए |

कितनो को मारोगे तुम तुम्हारे जैसे टुकड़ो में नहीं बटे हम |

बल्की हम एक है और बलिदान पर खडा हुआ सारा ए देश हैं |

और इस देश ने ही सिखाया है हमें देश पर मर मिटने के लिए |

हम डरते नही किसी से,लढते है खडे होकर सामने से सामना करने  का हौसला रख कर |

एक बार सिर्फ एक बार हमसे आमने-सामने का मुकाबला करके देखों,

माँ कसम तुम्हारी रूह भी अंदर से कांप उठेगी

अब वो दिन दूर नहीं गिनते रहो.. इंतजार की घड़ी पल-पल तुम्हारी मौत नजदीक ले आएगी..|

बदला तो जरूर लेंगे..

पीछे से वार करनेवालों.. तैयार रहना पीछे से नहीं सामने से तुम्हारी मौत चलकर आएगी |

सर्जिकल स्ट्राईक तो एक ट्रेलर था |

अब सजा-ए- मौत पूरी की पूरी होगी |

                      जय हिंद ! वन्दे मातरम !!


-किरण चव्हाण

८८०६७३७५२८.

--------------------------------------------------------


शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

ग्रेट भेट-उर्जानिर्मिती क्षेत्रातील पल्लवी यादव यांच्याशी संवाद..- किरण चव्हाण.




ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

           ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सध्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या समुद्रातील खनिज तेल,नैसर्गिक वायू अशा ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एक महिला म्हणून यशस्वी कार्य केले. १२० वर्ष जुन्या असलेल्या व ऑइल क्षेत्रात मोठं नाव असलेल्या जागतिक नामांकन 'बेकर ह्युजेस' या कंपनीत २००६ पासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.समुद्रात राहून समुद्रतळाच्या खाली तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रीलिंग करून समुद्राच्या पोटातील कच्चे तेल उपसले जाते अशा ठिकाणी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे अचुकरित्या शोधणे हे अशा महत्वाच्या कामाची जबाबदारी पल्लवी यांच्याकडे होती.हे काम सलग करावे लागते अशावेळी अनेक अडचणी व आव्हानांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. आजपर्यंत त्यांनी इराक,कतार, युनायटेड अरब अमराती अशा आखाती देशामध्ये काम केले आहे.इराकमध्ये असताना ऑइल रिगवर एकटीच महिला इंजिनिअर म्हणून त्या काम करीत होत्या त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने एक महिला उर्जानिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.या उत्सुकतेपोटी त्यांना बघायला खास चीनवरून मान्यवर लोक बघायला आले होते.


त्याचबरोबर त्यांना वाचनाची आणि विशेषतः मोटाररेसिंगची अतिशय आवड आहे.चंदीगड येथे पुरुष स्पर्धकांना हरवून कार रेसच्या अमॅच्युर कॅटेगरीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता त्यावेळी तेथील कॅबिनेट मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांनी त्यांचा गौरव केला होता.



अशा कोल्हापूरच्या रांगड्या मातीत जन्मलेल्या आणि कर्तृत्वाची उत्तुंग झेप घेतलेल्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याचा योग आला. त्यांनी आमच्या माध्यमिक विद्यालय कळंबा पाचगांव ता-करवीर,जि-कोल्हापूर शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खास मुंबईवरून त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.

 इयत्ता सातवीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकात नैसर्गिक साधनसंपत्ती या पाठामध्ये खनिजतेल,दगडी कोळसा,नैसर्गिक वायू याविषयीचा अभ्यासघटक अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या खनिजसंपत्ती यावर आधारित विद्यार्थ्यांना आणखीन सखोल व वस्तुनिष्ठ माहिती मिळावी यासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक किरण चव्हाण यांनी ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या पल्लवी यादव यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. यावेळी पल्लवी दीदीने विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत  ओघवत्या वाणीने दीड तास मार्गदर्शन केले. ऊर्जानिर्मिती प्रक्रिया,खनिजतेल उपसा प्रक्रिया तेथील कामाची पद्धत, आव्हाने,खनिजतेलाचे महत्व व ते भविष्यातील वापर.आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खनिज संपत्तीचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व आणि हे खनिज साठे संपुष्टात आले तर आपले मानवी जीवन कसे संपुष्टात येऊ शकते याविषयी सखोल माहिती सांगितली विशेषतः या ऊर्जानिर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागणारी पात्रता व संधी याविषयी त्यांनी प्रेरणादायी माहिती दिली. 


विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील प्रश्न पल्लवी दीदीला विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. अशा मनमोकळ्या संवादामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पल्लवी दीदीला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्याला दीदीने अवश्य भेटण्याचे आश्वासन दिले. एकंदरीत विज्ञान विषयासाठीचा हा उपक्रम यशस्वी झाला.हा ऑनलाईन संवाद घडवून आणण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानस्नेही शिक्षक श्री. आर.पी.सुतार सर तसेच सौ.दिपाली चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले.तर या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक व्ही.बी. ठाकूर सर यांची प्रेरणा मिळाली.

---------------------------------------------------------

Dear chavan sir...

           ...आज सोनेरी क्षण होता माझ्यासाठी. आजपर्यंत कॉलेज लेव्हलच्या अडल्ट स्टुडन्टना मी मार्गदर्शन केल आहे.पण आज एवढ्या छोट्या स्टुडन्टनी या विषयांमध्ये एवढा इंटरेस्ट घेऊन माझ्याशी संवाद साधला आहे त्यावरून.

 I am very impressed and very grateful.

आभार तर मी मानतेय की, शाळेचे छोटे-छोटे विद्यार्थीसुद्धा एवढे जागृकतेने करिअरचा विचार करतायेत.तुम्ही एक शिक्षक म्हणून खूप छान काम करता आहात. 

Thank you very much

मला तुमच्या शाळेला एकदा व्हिजिट करायला आवडेल अगदी सहज म्हणून कधीतरी.

Permit me to visit..

Thank you very much.


Best regards,

Pallavi Yadav.

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

गांव विकताना पाहिला - किरण चव्हाण.

 


                       गांव विकताना पाहिला


दिवसाढवळ्या  लोकशाहीचा उदो उदो पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.?

अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला.


तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.?

हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल.

मी काय कमी वाटलो का काय..?


मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत.

हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत..


दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती.

खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती.


दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला.

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा.

सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला.


आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी जान कुर्बान करायचीत इथं माणसं.

आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी आज स्वतःलाच विकायला तयार झालीत माणसं.


भंडारा उचलायचे इथे एकेकाळी हर हर महादेवाच्या घोषात मातीच्या इमानासाठी आमचे जिगरबाज मावळे

आणि आज स्वार्थासाठी देवालाचं गहाण टाकून चोरी छुपे उचलतायत भंडारा बेईमान कावळे.


आयुष्य वेचलं की रे घरादारावर तुळशीपत्र ठेऊन त्या महान लोकांनी या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

आणि आपल्याचं स्वार्थासाठी निष्ठा विकून तुम्हीं स्वतःला एवढं कवडीमोल होऊ दिलं.


अरे तरुणांनो,तुमच्या वयाचे असताना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेलेत या देशासाठी.

का सळसळत नाही असं तुमचं ताजं रक्त निदान गावासाठी तरी?

जिवंतपणीच बांधलं की रे कफन डोक्याला त्यांनी या मातीसाठी.

आणि तुम्हीं कुणाच्या पैशाची बाटली ओठाला लावून तरुण रक्ताला बाटवताय कुणासाठी..?


सत्ताच पाहिजे आहे,गावचा विकास-प्रगती करायची आहे

मग त्यासाठी का तुम्हाला पैशाचा एवढा खेळ करावा लागला..?

आणि पाच वर्षांसाठी लोकांचा विश्वास तुम्हांला विकत घ्यावा लागला ?

घेणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनीही बघा कसा सत्तेसाठी घोडेबाजार मांडला.


आणि रात्रीच माझा गांव मी विकताना पाहिला.


दिवसाढवळ्या लोकशाहीचा उदो उदो...

लोकशाही.. लोकशाही.. लोकशाही...

कुठली लोकशाही....?


रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटताना पाहिला

आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला.


 - किरण सुभाष चव्हाण.

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

'असावे सुंदर असे माझे गांव.'-किरण चव्हाण.

 


(देवा तुझे किती सुंदर आकाश या गीताच्या चालीवर)


'असावे सुंदर असे माझे गांव.'


असावे सुंदर असे माझे गाव

गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं


नको कुणी दुःखी असो सर्व सुखी 

गोड वाचा असो सर्वांमुखी


गरीब श्रीमंत नको भेदभाव

सर्वांभूती असो समभाव


आपणची ठेऊ गावची स्वच्छता 

दिसावी सर्वांना सुंदरता


गावाचा विकास मिळुनी करूया 

आम्हीं प्रगतीची कास धरूया


लहानांची कदर मोठ्यांचा आदर

एकत्र कुटूंब तेचि सुखी घर


गुणी सज्जनांचा असो अधिवास

करावा उपदेश सकळ जनास


अवघाची गांव एकीने नांदावं

समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.

रविवार, ३ जानेवारी, २०२१

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.



'जलतरणामध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी भारताची जलतरणपटू जलकन्या कांचनमाला पांडे- देशमुख.'


                                       ती एक लाट बेधुंदपणे पाण्यावर स्वार होऊन यशाचा किनारा गाठणारी. तिचं नी पाण्याचं जिव्हाळ्याचं अतूट घट्ट नातं.तिनं आत्मविश्वासाने  झेपावं आणि कवेत घ्यावं पाण्याने तिलाही.पाण्याच्या पाठकुळीवर स्वार होऊन पादाक्रांत केलीत तिने यशाची अनेक शिखरे... रचलाय एक नवा इतिहास.साकारलाय अद्वितीय विजय.स्वतःच्या दृष्टीहीनतेवर मात करत देशाच्या जलतरणाला जागतिक स्तरावर जिने एक नवी दृष्टी दिलीय.मनातल्या स्वप्नांना सत्यात उतरवताना त्या प्रत्येक स्वप्नांना लाभलाय प्रत्येक वेळी यशाचा किनारा...प्रखर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने पार केलाय भवसिंधु...स्वप्नांच्या मागे पोहताना ती आता पोहोचलीय सातासमुद्रापार. तिला माहितीचं नाहीं कधी थांबणं. आणि तिला कोणी थांबवूही शकत नाही..तिनं गाठलाय आता आयुष्यातला सुवर्णमयीक्षण.येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना झुगारून देत तिने अखेर सिद्ध केलंय स्वतःला.अशा या लाटेने आज गाठलाय सर्वोच्च यशाचा किनारा. जलतरणमध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी जलपरी जलपरी भारताची जलतरणपटू सागरकन्या अर्थात कांचनमाला पांडे-देशमुख.       

                                      भारताची सागरकन्या म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं,अशा कांचनमालाचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे ३१ डिसेंबर १९९० रोजी झाला.वडील श्री. ज्ञानेश्वर पांडे व आई सौ.हिरुताई पांडे .कांचनमालासह एकूण पाच भावंडे.चौघी बहिणी व एक भाऊ.एकत्र कुटुंबात तिचे लहानपण गेले.नियतीने घोर अन्याय करूनच कांचनमाला व तिच्या आणखीन एका बहिणीला जन्माला घातलं. ते म्हणजे कांचनमालासह एक बहीण जन्मतः अंध आहे.पण या घटनेने तिचे आईवडील जराही डगमगले नाहीत.६ वर्षांची असताना कांचनमालाला अंधमुलांच्या शाळेत घातलं गेलं.सर्वसाधारण मुलांप्रमाणे तिला मैदानात खेळता येणार नव्हते पण म्हणतात ना,' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.' लहानपणापासून कांचनमालाला पाण्याशी अटॅचमेंट(जवळीकता) होती..हे ओळखूनचं  वडिलांनी सुरुवातीला तिच्या शारीरिक व्यायामासाठी वयाच्या १० व्या वर्षी  ५ वीत असताना  स्विमिंग शिकायला घातले.पण तेंव्हा आजूबाजूच्या लोकांनी कांचनमालाच्या वडिलांना अक्षरशः वेड्यात काढलं. लोक म्हणायचे.."काय मूर्ख आहे हिचा बाप..आंधळ्या मुलगीला स्विमिंग शिकवतोय..आहे केवढीशी ही पोर..? कुठे बुडून मेली तर..?" असतात असे लोक 'ना घेणं ना देणं.:.तिच्या घरच्यांपेक्षा यांनाच तिची जास्त काळजी म्हणायची.पण बाबांनी ते बोलणं मनावर घेतलं नाही.लोक काय म्हणतात यांकडे साफ दुर्लक्ष केलं.आणि जिथे स्विमिंग शिकायला इतरांना महिना लागतो आश्चर्य म्हणजे तिथे फक्त आठच दिवसात कांचनमाला स्विमिंग शिकली.

                                                    ..मग पुढे माहिती कळत गेली की,स्विमिंग कॉम्पिटेशन असतात.त्यामध्ये सहभागी व्हायचे ठरवले. वयाच्या १० व्या वर्षांपासून तिने स्विमिंग स्पर्धेला सुरुवात केली. प्रथम जिल्हा पातळीवर नॉर्मल (डोळस) मुलांबरोबर स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात कांचनमालाने पहिला क्रमांक पटकावला.इथून जी यशाला सुरुवात झाली त्यानंतर तिने कधीच मागे पाहिलं नाही.त्यानंतर स्टेट लेव्हल ( राज्य पातळीवर) स्विमिंगमध्ये सहभाग घ्यायचे ठरले मात्र तिथे गेल्यानंतर DSO (district sport officer) यांनी या स्पर्धेत कांचनमालाला सहभागी होण्यास नकार दिला.कारण ही अंध मुलगी नॉर्मल मुलांच्यासोबत कशी सहभागी होणार..? एखाद्यावेळी पाण्यात बुडाली म्हणजे..? ही त्यांना भीती.पण बाबांनी त्यांना बऱ्याच विनवण्या केल्या. त्यांना विश्वास दिला की, एकदा तिचा इव्हेंट पहा मग निर्णय घ्या...असे म्हटल्यावर आदल्या दिवशी त्यांनी कांचनमालाचा इव्हेंट पाहिला आणि मगच परवानगी दिली.. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत कांचनमालाने नॉर्मल मुलांबरोबर तिसरा क्रमांक प्राप्त केला.आणि मग खऱ्या अर्थाने इथून स्विमिंग करिअर मधील मोठी स्वप्नं तिला खुणावू लागली..मिळालेल्या यशाने स्वप्नांच्याकडे भरारी घेण्यासाठी आत्मविश्वासाचे बळ दिले.

                                           एका बाजूला अभ्यास तर दुसऱ्या बाजूला स्विमिंग खेळात करिअरची करण्याची ,जिद्द.सकाळी २ तास स्विमिंगचा सराव , त्यानंतर दिवसभर शाळा, शाळेतून घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळी दोन तासाचा स्विमिंग सराव,शाळेचा अभ्यास आणि मग झोपणे असा दिनक्रम.म्हणजे एकीकडे स्विमिंगचा सराव सुरू असताना  दुसरीकडे अभ्यासाकडेही ती तेवढेच लक्ष द्यायची.एकीकडे आपला खेळ तर दुसऱ्या बाजूला आपला अभ्यास या दोन्हीं गोष्टींना कांचनमाला न्याय देत होती.स्विमिंगचा सराव जोरदारपणे सुरू होता.प्रत्येक स्पर्धा ही कांचनमालासाठी घवघवीत यश मिळवून देत होती. जिल्हा..राज्य पातळीवरून आता राष्ट्रीय पातळीवर यशाच्या घौडदौडीने मजल मारलेली.वयाच्या ११ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील स्विमिंग स्पर्धेत भाग घेऊन तिने पहिलं नॅशनल मेडल घेतलं.राष्ट्रीय पातळीवर हा तिने पहिलाच विजय साकारला होता.त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या यशाने मनातील आत्मविश्वास वाढला होता..म्हणून आणखीन एक आव्हान पेलण्याचा, एक भव्य-दिव्य स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला.तो म्हणजे  समुद्र जलतरण 'सी स्विमिंग' अरबी समुद्रात पोहायचं.

                                          समुद्रात पोहणं ही खरीच सोपी गोष्ट नव्हती.११ वर्षांचं कोवळं वय.समुद्रात पोहोण्याचा हा पहिलावहिला अनुभव असणार होता.पण मनात प्रखर जिद्द,प्रचंड आत्मविश्वास ठासून भरलेला. मूळचा अंधपणाही कुठे आड येणार नव्हता आणि ठरलं या यशाला गवसणी घालायची. सुरू झाली मेहनत त्या दिशेने.सरावासाठी पहिल्यांदा समुद्रात उतरल्यानंतर खुप भीती वाटायची.कारण या आगोदर तिला कधीच समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा अनुभव नव्हता.त्यामुळे पहिल्यांदाच  कांचनमाला समुद्राच्या पाण्यात उतरली तेंव्हा अक्षरशः ती जोरजोरात ओरडली होती.. कारण समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा हा पहिलाच अनुभव होता...डोळ्यांनी काही दिसत नसल्यामुळे काहीच कळायचं नाही.पाण्यातील छोटे छोटे मासे.. कचरा अंगाला लागल्यानंतर आणखीनचं भीती वाढायची.. पण स्विमिंग प्रशिक्षक (कोच) आणि बाबां तिला धीर द्यायचे..कोचनी आपल्या  हाताने समुद्रातील त्या वस्तू दाखवून तिच्या मनातील भीती कमी करायचा प्रयत्न केला.अशाप्रकारे  सराव सुरू झाला.पहिल्यांदा दोन तासांचा सराव त्यानंतर पाच तासांवर आला.नॉनस्टॉप स्विमिंग करायचे होते.जिद्दीने प्रॅक्टिस सुरू होती.रात्री ८ वाजता पाण्यात उतरल्यावर बाहेर येण्यासाठी १२-१ वाजायचे..समुद्रात  प्रॅक्टिस करताना पाण्यात मध्येच थांबून पाणी प्यायचा सराव करायचा.त्याचबरोबर सोबत असणारे बाबा आणि कोच लांबून कॅटबरी टाकायचे ती झेलून ते चॉकलेट खायचे..अर्धेअधिक खाली पडायचे. ही प्रॅक्टिस एवढ्यासाठी असायची की,समुद्रात पोहताना तोंड खारे होते.तसेच शरीरातील शुगरचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची गरज भरून काढण्यासाठी चॉकलेट खावे लागायचे.

                                          १ मार्च २००२ ची अरबी समुद्रातील ती समुद्र जलतरण (सी-स्विमिंगची) ती स्पर्धा.वयाच्या ११ व्या वर्षी या स्पर्धेत कांचनमालाने सहभाग घेतला..एवढीशी चिमुकली पोर जिंकण्याच्या प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर हे कडवे आव्हान घेऊन त्या अवाढव्य सागरावर स्वार झाली.त्या समुद्राच्या पाण्यावर.उसळत्या उमद्या लाटेसारखी पाण्याशी दोन हात करून ती सरसावू लागली पुढे पुढे.पाण्याची एकेक लाट आव्हान बनून तिच्यासमोर येत होती आणि तिला मागे सारून कांचनमाला पुढे जात होती..आणि अशावेळी संकटं समोर न येतील तरच नवल..अचानक एक संकट शेवटी उभं ठाकलंच..तिची कठोर परीक्षा घेण्यासाठीच एक लाट तिच्या दिशेनं आली. त्या लाटेत कांचनमाला पूर्णपणे अडकली...भिरभिरत्या भोवऱ्यात एखादी नाव अडकावी तस झालं..तिला पुढेही जाता येईना आणि मागेही जात येईना...कितीही हात पाय मारले तरी ती तिथेच तरंगायची आणि हात पाय मारायचे बंद केले की,मागे सरकायची...नाका तोंडात पाणी जात होतं..पाण्यात अंतराळी पाय..त्यामुळे बुडण्याची शक्यता अधिक होती..आता आपण बुडणार.. अशीच सगळी अवस्था.. चारी बाजूने लाटा संकट बनून आलेल्या..धीर खचला..काय करावं..? पाण्यावर तग धरून राहण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू झाला.जीव घुटमळला.ती आता रडायला लागली..आता नाही.. मला हे आव्हान पेलण शक्य नाही..मनात विचार आला की, सोडून द्यावं.. तसे तर काही अडचण आल्यास हात वर करण्यास सांगितले होते म्हणजे आपत्कालीन बोट सोबत होतीच..लगेच त्यांनी बोटेत घेतलं असतं...पण खरंच का आपण आता हार मानायची..? पण दुसरा एक सकारात्मक विचार मनात आला की, इथपर्यंत येण्यासाठी आपण किती मेहनत घेतलीय..माझ्या आईवडिलांनी माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी किती मेहनत घेतलीय..आपण ज्यावेळी स्विमिंगला सुरुवात केली होती तेंव्हा लोक काय म्हणायचे..'एका अंध मुलीला स्विमिंगला घातल्याबद्दल लोकांनी आईवडिलांना मूर्खात काढलं होतं..लोकांची ती नकारात्मक प्रतिक्रिया तिला त्यावेळी आठवली..आणि मनानं पक्कं केलं की काही नाही आपण जर हरलो तर या सर्वांच्यावर पाणी फिरणार आहे पण आपण जर हे अंतर पूर्ण केलं तर असा एक विक्रम होईल की, जो आजपर्यंत कोणीच केला नाही.समुद्रात पोहुन एवढे अंतर पार करणारी आपण भारतातील पहिली महिला ठरू.आणि या विचारगतीने मनाला ऊर्जा मिळाली.सगळी शक्ती पणाला लावून ती पुन्हा नव्या तडफेने त्या उसळत्या सागरावर स्वार झाली.आणि जलदगतीने स्विमिंग करत ५ किलोमीटरचे अंतर १ तास १४ मिनिटांत तिने पूर्ण केले.अवघ्या ११ व्या वर्षी कांचनमलाने एक नवा इतिहास रचला.समुद्रात पोहून सात किलोमीटर अंतर पार करणारी भारतातील ती पहिली महिला ठरली.अवघ्या देशवासियांची हृदये या तिच्या पराक्रमाने भारावून गेली..या विजयाने एक नवी ओळख कांचनमालाला मिळाली..'भारताची जलकन्या.' कांचनमालाने केलेल्या या विक्रमाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

                                           इथून जी कांचनमालाने भरारी घेतली ती भव्यदिव्य अशी गरुड झेपच होती.त्याच्यानंतर कांचनमाला स्विमिंगच्या प्रत्येक कॉम्पिटेशनमध्ये सातत्याने जिंकत गेली.जे लोक सुरुवातीला 'ही आंधळी मुलगी स्विमिंग कशी शिकणार..?' असं म्हणणारे आणि आईवडिलांना मूर्खात काढणारे होते आता तेच तिला डोक्यावर घेत होते.म्हणजे बघा ना..! समाजात लोक कसे असतात,सुरुवातीला नुसत्या  उणीवा शोधत राहायचं,आपल्यातल्या कमीपणाला सतत अधोरेखित करायचं पण कांचनमाला आणि तिच्या परिवाराने या लोकांकडे कधीच लक्ष दिले नाही..लक्ष दिलं असतं तर कदाचित त्या लोकांच्या मनासारखं झालं असतं..अशा लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नसतं.. आपलं लक्ष फक्त एकच स्वतःला सिद्ध करून दाखवणं... आपलं जे ध्येय ठरले आहे त्याचा पाठलाग करत राहणं.. आणि तेच कांचनमालाने केलं..स्वतःला सिद्ध करून दाखवलं. म्हणून तर काल तिला हिनवणारे लोक आज तिला डोक्यावर घेऊन मिरवायला लागले.तिचा जयजयकार करू लागले...म्हणतात ना.'कुछ किये बिना ही जयजयकार नहीं होती कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती'...या ओळींचा आता खऱ्या अर्थाने  अनुभव येत होता.स्वतःला हरु न देता शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणं त्यातच यशाचं गम्य दडलेलं असतं.आणि हे गम्य तिला सापडलं होतं..एवढ्यावरतीच तिला थांबायचं नव्हतं..आता तिला आणखीन यशाची उंच उंच शिखरे खुणावत होती. त्याला गवसणी घालण्यासाठी  प्रथमच कांचनमालाने देशाबाहेर पहिले पाऊल टाकले.

                             २००६ साली दहावीत असताना ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेमसाठी तिची निवड झाली.आणि झालं असं की १० वी ची परीक्षा सुरू होणार त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला जाण्याची फ्लाईट होती.पण परीक्षा नंतर देता येईल असा विचार करून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला.प्रथमच देशाबाहेर जाणार असल्याने आणि वय लहान व अंध असल्याने घरच्या एका व्यक्तीला सोबत जाण्यासाठी परवानगी मागितली पण ती नाकारण्यात आली त्याऐवजी.भारत सरकातर्फे ऑस्ट्रेलियाला जाताना कांचनमालाला लेडी एस्कॉर्ट म्हणजे  केअर टेकर  देण्यात आली..जी २४ तास तिच्यासोबत राहणार होती.ही पहिली आणि शेवटची लेडी एस्कॉर्ट यानंतर भारताबाहेर जाताना तिला एकटीलाच जावं लागलं.. पण हे तिच्यासाठी वरदान ठरलं.याचा तिला एक असा फायदा झाला की, कुठेही वावरण्याचा एक आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. पहिल्यांदाचं कांचनमालाने यशाला गवसणी घालण्यासाठी भारताबाहेर झेप घेतली..ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारतातून कांचनमाला ही एकमेव अंध मुलगी म्हणून सहभागी झाली होती.७१ देशांतील स्पर्धकांनी स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये सहभाग घेतला होता. सगळे स्पर्धक डोळस होते..फक्त आपल्या भारताची कांचनमाला ही एकटीच अंध मुलगी त्यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणार होती.अर्थात अंध असूनही एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवर स्पर्धेत सहभागी होते आहे याचे तिच्या इतर स्पर्धकांबरोबर अनेकांना अप्रुप वाटत होतं..७१ स्पर्धकांसोबत कांचनमाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार झाली पूर्ण जोमाने स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली. आणि जागतिक क्रमवारीत (world ranking)  ६ व्या स्थानी आली.आतापर्यंत यशाची चव चाखली होती पण इथे मात्र अपयशाचा कडवटपणा वाट्याला आला होता..जिंकण्याची एक सवय लागली होती पण पहिल्यांदाच पराभवाने धक्का दिला होता.हे अपयश तिच्या मनाला चांगलेच जिव्हारी लागले. दुःखवेगाने अश्रूही कोसळले..पण  अपयशाने खचून न जाता कांचनमालाने या अपयशाला गुरुस्थानी मानले..जीवनात काहीवेळा अपयशही यावं लागतं तेंव्हाच यशाची खरी किंमत कळते..पण या  अपयशाने पुढच्या यशासाठी एक नवी ऊर्जा दिली..स्वतःमधील चुका,उणिवा शोधण्याची संधी दिली.आणि कांचनमाला पुन्हा नव्याने उभा राहिली.आणि त्याचवर्षी नोव्हेंबर २००६ साली मलेशियाला पॅराएशियन गेम होत्या त्यामध्ये तिला पुन्हा संधी मिळाली.कॉम्पिटेशनमध्ये कांचनमाला सहभागी झाली तिच्यासोबत चायनीज स्पर्धक होते.या इव्हेंटमध्ये शेवटपर्यंत भारताला एकही पदक मिळाले नव्हते..त्यामुळे साहजिकच तिच्याबद्दल संपूर्ण देशाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.देशवासीयांच्या अपेक्षांचं तिने टेन्शन  कधीच घेतलं नाही उलट या अपेक्षा तिच्या कामगिरीसाठी तिला सकारात्मक ऊर्जा द्यायच्या...या कॉम्पिटेशनमध्ये भाग घेताना मनात एक विचार पक्का केला होता की, कोणत्याही परिस्थितीत भारताला गोल्ड मेडल जिंकून द्यायचं.. त्यासाठी 'करो या मरो' ची मनात जिद्द ठेवली होती..आदल्या रात्री एका मिनिटासाठीही ती झोपली नव्हती..मनात फक्त एकच ध्यास ही स्पर्धा आपणच जिंकायची...आणि कांचनमालाचा इव्हेंट सुरू झाला.  तो इव्हेंट तिने इतका फास्ट मारला की, ज्यावेळी ते अंतर पूर्ण करून कांचनमाला थांबली त्यावेळी तिच्या तळपायातून आग आग होत होती..तिचे शरीर अक्षरशः एवढे थकले होते की,तिथून बाहेर यायचीसुद्धा ताकद तिच्यात राहिली नव्हती..दोन व्यक्तींनी तिला उचलून बाहेर घेतलं...शेवटी याचा परिणाम...? कांचनमालाने आपल्या भारताला स्विमिंगमधलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.अभूतपूर्व यशाचा आणखीन एक इतिहास तिने रचला. 

                                देशाचं प्रतिनिधित्व करताना एक अनुभव असा राहिला की,२००८ ला जर्मनी बर्लिनला ऑलम्पिकसाठी बिल्डप टोनामेंट होत्या.तिथल्या  स्विमिंग इव्हेंटमध्ये एका ब्राझीलीयन कोचने कांचनमालाचा परफॉर्मन्स पाहिला आणि ते प्रभावित झाले.त्यांनी कांचनमालाला ऑफर दिली की, "तू आमच्या देशाकडून या खेळाचं प्रतिनिधित्व करशील का..? आम्हीं तुला आमच्या देशाचं नागरिकत्व देऊ..सर्व सोयीसुविधा देऊ.एवढंच नव्हे भारतातून येण्याचा विमानप्रवासाचा खर्चही आम्हीं देऊ.." पण कांचनमालाने ती ऑफर तिथेच नाकारली. काहीही असो पण मी माझ्या देशाकडून खेळणार आहे..मी फक्त माझ्याच देशाचं प्रतिनिधित्व करणार.आहे.म्हणजे एका खेळाडूच्या मनात आपल्या देशाविषयी किती मोठा स्वाभिमान असतो हे कांचनमालाच्या या उदाहरणातून कळते. 

                                  २००८ साली डिसेबल लोकांसाठी असणाऱ्या बिझिंग पॅराऑलम्पिकसाठी कांचनमालाची निवड झाली होती.कॉम्पिटेशनमध्ये कॉलीफायही झाली..इथेही या कॉम्पिटेशनमध्ये निवड होणारी ती पहिलीच भारतीय होती.म्हणजे एका अर्थानं कांचनमाला जिथे जिथे यश मिळवत होती तिथे पहिल्यावहिल्या विक्रमाची नोंद होत होती...पॅराऑलम्पिकसाठी निवड झाली इथपर्यंत सर्व ठीक असताना अचानक एका अडथळ्याने आशेची निराशा झाली.ती म्हणजे काही तांत्रिक बाबींमुळे या स्पर्धेत भारताला स्वीमरसाठी कोटाच मिळाला नाही. त्यामुळे भारतातून जलतरणपटू (स्वीमर) या..पॅराऑलम्पिकसाठी  जाऊ शकणार नव्हते...अर्थात त्यामुळे कांचनमालाही या टोनामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हती... ऑलम्पिक म्हणजे खेळाडूंची पंढरी समजली जाते.एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने  खेळात हार पत्करावी लागली तरी एवढं वाईट वाटत नाही पण आपली पात्रता असताना आपण खेळायला जाण्यासाठी सज्ज झालो असताना आपल्याला तिथे सिद्ध करण्याची संधी मिळू नये याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं..? आणि अशाप्रकारामुळे कांचनमाला मुळातून हादरली. आता पुढे काय करायचं तिला सुचेना..मनाचा समतोल ढासळला..विचारचं खुंटले. आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.कांचनमालाच्या जीवनातला हा सर्वात वाईट काळ होता.. पॅराऑलम्पिकमध्ये आपण जाऊ शकत नाही..आता संपलं सगळं असंच सतत मनाला वाटू लागलं. ती गर्भगळीत झाली.आणि मनानं एक अविचारी निर्णय घेतला..तो म्हणजे आत्महत्येचा.जीवनच संपवण्याचा.

                      त्या रात्री आपल्या स्वतंत्र बेडरूममध्ये ती याच विचारात मश्गुल होती..मरायचं आहे तर मग मरण्याचा सोपा मार्ग म्हणून हाताची नस कापून मरायचं अस ठरवलं.त्यासाठी ब्लेडही जवळ घेतलं..ब्रेललिपीमध्ये एक सुसाईड नोट लिहिली.डोळ्यांतल्या कळीकाळाच्या अंधारात तिने कोवळेपणात आपली स्वप्नं रुजवली होती..ती साकारली, आकारालाही आणली होती.. पण कुठल्या एका अपयशाने ती स्वप्नं झाकोळून गेल्यासारखे झाले होते. सबंध जीवनाला काळाच्या पडद्याआड झाकण्याची मनाने  तयारी केली होती.स्वयंप्रकाशित काजव्याने विझण्याचे ठरवले होते..? रात्रीचा एक वाजला होता.जीवन संपवून टाकायचं या विचारांच्या घोळात आतून एक सकारात्मक विचार अलगद मनात डोकावला.."अरे आपलं वय काय तर नुसतं १८ वर्षं... आणि आपण मरतोय...? माझ्यासमोर तर माझं अख्खं आयुष्य पडलंय... या ऑलम्पिकमध्ये जाता आलं नाही म्हणून का आपण एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा..? आणखीन चार वर्षाने ऑलम्पिक येणार आहेचं की....का मग आपण असा निर्णय घ्यावा..? .इथपर्यंत येण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आपण किती कष्ट घेतले आहे ते एका क्षणात वाया जाऊ द्यायचं का..?" आणि या अशा सकरात्मक विचाराने ती स्वतःला मालवू पाहणारी ती स्वयंप्रकाशित वात पुन्हा नव्या ऊर्जेने प्रकाशित झाली..मनातला काळोख दूर सारला.. निर्णय बदलला..आणि अखेर ती मरणाच्या दारातून वळून मागे आली.जवळची सुसाईड नोट फाडून टाकली..आणि एक ध्यास तिचा एक नवा श्वास बनला. खरं तर कांचनमाला सांगते की या वाईट काळात माझा खेळ माझ्यासोबत होता म्हणून मी वाचले..मी जे ही आहे ते माझ्या खेळामुळेच.. यावरून कळते की खेळाचं स्थान एका खेळाडूच्या आयुष्यात काय असतं.

                                 २००१४ -१६ या काळात कांचनमाला आपल्या स्विमिंग करिअर पासून  थोडी दूर राहिली दरम्यान.२०१६ ती विनोद देशमुख यांच्याशी विवाहबद्ध झाली.पण लग्नानंतरही स्वीमिंग प्रॅक्टिस सुरूच ठेवली होती. आणि मग पुन्हा तिने २०१६ ला कमबॅक केलं.२०१७ ला मेक्सिको येथे पॅराऑलम्पिक होणार होती.त्यासाठी ती कॉलिफायही झाली..आणि मग ती सज्ज झाली आणखीन एक नवा इतिहास रचण्यासाठी.. मेक्सिको येथे गेल्यानंतर तिथे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.तिथे पहिली अडचण आहे ती म्हणजे आपल्याकडील आणि तिकडील वेळेत जवळजवळ १२ तासांचा असणारा फरक . इकडे ज्यावेळी रात्र असते त्यावेळी तिकडे दिवस असतो..अशावेळी शरीरधर्माच्या  सवयीप्रमाणे इकडच्यावेळेनुसार ठरलेल्या वेळी तिकडे झोप येत असे.त्यावेळी तिकडे तर दिवस सुरू असायचा...त्यामुळे सुरुवातीला शरीराची ही सवय मोडणे आवश्यक होते.. त्यासाठी कांचनमाला (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २ वाजता ) मेक्सिकोमधील वेळेनुसार दुपारी २ ला स्विमिंगच्या प्रॅक्टिससाठी पाण्यात उतरायची. फायनल इव्हेंटच्या आहे  चार दिवस अगोदर  तिने अशी प्रॅक्टिस केली.उद्या फायनल इव्हेंट आहे म्हटल्यावर ती आदल्या रात्री एका मिनिटांसाठीसुद्धा झोपली नाही..संपूर्ण अवधान फक्त नी फक्त आपल्या खेळावर..कारण संपूर्ण देशाच्या अपेक्षा तिच्यावर असायच्या..देशाच्या अपेक्षांचे कधी ओझे वाटले नाही..अपेक्षांचं कधी टेन्शन घेतलं नाही तर तर ते नेहमी सकारात्मक घेत गेली. उलट या देशवासियांच्या अपेक्षा तिला एक नेहमी सकारात्मक ऊर्जा देत राहिल्या...माझ्या देशाकडून जर माझ्याविषयी एवढ्या अपेक्षा असतील तर मला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे हा आत्मविश्वास त्या अपेक्षांमुळेच दुणावायचा. 

                                            ६ तारखेला सकाळी तो इव्हेंट होता..कोणत्याही परिस्थितीत गोल्ड मेडल भारताला मिळवून द्यायचं त्यासाठी 'करो या मरो' हा निर्धार. हा निर्धार करूनच ती या स्विमिंग कॉम्पिटेशनमध्ये उतरली.सोबतीचे सगळे डोळस स्पर्धक होते. आणि झाली सुरुवात स्पर्धेला..कांचनमालाने प्रखर जिद्दीने सर्व शक्ती पणाला लावून तो इव्हेंट  इतक्या ताकदीने मारला की,ज्यावेळी तिने इव्हेंट फिनिश केला.तिला धड श्वास घेता येत नव्हता..शरीरातील.ऑक्सिजन कमी झाला होता..तिला ओमीटिंग होत होत्या..चेहरा पांढरा पडला होता.तिच्या जवळ लगेच तिचे प्रशिक्षक आले..एवढा त्रास होऊनही कांचनमालाने त्यांना विचारले.."सर काय झालं..?" तेव्हा प्रशिक्षक म्हणाले .."तू पहिली नॉर्मल तर हो.." मग नॉर्मल झाल्यानंतर 

प्रशिक्षकांनी तिला छातीशी कवटाळलं आणि सांगितलं.

"बेटा तू आपल्या देशाला गोल्ड मेडल दिलंयस.!"

बस..!!. 'याच साठी केला होता अटाहास.' ज्या साठी ही सगळी धडपड चालू होती... .कांचनमालाने भारताला ते पॅराऑलम्पिक जलतरणमधलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

हे यश झालेला आनंद तिच्यासाठी  सर्वकाही होता...पण त्या क्षणाची आणखीन आठवण कांचनमाला सांगते की, इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर तिच्या अवस्थेकडे पाहून तिचे प्रशिक्षक खूपच भावनिक झाले होते,ते तिला म्हणाले  "कांचन तुझा चेहरा पांढरा पडलाय..तुला अगोदरपासूनचं श्वास घेण्यास त्रास होत होता.ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तू सतत ओमेटिंग करत होतीस...या त्रासाची तुला अगोदर कल्पना होती..?"

"होय सर मला याची कल्पना होती पण मी या त्रासाकडे  दुर्लक्ष केलं कारण मी माझ्या देशासाठी खेळते आहे अशावेळी या त्रासापेक्षा मी माझ्या खेळावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केले..." 

 स्वतःला होणाऱ्या त्रासापेक्षा आपल्या देशासाठी समर्पित भावेनेनं झोकून देऊन खेळणं हेच खेळाडूंचं पहिलं कर्तव्य असतं. देशाला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर जो आपल्या देशाचा तिरंगा तिथे उंचावतो..आपल्या राष्ट्रगीताची धून वाजते आणि त्या क्षणाला सर्वजण उभे राहतात तो सुवर्णमयी क्षणच आमच्या खेळाडूंच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो असे कांचनमाला सांगते.

                    वयाच्या १० व्या वर्षांपासून स्विमिंग करिअरला सुरुवात आणि आज हा भव्य दिव्य  २० वर्षांचा यशस्वी कार्यकिर्दीचा विपुल असा प्रवास..डीस्ट्रिक लेव्हलपासून इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत कॉमनवेल्थ, ऑलम्पिक, पॅराएशियन,पॅराऑलम्पिक अशा जागतिक पातळीवर स्पर्धामध्ये सहभागी होऊन १०० मीटर फ्री स्टाईल,१०० मीटर बॅक स्ट्रोक,१०० मीटर ब्रेक स्ट्रोक,२०० मीटर इंडिव्हिज्युअल असे परफॉर्मन्स देऊन वर्ल्ड चॅम्पियनचा बहूमान कांचलमानाने मिळविला..आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, ब्राझील,चायना,जर्कि, डेन्मार्क, मलेशिया, मेक्सिको.अशा एकंदरीत १२ देशामध्ये तिने आपल्या खेळाचं प्रतिनिधित्व करून जळतर स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.आतापर्यंत तब्बल १२४ नॅशनल सुवर्णपदक आणि ११ इंटरनॅशनल सुवर्णपदक आणि ३ रजतपदक असा सुवर्णमयी बहुमान तिने प्राप्त केला आहे.ज्याची गणती करणे अशक्य आहे अशा अनेक पुरस्कारांनी कांचनमालाला सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकलव्य पुरस्कार तर भारत सरकारच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले आहे.

                                   हे सर्व करत असताना स्विमिंगच्या करिअर सोबत तिने अभ्यासाकडेही तेवढेच लक्ष दिले.१० व १२ ती पहिल्या वर्गाने  पास झाली.पदवी शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि इथेही प्रखर जिद्द,सचोटी आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर (खेळातील कामगिरीमुळे नव्हे) तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आज ती नागपूर येथील रिझर्व्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.सकाळी पाच वाजता कांचनमालाचा दिवस सुरू होतो. सकाळी व्यायाम,रोज सकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस..त्यानंतर ऑफिस काम पुन्हा संध्याकाळी ३ तास स्विमिंग प्रॅक्टिस असा रोजचा तिचा पूर्ण व्यस्त दिनक्रम असतो आणि यामध्ये पती विनोद देशमुख यांची मोलाची साथ तिला लाभते आहे.

                                  जन्मतः अंधत्व..पण त्या अंधत्वावर मात करून केवढं मोठं उदात्त कर्तृत्व सिद्ध करता येतं हे कांचनमालाने सिद्ध करून दाखवलं.दृष्टी तर सगळ्यांनाच आहे पण आभाळाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा आणि सातासमुद्रापार झेप घेण्याची भरारी घेण्याचा दृष्टिकोन नाही कुणालाही साधता येत.डोळ्यातल्या काळोखाने कधीच तिच्या यशाची वाट रोखली नाही..पण उभारत्या काळात एक अंध मुलगी म्हणून ज्या लोकांनी तिला हिणवलं तिला भक्कम साथ देणाऱ्या बापाला मूर्खात काढलं त्याच लोकांच्या डोळ्यांत तिने आपल्या लखलखत्या यशाने झणझणीत अंजन घातलंय.कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते शेवटी तेच खरं...खरं तर कांचनमालाच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांचा-कुटुंबाचा प्रशिक्षक डॉ.प्रविण लामखेडे यांचा खूप मोठा वाटा आहेच पण खासकरून तिच्या बाबांचा सिहांचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही.बाबा अगदी समर्थपणे तिच्या पाठीशी उभा राहीले...यशापयशाच्यावेळी जवळचा मित्र होऊन तिला धीर देत राहिले.प्रेरणेच बळ देत राहिले.

                 घरात पाच भावंडांमध्ये कांचनमाला व तिची अजून एक बहीण जन्मतः अंध निपजली पण कधीच कुणाकडून त्यांना वेगळी वागणूक मिळाली नाही.   सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांची जपणूक केली.लहानपणी कांचनमाला खूप खेळकर,खोडकर होती..कधी कधी अशा खोडकरपणामुळे तिने घरच्यांचा मारही खाल्लेला आहे. म्हणजेच काय तर दृष्टिविनाही तिचं लहानपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे गेलं आहे.त्यामुळे अंधत्वाचा न्यूनगंड कधीच तिच्या मनात निर्माण झाला नाही.. पण समाजाची एक रीतच असते..कुठे तरी कमीपणा शोधायची.. आणि म्हणूनच सुरुवातीला ज्यावेळी कांचनमाला स्विमिंग शिकत होती त्यावेळी तिचं कौतुक करायचं सोडून लोक टीका करू लागले.. आज अंध अपंग लोकांच्यात इतकं टॅलेंट भरलेलं असतानाही समाजाचा अजूनही त्यांच्याकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलत नाही.. पण इथे मान्य करावं लागेल की,दृष्टी नसतानाही कांचनमालाने अशा लोकांचा हा दृष्टिकोन बदलायला भाग पाडलं.पण समाजाने अशा डिसेबल लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे तरच अशा व्यक्ती पुढे येऊ शकतात.चांगल्या माणसांच्या तुलनेत अंध अपंग लोकांना १०% जास्त मेहनत करावी लागते तेंव्हा कुठे अशा यशापर्यंत पोहोचता येते त्यासाठी डिसेबल लोकांना उभं करण्यासाठी समाजाचं पाठबळ मिळणं जरुरीचे आहे असं कांचनमालाचे मत आहे.

                                    एखादी गोष्ट करताना ती अगदी मनापासून केली पाहिजे कांचनमाला म्हणते,ज्या वेळी मी शरीराने पाण्यात असते त्यावेळी मनानेही पाण्यातच असते..म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाशी आपण मनाने एकरूप असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही..त्यासाठी अपार मेहनत.. मनामध्ये प्रखर जिद्द ठेवून वाटचाल करावी लागते.एक अशी महत्वाकांक्षा उराशी बाळगावी लागते की, आपल्याकडून काही अभूतपूर्व घडवून आणू शकते.. आणि त्यातूनच मग घडतं एक असं उदंड कर्तृत्व..ज्याची कीर्ती जगभर पसरते...अखंड देशवासियांच्या हृदयात भरला जातो अभिमान..कोरलं जातं इतिहासाचं एक पान ..सुवर्णपदकांनी केला जातो बहुमान...मिळालेल्या आयुष्याचं सार्थक होतं...प्रत्येक क्षणांचं सोनं होतं...जसं आज आपल्या कर्तृत्वाने कांचनमालाने आयुष्याचं सोनं केलं. कांचनमालाचं हे नेत्रदीपक उदात्त उदंड असं कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी तर आहेच.पण तिच्याकडून प्रामुख्याने हे शिकायला मिळतं 

"हमारी हालतें, हमारी कमियां कोई मायने नहीं रखती ना कुछ कहीए|

कुछ पाना हैं कुछ कर दिखाना हैं तो हमारें हौसले बुलंद होने चाहिए |" 

अंधत्वावर मात करत जागतिक पातळीवर गाजवलेल्या कर्तृत्वानं भारतमाताही आज कृत कृतार्थ झाली असेल.अशाच कर्तृत्ववान मुली घराघरांत जन्माला याव्यात. भारतमातेच्या या लाडक्या जलकन्येला मनापासून सलाम..आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..


जय हो मंगल हो...

 - किरण चव्हाण (कोल्हापूर)

८८०६७३७५२८.






जन्म लेकीचा- किरण चव्हाण.


 जन्म लेकीचा...


माय माझी विनवणी मी आता करू कोणापाशी,

तू ही असा कसा गं घाव घालतेस माझ्या मुळाशी.

सांग तुझ्याशिवाय मी कोणाच्या गर्भात वाढायची ...?

तू पण जर अशी वागत असशील तर..

 मी आई कोणाला म्हणायची...?


खरंच का गं तुला वाटतं..?

मी जन्मालाच येऊ नये

जन्मानंतर एकमेकींनी तोंड कधीच पाहू नये.

बाबांनाही माझ्या काहीसं असंच वाटत का गं..?

मग त्यांना तू हवी,आई हवी, बहीण हवी पण पोटची मुलगी नको का गं..?


नशीबवान आहात आईबाबा तुम्ही 

तुम्हाला तुमच्या आईबाबाने जन्म दिला,

मीच दुर्दैवी  जन्माला येण्याअगोदर तुम्ही माझा जन्म नाकारला.

तुमच्या पोटी येण्याचा असा मी हो कोणता गुन्हा केला?

गर्भातच खुडून टाकता का हो एवढी मोठी शिक्षा मला..?


तुम्हांला दिवा हवा वंशाला , तर गर्भपात करून पैसा हवा कुणाला,

स्वार्थ साधताय तुमचा तुम्ही पण माझ्या जीवाचा कोण घेणार हवाला..?

निर्लज्ज आहेत नराधम ते त्यांना लाज जनाची ना मनाची,

पण तुम्हालाही आईबाबा कस कळू नये मुलाच्या हव्यासापोटी हत्या करताय पोटच्या मुलीची.


या नराध्यमांच्या नादी आई तू ही कशी लागलीस गं..?

नदी नाल्यांच्या काठाने पुरताना मला तुला काहीच कस नाही वाटलं गं...?

खरंच आईपणाच्या नात्याचा तू आता लिलाव केलास आहेस का...?

गर्भातील तुझ्या या वासराला 

कसाबांच्या हाती तूच दिलस का?


शेवटी आई एवढंच मला तुला सांगावस वाटतं,

मलाही जन्माला येऊन हे जग पहावंस वाटत.

तूच ठरव मला जन्माला घालायचं कि नाही शेवटी तुझा अधिकार आहे ,

स्वार्थासाठी लोक काहीही करतील तुझ्या उदरात नाळ माझी तुझ्याशी जोडली आहे .


मी करेन ते स्वप्न पूर्ण मी होईन तुमच्या वंशाची पणती,

करीन घरादाराला समृद्ध लावीन संस्कृतीच्या नव्या ज्योती.

थकलेल्या तुमच्या आयुष्यात मी होईन जीवाचा आसरा तुमचा,

विश्वास ठेवा माझ्यावर अभिमान वाटेल तुम्हाला असा सार्थ करीन हा जन्म लेकीचा.

      (समर्पित... प्रत्येक लेकीला)

              

माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.

  माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास.                          ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली प...